शनिवार, ११ एप्रिल, २०२६

मातृभू इस्रायल पितृभू भारत

 ज्यू लोकांचा आणि भारताचे नाते ऐतिहासिक आहे. विशेषतः १९४० च्यादशकात बरेचसे ज्यू लोक भारतात शरणार्थी म्हणून आले होते. महाराष्ट्रात कोकणात होते कोल्हापूरात होते. उत्कृष्ट मराठी बोलणारे इस्रायली लोक आहेत. आंध्रात आणि नॉर्थ ईस्ट स्टेटस मध्ये पण इस्रायली लोक आहेत खूप वर्षांपासून. भले ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. कित्येक ज्यू लोकांना भारतीय सरकार मध्ये किंवा आर्मी मध्ये देशसेवा करायला संधी मिळाली. इस्रायल देश स्थापन झाल्यावर बरेचसे लोक भारतातून तिकडे गेले. त्यांच्या साठी भारतदेश पितृभू म्हणजेच फादरलॅंड तर इस्रायल मातृभू म्हणजे मातृभूमी मदरलॅंड.  हा संदर्भ खूप ऐतिहासिक आहे. कित्येक ज्यू इतिहासकार किंवा संशोधक, इस्रायली नेते नागरिक भारताच्या बाबतीत असणारी ही भावनिक नाती अभिमानाने जपतात. हा संदर्भ लक्षात घेऊन मोदींनी फादरलॅंड मदरलॅंड वगैरे भाषणबाजी केली होती हे लक्षात ठेवावे. 


त्यामुळे ज्यू लोकांना भारताने फादरलॅंड म्हटलं आणि इस्रायल हा मदरलॅंड म्हटलं तर काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तो फ्रस्ट्रेटेड झालेल्या पुरोगामी लोकांना. त्यांना सगळा इतिहास भूगोल माहीत असतो. मध्य पूर्वेत कैक दशकांपासून होणाऱ्या युद्धात भारत कधीच मध्यस्थी करत नव्हता हे पण माहीत आहे. पण काहीही करून भारतात कुठेही काही झाले की मोदींच्या नावाने टाहो फोडून काही उपयोग होत नाही हे समजल्यावर जगात काही झाले की मोदींच्या नावाने आकांडतांडव करून नवीन टुलकीट सुरू झाले आहे.


बिचारे मोदी विरोधी, मोदीद्वेष्टे आणि मोदीबिंदू व मोदीव्याध झालेले रूग्ण हेच खरेखुरे मोदींना मोठे करणारे आहेत!


(ता. क. मोदीबिंदू म्हणजे कोणत्याही गोष्टीत मोदींचीच चू आहे असे दिसणारी मंडळी आणि मोदीव्याध म्हणजे चांगली गोष्ट मोदींमुळेच झाली हे मान्य आहे पण अपचन झाल्यामुळे बुडाला आग होणारी मंडळी)


