मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

Her Voice Her Choice

Her Voice, Her Choice
Her decision, Her life

Her distorted life, Family problem
Her repentance, Curtural problem

Her broken mind, Career problem
Her love life, Society matter

Her success, Women empowerment
Her failures, Male dominance

Her excessive demands, Pampered parents problem
Her chaste emotions, Humiliated men problem

Her social duties, Our religious problem
Her freedom of expression, Progressive beliefs problem 

Her murder, Our problem
Her rape, Patriarchal problem

©Bhushan Vardhekar 
15 November 2022
Pune - 412115

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

लढाई

आमची लढाई, तुमची लढाई
त्यांची लढाई, ह्यांची लढाई
आतली लढाई, बाहेरची लढाई
गल्लीतील लढाई, दिल्लीतील लढाई

मनातील लढाई, घरातील लढाई
एकट्याची लढाई, दुकट्याची लढाई
शांततेसाठी लढाई, वर्चस्वासाठी लढाई
रक्षणासाठी लढाई, संरक्षणासाठी लढाई

मिरवण्याची लढाई, दिखाव्याची लढाई
आस्तित्वाची लढाई, निकराची लढाई 
अटीतटीची लढाई, मेटाकुटीची लढाई 
शहाण्यांची लढाई, मुर्खांची लढाई

गटागटात लढाई, तटातटात लढाई
सामाजिक लढाई, राजकीय लढाई
जातीअंताची लढाई, जातीपातीची लढाई
विचारांची लढाई, आचारांची लढाई

सत्तेची लढाई, खुर्चीची लढाई
मंत्र्यांची लढाई, नेत्यांची लढाई
पदांची लढाई, प्रतिष्ठेची लढाई
भक्तांची लढाई, गुलामांची लढाई

अंधश्रद्धेशी लढाई, प्रथांशी लढाई
रुढींशी लढाई, परंपरांशी लढाई
दैववादी लढाई, विवेकवादी लढाई
सांस्कृतिक लढाई, सदाचारी लढाई 

पक्ष वाढवण्याची लढाई, पक्ष संपवण्याची लढाई
बंड क्षमवण्याची लढाई, बंड पेटवण्याची लढाई
सरकार करण्यासाठी लढाई, सरकार पाडण्यासाठी लढाई
विरोधकांची अंतर्गत लढाई, विरोधकांची कमीशनची लढाई

जनतेची जगण्याची लढाई, महागाईशी कमाईची लढाई,
बेरोजगारीशी बेकारांची लढाई, शेतकऱ्यांची निसर्गाशी लढाई 
कर्जबाजाऱ्यांची बॅंकेशी लढाई, मजूरांची भांडवलदाराशी लढाई
मानवतेची माणसाशी लढाई, सौहार्दाची ढोंगाशी लढाई 

©भूषण वर्धेकर
३१ मे २०२२
पुणे -४१२११५



शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

समाजमाध्यांकित विचारवंत होण्याची दशसुत्री


१. सर्वसामान्य जनतेला ठाऊकच नसलेल्या परकीय लेखकांच्या पुस्तकांची यादी तयार करून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल माहिती वाचावी
२. ही माहीती मराठीत अशा पद्धतीनं लिहायची की वाचणाऱ्याला मूळ लेखकाचे सगळं प्रकाशित अप्रकाशित साहित्य कोळून प्यायला की काय असं वाटावं! ही लिहिलेली माहिती सोप्या आणि जड भाषेत लिहून समाज माध्यमातून पोहोचवावी. सोपी भाषा सर्वसाधारण वाचक तर जड भाषा प्रगल्भ वाचक.
३. प्रगल्भ वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास असे वाचक कसे फक्त लोकप्रिय आणि रसिकप्रिय लेखकाची पुस्तके वाचतात यावर काथ्याकूट करायचा. अशी मंडळी कशी प्रतिगामी अवैज्ञानिक आणि बुरसटलेल्या मानसिकतेची असतात यावर पोष्टी पाडायच्या. 
४. सर्वसाधारण वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास अशा वाचकांना साहित्यिक जाणच नाही यावर प्रदीर्घ पोस्ट लिहायची. त्यात त्यांच्यावर ब्राह्मणवादी संस्कृती आणि सनातन विचारांचा प्रभाव कीती खोलवर आहे असे टिकात्मक लिखाणातून ठोसपणे लिहायचे.
५. जर दोघांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला तर. तर भांबावून न जाता क्रमांक १,२ आणि ३ ची च्या कृती पुन्हा करायच्या. फक्त प्रगल्भ वाचकांना ठाऊक असलेल्या परकीय लेखकांच्या साहित्याबद्दल सोप्या भाषेत लिहावे सर्वसाधारण वाचकांसाठी. इथे वैचारिक प्रमोशनसाठी आणि आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नामी संधी मिळते. त्यात सामान्य वाचन करणारे लोक मिळाले तरीही बेहत्तर. अशी सुवर्ण संधी सोडायची नाही. आत्मप्रौढी मिरवताना लिखाणातून सेल्फ ऍपिझमेंट करणं महत्वाचं. मी कशाप्रकारे कसलीही सामाजिक राजकीय आर्थिक आणि परंपरागत पार्श्वभूमी नसताना इथपर्यंत आलो आणि टिकलो हे दाखवून द्यावे. इथे स्वतःच्या सामाजिक, साहित्यिक, वैचारिक आणि पुढारलेल्या मानसिकतेचा अवाका दाखवून देण्यासाठी जगप्रसिद्ध पाश्चिमात्य देशांमधील विचारवंतांची पुस्तकं वाचून स्वतःला बदलत गेलो हे ठशीवपणे लिखाणातून मांडावे.
६. एवढं सगळं कशाचीही अपेक्षा न ठेवता जोपर्यत करावे तोपर्यंत तुमचे समाजमाध्यमात फॉलोअर्स वाढत नाहीत. जर फॉलोअर्स वाढले तर त्यांच्यापैकी आर्थिक क्षेत्रात सधन लोकांच्या सानिध्यात राहून वैचारिक मंथन करावे. फॉलोअर्स पैकी कोणी राजकीयदृष्ट्या फायद्याच्या दृष्टीने समक्ष असेल तर संमेलने, चर्चासत्र वा साहित्यिक मेळावे यासाठी आग्रही असावे. या सगळ्यात आपण फक्त मार्गदर्शक म्हणून वावरावे. एक्टीव्ह पार्टिसिपेशन टाळावे आणि दिवसभर जरी घरी रिकामे असलो तरी आगामी मोठ्या प्रोजेक्ट्स बद्दल तयारी चालूय म्हणून वायरी सोडाव्यात. त्यात एखादा शिष्यवृत्ती योजना देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर मुद्दामहून बहुजन होतकरू लेखकाची नावे पुढे करावीत जेणेकरुन त्यांना वैचारिक व्यासपीठावर फुटेज मिळेल व त्यांच्या लेखी तुम्ही ऋषितुल्य व्हाल.
७. इथपर्यंत जर सगळं सहज शक्य नाही झालं तर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे आपण लिखाणातून अशाप्रकारे अवलोकन आणि सिंहावलोकन करावे की सभोवतालच्या समाजातील लोकांचा आयक्यू हा अश्मयुगीन आहे. आणि जग खूप पुढे गेले तरीही ही मंडळी नॉस्टॅल्जिक चिखलात लोळणारी आहेत असे तिखट शब्दांत सांगावे. 
८. जर कोणी तुमची दखल घेतलीच तर आजूबाजूच्या वातावरणात कल्लोळ माजला असून तुम्ही माझ्यासारख्या पामराची दखल घेतल्याने समाजात अजूनही सुधारणा होण्यासाठी खूप वाव आहे असे छातीठोकपणे सांगावे. त्यासाठी स्वखर्चाने छोटेखानी कार्यक्रम आयोजित करावेत.
९. एवढे प्रयत्न करूनही हाती काहीच लागले नाही तरी नकारात्मक आणि नैराश्याच्या वाटेवर जाऊ नये. जर तशीच अवस्था जाणवली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शोषितांच्या, वंचितांच्या, दुर्लक्षित बहुजनांच्या, विस्थापित विस्कटलेल्या जनजाती, आदिवासी लोकांच्या बद्दल तळमळीने लिखाण करावे. त्यांच्यावर सांस्कृतिक दहशतवादाचे सावट आणि आव्हान कसे वाढतेय यावर लिखाण करावे. अशी मंडळीचे ब्राह्मणीकरण होण्यासाठी वर्चस्वतावादी संघटना, नेते कसे कारणीभूत आहेत यावर धाय मोकलून क्रंदन करावे.
१०. ही शेवटची कृती. एवढे सगळे खटाटोप करूनही कोणी म्हणजेच कोणीही तुमची दखल घेतली नाही तर कृती क्रमांक १, २ आणि ३ पुनः एकदा करावी. फरक एकच. आता लोकप्रिय, रसिकप्रिय, सर्वसामान्य लोकांना परिचित असलेल्या लेखकांचं साहित्य उपयोगात आणावे.

® भूषण वर्धेकर
पुणे- ४१२११५
३० सप्टेंबर २०२२
वेळ - वामकुक्षी घेण्यापूर्वी

रविवार, १० जुलै, २०२२

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

आर. माधवन दिग्दर्शित रॉकेट्री चित्रपट नव्या युगात वैज्ञानिक राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ ठरेल असा बनवला आहे. आजवर ऐतिहासिक राष्ट्रवाद ऊतू जाईल एवढे सिनेमे आलेले आहेत. अशा प्रत्येक चित्रपटात कोणाला कोणीतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. किंवा शत्रू पक्ष म्हणून ठरवून चित्रपटाची बांधणी आणि मांडणी करतात. रॉकेट्री चित्रपट मात्र भलेही राष्ट्रवाद, वैज्ञानिक क्षेत्रातील घडामोडी यावर आधारित असेल तरीही भडक आणि भंपक वाटत नाही. यात कोणीही कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कसलेही आडाखे तडाखे दिलेले नाहीत. काही शक्यता असू शकतात, प्रशासन शासन आणि यंत्रणा यातील त्रुटींवर तिखट भाष्ये केली आहेत. वैज्ञानिक क्षेत्रातील संस्था कशा काटकसरीने कारभार करतात हे यात व्यवस्थित योजनाबद्ध पद्धतीने दाखवले आहे. अर्थातच नंबी नारायण यांच्या आयुष्यातील आलेले आणि आणलेले चढ उतार आर. माधवनने काही फिल्मी तर काही रोमांचक पद्धतीने दाखवले आहेत. आर. माधवन तसा जबरदस्त टॅलेंट असलेला अभिनेता. या सिनेमात अभिनयाच्या बाबतीत तर तो उजवाच ठरलाय. दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा समोर येतोय. सिनेमा मेकिंग चे बारकावे टिपण्यात तो कमालीचा यशस्वी ठरलाय. मध्यंतरापूर्वी चित्रपट मनाची पकड तर घेतोच. शिवाय स्वातंत्र्योत्तर काळात कशाप्रकारे वैज्ञानिक क्षेत्रात भारतीय वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि संस्था उभ्या राहत हे पण काही संदर्भातून समजतं. मध्यंतरानंतर सिनेमा थोडासा रेंगाळलेला वाटला मला. कदाचित ते दिग्दर्शकाने नंबी नारायण यांचा संघर्ष एस्टॅब्लिश करण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असावी. 

