राजकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!


भारतीय राज्यघटना लिहिली जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फार बारकाईने अभ्यास करून आरक्षणाच्या तरतुदी केल्या. सर्वार्थाने जो समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रवाहापासून दूर होता त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी केल्या आहेत. यात प्रामुख्याने वंचित, शोषित जनतेला प्राधान्य द्यावे हे महत्त्वाचे. कारण वर्षानुवर्षे एकाच वर्गातील पिढ्यानपिढ्या लाभार्थी होत होत्या. बहुसंख्य सवर्ण हे संधी मिळवून आपापल्या परीने प्रगती करत. मात्र संधी न मिळालेला समाज किंवा संधी असूनही तीचा वापर कसा करावा याचा मागमूसही नसलेला समाज प्रामुख्याने शोषित, वंचित होता. दुर्लक्षित नव्हता फक्त शासनदरबारी, प्रशासकीय कारभारात अजिबातच नव्हता. अशा मंडळींची समाजातील धनाढ्य लोकांकडून पिळवणूक होत असे. नंतर अशा मंडळींना दलित, अस्पृश्य, मागास, भटकी जमात वा गावाच्या वेशीबाहेरची जमात वगैरे संबोधलं गेलं. अशा लोकांना समान संधी आणि सामाजिक न्याय देण्यासाठी आरक्षण महत्वाचे. मात्र आरक्षण हा हक्क नसतो. ती एक बेजमी असते सरकारी सबसिडी सारखी. त्यामुळे जे साध्य करायचे आहे त्यासाठी मागासलेल्या वर्गांना आरक्षण हे साधन म्हणून वापरणं गरजेचं होतं. मात्र चाणाक्षपणे आरक्षण हेच साध्य ठरवून हक्क सांगण्यासाठी राजकीय आणि सामाजिक व्यवस्था मजबूतीने उभी राहीली. स्वातंत्र्यानंतर किमान चार पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जर तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी पोचल्या नसतील तर समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे ह्या फक्त भूलथापा राहतील. आरक्षणाचा लाभ घेऊन वंचित, शोषित समाजाच्या एका वर्गाने कायमस्वरूपी लाभार्थी असण्याचा फायदा घेतला. त्यांच्याकडे सवर्ण वर्गाशी स्पर्धा करण्यासाठी बरोबरीने समान संधी मिळाल्या तरीही त्या वर्गाने आरक्षणाचा लाभ सोडला नाही. हीच खरी मेख आहे तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी न मिळाल्याच्या. 


आरक्षण मिळाल्याने समाजाचा विकास होतो ही एक सामाजिक अंधश्रद्धा आहे. आरक्षण हे साधन आहे संधी न मिळालेल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. पण राजकीयदृष्ट्या वापर करून लोकांनी आरक्षण हेच साध्य बनवलं आहे. कागदोपत्री आकडेवारी दिली की काहीतरी पुराव्यानिशी आपण युक्तिवाद करतोय असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र आकडेवारी देऊन जेव्हा तुलना केली जाते तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाण ही बाब फार महत्त्वाची. दुसरं तुलनेत कोणकोणत्या घटकांना प्राधान्य दिले आहे याचं. त्यामुळे आकडेवारी देऊन सांगितले की कोर्टात आपली बाजू भक्कमपणे उभी होईल आणि वेळ पडली तर संविधानाच्या चौकटीत राहून तरतूद करण्यासाठी दुरूस्ती विधेयक वगैरे आणण्यासाठी परत आंदोलनं, चर्चा, चिखलफेक हे निर्विवादपणे चालत राहणार आहे. समजा माणसाला आजार झाला असेल आणि त्यावर एखाद्या औषधाची मात्रा लागू होत नसेल तर औषध बदलायला हवं. किंवा आजार होऊ नये म्हणून जीवनशैली बदलणं गरजेची आहे. औषध तेच ठेवायचं आणि डॉक्टर बदलायचे. हेच तर कैक वर्षे चालू आहे. मुळातच संधी उपलब्ध करून देणे आणि संधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता, कौशल्ये विकसित करण्यासाठी सेवा, सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे आहे. घटनात्मक आरक्षण हे मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ट 'मॉडेल' आहे. पण इम्प्लिमेंटेशन गंडवले गेले आहे. त्याला जबाबदार सामाजिक आणि राजकीय व्यवस्था.


गेल्या सात दशकांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या किती पिढ्या भारतात घडल्या? ज्यांनी आरक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येऊन सक्षम होऊन आरक्षणाचे लाभ नको म्हणून किती घटकांनी सरकार दरबारी नोंद केली आहे? क्रिमी लेअर नॉन क्रिमी लेअर वगैरे नोंदणी फक्त जात प्रमाणपत्राची गरज आहे. प्रत्यक्षात आरक्षणाचे हत्यार म्हणून वापर सर्रासपणे सुरू आहे. आता तर संख्यात्मक बळ वाढतेय समजल्यावर हिंसक उग्र आंदोलने आणि व्यवस्थेला धाब्यावर बसवून वाट्टेल त्या मागण्यांसाठी लोकांना भडकावणं सुरू आहे. आरक्षण हे गरीबी दूर करण्यासाठी आणलेलं नाही. वंचित, शोषित आणि पिढ्यानपिढ्या मागासलेला वर्ग आणि मुख्य प्रवाहातील वर्ग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणलेला उत्तम पर्याय म्हणजे घटनात्मक आरक्षण. ठराविक कालावधीनंतर ह्या पर्यायाने खरंच तळागाळापर्यंत लोकांना लाभ मिळत आहे का? ह्याच सिंहावलोकन करणं गरजेचं. म्हणजे व्यवस्था अजून सुदृढ कशी करता येईल याची चाचपणी करता येईल. मात्र हे करण्यासाठी धजावणार कोण? आरक्षणाचा प्रश्न राजकीय झाला आहे. राजकीय समस्या सुटत नसतात त्याचा वापर सत्ताकारणात कुटील डाव खेळण्यासाठी होतो. 