©️भूषण वर्धेकर

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा

 धुरंधर - एक पुरोगामी चिकित्सा 


आदित्य धर लिखित-दिग्दर्शित-निर्मित धुरंधर चित्रपट ही अनेकार्थाने प्रोपागंडा फिल्म आहे. तब्बल अडीच दशकांचा कलावधी केवळ साडे सात, आठ तासात - दोन भागात खपवला आहे. ही निव्वळ भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक असून त्याकडे अल्पसंख्याक विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण करणारी कलाकृती म्हणून पाहिले पाहिजे. पवित्र इस्लाम धर्म हा शांततेचे प्रतिक आहे. त्यासाठी अतिपवित्र जिहाद आजपावेतो कार्यरत आहे. गेली कैक शतके पवित्र जिहादी शिकवण जनसामान्य जनतेत रूजवण्यासाठी प्रसंगी किरकोळ हिंसा, फिदाईन ॲटॅक वगैरे करणे अनिवार्य होते. पण चक्क धुरंधर सारख्या प्रोपागंडा फिल्म मध्ये हे जिहादी कार्य दुष्कृत्य म्हणून हिणवले जाते हे मानवतेला धरून नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची बालवाडी, प्राथमिक शाळा आणि महाविद्यालये ही जगाला दिलेली देणगी आहे. यातून बाहेर पडणाऱ्या तडफदार तरुणांना जर ऑन जॉब ट्रेनिंग देण्यासाठी छोटे मोठे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी भारतात पाठवले तर पोटशूळ दुखण्याचे कारणच काय? बिचारे बापुडे अतिरेकी कबाडकष्ट करून जीवाची पर्वा न करता प्रसंगी धारातीर्थी पडतात. त्यांची ही शहादत सामाजिक एकोप्यासाठी प्रेरणादायी आहे. कोण कुठला सळसळत्या रक्ताचा तरूण सत्तरावर दोन बहाहत्तर सुंदऱ्यांचा उपभोग घेण्यासाठी जंग जंग पछाडतो. काहीही करून वैश्विक एकात्मिक शांततेसाठी मृत्यूला भिडतो. याला टुकार हिंदुत्ववादी मानवतेविरोधी घटना सांगतात. निर्घृण हल्ला संबोधतात. दहशतवाद्यांच्या कार्याला देशद्रोही ठरवताना लाजा कशा वाटत नाहीत. धुरंधर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध पाहून तळपायाची तिडिक मस्तकात जाते. कसाला हिंसक आणि प्रोपागंडा सिनेमा आहे हा. असे सिनेमे फक्त आणि फक्त पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या परमोच्च कृत्यांना जगभरात बदनाम करण्यासाठी काढले जातात. 


गेल्या वीस वर्षात ज्या गोष्टी किंवा बातम्या ऐकल्या/पाहिल्या असतील त्यामागचा माहिती नसलेला भाग सिनेमात आहे. पाकिस्तान कसे बकवास आहे आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा आहे हे दाखवले आहे. हे करण्याची सिनेमॅटिक लिबर्टी दिली कुणी? हे संविधानाच्या विरोधात आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा कैवार घेऊन तुम्ही एखाद्या गरीब देशाच्या गरीब औद्योगिक क्षेत्राला बदनाम करण्याचा वैश्विक कट रचला आहे. याला सर्वस्वी जबाबदार समकालीन हिंदुत्ववादी संघटना आणि सरकार आहे. दहशतवादाची मोडस ऑपरेंडी सिल्व्हर स्क्रीनवर दाखवून काय साध्य होणार आहे? कैक वर्षे बॉलिवूड नामक चित्रपटसृष्टीत गंग जमुना तहजीबचे बाळकडू पाजले जात होते ते एकाएकी धुळीस मिळवले जातेय हा निव्वळ करंटेपणा आहे. (अवांतर- खरंतर गंगा जमुना तहजीब भारतातील तमाम पुरोगाम्यांनी शिया सुन्नी पंथीय बांधवांना शिकवायची गरज आहे. अहाहा! यात जर यशस्वी झाले तर मध्य पूर्वेतील अशांतता कायमस्वरूपी नष्ट होईल… असो…) अशात धुरंधर सारख्या चित्रपटात पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांच्या, गुन्हेगारांच्या कारनाम्यांची मालिका दाखवली जाते. हे सेक्युलर समाजासाठी अत्यंत घातक आहे.  सिनेमॅटिक लिबर्टीचा किती तो अतिरेक! 