सिनेमा दोन पातळ्यांवर समांतरपणे घडतो एक नंबी नारायण यांची कारकीर्द कशी घडत गेली, कशा पद्धतीने त्यांच्या विरोधात आरोपांची चौकशी झाली आणि त्याचा लढा. दुसरी पातळी म्हणजे भारतीय अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांच्या प्रयत्नांना मिळणारे यशापयश. हे दाखवताना दिग्दर्शकाने कोणालाही लार्जर दॅन लाईफ दाखवले नाही की मेडिया ट्रायल करतात त्याप्रमाणे अमुकतमुक आरोपी ठरवून भाषणबाजी दाखवली नाही. नंबी नारायण यांचा लढा हा फार वेगळा आहे. त्यामुळे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची स्वयंपूर्ण यंत्रणा सहज उभी न राहता अडखळली. अर्थात यात बऱ्याच कॉन्स्पीरेन्सी थिअरीज आहेत. हॉलिवूडमध्ये अशा एकेका थिअरीच्या एकेका थ्रेडवर किमान एक सिनेमाची सिरिज होऊ शकते. माधवन ने मात्र त्याचा हात आवरता घेतलाय. टू द पॉईंट गोष्ट सांगून सगळ्या सरकारी यंत्रणा, प्रशासकीय करभार पाहणारे मंडळी यांच्या मर्यादा किमान सिन्स मध्ये कमाल दाखवल्या आहेत. मुळातच स्वातंत्र्योत्तर भारतात कोणत्याही क्षेत्रात जे जे काही घडले ते पायोनियर असेच होते. टीम वर्क तसेच होते. इथे कोणी हिरो नाही व्हीलन नाही. फक्त विज्ञान क्षेत्रातील परिवर्तनाचा बदलांचा वेग प्रचंड मंदावलेला होता. त्यातही भारतीय वैज्ञानिकांनी किमान उपलब्ध असलेल्या स्रोतांचा वापर करून बऱ्यापैकी यशस्वी प्रयोग केले. या आशयाचे अनेक चित्रपट, ओटीटी वरील निवडक सिरिजेस पाहिल्यावर तशी कल्पना येते. मात्र या रॉकेट्री सिनेमात लाईफ ऑफ नंबी नारायण कसलेही आढेवेढे न घेता दिग्दर्शकाने दाखवली आहे. शेवटचं खरेखुरे नंबी नारायण यांचं वक्तव्य विचार करण्याजोगे आहे. त्यांच्या एकूण लढ्याला मिळालेला पाठिंबा त्यांच्या वर झालेले आरोप हल्ले पाहून असे कितीतरी वैज्ञानिक क्षेत्रातील शापित गंधर्व आज आपल्या देशात राहतात असे जाणवते. देशासाठी काहीतरी करण्याचा संघर्ष फक्त सामाजिक, राजकीय, आर्थिक असतो असं नव्हे. वैज्ञानिक क्षेत्रात जेवढे अमुलाग्र बदल होतील त्यासाठी लागणारा राजकीय आणि आर्थिक पाठींबा जर कणखर असेल तर देश महासत्ता, स्वयंपूर्ण वगैरे नक्कीच होऊ शकेल. त्यासाठी सोडवाव्या लागणाऱ्या समस्या ह्या अंतर्गत गुंतागुंतीच्या असतात. हल्लीच्या भाषेत देशाचा जीडीपी वाढवायचा असेल किंवा अमुकतमुक ट्रिलियन वगैरे अर्थव्यवस्था करायची असेल तर मूलभूत वैज्ञानिक संशोधन आणि त्याचे प्रभावीरीत्या उपयोजन करणे खूप गरजेचे आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन जेवढे स्वावलंबी तेवढे राष्ट्री स्वयंभू. मात्र आपल्याकडे असणारी वैज्ञानिक क्षेत्रातील, संशोधन क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनास्था ह्या कधीही राजकीय पटलावर आल्या नाहीत. जातपातधर्म आणि सोकॉल्ड विचारधारा यावरच सगळ्या राजकीय कुस्त्या झाल्या. त्यामुळे वैज्ञानिक अधोगतीला राजकीय इच्छाशक्ती, वैज्ञानिक दृष्ट्या मागासलेल्या विचारधारा, शैक्षणिक उदासीनता आणि ढिसाळ कारभारी ह्याच कारणीभूत आहेत. भारतीय लोक बुद्धीमान आहेतच यात वाद नाही मात्र त्यांचं टॅलेंट देशासाठी वापरण्यासाठी आवश्यक असलेला सामाजिक आणि राजकीय प्रगल्भता कोणाकडे नाही. तशी व्यवस्था पण या देशात बळकट नाही.

सिनेमात बऱ्याच वैज्ञानिक संकल्पना आणि मूलभूत नियमानुसार केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक चाचण्या यांच्याबद्दल बरेच उल्लेख आहेत. जे लोक विज्ञानाच्या किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात असतील त्यांना ते ओळखीचे नक्कीच वाटतील. इंटरनल कंबशन इंजिन आणि त्याचे कार्य वगैरे कधीकाळी अभ्यासताना द्रवरूप आणि स्थायूरूप इंधन, दाब आणि हीट, मास ट्रान्सफर वगैरे संदर्भ उगाचंच आठवत होते. औद्योगिक क्रांती झाली आणि अशी सगळी कारणीभूत ठरलेली आयुधं, साधनं आणि यंत्रे सार्वजनिक जीवनात कमालीची परिचयाची झाली. त्यामुळे अनेक विद्याशाखा तयार झाल्या प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी त्यातून बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उलाढाली झाल्या वगैरेचा सालंकृत इतिहास हा सिनेमात कुठेन् कुठेतरी डोकावतो. त्या वैज्ञानिक पद्धतीने जास्त विस्तृतपणे जर सिनेमात दाखवल्या असत्या तर अजून मजा आली असती. कदाचित दिग्दर्शकाने सिनेमा माहितीपट होऊ नये म्हणून जागोजागी हात आवरता घेतलाय की काय असे जाणवते. 

एकूण पहिलाच प्रयत्न आहे माधवनचा दिग्दर्शक म्हणून असे जाणवत नाही सिनेमा बघताना. सिनेमात दाखवलेल्या इतर पात्रांनी पण साजेसा अभिनय केला आहे. उगाचंच मेलोड्रामा कटाक्षाने टाळलेला जाणवतो. फिल्मी टेकिंग आहे बऱ्याचशा सीन्समध्ये. भारतीय सिनेमा म्हटलं की चालायचंच. मात्र अभिनय उत्तम. बॉडी लँग्वेज आर. माधवनने भारी पेललीय. टेक्निकल आस्पेक्ट्स सिनेमात येत राहतात. सरतेशेवटी संघर्षाची कहाणी ही मानवी पातळीवर आणायची असेल तर कौटुंबिक ससेहोलपट दाखवली की निम्म काम सोपं होतं कोणत्याही घटनेचं. त्यात सिनेमात हे येतंच येतं. एवढं सगळं सहन करून लढण्याची जिद्द शेवटपर्यंत ठेवणं हे फार जिकिरीचे असते. ते प्रत्यक्षात नंबी नारायण यांची याची देही याची डोळा अनुभवलं आहे. शेवट कटू गोड व्हावा तसा नंबी नारायण यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार, त्यांचा निर्दोषत्वाचा कोर्टाने दिलेला निकाल आणि त्यांना मिळालेल्या भरपाया याचे धावते संदर्भ सिनेमात शेवटी येतात. मोदींच्या भाषणाचा एक व्हॉईस ओव्हर शेवटी येतो. तो ऐकून नेहरू भक्त दुखावतात बहुतेक असे वाटते. उद्या ते अशी ही मागणी करतील की नेहरुंनी वैज्ञानिक क्षेत्रातील ज्या ज्या संस्थांची पायाभरणी केली त्याचे पण संदर्भ सिनेमात असायला पाहिजेत. चालायचंच ही भक्तमंडळी भारतीयांना मनोरंजनासाठी मिळालेली सर्वात डोकीदुखीयुक्त मेजवानी आहे. असो. पण हा रॉकेट्री सिनेमा एकदा का होईना बघितलाच पाहिजे. विज्ञानविषयक विद्याशाखेच्या लोकांना हा सिनेमा पाहताना लढा, संघर्ष करण्यासाठी कशा आणि किती खस्ता खाव्या लागतात हे समजेल. 

©भूषण वर्धेकर
१० जूलै २०२२
पुणे

गुरुवार, १९ मे, २०२२

दि ग्रेट एडव्हेंचर

 

नथुराम गोडसे आणि औरंगजेब
एकाने एका हिंदूला मारले
दुसऱ्याने अनेक हिंदूंना मारले
नथुरामचे समर्थन करणारे
नेहमीच द्वेषाचे धनी असतात
औरंग्याच्या कबरीवर फुले, चादर चढवणारे
इतिहासाची आब राखणारे असतात म्हणे
थोडक्यात काय,
तुम्ही एकाला मारता की अनेकांना
यावरून इतिहासात खलपुरुष ठरतो
एकाला मारण्याचा इतिहास पारदर्शक असतो
अनेकांना मारल्याचा इतिहास संदिग्ध असतो
कबर, समाधी आणि अस्थी
ज्याची त्याची प्रेरणास्थाने
आजूबाजूला मांडली गेली
अलौकिक वैचारिक दुकाने
दुकाने चालण्यासाठी विक्रेता,
ग्राहक, उत्पादक सदैव सत्पर
सोबत येतातच गुंतवणूकदार,
विपणन शीघ्र सत्वर
प्रत्येकाने नेमलाय एक्स्लुसिव्ह डीलर
विथ एक्सीक्युटिव्ह एरिया मॅनेजर
धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती हे
संविधानाने बांधणे हेच दि ग्रेट एडव्हेंचर
©भूषण वर्धेकर
१९ मे २०२२
पुणे

रविवार, ३ एप्रिल, २०२२

मी वसंतराव

मी वसंतराव - कलाकाराचा मनस्वी संघर्ष

एखाद्या कलाकाराला किती पातळीवर संघर्ष करावा लागतो ते केवळ तो कलाकार आणि त्याचे सखेसोबतीच जाणतात. त्यांच्या संघर्षाचे असे काय महत्त्व जे त्यांच्या कलेत उतरते? ते बघायचे असेल तर सध्याचा मी वसंतराव हा चित्रपट बघणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात असे अनेक कलाकार लोकांपर्यंत उशिरा आले. पण जेव्हा आले तेव्हा कायमस्वरूपी आरूढ झाले. मी वसंतराव हा चित्रपट फक्त वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल आहे का? नाही तो फक्त एक बायोपिक नसून महाराष्ट्रात नाटक, संगीत वगैरेवर घडामोडींचा एक कालपट आहे. ज्यात वसंतरावांचा एका पठडीबाहेरील गवय्याचा प्रवास आहे. वसंतराव रुढार्थाने कोण्या एका घराण्यातील नावाजलेले गायक नव्हते. त्यांनी गाण शिकण्यासाठी जो संघर्ष केला स्वतः मध्ये गाणं जीवंत ठेवून जगण्यासाठी जी धडपड केली त्याचा जातीवंत लढा चित्रपटात दाखवला आहे. चित्रपटात कुठेही अतिरिक्त आर्टिस्टिक लिबर्टी घेऊन उगाचंच काहीही घुसडलेलं नाही. वसंतरावांचा एकाकी प्रवास त्यात आपसूकच येणारे कुटुंबीय आणि जीवाभावाचे सखेसोबती याची सांगीतिक मैफल आहे. अभिनय, संगीत, दिग्दर्शन तोडीस तोड जमलंय. 

रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचं कसब मैफिलीत जसं जमवावं लागतं अगदी तसंच चित्रपटात दिग्दर्शकाने जमवलंय. चित्रपटात कुठेही प्रेक्षक बाहेर पडत नाही. गाणी तर आत्म्यासारखी आहेत. कुठेही अमुक एक गाणं उगाचंच आलंय असं अजिबात वाटणार नाही. दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत पदोपदी दिसते. अभिनेता म्हणून राहूल देशपांडे कुठेही अवघडल्यासारखे वाटत नाहीत. वसंतरावांचा एकाकी लढा आणि सांसारिक ओढाताण कुठेही मेलोड्रामा वाटत नाही हे दिग्दर्शक निपुणचे कौशल्य. गाण्याच्या वेगवेगळ्या शैली हाताळणे सहजसाध्य नाही. ते राहूलने जबरदस्त पेललंय. सर्वात ठशीव भूमिका लक्षात राहते ती राधिकाची. वसंतरावांची आई. वसंतरावांची आई ही भूमिका ज्यापद्धतीने तीने केलीय ते लाजवाब.  तिच्या वागण्यात नागपूरी हिसका आहे तो भारीय. छोट्या भुमिकेतून येणारे दिनानाथ मंगेशकर अमेयने ताकदीने उभे केलेत. वसंतरावांचे मामा थोड्याच वेळेसाठी येतात. आलोकने त्या तेवढ्याशा भुमिकेतून मजा आणलीय. नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत कलाकारांचे आयुष्य कसे वेगवेगळ्या परिस्थितीत व्यतीत होते हे प्रेक्षकांना समजते. गाणाऱ्याला रसिक प्रेक्षक काही मिनिटांसाठी ऐकतात मात्र ती काही मिनिटे गायक कसा घडलेला आहे हे समजत नाही. त्याचे चरित्र वाचल्यावर किंवा त्या गवय्याचे किस्से ऐकल्यावर समजतं. हा चित्रपट एकूण गयक व त्याची फुलत गेलेली गायकी यावर मार्मिक भाष्य करतो. दिग्दर्शक आणि टिमने चित्रपटासाठी घेतलेली मेहनत प्रत्येक सीनमध्ये दिसते. स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळ उभा करणे अवघड काम. पण चित्रपटाच्या प्रॉडक्शन टिमने घेतलेली मेहनत अप्रतिमच. डिटेलिंगवर निपूण ने केलेले काम लगेचच दिसते. मला इथे आशुतोष गोवारीकरची आठवण येते. खूप कमी दिग्दर्शक आहेत जे सिनेमात बारीकसारीक गोष्टींवर फार डिटेलिंगमध्ये काम करतात. 

