चिंतन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंतन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही?

 छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही?


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात आले असा दावा करण्यात येतो. कारण ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला होता. याचे सांस्कृतिक महत्त्व आहे आणि तसे सर्वमान्य ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्यातील ठरावीक घटना ऐतिहासिक पुराव्यानिशी इतिहासकारांनी मांडल्या आहेत. साहित्य नाटक आणि चित्रपट या माध्यमाने आपापल्या परीने शिवाजी महाराजांची कारकीर्द कशी होती हे दाखवून दिले. चरित्रकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून जी जी रथी महारथी मंडळी होती आणि आहेत त्यांनी पण महाराजांच्या आयुष्यातातील घटनांचे दाखले देऊन किंवा प्रेरणा घेऊन आपल्या विचारांचा प्रसार प्रचार केला. व्यक्तीशः मला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून छत्रपती शिवराय वेगवेगळ्या पद्धतीने समजत गेले वेगवेगळ्या टप्प्यांवर.सर्वात आधी शाळेत अभ्यासक्रमातून भेटलेले शिवबा वेगळे होते. कॉलेजमध्ये गेल्यावर अवांतर वाचनात आलेले शिवराय वेगवेगळ्या दृष्टीनं समजत गेले. वय जसं जसं वाढत गेलं तसं तसं आजूबाजूच्या राजकीय सामाजिक घडामोडी घडत असताना शिवकालीन इतिहासाची परिस्थिती कशी काय हाताळली असेल शिवाजी महाराजांनी हे अनेकार्थाने उमजत गेलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख ज्या पद्धतीने करून दिली जातेय यावरून नेमके छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे हिंदवी होते की विद्रोही होते याचा विचार मांडणे प्रकर्षाने जाणवते. अर्थात ह्या लिखाणाने आमुलाग्र बदल वगैरे होतील असे मला अजिबात वाटत नाही. मात्र मराठी माणसाच्या मनातल्या शिवबा ते छत्रपती ह्या प्रवासात एक उद्बोधक वैचारिक रंजकता ही कालांतराने परिपक्व होत जाते. तसाच शिवबा ते छत्रपती या माझ्या मनातील शिवाजी महाराजांच्या विचारांचा दृष्टिकोन विस्तारत गेला. असाच प्रवास कित्येक मराठी माणसांनी पाहिला असेल. त्यामुळेच छत्रपती शिवराय हे कित्येक पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देतात.


सुरुवातीला मराठा साम्राज्याचा कालरेषा पट थोडक्यात पाहू. 

१६२७ शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते १८१८ मध्ये ब्रिटिश सैन्याने केलेला पेशव्यांचा पराभव. हा प्रामुख्याने महत्वाचा काळ मानला जातो. १६८० साली शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा कालखंड हा प्रामुख्याने कौटुंबिक कलह आणि साम्राज्य विस्तार या दोन भागांत विभागला जातो. १८१८ नंतरच्या काळातील ब्रिटिशांनी केलेल्या ट्रिटीज् आणि उत्तर भारतात असलेल्या संस्थानांसोबतचा व्यवहार आणि महाराष्ट्रातील संस्थानांसोबतचा व्यवहार यात बऱ्यापैकी तफावत दिसून येते. याव्यतिरिक्त मराठा साम्राज्याच्या समकालीन असलेल्या राजकीय व्यवस्थेला दुर्लक्षित करून चालणार नाही. तत्कालीन सामाजिक व्यवस्था आणि जगरहाटी फार महत्त्वाची आहे. परदेशी प्रवासी आले आणि त्यांनी तत्कालीन मराठा साम्राज्याच्या काळात दिसणाऱ्या नोंदी केल्या त्या पण लक्षात ठेवल्या पाहिजेत.  निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि मुघल सल्तनत या साम्राज्याच्या काळात ज्यांनी राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक व्यवहार केले त्याच्या नोंदी आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समजून घेणे जेवढे गरजेचे तेवढेच त्याकाळात आजूबाजूला घडणाऱ्या घटना समजून घेतल्या पाहिजेत. यामुळे शिवाजी महाराजांचे दूरदृष्टी आणि हिंदवी स्वराज्याची पायाभरणी याकडे डोळस पद्धतीने पाहता येईल.