आजपर्यंत आजवर अनेक हिंदी चित्रपट भारतीय समाजमन घडवत होते. कैक सिनेमे मानवतेचे उपदेश देऊन सामाजिक बांधिलकी, जाणीवा वाढवत होते. कितीतरी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांनी समतेच्या कक्षा रूंदावल्या. भारतीय जनमानसात विषमता वाढवण्यासाठी धुरंधर सारखे सिनेमे तयार केले जात आहेत. हा या लोकशाहीवादी देशाचा अपमान आहे. कोण कुठला पंजाबी मुंडा धडाधड गोळीबार करून कोण्या एका स्वच्छ चारित्र्याच्या आमदाराच्या कुटुंबातील पुरूषांना वेचून वेचून ठार करतो. कारण काय तर त्याच्या कुटुंबाला किरकोळ छळ सहन करावा लागला म्हणून. हे काही बरोबर नाही. गांधीच्या देशात अशी हिंसा! हे नितिमत्तेला धरुन नाही. यावरची कडी म्हणजे अंडरकव्हर एजंट म्हणून त्याला पवित्रभूमी पाकिस्तानात पाठवले जाते गुंड होण्यासाठी. मग गल्लीगुंड, गावगुंड शहरीगुंड ते सरकार पुरस्कृत राष्ट्रीय गुंड असा प्रवास करून अननोन मेन ला नेम धरून गोळ्या झाडण्यासाठी फ्री हॅंड मिळवतो. ही कसली दळभद्री कथा? या कथेत कुठेच समता बंधुता एकात्मता दिसत नाही. कोण तो सुक्काळीचा हमजा मारून गमजा “कराची की प्यारी ल्यारी” चा बाजार उठवतो हे सद्सद्विवेक बुद्धीला पटणारे तरी आहे काय? आपल्या देशात काय चालू आहे त्यावर चर्चा करायला नको म्हणून असे सरकारी आशीर्वादाने सिनेमे दाखवले जातात. बेरोजगारी, गरीबी असूनही असे सिनेमे हजारो करोड रुपयांची उलाढाल करतात म्हणजे काय? ही कसली नैतिकता? सामाजिक वीण टराटरा अन् फराफरा फाडली जाते असे सिनेमे पाहिल्यावर. कसला तो जल्लोष सुरु आहे धुरंधर वरून? अननोन मेन म्हणे! कोणत्याही भारतीय एजन्सी ने अननोन मेन आमचेच धुरंधर आहेत म्हणून अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. नरिंदर चा दलिंदर सिनेमा म्हणजे धुरंधर. एक नंबरचा वाह्यात सिनेमा आहे. कोण तो बिचारा आतिक अहमद युपीवाला आय एस आय चा हस्तक म्हणून दाखवलाय सिनेमात. मति भ्रष्ट झाली आहे की काय? सेक्युलर भारताचा कणा ताठ रहावा म्हणून धडपडणारा कुशल संघटक आतिक अहमद. गोरगरीब अशिक्षित कमी शिक्षित तरूणांना नशील्या पदार्थाच्या डिलिवरी बॉय म्हणून नोकऱ्या देणारा मसीहा म्हणजे आतिक अहमद. त्याला ऑन कॅमेरा मारल्याचे संदर्भ दाखवून धुरंधर ने नेमके काय साधले? नोव्हेंबर २००८ साली मुंबईतील हल्ला हा विश्वविद्यालयातून स्नातकोत्तर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवायांच्या ॲपरेंटशीप साठी आलेले भटके हुए जवानांचा डिप्लॉयमेंट प्रोजेक्ट होता. बिचारी तरुण पोरंटोरं ड्रायफुट्स खाऊन एकेफोर्टी सेव्हन मधून गोळ्या झाडून भारतीयांवर टेस्टिंग करत होती. ते पाकिस्तानी प्रदीर्घ अनुभव असणारे प्रबंधक २४x७ डोळ्यात तेल घालून लक्षपूर्वक सगळ्या घडामोडींवर देखरेख ठेवत होते. गो लाईव्ह असा प्रशिक्षणार्थींच्या सी आय सी डी पाईप लाईन प्रोजेक्टला तुम्ही अतिरेकी कारवाई म्हणून पदाखवता? कुठे फेडाल ही पापे! असे पेरून ठेवलेले संदर्भ घेऊन धुरंधर अंगावर काटा येईल असा करण्याचा हेतू नक्कीच वाईट आहे.  मुळात अतिरेकी हे प्रेमळ असतात. जिहाद म्हणून ते समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडतात, बॉम्बने उडवतात. प्राणाची आहुती देतात. अशा निरागस लोकांना निस्वार्थी सेवाकार्य करण्यासाठी मदत केली पाहिजे. आपली न्यायव्यवस्था फासावर लटकवते? हे कोणत्या गुडबुक मध्ये बसतं? 


