सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!


भारतीय राज्यघटना लिहिली जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फार बारकाईने अभ्यास करून आरक्षणाच्या तरतुदी केल्या. सर्वार्थाने जो समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रवाहापासून दूर होता त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी केल्या आहेत. यात प्रामुख्याने वंचित, शोषित जनतेला प्राधान्य द्यावे हे महत्त्वाचे. कारण वर्षानुवर्षे एकाच वर्गातील पिढ्यानपिढ्या लाभार्थी होत होत्या. बहुसंख्य सवर्ण हे संधी मिळवून आपापल्या परीने प्रगती करत. मात्र संधी न मिळालेला समाज किंवा संधी असूनही तीचा वापर कसा करावा याचा मागमूसही नसलेला समाज प्रामुख्याने शोषित, वंचित होता. दुर्लक्षित नव्हता फक्त शासनदरबारी, प्रशासकीय कारभारात अजिबातच नव्हता. अशा मंडळींची समाजातील धनाढ्य लोकांकडून पिळवणूक होत असे. नंतर अशा मंडळींना दलित, अस्पृश्य, मागास, भटकी जमात वा गावाच्या वेशीबाहेरची जमात वगैरे संबोधलं गेलं. अशा लोकांना समान संधी आणि सामाजिक न्याय देण्यासाठी आरक्षण महत्वाचे. मात्र आरक्षण हा हक्क नसतो. ती एक बेजमी असते सरकारी सबसिडी सारखी. त्यामुळे जे साध्य करायचे आहे त्यासाठी मागासलेल्या वर्गांना आरक्षण हे साधन म्हणून वापरणं गरजेचं होतं. मात्र चाणाक्षपणे आरक्षण हेच साध्य ठरवून हक्क सांगण्यासाठी राजकीय आणि सामाजिक व्यवस्था मजबूतीने उभी राहीली. स्वातंत्र्यानंतर किमान चार पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जर तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी पोचल्या नसतील तर समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे ह्या फक्त भूलथापा राहतील. आरक्षणाचा लाभ घेऊन वंचित, शोषित समाजाच्या एका वर्गाने कायमस्वरूपी लाभार्थी असण्याचा फायदा घेतला. त्यांच्याकडे सवर्ण वर्गाशी स्पर्धा करण्यासाठी बरोबरीने समान संधी मिळाल्या तरीही त्या वर्गाने आरक्षणाचा लाभ सोडला नाही. हीच खरी मेख आहे तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी न मिळाल्याच्या. 


आरक्षण मिळाल्याने समाजाचा विकास होतो ही एक सामाजिक अंधश्रद्धा आहे. आरक्षण हे साधन आहे संधी न मिळालेल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. पण राजकीयदृष्ट्या वापर करून लोकांनी आरक्षण हेच साध्य बनवलं आहे. कागदोपत्री आकडेवारी दिली की काहीतरी पुराव्यानिशी आपण युक्तिवाद करतोय असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र आकडेवारी देऊन जेव्हा तुलना केली जाते तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाण ही बाब फार महत्त्वाची. दुसरं तुलनेत कोणकोणत्या घटकांना प्राधान्य दिले आहे याचं. त्यामुळे आकडेवारी देऊन सांगितले की कोर्टात आपली बाजू भक्कमपणे उभी होईल आणि वेळ पडली तर संविधानाच्या चौकटीत राहून तरतूद करण्यासाठी दुरूस्ती विधेयक वगैरे आणण्यासाठी परत आंदोलनं, चर्चा, चिखलफेक हे निर्विवादपणे चालत राहणार आहे. समजा माणसाला आजार झाला असेल आणि त्यावर एखाद्या औषधाची मात्रा लागू होत नसेल तर औषध बदलायला हवं. किंवा आजार होऊ नये म्हणून जीवनशैली बदलणं गरजेची आहे. औषध तेच ठेवायचं आणि डॉक्टर बदलायचे. हेच तर कैक वर्षे चालू आहे. मुळातच संधी उपलब्ध करून देणे आणि संधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता, कौशल्ये विकसित करण्यासाठी सेवा, सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे आहे. घटनात्मक आरक्षण हे मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ट 'मॉडेल' आहे. पण इम्प्लिमेंटेशन गंडवले गेले आहे. त्याला जबाबदार सामाजिक आणि राजकीय व्यवस्था.


गेल्या सात दशकांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या किती पिढ्या भारतात घडल्या? ज्यांनी आरक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येऊन सक्षम होऊन आरक्षणाचे लाभ नको म्हणून किती घटकांनी सरकार दरबारी नोंद केली आहे? क्रिमी लेअर नॉन क्रिमी लेअर वगैरे नोंदणी फक्त जात प्रमाणपत्राची गरज आहे. प्रत्यक्षात आरक्षणाचे हत्यार म्हणून वापर सर्रासपणे सुरू आहे. आता तर संख्यात्मक बळ वाढतेय समजल्यावर हिंसक उग्र आंदोलने आणि व्यवस्थेला धाब्यावर बसवून वाट्टेल त्या मागण्यांसाठी लोकांना भडकावणं सुरू आहे. आरक्षण हे गरीबी दूर करण्यासाठी आणलेलं नाही. वंचित, शोषित आणि पिढ्यानपिढ्या मागासलेला वर्ग आणि मुख्य प्रवाहातील वर्ग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणलेला उत्तम पर्याय म्हणजे घटनात्मक आरक्षण. ठराविक कालावधीनंतर ह्या पर्यायाने खरंच तळागाळापर्यंत लोकांना लाभ मिळत आहे का? ह्याच सिंहावलोकन करणं गरजेचं. म्हणजे व्यवस्था अजून सुदृढ कशी करता येईल याची चाचपणी करता येईल. मात्र हे करण्यासाठी धजावणार कोण? आरक्षणाचा प्रश्न राजकीय झाला आहे. राजकीय समस्या सुटत नसतात त्याचा वापर सत्ताकारणात कुटील डाव खेळण्यासाठी होतो. 


मराठा आरक्षणावर खूप बोलून झाले, लिहून झाले, चर्चा वादविवाद होत राहतील. याचं समाजाभिमुख निरसन व्हावं असं कोणत्याही राजकीय सामाजिक क्षेत्रातील धुरिणांना वाटत नाही. ज्यांना पोटतिडकीने काही तरी करायचे आहे अशांना सार्वजनिक जीवनात व्यापकपणे पाठींबा मिळत नाही. कारण राजकीय धोरणलकवे. मराठा समाजातील लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. आपल्याकडे सत्ता मिळवण्यासाठी मराठा समाजाला वापरून दुर्लक्षित केले आहे. मराठा समाजाला संख्यात्मक पाठबळ जास्त आहे म्हणून त्यांचा राजकीय उपद्रव कोणत्याही राजकीय पक्षांना महागात पडतो. खरी गरज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून मराठा नेतृत्व राजकीय, आर्थिक क्षेत्रात आघाडीवर होते. मग सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण हवे असं का वाटू लागले? मराठा टक्केवारी जास्त असल्याने त्याच प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व पण जास्त असणार सहाजिकच आहे. मग एवढं सगळं सोशोइकोपॉलिटिकल प्रिव्हिलेजेस मिळून देखील मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासते म्हणजे. खरी मेख व्यवस्थेतील त्रुटींची आहे. त्यानंतर सत्ताधारी लोकांची अनास्था. त्यामुळे सत्तेवर कोणीही असले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच लोंबकळत राहील. 


ज्या आंदोलनाचे उपद्रवमूल्य जास्त ती आंदोलन आपल्याला कशी फायदेशीर ठरतील हे बघणं विरोधकांचे पहिलं काम आहे. कारण सत्तेवर यायचं असेल तर सरकार विरोधात वातावरण निर्माण झाले पाहिजे तरच आपल्याला सत्तेवर येण्याची संधी उपलब्ध होईल हे राजकीय शहाणपण विरोधकांना असते. सत्ताधारी वेळकाढूपणा करत आपल्या पथ्यावर कसं पडेल याची काळजी घेत असतात. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ना सत्ताधारी लोकांना इंटरेस्ट असतो ना विरोधकांना. आंदोलनं हायजॅक होणं काही नवीन नाही. गेल्या दोन दशकांत अशी कितीतरी आंदोलनं फसलेली आहेत किंवा भरकटवली गेली आहेत. मराठा समाज कधीकाळी क्षत्रिय, लढवय्या म्हणून नावाजलेला होता तोच आज आरक्षणासाठी मागासलेला हे सिद्ध करण्यासाठी धडपडतोय. यावरून लक्षात घेतलं पाहिजे की, हीच पद्धत जर अंगवळणी पडली तर संख्यात्मक बळाच्या जोरावर व्यवस्थेला वेठीस धरेल. वेळ पडली तर संविधानाच्या दुरुस्तीसाठी दबावतंत्राचा वापर होईल. यावर उपाय म्हणून मूळ प्रश्न ज्यामुळे उद्भवले ते सोडवले पाहिजेत. खेडोपाड्यात मराठा समाजाला शेतीसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी हा बहुतांश मराठा समाजातील आहे. खेडोपाड्यात शेतकऱ्यांची पिळवणूक कोणामुळे कशासाठी होते हे वेगळे सांगायला नको. शिक्षणासाठी मराठा तरुणांना तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत जेवढ्या इतर समाजातील लोकांना असतात. फक्त आरक्षण मिळाल्याने सरकारी नोकरीत मराठा टक्का वाढेल. शिक्षणासाठी फीया कमी भराव्या लागतील हा बाळबोध समज आधी दूर केला पाहिजे. सरकारमध्ये नोकरीच्या संधी लोकसंख्येच्या प्रमाणात खूपच कमी होणार आहेत उत्तरोत्तर. मराठा समाजाला आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक हवे आहे. राजकीय हवंय पण स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे निवडणुकीत पदे मिळवण्यासाठी. त्यात ओबीसींच्या आरक्षणातच मराठा समाजाला सामावून घेण्यासाठी धडपड चालू आहे. अशी त्रेधातिरपीट होणारी गुंतागुंतीची अवस्था झाली आहे. स्वतःला कधीकाळी सरंजाम, जहागिरदार, वतनदार, सावकार, जमीनदार, गावची पाटीलकी संभाळून, गावगाडा चालवणारा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो हे सामाजिक ऱ्हासाचे द्योतक आहे. भविष्यात आरक्षण मिळाले आणि समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही तर एससी, एसटी, व्हीजेएनटी वगैरे मध्ये सामील करा म्हणून मागणी करणार का? कारण ओपन मधून ओबीसींच्या कोट्यात जाण्यासाठी आज आंदोलन होतंय. याचा अर्थ आंदोलनं भरकटलेली आहे. आरक्षण मिळाल्याने जर खरंच समाजाचा चौफेर विकास होत असता तर गेली सात दशके किमान एक तरी मागास समाज आरक्षण नको मुख्य प्रवाहात स्थिरस्थावर झालो आहोत म्हणून पुढे आला असता. तसे झाले नाही आणि दोन चार पिढ्या मुख्य प्रवाहात येऊन सधन झाल्यानंतरही आरक्षण सोडणार नाहीत. अशा बरबटलेल्या वातावरणात कोणीही विवेकी पद्धतीने प्रबोधन करणार नाही. याचं कारण आरक्षण हे हत्यार झाले आहे. व्यवस्थेला जेरीस आणून हवं ते साध्य करता येते ह्याचा पायंडा पडत आहे. 


शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करणाऱ्या, पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या लोकांना सत्य परिस्थिती काय आहे आणि घटनात्मक मर्यादा कशा आहेत हे समजले आहे. यात भरडला जातोय तो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मराठा तरुण. यावर एक उपाय म्हणजे सामुहिक पद्धतीने संविधानाचे पारायण व्हावे आणि संविधानाच्या चौकटीत राहून देश कसा चालतो ह्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पण हे प्रबोधन करणे सोपे आहे का? संविधानाविषयी सर्वसामान्य माणसाला माहिती असते. वाचन, अभ्यास मात्र नसतो. त्यामुळे अशा जनतेला घोळात घेणं सोपं असतं. उदाहरणार्थ अमुक तमुक मुळं आपण दुर्लक्षित राहिलो किंवा फलाना टिमका लोकांमुळेच आपलं नुकसान झालं. अशा अन्यायकारक गोष्टी ठासून सांगितल्या की बहुसंख्य भोळा समाज विश्वास ठेवतो कसलीही शहानिशा न करता. तसंही सामाजिक आणि राजकीय प्रश्नांमध्ये पुसटशी रेषा असते. ती समजणं खूप जिकिरीचे आहे. त्यासाठी जागरूक नागरिक म्हणून सर्वात मोठा आधार म्हणजे संविधानाचा मसुदा. संविधान वगैरे गोष्टींचा वापर व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रामुख्यानं केला पाहिजे. पण व्यवस्थेतील लोक स्वतःला बळकट करण्यासाठी अशा आंदोलनाचा वापर करतात. मग अशी मंडळी सत्तेत असो वा नसो. व्यवस्था कशी राबवावी, झुकवावी किंवा विस्कळीत करावी याचं परिपूर्ण टूलकिट वापरण्यात वाकबगार असतात. यात फरफटतो तो गरीब समाज. बहुतांश बहुजन. सुस्थापित सवर्ण वर्गाचा रस्त्यावरील आंदोलन वगैरे यांचा तसा संबंध येत नाही. मात्र मेख अशी आहे की ह्यावर प्रबोधन करणे सोपे नाही. गमतीने म्हटले जाते की समाज हा किर्तनाने सुधारत नाही की तमाशाने बिघडत पण नाही. जो तो सभ्यतेचा आव आणून सांस्कृतिक किर्तन करतो किंवा सामाजिक जाणीवांची भोंगळ स्वप्न दाखवून राजकीय तमाशा करतो.


मागासलेल्या वर्गातील लाभार्थी जेव्हा सोयीसुविधांचा पुरेपूर वापर करून किमान दोन तीन पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जेव्हा तुल्यबळ होतात तेव्हा त्याच वर्गातील कायमस्वरूपी वंचित राहिलेले बाहेर फेकले जातात. उदाहरणार्थ एखाद्या जातीतीत मागासलेल्या कुटुंबातील पणजोबा, आजोबा, वडील जर सरकारी भरगच्च पगारदार नोकरीत असतील तर त्यांची पुढच्या पिढीला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी धडपड चालू असते. खरंतर अशा मंडळींमुळेच त्याच जातीतील संधी उपलब्ध न झालेली पिढी उपेक्षित राहते. तुलना केली असता समजेल की मागासवर्गीय क्लास वन अधिकाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आणि त्याच मागासवर्गातील शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी यात सर्वाधिक संधी कोणाला मिळणार? वंचित कोण राहणार? इथं समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे जिकरीनं लागू करणं गरजेचं आहे. त्यासाठी क्रिमी लेअर वगैरे तयार करण्यासाठी कायदेशीर रित्या कोर्टात ठरवलं जाईल. मात्र ते लागू करणं, अंगिकार करणं आणि स्विकारले जाणं या गोष्टी स्वयंप्रेरणेने येणं आवश्यक आहे. त्यासाठी कोर्टात, संसदेत मंजूरी होईल न होईल पण सार्वजनिक जीवनात ते स्विकारण्याची शक्यता कमीच. कारण आरक्षणाचा वापर हत्यार म्हणून झाला आहे. त्यासाठी सरकार दरबारी, राजकीय व्यवस्थेत लॉबिंग मजबूत केले जाते.  महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर अशीच व्यवस्था मजबूतीने उभी राहिली. त्यामुळे आधीच साधनसंपन्न असलेल्या मराठा समाजाला लौकिकार्थाने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. कालांतराने भाऊबंदकी जशी वाढली तसतशी संपत्ती विभागली गेली. सरासरी ३५% मराठा समाज महाराष्ट्रात जरी असला तरी ३०% च्या आसपास गरीब मराठा दशकांपासून वाढत गेला. त्यात याच दशकांत मागासवर्गीय आणि मराठेतर समाज बऱ्यापैकी आरक्षणाच्या लाभांमुळे सरकारी नोकरीत, राजकीय पटलावर स्थिरस्थावर झाला. अशा वेळी जेव्हा गावागावांत प्रबळ मराठा कुलीन घराण्याचे प्राबल्य कमी झाले आणि विखूरलेल्या मराठा कुटुंबातील आर्थिक आणि सामाजिक गोष्टींनी डोकं वर काढायला सुरुवात केली. अशा वेळी राजकीय धुरिणांनी आरक्षणाचा मुद्दा पेटवून आणि वरकरणी पटवून आपापले उपद्रवमूल्य किती आहे हे दाखवायला सुरुवात केली. महाराष्ट्रात रुढार्थाने भाजपा हा भटा-बामणांचा पक्ष म्हणून बाहेर पडून ओबीसीचा डीएनए असलेला पक्ष म्हणून उदयास आला तसतशी मराठांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली जाऊ लागली. राजकीयदृष्ट्या अजूनही मराठा समाज प्रभावी आहे. कधीकाळी तो सत्ताधारी पुरोगामी विचारांचा पाईक होता आता हिंदुत्ववादी विचारांचा कित्ता गिरवतोय. अशा परिस्थितीत बहुसंख्य मराठांच्या रोषाला ट्रिगर मिळाला तो कोपर्डी येथील अन्याय्यकारक घटनेचा. तिथून मग मूक मोर्चे निदर्शने झाली आणि मुख्य प्रवाहात मराठा आरक्षणावर झाडाझडती सुरू झाली. आता तर आम्हाला ओबीसीत घ्या नाहीतर बघा वगैरे वगैरे धमकीची भाषा बोलली जाऊ लागली. अर्थात झुंडशाही जशी वाढते तसा विचार, विवेक शून्य होतो आणि हिंसेला खतपाणी घालून आपापली इप्सितं साध्य केली जातात.


आम्ही परिस्थितीने वंचित, दुर्लक्षित झालो म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, ओबीसींच्या गटाचं पाहीजे, जमत नसेल तर संविधान बदला वगैरे मागण्या केल्या जातात. हे हास्यास्पद आहे. समजा भविष्यात ओबीसी मध्ये गेले आणि तरीही संधी मिळाली नाही तर काय एसटी एससी व्हीजेएनटी मध्ये घ्या म्हणून आंदोलन करणार का? दोन हाणा पण मागास म्हणा असं होत नसतं. संविधान अभ्यासलं पाहिजे. वाचून समजून आपण का त्यांच्या कक्षेत येऊ शकत नाही हे प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी मराठेतर समाजाला खूप कालावधी लागला. मात्र या कालावधीत गरीब मराठा समाजाला हाती काहीच लागले नाही. सत्तापिपासू मराठा लॉबी ही फक्त आणि फक्त आपला कुटुंबकबिला, बगलबच्चे आणि कार्यकर्ते लोकांना संधी कशी मिळेल यातच व्यस्त राहिले. त्यामुळे प्रस्थापित मराठा अजून श्रीमंत झाला. तर सर्वसामान्य गरीब मराठा हा कालांतराने विस्थापित होऊ लागला. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणता येणार नाही. कारण संविधानाच्या चौकटीत ते होऊच शकत नाही. जेव्हा शक्य होते तेव्हा जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. कारण तेव्हा मराठा समाज जर ओबीसी मध्ये आणला असता तर मराठा लॉबी ला राजकारणात मोठा पल्ला गाठाता आला नसता. सत्ता नसते तेव्हा बहुजन म्हणून मिरवायचे आणि सत्ता आल्यानंतर फक्त आणि फक्त मराठ्यांच्याच घराण्यात सत्ता टिकेल कशी हेच बघायचं. हेच काम आहे राजकारणातील सक्रिय मराठा लॉबीचे. आज कुणबी म्हणजे शेतकरी आहोत म्हणून ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे हे नियमाला धरून नाही. त्रिवार नाही. आज कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षण मिळवणारा समाज बऱ्यापैकी आस्तित्वात आहे. हाच समाज आज कागदोपत्री ओबीसी पण समाजात उजळमाथ्याने मराठा म्हणवून मिरवतो. ह्यांची संख्या लक्षणीय आहे. अर्थात ही कुणबी मराठा नोंद ब्रिटिशकालीन कागदोपत्रीच असल्याने राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये फायदेशीर झाली. मात्र ह्या नोंदी अपुऱ्या असल्याने मराठवाडा वंचित होता. मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्यापैकी प्राबल्य वाढलं ते ओबीसी समाजाचे. त्यात जून २०२५ च्या अखेरीस सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात एक जीआर काढला होता. तिथूनच मराठा आरक्षणासाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली असावी. कारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण राज्य सरकारने दिले आहे. त्याचा सर्वाधिक फायदा गरीब मराठा कुटुंबातील लोकांना झाला. हे असूनही आम्हाला गावपातळीवर प्रभाव पाडण्यासाठी काहीतरी कायदेशीर हक्काचे टूल हवे यासाठी तर हा आरक्षणाचा खेळखंडोबा केला नसावा? अर्थात हे प्रश्न आहेत उत्तरं ज्याने त्याने शोधावीत.