मराठा साम्राज्याचा शुभारंभ हा विस्तारवादी आक्रमणातून झालेला नाही तो झाला विद्रोहातून. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात विद्रोह आणि रयतेचे राज्य या दोन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. शिवाजी महाराजांना परकीय राज्यकर्त्यांशी लढाया जेवढ्या ताकदीने लढल्या त्याच ताकदीने स्वकीयांशी पण लढाया लढाव्या लागल्या. याकडे बघताना त्या त्या विचारधारेच्या संशोधक, अभ्यासक, इतिहासकार आणि लेखक यांनी आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराजांची कारकीर्द रेखाटली. डाव्या विचारसरणीच्या कंपूत शिवाजी महाराजांच्या कारकिर्द वेगळ्या दृष्टीने मांडली. उजव्या विचारसरणीच्या कंपूत शिवाजी महाराजांची प्रतिमा वेगळी आहे. राजकीय फायद्यासाठी कालांतराने नवीन विचारकंपू जन्माला आला पुरोगामी म्हणून. त्यात शिवाजी महाराजांचा इतिहास मनाला वाटेल तसा लिहिला आहे. लेखक लोकांनी साहित्यात रंजकता आणण्यासाठी क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेले प्रसंग फार वेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. या सगळ्या नंतर प्रकट झालेले माध्यमे म्हणजे चित्रपट, दृश्य कला माध्यम आणि कथाकथन-व्याख्याने यांचे. यातून शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कित्येक बऱ्या वाईट चांगल्या उत्तम आणि दर्जेदार कलाकृती निर्माण झाल्या आणि जनतेला प्रभावित करून त्यांनी शिवाजी महाराजांची ठशीव प्रतिमा तयार केली. अशा सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन एक गोष्ट स्पष्ट होते की ज्याला त्याला आपापल्या वैचारिक विश्वात छत्रपती शिवाजी महाराज वेगळे भावलेले आहेत. 


ऐतिहासिक संदर्भ घेऊन तत्कालीन परकीय राज्यकर्त्यांची माहिती पाहू. इस्लामिक आक्रमणं सातव्या- आठव्या शतकापासून भारताच्या भूमीवर होत राहिली. काही अयशस्वी तर काही यशस्वीरीत्या. या दरम्यानच्या काळात गझनीच्या महमूदने भारतावर सतरावेळा आक्रमणं केली लुटालूट करण्यासाठी. बाराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात मोहम्मद घोरीने तराईनच्या युद्धात पृथ्वीराज चौहानचा पराभव करून भारतात कायमस्वरूपी मुस्लिम राजवट म्हणजे दिल्ली सल्तनत स्थापन केली. भारताच्या मध्ययुगीन काळातील एक महत्त्वाचे परकीय आक्रमण आणि साम्राज्य होते ते म्हणजे तेराव्या शतकापासून ते सोळाव्या शतकाची सुरवातीची दशके. दिल्ली सल्तनत ची तीनशेपेक्षा जास्त वर्षे सत्ता होती. या त्रिशतकात गुलामवंश, खिलजीवंश, तुघलक, सय्यद आणि लोधी वंशावळी दिल्लीचा तख्त संभाळत होती. पानिपताच्या पहिल्या युद्धात दिल्ली सल्तनतचा पराभव झाला आणि बाबरने मुघल साम्राज्याची सुरुवात केली. मुघल साम्राज्याचा पाडाव १८५७ च्या सुमारास झाला. शेवटचा मुघल सम्राट बहादूर जाफर शहा होता. यासोबतच दख्खनच्या पठारावरील सल्तनती म्हणजे विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, विदर्भाची बेरारची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतूबशाही आणि बीदरची बरीदशाही अस्तित्वात होती. याच काळात १६७४ ते १८१८ हा कालखंड मराठ्यांनी गाजवला. इस्लामिक शासकांचा इतिहास भूगोल समजला तर मराठ्यांनी दिलेला चिवट लढा कसा तुटपुंज्या साधनांवर अवलंबून होता हे समजते. अशा काळात हिंदवी स्वराज्य हेच साध्य होते आणि तीनही बाजूंनी इस्लामिक राजवट एका बाजूला पसरलेल्या अथांग सागरात हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकत होता. भौगोलिकदृष्ट्या बघितले असता एकास पाच असे प्रमाण होते मराठा आणि मुघल साम्राज्याचे. एवढ्या मोठ्या भूभागावर अनभिषिक्त सत्ता होती तरी मुघलांना मराठ्यांनी चिवटपणे झुंजवले होते. औरंगजेबाचा इतिहास वाचल्यानंतर मराठा कसा लढवय्या होता हे समजते. 