मराठा आरक्षणावर खूप बोलून झाले, लिहून झाले, चर्चा वादविवाद होत राहतील. याचं समाजाभिमुख निरसन व्हावं असं कोणत्याही राजकीय सामाजिक क्षेत्रातील धुरिणांना वाटत नाही. ज्यांना पोटतिडकीने काही तरी करायचे आहे अशांना सार्वजनिक जीवनात व्यापकपणे पाठींबा मिळत नाही. कारण राजकीय धोरणलकवे. मराठा समाजातील लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. आपल्याकडे सत्ता मिळवण्यासाठी मराठा समाजाला वापरून दुर्लक्षित केले आहे. मराठा समाजाला संख्यात्मक पाठबळ जास्त आहे म्हणून त्यांचा राजकीय उपद्रव कोणत्याही राजकीय पक्षांना महागात पडतो. खरी गरज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून मराठा नेतृत्व राजकीय, आर्थिक क्षेत्रात आघाडीवर होते. मग सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण हवे असं का वाटू लागले? मराठा टक्केवारी जास्त असल्याने त्याच प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व पण जास्त असणार सहाजिकच आहे. मग एवढं सगळं सोशोइकोपॉलिटिकल प्रिव्हिलेजेस मिळून देखील मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासते म्हणजे. खरी मेख व्यवस्थेतील त्रुटींची आहे. त्यानंतर सत्ताधारी लोकांची अनास्था. त्यामुळे सत्तेवर कोणीही असले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच लोंबकळत राहील. 


ज्या आंदोलनाचे उपद्रवमूल्य जास्त ती आंदोलन आपल्याला कशी फायदेशीर ठरतील हे बघणं विरोधकांचे पहिलं काम आहे. कारण सत्तेवर यायचं असेल तर सरकार विरोधात वातावरण निर्माण झाले पाहिजे तरच आपल्याला सत्तेवर येण्याची संधी उपलब्ध होईल हे राजकीय शहाणपण विरोधकांना असते. सत्ताधारी वेळकाढूपणा करत आपल्या पथ्यावर कसं पडेल याची काळजी घेत असतात. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ना सत्ताधारी लोकांना इंटरेस्ट असतो ना विरोधकांना. आंदोलनं हायजॅक होणं काही नवीन नाही. गेल्या दोन दशकांत अशी कितीतरी आंदोलनं फसलेली आहेत किंवा भरकटवली गेली आहेत. मराठा समाज कधीकाळी क्षत्रिय, लढवय्या म्हणून नावाजलेला होता तोच आज आरक्षणासाठी मागासलेला हे सिद्ध करण्यासाठी धडपडतोय. यावरून लक्षात घेतलं पाहिजे की, हीच पद्धत जर अंगवळणी पडली तर संख्यात्मक बळाच्या जोरावर व्यवस्थेला वेठीस धरेल. वेळ पडली तर संविधानाच्या दुरुस्तीसाठी दबावतंत्राचा वापर होईल. यावर उपाय म्हणून मूळ प्रश्न ज्यामुळे उद्भवले ते सोडवले पाहिजेत. खेडोपाड्यात मराठा समाजाला शेतीसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी हा बहुतांश मराठा समाजातील आहे. खेडोपाड्यात शेतकऱ्यांची पिळवणूक कोणामुळे कशासाठी होते हे वेगळे सांगायला नको. शिक्षणासाठी मराठा तरुणांना तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत जेवढ्या इतर समाजातील लोकांना असतात. फक्त आरक्षण मिळाल्याने सरकारी नोकरीत मराठा टक्का वाढेल. शिक्षणासाठी फीया कमी भराव्या लागतील हा बाळबोध समज आधी दूर केला पाहिजे. सरकारमध्ये नोकरीच्या संधी लोकसंख्येच्या प्रमाणात खूपच कमी होणार आहेत उत्तरोत्तर. मराठा समाजाला आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक हवे आहे. राजकीय हवंय पण स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे निवडणुकीत पदे मिळवण्यासाठी. त्यात ओबीसींच्या आरक्षणातच मराठा समाजाला सामावून घेण्यासाठी धडपड चालू आहे. अशी त्रेधातिरपीट होणारी गुंतागुंतीची अवस्था झाली आहे. स्वतःला कधीकाळी सरंजाम, जहागिरदार, वतनदार, सावकार, जमीनदार, गावची पाटीलकी संभाळून, गावगाडा चालवणारा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो हे सामाजिक ऱ्हासाचे द्योतक आहे. भविष्यात आरक्षण मिळाले आणि समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही तर एससी, एसटी, व्हीजेएनटी वगैरे मध्ये सामील करा म्हणून मागणी करणार का? कारण ओपन मधून ओबीसींच्या कोट्यात जाण्यासाठी आज आंदोलन होतंय. याचा अर्थ आंदोलनं भरकटलेली आहे. आरक्षण मिळाल्याने जर खरंच समाजाचा चौफेर विकास होत असता तर गेली सात दशके किमान एक तरी मागास समाज आरक्षण नको मुख्य प्रवाहात स्थिरस्थावर झालो आहोत म्हणून पुढे आला असता. तसे झाले नाही आणि दोन चार पिढ्या मुख्य प्रवाहात येऊन सधन झाल्यानंतरही आरक्षण सोडणार नाहीत. अशा बरबटलेल्या वातावरणात कोणीही विवेकी पद्धतीने प्रबोधन करणार नाही. याचं कारण आरक्षण हे हत्यार झाले आहे. व्यवस्थेला जेरीस आणून हवं ते साध्य करता येते ह्याचा पायंडा पडत आहे. 


शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करणाऱ्या, पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या लोकांना सत्य परिस्थिती काय आहे आणि घटनात्मक मर्यादा कशा आहेत हे समजले आहे. यात भरडला जातोय तो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मराठा तरुण. यावर एक उपाय म्हणजे सामुहिक पद्धतीने संविधानाचे पारायण व्हावे आणि संविधानाच्या चौकटीत राहून देश कसा चालतो ह्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पण हे प्रबोधन करणे सोपे आहे का? संविधानाविषयी सर्वसामान्य माणसाला माहिती असते. वाचन, अभ्यास मात्र नसतो. त्यामुळे अशा जनतेला घोळात घेणं सोपं असतं. उदाहरणार्थ अमुक तमुक मुळं आपण दुर्लक्षित राहिलो किंवा फलाना टिमका लोकांमुळेच आपलं नुकसान झालं. अशा अन्यायकारक गोष्टी ठासून सांगितल्या की बहुसंख्य भोळा समाज विश्वास ठेवतो कसलीही शहानिशा न करता. तसंही सामाजिक आणि राजकीय प्रश्नांमध्ये पुसटशी रेषा असते. ती समजणं खूप जिकिरीचे आहे. त्यासाठी जागरूक नागरिक म्हणून सर्वात मोठा आधार म्हणजे संविधानाचा मसुदा. संविधान वगैरे गोष्टींचा वापर व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रामुख्यानं केला पाहिजे. पण व्यवस्थेतील लोक स्वतःला बळकट करण्यासाठी अशा आंदोलनाचा वापर करतात. मग अशी मंडळी सत्तेत असो वा नसो. व्यवस्था कशी राबवावी, झुकवावी किंवा विस्कळीत करावी याचं परिपूर्ण टूलकिट वापरण्यात वाकबगार असतात. यात फरफटतो तो गरीब समाज. बहुतांश बहुजन. सुस्थापित सवर्ण वर्गाचा रस्त्यावरील आंदोलन वगैरे यांचा तसा संबंध येत नाही. मात्र मेख अशी आहे की ह्यावर प्रबोधन करणे सोपे नाही. गमतीने म्हटले जाते की समाज हा किर्तनाने सुधारत नाही की तमाशाने बिघडत पण नाही. जो तो सभ्यतेचा आव आणून सांस्कृतिक किर्तन करतो किंवा सामाजिक जाणीवांची भोंगळ स्वप्न दाखवून राजकीय तमाशा करतो.


मागासलेल्या वर्गातील लाभार्थी जेव्हा सोयीसुविधांचा पुरेपूर वापर करून किमान दोन तीन पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जेव्हा तुल्यबळ होतात तेव्हा त्याच वर्गातील कायमस्वरूपी वंचित राहिलेले बाहेर फेकले जातात. उदाहरणार्थ एखाद्या जातीतीत मागासलेल्या कुटुंबातील पणजोबा, आजोबा, वडील जर सरकारी भरगच्च पगारदार नोकरीत असतील तर त्यांची पुढच्या पिढीला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी धडपड चालू असते. खरंतर अशा मंडळींमुळेच त्याच जातीतील संधी उपलब्ध न झालेली पिढी उपेक्षित राहते. तुलना केली असता समजेल की मागासवर्गीय क्लास वन अधिकाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आणि त्याच मागासवर्गातील शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी यात सर्वाधिक संधी कोणाला मिळणार? वंचित कोण राहणार? इथं समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे जिकरीनं लागू करणं गरजेचं आहे. त्यासाठी क्रिमी लेअर वगैरे तयार करण्यासाठी कायदेशीर रित्या कोर्टात ठरवलं जाईल. मात्र ते लागू करणं, अंगिकार करणं आणि स्विकारले जाणं या गोष्टी स्वयंप्रेरणेने येणं आवश्यक आहे. त्यासाठी कोर्टात, संसदेत मंजूरी होईल न होईल पण सार्वजनिक जीवनात ते स्विकारण्याची शक्यता कमीच. कारण आरक्षणाचा वापर हत्यार म्हणून झाला आहे. त्यासाठी सरकार दरबारी, राजकीय व्यवस्थेत लॉबिंग मजबूत केले जाते.  महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर अशीच व्यवस्था मजबूतीने उभी राहिली. त्यामुळे आधीच साधनसंपन्न असलेल्या मराठा समाजाला लौकिकार्थाने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. कालांतराने भाऊबंदकी जशी वाढली तसतशी संपत्ती विभागली गेली. सरासरी ३५% मराठा समाज महाराष्ट्रात जरी असला तरी ३०% च्या आसपास गरीब मराठा दशकांपासून वाढत गेला. त्यात याच दशकांत मागासवर्गीय आणि मराठेतर समाज बऱ्यापैकी आरक्षणाच्या लाभांमुळे सरकारी नोकरीत, राजकीय पटलावर स्थिरस्थावर झाला. अशा वेळी जेव्हा गावागावांत प्रबळ मराठा कुलीन घराण्याचे प्राबल्य कमी झाले आणि विखूरलेल्या मराठा कुटुंबातील आर्थिक आणि सामाजिक गोष्टींनी डोकं वर काढायला सुरुवात केली. अशा वेळी राजकीय धुरिणांनी आरक्षणाचा मुद्दा पेटवून आणि वरकरणी पटवून आपापले उपद्रवमूल्य किती आहे हे दाखवायला सुरुवात केली. महाराष्ट्रात रुढार्थाने भाजपा हा भटा-बामणांचा पक्ष म्हणून बाहेर पडून ओबीसीचा डीएनए असलेला पक्ष म्हणून उदयास आला तसतशी मराठांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली जाऊ लागली. राजकीयदृष्ट्या अजूनही मराठा समाज प्रभावी आहे. कधीकाळी तो सत्ताधारी पुरोगामी विचारांचा पाईक होता आता हिंदुत्ववादी विचारांचा कित्ता गिरवतोय. अशा परिस्थितीत बहुसंख्य मराठांच्या रोषाला ट्रिगर मिळाला तो कोपर्डी येथील अन्याय्यकारक घटनेचा. तिथून मग मूक मोर्चे निदर्शने झाली आणि मुख्य प्रवाहात मराठा आरक्षणावर झाडाझडती सुरू झाली. आता तर आम्हाला ओबीसीत घ्या नाहीतर बघा वगैरे वगैरे धमकीची भाषा बोलली जाऊ लागली. अर्थात झुंडशाही जशी वाढते तसा विचार, विवेक शून्य होतो आणि हिंसेला खतपाणी घालून आपापली इप्सितं साध्य केली जातात.


आम्ही परिस्थितीने वंचित, दुर्लक्षित झालो म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, ओबीसींच्या गटाचं पाहीजे, जमत नसेल तर संविधान बदला वगैरे मागण्या केल्या जातात. हे हास्यास्पद आहे. समजा भविष्यात ओबीसी मध्ये गेले आणि तरीही संधी मिळाली नाही तर काय एसटी एससी व्हीजेएनटी मध्ये घ्या म्हणून आंदोलन करणार का? दोन हाणा पण मागास म्हणा असं होत नसतं. संविधान अभ्यासलं पाहिजे. वाचून समजून आपण का त्यांच्या कक्षेत येऊ शकत नाही हे प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी मराठेतर समाजाला खूप कालावधी लागला. मात्र या कालावधीत गरीब मराठा समाजाला हाती काहीच लागले नाही. सत्तापिपासू मराठा लॉबी ही फक्त आणि फक्त आपला कुटुंबकबिला, बगलबच्चे आणि कार्यकर्ते लोकांना संधी कशी मिळेल यातच व्यस्त राहिले. त्यामुळे प्रस्थापित मराठा अजून श्रीमंत झाला. तर सर्वसामान्य गरीब मराठा हा कालांतराने विस्थापित होऊ लागला. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणता येणार नाही. कारण संविधानाच्या चौकटीत ते होऊच शकत नाही. जेव्हा शक्य होते तेव्हा जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. कारण तेव्हा मराठा समाज जर ओबीसी मध्ये आणला असता तर मराठा लॉबी ला राजकारणात मोठा पल्ला गाठाता आला नसता. सत्ता नसते तेव्हा बहुजन म्हणून मिरवायचे आणि सत्ता आल्यानंतर फक्त आणि फक्त मराठ्यांच्याच घराण्यात सत्ता टिकेल कशी हेच बघायचं. हेच काम आहे राजकारणातील सक्रिय मराठा लॉबीचे. आज कुणबी म्हणजे शेतकरी आहोत म्हणून ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे हे नियमाला धरून नाही. त्रिवार नाही. आज कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षण मिळवणारा समाज बऱ्यापैकी आस्तित्वात आहे. हाच समाज आज कागदोपत्री ओबीसी पण समाजात उजळमाथ्याने मराठा म्हणवून मिरवतो. ह्यांची संख्या लक्षणीय आहे. अर्थात ही कुणबी मराठा नोंद ब्रिटिशकालीन कागदोपत्रीच असल्याने राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये फायदेशीर झाली. मात्र ह्या नोंदी अपुऱ्या असल्याने मराठवाडा वंचित होता. मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्यापैकी प्राबल्य वाढलं ते ओबीसी समाजाचे. त्यात जून २०२५ च्या अखेरीस सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात एक जीआर काढला होता. तिथूनच मराठा आरक्षणासाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली असावी. कारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण राज्य सरकारने दिले आहे. त्याचा सर्वाधिक फायदा गरीब मराठा कुटुंबातील लोकांना झाला. हे असूनही आम्हाला गावपातळीवर प्रभाव पाडण्यासाठी काहीतरी कायदेशीर हक्काचे टूल हवे यासाठी तर हा आरक्षणाचा खेळखंडोबा केला नसावा? अर्थात हे प्रश्न आहेत उत्तरं ज्याने त्याने शोधावीत.


आरक्षणाचा आणि त्यासंदर्भातील तरतुदींचा पुनर्विचार करण्याची योग्य वेळ आलेली आहे. कारण मराठा आरक्षणावर आजवर जी आंदोलनं झाली ती एका तालुक्यातील एका खेडेगावात मर्यादित होती. नंतर हे आंदोलन जिल्ह्यात व्यापले गेले. आता ते डायरेक्ट राज्याच्या राजधानीत येऊन धडकले आहे. हे जर असेच चालू राहिले तर महाराष्ट्रात शेकडो जातीपातीच्या लोकांना स्फूरण चढेल. जो तो आम्हाला अमुक गटातून तमुक गटात घ्या नाहीतर तर बघा! अशी धमकीवजा आंदोलन होतील. आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. राजकीय नाही. आपल्याकडं एक बोगस व्यवस्था रुजली आहे जी राजकीय प्रश्न सामाजिक पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते, सामाजिक प्रश्न राजकीय पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते तर आपण आर्थिक प्रश्न भांडवलदारांच्या भरवशावर टाकून त्यावर काथ्याकूट करत बसतो. जर कोणत्याही असंविधानिक आरक्षणाच्या मागणीवर वेळीच योग्य ते उपाय केले नाहीत तर लिटमस टेस्ट म्हणून झुंडीच्या जोरावर हवं ते करवून घेऊ अशी नवीन कुचकामी संस्कृती जन्माला येईल. तीच लोकशाहीला घातक असेल. देशाचं सार्वभौमत्व फक्त कागदोपत्रीच राहील. जातीधारित आरक्षणाच्या कक्षेत अजून किती जाती वाढवणार? या देशात हजारोंच्या संख्येने जाती अस्तित्वात आहेत. त्यातील कित्येक प्रमुख जातसमुह एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी मध्ये विभागले गेले आहेत. बरं एखादी जात आरक्षणाचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात आली म्हणून आरक्षण नको म्हणून बाहेर पडली आहे का? मुख्य प्रवाहात म्हणजे प्रतिनिधित्व कोणत्या कोणत्या क्षेत्रात वाढलं? किती प्रमाणात आहे? जातीची लोकसंख्या तुलनेसाठी घ्यावी की इतर जातसमुह संख्या? तुलनात्मक दृष्टीने कशाचा आधार घ्यावा? अशी कोणती फूटपट्टी आहे का मोजमाप करण्यासाठी? जर लोकसंख्या वाढतेय म्हटल्यावर आरक्षणाचे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येणार त्या लाभार्थी लॉबीचीच. जसं सवर्ण लोकांनी सगळं कसं आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी मांड भक्कम करून ठेवली होती तशीच मागासवर्गीय कायमस्वरूपी लाभार्थी लॉबीचीच मक्तेदारी गटातटापुरती भक्कम झाली आहे. नुकत्याच युपीएससीच्या संदर्भात पूजा खेडेकर केस संदर्भात ह्याची प्रचिती आली आहे. हा मागासवर्गीय लाभार्थी 'मवर्ण' जर सगळे लाभ गिळंकृत करत असेल तर तळागाळापर्यंत लाभ पोचत नाहीत याला जबाबदार कोणाला धरणार? नुकत्याच सुप्रीम कोर्टाने यावर मागासवर्गीय क्रिमी लेअर वगैरे बाबत सरकारला आदेश दिले आहेत एका केस संदर्भात. यावर कार्यवाही होईल न होईल ते राजकीय फायदा तोटा बघून होईल. थोडक्यात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या संधी पोचल्या आहेत तर सामाजिक, राजकीय, आर्थिक संधींची कशा पद्धतीने पडताळणी केलीय याची शासनदरबारी कोणतीही प्रक्रिया नाही. केवळ राजकीयदृष्ट्या अजूनही वापर केला जातोय आरक्षणाच्या मुद्द्यांचा. यामुळे एकेक नेतृत्व जातीपातीच्या लोकांना उद्युक्त करतं. नंतर झुंडीच्या जोरावर हवं ते मिळालं नाही तर व्यवस्थेला बेजार करते. म्हणजे जातीपातीच्या राजकारणात सर्वपक्षीय नेते आपापल्या परीने जातीचं लॉबिंग मजबूत करण्यासाठी प्रामुख्यानं धडपडत असतात. हीच व्यवस्था कुचकामी आहे. कारण जातीपाती घट्ट पकडून स्थानिक राजकारणात प्रभाव पाडता येतो. मग हीच प्रयोगशाळा धर्माच्या राजकारणासाठी पाया मजबूत करते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे झेंडे मिरवणारे राजकीय नेते चाणाक्षपणे धर्माची पताका बेमालूमपणे फडकवू लागले. ही अधोगती झाली ही बाब लक्षात येत नसेल का? अर्थातच मनातून हतबलता असल्याने असे तडजोडीचे केविलवाणे निर्णय घेतले जातात. जनता भरडली जाते कारण जनतेला जातीपातीच्या विषाची मात्रा पचलेली असते. ह्या भेसूर भवतालामुळे संविधान, राज्यघटना वगैरे वर विश्वास वाढेल का कमी होईल? ह्या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून योग्य ती प्रक्रिया, नियम, दुरुस्ती न्यायालयाच्या आदेशानुसार संविधानाच्या चौकटीत संसदेने आमलात आणली पाहिजे. 


आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. मग लोकसहभागातून, त्या त्या जातीपातीच्या गटातटाचे नेतृत्व आणि मुख्य मागासवर्गीय आयोग यांनी पुढाकार घेऊन जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. आरक्षण हे हत्यार नाही, साध्य नाही फक्त साधन आहे कशासाठी तर समान संधी आणि सामाजिक न्याय मिळण्यासाठी. हे प्रबोधन करणं गरजेचं आहे. मेडिया प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक वा सोशल मीडिया वरील फ्रीलान्सर, इंडिपेंडंट पत्रकार ह्या सर्वांनी किमान सामाईक कार्यक्रम आखून विश्वसनीय एकी दाखवणं गरजेचं आहे. जसं युध्दाच्या वेळी सगळे प्रश्न, समस्या बाजूला ठेवून आपण सर्वजण देशासाठी एकत्र येतो तशीच भावना संविधानाच्या कक्षेत आरक्षणाच्या बाबतीत दिसायला हवी. अशा वखवखलेल्या समस्या आजूबाजूला पेटलेल्या असताना सामाजिक बांधिलकी टिकावी हीच अपेक्षा.


© भूषण वर्धेकर 

पुणे 

४ सप्टेंबर २०२५


शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

अस्थिर आशिया कोणाच्या पथ्यावर पडणार?


आशिया खंडातील ४८ देश आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार देश म्हणजे भारत चीन रशिया आणि जापान. त्यापैकी जापान देशाबद्दल नंतर चर्चा होईल. पण भारत, रशिया आणि चीन या देशांमधील घडामोडी आशिया खंडातील स्थैर्यासाठी फार महत्वाच्या आहेत. त्यातही मागच्या शतकातील अखेरच्या चार पाच दशकांत रशियाचे विभाजन होणं आशिया खंडातील अस्थिर राजकारणाची फार महत्त्वाची घटना होती. त्यापूर्वी ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देताना पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान देणं हेही तेवढेच महत्त्वाचे. आशिया खंडातील चार डझन देशाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास भूगोल बघितला तर कल्पना येईल की गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळात आशिया अस्थिर होणं हे क्रमाक्रमाने वाढत आहे. भारतीय उपखंडातील अस्थिरता अभ्यासाची असेल तर बंगालची फाळणी गेल्या शतकाच्या पहिल्या दशकात झाली ते आज एकविसाव्या शतकातील दोन दशकं उलटून गेल्यानंतरही बांग्लादेशात जे होतं ते जगाच्या इतिहासातील फार महत्वाचे पर्व आहे. कारण संपूर्ण जगाचा विचार केला तर पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या आशिया खंडातील आहे. तर तीस टक्क्यांच्या आसपास पृथ्वीवरचा भूभाग आशिया खंडाने व्यापलेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आशिया खंडातील स्थैर्याचे आणि अस्थिरततेचे पडसाद खूप मोठे आहेत. बरेचदा बाह्य हस्तक्षेपामुळे तर कधीतरी अंतर्गत कुरबुरी वाढल्यामुळे आशिया खंडात अस्थिरता निर्माण होते. कित्येक अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी यावर चर्चा केल्या आहेत. शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. बरीचशी उत्कृष्ट दर्जाची पुस्तके उपलब्ध आहेत. (ऐसी अक्षरे वर हा धागा सुरु करण्यासाठी सध्याच्या बांग्लादेशात होत असलेल्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे.) अस्थिर आशिया नेमकं कोणासाठी वरदान आहे किंवा कोणासाठी शाप यावर चर्चा व्हावी हा शुद्ध हेतू या धाग्यामागे आहे.