मी वसंतराव चित्रपट कोण्या एका पुण्या-मुंबई मध्ये स्ट्रगल करण्याऱ्या गायकाचा सिनेमा नसून एक गायनावर निस्सीम प्रेम करणारा, रसिकांना वेगवेगळे काही देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अस्सल  बहुआयामी गवय्याचा प्रवास आहे. कितीतरी गवय्ये लोकांपर्यंत पोचण्यासाठी धडपडत असतात. काहींना यश लगेच लाभतं. काहींना उशीरा लाभतं. ज्याचं त्याचं प्राक्तन. वसंतरावांची गाणं शिकण्याची धडपड, त्यातलं नवनवीन शोधण्याचा प्रवास फार महत्वाचा आहे. गायन क्षेत्रात प्रचलित असलेली घराणी, त्यांच्या गायकीतल्या वैशिष्ट्यपूर्ण लकबी वगैरे जाणकारांचे अत्यंत जवळचे. मात्र वसंतरावांची शैली ही फार वेगळी. कोणत्याही अमुकतमुक घराण्याच्या नियमानुसार बांधलेली नाही. गायन हाच ध्यास आणि श्वास हे मूल्य जपणारे वसंतराव चित्रपटात पदोपदी दिसतात. याच्यासोबत जी जी पात्रे येतात ती अगदी सहजपणे. उगाचंच तत्कालीन व्यक्तीच्या काळातील संबंधीत प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कुठेही घुसडलेली नाहीत. सगळेच संदर्भ आटोपशीर ठेवल्यामुळे सिनेमा गोळीबंद झालाय. वसंतरावांच्या जवळच्या खास दोस्तांपैकी पु.ल. होते. त्यांचे कालानुरूप संदर्भ फार महत्त्वाचे आहेत. पु.ल. च्या भूमिकेत पुष्करने घेतलेली मेहनत फार मोठी आहे. सहजसुंदर नैसर्गिक चालणं, वागणं, बोलणं फार भारी जमलंय पुष्करला. 'आता मी पु.ल. सादर करतो' म्हणून स्टिरिओटाईप अविर्भाव आणून अभिनय त्याने केला नाही. पुलंचे सगळेच विनोद उस्फुर्त होते. तसे पुष्करने सादर केले आहेत. चित्रपटात सगळ्यांचे अभिनय झकासच झाले आहेत. आलोक, अमेय, सारंग, अनिता, राहूल ही सगळी मंडळी एक वेगळीच दुनिया उभी करतात पडद्यावर. 

कोणत्याही गायनक्षेत्राशी संदर्भात चित्रपट करायचा म्हटल्यावर त्याचा प्रेक्षकवर्ग हा विभागला जातो. कारण प्रत्येक गायनाची स्वतःची अशी वेगळी ओळख आणि वेगळा बाज. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या. भावगीते, सुगम संगीत, ठुमरी, खयाल, नाट्यसंगीत वगैरे लोकांमध्ये लोकप्रिय. काही लोकांना अमुकतमुक संगीत आवडत नाहीत तमुकच आवडतात. जे आवडतं तेच खपलं जातं. तेच प्रसिद्ध होतं. अस्सल रसिकांना कोणतेही गायन वर्ज्य नसतं. मात्र प्रचलित गायनाशी निगडीत नसलेलं लोकांनी स्विकारणं थोडं अवघड असतं. मग ते सादर करणाऱ्या गायकाला तशी मान्यता मिळणं त्याहूनही अवघड. वसंतरावांचा अशा सगळ्या घटनांशी आलेला जवळचा संघर्ष हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. 'कट्यार'मुळे खऱ्या अर्थाने वसंतरावांची लोकप्रियता वाढू लागली. त्याआधी मित्रमंडळी, ठराविक गायनक्षेत्राशी निगडीत लोकांना वसंतराव माहिती होते. सांसारिक जबाबदाऱ्या आणि पुर्णवेळ गायन याचा सहजतेने चाललेला लढा चित्रपटात येतो. कशाचीही अतिशयोक्ती न करता हे फार महत्त्वाचे. हा चित्रपट बघताना आणि ऐकताना भारावून जातो. चित्रपटाची गाणी प्रासंगिक आहेत पण लाजवाब. राहूलने गायलेली लावणी आणि सहजसुंदर अभिनय हे फारच वेगळ्या लेव्हलवर जातं. शेवटचे 'कैवल्य' गाणं तर मनात दीर्घकाळ रुंजी घालते. 

हा सिनेमा गायक कसा घडतो आणि कशाप्रकारे गाणं घडतं हे दाखवणारा आणि ऐकवणारा आहे. एखाद्याला हा चित्रपट पाहून गायनाशी एकरूप होण्यासाठी साधना कशी करावी हे समजेल. चित्रपटातील अगदी छोटे छोटे प्रसंग तत्कालीन परिस्थिती कशी होते आणि प्रत्यक्ष त्याला सामोरे जाताना वसंतरावांनी कसे तोंड दिले हे खूप काही सांगून जातात. वसंतराव कसे घडले हे तर सिनेमा दाखवतोच पण पॅशन, पेशन्स, पर्सिस्टन्स किती महत्त्वाचा आहे ह्यावर भावनिक भाष्य करतो. सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर मनात आणि कानात एक वेगळाच नाद रूळतो. 

एखाद्याला आवडणारी गोष्ट पूर्णवेळ करायची असल्यास अनेक अडचणी येतात. काही अर्धवट सोडतात. काही पुढे रेटतात. काहींना यश मिळतं. काहींना मिळत नाही. काहींच्या कला लोकांपर्यंत जातात. काहींच्या जात नाहीत. काहींना काय करावे कसे करावे हे समजत नाही. असं वैचारिक द्वंद्व असलेल्या लोकांनी हा चित्रपट तर जरुर बघावा. एखाद्या व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास नक्कीच लढण्यासाठी बळ देतो. हा चित्रपट असाच कलाकाराचा मनस्वी संघर्ष दाखवतो.

© भूषण वर्धेकर,
३ एप्रिल २०२२, पुणे.


रविवार, २७ मार्च, २०२२

आरंआरंआरं

आरं आरं आरं

बाबाओ, काय बघितलं मी कायचं समजून न रहायलं.. आरं आरं आरं

एका आदीवाशी पोरीला इंग्रजाची बायको घेऊन जाते मग इंग्रज कश्शे निष्ठूर असत्याय ते बी पिक्चर मध्ये येतंय. मग आदीवाशी लोकांचा भीम नावाचा पयला  हिर्रो त्या मुलीला आणण्यासाठी दिल्लीत धडक मारतो. वेश बदलून अख्तार म्हणून राहतो. तोवर इकडे इंग्रजांची पोलीससेवा करणारा दुसरा हिर्रो राम हा लय भारी हजारो लोकांचा मार खाऊन तितक्याच लोकांशी मारधाड करून एका माणसाला अटक करतो. दोन्ही हिरोंची भेट व्हण्यासाठी एका गरीब बिचाऱ्या पोराला यमुना नदीत मासे पकडायला पाठवत्यात. मग मग नदीवरच्या पुलावरनं रेल्वे जखताना डायरेक्ट लोखंडी चाकाला आग लागते मग तीच आग पाण्यात पण लागते. मधोमध तो बिचारा पोरगा. नंतर हाय लय भारी स्टंट. एक हिरो इकडून घोड्यावर दुसरा हिरो तिकडून फटफटीवरुन कमरंला दोरी बांधून खाली पुलावरनं उड्या मारत्यात. घोड्यावरचा हिरो उडी मारताना 'वंदे मातरम' लिवलेला झेंडा घेतो. (हा झेंडा सावरकर, भिकाजी कामा व शामजी कृष्ण वर्मा यांनी डिझाइन केलेला आहे १९०७ साली. वाचकांच्या खास माहिती साठी. १९०४ ते १९३१ काळात झेंड्याच्या डिझाइन मध्ये वेगवेगळे बदल झाले. कारण सिनेमाचा काळ १९२० च्या आधीचा आहे. असो.) मग दोघंबी दोरीला लटकून  पयल्यांदा मासं पकडणाऱ्या पोराला वचिवतात. मग एकमेकांना वाचिवतात. मग नदिच्या तळाशी स्टंट करत्यात. मग जिग्री दोस्त व्हत्यात. तोवर आदिवाशी पोरगीला वाचवण्यासाठी एक हिरो जंगली प्राणी घेऊन हल्ला करतो. त्याला अटक करण्यासाठी दुसरा हिरो त्याच्या मागे लागतो. मग फुल इमोशनल ड्रामा, मेलोड्रामा, डायलागबाजी. 
मग परत भांडत्यात एकमेकांना लय मारत्यात. पहिल्या हिरोला अटक व्हते. त्याला शिक्षा होते. तोवर हिकडं दुसऱ्या हिरोची येगळीच श्टोरी सुरू होते. वडीलांची अर्धवट राह्यलेली ईच्छा पुरी करायला गडी पेशल आफिसर होतो इंग्रजांचा. तोवर इंग्रज दुसऱ्या हिरोला चाबकाचे फटके मारायला पयल्याला सांगत्यात. तो बी मारायला तयार व्हतो. मग भर चौकात सगळ्यांसमोर पयल्या दुसरा हिरो चाबकाचे फटके मारतो. पयला हिरो देशभक्तीपर गाणं बोलतो. त्याचं रक्त सांडणं मग त्यामुळे बघणारे लोक पेटून उठणं अगागागायायाया लय भारीच. मग ज्या पोरीला सोडवण्यासाठी पहिला हिरो आलेला असतो त्याला फाशी देण्यासाठी दूरवर नेतात. सोबत त्या पोरीला बी नेतात. मग दुसरा हिरो पहिल्याची मदत करतो पळून जाण्यासाठी. पयल्याला हे समजतंच नाय. मग इंग्रज दुसऱ्याला अटक करून लय बेक्कार शिक्षा करतात. तोवर त्याचीच फकस्त दाढी वाढलेली असते. इकडं पहिल्या हिरोला, छोट्या पोरीला आणि त्यांच्या लोकांना इंग्रज सगळीकडं लय शोधतात. एके ठिकाणी दुसऱ्या हिरोची बायको त्यांना मदत करते. मग ती कोणाची बायको हे समजतं. मग पयल्याला लय वाईट्ट वाटतं. मग तो दुसऱ्याला पोलीसांच्या तावडीतून लयभारी हाणामाऱ्या करून सोडवतो. दुसरा हिरो पयल्याच्या खांद्यावर बसून हिकडनं तिकडनं उड्या मारून सगळ्यांना मारून बंदुकीच्या गोळ्या चूकवून जंगलात जात्यात. मग जंगलात सगळे इंग्रज लोक बंदुका बॉम्ब घेऊन ह्यांच्या मागं लागतात. पहिल्या हिरोकडं काय बी नसतं मारामारी करायला म्हणून त्यो फटफटी उचलून मारतो एकेकाला. दुसरा हिरो भगव्या कापडाच्या धोतर उपरण्यात लय खतरनाक दिसतुया. जबराट. हवेत उडू उडू बाणाने मारतुया. बंदुकवाल्या एकेका इंग्रजाला धनुष्यबाणाने सुई सुई करत मारतो. मग पयला हिरो हवेत फटफटी उडवतंय दुसरा पेटलेल्या बाणाने फटफटीला आग लावतंय. ती फटफटी डायरेक्ट दारूगोळा ठेवलेल्या गोदामात जाती. दोन हिरो बी तिथंच मेन व्हीलन बी तिथंच. मोठ्ठा स्फोट होतो व्हीलन आणि दोन हिरो सोडून सगळे मरतात. व्हीलन इंग्रजाला एक बाणाने मारतो दुसरा बंदुकीच्या गोळीने मारतो. स्फोटात वाचलेल्या बंदुका घेऊन दुसरा हिरो गावी होडीतून येतो. मग दुसरा हिरो 'जल जंगल जमीन' झेंडा दावतो अन् पिक्चर संपतो.

(विशेष सूचना: सिनेमातील फायटिंग सीन्स भारी आहेत. राजमौली चे भव्य दिव्य सेट स्पेशल इफेक्ट दमदार. कोमारम भीम आणि सीताराम राजू हे दोघेजण दक्षिणेकडील खरेखुरे स्वातंत्र्यपूर्व काळातील लढवय्ये क्रांतिकारक होते. कोमारम भीम यांची जल जंगल जमीन आदीवासी लोकांसाठीची चळवळ खूप महत्वाची. आरआरआर सिनेमा फक्त राजमौली स्टाईल, पावरपँक्ड एक्शन, पॉवरफुल फुल्ल ऑफ स्पेशल इफेक्ट्स, क्लासिक फोटोग्राफी साठीच बघावा. स्वातंत्र्य चळवळीचे वगैरे संदर्भ शोधू नयेत.)
©भूषण वर्धेकर
२७ मार्च २०२२, पुणे.