वरील पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली कारण हा बॅकड्रॉप लक्षात आला तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना कशी अस्तित्वात आली विद्रोह कसा तयार झाला आणि मावळ प्रांतांत रूजला, स्फुरला आणि धगधगत मराठा साम्राज्याचा उदय कसा झाला ते अटकेपार जाऊन मराठ्यांनी साम्राज्य विस्तारित केले याचा आढावा सहजपणे घेता येईल. विद्रोह हा ब्राह्मणांच्या विरोधात असतो हा एक गोड गैरसमज आजच्या काळातील एक राजकीय ढोंगीपणाचा कळस आहे. ब्राह्मणी व्यवस्थे विरोधात लढा म्हणजे विद्रोह. मग ब्राह्मणी व्यवही बिरूदावली आहे. ठाण मांडून बसलेल्या व्यवस्थेत शोषक आणि शोषित वर्ग विभागला जातो वाढत जातो आणि शोषकांच्या पिढ्या मांड ठोकून बसतात ती व्यवस्था ब्राह्मणी म्हणून ओळखली जाते. अशा व्यवस्थेला विरोध करणाऱ्या बंडखोरी करणाऱ्या लोकांना विद्रोही म्हणून संबोधले जाते. अशी शोषकांची पिढी शोषित समाजाला गुलामगिरीत ढकलत असते. अशा कधीही न बदलाणाऱ्या व्यवस्थेला छेद देणारी आणि पर्यायी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची ताकद असलेल्या लोकांना विद्रोह हाच सुरूवातीचा आधार असतो.  इस्लामिक शासकांकडे जहागीरदार, वतनदार, सरंजाम, संस्थाने आणि सरदार जुळवून घेत आपापली मक्तेदारी राखून होते. काही नाईलाजाने गुलामी करत होते. काही आपापल्या पद्धतीने बंडखोरी करत होते. असे अनेक सरदार होते. त्यापैकीच एक पराक्रमी आणि मुत्सद्दी शहाजीराजे भोसले. त्यांच्याकडे पुणे आणि सुपे यांची जहागिरी आदिलशाहीत होती. याच कालखंडात शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन, संस्कार आणि मार्गदर्शन केले. हिंदवी स्वराज्याची मूल्ये इथे रुजवली गेली. त्यासाठी विद्रोह कसा तयार झाला आणि नुसत्या विद्रोहाने संघटन होणार नाही म्हणून विद्रोहाला हिंदवी स्वराज्याची जोड मिळाली. रयतेचे राज्य कसे असावे याचे बाळकडू लहानपणापासून शिवरायांना पाजले होते. परकीय राजवटीत जुलमी व्यवस्था आणि शोषक कसे रयतेची लूट करतात हे दिसत होते. त्यामुळे आपण आपल्या व्यवस्था उभ्या करू. रयतेचे रक्षण करण्यासाठी पालन पोषण करण्यासाठी स्वायत्त व्यवस्था असावी असे वाटणे सहाजिकच होते. अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी विद्रोह आवश्यक होता. हा विद्रोह व्यवस्थेविरोधात होता. कोणत्या? गुलामीच्या! कोणाची गुलामी? तर परकीय सत्ताधिशांची. परकीय राजवटीत त्यांच्याच विरोधात बंडखोरी करून विद्रोह करून स्वकीयांचा विश्वास संपादन करून एक लौकिकार्थाने रयतेचे राज्य म्हणून स्वराज्य स्थापन केले पाहिजे ही भावना निर्माण झाली. मग जे स्वकीय सोबत येतील ते सवंगडी म्हणून त्यांना शुद्ध व प्रामाणिक हेतूने स्वायत्तता कशी गरजेची आहे आणि भूमिपुत्र म्हणून आपला हक्क आहे हे पटवून देणे किती कमालीचे कौशल्य असेल? ही व्यवस्था सगेसोयरे म्हणून जे आपल्याला साथ देतील त्यांना सोबत घेऊन उभी करणे. त्यांना तत्वाशी बांधून ठेवणे हे सोपे काम नाही. जे सोबत नाहीत परकीयांना मदत करतात त्यांच्या विरोधात लढणे मग ते स्वकीय का असेनात! अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांभाळून घेणे आणि स्वराज्य निर्माण करणे ही फार मोठी जोखीम होती. यात समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायचा नंतर त्यांना आपल्या सोबत कोणत्याही परिस्थितीत राहण्यासाठी आश्वासक वातावरण निर्माण करणे हेच हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करणारे होते. यातूनच पुढे प्रेरणा संवेदना भावना जागृत करून लढवय्या तयार करणे किती मोठे आव्हान असेल? अल्प साधने अत्यल्प रसद आणि काही शे किलोमीटर वर पसरलेली सह्याद्री पर्वतरांग हीच जमेची बाजू. वडिलांनी दिलेला गनिमाविरोधात लढायचा संस्कार. 