आरक्षणाचा आणि त्यासंदर्भातील तरतुदींचा पुनर्विचार करण्याची योग्य वेळ आलेली आहे. कारण मराठा आरक्षणावर आजवर जी आंदोलनं झाली ती एका तालुक्यातील एका खेडेगावात मर्यादित होती. नंतर हे आंदोलन जिल्ह्यात व्यापले गेले. आता ते डायरेक्ट राज्याच्या राजधानीत येऊन धडकले आहे. हे जर असेच चालू राहिले तर महाराष्ट्रात शेकडो जातीपातीच्या लोकांना स्फूरण चढेल. जो तो आम्हाला अमुक गटातून तमुक गटात घ्या नाहीतर तर बघा! अशी धमकीवजा आंदोलन होतील. आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. राजकीय नाही. आपल्याकडं एक बोगस व्यवस्था रुजली आहे जी राजकीय प्रश्न सामाजिक पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते, सामाजिक प्रश्न राजकीय पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते तर आपण आर्थिक प्रश्न भांडवलदारांच्या भरवशावर टाकून त्यावर काथ्याकूट करत बसतो. जर कोणत्याही असंविधानिक आरक्षणाच्या मागणीवर वेळीच योग्य ते उपाय केले नाहीत तर लिटमस टेस्ट म्हणून झुंडीच्या जोरावर हवं ते करवून घेऊ अशी नवीन कुचकामी संस्कृती जन्माला येईल. तीच लोकशाहीला घातक असेल. देशाचं सार्वभौमत्व फक्त कागदोपत्रीच राहील. जातीधारित आरक्षणाच्या कक्षेत अजून किती जाती वाढवणार? या देशात हजारोंच्या संख्येने जाती अस्तित्वात आहेत. त्यातील कित्येक प्रमुख जातसमुह एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी मध्ये विभागले गेले आहेत. बरं एखादी जात आरक्षणाचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात आली म्हणून आरक्षण नको म्हणून बाहेर पडली आहे का? मुख्य प्रवाहात म्हणजे प्रतिनिधित्व कोणत्या कोणत्या क्षेत्रात वाढलं? किती प्रमाणात आहे? जातीची लोकसंख्या तुलनेसाठी घ्यावी की इतर जातसमुह संख्या? तुलनात्मक दृष्टीने कशाचा आधार घ्यावा? अशी कोणती फूटपट्टी आहे का मोजमाप करण्यासाठी? जर लोकसंख्या वाढतेय म्हटल्यावर आरक्षणाचे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येणार त्या लाभार्थी लॉबीचीच. जसं सवर्ण लोकांनी सगळं कसं आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी मांड भक्कम करून ठेवली होती तशीच मागासवर्गीय कायमस्वरूपी लाभार्थी लॉबीचीच मक्तेदारी गटातटापुरती भक्कम झाली आहे. नुकत्याच युपीएससीच्या संदर्भात पूजा खेडेकर केस संदर्भात ह्याची प्रचिती आली आहे. हा मागासवर्गीय लाभार्थी 'मवर्ण' जर सगळे लाभ गिळंकृत करत असेल तर तळागाळापर्यंत लाभ पोचत नाहीत याला जबाबदार कोणाला धरणार? नुकत्याच सुप्रीम कोर्टाने यावर मागासवर्गीय क्रिमी लेअर वगैरे बाबत सरकारला आदेश दिले आहेत एका केस संदर्भात. यावर कार्यवाही होईल न होईल ते राजकीय फायदा तोटा बघून होईल. थोडक्यात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या संधी पोचल्या आहेत तर सामाजिक, राजकीय, आर्थिक संधींची कशा पद्धतीने पडताळणी केलीय याची शासनदरबारी कोणतीही प्रक्रिया नाही. केवळ राजकीयदृष्ट्या अजूनही वापर केला जातोय आरक्षणाच्या मुद्द्यांचा. यामुळे एकेक नेतृत्व जातीपातीच्या लोकांना उद्युक्त करतं. नंतर झुंडीच्या जोरावर हवं ते मिळालं नाही तर व्यवस्थेला बेजार करते. म्हणजे जातीपातीच्या राजकारणात सर्वपक्षीय नेते आपापल्या परीने जातीचं लॉबिंग मजबूत करण्यासाठी प्रामुख्यानं धडपडत असतात. हीच व्यवस्था कुचकामी आहे. कारण जातीपाती घट्ट पकडून स्थानिक राजकारणात प्रभाव पाडता येतो. मग हीच प्रयोगशाळा धर्माच्या राजकारणासाठी पाया मजबूत करते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे झेंडे मिरवणारे राजकीय नेते चाणाक्षपणे धर्माची पताका बेमालूमपणे फडकवू लागले. ही अधोगती झाली ही बाब लक्षात येत नसेल का? अर्थातच मनातून हतबलता असल्याने असे तडजोडीचे केविलवाणे निर्णय घेतले जातात. जनता भरडली जाते कारण जनतेला जातीपातीच्या विषाची मात्रा पचलेली असते. ह्या भेसूर भवतालामुळे संविधान, राज्यघटना वगैरे वर विश्वास वाढेल का कमी होईल? ह्या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून योग्य ती प्रक्रिया, नियम, दुरुस्ती न्यायालयाच्या आदेशानुसार संविधानाच्या चौकटीत संसदेने आमलात आणली पाहिजे. 


आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. मग लोकसहभागातून, त्या त्या जातीपातीच्या गटातटाचे नेतृत्व आणि मुख्य मागासवर्गीय आयोग यांनी पुढाकार घेऊन जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. आरक्षण हे हत्यार नाही, साध्य नाही फक्त साधन आहे कशासाठी तर समान संधी आणि सामाजिक न्याय मिळण्यासाठी. हे प्रबोधन करणं गरजेचं आहे. मेडिया प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक वा सोशल मीडिया वरील फ्रीलान्सर, इंडिपेंडंट पत्रकार ह्या सर्वांनी किमान सामाईक कार्यक्रम आखून विश्वसनीय एकी दाखवणं गरजेचं आहे. जसं युध्दाच्या वेळी सगळे प्रश्न, समस्या बाजूला ठेवून आपण सर्वजण देशासाठी एकत्र येतो तशीच भावना संविधानाच्या कक्षेत आरक्षणाच्या बाबतीत दिसायला हवी. अशा वखवखलेल्या समस्या आजूबाजूला पेटलेल्या असताना सामाजिक बांधिलकी टिकावी हीच अपेक्षा.


© भूषण वर्धेकर 

पुणे 

४ सप्टेंबर २०२५


बुधवार, ५ मार्च, २०२५

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची अडीच दशकं सरली. गेल्या पंचवीस वर्षात साहित्य, चित्रपट, नाटक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात नेमका काय बदल घडला याचा धांडोळा घेण्यासाठी हा लेख. खरंतर राजकीय बाबींवर धांडोळा घ्यायची इच्छा आहे मात्र राजकीय क्षेत्र गेल्या अडीच दशकांत इतकं चिखलाने बरबटलेले आहे की त्यावर कितीही चर्चा करा, कितीही लिहा, कितीही वाद घाला, कितीही रवंथ केले तरी 'परिस्थिती जैसे थे' राहणार आहे. त्यामुळे शक्यतो राजकीय परिप्रेक्ष्यात न पाहता विशेषतः मराठी साहित्य, चित्रपट, नाटक वगैरे या अनुषंगाने लिखाण करायची इच्छा आहे. गेल्या पंचवीस वर्षात मराठी चित्रपट, नाटक आणि साहित्य याविषयी खूप वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विशेषतः समाज माध्यमातून आपली मते ठोकून देणे हे एक राष्ट्रीय आद्य कर्तव्य आहे आणि हे बजावलंच पाहिजे असा सामाजिक प्रवाह सध्या मजबूत झाला आहे. 


लेखाची सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. २००० नंतरच्या काळात जे काही बदलत गेले ते बघणं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. २००० आधी चित्रपट, नाटक, साहित्य वगैरे क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर, साठोत्तरी, नव्वदी वगैरे शेलक्या शब्दांत वर्णन करण्यासाठी काहीतरी ऐवज होता. त्यातही पंचवीस वर्षापूर्वी अशी शाब्दिक बिरुदावली बऱ्यापैकी साहित्यात वावरत होती. आज २०२५ सुरू झाले आणि प्री कोरोना आणि पोस्ट कोरोना ही बिरुदावली वाढली. या लेखात गेल्या पंचवीस वर्षांत विशेषतः सिनेमात बरेच बदल झाले. एक पडदा चित्रपटगृह ते मल्टिप्लेक्स. नंतर मोबाईल मध्ये आलेले ओटीटी प्लॅटफॉर्म. त्यामुळे या तीनही माध्यमातून सिनेमानं खूप वेगवेगळे प्रेक्षकवर्ग तयार केले. नाटकाची जी काटकसर करायची सवय होती ती तशीच आहे कारण व्यवसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी ही अजूनही मध्यमवर्गीय संसार करतात तसाच नाट्यसंसार करत आहेत. ठराविक साच्यातील विषयावर कधीकाळी नाटकं होत असत. गेल्या पंचवीस वर्षांत जूनीच नावाजलेली नाटक नवीन संचात रंगभूमीवर आणली. प्रायोगिक नवनव्या प्रयोगांना गवसणी घालत शहरं, तालुके, गावपातळीवर तगून आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत मात्र कलाकारांना टिव्ही सिरियल्स, सांस्कृतिक कार्यक्रम, युट्यूबवर, फेसबुकवर रील्स,व्हिडिओ वगैरे मुळं भरपूर एक्स्पोजर मिळाले आहे. ज्यामुळे गुणी कलावंत तर पुढे आलेच. सोबत टाकाऊ माल पण घाऊक प्रमाणावर बाजारात उपलब्ध झाला. चित्रपट क्षेत्रात कधीकाळी फक्त मुंबई, पुणे, कोल्हापूर वगैरे भागांत असणाऱ्या मंडळींना बघायची सवय होती. नंतर मात्र महाराष्ट्रातील खेडोपाड्यातून आलेल्या नट, कलाकार, दिग्दर्शक लोकांनी मराठी भाषेत अस्सल मातीतील विषय, आशय आणि उत्तम मनोरंजन होईल असे प्रयोग केले. गेल्या काही दशकांत केवळ सिनेमाच्या कंपू पुरता मर्यादित असलेले फिल्म्स फेस्टिवल बऱ्याच ठिकाणी सुरू झाले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमांची मेजवानी वगैरे म्हणतात तशी सोय कित्येक ठिकाणच्या लोकांची झाली. जगभरातील सिनेमे कधीकाळी फक्त आणि फक्त अभ्यासक, कलाप्रेमी लोकांना सहजासहजी उपलब्ध होत असत. मात्र सोशल मीडिया मुळं किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म मुळं सर्वसामान्य जनतेला टिचकीवर उपलब्ध झाले. अर्थातच प्रेक्षकांना नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञान आणि विषय वगैरेचे पर्याय इतके उपलब्ध आहेत की सिनेमाला प्रेक्षकांपर्यंत पोचावे लागत आहे. भरपूर प्रमाणात पर्याय उपलब्ध असल्याने प्रेक्षकही चुझी झाले आहेत. अर्थातच कंटेंट चांगला असेल तर प्रेक्षक सिनेमा उचलून घेतातच. तसंच साहित्याचे झाले आहे. 


कधीकाळी लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचणारी एक तरुण पिढी होती. वाचकप्रेमी कुटुंबात पण लायब्ररी सदस्य असायचे. मात्र ऑनलाईन ब्लॉग, पोर्टल, ईबुक्स चा पर्याय उपलब्ध झाल्याने फार नवनवीन विषयावर लिहिले गेले. सोशल मीडियावर चर्चा, वादविवाद झाले. साहित्यात गेल्या दोन दशकभरात सेल्फ हेल्प वरची पुस्तके मराठीत प्रकाशित करण्याची जी टूम आली ती थांबायचं नाव घेईना. तसंही पुस्तके छापायचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढले. कारण तशा संधी मिळत गेल्या नवनवीन प्रकाशन संस्था गावोगावी झाल्याने. कधीकाळी सरकारी सवलती ने छपाईचा कागद मिळाले की बरीचशी पुस्तके प्रकाशित केली जायची. नंतर पुस्तक छपाई हाच व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक तरुण, लेखक, तज्ञ नवं तंत्रज्ञान घेऊन पुढे आले. त्याचा नवीन चकचकीत पुस्तकं हाताळण्याचा अनुभव वाढला. कॉफी टेबल बुक सारखी चकचकीत पुस्तकं कधीतरी बघणाऱ्या लोकांना अशा नवीन दमाच्या मंडळींनी नवनवीन प्रयोग करून वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके उपलब्ध करून दिली. अर्थातच यात साहित्य किती आणि माहितीपर पुस्तके किती हा वादाचा विषय आहे. 


नाटकाची निर्मिती ही पदरमोड करून समाजासाठी काहीतरी देणं लागतो वगैरे म्हणून करणारी मंडळी पुर्वीच्या काळात होतीच होती. सध्या पण आहेतच. मराठी व्यवसायिक नाटकं ही म्हणजे फक्त विनोदी नाटके हे एक उगाचंच ठसवले गेलेले नॅरेटिव्ह कोलमडून पडले. नवनवीन आशय, विषय घेऊन प्रायोगिक असो वा व्यवसायिक नाटकं वाढली. प्रेक्षकांना भावली. मात्र नागरीकरण जसे वाढले तसे उपलब्ध नाट्यगृह वाढली नाहीत. जी होती, आहेत आणि नवीन झालेली केवळ सरकारी बजेट मध्ये तरतूद केली म्हणून झाली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर जी नाट्यगृह आहेत तिथल्याच लोकांपर्यंत नवनवी प्रयोग पोचले. तालुका पातळीवर नाटक केवळ स्पर्धा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इव्हेंटबाजी याचाच आधार घ्यावा लागला. व्यावसायिक नाटकांनी मात्र गेल्या पंचवीस वर्षात नवीन प्रेक्षकवर्ग तयार केला. शिवाय नाट्य, चित्रपट आणि माध्यमांशी निगडित शैक्षणिक व्यवस्था, वेगवेगळ्या संस्था आणि वर्कशॉप्स वाढल्याने प्रोफेशनल ऍटिट्यूड वाढला. ही खूप जमेची बाजू. प्रशिक्षण घेऊन आलेल्या नव्या दमाच्या मंडळींनी नाटक असो वा सिनेमा करताना फक्त स्वतःचं जगणं मांडले नाही तर नवनवीन ग्रहण केलेले सादर केले. उदाहरणार्थ परदेशी चित्रपटाचे विषय आपल्या मातीत कसे होतील याचा विचार केला. असे प्रयोग प्रेक्षकांना आकर्षित करतात. एकेकाळी परदेशी चित्रपट बघणं म्हणजे ठराविक वर्गातील लोकांना सहज शक्य होते. त्याची व्याप्ती वाढल्याने प्रेक्षक सिनेमा केवळ निखळ मनोरंजनासाठी न बघता चिकित्सा करण्यासाठी बघू लागला. त्यात जातीपातीच्या चष्म्यातून बघणाऱ्या लोकांना जास्त संधी मिळाली. तसंही तिकडचं साहित्य, सिनेमा कसा कसदार, कलात्मक वगैरे असतात अन् इकडचं सगळंच भोंगळ अन् रटाळ बोलणारे त्याकाळी पण होते. आताशा त्यांना मतं ठोकून द्यायला रान मोकळं मिळाले आहे. आम्ही कसे अभिरुची संपन्न वगैरे आहोत याचा टेंभा मिरवणारे असतातच. 


बायोपिक सिनेमा विषयी मात्र बरीच उलथापालथ झाली आहे. २००१ साली आलेल्या अमोल पालेकर यांच्या ध्यासपर्व ने चरित्रविषयक चित्रपटाची एक उत्कृष्ट सुरुवात केली होती. नंतर मराठी भाषेत कलात्मक वगैरे फक्त फेस्टिव्हलमध्ये जाणारे सिनेमे लोकांना विशेष आवडू लागले. तसा हुकुमी प्रेक्षकवर्ग तयार होऊ लागला. एकूणच व्यावसायिक गणिते आणि सिनेमाच्या बजेटचा वाढता आलेख पाहता नवनवीन प्रयोग होऊ लागले. हे स्वागतार्ह. सर्वात जबरदस्त बदलली ती मराठी सिनेमाची दृश्यप्रतिमा. सिनेमॅटिक फ्रेम म्हणूया! उंची निर्मितीमुल्ये, आधुनिक कॅमेरा आणि इतर बदललेल्या तांत्रिक गोष्टींमुळं सिनेमा देखणा झाला. तीच गत सिरियल्स ची. कमी प्रमाणात होणाऱ्या मराठी सिरियल्स नंतर नवनवीन चॅनल आल्यानंतर धोधो वाहू लागल्या. उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि लगेच संपणाऱ्या सिरियल्सचा प्रेक्षकवर्ग वाढला. मात्र टीआरपी मिळतो म्हणून चॅनल वालेच ठरवू लागले की काय अन् कसं दाखवायचे तेव्हा या सिरियल्स वगैरे या फक्त रतीब टाकण्याचा धंदा झाला. पालीला ओढूनताणून मगर दाखवायचा हा प्रकार! कथानक म्हणजे कळशीभर पाणी टाकून वाढवलेली पाचकळ आमटी. अशा एकसे बढकर एक डेली सोप ने गेली दोन दशकं घुसळून निघाली. मात्र या सिरियल्स वगैरे मुळं गावागावांतील कलाकार मंडळींना फुटेज मिळाले हे पथ्यावर पडलं. त्यामुळे घरातल्या टिव्हीवर चकाचक गावं दिसू लागली. यातच गावोगावच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी देवदेवतांच्या कथा, संत, स्वामी, अध्यात्मिक बाबा-बुवा, ऐतिहासिक पात्रे वगैरे मान्यवरांच्या गोष्टी सिरियल्सच्या माध्यमातून घरोघरी पोचल्या. त्यामुळे एक वेगळीच धंदेवाईक इंडस्ट्री तयार झाली. अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नकळतपणे महाराष्ट्रात बहुसंख्य असणाऱ्या बहुजनांवर पडला. कारण एक उगाचंच पसरवलेलं मिथक होतं कलाक्षेत्रात फक्त आणि फक्त भटबामणांचा बोलबाला आहे म्हणून. त्याला फाटा मिळाला गेल्या दोन दशकांत बदललेल्या टिव्ही इंडस्ट्रीमुळे.


सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या दशकभरात बदललेले समाजजीवन हे इव्हेंटबाजी मुळं सुटल्या सारखं झालं आहे. या इव्हेंट मॅनेजमेंट ने संमेलनं, भाषणं, व्याख्यानं, नाचगाणी वगैरेचे करमणुकीचे कार्यक्रम आणि हुल्लडबाजीचे बरबटलेले महोत्सव वगैरे गावागावांत पोचविले. त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने सामाजिक जाणिवा रुंद होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात वगैरे हे ब्रीद धुळीस मिळाले. शहरातील मोकाट वाढलेल्या युवा नेत्यांनी शहराचे विद्रुपीकरण तर केलंच. शिवाय गावोगावच्या माननीय पुढाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात जो थिल्लरपणा सुरू केला त्याला आता आवर घातला जावू शकत नाही. भारतात सणासुदीचा एक वेगळाच बारमाही माहौल असतो. त्यात भरकटलेल्या उत्सवी, महोत्सवी उन्मादाला पारावर उरला नाही. ना सामाजिक जाणीव राहिली ना सणांचं पावित्र्य. त्यामुळे एक बटबटीत नकोशी संस्कृती आली. ती लादली गेली का हा चर्चेचा विषय आहे. कधीकाळी असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे लोकवर्गणीतून होत असत. राजकीय आकांक्षा वाढल्याने पैसा ओतला जाऊ लागला आणि लोकांना नकोशी वाटणारी सांस्कृतिक मुस्कटदाबी वाढली. यावर आता जनजागृती वगैरे करणं दुरापास्त झाले आहे. अशा सांस्कृतिक क्षेत्रात बोकाळलेल्या अनिष्ट प्रथा जरी असल्या तरी लोकसहभागातून बरीच दुर्लक्षित राहिलेल्या उत्तम कार्यक्रमांना मेन स्ट्रीट मध्ये म्हणावं तसं फुटेज मिळाले नाही. राजकीय हस्तक्षेप झाला की माती होते तर लोकसहभागातून जर कार्यक्रम झाला तर त्याचा किमान पातळीवर मर्यादित प्रभाव दिसतो.


सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात गेल्या दोन दशकांत एक हायली प्रोफेशनल इव्हेंट संस्कृती आली. पूर्वी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले जात असे. आताशा इव्हेंट सेलेब्रेट होतो. अर्थातच धंदेवाईक आणि व्यावसायिक यात जमीन अस्मानी फरक आहे. 
कारण एखादा इव्हेंट कमर्शियली सक्सेसफुल झाला तर त्यावर बऱ्याच लोकांची उपजीविका चालते. एका बाबतीत नव्या पिढीला प्रोफेशनल अवेअरनेस खूप आहे हे जाणवतं. विशेषतः आर्थिक बाबतीत बरेच नवनवीन पर्याय उपलब्ध असल्याने चोखंदळ पणा जाणवतो. त्याचाच परिपाक म्हणून हा प्रोफेशनल अवेअरनेस वाढलेला असावा. तशीच कट थ्रोट स्पर्धा पण आहे टिकून राहण्यासाठी हे ही कारण असावे. कलाक्षेत्रातील संधी मिळणं आणि मिळालेली संधी वापरून स्वतःचं मार्केटिंग करणे हे जबरदस्त फॅक्सिनेटिंग आहे. याचा एकत्रित गोळीबंद परिणाम सुरुवातीला फक्त शहरी भागात जाणवत होता. आताशा तो गावपातळीवर पोचला आहे असं जाणवतं. कारण सांस्कृतिक वगैरे वगैरे छत्राखाली आज गावपातळीवरील कित्येक कलाकार, गट-तट बऱ्यापैकी आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. कधीकाळी सिल्व्हर स्क्रीन किंवा टेलिव्हिजन ही प्रमुख दोन माध्यमातून जनतेपर्यंत पोचता येत होतं. मात्र सोशल मीडिया साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या मुळे कित्येक नवनवीन रोजगाराच्या संधी सांस्कृतिक क्षेत्रात तयार झाला. अर्थातच दुसरी काळी बाजू शोषणाची वाढली हे खेदाने म्हणावे लागते. त्यात कंपू संस्कृती जी केवळ ठराविक लोकांपर्यंत मर्यादित होती ती आता सर्वसामान्य जनतेला पण दिसू लागली आहे. 


गेल्या पंचवीस वर्षात रिऍलिटी शो ने एकूणच सांस्कृतिक क्षेत्रातील कलाविषयक अभिरुची बथ्थड झाली आहे. कारण जे विकलं जातं ते खपवलं जातं. या आधीही हवशे नवशे गवशे वगैरे मंडळी होती. पण रिऍलिटी शोमधून त्यांना नको इतका मोठा कॅनव्हास मिळाला. त्यामुळे हेच खरं सांस्कृतिक कलासक्त जग आहे हे बिंबविलं गेले. काला क्षेत्रात सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेली किंवा मेहनतीने मिळवलेली पात्रता, कलेबद्दल असलेली आत्मीयता, रियाज, तपश्चर्या आणि सर्जनशील जाणीवा ह्या बरबटल्या. याचं कारण म्हणजे रिऍलिटी शो सारख्या कार्यक्रमामुळे स्पॉन्सर्ड, प्रॉक्टर्ड, स्क्रिप्टेड मालमसाला युक्त बारमाही रतीब टाकला जाऊ लागला. ह्या रिऍलिटी शोमुळे जे जे होतकरू तरुण होते ते तर भरडले गेलेच. पण नवनिर्मिती करण्याची प्राज्ञा असणारी मंडळी खपाऊ माल विकू लागल्या. त्यामुळे क्रिएटिव्हिटी वगैरे फक्त उत्कृष्ट कॉपी पेस्ट जो करेल त्याची ही संकुचित वृत्ती उदयास आली. कलाक्षेत्रातील संधी विस्तारल्या खऱ्या अर्थाने. पण अंधानुकरण करणाऱ्या लोकांचा बोलबाला झाला. जे काही वेगळं करू पाहतात त्यांना फुटेज मर्यादित मिळाले. याचा परिपाक म्हणजे पीआर एजंट संस्कृती तयार झाली. त्यामुळे कलाक्षेत्रात जे जे तयार होत होतं त्याचा भडीमार केला जाऊ लागला. त्यात भर पडली सोशल मीडिया साधनांची. मग कहर झाला. लोकांच्या अटेंशन स्पॅन मध्ये काहीही करून आपण आलो पाहीजेत. हाच इथल्या बाजाराचा नवा नियम झाला. कधीकाळी कलेसाठी जनता आसुसलेली असायची. नवीन सिनेमा,नाटक, गाणं बजावणं वगैरे गोष्टींची आतुरतेने वाट बघणारी एक पिढी होती. कलेचे साधक जसे होते तसे कलेविषयी आपुलकी असणारे कलाप्रेमी होते. कारण तुरळकच अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होत असे. आता मात्र भव्यदिव्य इव्हेंट सेलेब्रेट करण्यात येत असल्याने तादात्म्य हरवलं आहे. एवढ्या गदारोळात खऱ्या अर्थाने कलेसाठी धडपडतात ते जशी संधी मिळेल तशी कला जोपासतात. चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तर प्रेक्षकांची वाहवा मिळवतात. 


सामाजिक बदल काय झाले त्याविषयी बोलू. सर्वात महत्त्वाचे बदल झाले ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले म्हणून. ते नोकरी, शिक्षणासाठी सर्वाधिक झाले. अर्थातच जागतिकीकरणाचे सगळे फायदे तोटे आपल्याला या पंचवीस वर्षात समजले. या काळात सर्वात स्वागतार्ह बाब लक्षात घेता येईल ती म्हणजे स्त्री घराबाहेर पडली. नोकरीसाठी, शिक्षणासाठी. त्यामुळे ती पुढारली. पंचवीस वर्षापूर्वी तर नोकरदार स्त्रिया बाबतीत आकडेवारी बघितली तर लक्षात येईल की सरकारी नोकरी मध्ये आणि पारंपरिक शिक्षणासाठी घराबाहेर पडणारी स्त्रीयांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र गेल्या दोन दशकांत खूप मोठ्या ग्रामीण भागातील स्त्रिया नोकरी निमित्ताने, शिक्षणासाठी घराबाहेर पडल्या. स्वावलंबी झाल्या. एक प्रकारे सो कॉल्ड पुरुषप्रधान संस्कृतीला फाट्यावर मारत कित्येकींनी घरादाराची जबाबदारी संपूर्णपणे पेलली. वेगवेगळ्या स्तरातून येत अनेक क्षेत्रांत दखल घेण्याजोगी कामगिरी बजावली. स्वतःचं म्हणणं आत्मविश्वासाने मांडले. कित्येक सामाजिक पुचाट रुढी, प्रथा, परंपरा झिडकारल्या. बंडखोर स्त्री ही समाजाला समजली. अर्थातच अशाने अनेक संस्कृती रक्षकांना लागलीच कुटुंबव्यवस्था बाधित होण्यामागे पुढारलेली स्त्रीच दिसू लागली. कारण त्यांना संकुचित विचार सिद्ध करण्यासाठी हेच आयतं कोलित मिळते. मात्र स्त्री घराबाहेर पडली आणि विचाराने, शिक्षणाने पुढारली की नकळतपणे कुटुंब आणि समाज वेगळ्या दृष्टिकोनातून बदलतो. परंपरागत साचलेपण झिडकारता येतो. याचा परिणाम हा पुढच्या पिढ्यांना झाला. कारण शिकलेल्या स्त्रीच्या कुटुंबात एक प्रकारची आधुनिकता असते. निर्णय घेण्याची, कारभार चालवण्यासाठी आवश्यक असलेली सदसद्विवेकबुद्धी आणि आत्मनिर्भरता नकळतपणे स्त्री पुढच्या पिढीला हस्तांतरित करते. पुरुषप्रधान संस्कृतीत ही दुर्लक्षित राहिलेली गोष्ट होती. गेल्या दोन दशकांत मात्र स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि स्वतःच्या विचारांना प्राधान्य देऊ लागली. अजूनही एक भाबडा समज पसरवला गेला की स्त्री घराबाहेर पडली की स्वैराचार वाढतो. मुळातच पुरुषी स्वैराचाराला झाकण्यासाठी आधुनिक स्त्रीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. एखाद्या कुटुंबात निर्णय घेण्याची कधीकाळी पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान या पंचवीस वर्षात मिळाले. हाच सामाजिक महत्वाचा बदल नव्या पिढीने स्विकारला. अर्थातच ह्याच काळात अनेक स्त्रियांनी व्हिक्टीम कार्डचा वापर केला हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ढासळलेल्या लग्नसंस्था, कुटुंबसंस्था असो वा नातेसंबंध याला जबाबदार फक्त आणि फक्त पुढारलेली स्त्रीच असते असे नालायक अनुमान काढणे विकृतीचे लक्षण आहे. मुळातच लग्नसंस्था, कुटुंबसंस्था वा परस्पर नातेसंबंध ह्या गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्या पाहिजेत. विश्वास, गरजा, अवास्तव अपेक्षा आणि भावनिक आधार या बाबींवर खंडन मंडन झाले पाहिजे. प्रमाण वाढले म्हणून स्त्री ला जबाबदार धरणं कृतघ्नपणा आहे. लोकसंख्या वाढली की त्याचं प्रमाणात इतर गोष्टी वाढणारच. संस्कृती वाहक पुरुषामुळे आणि खराब झाली तर स्त्रीमुळे हे बैल बुद्धी लॉजिक आहे. अर्थातच नवीन तरुण पिढी ह्या सगळ्या संस्कृती विषयक सक्तीच्या बंधनांना फाट्यावर मारते. बंडखोरी करते हे खूप महत्त्वाचे. संस्कृती बंडखोरीमुळे बहरते. वाढते. डबक्यात साठलेले पाणी आणि वाहणारे पाणी तशीच संस्कृती, सभ्यता बघायला हवी. नवनवीन गोष्टी स्विकारण्याची, जोपासण्याची सुपीकता जर समाजात नसेल संस्कृतीत नसेल तर सामाजिक पतन ठरलेले असते.


सध्या मिलेनियल म्हणून जी पिढी आहे, क्रयशक्ती वाढलेली ती फार प्रिव्हिलेज्ड आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता ही बुरसटलेली नाही. नवं स्विकारण्याची आणि बोथट रूढी परंपरा झिडकारून पुढे जाण्याची त्यांची मानसिक तयारी फार महत्त्वाची. कारण सर्वात जास्त व्यक्त होण्याची साधनं ह्यांना उपलब्ध आहेत. जगण्याकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन आहे. त्यामुळे ही एकविसाव्या शतकातील स्वागतार्ह बाब आहे. शिवाय हल्ली नातेसंबंधात डेटिंग, लिव्ह-इन, डिंक्स (डबल इन्कम नो किड्स) सिच्युएशनशिप, बेंचिंग आणि नॅनोशिप सारखे तत्सम प्रवाह अंगवळणी पडले आहेत. त्यामुळे काय चूक काय बरोबर यावर काथ्याकूट न करता नवीन सामाजिक बदल म्हणून बऱ्यापैकी अंगवळणी पडले आहेत. अर्थातच हे जास्त जाणवतं शहरी भागात. कारण अस्ताव्यस्त नागरीकरणामुळे तुटले पणा जास्त जाणवतो. त्यात व्यसनं, सवयी वगैरे कवटाळल्या जातात. ह्या नव्या बदलांना ही तरुण पिढी गेल्या दशकभरात रुळली आहे. नवीन पिढीला जे काही जागतिक पातळीवर घडतं त्याचे अपडेट्स लागलीच समजतात. त्यामुळे त्यावर रिस्पॉन्स कमी रिऍक्शन्स जास्त येतात. तसंही सोशल मीडियामुळे इम्पलसिव्ह रिऍक्टिव्ह ऍग्रेशन ग्रस्त पिढी वाढू लागली. असंतुलित गोष्टी इतक्या वेगाने आदळत असल्याने शांतपणे विचार करून एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता मत ठोकून देणे म्हणजे आद्य राष्ट्रीय कर्तव्य झाले आहे. त्यात फेक न्यूज, अफवा, सिलेक्टिव्ह पावित्रा आणि स्युडो नॅरेटिव्ह ने वातावरण दुषित झाले आहे. अशा सगळ्या कसोट्यांवर सामाजिक जाणीव कमी आक्रस्ताळेपणा वाढला आहे.


आर्थिक बाबतीत मात्र या पंचवीस वर्षात न भूतो न भविष्याति बदलांचा सुकाळ आला आहे. पारंपारिक रोजगाराच्या आधारावर पैसा कमावणे हे या दोन दशकांत मागं पडलं आहे. नवनवीन प्रयोग करून तंत्रज्ञान वापरून नवी पिढी अर्थ साक्षर झाली आहे. पैसा , वेळ आणि उत्पादकता वगैरे मुलभूत गोष्टींचं इकॉनॉमिक्स चांगले समजू लागले आहे. पैसा कमावण्यासाठी, पॅशन पूर्ण करण्यासाठी धडपड, नवनवीन रोजगाराच्या संधी, व्यवसाय, स्टार्ट अप, प्रोफेशनल कन्सल्टिंग वगैरे सारख्या नवनव्या चोखंदळ वाटा शोधून पुढं जाणारी पिढी आहे ही. त्यामुळे प्राथमिक, कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा कमावणारी एक पिढी होती. ती जूनी पिढी गुलामी पत्करुन राबणारी होती. बॉसिंग सहन करणारी होती. बहुतेक ही पिढी एक्सटर्नली ड्रिव्हन होती. नवीन पिढी इंटरनली ड्रिव्हन आहे. तरुण पिढीला पैसा कमावणे हे स्कील बेस्ड आहे हे समजलंय. त्यामुळे वयाची किमान काही दशकं नोकरी करून गुलामी पत्करुन जगणं मान्य नसलेली ही पिढी आहे. त्यामुळे स्थलांतर करून नवनवे मार्ग शोधणारी, धडपडणारी, आवडलं नाही तर मन मारत न कुढता नवीन पर्याय अंगिकारणारी नवीन पिढी आहे. आर्थिक बाबतीत सर्वात जास्त हुशार असलेली ही पिढी. पैसा फक्त जगण्यासाठी न कमावता वेल्थ, ऍसेट तयार करण्यासाठी कसा वापरता येईल ह्याचा प्रामुख्याने विचार करणारी पिढी आहे. त्यामुळे रोजगार म्हणजे तीस पस्तीस वर्षे नोकरी ही रुळलेली संस्कृती या दोन दशकांत नव्या दमाच्या तरुणांनी हाणून पाडली आहे. हा बदल सर्वस्वी महत्त्वाचा. हीच परिस्थिती ग्रामीण भागातील शेती क्षेत्रातील आहे. नवनवीन प्रयोग करणारी नवीन पिढी नवं तंत्रज्ञान विकसित करत वापरत काहीतरी करु पाहत आहे. ग्रामीण भागातून शहरी कनेक्ट वाढवत आहेत. तरीही शेती क्षेत्रात अजून बरेचसे बदल सरकारी कृपेमुळे होत आहेत. खाजगीकरण उदारीकरण जसं झाले उद्योगधंद्यात, कारखानदारी मध्ये, तसे कृषी क्षेत्रात कमी झाले. राजकीय आशिर्वादाने गुलाम असलेली एक शेतकऱ्यांची पिढी होती. जिने खूप मोठा अन्याय सहन केला. मात्र नवी पिढी नवनवीन बदल स्विकारत काहीतरी करु पाहत आहे. उद्यमी होत आहे. शेतीच्या कामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सरकार दरबारी असलेल्या मदतीशिवाय खाजगी मदत घेऊन उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. बदलांचे प्रमाण कमी असले तरी बदल होत आहेत. पारंपारिक शेती उद्योग काय टाकत आहेत हे महत्त्वाचे. हेच बदल देशातील अर्थव्यवस्थेत अमुलाग्र घडामोडीसाठी आवश्यक आहेत. कारण कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखले जातो.


सरतेशेवटी एवढं सगळं मांडल्यानंतर लक्षात येतं की, आज २०२५ मध्ये जी काही उरलीसुरली वय वर्षे ८० पार केलेली जागरूक मंडळी आहेत (कोरोनाच्या तडाख्यातून वाचलेली) त्यांनी खूप मोठी स्थित्यंतरे बघितली आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जे घडलं ते अनुभवलं आहे. त्याच पिढीने नव्वदच्या दशकात ऐन चाळीशीत वेगाने होणारे बदल रिचवले आहेत. आज २०२५ मध्ये अतिशय वेगाने आणि आक्रस्ताळेपणा असलेल्या बदलांना पण सहन केले आहे. मुळातच वयाच्या या टप्प्यावर ह्या मंडळींनी जेवढा बदलणाऱ्या काळाचा पट अनुभवला आहे तो फारच मजेशीर आहे. संख्यात्मक आकडेवारी खूप कमी असेल या पिढीतल्या लोकांची. मात्र साहित्य, चित्रपट आणि नाटक या क्षेत्रात घडलेल्या बदलांचा आवाका मोठा आहे. थोडक्यात यांनी पचवलं खूप काही पण जे योगदान दिले ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी खूप मोठा कालावधी लागला. तसा कालावधी नंतरच्या पिढीला कमी मिळत गेला. उदाहरणार्थ २०२५ मध्ये साठी पार केलेली एक पिढी जी बहुसंख्य सरकारी किंवा निमसरकारी नोकरी मध्ये जोपासली तर चाळीशीत असणारी पिढी बहुतेक खाजगीकरण उदारीकरण वगैरे मुळं मिळालेल्या संधी जोपासणारी आहे. जी पिढी विशीत आहे तीला मात्र एक नवं कल्चर लाभलं आहे. त्यामुळे साठी पार केलेली एक पिढी हळूहळू युझ्ड टू झाली नवनवीन बदलांना. त्यापेक्षा जास्त पर्याय नसल्याने चाळीशीत वावरणाऱ्या पिढीला नवे बदल आत्मसात करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आता विशीतील्या पिढीला गायडेड मिसाईल प्रमाणे पुढे जावं लागणार आहे. अनगायडेड मिसाईल अनकंट्रोल होते त्याच पद्धतीने विशीतल्या पिढीला वापरण्यासाठी अनेक सुप्त धष्टपुष्ट व्यवस्था टपून बसलेल्या आहेत. भविष्यात ही गद्धेपंचवीशी (गद्देपंचवीशी?) संपल्यावर काय होणार हे बघणं औत्सुक्याचे आहे.

तूर्तास एवढेच.

लेखन विश्रांती!


©भूषण वर्धेकर 
५ जानेवारी २०२५
पुणे - ४१२११५

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

अस्थिर आशिया कोणाच्या पथ्यावर पडणार?


आशिया खंडातील ४८ देश आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार देश म्हणजे भारत चीन रशिया आणि जापान. त्यापैकी जापान देशाबद्दल नंतर चर्चा होईल. पण भारत, रशिया आणि चीन या देशांमधील घडामोडी आशिया खंडातील स्थैर्यासाठी फार महत्वाच्या आहेत. त्यातही मागच्या शतकातील अखेरच्या चार पाच दशकांत रशियाचे विभाजन होणं आशिया खंडातील अस्थिर राजकारणाची फार महत्त्वाची घटना होती. त्यापूर्वी ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देताना पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान देणं हेही तेवढेच महत्त्वाचे. आशिया खंडातील चार डझन देशाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास भूगोल बघितला तर कल्पना येईल की गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळात आशिया अस्थिर होणं हे क्रमाक्रमाने वाढत आहे. भारतीय उपखंडातील अस्थिरता अभ्यासाची असेल तर बंगालची फाळणी गेल्या शतकाच्या पहिल्या दशकात झाली ते आज एकविसाव्या शतकातील दोन दशकं उलटून गेल्यानंतरही बांग्लादेशात जे होतं ते जगाच्या इतिहासातील फार महत्वाचे पर्व आहे. कारण संपूर्ण जगाचा विचार केला तर पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या आशिया खंडातील आहे. तर तीस टक्क्यांच्या आसपास पृथ्वीवरचा भूभाग आशिया खंडाने व्यापलेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आशिया खंडातील स्थैर्याचे आणि अस्थिरततेचे पडसाद खूप मोठे आहेत. बरेचदा बाह्य हस्तक्षेपामुळे तर कधीतरी अंतर्गत कुरबुरी वाढल्यामुळे आशिया खंडात अस्थिरता निर्माण होते. कित्येक अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी यावर चर्चा केल्या आहेत. शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. बरीचशी उत्कृष्ट दर्जाची पुस्तके उपलब्ध आहेत. (ऐसी अक्षरे वर हा धागा सुरु करण्यासाठी सध्याच्या बांग्लादेशात होत असलेल्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे.) अस्थिर आशिया नेमकं कोणासाठी वरदान आहे किंवा कोणासाठी शाप यावर चर्चा व्हावी हा शुद्ध हेतू या धाग्यामागे आहे.

भारताच्या बाजूला असणारे छोट्या देशातील अस्थिरता ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. कारण आजूबाजूच्या देशातील अस्थिरता ही नेहमीच आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय दळणवळण आणि व्यवहार, व्यापार व गुंतवणूक यावर प्रभाव टाकत असते. यावर सोशोइकोपॉलिटिकल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची निरिक्षणं फार महत्त्वाची. यात कॉन्स्पीरेसी थिअरीज् पुष्कळ आहेत. त्यात काही बाष्कळ व उथळ असतात. ‌भारताच्या एकूण परिस्थितीत या घडामोडींमुळे काय बदल होतील हे बघणं गरजेचं आहे. आग्नेय आशियातील दरवाजे इशान्य भारतातून जातात. तिकडेच भारताची जवळपास चार हजार किलोमीटरची सीमारेषा लागून असलेल्या बांग्लादेशात धुसफूस सुरू आहे. त्यातही आशिया खंडातील सर्वात जास्त प्रभावशाली रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट लोकांचा खूप मोठा गट अशांतता निर्माण करत आहे. त्यांच्या मागे जे कटकारस्थान करणारे देश संघटना असतील त्यांना काय हवं नको त्यावर या अनुषंगाने चर्चा करता येईल.
भले त्यामागे छुपा चीन किंवा अमेरिकेचा पाठींबा असेल! कॉन्स्पीरेसी थिअरी आहेत बऱ्याच. पण संशोधन करून मांडणी केली असेल तर त्यात तथ्य आहे. आशिया खंडात हिंदू, बौद्ध पण सर्वात जास्त आहेत त्यांनी कधी एवढी भयानक कट्टरता दाखवली नाही की आशिया खंडातील स्थैर्य डगमगेल. ती योग्यता इस्लाम मधील कट्टर पंथीय लोकांची. कारण धर्माच्या नावाखाली जिहादी प्रवृत्ती तयार होणं आणि त्यांना आपापल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरणं ह्याचे प्रयोग आशिया खंडात बरेचदा झाले. मुख्य अशा वेळी त्यांना खतपाणी घालण्यासाठी देशांतर्गत संधी वा निमित्ते मिळतात. हे सूचक आहे. सोप्या पद्धतीने मांडायचे झाले तर दुसऱ्याच्या भांडणात तिसरा छुपा लाभार्थी दडलेला असतो. तसा आशिया खंडातील अस्थिरता कोणाच्या तरी नक्कीच पथ्यावर पडत असणार! 

खूप महत्त्वाची गोष्ट घडत आहे शेजारच्या देशात सत्तांतर झाल्यानंतर. ती म्हणजे फ्रंट वर येऊन जमात-ए-इस्लामी संघटनेचचा सक्रीय सहभाग. या संघटनेला पाकीस्तातून रसद मिळते हे सर्वश्रुत आहे. चीन सुद्धा कट्टर पंथीय रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट आपल्या देशात तयार होणार नाही याची दक्षता घेतो. तर दुसरीकडे आजूबाजूच्या देशात शिरकाव करण्यासाठी अशा संघटनांचा वापर करता येईल का किंवा कर्जबाजारी करून छोट्या देशांना आपल्या इशाऱ्यावर कसे नाचवता येईल याचा पुरेपूर दक्षता घेतो. चीनधार्जिणी एक गट भारतात नेहमीच सक्रिय असतो. याबाबतीत चीन भारत संबंध यावर संशोधन करणारे प्रकाश टाकू शकतील. बारकाईने विचार केला तर भारतात कट्टरपंथी इस्लामी संघटना कैक आहेत. जमात-ए-इस्लामी संघटनेचे छुपे पाठीराखे बंगाल, आसाम मध्ये असल्याचे गुप्तचरांनी सांगितले आहे. थोडक्यात माहिती जमात-ए-इस्लामी बद्दल. १९४०-४१ च्या दरम्यान अबुल अल मौदुदी यांनी ह्या संघटनेची स्थापना भारतात केली. या संघटनेची उद्दिष्टे म्हणजे इस्लामिक तत्त्वांनुसार समाज उभा करणे. ह्याच संघटनेचे सेक्युलॅरिझम आणि लोकशाही बद्दल काय विचार आहेत हे जाणकारांकडून समजून घ्यावेत. म्हणजे अशी कट्टर संघटना बांग्लादेशात फ्रंट वर येऊन कार्यभाग साधणे आहे. भविष्यात बांग्लादेशातले येणारे सरकार यावर बंदी आणू शकते दिखाव्यासाठी. पण भारतीय मुस्लिम समाजात अशा कट्टर पंथीय लोकांचे विशेष इंटरेस्ट दडलेले असतात. उदाहरणार्थ शंभर टक्के साक्षर असलेल्या केरळमध्ये पी.एफ.आय नावाची संघटना आहे. तिने काय काय कारनामे केले आहेत हे जगजाहीर आहे. आयसीसचे धागेदोरे तर केरळमध्ये मिळालेले आहेतच. बंगाल आणि आसाम मध्ये अनधिकृत निर्वासित मुस्लिमांचे प्रश्न कैक वर्षे अस्तित्वात आहेत. म्हणजे मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्य झाली की कट्टर पंथीय लोकांचा उपद्रव वाढू लागतो. इस्लाम मधील कट्टरता वाढली की हिंसक रुप घेते हे जगाला समजलं आहे. जिहादी प्रवृत्ती कशी भयानक अमानवी कृत्य करते हे जगाला दाखवलं आहे वेळोवेळी. संख्यात्मक वाढ झाली की कट्टरता वाढण्याची कारणं काय आहेत यावर चर्चा व्हावी. विचारवंतांनी जनजागृती करावी. जगभरात पन्नास पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत. त्यापैकी किती स्वतःला लोकशाही वादी सेक्युलर देश म्हणून प्रोजेक्ट करतात? काही अपवाद सोडले तर कोणते मुस्लिम देश इस्लामिक न म्हणता सेक्युलर म्हणवून घेतात? अर्थातच हा कळीचा प्रश्न आहे. गेल्या काही दशकांत कट्टरता वाढू लागली. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसरीकडे उजव्या लोकांची कट्टरता वाढली. उदाहरणार्थ म्यानमार मध्ये राखाईन प्रांतातून रोहिंग्यांना हाकलून दिले. तसंही मुस्लिम समाजातील शिया, सुन्नी आणि अहमदिया वगैरे पंथांचे अंतर्गत कलह चालूच आहेत. मूळ प्रश्न इस्लाम कट्टरता वाढण्याबद्दल आहे. बहुसंख्य झाले की अल्पसंख्याक लोकांना छळ सहन करावा लागतो. हे बांगलादेशातील घटनेने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. आधी भारतात काश्मीर मध्ये दिसलं. पाकिस्तान मध्ये काय होतंय ते जगात प्रसिद्ध आहेच. याकडे नेहमीच हिंदू मुस्लिम, गुड मुस्लिम बॅड मुस्लिम, सहिष्णू हिंदू कट्टर हिंदू वगैरेंच्या दृष्टीने चर्चा, वादविवाद, मंथन होत राहणार. भारतात तरी हिंदू मुस्लिम हा चघळला जाणारा प्रश्न सृष्टीच्या अंतापर्यंत टिकणार आहे.

भारतात भविष्यात व्होट बँक जपण्यासाठी अशा कट्टर इस्लामी संघटनेला राजकीय पाठींबा देणारे पक्ष पण पुढे येतील. काही सुविद्य पुरोगामी भाजपा संघ यांना उल्लेख करून काउंटर प्रतिक्रिया देत राहतील. २००२ मध्ये झालेली गुजरात दंगल असो वा १९८९-९० घ्या काळात काश्मीरमध्ये पंडितांना जे सहन करावे लागले त्या घटना. हे सर्वाधिक सेलेबल इव्हेंट आहेत. ज्याने त्याने वाटून घेतलेले. शंभरपेक्षा जास्त सेलिब्रिटी लोकांचे निषेधाचे टुलकिट म्हणजे 'ऑल आईज ऑन राफा' किंवा 'सेव्ह गाझा' याविषयी बोलणारे निषेध नोंदवणारे बांग्लादेशात हिंदूंना जे सहन करावे लागले त्यावर का बोलत नाही यावर सध्या हिंदुत्ववाद्यांनी आघाडी घेतली आहे. इस्राएल ला शिव्या देणाऱ्या संघटना, विचारवंत वगैरे बांग्लादेशात जे घडतेय त्यावर का बरं बोलत नाहीत वगैरेंचा महापूर सोशल मीडियावर आला आहे. गंमतीचा भाग म्हणजे कधीकाळी रोहिंग्यांना आश्रय द्या म्हणणारी त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारी मंडळी, बांगलादेशातील हिंदू निर्वासित लोकांना भारतात आश्रय दिला तर समस्या निर्माण होतील म्हणून फेसबुकवर पोस्टी खुरडत आहेत. मुस्लिम समाजाचे कितीतरी विचारवंत इस्लाम धर्म शांततेचा पुरस्कार करतो, प्रचार प्रसार करतो म्हणून व्याख्यानं देतात. लिहितात. मुस्लिम सत्यशोधक चळवळीत कित्येक हुशार विचारशील मंडळी आहेत. ते नेमकं सध्या कशाची वाट बघत आहेत? 
असो. त्यांचे जे काही तर्क असतील त्यांच्यापाशी. 'गंगा जमुना तहजीब' मातीमोल होण्यास दोन्हीकडील मंडळी जबाबदार आहेत. त्यामुळे ही न संपणारी चर्चा आहे. तूर्तास इतकेच. 

जसा इस्लामी कट्टर पंथीय संघटनेचा/लोकांचा वापर आशिया खंड कसा अस्थिर राहील यासाठी होतो. तसाच आशियाई देशांमध्ये एकाधिकारशाही वाढल्याने अंतर्गत कलह कुरबुरी वाढू लागतात यांचाही परिणाम होत असावा. बांग्लादेशात जे घडलं त्यांचे आर्थिक कारणं जशी आहेत तसेच राजकीय कारण पण आहे. लोकशाहीचा बुरखा घालून एकाधिकारशाही हुकुमशाही सत्ता टिकवणं महागात गेले. हॅपीनेस इंडेक्स, वाढललेला जीडीपी, टेक्सटाइल उद्योगवाढ वगैरे जमेच्या गोष्टी धुळीस मिळाल्या. म्हणजे भारताच्या आजूबाजूला ज्या देशात राजकीय उलथापालथ होते, उदाहरणार्थ पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका वगैरे त्यांचे परिणाम येनकेनप्रकारेन भारतावर होणार हे निश्चित. विशेषतः इशान्य भारताचा इतिहास भूगोल बघितला तर आग्नेय आशियातील किमान डझनभर देश भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत. व्यापार, रस्ते, समुद्री मार्ग यावर लक्ष केंद्रित केले तर खूप मोठी बाजारपेठ भारताच्या प्रभावाखाली येईल. या छोट्या देशांना चीनपेक्षा भारताबद्दल जास्त विश्वास असेल. चीनची विस्तारवादी भुमिका जगजाहीर आहे. आशिया खंडातील सगळ्यात जास्त हॅपनिंग जे जे घडतं ते ते भारताच्या आजूबाजूला घडतं हे विशेष. या आधी अखंड रशियाचे तुकडे केले. आता पुतिनबाबा वडिलोपार्जित संपत्ती भावकीने लाटली म्हणून भावकीवर हल्ले करू लागलाय. ते एक तर्कट फार गुंतागुंतीचे आहे. युक्रेनच का? या प्रश्नाचे उत्तर शोधणं रंजक आहे. तसंच पानीपत का? या प्रश्नाचे उत्तर शोधणं रंजक असेल कारण तत्कालीन उत्तर भारतात ज्या महत्वाच्या लढाया झाल्या त्यात पानीपत महत्त्वाचे ठिकाण होते. (१५२६, १५५६ आणि १७६१ च्या लढाया) असो विषयांतर नको. पण आधी रशिया डळमळीत झाला आणि त्याचे फायदे आंतरराष्ट्रीय पातळीवर इतरांना भरपूर झाले. तसे भारताच्या आजूबाजूला देशातील अशांतता कोणाच्या पथ्यावर पडत असावी?

पाकिस्तान, भारत आणि बांग्लादेश हे एकाच भूभागाचे केलेले तीन तुकडे. यातील व्यापार, उद्योग व्यवसाय गुंतवणूक, राजकीय स्थैर्य आशिया खंडातील सर्वात महत्त्वाचे व्यवहार आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य वेगळं होतात, स्वायत्तता हवी असते म्हणून पण प्रत्यक्षात वेगळं होऊन प्रगती केली तर ठिक. अधोगती झाली तर वेगळं होण्यासाठी आटापिटा कशासाठी केला हा यक्षप्रश्न आहे. आज पाकिस्तान आणि बांगलादेश महत्वाचे शेजारी जर गटांगळ्या खात असतील तर त्यांच्या मागे नेमकं कोण आहे आणि त्यांच्या सुप्त इच्छा काय आहेत? हे शोधणं महत्वाचे. त्यांच्या अस्थिरतेचा आपल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गोष्टींवर काय परिणाम होणार हे बघणं पण तेवढंच जिकिरीचे. 

(एकूणच आशिया खंडातील देश आणि त्यांच्या सर्वसमावेशक व्यवहारांवर रूटलेज(टेलर ऍन्ड फ्रान्सिस ग्रुप) पुस्तकांची सिरिज अभ्यासली जाते. शिवाय ए.आर.आय एशिया रिसर्च इन्स्टिट्यूट ची स्प्रिंजर सिरिज पण महत्वाचे दस्तऐवज आहे आशिया खंडातील घडामोडींची माहिती घेण्यासाठी. मॅकमिलन एशियन हिस्ट्री वर पण महत्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या बद्दल मराठी मध्ये लिखाण तुरळकच. जे काही असेल ते पाठ्यपुस्तकी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमानुसार. जाणकारांनी मराठी मधील साहित्य, पुस्तके असतील तर नक्कीच सांगावीत.)