मंगळवार, २२ मार्च, २०२२

विवेकवादी हतबलता - उत्तरार्ध

विवेकवादी हतबलता

एका राज्यात विवेकवादी लोकांच्या दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या होऊ लागल्या होत्या. धर्माच्या नावाखाली एकत्र येऊन बरेच ठिकाणी हिंसक प्रदर्शने होऊ लागली. अचानकपणे राज्यात धर्माच्या नावाखाली अनागोंदी माजतेय की काय असा प्रश्न राजाला पडला. राजाने तात्काळ फर्मान सोडले आणि प्रधान आणि कायदा सुव्यवस्था मंत्र्यांची बैठक बोलावली. प्रधांनांनी जे काही घडतंय त्याची सगळी हकिगत, त्यामागील षडयंत्र करणारे यांची माहिती घेऊन लागलीच महाराजांना सांगितली. राजाने सगळं ऐकल्यावर गंभीर मुद्रेने प्रधांनाकडे मागणी केली की अशा धार्मिक उन्माद करणाऱ्यांना कायमचा जेरबंद करूच पण यांना छुप्या पद्धतीने पोसणाऱ्या लोकांना, संघटनांना पण ठेचून काढू. म्हणजे भविष्यात परत विवेकवादी लोकांच्या हत्या होणार नाहीत. त्यासाठी करावे लागेल ते निर्भिडपणे आपण करू. कायदा सुव्यवस्था पाहणाऱ्या मंत्र्यांना पण कडक कारवाई करा, कोणाचाही हस्तक्षेप झाला तर मला लागलीच कळवा, मी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे असा आदेश दिला. प्रधानांनी महाराजांना सांगितले की सध्याच्या कायदा सुव्यवस्थेत अशा गुन्हेगारांना अजिबात कडक शिक्षा करता येत नाही. धार्मिक आस्थेच्या नावाखाली लोकांनी कायदा हवा तसा वाकवला आहे. आपण कायद्यानुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे प्रचार प्रसार करण्यासाठी. त्यामुळे तथाकथित धर्माच्या आड येणाऱ्या लोकांना प्रचंड सहन करावे लागतेय. धर्मद्वेष वाढतोय. नवीन कायदा आणून अशा हिंसक कारवाया करणाऱ्या लोकांना जलदगतीने शिक्षा करण्यासाठी आपल्या कायदा सुव्यवस्थेत बदल करू. त्यासाठी मंत्रीमंडळाच्या सदस्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेता येईल. 

येणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ह्याच विषयावर चर्चा करून विधेयक मांडून कायद्यात रूपांतर करू असे महाराजांकडून आश्वासन घेऊन प्रधान आणि कायदा सुव्यवस्था पाहणारे पुढच्या तयारीला लागले. महाराजांनी स्पष्ट सांगितले होते जी काही कारणं असतील धार्मिक उन्माद वाढण्यासाठी ती सगळी मंत्रीमंडळाच्या पटलावर आणा चर्चेसाठी. त्यामुळे प्रधानांनी आपली यंत्रणा कामाला लावली आणि धार्मिक द्वेषाची पाळंमुळं कुठपर्यंत आणि कशी पोचली याची साग्रसंगीत कारणमीमांसा लिहून काढली. सोबत कायदेविषयक सल्लागार घेऊन नवीन कायदा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु झाली. तोपर्यंत राज्यभर दबक्या आवाजात चर्चा सुरु झाल्या. धर्माच्या नावाखाली दिवसाढवळ्या विवेकवादी लोकांना ठार मारणाऱ्या लोकांना जरब बसावी म्हणून राज्यात नवा कायदा येणार असल्याची कुजबुज सगळ्या पातळीवर सुरु झाली. धर्माच्या नावाखाली ज्यांनी बाजार मांडला होता त्यांची आता खैर नाही असं जो तो बोलू लागला. लोकमानस वळवण्यासाठी लागलीच धर्माच्या ठेकेदारांनी आपापले धर्म कसे मानवतावादी, शांतीप्रिय सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे आहेत याचे शिबिरे, सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव आणि शोभायात्रा सुरू केल्या. धर्माच्या नावाखाली लोकांना एकत्र करण्यात नेहमीचे यशस्वी तंत्र ज्याने त्याने वापरले. लोकांचा प्रतिसाद पण लक्षणीय वाढला. अखेरीस मंत्रीमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली. बैठकीत एक विशेष दिवस राखीव ठेवला फक्त आणि फक्त नव्या कायदेविषयक चर्चेसाठी. वाद, प्रतिवाद, प्रतिक्रिया, प्रतिसाद यांचा योग्य तो विचार करून नवीन कायदा सर्वानुमते संमत व्हावा यासाठी. 

विशेष दिवस उजाडला. प्रधानांनी प्रास्ताविक केल्यानंतर कायद्याच्या अनुषंगाने काही विचार मांडले. 'आपले राज्य धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आहे. आपण सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करतो. पण सध्या विवेकवादी लोकांच्या दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या होणं आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. आपण धर्माचा प्रसार, प्रचार करण्यासाठी, धर्म निवडीचे, धर्माचे शिक्षण देण्याचे, श्रद्धा व उपासना करण्याचे आणि सर्वात महत्वाचे विचार, अभिव्यक्ती व विश्वास यांचे स्वातंत्र्य घटनेप्रमाणे सर्वांना दिले आहे. मात्र त्याचा गैरवापर होत आहे. त्यामुळे धर्माच्या बाबतीत निगडित असलेले सगळे कायदे, नियम यांचे आपण एकत्रीकरण करून एक नवा अद्ययावत कायदा पटलावर मांडणार आहोत. आधीचे सगळे धार्मिक चालीरीतींशी असलेले कायदे, सोयी, सुविधा आणि सरकार दरबारी, गैरसरकारी मिळणारे फायदे यांचा एकात्मिक सुधारित दुरुस्ती कायदा तयार केला आहे. त्याचा प्राथमिक मसुदा प्रत्येकाला देण्यात आला आहे. त्यावर चर्चा करून अजून काही सूचना असतील त्यावर सर्वानुमते सहमती घेऊनच कार्यवाही होईल हे निश्चित.' आटोपशीर भाषण संपल्यावर प्रधानांनी कायदा सुव्यवस्था मंत्र्यांना सांगितले की कायद्याच्या मसुद्याचे वाचन करा आणि एकेका सदस्यांनी व्यक्त केलेल्या विचारांवर, आक्षेपांवर, सुचवलेल्या दुरुस्त्यांवर कार्यवाही सुरु करावी. कायदेविषयक सगळ्या बाबींची पुर्तता कशी करायची यावर सगळ्या मंत्रीमंडळातील सदस्यांनी मते मांडावीत.

कायदा सुव्यवस्था मंत्र्यांनी मसुदा वाचायला सुरुवात केली.
कलम क्रमांक १: धार्मिक कार्यासाठी जे जे अनुदान मिळते त्यांचा सगळा हिशेब, तपासणी, करणे अनिवार्य. मिळणारा निधी ज्या स्रोताकडून येतोय त्यांचे सर्व आर्थिक कागदपत्रांची हिशेब-तपासणी अनिवार्य करणे. या मध्ये ज्या संस्थापना, संघटना, खाजगी समुह कुचराई करतील किंवा दिरंगाई करतील त्यांच्या सगळ्या सरकार दरबारी मान्यता रद्दबातल होतील. सहभागी सभासदांना वा व्यवस्थापन मंडळांवर अजामीनपात्र फौजदारी गुन्हे दाखल होतील. याची कायदेशीर कारवाई जलदगती न्यायालयात होईल. सर्वात महत्त्वाचे हा सगळ्या धर्मांना एकच कडक कायदा असेल. 

कलम क्रमांक २: धार्मिक शिक्षण देणाऱ्या सगळ्या शाळा, पाठशाळा, सरकारी, बिगर सरकारी कायमस्वरूपी बंद करण्यात येतील. एक राज्य एकच शिक्षणप्रणाली सर्व धर्मियांना सक्तीने अंगिकारावी लागेल. कोणत्याही शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे कसलेही शिक्षण कदापिही दिले जाणार नाही. जे काही धार्मिक शिक्षण द्यायचे असेल ते कुटुंबापुरते मर्यादित असेल. सार्वजनिक जीवनात कोणत्याही धार्मिक शिक्षणासाठी कायमस्वरूपी बंदी असेल.
एकात्मिक शिक्षण पद्धतीत कोणालाही जातपातधर्माचा कोणत्याही शैक्षणिक कागदपत्रांवर उल्लेख करता येणार नाही. हे नियम सर्वच धर्मांना लागू असतील.

कलम क्रमांक ३: कोणत्याही धार्मिक कार्यास सरकार दरबारी कसलीही मदत मिळणार नाही. मात्र कार्यक्रम करायचा असल्यास आगाऊ परवानगी घेणे अनिवार्य आहे. कोणताही सरकारी कर्मचारी, अधिकारी किंवा मंत्री अशा कार्यक्रमात सहभागी होणार नाही. सहभागी झाल्यास त्याची सरकारी सेवा कायमस्वरूपी रद्दबातल केली जाईल. सर्वात महत्त्वाचे अशा धार्मिक कार्यात जर समाजविघातक कृत्ये निदर्शनास आली तर आयोजन करणाऱ्या संघटनावर कायमस्वरूपी बंदी, सभासद आणि मंडळावर मनुष्यवधाचा गंभीर गुन्हा दाखल केला जाईल.

कलम क्रमांक ४: कायद्यासमोर सगळेच समान असल्याने सगळे धार्मिक कायदे रद्दबातल करून समान नागरी कायदा अंमलात आणला जाईल. त्यामुळे कोणत्याही धर्माला कसलीही विशेष वागणूक, सवलत कदापिही मिळणार नाही.

कलम क्रमांक ५: धर्माचा हवाला देत कोणत्याही अमानवी कृत्यासाठी सहभागी असलेल्या व्यक्ती आणि समुहावर अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. जीवीतहानीस समर्थन करणाऱ्या सगळ्या समुहावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. 

कलम क्रमांक ६: कोणत्याही नागरिकावर कोणत्याही प्रकारच्या धार्मिक चालीरीतींची बळजबरी करता येणार नाही. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धर्माच्या नावाखाली कसलाही विक्षिप्त धूडगूस घालता येणार नाही. मिरवणूका, जलसे, शोभायात्रा, प्रभातफेऱ्या, सामुदायिक प्रार्थना, सार्वजनिक ठिकाणी करण्यास कायमस्वरूपी बंदी घातली आहे.

कलम क्रमांक ७: भूतकाळात आमच्या वर अन्याय झाला, आमच्या आस्थांवर आघात झाले, परकीयांच्या आक्रमणात अमुक उद्ध्वस्त झाले म्हणून तमुक पुनर्बांधणी करणे, तोडफोड करणे, आस्था म्हणून बळकावणे, अतिक्रमण करणे यास कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आले आहेत. तसे करणारे कोणी आढळल्यास किंवा समर्थनार्थ उतरलेल्या लोकांवर किंवा समुहांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

सात कलमी मसुद्याचे वाचन झाल्यावर चर्चेसाठी मुद्दे उपस्थित केले गेले. महाराज प्रधान आणि कायदेपंडितांवर खुष होते. खरीखुरी धर्मनिरपेक्ष घटना अशीच असावी असे त्याला वाटे. मंत्रीमंडळाच्या एका सदस्याने सातही कलम नागरिकांच्या व्यक्तीगत जीवनावर आघात करणारे आहेत. ही हुकुमशाही आहे. असे सुनावले. तीव्र आक्षेप घेत सांगितले एका विवेकवादी माणसाच्या हत्येबद्दल सर्वच धर्माची अशी मुस्कटदाबी जनता अजिबात सहन करणार नाही. दुसऱ्या मंत्र्याने दुजोरा देत हत्या करणाऱ्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवा असे सांगितले पण जनसामान्यांचे धर्माचे स्वातंत्र्य असे कलमानुसार घालवू नका. तिसऱ्या मंत्र्याने तर कहरच केला. आमचा धर्म अल्पसंख्याक आहे म्हणून या सातही कलमातून आम्हाला सूट द्यावी असा प्रस्ताव मांडला. अनेकांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला. आता खरी लढाई अल्पसंख्य विरूद्ध बहुसंख्य अशी झाली. सगळ्याच मंत्र्यानी कुरबुरी सुरु केल्या. प्रधानांनी समजावण्याचा प्रयत्न केला की सार्वजनिक ठिकाणी सगळ्या धर्माच्या सगळ्या प्रकाराला पायबंद असेल. खाजगी ठिकाणी  कोणताही पायबंद नसेल. मात्र समाजातील शांतता बाधित होत असेल तर कायदेशीर कारवाई होणारच. सगळ्याच मंत्र्यांनी प्रत्येक मुद्द्यावर आक्षेप घेत आमच्या धार्मिक कर्तव्य, हक्क आणि अधिकारांची कुचंबणा होते असा दावा केला. महाराज सगळं पाहत होते, ऐकत होते. त्यांना मनोमन खूप वाईट वाटले. एकही विवेकवादी मंत्री या राजदरबारात नाही याचे शल्य महाराजांना बोचू लागले. काही मंत्री तर महाराजांना म्हणाले की आमच्या धर्मात लूडबूड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा कायदा जर लागू केला तर अराजक माजेल. जनता रस्त्यावर उतरेल. धर्माचे अनुसरण आम्ही कसे करावे हे ठरवणारे मंत्रीमंडळ कोण? मंत्रीमंडळाने राज्यकारभार करावा. धर्माच्या बाबतीत काय करायचे हे जनता ठरवेल. ना महाराज, ना प्रधान, ना कायदा सुव्यवस्था मंत्री ना कोण्या मंत्रीमंडळाच्या सदस्यांना धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. मंत्रीमंडळात गदारोळ माजल्याने दरबाराचे दिवसभराचे कामकाज तहकूब करावे लागले. दुसऱ्या दिवशी उर्वरित चर्चा आणि इतर गोष्टींवर विचारविनिमय केला जाईल असे ठरले. तोपर्यंत सातही कलमे राज्यातील नागरिकांना समजली. विवेकवादी लोकांनी महाराजांचे कौतुक केले. मात्र त्यांना जनाधार नसल्याने त्यांचे कोणतेही मुद्दे जनतेपर्यंत पोचत नव्हते. ज्यांना जनाधार होता त्यांनी त्यांची इकोसिस्टिम उभी केली होती. विवेकवादी हतबल झाले होते. सातही कलमातून धर्मांतराच्या बाबतीत कसलीही नियमावली नसल्याचे पाहून धर्मांतर करण्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था, समुह कार्यान्वित झाले. युद्धपातळीवर लोकांना आमीषं दाखवली जाऊ लागली. दरबारातील, राज्यकारातील यंत्रणा काही अतिउत्साही लोकांनी कामाला लावली. प्रत्येक प्रार्थना स्थळांना टार्गेट आणि फंड दिला गेला. आपापल्या धर्मियांच्या लॉबीच्या मजबूतीसाठी जो तो झटू लागला.