आपल्या रयतेसाठी आपलं शासन प्रशासन राज्यकारभार आणि व्यवहार उभा करण सोपी गोष्ट नव्हतीच. यातून समाजातील सर्व घटकांना एका छत्री खाली आणून केवळ स्वप्न न दाखवता ते साकार करून एक भक्कम पर्यायी व्यवस्था उभी करणं हेच हिंदवी स्वराज्याचे कोअर प्रिन्सीपल होते. शिवरायांनी ही मुहुर्तवेढ रचली किशोरवयीन सवंगडी घेऊन. एखादा किल्ला सर करून तो ताब्यात घेऊन तिथली व्यवस्था उभी करून तिथे राहणाऱ्या रयतेचे रक्षण पालन पोषण करणे ही छोटी सुरुवात. असे तीनशेहून अधिक किल्ले आहेत. मग अशा किल्ले परिसरात किती गावे असतील त्या गावातील शेतकऱ्यांना काय हवं काय नको हे बघून त्यांना राजकोषातून मदत करण. रयत कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण झाली तर गावातील सगळे आर्थिक सामाजिक व्यवहार सुरळीत होतात. अशी राज्यकारभाराची रचना त्याकाळी तयार होती. प्रशासकीय यंत्रणा मजबूत होती देखरेख ठेवण्यासाठी. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून त्या त्या क्षेत्रात तज्ञ असणाऱ्या लोकांना नियुक्त केले होते. राज्यात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी गुप्तहेरांची व्यवस्था होती. ही गुप्तचर यंत्रणा हिंदवी स्वराज्याचा ताठ कणा होता. स्वराज्य स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयी केल्या गेल्या होत्या. परकीय राजवटीत तत्कालीन संस्थानिक हिंदवी स्वराज्याच्या विरोधात नव्हते का? होतेच. काही अल्पसंतुष्ट जहागिरदार वतनदार होते आत्मघातकी. अशांवर वचक ठेवून वेळ पडली तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलून त्यांना विश्वासात घेऊन स्वराज्यात सामील करून वा भागीदार करून विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणे ही एक यंत्रणा होती. या सोबतच आजची लोकप्रिय संज्ञा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या कडे बारकाईने लक्ष दिले होते. प्रसंगी पैसा उभा करण्यासाठी सुरतेची लूट केली होती. अर्थात ही लूटमार स्वराज्य बांधण्यासाठी होती. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी सोयीनुसार संदर्भ घेऊन मराठा लूटमार करत वगैरे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण वेळोवेळी इतिहासकार अभ्यासक लोकांनी तो हाणून पाडला. औरंगजेब मेल्यावर मराठा साम्राज्यात असे कितीतरी भौगोलिक प्रदेश मुघलांनी बळकावले तिथली डागडुजी करून एक टिकणारी व्यवस्था तयार केली. मग असा रेडीमेड किल्ला वा प्रदेश मराठ्यांनी पुन्हा जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला होता. त्यामुळे मुघल साम्राज्यातील कैक राजे महाराजांना मराठ्यांचा वचक होता भीती होती. हीच स्वराज्य बांधणीची नीती होती. तत्कालीन मराठ्यांनी वेळप्रसंगी नमतं घेतलं तह केले काही जिंकलेले प्रदेश तहात घालवले काही वर्षांनी परत मिळवले. हा रंजक इतिहास आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे कैक मावळ्यांनी पुढे नेला. चिवट लढवय्या आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून मराठा साम्राज्याच्या काळात बरेच थोर सरदार, सेनापती आणि राजे साम्राज्याचे वाहक बनले. भले कौटुंबिक कलहाचे पडसाद उमटले. वारणेचा तह करून साताऱ्यात कोल्हापूरात गादी विभागली गेली पण मराठ्यांचा गड भलेभले शासक हलवू शकले नाहीत. अंतर्गत संघर्ष बंडखोरी सत्तालालसा आणि इर्ष्या कपट कारस्थाने याने पुरेपूर ओतप्रोत भरलेला सत्तापिसासूंचा वरचष्मा यामुळे भले १८१८ साली ब्रिटिश सरकारने मराठा साम्राज्याचा अश्वमेधाचा वारू रोखला. मात्र स्वराज्याची धग तेवढीच प्रखरतेने पेटत होती. याची प्रेरणा पुढं कैक महापुरुष आणि थोर विचारवंत यांना पण कमालीचे बळ देऊन गेली. याचं एक कारण म्हणजे शिवरायांना वेळोवेळी वेगवेगळ्या कालावधीत अनेक वेळा वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्या आकलनानुसार लोकांसमोर मांडले. मग तशी प्रेरणा घेऊन त्या त्या विचारांचा अनुयायी असलेल्या लोकांना पाठबळ मिळाले. मुळातच शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साधने कोणती यावर चर्चा झाली पाहिजे. त्याकाळात झालेल्या पत्रव्यवहारातून शिवाजी महाराजांच्या विचारांची ओळख होते. तत्कालीन परदेशी प्रवासी लोकांनी लिहिलेल्या नोंदीचा संदर्भ घेऊन एक वेगळा इतिहास वाचायला मिळतो. इस्लामिक शासकांच्या काळात लिखित स्वरूपात असलेला ग्रंथभांडारातून हिंदवी स्वराज्य कसे होते हे समजते. नंतर येतात बखरकार ज्यांची अतिशयोक्ती करून लिहिण्याची पद्धत होती. यावर संशोधन करून निष्पक्षपणे मांडलेला इतिहास. या भौगोलिक परिस्थितीत परकीय अभ्यासकांनी मांडलेली निरिक्षणे वाचली की एक कालपट समोर येतो. यातून ज्याने त्याने समजतील उमजतील असे शिवराय लोकांसमोर आणले. यापुढे हे प्रयत्न असेच सुरू राहतील. महाराष्ट्रातील प्रत्येक भौगोलिक प्रदेशावर मराठा साम्राज्याच्या काही ना काही ठळक खुणा आढळणार. त्यामुळे गेल्या साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षांत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येकाला प्रेरणा देणारा होता. आजही आहे आणि भविष्यातही असेल. कारण प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो. मग तो मानसिक असो वा सामाजिक. राजकीय असो वा आर्थिक. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे प्रसंग येतात त्यातून धीटपणे तावून सुलाखून बाहेर पडणाऱ्या (मराठी) माणसाला छत्रपती शिवराय नेहमीच बळ दे राहणार. मग हे नेमके कोणते शिवराय असतील? अमक्याने सांगितलेले खरे की तमक्याने सांगितलेले खोटे? किंवा फलाना म्हणतो तसे कपोलकल्पित की टिमका सांगतो तसे शिवराय? प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शिवराय आणि त्यांचा काळ व्यक्त करतात. त्यामुळे ह्यांनीच लिहिलेले खरे बाकीचे खोटे असे म्हणता येणार नाही. आपल्याला राजकीय फायदा झाला पाहिजे आणि त्यासाठी अमुक असाच इतिहास खपवण्याचे काम अव्याहतपणे चाल राहणारे आहे. त्यामुळे गोष्टींतले शिवराय असो वा व्याख्यानांमधील! साहित्य चित्रपट नाटकातून दिसणारे शिवराय असो वा विचारवंत लोकांच्या मनातील शिवराय! शैक्षणिक पाठ्यपुस्तकातून भेटणारे शिवराय असो वा अवांतर वाचनातून मनात रूंजी घालणारे शिवराय असो. ह्या सगळ्यात व्यापक अर्थाने प्रत्येकाला प्रभावित करणारे शिवराय वेगवेगळे असू शकतात. कसलीही न जुमानणारी परिस्थिती असताना बंडखोरी करून विद्रोह करून तत्व सत्व आणि स्वत्व टिकवून संघर्ष करण्याची ताकद देणारा अक्षय्य प्रेरणास्रोत म्हणजे माझा शिवबा ते सकलजनांचे छत्रपती शिवाजी महाराज. एका विचाराने पेटून उठलेले वादळ हिंदवी स्वराज्य स्थापन करत हजारो पिढ्यांना विद्रोहाचा मूलमंत्र देऊन लढण्यासाठी मानसिक शक्ती देणारा मेरूमणी म्हणजे हिंदवी स्वराज्याचा विचार. महाराष्ट्रातील मातीच्या कणाकणांत रूजलेले कणखर बीज म्हणजे विद्रोह. त्याच विचारांतून संकल्पित समाज निर्माण करणारा स्वराज्याचा हिंदवी संस्कार. सर्व स्तरातील तळागाळातील लोकांना एका घोषणेने पेटवणारा विचार छत्रपती शिवाजी महाराज. शोषकांच्या व्यवस्थेला झुगारणारा शोषितांसाठी विद्रोह करणारा चिवटपणे लढणारा रयतेच्या एकछत्री स्वराज्याची संकल्पना सिद्धीस नेणारा एकमेव आदर्श म्हणजे हिंदवी विचार. छत्रपती शिवाजी महाराजांची विद्रोही नीतिमत्ता हीच हिंदवी स्वराज्याची पायाभरणी होती.


©️ भूषण वर्धेकर, पुणे.

२२ फेब्रुवारी २०२६


गुरुवार, २२ मे, २०२५

नारळीकर, मराठी विज्ञान साहित्य

नारळीकर गेल्याची बातमी समजली आणि एकदमच आपल्या जवळचं कोणीतरी गेले अशी भावना झाली. प्रत्यक्षात त्यांना मी कधीच भेटलो नाही. त्यांचं कोणतेही व्याख्यान मी ऐकले नाही. केवळ त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून, त्यांच्या मुलाखतीतून आणि त्यांनी आजवरच्या केलेल्या कामातून ते भेटत राहीले.  सर्वसाधारणपणे शालेय जीवनात उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत पुस्तके वाचली पाहिजेत असा अघोषित नियम असतो. काही पाळतात काही पाळत नाहीत. नारळीकर भेटले पहिल्यांदा यक्षाची देणगी, वामन परतोनि न आला, प्रेषित आणि अंतराळीतील भस्मासूर वगैरे पुस्तकातून. नंतर आकाशाशी जडले नाते या पुस्तकामुळे तर विज्ञानाची गोडी अनेक पटीने वाढली. (ही पुस्तके माहित असण्याचे मुख्य कारण म्हणजे दौंडचे एस. एन. कुलकर्णी सरांची शिकवणी. त्यांच्यामुळेच पुणे विद्यापीठात आयुकात जाणं झालं.) या घटना एकदम आठवल्या कारण त्यानंतरच्या काळात आपण पण विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी करावे हीच स्वप्न उराशी बाळगून अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पुढं सप महाविद्यालयात बीएस्सी आणि फर्ग्युसन महाविद्यालयात एमएस्सी करणं. फर्ग्युसन मध्ये जुन्नरचे जयंत विष्णू कुलकर्णी (जेव्हीके सर) यांच्या लेक्चर्स मुळं विषयाची व्याप्ती खोली समजणं आणि आवड वाढणं. (अर्थातच भरपूर शिक्षकांच्या नावांचा उल्लेख करणं शक्य नाही)  मात्र ठराविक शिक्षकांची मराठीतून शिकवण्याची एक हतौटी होती तीची आज प्रकर्षाने जाणीव होते. ह्या सगळ्या आठवणी एकाएकी दाटून आल्या कारण विज्ञानाकडे कसं बघायचं आणि त्याचं दैनंदिन जीवनात महत्व काय ह्याचे धडे मिळाले. अर्थात शाळेत विज्ञान विषय शिकवला जायचा पण तो पाठ्यपुस्तकी परिक्षेसाठी. एस. एन. कुलकर्णी यांच्या क्लासेस मध्ये विज्ञान आणि गणित हे विषय कसे, का व कशासाठी शिकावे हे समजलं. छोट्या छोट्या प्रयोगातून वैज्ञानिक संकल्पना शिकल्याने विज्ञान विषयात रुची वाढते गेली. त्याआधी विज्ञान हा रट्टा मारून, व्याख्या, सूत्रे, तोंडपाठ करून परिक्षेसाठी शिकणं हेच होत होतं. नारळीकर यांनी लिहिलेल्या साहित्यातून, मराठी विज्ञान परिषदेच्या मासिकातून (शीव चुनाभट्टी मुंबई हा पत्ता वाचताना जे फिलिंग असायचं ते अजूनही आहे), बाळ फोंडके, डॉ प्रकाश तुपे, मोहन आपटे, शाम मराठे, निरंजन घाटे, वगैरे मंडळींनी लिहिलेल्या पुस्तकातून विज्ञानाविषयी वेगळंच ग्लॅमर वाढत होतं. कालांतराने मराठी भाषेत अच्युत गोडबोले, नंदा खरे आणि सुबोध जावडेकर वगैरे आले. नंतर कॉलेजमध्ये असताना असिमोव्ह, हाईनलीन, क्लार्क वगैरे मंडळींच्या कादंबऱ्या विषयी माहिती मिळाली काही वाचल्या त्या कादंबऱ्या बद्दल मराठीत वाचलं. काही परिक्षणं इंग्रजीत वाचली ब्रिटिश लायब्ररीत. मग एकूणच मराठी भाषेत विज्ञानकथा किंवा विज्ञान साहित्य याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. अर्थातच जे जे आधी मराठी भाषेत वाचलं होते ते वाईट अजिबात नव्हतं. कारण ती पात्रं ते विषय डोक्यात घोळत असतानाच वय वाढत होतं. समज वाढत होती.

नारळीकरांच्या विज्ञानकथांविषयी वेगळी समीक्षा होईल. बरोबरी करताना आयझॅक असिमोव्ह सोबत करू नये हीच प्रांजळ अपेक्षा. हे मनात ठेवून जर कथा वाचल्या की त्यांच्या लेखणीतली ताकत कळते. मी आधी नारळीकर, सुबोध जावडेकर यांच्या कथा वाचल्या नंतर असिमोव्ह च्या कथा वाचल्या. म्हणून मराठी विज्ञानकथा त्याज्य होत नाहीत. ज्यांनी आधी असिमोव्ह च्या कथा वाचल्या आहेत त्यांना नारळीकर यांनी लिहिलेल्या कथा बाळबोधच वाटणार. ह्याविषयी निरंतर चर्चा सुरू राहील. मात्र मराठी भाषेत विज्ञानकथा लिहिणं, विज्ञान तंत्रज्ञान विषयक मराठीत माहितीपर लेख लिहिणं, मराठी भाषेतून विज्ञान विषयक चिंतन मनन करणारे लेख लिहिणं, विज्ञानवादी (वैचारिक, तात्विक अंगाने) लेख लिहिणं, विज्ञान मराठी भाषेत समजावे म्हणून लेख लिहिणे आणि वैज्ञानिक संशोधन, प्रबंध मराठी भाषेत लिहिणं या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे स्तर एकमेकांत गुंतलेले वाटतील पण जाणकार असाल तर फरक लागलीच समजेल. मूळ मुद्दा येतो की मराठी भाषेतून विज्ञान साहित्याचा प्रचार, प्रसार करताना विवेकवादी भूमिका घेत नारळीकरांनी जे कार्य केले ते फार मोलाचे आहे. योगदान दिले वगैरे ह्या शब्दच्छलात नको पडायला. त्यासाठी त्यांनी बहुमोल वेळ दिला. संशोधन क्षेत्रात काम करत, प्रशासकीय कारभार सांभाळत सामाजिक जाणीव ठेवून विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी धडपड केली. आयुकात उपक्रम राबविले. विज्ञान म्हणजे पडणाऱ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी असलेली शाखा. जिथे वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झालेले पुरावे ग्राह्य धरतात. नारळीकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं आणि रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, श्रद्धा, अंधश्रद्धा याकडे डोळसपणे विचारपूर्वक पाहणं कसं असावं आणि कृतीतून काय करावं हे दाखवून दिले आहे. अर्थातच त्यांनी पन्नास साठ वर्षे या क्षेत्रात ठशीव कामगिरी केली आहे तशीच समाजातील सर्व घटकांना समजेल अशा साध्या सोप्या विषयावर प्रश्न विचारून वैज्ञानिक उत्तरं मिळवा ही चळवळीची संकल्पना रुजवली हे खूप महत्त्वाचे. महाराष्ट्रात खेडोपाड्यात किंवा तालुक्यातील पोराटोरांना नारळीकरांनी कैक प्रश्नांची उत्तरं पाठवली ती साध्या पोस्टकार्ड पासून ते आयुकाच्या वर्तुळाकार लोगो असलेल्या पाकिटातून. यामुळे जो कनेक्ट तयार झाला तसा कनेक्ट कोणत्याही शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात तरी आजपर्यंत केला नव्हता. २७ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयुकात सायन्स टूर म्हणून जे जे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामुळे जे एक ग्लॅमर तयार झाले ते मी स्वतः अनुभवलं आहे. ज्यांनी ज्यांनी ते शालेय जीवनात अनुभवले आहे त्यांच्या त्या आठवणी चिरकाल टिकणाऱ्या असतील.

नारळीकरांनी फ्रेड हॉईल यांच्या सोबत विश्वरचनाशास्त्र या विषयावर संशोधन केले. गुरुत्वाकर्षण, गणित आणि खगोलशास्त्र यावर त्यांनी केलेले संशोधन जगभरात मान्य केले आहे. सर्वसामान्य मराठी माणसाला या विषयावर फार जास्त माहिती नसणार मात्र नारळीकर यांनी विज्ञान विषयक चळवळीत, विज्ञानकथा, साहित्यात जे योगदान दिले ते नक्कीच माहिती असेल. आपल्याकडे शास्त्रज्ञ लोकांचे कार्य ठराविक वर्गातील लोकांपर्यंत मर्यादित आहे. याचं कारण म्हणजे कमी असलेली सामाजिक प्रगल्भता. विज्ञान आणि गणित विषयासाठी चौकस आणि उत्साही वातावरण तयार नसतं ही एक महाराष्ट्रातील शैक्षणिक शोकांतिका आहे. एका नावाजलेल्या शास्त्रज्ञाच्या प्रयत्नाने लागलीच बदल होणार नाही मात्र ठिणगी पडली हे महत्त्वाचे. राष्ट्रीय पातळीवर डॉ कलाम ह्यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशी कैक वैज्ञानिकांना मिळाली नाही. त्यासाठी वैचारिक तात्विक अंगाने विचार केला पाहिजे. खूप लोकांचा गैरसमज असतो वैज्ञानिक असेल तो विवेकवादी भूमिका घेणारा चे पाहिजे. जर तो श्रद्धाळू किंवा अध्यात्मिक असेल तो बुवाबाजी करणाराच असतो. अर्थातच हे वैचारिक वायफळ बगिचे डोक्यात फुललेले असतात. प्रत्यक्षात मात्र वैज्ञानिक संशोधन करून एखाद्या क्षेत्रात प्रगती झाली हे बघून मापदंड ठरले पाहिजेत. भारतीय समाजमनात देवभोळ्या प्रवृत्ती आहेत. श्रद्धाळू, आस्था जपणारा मोठा समाज आहे. तसाच अंधश्रद्धा बाळगून वागणारी भली मोठी पिढीजात चालत आलेले बहुसंख्य लोक आहेत. अशा गुंतागुंतीच्या सामाजिक वातावरणात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं आणि विवेकवादी भूमिका घेणं हे फार जिकिरीचं आहे. एखाद्या वैज्ञानिकाला सेवासुविधा पुरवल्या की त्याने सगळीकडे वैज्ञानिक क्रांती घडवून आणली पाहिजे हा हट्ट (किंवा समज) सहाजिकच बाळबोध आहे. भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवेकवादी भूमिका घेणं सरळमार्गी नाही. त्यांचं एकमेव कारण म्हणजे आपण पुराणं, वेद, उपनिषदे, पोथ्या, संस्कृती, सभ्यता आणि विज्ञान वगैरे ची सरमिसळ खूपच जाहीरपणे करतो. त्यामुळे एखाद्या वैज्ञानिकाला जे अपेक्षित असते अनुमान काढता येईल असे वातावरण किंवा घटना त्याला आवश्यक असा अवकाश मिळत नाही. आमच्या कडे आधीपासूनच हे अस्तित्वात होते वगैरे वर छातीठोकपणे मान्य असलेल्या समाजांना आपण विज्ञानवादी ठरवतो. मग लागलीच पुरावे आहेत का विचारलं की आस्था, युगानुयुगे चालत आलेल्या प्रथा, रुढी, परंपरा, चालीरीती वगैरे वगैरे वर चर्चा ढकलली जाते. याकडे मी वेगळ्याच दृष्टीने बघतो. उदाहरणार्थ अणू केंद्राबाहेर घिरट्या घालणारा इलेक्ट्रॉन स्थिर रेणू होण्यासाठी उर्जा उत्सर्जित करतो, दुसऱ्या अणूंची कक्षेत उड्या मारतो किंवा भागीदारी करतो हे प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं आहे. प्रमाणित आहे. मात्र या घटनेकडे अनेक विज्ञान शाखा वेगवेगळ्या स्तरातून दृष्टीकोनातून बघतात आणि तशी त्यांची थिअरी मांडली जाते. तसाच विचार प्रवाह गरजेचा आहे. विज्ञान जर विचारधारा असेल तर गणित ते सिद्ध करण्यासाठी भाषा असेल आणि तंत्रज्ञान हे प्रात्यक्षिकातून तयार झालेलं प्रचलित प्रमाण. मराठीत समजायला अवघड जाणार आहे हे लिहिलेले. मात्र विचार केला की पुष्टी होईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर सगळं बघून सप्रमाण दाखवून द्यायचं असेल किंवा मान्य करायचं असेल तर गुंतागुंतीचे कंगोरे दुर्लक्षित करता येणार नाहीत. उदाहरणार्थ पुरातन काळापासून चालत आलेल्या कैक गोष्टी छद्मविज्ञान म्हणून हेटाळल्या गेल्या तर जेव्हा केव्हा त्या सुरू झाल्या त्या आजतागायत टिकून आहेत हे दुर्लक्षित करता येणार नाही. जर त्याकाळी असं सांगितलं गेलं असेल किंवा मान्य केले गेले असेल ते आजच्या काळात विज्ञानाच्या कसोटीवर पडताळून घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान पाश्चात्य देशातून आलेले खरेखुरे तर एत्तदेशीय पुरातन काळातील विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे टाकाऊ. जर असे मानायचे ठरवलं तर हजारो वर्षांपासून दिमाखात उभे असलेल्या वास्तू (बहुसंख्य मंदिरे) कशी बांधली असतील? एखाद्या सिव्हिलायझेशनमध्ये जर स्थापत्यकलेचा विकास झालेला असेल तर त्यासाठी मूलभूत विज्ञान आणि आजूबाजूला उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून बांधलेल्या वास्तू छद्मविज्ञान होतं म्हणून बांधल्या का? असो यावर वेगळी चर्चा होईल.