© भूषण वर्धेकर 
९ ऑगस्ट २०२४
पुणे

शनिवार, ६ जुलै, २०२४

आरक्षणाच्या बैलाला ऽ ऽ ऽ

त्याचं असं झालं, समाजाचं एकदमच बिनसलं
जातीपाती एकवटल्या, आरक्षणाला कंटाळून
संगनमताने सर्वांनी एकच ठराव केला संमत
आम्हाला करा ब्राह्मण, तरच सोडू आरक्षण

एकीकडे प्रत्येकाला पाहिजे होती ब्राह्मण जात
आरक्षणाच्या ठेकेदारांना पटत नव्हते अजिबात
जातीपातीच्या राजकारणाचे नेते झाले उदास
सगळेच झाले ब्राह्मण तर चालणार कसे दुकान

वाटलं होतं सुटेल पेच, पुढ्यात होती खरी मेख
ब्राह्मणात नक्की कोण, होत्या डझनभर शाखा
सगळे ब्राम्हण एकदम, आंदोलनात आले थेट
आधी सांगा कोणते ब्राह्मण, मग ठरवा कोटा

चित्पावन, देशस्थ, कऱ्हाडे की कायस्थ 
सारस्वत चिडले, का आम्हाला वगळता!
सर्वात आधी ठरवा, गौड की द्राविडी 
लगेचच यजुर्वेदींनी मांडल्या पोटजाती 

तेवढ्यात आले देवरुखे, खोत आणि खिस्ती 
सोबतीला होते कनौजी, दैवज्ञ आणि कानडी
अय्यर सरसावले तोच, नंबुद्रींचा वेगळा नारा
कोकणस्थ झाले सावध, देशस्थ उठले भराभरा

शेवटी कोटा ठरवण्यासाठी ठरली बैठक
उत्तरेतील पंचगौड, की दक्षिणेचे पंचद्रविड
नंतर मांडून पोटजाती ठरवा क्रीमी लेअर 
शिक्कामोर्तब होऊन कोटा झाला सूकर

लिखित पाहिजे म्हणून ठरले एकछत्री सूत्र 
तेवढ्यात आला प्रश्न, कोणतं घ्यायचं गोत्र
तयार होत्या वंशावळी, मात्र अडले सगेसोयरे 
बैठक झाली सैरभैर, त्यात काही कावरेबावरे 

नुसत्याच झाल्या चर्चा, वाद थोडी हमरीतुमरी
कागदोपत्री प्रत्यक्षात मात्र दिखावा एकसूरी
कोकणस्थांनी कानोसा घेऊन साधला निशाणा
आम्ही आहोत तुमच्यासोबत सांगून देशस्थांना

अय्यर लढून तीस टक्क्यांत झाले होते मातब्बर 
नंबुद्रींना होता कमी वाटा तरी झाले धीरगंभीर 
कनौजींचा प्रश्न मैथिल उत्कल ब्राह्मणांचं काय?
ठरलं होतं खरं, सगळे एकच ज्याला पवित्र गाय

एवढं सगळं बघत बघत आंदोलक झाले त्रस्त 
जातीपातीच्या प्रश्न समस्या ह्या पेक्षा अस्तव्यस्त
म्होरक्या होता बेरकी, सोबत अनुभवी प्रशासन
आली हळूच मागणी, होऊ दे बहुजन ब्राम्हण

सगळे झाले खूष बघून नवीन होणारी शाखा
वाचल्या आपापल्या पोटजाती अन् उपशाखा 
बहुजन ब्राम्हणी कुळाचार अन् रूढी, परंपरा
यांचेही झाले पाहिजे शासन नोंदणी गोषवारा 

सरतेशेवटी ठरलं काढा घटनात्मक श्वेतपत्रिका 
सगळ्या गोतावळ्यांनी घेतल्या आणाभाका
जे सांगू ते खरं सांगू कागदी पुराव्यानिशी नोंदवू
तडीपार करा कोणी सापडला आमच्यात भोंदू

शासकीय हस्तक्षेप होताच उभा नवीन पेचप्रसंग
घटना कलम, परिशिष्टे पारायणे झाली यथासांग 
बहुजन ब्राम्हण साठी नोंदणीकृत नव्हती तरतूद
आणा दुरुस्ती विधेयक किंवा काढून वटहुकूम

पाच वर्षे सरली, अर्धवट ठेवून श्वेतपत्रिका
सर्वपक्षीय लोकांना दिसू लागल्या निवडणुका
एकाएकी घटना बदलणार,  ठोकली आरोळी
चाणाक्षांनी घेतली भरून आपापली झोळी

येत्या अधिवेशनात येऊन सत्तेत दिले आश्वासन 
करू नोंदणीकृत घटनात्मक बहुजन ब्राम्हण
तोवर जातीपातीच्या नेत्यांनी गाजवली भाषणं
'तरच सोडू आरक्षण' चं वाजत राहिलं तुणतुणं 

© भूषण वर्धेकर 
५ जूलै २०२४
पुणे 

२ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू केले लिहिणं 
५ जूलै २०२४ रोजी पूर्ण केले 

गुरुवार, २० जुलै, २०२३

उठ भक्ता जागा हो

उठ भक्ता जागा हो
बॉयकॉट चा धागा हो
संस्कृतीच्या रक्षणासाठी
भावी पिढीच्या कल्याणासाठी 

उठ गुलामा पेटून उठ
लढण्यासाठी रणशिंग फुंक
भक्तमुजोरीला मोडण्यासाठी
पुरोगामित्व टिकवण्यासाठी

पळ सैनिका जिवानिशी धाव
उचल सतरंज्या खाऊन वडापाव
आदेशाचे पालन करण्यासाठी 
अस्मितेचा अंगार पेटवण्यासाठी

खडबडून जागा हो नवसैनिका
कर खळखट्याक घे आणाभाका 
परप्रांतियांना ठोकण्यासाठी
नवनिर्माण जोपासण्यासाठी 

लाल कॉमरेडा ठोक सलाम
रक्तरंजित संघर्ष कर बेफाम
मॅनिफेस्टोच्या संवर्धनासाठी
शोषितांच्या मतदानासाठी

गर्जून मूलनिवासी घुमू दे नारा
वंचितांचा तूच एकमेव सहारा
सवर्णांना धडा शिकविण्यासाठी
निळ्या क्रांतीच्या उत्थानासाठी

आवळून घट्ट मनगट, हे बिग्रेड्या
तोडफोड कर बनून घरगड्या
सनातन्यांना संपवण्यासाठी 
साहेबांना सत्ता गाजवण्यासाठी 

हे तरुणा, सार्वभौम देशाच्या
कष्टाने मिळवा संधी रोजगाराच्या 
टीचभर पोटाच्या उपजिविकेसाठी
रक्ताच्या नात्यांच्या भरभराटीसाठी 

१९ जूलै २०२३
पुणे


मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

Her Voice Her Choice

Her Voice, Her Choice
Her decision, Her life

Her distorted life, Family problem
Her repentance, Curtural problem

Her broken mind, Career problem
Her love life, Society matter

Her success, Women empowerment
Her failures, Male dominance

Her excessive demands, Pampered parents problem
Her chaste emotions, Humiliated men problem

Her social duties, Our religious problem
Her freedom of expression, Progressive beliefs problem 

Her murder, Our problem
Her rape, Patriarchal problem

©Bhushan Vardhekar 
15 November 2022
Pune - 412115

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

लढाई

आमची लढाई, तुमची लढाई
त्यांची लढाई, ह्यांची लढाई
आतली लढाई, बाहेरची लढाई
गल्लीतील लढाई, दिल्लीतील लढाई

मनातील लढाई, घरातील लढाई
एकट्याची लढाई, दुकट्याची लढाई
शांततेसाठी लढाई, वर्चस्वासाठी लढाई
रक्षणासाठी लढाई, संरक्षणासाठी लढाई

मिरवण्याची लढाई, दिखाव्याची लढाई
आस्तित्वाची लढाई, निकराची लढाई 
अटीतटीची लढाई, मेटाकुटीची लढाई 
शहाण्यांची लढाई, मुर्खांची लढाई

गटागटात लढाई, तटातटात लढाई
सामाजिक लढाई, राजकीय लढाई
जातीअंताची लढाई, जातीपातीची लढाई
विचारांची लढाई, आचारांची लढाई

सत्तेची लढाई, खुर्चीची लढाई
मंत्र्यांची लढाई, नेत्यांची लढाई
पदांची लढाई, प्रतिष्ठेची लढाई
भक्तांची लढाई, गुलामांची लढाई

अंधश्रद्धेशी लढाई, प्रथांशी लढाई
रुढींशी लढाई, परंपरांशी लढाई
दैववादी लढाई, विवेकवादी लढाई
सांस्कृतिक लढाई, सदाचारी लढाई 

पक्ष वाढवण्याची लढाई, पक्ष संपवण्याची लढाई
बंड क्षमवण्याची लढाई, बंड पेटवण्याची लढाई
सरकार करण्यासाठी लढाई, सरकार पाडण्यासाठी लढाई
विरोधकांची अंतर्गत लढाई, विरोधकांची कमीशनची लढाई

जनतेची जगण्याची लढाई, महागाईशी कमाईची लढाई,
बेरोजगारीशी बेकारांची लढाई, शेतकऱ्यांची निसर्गाशी लढाई 
कर्जबाजाऱ्यांची बॅंकेशी लढाई, मजूरांची भांडवलदाराशी लढाई
मानवतेची माणसाशी लढाई, सौहार्दाची ढोंगाशी लढाई 

©भूषण वर्धेकर
३१ मे २०२२
पुणे -४१२११५



शनिवार, २९ जानेवारी, २०२२

गांधीगौरव

अहिंसा फक्त पुस्तकी शोभते, शांतीसाठी युद्ध होते
सत्य बोलायला झकास, मात्र सिद्ध करायला नाहक त्रास

अस्तेय गुणधर्म म्हणून श्रेष्ठ, पण इतिहासात बळकावणारेच वरिष्ठ
ब्रम्हचर्य सामाजिक प्रतिमेचे ध्यान, प्रत्यक्षात भोगवादी कायदेशीर सज्ञान

अपरिग्रहात असतात मिरवण्याचे छंद, काबीज करायला संपत्तीचा ताळेबंद
श्रमजीवी संघटीत होतात सत्पर, मजबूरीने गुलामगिरीत रमतात तत्पर

आस्वाद समर्थ अनुभुतीचे बळ, गरजेपेक्षा जास्त हव्यासाचे मूळ
निर्भय होणे प्रगतीचे लक्षण, भीती दाखवणे हे सत्तातुरांचे भक्षण

सर्वधर्मसमभाव आदर्शवत प्रमाण, शोषितांचे मात्र धर्मांतर गतिमान
अस्पृश्यता निर्मूलन सलोख्याचे अनुष्ठान, सत्तेसाठी मात्र जातीपातीचे अनुमान

स्वदेशीची स्विकृती करे राष्ट्र आत्मनिर्भर, सरंजामी घराण्यांचे होई चित्त सैरभैर
वर्चस्वासाठी गांधी लागतात, द्वेषासाठी नथुरामाचा पर्याय
आसुसलेल्या सत्तेत राहण्यासाठी, दोघेही जिवंत ठेवणं अपरिहार्य

©भूषण वर्धेकर

२९ जानेवारी २०२२, रात्री २.१५ AM

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे शोषितांसाठी लढले 
कामगारांसाठी हाल सोसले
लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले
विळा हातोड्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वंचितांसाठी लढले
दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले
निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले
अशोक चक्रांचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वर्चस्वासाठी लढले
फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले
क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले
विजयी उत्सवाचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे स्वराज्यासाठी लढले
गुलामांना धर्माखाली बांधले
सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले
सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे समाजासाठी लढले
ऐहिक कल्याणासाठी टिकले
चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले
स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे सर्वांगीण विकासासाठी लढले
संधीसाधूंनी त्यांना मिरवले
ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले
सत्ताधीश बनून सरंजामीत रमले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे उपेक्षितांसाठी लढले
रोजीरोटीसाठी रक्त आटवले
समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले
अल्पसंख्यांक म्हणून राजाश्रित झाले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे ऐक्यासाठी लढले
एकात्मकेच्या हक्कासाठी घुसमटले
मुलभूत गरजांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत भिडले
ते जयंती, पुण्यतिथीतच अडकले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
____________________
भूषण वर्धेकर
२८ नोव्हेंबर २०२१
पुणे
____________________


नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...