जनतेला जसं समजलं आपले धार्मिक विधी, कार्यक्रम, उत्सव, मिरवणूका आणि शोभायात्रा आता कायमस्वरूपी बंद होणार तसं एकप्रकारचे निषेधाचे, आंदोलनाचे आणि मोर्चेबांधणीचे वारे वाहू लागले. समाजकंटकांनी याच संधीचा फायदा उचलून मोर्चे, आंदोलने यात सहभागी होऊन जाळपोळ, तोडफोड, लुटालूट आणि दंगली सुरू केल्या. सगळ्याच धर्मातल्या लोकांनी जिथे तिथे धूडगूस घालायला सुरूवात केली. आरपारची लढाई म्हणून बाहेरच्या शत्रू राज्यांनी आपापल्या हस्तकांमार्फत रसद पुरवायला सुरूवात केली. कोणत्याही मंत्र्यांना कोणीही जुमानत नव्हते. कायदा सुव्यवस्था मोडकळीला आली. हतबल प्रधान महाराजांना सगळ्या गोष्टी सांगू लागला. महाराज खजील झाले. महराजांनी शांततावादी समाज निर्माण होण्यासाठी धर्माच्या बाबतीत लूडबूड करू नये कसा सरळसरळ धमकीवजा आदेश प्रस्थापित धर्माच्या ठेकेदारांनी महाराजांना दिला. प्रधानांनी गुप्तचर विभागाकडून मिळालेली स्फोटक बातमी राजांच्या कानावर घातली. प्रधानांनी सांगितले जर योग्य वेळी आवर घातला नाही तर राज्याचे धर्माच्या बहुसंख्य लोकसंख्येच्या आधारावर तुकडे स्वतंत्र छोटीमोठी राज्ये तयार होतील. त्यासाठी आजूबाजूच्या शत्रू राज्यातील टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. प्रधानांकडे राजांनी मनातील खदखद व्यक्त केली. आता काय करावे यासाठी विचारणा केली. प्रधानांनी सात कलमी कायदा लागू केला जाणार नाही याची घोषणा करायला सांगितले. तशी घोषणा महराजांनी केली. अंमलबजावणी झाली. विवेकवादी लोकांची हतबलता कशी असते याची जाणीव महाराजांना झाली.

© भूषण वर्धेकर,
२२ मार्च २०२२, पुणे

मंगळवार, १५ मार्च, २०२२

काश्मीर फाईल्स

दि काश्मीर फाईल्स - अस्वस्थ करणारा अनुभव

सिनेमा पाहताना जर अस्वस्थ वाटत असेल तर त्या सिनेमाचा कंटेंट आणि कंटेक्स्ट योग्य जागी प्रहार करतो. अर्थातच सगळेच मनाला भिडणारे सिनेमे ह्यूमन लेवल वर करूण वाटतात. ठणकावून आणि ओरबडून सत्य सांगणारे सिनेमे फार कमीच. त्यापैकी काश्मीर फाईल्स. काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल तिखट आणि तीव्र भाष्य करणारा सिनेमा. काही लोकांना हा सिनेमा प्रोपागंडा वाटतो कारण त्यांच्या डीप नॅरेटिव्हला धक्के बसतात म्हणून. सेट केलेलं नॅरेटिव्ह जर खोटं पडू लागलं की जळफळाट, तळमळ, खदखद बाहेर येणं सहाजिकच आहे. मात्र जे काही दाखवले आहे काश्मीर फाईल्स मध्ये ते सत्य घटनेवर आधारित आहे. कपोलकल्पित कथांवर तर नक्कीच नाही. कारण या सिनेमासाठी जो रिसर्च केलाय तो सिनेमा बघताना आतून हादरवतो. अतिरेक्यांनी पंडितांवर हल्लेच केले नाहीत असं जर कोणाचं म्हणणं असेल तर पंडित काश्मीरमध्ये का राहिले नाहीत? विस्थापित का व्हावे लागले पंडितांना? अर्थातच अतिरेक्यांनी गुलाबपुष्प देऊन पंडितांना काश्मीर सोडा म्हणून तर सांगितले नव्हते! 

आपल्याच देशात  मूळ रहिवाशांना आपापल्या घरादाराला सोडून त्रयस्थ ठिकाणी जीवाच्या भीतीपोटी विस्थापित व्हायला भाग पाडले हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ताश्कंद फाईल्स साठी जसा रिसर्च केला होता तसाच खोलवर जाऊन रिसर्च या सिनेमासाठी केला हे स्क्रिप्ट मध्ये दिसून येते. कलाकारांचे परफॉर्मन्सेस पॉवरफुल झाले आहेत. सिनेमाची गोष्ट जसजशी पुढं सरकत जाते तसतसे काही संदर्भ मध्येच कसे काय आले असा प्रश्न पडतो. अशा किरकोळ त्रुटी वगळता सिनेमा बघण्यासारखा झालाय. उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरेंनी विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणासाठी काही जागा वाढवून दिल्याचा उल्लेख आहे. मात्र महाराष्ट्रात युतीचे सरकार ९५ नंतर आले. ८९-९० सालातील हल्ले दाखवले गेले. मात्र डिरेक्टोरिअल लिबर्टी म्हणून असे संदर्भ खपून जातात. दुसरा प्रसंग म्हणजे रक्ताने माखलेले तांदूळ खाऊ घालणे. हा प्रसंग कधीकाळी बंगालमध्ये खराखुरा घडलेला आहे. तत्कालीन कॉंग्रेसच्या नेत्याला घरात घूसून असेच मारले होते कम्युनिस्ट लोकांनी. सैनबारी हत्याकांड म्हणून प्रसिद्ध आहे. त्या घटनेचा पंडितांचे हाल दाखवताना आधार का घ्यावा हे समजले नाही. सिनेमात पंडितांवर झालेले अनन्वित अत्याचार पाहून आतून उध्वस्त होतेच. मग समजते प्रत्यक्षात किती आणि कसे हाल त्यांनी सहन केले असावेत! त्याहूनही वाईट वाटते तथाकथित लोकांच्या डीप सिस्टिम्सचा अवाका आणि ब्रेनवॉश करण्यासाठी केली जाणारी हुकुमी पद्धत. सिनेमात हिंसक दृश्ये दाखवली आहेत कारण हिंसा हेच अस्त्र वापरलं गेलं पंडितांना हुसकावून लावण्यासाठी. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुनागढ, हैद्राबाद आणि काश्मीर या संस्थानाच्या इतिहासातील घडामोडींचा जर सिनेमात उल्लेख आला असता तर सिनेमात एक महत्त्वाचा टप्पा मांडला गेला असता. त्यानंतर सोव्हिएत रशियाच्या पाडावानंतर काश्मीरमधील कित्येकांना अचानक कसा काय इंटरेस्ट वाटू लागला याचेही धागेदोरे सिनेमात मांडता आले असते. कारण इस्लामिक स्टेटची मोडस ऑपरेंडी अचानक एकाकी वाढली नाही. तिचा शिरकाव खूप आधीपासूनच झाला. मग स्वतंत्र काश्मीर चे आळोखेपिळोखे नंतर भारताने बळकावल्याची भावना वगैरे सिनेमात यथोचित मांडली आहे. कारण काश्मीर स्वतंत्रपणे केवळ धर्माधारित हवा होते तत्कालीन अलगाववादी लोकांना. त्यांना छुपा पाठिंबा देणारे भारतातील तथाकथित विचारवंत आणि त्यांना रसद पुरवणारे पॉलिटिकल थिंकटँक समांतरपणे कार्यरत होते. साधा सोपा प्रश्न आहे जर स्वतंत्र काश्मीर हवा होता तर काश्मीरमधील पंडितांचे जिनोसाईड करण्याची काय गरज होती?

काश्मीरमधील प्रश्नांची उकल करण्यापेक्षा ते तसेच ठेवून कैक लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट इनकॅश करायचे उद्योग काही नवे नाहीत. रलीव, सलीव, गलीव चे नारे देऊन पंडितांवर काश्मीर सोडण्याची वेळ आली याला जबाबदार कोण? इस्लामिक टेररिझमला पाठीशी घालणारे कोण? सत्य दाबून ठेऊन इन्फो वॉर चालवणारे कोण? याची उत्तरे सिनेमा पाहून समजतात. मुस्लिम ऑप्रेस्ड झाला म्हणून अतिरेकी कारवायांकडे वळाला हे भंपक लॉजिक कैक दशकांपासून लोकांच्या मनावर बिंबवलं जाते. मुळातच धार्मिक कट्टर शिक्षण लहाणपणापासून दिल्यावर मेंदूत सर्वधर्मसमभावाचा मागमूस तरी राहील का? अशा धार्मिक कट्टरपंथी अतिरेकी सोकॉल्ड फ्रीडम फायटर होऊच कसे शकतात. तसं त्यांना एखाद्या इकोसिस्टिमने जर प्रमोट केले तरच असे होऊ शकते. इकोसिस्टिम कोणी राबवली कशासाठी राबवली कोणाचे काय मनसुबे आहेत यावर काश्मीर फाईल्स सडेतोड भाष्य करतो. हे असं उघडंनागडं सत्य पचवायला तथाकथित पुरोगाम्यांना शक्य नाही. कारण त्यांना पंडितांबद्दलची सरकारने जाहीर केलेली आकडेवारी प्रिय आहे. हेच तर्कट गुजरात दंगलीवर पुरोगामी कदापिही मान्य करणार नाहीत. कारण गुजरात दंगल हा पुरोगाम्यांचा जीवाभावाचा विषय. मात्र गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगली पेटल्या हे स्विकारणे पुरोगाम्यांना जमणार नाही. हा विषय खूप खोल आहे. तसेच दलितांवर झालेल्या अत्याचाराचे खापर जसे तथाकथित सवर्ण आणि प्रस्थापित वर्गावर फोडले जाते. तसे पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे खापर इस्लामिक टेररिझमवर जाहीरपणे कोणी सोकॉल्ड स्कॉलर फोडत नाही. मुळातच पॉलिटिकल इस्लाम, मुल्लांचा इस्लाम की अल्लाह चा इस्लाम यातच खूप लोकांचे बेसिकमध्ये राडे आहेत. मुसलमान स्वतःच्या धार्मिक आस्थांना कवटाळून नक्की काय आणि कशी भूमिका घ्यायची याच्याच विवंचनेत असतो. तलवारीच्या टोकावर इस्लामिक प्रसार प्रचार झालाय हे सर्वश्रुत असून देखील जिहाद म्हणजे धार्मिक बाब म्हणून दुर्लक्षित केला जातो. मी मागे कोणत्यातरी वेच्यात लिहिले होते अल्पसंख्याक असू तेव्हा विशेषाधिकार आणि बहुसंख्य झालो की सर्वाधिकार हीच शिकवण लादली गेलीय धर्माच्या नावाखाली. मग शरीया, कुराण दिमतीला आहेच. सोबत समुदायावर असलेले मुल्ला मौलवींचे वर्चस्व. अशा त्रेधातिरपीट असलेल्या गुंतागुंतीची व्यवस्था असताना सोकॉल्ड मुस्लिम स्कॉलरांनी पुढे येऊन प्रबोधन करण्याची गरज असते. मात्र तसं होताना दिसत नाही. कोणताही पुरोगामी असे प्रबोधन करण्यास उत्सुक नसतो. हिंदुत्ववादी लोकांना हाच मुद्दा मिळतो ध्रुवीकरण करण्यासाठी. 