नोटबंदी सारख्या तद्दन फसलेल्या निर्णयाला वाट्टेल ते संदर्भ देत भलामण करतात का कुठे? बिचारी गोरगरीब जनता नोटबंदीत होरपळून निघाली ते का नाही दाखवले? तासनतास रांगेत उभे राहून केवळ काही नोटांच्या पत्त्या मिळवण्यासाठी तळपत्या उन्हात कडाक्याच्या थंडीत मुसळधार पावसात सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. ते नाही दाखवले धुरंधर मध्ये! दाखवतात काय की कोट्यवधीची बनावट नोटा छापून आलेल्या बाजारात येऊ नये म्हणून नोटबंदी केली ऑपरेशन ग्रीन लीफ. म्हणजे फसलेल्या निर्णयाचे कीती ते महिमामंडन करायचे?  मुळातच हिंदुत्ववादी लोक सत्तेत आहेत त्यामुळे हागलं-पादलं मास्टरस्ट्रोक म्हणून खपवतात गाजावाजा करत. परमपूज्य नेहरूचाचांनी हाती काहीही नसताना देश घडवला तर त्यो नरिंदर हातचं सगळं विकून देश बिघडवतोय. हे पण दाखवा की धुरंधरमध्ये. रणरागिणी इंदिरा गांधींनी तडाखेबाज गुप्तहेर लोकांची रॉ एजन्सी तयार केली होती हे पण लक्षात ठेवा. हा देश फक्त आणि फक्त सेक्युलरवादी लोकच यशस्वीरीत्या पुढे नेत होते. हिंदुत्ववादी पक्ष देश विकून व्यवसायिक लोकांना श्रीमंत करण्याचेच काम करत आहेत. चारपदरी चकाचक रस्ते देऊन विकास होत नसतो. मने जोडणारा रस्ता तयार करणे आवश्यक असते. ते काम सेक्युलर सत्ताधीशांनी केले होते. आताचे सत्ताधारी फक्त द्वेष पसरवत आहेत. अल्पसंख्यांक समाज सामाजिक विषमतेमुळे अडचणीत सापडला आहे. संविधानाची दिवसाढवळ्या हत्या केली जातेय. उरंधरमुळे ही भावना शतपटीने वाढत जाते. जनता पण पढतमूर्ख आहे. सहा दशकांपासून सर्वधर्मसमभाव संस्कार असलेला समाज गेल्या दिड दशकांत घट्ट सामाजिक बांधिलकीची शिवण उसवायला लागली आहे. हे या नाकर्ते सत्ताधीशांचे पाप आहे. 


धुरंधर मध्ये अजून एक ढळढळीत खोटा प्रचार केला आहे की पाकिस्तानच्या आशीर्वादाने भारतात नक्षलवादी आणि खलिस्तानवादी कारवाया चालू आहेत. हे सरळ सरळ डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहेत. नक्षलवादी चळवळ ही वैचारिक लढाई आहे. प्रसंगी तिचे उग्र स्वरूप जनतेसमोर येते ते हिंसक मार्गाने. त्याला बिचारे नक्षलवादी तरी काय करणार? एक तर कॅपिटालिस्ट लोकांनी जल जंगल जमीन खाजगी मालमत्ता करून टाकली. मग हिंसक उद्रेक होणारच ना? एकतर सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रशासन प्रामुख्याने जबाबदार आहेत नक्षली तयार होण्यासाठी. नक्षलवादी चळवळींमुळे शोषित वर्गाचा आवाज सर्वसामान्यांच्या कानांवर आला. सुस्तावलेल्या सुस्थापित जनतेला जागं करण्यासाठी केले नक्षलींनी बॉम्बफेक तर बिघडले कुठे? एका डाव्या विचारसरणीचा एक ज्वलंत गाभा आहे नक्षलवाद माओवाद. त्याचे कनेक्शन तुम्ही पाकिस्तानातल्या लोकांशी दाखवून काय मिळवलं? कुजबुज गॅंगच्या कुजबुजी सरळ सरळ सत्तर एम एम पडद्यावर ठशीवपणे दाखवताना लाज नाही वाटत? वर्षानुवर्षे चालू असलेल्या दुकानदारीला धुरंधर नामक चित्रपटाने सुरूंग लावला आहे. विशेष म्हणजे जनतेने डोक्यावर घेतले आहे धुरंधर ला. ही गांविचारांची हाराकिरी आहे. गोडसेविचार बळावला आहे हे सिद्ध होते. 