भारताच्या बाजूला असणारे छोट्या देशातील अस्थिरता ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. कारण आजूबाजूच्या देशातील अस्थिरता ही नेहमीच आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय दळणवळण आणि व्यवहार, व्यापार व गुंतवणूक यावर प्रभाव टाकत असते. यावर सोशोइकोपॉलिटिकल क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची निरिक्षणं फार महत्त्वाची. यात कॉन्स्पीरेसी थिअरीज् पुष्कळ आहेत. त्यात काही बाष्कळ व उथळ असतात. ‌भारताच्या एकूण परिस्थितीत या घडामोडींमुळे काय बदल होतील हे बघणं गरजेचं आहे. आग्नेय आशियातील दरवाजे इशान्य भारतातून जातात. तिकडेच भारताची जवळपास चार हजार किलोमीटरची सीमारेषा लागून असलेल्या बांग्लादेशात धुसफूस सुरू आहे. त्यातही आशिया खंडातील सर्वात जास्त प्रभावशाली रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट लोकांचा खूप मोठा गट अशांतता निर्माण करत आहे. त्यांच्या मागे जे कटकारस्थान करणारे देश संघटना असतील त्यांना काय हवं नको त्यावर या अनुषंगाने चर्चा करता येईल.
भले त्यामागे छुपा चीन किंवा अमेरिकेचा पाठींबा असेल! कॉन्स्पीरेसी थिअरी आहेत बऱ्याच. पण संशोधन करून मांडणी केली असेल तर त्यात तथ्य आहे. आशिया खंडात हिंदू, बौद्ध पण सर्वात जास्त आहेत त्यांनी कधी एवढी भयानक कट्टरता दाखवली नाही की आशिया खंडातील स्थैर्य डगमगेल. ती योग्यता इस्लाम मधील कट्टर पंथीय लोकांची. कारण धर्माच्या नावाखाली जिहादी प्रवृत्ती तयार होणं आणि त्यांना आपापल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरणं ह्याचे प्रयोग आशिया खंडात बरेचदा झाले. मुख्य अशा वेळी त्यांना खतपाणी घालण्यासाठी देशांतर्गत संधी वा निमित्ते मिळतात. हे सूचक आहे. सोप्या पद्धतीने मांडायचे झाले तर दुसऱ्याच्या भांडणात तिसरा छुपा लाभार्थी दडलेला असतो. तसा आशिया खंडातील अस्थिरता कोणाच्या तरी नक्कीच पथ्यावर पडत असणार! 

खूप महत्त्वाची गोष्ट घडत आहे शेजारच्या देशात सत्तांतर झाल्यानंतर. ती म्हणजे फ्रंट वर येऊन जमात-ए-इस्लामी संघटनेचचा सक्रीय सहभाग. या संघटनेला पाकीस्तातून रसद मिळते हे सर्वश्रुत आहे. चीन सुद्धा कट्टर पंथीय रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट आपल्या देशात तयार होणार नाही याची दक्षता घेतो. तर दुसरीकडे आजूबाजूच्या देशात शिरकाव करण्यासाठी अशा संघटनांचा वापर करता येईल का किंवा कर्जबाजारी करून छोट्या देशांना आपल्या इशाऱ्यावर कसे नाचवता येईल याचा पुरेपूर दक्षता घेतो. चीनधार्जिणी एक गट भारतात नेहमीच सक्रिय असतो. याबाबतीत चीन भारत संबंध यावर संशोधन करणारे प्रकाश टाकू शकतील. बारकाईने विचार केला तर भारतात कट्टरपंथी इस्लामी संघटना कैक आहेत. जमात-ए-इस्लामी संघटनेचे छुपे पाठीराखे बंगाल, आसाम मध्ये असल्याचे गुप्तचरांनी सांगितले आहे. थोडक्यात माहिती जमात-ए-इस्लामी बद्दल. १९४०-४१ च्या दरम्यान अबुल अल मौदुदी यांनी ह्या संघटनेची स्थापना भारतात केली. या संघटनेची उद्दिष्टे म्हणजे इस्लामिक तत्त्वांनुसार समाज उभा करणे. ह्याच संघटनेचे सेक्युलॅरिझम आणि लोकशाही बद्दल काय विचार आहेत हे जाणकारांकडून समजून घ्यावेत. म्हणजे अशी कट्टर संघटना बांग्लादेशात फ्रंट वर येऊन कार्यभाग साधणे आहे. भविष्यात बांग्लादेशातले येणारे सरकार यावर बंदी आणू शकते दिखाव्यासाठी. पण भारतीय मुस्लिम समाजात अशा कट्टर पंथीय लोकांचे विशेष इंटरेस्ट दडलेले असतात. उदाहरणार्थ शंभर टक्के साक्षर असलेल्या केरळमध्ये पी.एफ.आय नावाची संघटना आहे. तिने काय काय कारनामे केले आहेत हे जगजाहीर आहे. आयसीसचे धागेदोरे तर केरळमध्ये मिळालेले आहेतच. बंगाल आणि आसाम मध्ये अनधिकृत निर्वासित मुस्लिमांचे प्रश्न कैक वर्षे अस्तित्वात आहेत. म्हणजे मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्य झाली की कट्टर पंथीय लोकांचा उपद्रव वाढू लागतो. इस्लाम मधील कट्टरता वाढली की हिंसक रुप घेते हे जगाला समजलं आहे. जिहादी प्रवृत्ती कशी भयानक अमानवी कृत्य करते हे जगाला दाखवलं आहे वेळोवेळी. संख्यात्मक वाढ झाली की कट्टरता वाढण्याची कारणं काय आहेत यावर चर्चा व्हावी. विचारवंतांनी जनजागृती करावी. जगभरात पन्नास पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत. त्यापैकी किती स्वतःला लोकशाही वादी सेक्युलर देश म्हणून प्रोजेक्ट करतात? काही अपवाद सोडले तर कोणते मुस्लिम देश इस्लामिक न म्हणता सेक्युलर म्हणवून घेतात? अर्थातच हा कळीचा प्रश्न आहे. गेल्या काही दशकांत कट्टरता वाढू लागली. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसरीकडे उजव्या लोकांची कट्टरता वाढली. उदाहरणार्थ म्यानमार मध्ये राखाईन प्रांतातून रोहिंग्यांना हाकलून दिले. तसंही मुस्लिम समाजातील शिया, सुन्नी आणि अहमदिया वगैरे पंथांचे अंतर्गत कलह चालूच आहेत. मूळ प्रश्न इस्लाम कट्टरता वाढण्याबद्दल आहे. बहुसंख्य झाले की अल्पसंख्याक लोकांना छळ सहन करावा लागतो. हे बांगलादेशातील घटनेने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. आधी भारतात काश्मीर मध्ये दिसलं. पाकिस्तान मध्ये काय होतंय ते जगात प्रसिद्ध आहेच. याकडे नेहमीच हिंदू मुस्लिम, गुड मुस्लिम बॅड मुस्लिम, सहिष्णू हिंदू कट्टर हिंदू वगैरेंच्या दृष्टीने चर्चा, वादविवाद, मंथन होत राहणार. भारतात तरी हिंदू मुस्लिम हा चघळला जाणारा प्रश्न सृष्टीच्या अंतापर्यंत टिकणार आहे.