सर्वात महत्त्वाचं या सिनेमात भिडणारे आहे ते म्हणजे गोंधळलेल्या कृष्णा पंडितचे मानसिक द्वंद्व. त्यासाठी दिग्दर्शकाने जेएनयूस्टाईल इन्स्टीट्यूट ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. मग प्रेसिडेंट इलेक्शन, प्रचार, स्पीच वगैरेंची विषयसुचक पेरणी भारी केलीय. डाव्यांची बौद्धीकं ज्या पद्धतीने मेंदूत बिंबवली जातात त्याचा वापर स्वैरपणे स्क्रिप्ट आणि प्लॉटमध्ये केलाय. हे करताना सिनेमा कुठेही पकड सैल करत नाही कारण अभिनेत्यांनी केलेल्या चाबूक परफॉर्मन्समुळे. विशेष अनुपम खेर. सारांशमधला हतबल म्हातारा ज्या ताकदीने उभा केला होता त्याच ताकदीने पुष्करनाथ पंडित उभा केलाय. बाकीचे सोबतीचे तेवढेच ताकदीचे कलाकार. त्यांच्या त्या काळच्या आठवणी ज्या पद्धतीने मांडल्या आहेत त्यावरून प्रशासकीय कारभारात काही तरी करू पाहणाऱ्या लोकांची हतबलता लक्षात येते. डोळ्यासमोर जूलुस निघतात. आजूबाजूला हिंसक हल्ले होतात. वेचून वेचून पंडितांना ठार केले जाते अल् जिहादच्या नावाखाली. हे बघून सून्न होते. हे जे दाखवलंय ते काय मनघटीत कहाण्यांवर तर नक्कीच नाही. या वर वेगवेगळ्या वेळी खूप लोकांनी लिहिले आहे. मात्र सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर पहिल्यांदाच येतंय. हे धाडस महत्त्वाचे. अर्थातच याला प्रोपागंडा म्हणणारे अट्टल आहेत. त्यांची सर्वात मोठी गोची अशी आहे की असे घडले होते जाहीरपणे बोलूही शकत नाहीत. मुळातच जसे काश्मीरमधील हिंदू होरपळले तसे काश्मिरी मुसलमान पण हकनाक बळी पडले. काश्मिरी पोलिसांना तर कोणीही वाली नाही. त्यांच्यावर पण असाच सिनेमा यायला पाहिजे. पण मेख तिथेच आहे बहुसंख्य काश्मिरी पोलीस हे मुस्लिम आणि इस्लामिक अतिरेक्यांनी त्यांच्यावर केलेले अमानुष हल्ले जर सिनेमात दाखवले तर त्यालापण प्रोपागंडा वगैरे लेबल लावून मोकळे होता येणार नाही. एरव्ही हिंदु दहशतवाद, भगवा आतंकवाद वगैरे बरळणारे काश्मीरमधील आतंकवादाला उभ्या आयुष्यात इस्लामिक टेररिझम बोलणार नाहीत. कारण कैक वर्षे सेट केलेले नॅरेटिव्हला तडा जाईल. काश्मीर बाबतीत सेपरेटिस्ट, फ्रीडम फायटर वगैरे बीरुदावलल्या जाणूनबुजून पेरल्या.

सिनेमा बघताना फक्त पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला आहे असे वाटत नाही. एकमेकांच्या खोलवर पसरलेल्या गुंतागुंतीच्या सिस्टिम्स कशा वापरल्या जातात हे समजते. मग लढणारे वेगळ्या पातळीवर जातात आणि फिल्डवर होरपळून मरणारे बिचारे पंडित दिसतात. 'सियासत की लडाई' न राहता 'धर्म की नोंकपर लहराएँ परचम' पर्यंत सिक्वेन्सेस ढळढळीत दिसतात. ज्यांनी इतिहास भूगोल वाचलाय काश्मीर विषयी त्यांना फार काही हादरे बसत नाहीत. मात्र ज्या धाडसाने सिनेमात मांडलेय त्याचं कौतुक वाटतं. कारण अशा जेनोसाईडवर माहितीपट, न्यूज हिस्टॉरिकल सेगमेंट आले असते तर इम्पॅक्ट पडला नसता. सिनेमाने तो पडतो. सिनेमा बनवणे ही सर्वात महागडी कला. त्यात अशा विषयांवर एवढी जोखीम घेऊन सिनेमा बनवणे आणि कमर्शिअल पद्धतीने ऑडिअन्स ला सिनेमागृहात खेचून आणणे सहजसाध्य नाही. बॉलिवूड चौकटीच्या कसल्याही प्रमोशनल टेकनिक्स न वापरता सिनेमा चालतो लोकांना आवडतो हे या सिनेमाने दाखवून दिलेय. सिनेमाचं माध्यम लोकांपर्यंत न आणलेल्या गोष्टी दाखवू शकतो हे पुन्हा सिद्ध केलंय. काहींना हे प्रचारतंत्र वाटतेय. वाटणारच कारण त्यांनीही कधीकाळी असाच प्रचारासाठी प्रयत्न केलेला असावा. कारण ज्या ठामपणे सांगितले जातेय की काश्मीर फाईल्स हा असत्यावर आधारित आहे तर त्या ठामपणे ते सत्य नेमके काय हे सांगत नाहीत. 

सिनेमाची सर्वात मोठी बाब म्हणजे गोष्ट सांगणे. ती जर का फसली तर सिनेमा प्रेक्षकांना पकडून ठेवत नाही. नेहमीची गोष्ट सांगताना लोकांना नेमकं अमुकतमुकबद्दल काय घडलं याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकते. हे दिग्दर्शकीय कसब. शेवट निराशा करणारा असला तरी विचार करायला प्रवृत्त करतो कोणत्याही संवेदनशील माणसाला. आपल्याच देशात आपल्याच नागरिकांना अशाही प्रकारे जगावं लागलं कसलीही चूक नसताना. हे भीषण वास्तव मनाला  हादरा देतं सिनेमा संपल्यानंतरही.

© भूषण वर्धेकर
१५ मार्च २०२२
पुणे

सोमवार, ७ मार्च, २०२२

एका स्त्रीवादी बाईचा महिला दिवस

सकाळी सकाळी मोबाईलवर आलेले प्रमोशनल मेसेजेस वाचून एक स्त्रीवादी बाई फारच वैतागली. मेसेज होता एका ऑनलाइन शॉपिंगच्या सेल संदर्भात. महिला दिनानिमित्त किचन एप्लायन्सेसवर भरघोस सूट. दुसरा मेसेज होता साड्यांच्या सेलबद्दल. त्यातील एक वाक्य होते.  'वुमेन इन सारीज् लूक्स मोअर ट्रेडिशनल. हॅप्पी शॉपिंग'

सकाळीच असे मेसेजेस वाचल्यावर बाईंचे पित्त खवळले. बातम्या बघण्यासाठी टिव्ही लावला तर स्त्रीया आता पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात आघाडीवर वगैरे बाबतीत चर्चा चालू होत्या त्यात फक्त अँकर बाई होती आणि चर्चेसाठी बोलावलेल्या पॅनलवर पाचपैकी एकच स्त्री होती. बाकीचे चार म्हणे फेमिनिस्ट मेल होते. हे बघून बिचारी स्त्रीवादी एकदम फेमिनाझी झाली. 'फ' वर्गातील आंग्ल शिवी हासडून टिव्ही बंद करून मोबाईलवर स्क्रोल करू लागली. व्हॉट्सऍप ग्रुपवर वुमेन्स डे निमित्ताने येणाऱ्या पानाफुलांच्या, कवितांच्या, इमोजींच्या, सुविचारांच्या गराड्यात गोंधळून गेली. फेसबुकवर टॅग केलेल्या मैत्रिणींच्या नवऱ्यांच्या पोस्टींचा महापूर पाहून 'एक्स'च्या पोस्टवर थबकली.

आपल्या एक्सला बायको म्हणून काकूबाई घर सांभाळण्यासाठी पाहिजे होती आणि तशी त्याला भेटली होती हे पाहून मनातून कासावीस झाली. मग आवरून लाडक्या 'पेट'  ला घेऊन मॉर्निंग वॉकला निघाली. बाईंनी मुद्दाम कुत्राच पाळला होता आणि नाव पण एक्सचेच दिले होते. खुन्नस. तसंही पोरं ब्रेकअप झाल्यावर कुत्री पाळून तिला आपल्या एक्सचे नाव देतात. मग महिलांनी का मागे रहायचे! कुत्र्याची रपेट झाल्यानंतर बाईंची व्हेजिटेबल स्मुदी आणि वर्क फ्रॉम होम सेटअप रेडी झाला. लॉगिन केल्यावर एच.आर. चे वुमेन्स डे स्पेशल व्हाउचर्स, ग्रिटींग आणि मिटिंग इन्व्हीटेशन्स धडधडायला सुरुवात झाली. मग दिवसभर आळोखेपिळोखे देत स्टँड अप, स्टेटस मिटिंग, सेशन्स, एक्सेल शीट्स, जीरा टिकिट्स, ब्रेन स्ट्रॉमिंग डिस्कशन्स, कॉफी ब्रेक, लंच ब्रेक, वामकुक्षी, घरच्यांसोबत बोलणं, लग्नासाठी तुणतुणे वादविवाद, दिवसभराची कामे वगैरे सगळे सोपस्कर झाले. राहत असलेल्या सोसायटीची आज खास महिला दिना निमित्त खास महिलांनी महिलांसाठीच पुरुषांच्या पुढाकाराने टेरेस डिनर इव्हेंट पार पडला. सभासदांनी नसती केली तरी चालली असती अशी भाषणे फेकून मारली. घिसेपिटे हास्य विनोद. गॉसिप करताना कोंडलेल्या एकमेकींच्या इच्छा, आकांशा आणि वेदनांना मोकळी वाट मिळाली. इथे स्त्रीवादी बाई थोड्या आयसोलेटच होत्या.

सोसायटीच्या इव्हेंटमध्ये नटूनथटून येणाऱ्यांचा बाईंना विशेष एलर्जी. बाई स्वतः टॉमबॉय प्रमाणे वावरतात. बुलेट वापरतात. विकेंडला हँगआऊटला जातात. महिन्यात किमान डझनभर ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सिरिज संपवतात. घरच्यांचा आग्रहाखातर सणासुदीला गावी जातात. महिन्या दोन महिन्यांतून एकदा भावाच्या घरी जाऊन भाच्च्यांसोबत दंगामस्ती करतात. वर्षातून एकतरी लॉंग बाईक राईड फिनिश करतात. थोडक्यात मनाला हवं तसं जगतात म्हणून महिला दिनानिमित्त होणाऱ्या मच हायपर सेलेब्रेशन्स इव्हेंट्सचा तिटकारा करतात. पुर्वीसारखी आता नातलग, मित्रमैत्रिणींचे लग्न समारंभ उत्साहात साजरा करत नाहीत. स्वतःच्या स्पेसमध्ये गुरफटून जगाची निरिक्षणे नोंदवत बसतात. कधीतरी घरातून फारच पिच्छा पुरवला तर एखादे शनिवारी लग्नासाठी म्हणून पाहिलेल्या मुलासोबत कॉफी प्यायला जड मनाने पोचतात. मग इकडच्या तिकडच्या साचेबद्ध गप्पा. फ्युचर, पार्टनर, आवड निवड, नोकरी वगैरेंच्या चोथट चर्चा होतात. कधी इकडून नकार तर कधी तिकडून नकार यातच वयाची वर्षे वाढत जातात. मग पुन्हा तोच प्रपंच स्वतः स्वतःसाठी स्वतःपुरता केलेला रहाटगाडगे चालवण्यासाठी.