धुरंधर हा धादांत विखारी सिनेमा आहे. याच्यावर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे. 


एक सटकलेला उद्विग्न नवपुरोगामी 


©️भूषण वर्धेकर

सोमवार, ३० मार्च, २०२६

महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का?

 महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का?


महाराष्ट्रात सध्या एकूण घडणाऱ्या घटना पाहता महाराष्ट्र खरोखरच पुरोगामी विचारांचा होता का यावर चर्चा करण्याची गरज आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात फक्त शाहू फुले आंबेडकर वगैरे विभूतींचा जयघोष करत पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून मिरवले. महाराष्ट्राने देशाला फक्त शाहू फुले आंबेडकर हेच समाजसुधारक दिले आहेत काय? टिळक आगरकर, सावरकर, धोंडो केशव कर्वे, र धो कर्वे, जोशी, जांभेकर, डॉ लाड वगैरे कैक मंडळींना जातीमुळे जाणीवपूर्वक टाळले गेले असेल. मात्र जगन्नाथ शंकर शेट, विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे वगैरे मंडळी पण आहेत ना? अशा कितीतरी विद्वान विभूतींनी महाराष्ट्र घडवला आहे. सगळ्यांचीच नावे लिहिली नाहीत पण कित्येक पुढारलेल्या लोकांनी महाराष्ट्र धर्म परिपक्व केला. फक्त जयंत्या मयंत्यांसाठी अशी मंडळी राखून ठेवलेली आहेत का असा प्रश्न पडतो! महाराष्ट्रात वैचारिक मतभेद असणाऱ्या लोकांनी पण महाराष्ट्र घडवला आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावे. दर वीस वर्षांनी एक पिढी बदलते असं ढोबळमानाने सांगतात. मात्र वैचारिक अंगाने पिढी कधी आणि कशी बदलत जाते यावर चिकित्सा करणं गरजेचे आहे म्हणून हा लेखनप्रपंच!


महाराष्ट्र राज्य स्थापन झालं १९६० साली. भाषावार प्रांत रचनेनुसार. त्याआधी मराठी भाषिक भूभाग म्हणून म्हैसूर, हैदराबादच्या संस्थानात, मध्य भारत, वऱ्हाड, नागपूर संस्थान आणि मुंबई प्रांतांत मोठ्या प्रमाणात होते. हेच मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि एकत्र नांदू लागले. त्यानंतर मराठी भाषिक स्वायत्त राज्य म्हणून जे काही सामाजिक राजकीय आर्थिक दृष्ट्या बदल झाले ते लक्षात घेणे गरजेचे आहेत. सरसकट एकाच पुरोगामी ढाच्यात समस्त महाराष्ट्र पुरोगामी म्हणून राजकीय फायद्यासाठी लादला जातोय. ही पार्श्वभूमी लक्षात आल्यावर एक गोष्ट नक्की समजेल मराठी भाषिक एकजिनसी नाही. खानपान बोलीभाषा इतिहास भूगोल वगैरे विभागानुसार बदलत जाते. कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या भागातील मराठी माणूस स्वतःची वैशिष्ट्ये राखून आणि जोपासत असतो. या सगळ्यांना एकजुटीने धरून ठेवण्यासाठी आस्था, व्रतवैकल्ये आणि सण, उत्सव वगैरे आघाडीवर आहेत. पुरोगामी विचार हा आघाडीवर आहे का अशा पद्धतीने सगळ्यांना एकजुटीने धरून ठेवण्यासाठी? असायला पाहिजे पण राजकीय परिप्रेक्ष्यातच पुरोगामी विचार खुंटला. तो सार्वजनिक जीवनात मोठ्या प्रमाणात बहरलाच नाही. तो जर अग्रभागी असता तर आज महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात जातपातधर्म वगैरे टोकदार अस्मिता तयार झाल्या नसत्या. विवेकी महाराष्ट्रात प्रबोधनाची परंपरा आहे वगैरे गोष्टी छान वाटतात ऐकायला, वाचायला व लिहायला. प्रत्यक्षात जातीयवादी अस्मिता प्रखर झाल्या आहेत. 


स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात आणि दक्षिणेकडील काही राज्यात ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली होती. सनातनी विचार विरुद्ध पुढारलेला नवमतवादी विचार हा एक कालखंड होता. नंतर प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी विचार सुटसुटीत होऊन पुढे आला. या सगळ्यात अस्पृश्यतेविरोधात लढा, दलित, दलितेतर, बहुजन अभिजन वगैरे वैचारिक द्वंद्व चालू होते. अशा परिस्थितीत जर राजकीय विचार मराठी भाषिक अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व बहरलं असतं. तसेच सामाजिक विचारधारा म्हणून जर पुरोगामी विचार पुढे आणला गेला असता तर सामाजिक विषमता वाढली नसती. झालं नेमके उलटे! आपण राजकीय भूमिका पुरोगामी म्हणून स्वीकारली आणि राजकारणी मंडळींना आयतं चरायला कुरण दिलं आणि सामाजिक भूमिका म्हणून मराठी भाषेच्या अस्मितेचा डोस दिला गेला. अशी त्रेधातिरपीट झाल्यानंतर ना पुरोगामी विचार जनसामान्य जनतेत मुरला ना भाषिक अस्मिता सर्वदूर पसरल्या. अशी वैचारिक परिस्थिती असताना पुरोगामी विचार, विवेकी सामाजिक भान आणि जातिविरहीत ऐक्य महाराष्ट्रात मुरायला किती वर्षे, दशके, शतके लागतील? तशी टिकाऊ व्यवस्था उभी जरी राहिली तर तग धरेल काय? अशावेळी विवेकी जागर म्हणून खंडन मंडन चिकित्सा मीमांसा करणं एवढेच उरतं! ही वैचारिक हतबलता आली ती पुरोगामी चळवळ राजकीय टेकूवर उभी राहिली म्हणून. पुरोगामी विचार हा सर्वसमावेशक आणि सामाजिक समरसतेसाठी आवश्यक असतो. मात्र महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचार सर्वसमावेशक आणि सामाजिक समरसतेसाठी पुढे सरसावला आणि प्रबळ झाला. 


भारतात महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या जर मध्य पकडला तर दक्षिण भारत आणि उत्तर भारत असे प्रामुख्याने राज्यांचे समुह दिसतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाषिक अस्मिता टोकदार आहेत आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषिक अग्रेसर आहेत. मुळातच हिंदी ही अनेक बोलीभाषांमुळे बहरली जोपासली आणि वाढली. राजकीय वरचढ ठरली ती देशाची राजधानी हिंदी पट्ट्यात येत असल्याने. अशा परिस्थितीत दक्षिणेकडील राज्यात भाषिक अस्मितेचे राजकारण हिंदी भाषिक राजकारणात वरचढ ठरते. तसे महाराष्ट्राच्या बाबतीत घडत नाही. आपल्या महाराष्ट्रात कॉस्मोपॉलिटिन कल्चर मुरलेलं आहे. त्यामुळे मराठी भाषिक अस्मिता कधीच टोकदार होऊ शकत नाहीत. उलटपक्षी टोकदार काय झाल्या तर जातीय अस्मिता! कारणं काय तर चुकीच्या व्यवस्थेला पुरोगामी म्हणून रेखाटलं गेलं. उदाहरणार्थ, आजवर महाराष्ट्रात ज्या राजकीयदृष्ट्या व्यक्ती, संस्था आणि पंथ प्रभावशाली होते त्यांनी एक गोड गैरसमज काय पसरवला? दिसला बामन की करतो शोषण, दिसला वंचित की कर शोषित, दिसला दलित की कर पिडीत! असं भ्रमित व्हिज्युअल तयार केलं. पण प्रत्यक्षात काय होतं तर बहुजनांकडेच राजकीय प्राबल्य महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून होतं. १९६० ते १९९० हा कालखंड बघितला तर महाराष्ट्रात संस्थानिकं, जहागीरदार, वतनदार, सरंजामी लोकांचा राजकीय दबदबा दिसतो. १९९० नंतर जागतिकीकरण, अस्ताव्यस्त वाढलेलं शहरीकरण आणि विस्कटलेलं ग्रामीण कृषीक्षेत्र दिसतं. अशा साठ पासष्ठ वर्षांत किमान तीन मराठी भाषिक पिढ्या झाल्या आहेत. त्यांना दिसलेला पुरोगामी विचार एकसंध दिसला असेल काय? ह्या मूळ बाबींकडे लक्ष दिले तर समजेल की महाराष्ट्र पुरोगामी म्हणून अग्रेसर का नाही राहिला राजकारणात. 


