समीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० जुलै, २०२२

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

आर. माधवन दिग्दर्शित रॉकेट्री चित्रपट नव्या युगात वैज्ञानिक राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ ठरेल असा बनवला आहे. आजवर ऐतिहासिक राष्ट्रवाद ऊतू जाईल एवढे सिनेमे आलेले आहेत. अशा प्रत्येक चित्रपटात कोणाला कोणीतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. किंवा शत्रू पक्ष म्हणून ठरवून चित्रपटाची बांधणी आणि मांडणी करतात. रॉकेट्री चित्रपट मात्र भलेही राष्ट्रवाद, वैज्ञानिक क्षेत्रातील घडामोडी यावर आधारित असेल तरीही भडक आणि भंपक वाटत नाही. यात कोणीही कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कसलेही आडाखे तडाखे दिलेले नाहीत. काही शक्यता असू शकतात, प्रशासन शासन आणि यंत्रणा यातील त्रुटींवर तिखट भाष्ये केली आहेत. वैज्ञानिक क्षेत्रातील संस्था कशा काटकसरीने कारभार करतात हे यात व्यवस्थित योजनाबद्ध पद्धतीने दाखवले आहे. अर्थातच नंबी नारायण यांच्या आयुष्यातील आलेले आणि आणलेले चढ उतार आर. माधवनने काही फिल्मी तर काही रोमांचक पद्धतीने दाखवले आहेत. आर. माधवन तसा जबरदस्त टॅलेंट असलेला अभिनेता. या सिनेमात अभिनयाच्या बाबतीत तर तो उजवाच ठरलाय. दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा समोर येतोय. सिनेमा मेकिंग चे बारकावे टिपण्यात तो कमालीचा यशस्वी ठरलाय. मध्यंतरापूर्वी चित्रपट मनाची पकड तर घेतोच. शिवाय स्वातंत्र्योत्तर काळात कशाप्रकारे वैज्ञानिक क्षेत्रात भारतीय वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि संस्था उभ्या राहत हे पण काही संदर्भातून समजतं. मध्यंतरानंतर सिनेमा थोडासा रेंगाळलेला वाटला मला. कदाचित ते दिग्दर्शकाने नंबी नारायण यांचा संघर्ष एस्टॅब्लिश करण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असावी. 