©भूषण वर्धेकर
८ मार्च २०२२, पुणे

शनिवार, ५ मार्च, २०२२

झुंड

झुंड

झुंड मध्यंतरानंतर मनावरील पकड कमी करतो. बरेच ठिकाणी प्रेडिक्टेबल होतो. नागरजचे फँड्री आणि सैराट जसे मनावर गारूड करतात तसा झुंड करत नाही. सिनेमा संपल्यानंतर नागराज स्पेशल होल्ड झुंड बघितल्यावर राहत नाही. झोपडपट्टी मधल्या पोराटोरांचे मानसशास्त्र, सामाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानवतावाद सगळं एकाच सिनेमातून का दिलं गेलं असा प्रश्न पडतो. कलरफुल सिनेमा, प्रत्येक नॉन एक्टर कडून करवून घेतलेली कामे, संवाद, सिम्बॉलिक फ्रेम्स आणि सिनेमॅटोग्राफी आशयाला अनुसरून शोभत असली तरी शेवटपर्यंत खिळवून ठेवत नाही. धक्कातंत्र देण्याचे नागराजचे कसब इथे फिके पडते. मला व्यक्तीगत सिनेमा पाहताना नामदेव ढसाळ आणि जयंत पवार यांच लिखाण वाचल्यावर जे दृश्यं उभे राहिले होते तसा भास झाला. झोपडपट्टी मधल्या तरुणांना एकत्र घेऊन फुटबॉलच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणं लोकांना अपील होईल असं वाटत नाही. कारण स्पोर्ट्स फिल्म्स बनवण्यासाठी जे तंत्र लागते लोकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्याचे ते तंत्र इथे नाही. केवळ फुटबॉल खेळात गुंतून राहिल्याने त्यांचे प्रश्न सुटणार का? नाही सुटणार. कारण ते दुर्लक्षित राहिले म्हणून मुख्य प्रवाहात आले नाहीत. बच्चन साहेबांच्या खांद्यावर मुख्य पात्र देऊन सगळा स्ट्रगल इतर लोकांचा दाखवलाय. मग बच्चन नसते तर तीच झोपडपट्टी गँग हिरो म्हणून स्ट्रगल करताना दाखवली असती तर वेगळाच इम्पॅक्ट तयार करता आला असता. आजवरचे सगळे हिंदी सिनेमे संवादातून व्यथा मांडतात. मग झुंडमध्ये शेवटच्या सीनमध्ये कोर्टात अमिताभ बच्चन चे भारदस्त आवाजातील संवाद त्याच पठडीतील वाटतो. फँड्री आणि सैराट मध्ये संवादापेक्षा पात्रांनी केलेली कृती लोकांवर प्रभाव टाकत होती. संवादातून टाकलेला प्रभाव हा कृतीतून टाकलेल्या प्रभावासमोर तकलादू असतो. झोपडपट्टीत राहतात म्हटल्यावर दाखवण्यात आलेले सगळे कॅरॅक्टर्स हे लोकांपर्यंत आजवर सगळ्याच माध्यमातून बरेचदा आलेले आहेत. मग नागराज कडून वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्याने टिपिकल छापखान्यातील टेकनिक्स वापरून झुंड बनवला आहे असं जाणवत राहतं. ह्या विषयावर सगळं एकाच सिनेमात बसवण्याचा प्रयत्न केलाय असं दिसतं. कित्येक आजूबाजूचे कॅरॅक्टर्स तेवढ्यापुरते येतात जातात.  ही सगळी कॅरॅक्टर्स वेगवेगळ्या कॅनव्हासवर आणून किमान एक सिजन होईल अशी ओटीटी सिरिज सहज होऊ शकेल. त्यात प्रत्येक एपिसोड  मध्ये एक एक प्रश्न हाताळता येतील आणि वेगवेगळ्या सिच्युएशन वर भाष्य करता येईल.  

हिंदी सिनेमाच्या एक ठरलेल्या चौकटीत नागराज मंजुळेचा सिनेमा पाहणं अवघड जातं. अपेक्षा उंचावल्या होत्या फँड्री आणि सैराट ने त्यामुळे झुंड तशा अपेक्षा पुर्ण करत नाही. मध्यंतरापर्यंत जे जे हॅपनिंग आहे ते ते चांगलं खिळवून ठेवतं. नंतर फुटबॉलच्या संदर्भातील सामने, टुर्नामेंट्स, होमलेस सॉकर साठी प्रत्येक खेळाडूचा चाललेला संघर्ष एकाच सिनेमात पचनी पडत नाही. फक्त अमिताभ बच्चन लक्षात राहतो नागराज मंजुळे कुठेतरी हरवतो सिनेमा संपल्यानंतर. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची कामे ज्यांनी केली ते लक्षात राहतात. सिनेमात जे सामाजिक भाष्य केले आहे ते पण लक्षात राहते मात्र मंजुळे काय वेगळं दाखवणार ह्या अपेक्षेने गेलेला प्रेक्षक हिरमुसतो. नागराजचे सिनेमे सामाजिक भाष्य करतात. राजकीय भाष्य आणि सामाजिक भाष्य यात पुसटशी रेषा आहे. समाजाच्या व्यथा, प्रश्न, समस्या भेदकपणे मांडणे हे सामाजिक भाष्य आणि त्याचे खापर कोण्या एका वर्गावर तरी फोडणे हे झाले राजकीय भाष्य. सगळ्याच समाजात दाहक, ज्वलंत वगैरे भेडसावणाऱ्या समस्या असतात. काहींना त्या जाणीवेतून तर काहींना नेणिवेतून समजतात. ते जगणं ज्या माध्यामातून लोकांसमोर येते ते महत्त्वाचे. ते माध्यम किती लोकांना अपील होते किंवा तुमची जगण्यासाठी चालणारी धडपड किती लोकांपर्यंत जाते हे त्या माध्यमाच्या लोकप्रियतेवर ठरते. साहित्य, नाटक, चित्रपट ही महत्त्वाची माध्यमे ज्याने त्याने वापरली. एखाद्यावर झालेला अत्याचार जर साधन म्हणून बाजारात मांडला तर तो राजकीय किंवा सामाजिक बस्तान पक्कं करण्याचा खटाटोप असतो. असा खटाटोप सगळ्या माध्यमातून ज्या त्या सामाजिक आणि राजकीय आस्थांनी बरेचदा केला. काहींना यश आलं तर काही अपयशी ठरले. अशा सगळ्या बाबींवर जर मंजुळे काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय तर ते फँड्री किंवा सैराट सारखे असेल अशी अपेक्षा उंचावणे सहाजिकच आहे. कारण नागराज ज्या भेदकपणे प्रश्न मांडतो ते लाजवाब. मग ती चीड झुंड मध्ये मध्यंतरानंतर दिसत नाही. विस्कटले आहे काहीतरी असं मनोमन जाणवतं. कॉलेजमध्ये खेळणाऱ्या पोरांना फुटबॉलमध्ये गड्डी गोदामची पोरं हरवतात हे सिनेमॅटिक वाटतं. मात्र नंतरचा होमलेस सॉकरचा प्रत्येकाचा लढा मनाला रुचत नाही. मग चावून चोथा झालेले घिसेपिटे डायलॉग इनकी दुनिया उनकी दुनिया यात अडकल्यासारखा वाटतो सिनेमा. 

जब्याचा मारलेला दगड जेवढा जोरात लागला किंवा आर्ची परश्याच्या रक्तात माखलेली लहानग्याची पावले जेवढी मनात रुतली तेवढे वार डॉनच्या कटर ने झाले नाहीत. तरीही आपल्या मराठी माणसाने केलाय सिनेमा एकदा अवश्य बघा. आवडो न आवडो. 

© भूषण वर्धेकर
५ मार्च २०२२, पुणे

गुरुवार, ३ मार्च, २०२२

प्रत्येकाचं बरं चाललंय

प्रत्येकाचं बरं चाललंय
आपापलं राखून ठेवलंय
काहींनी वाटून घेतलंय
उरलेल्यांनी हेरून ठेवलंय

कोण कोणाला जीवे मारतो
कोण कोणावर हल्ले करतो
कोण कोणाची कोंडी करतो
त्यावर प्रत्येकाचा निषेध ठरतो

साम्राज्याचा विस्तारवाद युद्ध करते
स्वराज्याचे सीमोल्लंघन क्रांती करते
इतिहासकारांची ढोंगी लेखणी चाचरते
कुठे सशस्त्र लढा, कुठे युध्दाची खुमखुमी ठरते 

हल्ल्यांच्या भीतीपोटी शस्त्रे घ्यावी
संरक्षणासाठी दिखाऊ अस्त्रे दाखवावी
पत नसेल तर आर्थिक मदत घ्यावी
श्रीमंत तिजोरीत भर पडावी

असेल अभेद्य राष्ट्रवाद जर
अंतर्गत ऐक्य करावे जर्जर
लक्ष वेधून जातपातधर्मावर
वार करा सामाजिक सलोख्यावर

राष्ट्राच्या इतिहासाची करावी तोडमोड
संस्कृती, सभ्येतेची करून पडझड
फुस लावून असंतुष्टांची रडारड
राष्ट्रविघातक अंतर्गत वरचढ

शांततावादी भूमिका घेऊन तत्पर
दुसऱ्यांच्या माथी फोडावे खापर
महाशक्तीचे कौतुक गोडवे जोरदार
नफेखोरीचे शस्त्रास्त्र व्यवहार

© भूषण वर्धेकर
४ मार्च २०२२, पुणे

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

आमचं तुमचं

आमची असते कायदेशीर कारवाई
तुमची असते सूडबुद्धीची कारवाई
आमची असते संविधानिक दुरुस्ती
तुम्ही करता ते संविधानाची तोडमोड 

आमचा असतो अस्मितेचा अंगार
तुमची असते ती द्वेषपूर्ण नौटंकी 
आमची असते लोकशाहीतील एकी
तुमची असतात स्पॉन्सर्ड आंदोलने

आम्ही मांडतो भूमीपुत्रांचे मुद्दे
तुम्ही मांडता सुपारी घेऊन प्रश्न
आमचा असतो रस्त्यावरचा लढा
तुम्ही करता तो खळखट्याक राडा

आम्ही टाकतो नियमानुसार धाडी
तुम्ही करता जाणूनबुजून मुस्कटदाबी
आम्ही देतो कायदा-सुव्यवस्थेची हमी
तुम्ही देता तो गोरगरिबांचा बळी

आमचे चालते ते प्रामाणिक प्रशासन
तुम्ही करता ते हुकूमशाही शासन
आमचा पिंड पारदर्शी व्यवहाराचा
तुमचा असतो पाढा भ्रष्टाचाराचा

आमच्या विजयात असतो मतदारांचा कल
तुमच्या विजयात मात्र ईव्हीएम ची गडबड
आमचा पराभव ठरतो नैतिक विजय
तुमचा पराभव मात्र लोकशाहीचा विजय
------------------------
©भूषण वर्धेकर
२२ फेब्रुवारी २०२२
पुणे
-------------------------

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

होकार आणि नकार

होकार आणि नकार
एकाच नाण्याच्या दोन बाजू
मात्र एक पारदर्शी प्रमाणे
चकचकीत अभ्युदयाची सुरुवात
तर एकात अपारदर्शी दडवणूक
एका भ्रमाच्या फुग्याचा स्फोट
तत्वाच्या दृष्टीने दोन्ही समर्थ
एकीकाकडे निव्वळ आनंदी तर
एकीला विलक्षण त्रास

एकात अमुलाग्र बदलांची नांदी  
तर एकात नैराश्याची भ्रांती
उद्वेग, उद्विग्न कुतरोडीची पाठीराखी
तर एक उल्हास, उत्साह यांची सोबती
सुकाळाची क्रांती, दुष्काळाची संक्रांति
एकाच मुद्द्यावर आधारित

एकीला सर्वोतोपरी दुरुस्तीला
वाव तर एकीचे सोंग
मोकाटपणाला चालना देणारे
असू द्यावे नसू द्यावे
यांचा बेचकीत राहण्याचा संगम

एकाच उत्तरात दोन्ही वाटा एकत्र
दुकट्या फसव्या भावनांचा पोरखेळ
डोळे विस्फारून रक्ताच्या अश्रूत धूर सोडतो
तरतरीत चटपटीत काळाच्या
शिळा एकमेकांवर आक्रंदत
भूत भविष्य अंधारात
वर्तमान केवळ स्वप्नवत
दुखाची किनार तर
कुठे समाधानाचे आगर
आयुष्याच्या सोंगट्यांच्या
खेळाचा मौल्यवान अविष्कार
होकार आणि नकार

एका प्रश्नाच्या अलगुज
उत्तराचा उर्वरित सारांश
भावनांचे अक्षांश, वेदनेचे रेखांश
जगण्याच्या प्रवाहात सगळेच
सर्वकालिक अशांत संथ

- भूषण वर्धेकर
२३ जुलै २०१२, ८:१५ रात्री


गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

फुर्रोगामी फियास्को

आज्ञा पाळणारे आज्ञाधारक
आदेश पाळणारे गुलाम
हुकुम देणारे हुकुमशहा
फतवा मानणारे धार्मिक
मंगळसूत्र आणि कुंकू
स्रीवर लादलेली बंधने
स्त्रीचं गृहकृतदक्ष राहणं
जेन्डर बायस्ड अन् स्टिरिओटाईप
हिजाब अन् बुरखा हर चॉईस
हलाला आणि मुताह विवाह
धार्मिक स्वातंत्र्याचे रितीरिवाज
तीन तलाक धार्मिक अधिकार
वटपौर्णिमा किंवा करवा चौथ
स्रीत्वाच्या गुलामीचं जोखड
मासिक धर्मात स्त्रीची अलिप्तता
म्हणजे स्त्रीत्वाचे शोषण
इद्दाह मात्र धार्मिक पवित्र विधी
"संविधान की मनुस्मृती" नारा असतो प्रोग्रेसिव्ह
"संविधान की शरिया" नारा कम्युनल प्रोपागंडा
सवर्ण दलित फूट म्हणजे हिंदूंचा वर्चस्ववाद
शिया सुन्नी वैर असतो इस्लामी अंतर्गत वाद
सर्वधर्मसमभावाचा वैचारिक विचका
फुर्रोगाम्यांनी केलेला इहवादी पचका

© भूषण वर्धेकर
१० फेब्रुवारी २०२२
पुणे

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

माझ्या जंगलगोष्टी

एकदा जंगलात सिंहाने सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावून घेतले आणि सांगितले की आपल्याला वाढलेल्या जंगलाचा कारभार पाहण्यासाठी नेमणुका करायच्या आहेत. पण त्या नेमणुका मी राजा असलो तरीही माझ्या मर्जीने करणार नाही. कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे तुमचे मत विचारात घेतल्याशिवाय माझा निर्णय सांगणार नाही. मग प्रत्येक प्राणीवर्ग आपापले प्रतिनिधी कोण याबद्दल चर्चा करू लागले. एका माकडाने शंका उपस्थित केली की कारभार पाहणाऱ्या मंडळीत सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे. सगळ्यांनी त्याची री ओढली. मग माकडांनी आघाडी घेऊन एक प्रतिनिधी माकड ठरवले सगळ्या प्राणी मात्रांचे प्रश्न मांडण्यासाठी. सगळे प्राणीमात्र भाबडे काहींनी लागलीच मान्यता दिली. काहींना असे समजावण्यात आले की तुमचे प्रश्न मांडण्यासाठी काही राखीव सदस्य प्रतिनिधी म्हणून आम्ही ठरवू जे तुमच्या प्राणीवर्गातील सगळे प्रश्न मांडतील. सगळे खुष झाले आम्हाला राखीव जागा मिळणार म्हणून. पण माकड मुळातच हुशार कोणाला निवडायचे हे तेच ठरवणार होते. सिंहाला हे सगळं माहिती होते, दिसत होते. पण त्याला जंगल एकत्र बांधायचे होते. कारभार करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा उभी करायची होती जेणेकरून जंगल सर्वच बाबतीत सुरक्षित राहिले पाहिजे होते. मग सिंहाने सांगितले आपले जंगल डोंगर, तळे, नद्या, पठारी भूभाग, घनदाट वने या सगळ्यांनी व्यापलेले आहे. आपण आपल्या जंगलात एकात्म कारभार करण्यासाठी प्रशासकीय गरज म्हणून पाच विभाग करूया ज्यात सगळ्या वर्गातील प्राणी अधिवास करतात. सगळे प्राणी लागलीच तयार झाले. माकडे बेरकीपणे ऐकत होते. 