विज्ञान हे निसर्गाचे निरिक्षण, सूक्ष्म निरीक्षण आणि मनाला पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून जन्माला येते. तसा विचार करण्याची पद्धत विकसित झाली की वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. मग तशी उपजतच भूमिका परिपक्व होते. नंतर प्रात्यक्षिके करून जर विकसित प्रारूप किंवा उपयोजित गोष्ट वापरात आली की तंत्रज्ञान जन्माला येते. हा वैज्ञानिक शोध म्हणून गणला जातो. ही एक कालातीत चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर पुणे. जागतिक स्तरावर कैक संशोधन, तंत्रज्ञान हे निसर्गाच्या निरिक्षणातून तयार झाले आहे. भारतात ह्यावर निसर्गाच्या सानिध्यात राहून सभ्यतेचा विकास झाला या धर्तीवर बघायला पाहिजे. मग सभ्यतेत जे जे उभं राहिलं ते मूळ तत्कालीन मान्यताप्राप्त विज्ञान आणि विकसित तंत्रज्ञान, शोध याचं जोरावर असेल. ही मांडणी लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे शिक्षणव्यवस्था जशी आणली तशी कारकून छाप पिढी तयार झाली. त्यातून वाचलेल्या पिढीतून उत्तमोत्तम शास्त्रज्ञ तयार झाले. कैक शास्त्रज्ञांनी संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आणि जगभरात भारताचे नाव उज्ज्वल केले. असे कितीतरी वैज्ञानिक आहेत. कितीतरी वेगवेगळ्या विज्ञानाच्या शाखांमध्ये भारतीयांचं काम वाखाणले गेले आहे. हजारो शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आज भारतात सरकारी संस्थांमध्ये खाजगी कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. सीएसआर, डीआरडीओ, आणि कैक संरक्षण संस्थांमध्ये भारतीय तंत्रज्ञ मोलाचं योगदान देत आहेत. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील असेच शास्त्रज्ञ समाजातील विज्ञान विषयक समज, गैरसमज, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार, विवेकवादी भूमिका घेत जनजागृतीसाठी कार्य करतात. त्यापैकी जयंत विष्णू नारळीकर हे होत. त्यांनी केलेल्या कामाचा आवाका मोठा आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली.

बातमी समजली अन् जे जे मनात येईल तसं लिहिलं आहे.

© भूषण वर्धेकर
२१ मे २०२५
पुणे ४१२११५

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही?

  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हिंदवी की विद्रोही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात आले असा...