भारतात भविष्यात व्होट बँक जपण्यासाठी अशा कट्टर इस्लामी संघटनेला राजकीय पाठींबा देणारे पक्ष पण पुढे येतील. काही सुविद्य पुरोगामी भाजपा संघ यांना उल्लेख करून काउंटर प्रतिक्रिया देत राहतील. २००२ मध्ये झालेली गुजरात दंगल असो वा १९८९-९० घ्या काळात काश्मीरमध्ये पंडितांना जे सहन करावे लागले त्या घटना. हे सर्वाधिक सेलेबल इव्हेंट आहेत. ज्याने त्याने वाटून घेतलेले. शंभरपेक्षा जास्त सेलिब्रिटी लोकांचे निषेधाचे टुलकिट म्हणजे 'ऑल आईज ऑन राफा' किंवा 'सेव्ह गाझा' याविषयी बोलणारे निषेध नोंदवणारे बांग्लादेशात हिंदूंना जे सहन करावे लागले त्यावर का बोलत नाही यावर सध्या हिंदुत्ववाद्यांनी आघाडी घेतली आहे. इस्राएल ला शिव्या देणाऱ्या संघटना, विचारवंत वगैरे बांग्लादेशात जे घडतेय त्यावर का बरं बोलत नाहीत वगैरेंचा महापूर सोशल मीडियावर आला आहे. गंमतीचा भाग म्हणजे कधीकाळी रोहिंग्यांना आश्रय द्या म्हणणारी त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारी मंडळी, बांगलादेशातील हिंदू निर्वासित लोकांना भारतात आश्रय दिला तर समस्या निर्माण होतील म्हणून फेसबुकवर पोस्टी खुरडत आहेत. मुस्लिम समाजाचे कितीतरी विचारवंत इस्लाम धर्म शांततेचा पुरस्कार करतो, प्रचार प्रसार करतो म्हणून व्याख्यानं देतात. लिहितात. मुस्लिम सत्यशोधक चळवळीत कित्येक हुशार विचारशील मंडळी आहेत. ते नेमकं सध्या कशाची वाट बघत आहेत? 
असो. त्यांचे जे काही तर्क असतील त्यांच्यापाशी. 'गंगा जमुना तहजीब' मातीमोल होण्यास दोन्हीकडील मंडळी जबाबदार आहेत. त्यामुळे ही न संपणारी चर्चा आहे. तूर्तास इतकेच. 

जसा इस्लामी कट्टर पंथीय संघटनेचा/लोकांचा वापर आशिया खंड कसा अस्थिर राहील यासाठी होतो. तसाच आशियाई देशांमध्ये एकाधिकारशाही वाढल्याने अंतर्गत कलह कुरबुरी वाढू लागतात यांचाही परिणाम होत असावा. बांग्लादेशात जे घडलं त्यांचे आर्थिक कारणं जशी आहेत तसेच राजकीय कारण पण आहे. लोकशाहीचा बुरखा घालून एकाधिकारशाही हुकुमशाही सत्ता टिकवणं महागात गेले. हॅपीनेस इंडेक्स, वाढललेला जीडीपी, टेक्सटाइल उद्योगवाढ वगैरे जमेच्या गोष्टी धुळीस मिळाल्या. म्हणजे भारताच्या आजूबाजूला ज्या देशात राजकीय उलथापालथ होते, उदाहरणार्थ पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका वगैरे त्यांचे परिणाम येनकेनप्रकारेन भारतावर होणार हे निश्चित. विशेषतः इशान्य भारताचा इतिहास भूगोल बघितला तर आग्नेय आशियातील किमान डझनभर देश भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत. व्यापार, रस्ते, समुद्री मार्ग यावर लक्ष केंद्रित केले तर खूप मोठी बाजारपेठ भारताच्या प्रभावाखाली येईल. या छोट्या देशांना चीनपेक्षा भारताबद्दल जास्त विश्वास असेल. चीनची विस्तारवादी भुमिका जगजाहीर आहे. आशिया खंडातील सगळ्यात जास्त हॅपनिंग जे जे घडतं ते ते भारताच्या आजूबाजूला घडतं हे विशेष. या आधी अखंड रशियाचे तुकडे केले. आता पुतिनबाबा वडिलोपार्जित संपत्ती भावकीने लाटली म्हणून भावकीवर हल्ले करू लागलाय. ते एक तर्कट फार गुंतागुंतीचे आहे. युक्रेनच का? या प्रश्नाचे उत्तर शोधणं रंजक आहे. तसंच पानीपत का? या प्रश्नाचे उत्तर शोधणं रंजक असेल कारण तत्कालीन उत्तर भारतात ज्या महत्वाच्या लढाया झाल्या त्यात पानीपत महत्त्वाचे ठिकाण होते. (१५२६, १५५६ आणि १७६१ च्या लढाया) असो विषयांतर नको. पण आधी रशिया डळमळीत झाला आणि त्याचे फायदे आंतरराष्ट्रीय पातळीवर इतरांना भरपूर झाले. तसे भारताच्या आजूबाजूला देशातील अशांतता कोणाच्या पथ्यावर पडत असावी?

पाकिस्तान, भारत आणि बांग्लादेश हे एकाच भूभागाचे केलेले तीन तुकडे. यातील व्यापार, उद्योग व्यवसाय गुंतवणूक, राजकीय स्थैर्य आशिया खंडातील सर्वात महत्त्वाचे व्यवहार आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य वेगळं होतात, स्वायत्तता हवी असते म्हणून पण प्रत्यक्षात वेगळं होऊन प्रगती केली तर ठिक. अधोगती झाली तर वेगळं होण्यासाठी आटापिटा कशासाठी केला हा यक्षप्रश्न आहे. आज पाकिस्तान आणि बांगलादेश महत्वाचे शेजारी जर गटांगळ्या खात असतील तर त्यांच्या मागे नेमकं कोण आहे आणि त्यांच्या सुप्त इच्छा काय आहेत? हे शोधणं महत्वाचे. त्यांच्या अस्थिरतेचा आपल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गोष्टींवर काय परिणाम होणार हे बघणं पण तेवढंच जिकिरीचे. 

(एकूणच आशिया खंडातील देश आणि त्यांच्या सर्वसमावेशक व्यवहारांवर रूटलेज(टेलर ऍन्ड फ्रान्सिस ग्रुप) पुस्तकांची सिरिज अभ्यासली जाते. शिवाय ए.आर.आय एशिया रिसर्च इन्स्टिट्यूट ची स्प्रिंजर सिरिज पण महत्वाचे दस्तऐवज आहे आशिया खंडातील घडामोडींची माहिती घेण्यासाठी. मॅकमिलन एशियन हिस्ट्री वर पण महत्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या बद्दल मराठी मध्ये लिखाण तुरळकच. जे काही असेल ते पाठ्यपुस्तकी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमानुसार. जाणकारांनी मराठी मधील साहित्य, पुस्तके असतील तर नक्कीच सांगावीत.)