सिंहाने सांगितले आपल्या जंगलात सगळे प्राणीमात्र गुण्यागोविंदाने कैक शतके राहतात. मग पाण्यात राहणारे असोत, झाडांवर राहणारे असोत, जंगलात राहणारे असोत किंवा सरपटणारे, हवेत उडणारे, वारूळं, बिळं करून राहणारे, गुहेत राहणारे, कळप करून राहणारे असोत. आपण सगळ्या ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना त्यांचे प्रश्न मांडून जंगलाचा कारभार उंचावण्यासाठी हक्क आणि अधिकार देणार आहोत. प्रत्येक प्राण्यांच्या प्रश्नावर आपण सगळे मिळून सामोपचाराने उत्तरे शोधू. आपला कारभार वाढवू. सुरक्षित राहू. जीवनमान उंचावू. आपल्या जंगलातील प्राण्यांच्या अन्नसाखळी मध्ये कोणत्याही बाहेरील शक्तींची लुडबूड होणार नाही हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. सिंह बोलत होता सगळे प्राणी कान देऊन ऐकत होते.

सगळ्यांनी एकमुखी मागणी केली तर प्रतिनिधी निवडला जाईल असा सिंहाचा कयास होता. सिंहाने पुढे सांगितले की हवेत उडणारे झाडावर राहणारे पक्षी यांचा एक प्रतिनिधी असणार, पाण्यात राहण्याऱ्या सगळ्या प्राण्यांचा एक प्रतिनिधी असणार, कष्टकरी किटक, किडे, मुंग्या यांचा तर राखीव प्रतिनिधी असणार कारण तो दुर्बल घटक आहेत. जमीनीवर सरपटणारे, बिळात राहणारे प्राणी पण त्यांचा एक प्रतिनिधी देणार. जंगलात कळपाने राहणाऱ्या प्राण्यांच्या पण एक प्रतिनिधी असणार. या सगळ्यावर शिक्कामोर्तब झाले. लागलीच माकडांनी एक प्रश्न उपस्थित केला जंगलाचे भौगोलिकदृष्ट्या विभाग करा म्हणजे प्रशासकीय कारभार अजूध सोपा जाईल. मग सिंहाने जमीन, डोंगर, पाणी, झाडे असे विभाग केले. आता सिंहाने सगळ्यांना सांगितले उद्या प्रत्येक प्राण्यांच्या प्रतिनिधीची निवड करण्यात येईल. आजची सभा संपली.

सगळे प्राणी आपापल्या विचारविश्वात रममाण होउन जाऊ लागले. माकडांना हीच ती योग्य वेळ आहे जाणवलं आणि त्यांनी सगळ्या जाणाऱ्या प्राण्यांना गाठलं. पहिल्यांदा किटक, किडे, मुंग्या या दुर्बल कष्टकरी वर्गाला समजावून सांगितले तुमचे कष्ट आम्ही खूप वर्षापासून पाहत आहोत. तुमचे दाहक प्रश्न शक्तिशाली राजसत्तेसमोर आम्हीच निर्भिडपणे मांडू शकतो. तुमच्या प्रश्नांना आम्हीच वाचा फोडू. तुम्हाला तुमचे जीवनमान उंच करायचे असेल तर आमच्यातील एका माकडाला प्रतिनिधित्व द्या. कारण आपण सगळे जमिनीवर राहतो. मग सगळ्या किटक, किडे, मुंग्यांनी माकडांना प्रतिनिधी ठरवले.

पुढे पक्ष्यांच्या समुहात एका माकडाने असेच समजावून सांगितले तुम्हाला खूप दूरवर भटकावे लागते रोजच्या जगण्यासाठी. तुमचे प्रश्न जर तुम्हीच मांडले तर त्याचा प्रभाव पडणार नाही. तुमच्या प्रश्नांची आम्हीच योग्यप्रकारे हाताळणी करू. तसंही आपण सगळे झाडावर राहणारे प्राणी आहोत. पक्षांना पण हे पटलं कारण आपल्याला सारखे स्थलांतरित व्हावे लागते. त्यापेक्षा जंगलात असणारे माकडे आपले प्रश्न मांडतील. म्हणून पक्ष्यांनी माकडांना प्रतिनिधी ठरवले.

असं करत करत सगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या समुहात जाऊन माकडे व्यवस्थित पोटतिडकीने पटवून देत होते आम्ही तुमचे प्रश्न व्यवस्थित मांडू. मग सगळ्या प्राण्यांना तेच पटलं आपलं रोजचं जगण एवढं जिकरीचे मग कोण प्रशासन आणि कारभारात लक्ष घालणार? त्यापेक्षा माकडे सगळीकडे संचार करत असतात त्यांना जंगलाची खडानखडा माहिती आहे. ते सगळीकडेच वावरत असल्याने तेच आपले प्रतिनिधित्व करू शकतील. म्हणून जंगलात राहणाऱ्या कळपातील प्राण्यांनी माकडांना प्रतिनिधी ठरवले.

पाण्यात राहणारे प्राण्यांच्या बाबतीत प्रश्न माकडांना सतावत होता. पण माकडांनी मगरीला तयार केले. मगर पाण्यात आणि जमिनीवर संचार करू शकते असे पटवून मगरीला पाण्यात पाठवले. मगर जेव्हा पाण्याबाहेर आली आणि सांगितले की सगळ्या जलचरांनी मला प्रतिनिधी म्हणून निवडलेय. मग माकडं बेरकीपणे मगरीला सांगू लागली तू एकमेव प्राणी आहेस जल आणि जमीनीवर राहणारा. म्हणजे तू तळ्यातला महाराजा आहेस. तू इथे असताना कोणीही तळ्याकाठी भटकत नाही हीच तूझी दहशत. मग तू राजा प्रमाणे वाग आम्ही तुझे पाईक सैनिक होऊन तुझ्यातर्फे प्रतिनिधी म्हणून जंगलात प्रश्न मांडू. तू तलावात राज्य कर. तळ्याच्या राज्यकारभारात फक्त तुझीच सत्ता. मगर खूष. माकडे सुस्साट. मग मगरीने पाण्यातील प्राण्यांचे माकडांना प्रतिनिधीत्व बहाल केले.

दुसऱ्या दिवशी सिंहाने बघितले तर सगळ्या जंगलातील प्राण्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून फक्त माकडेच गोळा झाली होती त्या त्या प्राणीमात्रांच्या एकमुखी संमती घेऊन. कारण सगळे प्राणी त्यांच्या रोजमर्रा जगण्याचे प्रश्न सांगितले सोडवायला बाहेर पडले होते. सिंहाने हे ओळखले की माकडे चलाखपणे वागत आहेत. पण सिंहाचा मुख्य फोकस जंगलाचे संरक्षण, विकास यावर होता. यथोचित पणे सगळ्या कारभाराची मुहूर्तावर सुरुवात झाली. भाषणे झाली. आनंदोत्सव साजरे झाले. अशी कैक वर्षे लोटली पण जंगलातील प्राण्यांच्या आयुष्यात काहीही बदल झाले नाहीत. जसे आधीचे आयुष्य होते तसेच राहिले. यावर कोणी आवाज उठवला की माकडे त्याचा यथोचित बंदोबस्त करायचे. सिंहाला हे सगळं समजत होतं पण जंगल एकात्मिक होते हेच तो पाहत होता. माकडांना आता आपलीच सत्ता यायला पाहिजे म्हणून मनोमन वाटले. मग त्यांनी आपापल्या प्रतिनिधी माकडांना जमीन, डोंगर, पाणी, झाडे या विभागाचे स्वायत्तता कसे करता येईल ते बघायला सांगितले. मग युनियन ऑफ फॉरेस्ट म्हणजेच संघराज्य जंगलात प्रत्येक विभागाचे स्वतंत्रपणे आस्तित्व पाहिजे. जंगलाचे त्यावर हक्क अधिकार नकोत अशा फुसकुल्या सोडल्या. सिंह गणराज्य म्हणजे जंगल या भूमिकेतून एकात्मिक जंगल तयार करण्यात व्यस्त होता. माकडांना एवढी वर्षे प्रतिनिधित्व केल्याने प्रशासकीय कारभाराची खडानखडा माहिती होती. त्यावर मजबूत पकड होती. अखेरीस सिंहाचा प्रयत्न निष्फळ ठरला मोठ्या जंगलाची जमीन, डोंगर, पाणी, झाडे यात फाळणी झाली. प्रत्यक्षात प्राणी रोजच्या जगण्याचा मरणाच्या प्रश्नांना भिडत होते. त्यांच्या काहीही गावी नव्हते. मनोमन ते सिंहाला च आपला राजा मानत होते. कारण ते कैक शतक पुर्वापार परंपरागत चालत आलेले होते. सरतेशेवटी जमीन, डोंगर, पाणी, झाडे अशी फाळणीनंतर जंगलाची विभागणी झाली. काही कालावधी गेल्यानंतर आजूबाजूला पसरलेल्या एकात्म जंगलाने जमीन, डोंगर, पाणी, झाडे काबीज करायला सुरूवात केली. कारण त्यांना माहिती होते माकडांना माकडचाळे करण्यासाठी काय आणि कोणत्या उद्योगात अडकायचे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी सिंहासारखेच धारिष्ट्य लागते. माकडांना ते जमणे शक्य नव्हते. दूर बसून हे सगळं सिंह पाहत आसवे गाळत बसला होता. कारण सिंह बंदिवान झाला होता आपल्या लाडक्या जंगलाची जमीन, डोंगर, पाणी, झाडे अशी झालेली शकले बघत.

©भूषण वर्धेकर
पुणे, ३ फेब्रुवारी २०२२

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

गांधीगौरव

अहिंसा फक्त पुस्तकी शोभते, शांतीसाठी युद्ध होते
सत्य बोलायला झकास, मात्र सिद्ध करायला नाहक त्रास

अस्तेय गुणधर्म म्हणून श्रेष्ठ, पण इतिहासात बळकावणारेच वरिष्ठ
ब्रम्हचर्य सामाजिक प्रतिमेचे ध्यान, प्रत्यक्षात भोगवादी कायदेशीर सज्ञान

अपरिग्रहात असतात मिरवण्याचे छंद, काबीज करायला संपत्तीचा ताळेबंद
श्रमजीवी संघटीत होतात सत्पर, मजबूरीने गुलामगिरीत रमतात तत्पर

आस्वाद समर्थ अनुभुतीचे बळ, गरजेपेक्षा जास्त हव्यासाचे मूळ
निर्भय होणे प्रगतीचे लक्षण, भीती दाखवणे हे सत्तातुरांचे भक्षण

सर्वधर्मसमभाव आदर्शवत प्रमाण, शोषितांचे मात्र धर्मांतर गतिमान
अस्पृश्यता निर्मूलन सलोख्याचे अनुष्ठान, सत्तेसाठी मात्र जातीपातीचे अनुमान

स्वदेशीची स्विकृती करे राष्ट्र आत्मनिर्भर, सरंजामी घराण्यांचे होई चित्त सैरभैर
वर्चस्वासाठी गांधी लागतात, द्वेषासाठी नथुरामाचा पर्याय
आसुसलेल्या सत्तेत राहण्यासाठी, दोघेही जिवंत ठेवणं अपरिहार्य

©भूषण वर्धेकर

२९ जानेवारी २०२२, रात्री २.१५ AM

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी  तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघर...