गुरुवार, २२ मे, २०२५

नारळीकर, मराठी विज्ञान साहित्य

नारळीकर गेल्याची बातमी समजली आणि एकदमच आपल्या जवळचं कोणीतरी गेले अशी भावना झाली. प्रत्यक्षात त्यांना मी कधीच भेटलो नाही. त्यांचं कोणतेही व्याख्यान मी ऐकले नाही. केवळ त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून, त्यांच्या मुलाखतीतून आणि त्यांनी आजवरच्या केलेल्या कामातून ते भेटत राहीले.  सर्वसाधारणपणे शालेय जीवनात उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत पुस्तके वाचली पाहिजेत असा अघोषित नियम असतो. काही पाळतात काही पाळत नाहीत. नारळीकर भेटले पहिल्यांदा यक्षाची देणगी, वामन परतोनि न आला, प्रेषित आणि अंतराळीतील भस्मासूर वगैरे पुस्तकातून. नंतर आकाशाशी जडले नाते या पुस्तकामुळे तर विज्ञानाची गोडी अनेक पटीने वाढली. (ही पुस्तके माहित असण्याचे मुख्य कारण म्हणजे दौंडचे एस. एन. कुलकर्णी सरांची शिकवणी. त्यांच्यामुळेच पुणे विद्यापीठात आयुकात जाणं झालं.) या घटना एकदम आठवल्या कारण त्यानंतरच्या काळात आपण पण विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी करावे हीच स्वप्न उराशी बाळगून अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पुढं सप महाविद्यालयात बीएस्सी आणि फर्ग्युसन महाविद्यालयात एमएस्सी करणं. फर्ग्युसन मध्ये जुन्नरचे जयंत विष्णू कुलकर्णी (जेव्हीके सर) यांच्या लेक्चर्स मुळं विषयाची व्याप्ती खोली समजणं आणि आवड वाढणं. (अर्थातच भरपूर शिक्षकांच्या नावांचा उल्लेख करणं शक्य नाही)  मात्र ठराविक शिक्षकांची मराठीतून शिकवण्याची एक हतौटी होती तीची आज प्रकर्षाने जाणीव होते. ह्या सगळ्या आठवणी एकाएकी दाटून आल्या कारण विज्ञानाकडे कसं बघायचं आणि त्याचं दैनंदिन जीवनात महत्व काय ह्याचे धडे मिळाले. अर्थात शाळेत विज्ञान विषय शिकवला जायचा पण तो पाठ्यपुस्तकी परिक्षेसाठी. एस. एन. कुलकर्णी यांच्या क्लासेस मध्ये विज्ञान आणि गणित हे विषय कसे, का व कशासाठी शिकावे हे समजलं. छोट्या छोट्या प्रयोगातून वैज्ञानिक संकल्पना शिकल्याने विज्ञान विषयात रुची वाढते गेली. त्याआधी विज्ञान हा रट्टा मारून, व्याख्या, सूत्रे, तोंडपाठ करून परिक्षेसाठी शिकणं हेच होत होतं. नारळीकर यांनी लिहिलेल्या साहित्यातून, मराठी विज्ञान परिषदेच्या मासिकातून (शीव चुनाभट्टी मुंबई हा पत्ता वाचताना जे फिलिंग असायचं ते अजूनही आहे), बाळ फोंडके, डॉ प्रकाश तुपे, मोहन आपटे, शाम मराठे, निरंजन घाटे, वगैरे मंडळींनी लिहिलेल्या पुस्तकातून विज्ञानाविषयी वेगळंच ग्लॅमर वाढत होतं. कालांतराने मराठी भाषेत अच्युत गोडबोले, नंदा खरे आणि सुबोध जावडेकर वगैरे आले. नंतर कॉलेजमध्ये असताना असिमोव्ह, हाईनलीन, क्लार्क वगैरे मंडळींच्या कादंबऱ्या विषयी माहिती मिळाली काही वाचल्या त्या कादंबऱ्या बद्दल मराठीत वाचलं. काही परिक्षणं इंग्रजीत वाचली ब्रिटिश लायब्ररीत. मग एकूणच मराठी भाषेत विज्ञानकथा किंवा विज्ञान साहित्य याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. अर्थातच जे जे आधी मराठी भाषेत वाचलं होते ते वाईट अजिबात नव्हतं. कारण ती पात्रं ते विषय डोक्यात घोळत असतानाच वय वाढत होतं. समज वाढत होती.

नारळीकरांच्या विज्ञानकथांविषयी वेगळी समीक्षा होईल. बरोबरी करताना आयझॅक असिमोव्ह सोबत करू नये हीच प्रांजळ अपेक्षा. हे मनात ठेवून जर कथा वाचल्या की त्यांच्या लेखणीतली ताकत कळते. मी आधी नारळीकर, सुबोध जावडेकर यांच्या कथा वाचल्या नंतर असिमोव्ह च्या कथा वाचल्या. म्हणून मराठी विज्ञानकथा त्याज्य होत नाहीत. ज्यांनी आधी असिमोव्ह च्या कथा वाचल्या आहेत त्यांना नारळीकर यांनी लिहिलेल्या कथा बाळबोधच वाटणार. ह्याविषयी निरंतर चर्चा सुरू राहील. मात्र मराठी भाषेत विज्ञानकथा लिहिणं, विज्ञान तंत्रज्ञान विषयक मराठीत माहितीपर लेख लिहिणं, मराठी भाषेतून विज्ञान विषयक चिंतन मनन करणारे लेख लिहिणं, विज्ञानवादी (वैचारिक, तात्विक अंगाने) लेख लिहिणं, विज्ञान मराठी भाषेत समजावे म्हणून लेख लिहिणे आणि वैज्ञानिक संशोधन, प्रबंध मराठी भाषेत लिहिणं या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे स्तर एकमेकांत गुंतलेले वाटतील पण जाणकार असाल तर फरक लागलीच समजेल. मूळ मुद्दा येतो की मराठी भाषेतून विज्ञान साहित्याचा प्रचार, प्रसार करताना विवेकवादी भूमिका घेत नारळीकरांनी जे कार्य केले ते फार मोलाचे आहे. योगदान दिले वगैरे ह्या शब्दच्छलात नको पडायला. त्यासाठी त्यांनी बहुमोल वेळ दिला. संशोधन क्षेत्रात काम करत, प्रशासकीय कारभार सांभाळत सामाजिक जाणीव ठेवून विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी धडपड केली. आयुकात उपक्रम राबविले. विज्ञान म्हणजे पडणाऱ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी असलेली शाखा. जिथे वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झालेले पुरावे ग्राह्य धरतात. नारळीकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं आणि रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, श्रद्धा, अंधश्रद्धा याकडे डोळसपणे विचारपूर्वक पाहणं कसं असावं आणि कृतीतून काय करावं हे दाखवून दिले आहे. अर्थातच त्यांनी पन्नास साठ वर्षे या क्षेत्रात ठशीव कामगिरी केली आहे तशीच समाजातील सर्व घटकांना समजेल अशा साध्या सोप्या विषयावर प्रश्न विचारून वैज्ञानिक उत्तरं मिळवा ही चळवळीची संकल्पना रुजवली हे खूप महत्त्वाचे. महाराष्ट्रात खेडोपाड्यात किंवा तालुक्यातील पोराटोरांना नारळीकरांनी कैक प्रश्नांची उत्तरं पाठवली ती साध्या पोस्टकार्ड पासून ते आयुकाच्या वर्तुळाकार लोगो असलेल्या पाकिटातून. यामुळे जो कनेक्ट तयार झाला तसा कनेक्ट कोणत्याही शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात तरी आजपर्यंत केला नव्हता. २७ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयुकात सायन्स टूर म्हणून जे जे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामुळे जे एक ग्लॅमर तयार झाले ते मी स्वतः अनुभवलं आहे. ज्यांनी ज्यांनी ते शालेय जीवनात अनुभवले आहे त्यांच्या त्या आठवणी चिरकाल टिकणाऱ्या असतील.

नारळीकरांनी फ्रेड हॉईल यांच्या सोबत विश्वरचनाशास्त्र या विषयावर संशोधन केले. गुरुत्वाकर्षण, गणित आणि खगोलशास्त्र यावर त्यांनी केलेले संशोधन जगभरात मान्य केले आहे. सर्वसामान्य मराठी माणसाला या विषयावर फार जास्त माहिती नसणार मात्र नारळीकर यांनी विज्ञान विषयक चळवळीत, विज्ञानकथा, साहित्यात जे योगदान दिले ते नक्कीच माहिती असेल. आपल्याकडे शास्त्रज्ञ लोकांचे कार्य ठराविक वर्गातील लोकांपर्यंत मर्यादित आहे. याचं कारण म्हणजे कमी असलेली सामाजिक प्रगल्भता. विज्ञान आणि गणित विषयासाठी चौकस आणि उत्साही वातावरण तयार नसतं ही एक महाराष्ट्रातील शैक्षणिक शोकांतिका आहे. एका नावाजलेल्या शास्त्रज्ञाच्या प्रयत्नाने लागलीच बदल होणार नाही मात्र ठिणगी पडली हे महत्त्वाचे. राष्ट्रीय पातळीवर डॉ कलाम ह्यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशी कैक वैज्ञानिकांना मिळाली नाही. त्यासाठी वैचारिक तात्विक अंगाने विचार केला पाहिजे. खूप लोकांचा गैरसमज असतो वैज्ञानिक असेल तो विवेकवादी भूमिका घेणारा चे पाहिजे. जर तो श्रद्धाळू किंवा अध्यात्मिक असेल तो बुवाबाजी करणाराच असतो. अर्थातच हे वैचारिक वायफळ बगिचे डोक्यात फुललेले असतात. प्रत्यक्षात मात्र वैज्ञानिक संशोधन करून एखाद्या क्षेत्रात प्रगती झाली हे बघून मापदंड ठरले पाहिजेत. भारतीय समाजमनात देवभोळ्या प्रवृत्ती आहेत. श्रद्धाळू, आस्था जपणारा मोठा समाज आहे. तसाच अंधश्रद्धा बाळगून वागणारी भली मोठी पिढीजात चालत आलेले बहुसंख्य लोक आहेत. अशा गुंतागुंतीच्या सामाजिक वातावरणात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं आणि विवेकवादी भूमिका घेणं हे फार जिकिरीचं आहे. एखाद्या वैज्ञानिकाला सेवासुविधा पुरवल्या की त्याने सगळीकडे वैज्ञानिक क्रांती घडवून आणली पाहिजे हा हट्ट (किंवा समज) सहाजिकच बाळबोध आहे. भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवेकवादी भूमिका घेणं सरळमार्गी नाही. त्यांचं एकमेव कारण म्हणजे आपण पुराणं, वेद, उपनिषदे, पोथ्या, संस्कृती, सभ्यता आणि विज्ञान वगैरे ची सरमिसळ खूपच जाहीरपणे करतो. त्यामुळे एखाद्या वैज्ञानिकाला जे अपेक्षित असते अनुमान काढता येईल असे वातावरण किंवा घटना त्याला आवश्यक असा अवकाश मिळत नाही. आमच्या कडे आधीपासूनच हे अस्तित्वात होते वगैरे वर छातीठोकपणे मान्य असलेल्या समाजांना आपण विज्ञानवादी ठरवतो. मग लागलीच पुरावे आहेत का विचारलं की आस्था, युगानुयुगे चालत आलेल्या प्रथा, रुढी, परंपरा, चालीरीती वगैरे वगैरे वर चर्चा ढकलली जाते. याकडे मी वेगळ्याच दृष्टीने बघतो. उदाहरणार्थ अणू केंद्राबाहेर घिरट्या घालणारा इलेक्ट्रॉन स्थिर रेणू होण्यासाठी उर्जा उत्सर्जित करतो, दुसऱ्या अणूंची कक्षेत उड्या मारतो किंवा भागीदारी करतो हे प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं आहे. प्रमाणित आहे. मात्र या घटनेकडे अनेक विज्ञान शाखा वेगवेगळ्या स्तरातून दृष्टीकोनातून बघतात आणि तशी त्यांची थिअरी मांडली जाते. तसाच विचार प्रवाह गरजेचा आहे. विज्ञान जर विचारधारा असेल तर गणित ते सिद्ध करण्यासाठी भाषा असेल आणि तंत्रज्ञान हे प्रात्यक्षिकातून तयार झालेलं प्रचलित प्रमाण. मराठीत समजायला अवघड जाणार आहे हे लिहिलेले. मात्र विचार केला की पुष्टी होईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर सगळं बघून सप्रमाण दाखवून द्यायचं असेल किंवा मान्य करायचं असेल तर गुंतागुंतीचे कंगोरे दुर्लक्षित करता येणार नाहीत. उदाहरणार्थ पुरातन काळापासून चालत आलेल्या कैक गोष्टी छद्मविज्ञान म्हणून हेटाळल्या गेल्या तर जेव्हा केव्हा त्या सुरू झाल्या त्या आजतागायत टिकून आहेत हे दुर्लक्षित करता येणार नाही. जर त्याकाळी असं सांगितलं गेलं असेल किंवा मान्य केले गेले असेल ते आजच्या काळात विज्ञानाच्या कसोटीवर पडताळून घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान पाश्चात्य देशातून आलेले खरेखुरे तर एत्तदेशीय पुरातन काळातील विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे टाकाऊ. जर असे मानायचे ठरवलं तर हजारो वर्षांपासून दिमाखात उभे असलेल्या वास्तू (बहुसंख्य मंदिरे) कशी बांधली असतील? एखाद्या सिव्हिलायझेशनमध्ये जर स्थापत्यकलेचा विकास झालेला असेल तर त्यासाठी मूलभूत विज्ञान आणि आजूबाजूला उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून बांधलेल्या वास्तू छद्मविज्ञान होतं म्हणून बांधल्या का? असो यावर वेगळी चर्चा होईल.

विज्ञान हे निसर्गाचे निरिक्षण, सूक्ष्म निरीक्षण आणि मनाला पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून जन्माला येते. तसा विचार करण्याची पद्धत विकसित झाली की वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. मग तशी उपजतच भूमिका परिपक्व होते. नंतर प्रात्यक्षिके करून जर विकसित प्रारूप किंवा उपयोजित गोष्ट वापरात आली की तंत्रज्ञान जन्माला येते. हा वैज्ञानिक शोध म्हणून गणला जातो. ही एक कालातीत चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर पुणे. जागतिक स्तरावर कैक संशोधन, तंत्रज्ञान हे निसर्गाच्या निरिक्षणातून तयार झाले आहे. भारतात ह्यावर निसर्गाच्या सानिध्यात राहून सभ्यतेचा विकास झाला या धर्तीवर बघायला पाहिजे. मग सभ्यतेत जे जे उभं राहिलं ते मूळ तत्कालीन मान्यताप्राप्त विज्ञान आणि विकसित तंत्रज्ञान, शोध याचं जोरावर असेल. ही मांडणी लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे शिक्षणव्यवस्था जशी आणली तशी कारकून छाप पिढी तयार झाली. त्यातून वाचलेल्या पिढीतून उत्तमोत्तम शास्त्रज्ञ तयार झाले. कैक शास्त्रज्ञांनी संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आणि जगभरात भारताचे नाव उज्ज्वल केले. असे कितीतरी वैज्ञानिक आहेत. कितीतरी वेगवेगळ्या विज्ञानाच्या शाखांमध्ये भारतीयांचं काम वाखाणले गेले आहे. हजारो शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आज भारतात सरकारी संस्थांमध्ये खाजगी कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. सीएसआर, डीआरडीओ, आणि कैक संरक्षण संस्थांमध्ये भारतीय तंत्रज्ञ मोलाचं योगदान देत आहेत. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील असेच शास्त्रज्ञ समाजातील विज्ञान विषयक समज, गैरसमज, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार, विवेकवादी भूमिका घेत जनजागृतीसाठी कार्य करतात. त्यापैकी जयंत विष्णू नारळीकर हे होत. त्यांनी केलेल्या कामाचा आवाका मोठा आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली.

बातमी समजली अन् जे जे मनात येईल तसं लिहिलं आहे.

© भूषण वर्धेकर
२१ मे २०२५
पुणे ४१२११५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नारळीकर, मराठी विज्ञान साहित्य

नारळीकर गेल्याची बातमी समजली आणि एकदमच आपल्या जवळचं कोणीतरी गेले अशी भावना झाली. प्रत्यक्षात त्यांना मी कधीच भेटलो नाही. त्यांचं कोणतेही व्...