सिनेमा दोन पातळ्यांवर समांतरपणे घडतो एक नंबी नारायण यांची कारकीर्द कशी घडत गेली, कशा पद्धतीने त्यांच्या विरोधात आरोपांची चौकशी झाली आणि त्याचा लढा. दुसरी पातळी म्हणजे भारतीय अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांच्या प्रयत्नांना मिळणारे यशापयश. हे दाखवताना दिग्दर्शकाने कोणालाही लार्जर दॅन लाईफ दाखवले नाही की मेडिया ट्रायल करतात त्याप्रमाणे अमुकतमुक आरोपी ठरवून भाषणबाजी दाखवली नाही. नंबी नारायण यांचा लढा हा फार वेगळा आहे. त्यामुळे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची स्वयंपूर्ण यंत्रणा सहज उभी न राहता अडखळली. अर्थात यात बऱ्याच कॉन्स्पीरेन्सी थिअरीज आहेत. हॉलिवूडमध्ये अशा एकेका थिअरीच्या एकेका थ्रेडवर किमान एक सिनेमाची सिरिज होऊ शकते. माधवन ने मात्र त्याचा हात आवरता घेतलाय. टू द पॉईंट गोष्ट सांगून सगळ्या सरकारी यंत्रणा, प्रशासकीय करभार पाहणारे मंडळी यांच्या मर्यादा किमान सिन्स मध्ये कमाल दाखवल्या आहेत. मुळातच स्वातंत्र्योत्तर भारतात कोणत्याही क्षेत्रात जे जे काही घडले ते पायोनियर असेच होते. टीम वर्क तसेच होते. इथे कोणी हिरो नाही व्हीलन नाही. फक्त विज्ञान क्षेत्रातील परिवर्तनाचा बदलांचा वेग प्रचंड मंदावलेला होता. त्यातही भारतीय वैज्ञानिकांनी किमान उपलब्ध असलेल्या स्रोतांचा वापर करून बऱ्यापैकी यशस्वी प्रयोग केले. या आशयाचे अनेक चित्रपट, ओटीटी वरील निवडक सिरिजेस पाहिल्यावर तशी कल्पना येते. मात्र या रॉकेट्री सिनेमात लाईफ ऑफ नंबी नारायण कसलेही आढेवेढे न घेता दिग्दर्शकाने दाखवली आहे. शेवटचं खरेखुरे नंबी नारायण यांचं वक्तव्य विचार करण्याजोगे आहे. त्यांच्या एकूण लढ्याला मिळालेला पाठिंबा त्यांच्या वर झालेले आरोप हल्ले पाहून असे कितीतरी वैज्ञानिक क्षेत्रातील शापित गंधर्व आज आपल्या देशात राहतात असे जाणवते. देशासाठी काहीतरी करण्याचा संघर्ष फक्त सामाजिक, राजकीय, आर्थिक असतो असं नव्हे. वैज्ञानिक क्षेत्रात जेवढे अमुलाग्र बदल होतील त्यासाठी लागणारा राजकीय आणि आर्थिक पाठींबा जर कणखर असेल तर देश महासत्ता, स्वयंपूर्ण वगैरे नक्कीच होऊ शकेल. त्यासाठी सोडवाव्या लागणाऱ्या समस्या ह्या अंतर्गत गुंतागुंतीच्या असतात. हल्लीच्या भाषेत देशाचा जीडीपी वाढवायचा असेल किंवा अमुकतमुक ट्रिलियन वगैरे अर्थव्यवस्था करायची असेल तर मूलभूत वैज्ञानिक संशोधन आणि त्याचे प्रभावीरीत्या उपयोजन करणे खूप गरजेचे आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन जेवढे स्वावलंबी तेवढे राष्ट्री स्वयंभू. मात्र आपल्याकडे असणारी वैज्ञानिक क्षेत्रातील, संशोधन क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनास्था ह्या कधीही राजकीय पटलावर आल्या नाहीत. जातपातधर्म आणि सोकॉल्ड विचारधारा यावरच सगळ्या राजकीय कुस्त्या झाल्या. त्यामुळे वैज्ञानिक अधोगतीला राजकीय इच्छाशक्ती, वैज्ञानिक दृष्ट्या मागासलेल्या विचारधारा, शैक्षणिक उदासीनता आणि ढिसाळ कारभारी ह्याच कारणीभूत आहेत. भारतीय लोक बुद्धीमान आहेतच यात वाद नाही मात्र त्यांचं टॅलेंट देशासाठी वापरण्यासाठी आवश्यक असलेला सामाजिक आणि राजकीय प्रगल्भता कोणाकडे नाही. तशी व्यवस्था पण या देशात बळकट नाही.

सिनेमात बऱ्याच वैज्ञानिक संकल्पना आणि मूलभूत नियमानुसार केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक चाचण्या यांच्याबद्दल बरेच उल्लेख आहेत. जे लोक विज्ञानाच्या किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात असतील त्यांना ते ओळखीचे नक्कीच वाटतील. इंटरनल कंबशन इंजिन आणि त्याचे कार्य वगैरे कधीकाळी अभ्यासताना द्रवरूप आणि स्थायूरूप इंधन, दाब आणि हीट, मास ट्रान्सफर वगैरे संदर्भ उगाचंच आठवत होते. औद्योगिक क्रांती झाली आणि अशी सगळी कारणीभूत ठरलेली आयुधं, साधनं आणि यंत्रे सार्वजनिक जीवनात कमालीची परिचयाची झाली. त्यामुळे अनेक विद्याशाखा तयार झाल्या प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी त्यातून बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उलाढाली झाल्या वगैरेचा सालंकृत इतिहास हा सिनेमात कुठेन् कुठेतरी डोकावतो. त्या वैज्ञानिक पद्धतीने जास्त विस्तृतपणे जर सिनेमात दाखवल्या असत्या तर अजून मजा आली असती. कदाचित दिग्दर्शकाने सिनेमा माहितीपट होऊ नये म्हणून जागोजागी हात आवरता घेतलाय की काय असे जाणवते. 

एकूण पहिलाच प्रयत्न आहे माधवनचा दिग्दर्शक म्हणून असे जाणवत नाही सिनेमा बघताना. सिनेमात दाखवलेल्या इतर पात्रांनी पण साजेसा अभिनय केला आहे. उगाचंच मेलोड्रामा कटाक्षाने टाळलेला जाणवतो. फिल्मी टेकिंग आहे बऱ्याचशा सीन्समध्ये. भारतीय सिनेमा म्हटलं की चालायचंच. मात्र अभिनय उत्तम. बॉडी लँग्वेज आर. माधवनने भारी पेललीय. टेक्निकल आस्पेक्ट्स सिनेमात येत राहतात. सरतेशेवटी संघर्षाची कहाणी ही मानवी पातळीवर आणायची असेल तर कौटुंबिक ससेहोलपट दाखवली की निम्म काम सोपं होतं कोणत्याही घटनेचं. त्यात सिनेमात हे येतंच येतं. एवढं सगळं सहन करून लढण्याची जिद्द शेवटपर्यंत ठेवणं हे फार जिकिरीचे असते. ते प्रत्यक्षात नंबी नारायण यांची याची देही याची डोळा अनुभवलं आहे. शेवट कटू गोड व्हावा तसा नंबी नारायण यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार, त्यांचा निर्दोषत्वाचा कोर्टाने दिलेला निकाल आणि त्यांना मिळालेल्या भरपाया याचे धावते संदर्भ सिनेमात शेवटी येतात. मोदींच्या भाषणाचा एक व्हॉईस ओव्हर शेवटी येतो. तो ऐकून नेहरू भक्त दुखावतात बहुतेक असे वाटते. उद्या ते अशी ही मागणी करतील की नेहरुंनी वैज्ञानिक क्षेत्रातील ज्या ज्या संस्थांची पायाभरणी केली त्याचे पण संदर्भ सिनेमात असायला पाहिजेत. चालायचंच ही भक्तमंडळी भारतीयांना मनोरंजनासाठी मिळालेली सर्वात डोकीदुखीयुक्त मेजवानी आहे. असो. पण हा रॉकेट्री सिनेमा एकदा का होईना बघितलाच पाहिजे. विज्ञानविषयक विद्याशाखेच्या लोकांना हा सिनेमा पाहताना लढा, संघर्ष करण्यासाठी कशा आणि किती खस्ता खाव्या लागतात हे समजेल. 

©भूषण वर्धेकर
१० जूलै २०२२
पुणे

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा

ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेला सरदार उधम हा चित्रपट नक्कीच न चुकवण्यासारखा आहे. शुजित सरकारचे दिग्दर्शन आणि विकी कौशलचा अभिनय अफाट आहे. एकूण स्वातंत्र्य मिळण्याआधीची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. हा नसिनेमा आजच्या काळात महत्त्वाचे विधान करतो. सध्याचा काळ हा श्रेयवादासाठी आसुसलेल्या पक्षांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. हा सिनेमा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी गोष्ट सांगतो ती फार महत्त्वाची आहे. सरदार उधम यांचा एकाकी लढा, सूडाची भावना आणि त्यामागची कारणमीमांसा जबरदस्त कन्व्हीक्शनने मांडलेली आहे. १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास निरखून बघायचा असेल तर एलन ह्यूम ने जे कारनामे केलेत त्यापासून सुरुवात करायला पाहिजे. १८५७ चा लढा आणि नंतरचे झालेले लढे. १९४२ च्या लढ्याला असलेले वेगवेगळे कंगोरे समजून घेणे गरजेचं आहे. त्यासाठी त्याकाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची भुमिका अभ्यासणे फार महत्त्वाचे आहे. समांतर पणे बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष पण महत्त्वाचा आहे. नंतर टिळकांच्या आधीचे लढे टिळकांच्या नंतरचे लढे फार महत्त्वाचे आहेत. आणि हो सोबत अमेरिकन आणि इंग्रज लोकांनी भारताबद्दल त्याकाळात जी निरिक्षणे नोंदवली आहेत ती पण विशेष उल्लेखनीय. नंतर तत्कालीन ठिकठिकाणच्या राजघराण्यातील लोकांनी काय काय उपद्व्याप केले ते पण तितकेच महत्त्वाचे. नंतर क्रांतिकारक लोकांची ठिकठिकाणी झालेली सशस्त्र आंदोलने आणि तत्कालीन कॉंग्रेसची आंदोलने यावर कटाक्ष टाकला की खरा इतिहास आणि लिहिला गेलेला कोणता आहे हे लक्षात येते. 

क्रांतिकारक लढ्याचा उल्लेख केलाय मी, त्यात सरसकटपणे सगळेच क्रांतिकारक गृहित धरले आहेत. यापैकीच एक उधम सिंग यांचा एकाकी लढा म्हणजे सरदार उधम चित्रपट. आजवर आपला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमात कॉंग्रेस प्रणित सरकारांनी नेंहरू गांधी या विचारावर आधारित लिहिला आहे. कारण कॉंग्रेसने तशी खंबीर व्यवस्था उभी केली होती. मुळात क्रांतिकारक लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी संघटना कार्यरत होत्या. त्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र आघाडीवर होते. दक्षिणेकडे पण तुरळक क्रांतिकारी घटना होत होत्या मात्र इतिहासात त्यांचा उल्लेख प्रचलित लढ्यासारखा नोंदवला गेला नाही. बंगाली बहुतेक डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे होते. कारण तत्कालीन दशकांत जागतिक घटना पण तशाच होत होत्या. पहिल्या महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर, रशियन क्रांतीनंतर, युरोपीय खंडातील बदल यांचा आपल्या देशात कसे परिणाम झाले याबद्दल इतिहास फारसा शिकवला नाही. मात्र स्वातंत्र्य लढ्यात तत्कालीन क्रांतिकारक लोकांनी ठिकठिकाणी जे जे उठाव केले मग ते देशात असोत वा परदेशात ते फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी फक्त संघटनाच नाही तर कित्येक व्यक्ती अग्रभागी होत्या हे जाणवते. त्यापैकीच उधम सिंग यांची एकाकी लढत पाहून विशेषतः तत्कालीन कम्युनिस्ट चळवळी महत्त्वाच्या कशा होत्या हे समजते.

सशस्त्र क्रांतिकारकांचे पहिले पर्व, दुसरे पर्व वगैरे वाचण्यासारखे आहे. हे सगळे समांतरपणे चालू असताना परदेशात (प्रामुख्याने इंग्लंड, लंडन, जपान व रशिया) जाऊन तिथून जे जे कार्यरत होते त्यांना साईडलाईन केले गेले मुख्य ऐतिहासिक प्रवाहातून असे मला नेहमीच जाणवते. तसंही गेल्या काही वर्षांत सातत्याने सत्ताधारी मातृसंघटनेच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील योगदानाबद्दल बिनकामी चर्चा होत असते. त्यानंतर गांधी नेहरु वगैरेंची व्यवस्था होती म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले हे वारंवार पटवून सांगितले जाते. या दोहोंच्या संघर्षात खऱ्याखुऱ्या लोकांच्या चळवळी म्हणजे तत्कालीन कम्युनिस्ट, तत्कालीन शोषित, दलित यांचा संघर्ष नेहमीच मागे राहिलाय असे वाटते. 

माझ्या मते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर खरा पारदर्शी कालखंड पडताळून पहायचे असेल तर १९४० नंतरचा लढा, १९२० ते ४० चा लढा, १९२० च्या आधीचे लढे आणि सर्वात महत्त्वाचे १८५७ चा लढा इत्यादी कालखंड खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला सगळ्यात जास्त हॅपनिंग कालखंड म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर ते स्वातंत्र्य बहाल करण्यापर्यंतचा. हे सगळे लिहिण्याचे मुख्य कारण सरदार उधम चित्रपट पाहताना कैक क्रांतिकारक लोकांना आणि त्यांच्या चळवळींना आपण इतिहासात कमी प्रमाणात प्रोजेक्ट केलेय असे दिसते. खरा इतिहास बायस्ड पद्धतीने कोणी लिहिला आहे कसा लिहिला आहे का लिहिला आहे वगैरेंची नंतर चिरफाड करता येईल. मात्र खराखुरा हार्डकोअर कम्युनिझम समजून घ्यायचा असेल तर हा सिनेमा फार महत्त्वाचे भाष्य करतो. शुजित सरकारने फार बारीकसारीक गोष्टी दाखवल्या आहेत. त्यामुळे चित्रपट कोठेही कंटाळवाणा वाटत नाही. उगाचंच शब्दबंबाळ संवाद, देशप्रेमाचे ओतप्रोत भरलेले तेजपुंज डोस वगैरे हा चित्रपट अजिबात देत नाही. एक संकीर्ण लढाई एकाकीपणे लढताना सरदार उधम सिंग जिवंत उभा राहतो. चित्रपटात तुरळक घटना १९१९ ते १९४० मधील अशा पद्धतीने दाखवल्या आहेत की चित्रपटाची पटकथा कुठेही सैल होत नाही. उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून मायकेल ओडवायरची हत्या लंडनमध्ये केली. या एका वाक्यात उधम सिंग यांचे कार्य मावणार नाही. त्यासाठी त्यांना किती दिव्यांतून जावे लागले. २१ वर्षे एकच गोष्ट करण्यासाठी जे जे केले ते या चित्रपटात पाहण्यासारखे आहे.  मला विशेष कौतुक या गोष्टीचे वाटते की हा चित्रपट करताना दिग्दर्शकाने  फारच मुद्देसूद आणि पाल्हाळ होणार नाही असे सिनेमॅटिक प्रसंग दाखवलेत. असे पिरियड फिल्म्स करताना थोडीशी जरी स्क्रिप्ट इकडेतिकडे झुकली की चित्रपट गडगडतो. तत्कालीन कम्युनिस्ट विचारधारा जबरदस्त साकारली आहे. तसंही कम्युनिस्ट विचारधारेचे गेल्या शतकात भारतीय भूखंडावर वेगवेगळे पल्ले आणि प्रवाह राहिलेले आहेत. हल्लीचे कम्युनिस्ट, लिबलर वगैरे मंडळी हे नक्षलप्रेमी असतात असा एक मोठा समज पसरवलेला आहे. १९४० पर्यंत भारतातील कम्युनिस्ट एक दिलाने लढणारा समुह आणि विचारधारा होती. १९४२ च्या लढ्याला तत्कालीन कम्युनिस्ट चळवळीचे आणि संघाचे समर्थन नव्हते. का नव्हते हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. १९६२ नंतरचा कम्युनिस्ट विचारप्रवाह भारतात वेगळ्या खाचखळग्यातून जात होता. ८० नंतरचा एकूणच कम्युनिझम पतनाकडे वाटचालीस आगेकूच करत होता. ९० नंतर जागतिकीकरण आले आहे सगळ्या विचारप्रवाहांना उधळून लावले. सरदार उधम चित्रपटात जो कम्युनिस्ट लोकांचा कालावधी दाखवतो तो प्रखर राष्ट्रवादी, वैचारिक रित्या परिपक्व व जहाल पद्धतीत विश्वास असणारा होता.

पहिल्या महायुद्धानंतरचा, दुसऱ्या महायुद्धाच्या आधीचा काळ आणि भारतीय क्रांतिकारक लोकांच्या छुप्या पद्धतीने लढण्याच्या कृती या गोष्टींनी ह्या चित्रपटाचा गाभा तयार झालेला आहे. यात सरदार उधम सिंग यांची कृती आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेला खटला, त्यांना सहन करावा लागलेला छळ, हत्या करण्यामागील जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर झालेला तीव्र आघात. हे सगळं जस्टीफायेबल आहे. या चित्रपटात भगतसिंगांशी निगडित काही प्रसंग ज्याप्रमाणे दाखवले गेले आहेत त्याला तोड नाही. साधा, सरळ आणि सुटसुटीत साम्यवादी विचार कसा असतो हे खूपच भारी दाखवलंय या सिनेमात. एखाद्या ग्राउंड रिएलिटीशी तडफेने जाऊन भिडण्याची तलफ काय असते हे हार्डकोअर कम्युनिस्टच समजू शकतो. तिथे जातपातधर्म याचा मागमूसही नसतो. विचार पक्का आणि धडक कृती ही साम्यवादी आकलनाची मुख्य शक्तीस्थळे आहेत. क्रांतिकारक आणि दहशतवादी यांच्यातला सडेतोड फरक चित्रपटात भगतसिंगांनी सांगितलेला आहे. तो सीन माझ्यामते अव्वल दर्जाचा आहे जो आजच्या काळातील तथाकथित भोंदू, स्वयंघोषित राष्ट्रभक्त आणि ढोंगी, लिबरल लोकांना दाखवण्या लायक आहे. आजचा काळ हा एकूण विस्कळीत वैचारिक कल्लोळाचा आहे. अशा काळात सरदार उधम सारखा चित्रपट येतो हेच खूप महत्त्वाचे आहे. कारण सध्याच्या काळात राष्ट्रभक्ती ही पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्थान झिंदाबाद भोवतीच फिरते. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी जहाल व मवाळ गटात विभागलेले होते वगैरे पुस्तकी विधाने घोकंपट्टी साठी ठिक. मात्र जहाल गटाकडे जो मोटिव्ह होता तो किती क्रिस्टल क्लिअर होता आणि त्याचा जनजागृती साठी कसा वापर करायचा याचे 'टूलकीट' प्रबोधनात्मक होते. प्रक्षोभक नव्हते. नुसतं स्वातंत्र्य मिळवणे हा हेतू नसून लोकांना चांगले सुशासन, तळागाळापर्यंत विखुरलेल्या घटकांना सोबत घेऊन राष्ट्रबांधणी करणे हे फार महत्त्वाचे 'टास्क' जहाल गटाकडे होते. हा चित्रपट अशा घटकांचा जीवनपट उलगडतो. 

मन सुन्न करणाऱ्या हिंसक घटना आपल्या देशात खूप घडल्या आहेत. त्यापैकीच जालियनवाला बाग हत्याकांड. चित्रपटातील शेवटची काही मिनिटे केवळ त्या रात्री काय घडले आणि त्याचा विशीतल्या तरूणावर -उधम सिंग- झालेला परिणाम यासाठीच राखीव. रक्तरंजित दाहकता जी दाखवलीय त्यावरून त्याकाळी काय काय सहन करावे लागले असेल त्याची प्रचिती येते. इंग्रज लोकांची प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि प्रशासकीय कर्तव्यदक्ष कामकाज रूटिन याचाही हलकासा कानोसा या चित्रपटाने घेतलाय. शेवटचा सीन चित्रपटातील 'वरचा सा' वगैरे म्हणतात तसा आहे. अभिनयापेक्षा दिग्दर्शकीय कसब चित्रपटात खूप आहे. तसही चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम अभिनेत्याचे नाटक हे माध्यम व साहित्यनिर्मिती हा लेखकाचा प्रांत. ह्या चित्रपटाची विशेषकरून महत्त्वाची उल्लेखनीय बाजू म्हणजे तत्कालीन काळ उभा करणं. ते लयभारी जमलंय. तंत्रज्ञ कलाकारांनी जे उभे केलेय त्याला दहा पैकी दहा मार्क. मोजकेच पण लक्षात राहणारे संवाद. 
"... जंग बडी बेईमान चीज़ है। आपको लगता है आप जीतते हो । कोई नही जीतता,  नोबडी विन्स, ओन्ली हेटरेड विन्स।" हा संवाद मला विशेष आवडला. 

- भूषण वर्धेकर, पुणे.

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...