तमिळी, मल्याळी, तेलुगू आणि कानडी लोकांसारखा सामाजिक, भाषिक एकात्मता म्हणून मराठी माणूस पुढे आला नाही याचे विवेचन केले पाहिजे. याला सर्वात मोठी खोडा महाराष्ट्रात घातला तो म्हणजे जातीयवाद्यांनी. उदाहरणार्थ जातीय दृष्टी एवढी मुरलेली आहे पुरोगामी महाराष्ट्रात जातीने ब्राह्मण असलेल्या पुरोगामी विचारांच्या लोकांना पण पुरोगामी लोकांनी लक्ष्य केलं आहे बरेचदा. म्हणजे सदासर्वदा ब्राह्मणद्वेष करणारा सोकॉल्ड पुरोगामी कंटाळा आला की पुरोगम्यांमधील कोण कोण ब्राह्मण आहेत हे शोधून उखाळ्यापाखाळ्या काढत बसतात. अशी जर मंडळी असतील तर महाराष्ट्रात पुरोगामी विचार बहरेल की हसं होईल त्याचं? जातीपातीत महाराष्ट्र बरबटलेला आहे हे जगजाहीर आहे मग शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने कंठशोष करून महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणून नेमके काय साधले जाते? सरकार दफ्तरी कागदपत्रे जर तपासली तर समजेल की महाराष्ट्रात ओबीसी कॅटेगरी मध्ये किमान अडीचशे पेक्षा जास्त जाती उल्लेखलेल्या आहे. एससी एसटी एनटी वगैरे कॅटेगरी मध्ये दिडशेच्या आसपास जाती आढळतात. खुल्या वर्गातील वीस पंचवीस जाती आहेत. म्हणजे सव्वाचारशे जातसमुह महाराष्ट्रात आहेत. ही सगळी माहिती आपल्याला सरकारी कागदोपत्री उपलब्ध आहे. यातील उपजाती आणि त्यांच्या निरनिराळ्या शाखा वेगळ्याच. मग एवढा मोठा जातिसमूह पुरोगामी विचाराखाली का आला नाही हा यक्षप्रश्न आहे. 


खरंतर जातपात आणि अस्पृश्यता यावर हिमालया एवढे काम डॉ आंबेडकरांनी केलं आहे. आज मात्र तुम्ही आंबेडकरांना मानत असाल आणि आंबेडकरवादी नसाल तर तुम्हाला परिघाबाहेर केलं जातं. अशाच विस्कळीत परिस्थितीत दलितांच्या चळवळींची गटगतटात शकलं झाली. महाराष्ट्रात कधीकाळी गावगाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुतेदार (१२ जातसमुह) आणि अलुतेदार (१८ जातसमुह) व्यवस्था कुशल कारागीर लोकांची होती. तीच अर्थव्यवस्थेची खरीखुरी वाहक होती. मात्र सरंजामी, वतनदार, जहागीरदार आणि संस्थानिकांच्या व्यवस्थेत शोषित व्यवस्था तयार झाली. मूळ पुरोगामी विचार पुढारलेला होता जो ब्राम्हणी व्यवस्थेविरोधातील वैचारिक लढाई होती. राजकीय धुरिणांनी शिताफीने ब्राम्हणद्वेषाचा कौल दिला. याच दरम्यान ब्राम्हणेतर समाजात सरकारी सोयीसुविधा आणि शैक्षणिक सवलती वापरून किमान दोन तीन पिढ्या ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांची दुसरी ब्राह्मणी व्यवस्था त्यांनी तयार केलेली आहे. जिच्याविरोधात खऱ्या अर्थाने सामाजिक लढा उभा राहिला पाहिजे पण राजकीय पुरोगामी लोकांना ब्राह्मणद्वेष प्रिय. प्रस्थापित ब्राह्मणेतर लोकांना मिळालेल्या नव्या अवकाशात त्यांचीच पुढची पिढी सुस्थापित होत राहिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने वंचित, शोषित आणि पिडीत प्रवाहाबाहेरील समुह तसेच राहिले. त्यामुळे सवर्णाविरोधात जंग जंग पछाडून “नवा प्रस्थापित मवर्ण” वर्ग उभा राहिला. अशा सामाजिक रचनेत अस्सल पुरोगामी विचारांच्या एकछत्राखाली एकजुटीने महाराष्ट्र एकत्र येऊ शकतो का? गेल्या साठ पासष्ट वर्षात नाही आला. आता येणं शक्य नाहीये. वारकरी संप्रदाय हा एकमेव पर्याय होता जिथे सर्व जातीपाती बाजला सारून लोक एकत्र येत असत. पण आजकाल वारकरी संप्रदाय हिंदुत्ववादी विचारधारेकडे झुकला आहे. कारण हिंदुत्व आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रात सर्व जातसमुहांना एकछत्राखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही अंशी ते सफल झाले आणि राजकीय पटलावर भक्कम झाले. 


एक उदाहरण पाहू. जर दुर्धर आजार पसरला तर आजार पसरवणारे विषाणू बलवान असतात. किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली तर थातुरमातुर आजार पण लवकर बळावतात. त्याप्रमाणे समाज धष्टपुष्ट असेल तर विखारी विकार टिकू शकत नाहीत. जर टिकले तर समाजाचा विवेक हरवलेला आहे समजावे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्याच्या काळात जे काही घडत आहे त्याला जबाबदार हिंदुत्ववादी तर आहेच आहेत आणि तेवढेच पुरोगामी पण आहेत. महाराष्ट्रात वैचारिक बकालपणा पुरोगाम्यांनी सुरू केला तर कळस हिंदुत्ववाद्यांनी चढवला आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस हा मूलतः सोशिक आणि श्रद्धाळू आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीपूजक असतो तसा मराठी माणूस पण कमी नाही. श्रद्धा, आस्था, अध्यात्म आणि रूढी परंपरा प्रथा या गोष्टी मराठी माणसाला नेहमीच आकर्षित करतात. वहावत जात व्यक्तीपूजा करून डोक्यावर मिरवण्यासाठी बहुतांश मराठी मने नेहमीच तयार असतात. अशा सुपीक जमिनीत अनेक चांगली पिके पण येतात आणि भरमसाठ वाढणारी निरुपयोगी तण, गवत, खुरटी झुडपे येत राहतात. योग्य मशागत, खते आणि औषध फवारणी जर वेळोवेळी केली तर ठिक नाहीतर येणाऱ्या भरघोस पिकाचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी फक्त शिक्षण झालेय म्हणून सुशिक्षित आहोत असे होत नाही. विवेक जागरूक असावा लागतो. अशा विवेकी समाजाची महाराष्ट्रात गरज आहे. पुरोगाम्यांनी ती संधी ढिगभर चुका करून घालवली. सध्या महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव आहे पण ही मंडळी फक्त राजकीय स्वार्थासाठी आसुसलेली आहेत. विवेकी प्रगल्भ समाज तयार करण्याची जबाबदारी ही राजकीय नसून सामाजिक आहे. ही प्रत्येक मराठी माणसाची वैयक्तिक जबाबदारी आहे. सारासार विचार, सद्‌सद्विवेक बुद्धी आणि विवेकाचे समाजभान अखंडित राहो!



©️भूषण वर्धेकर, पुणे 

३० मार्च २०२६

मातृभू इस्रायल पितृभू भारत

  ज्यू लोकांचा आणि भारताचे नाते ऐतिहासिक आहे. विशेषतः १९४० च्यादशकात बरेचसे ज्यू लोक भारतात शरणार्थी म्हणून आले होते. महाराष्ट्रात कोकणात हो...