© भूषण वर्धेकर 
९ ऑगस्ट २०२४
पुणे

शनिवार, ६ जुलै, २०२४

आरक्षणाच्या बैलाला ऽ ऽ ऽ

त्याचं असं झालं, समाजाचं एकदमच बिनसलं
जातीपाती एकवटल्या, आरक्षणाला कंटाळून
संगनमताने सर्वांनी एकच ठराव केला संमत
आम्हाला करा ब्राह्मण, तरच सोडू आरक्षण

एकीकडे प्रत्येकाला पाहिजे होती ब्राह्मण जात
आरक्षणाच्या ठेकेदारांना पटत नव्हते अजिबात
जातीपातीच्या राजकारणाचे नेते झाले उदास
सगळेच झाले ब्राह्मण तर चालणार कसे दुकान

वाटलं होतं सुटेल पेच, पुढ्यात होती खरी मेख
ब्राह्मणात नक्की कोण, होत्या डझनभर शाखा
सगळे ब्राम्हण एकदम, आंदोलनात आले थेट
आधी सांगा कोणते ब्राह्मण, मग ठरवा कोटा

चित्पावन, देशस्थ, कऱ्हाडे की कायस्थ 
सारस्वत चिडले, का आम्हाला वगळता!
सर्वात आधी ठरवा, गौड की द्राविडी 
लगेचच यजुर्वेदींनी मांडल्या पोटजाती 

तेवढ्यात आले देवरुखे, खोत आणि खिस्ती 
सोबतीला होते कनौजी, दैवज्ञ आणि कानडी
अय्यर सरसावले तोच, नंबुद्रींचा वेगळा नारा
कोकणस्थ झाले सावध, देशस्थ उठले भराभरा

शेवटी कोटा ठरवण्यासाठी ठरली बैठक
उत्तरेतील पंचगौड, की दक्षिणेचे पंचद्रविड
नंतर मांडून पोटजाती ठरवा क्रीमी लेअर 
शिक्कामोर्तब होऊन कोटा झाला सूकर

लिखित पाहिजे म्हणून ठरले एकछत्री सूत्र 
तेवढ्यात आला प्रश्न, कोणतं घ्यायचं गोत्र
तयार होत्या वंशावळी, मात्र अडले सगेसोयरे 
बैठक झाली सैरभैर, त्यात काही कावरेबावरे 

नुसत्याच झाल्या चर्चा, वाद थोडी हमरीतुमरी
कागदोपत्री प्रत्यक्षात मात्र दिखावा एकसूरी
कोकणस्थांनी कानोसा घेऊन साधला निशाणा
आम्ही आहोत तुमच्यासोबत सांगून देशस्थांना

अय्यर लढून तीस टक्क्यांत झाले होते मातब्बर 
नंबुद्रींना होता कमी वाटा तरी झाले धीरगंभीर 
कनौजींचा प्रश्न मैथिल उत्कल ब्राह्मणांचं काय?
ठरलं होतं खरं, सगळे एकच ज्याला पवित्र गाय

एवढं सगळं बघत बघत आंदोलक झाले त्रस्त 
जातीपातीच्या प्रश्न समस्या ह्या पेक्षा अस्तव्यस्त
म्होरक्या होता बेरकी, सोबत अनुभवी प्रशासन
आली हळूच मागणी, होऊ दे बहुजन ब्राम्हण

सगळे झाले खूष बघून नवीन होणारी शाखा
वाचल्या आपापल्या पोटजाती अन् उपशाखा 
बहुजन ब्राम्हणी कुळाचार अन् रूढी, परंपरा
यांचेही झाले पाहिजे शासन नोंदणी गोषवारा 

सरतेशेवटी ठरलं काढा घटनात्मक श्वेतपत्रिका 
सगळ्या गोतावळ्यांनी घेतल्या आणाभाका
जे सांगू ते खरं सांगू कागदी पुराव्यानिशी नोंदवू
तडीपार करा कोणी सापडला आमच्यात भोंदू

शासकीय हस्तक्षेप होताच उभा नवीन पेचप्रसंग
घटना कलम, परिशिष्टे पारायणे झाली यथासांग 
बहुजन ब्राम्हण साठी नोंदणीकृत नव्हती तरतूद
आणा दुरुस्ती विधेयक किंवा काढून वटहुकूम

पाच वर्षे सरली, अर्धवट ठेवून श्वेतपत्रिका
सर्वपक्षीय लोकांना दिसू लागल्या निवडणुका
एकाएकी घटना बदलणार,  ठोकली आरोळी
चाणाक्षांनी घेतली भरून आपापली झोळी

येत्या अधिवेशनात येऊन सत्तेत दिले आश्वासन 
करू नोंदणीकृत घटनात्मक बहुजन ब्राम्हण
तोवर जातीपातीच्या नेत्यांनी गाजवली भाषणं
'तरच सोडू आरक्षण' चं वाजत राहिलं तुणतुणं 

© भूषण वर्धेकर 
५ जूलै २०२४
पुणे 

२ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू केले लिहिणं 
५ जूलै २०२४ रोजी पूर्ण केले 

मंगळवार, २१ मे, २०२४

मोदीस्तोमाची दशकपूर्ती


सप्टेंबर २०१३ मध्ये तत्कालीन भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती. त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी राजकारणात हळूहळू मोदीकेंद्रीत होऊ लागल्या. याचा फायदा भाजपाला झालाच पण तोटाही भाजपालाच झाला. कारण भाजपाप्रणित मोदी की मोदीप्रणित भाजपा याचे द्वंद्व निर्माण झाले. भाजपाला आजपर्यंत हुकुमी एक्का मिळाला नव्हता सत्तेवर येण्यासाठी. तो मोदींच्या रुपाने मिळाला. कालांतराने मोदींनी आपली पक्षावरची पकड अजून मजबूत केली. राजनाथसिंह यांच्यानंतर अमित शहा यांच्याकडे भाजपाची सूत्रे आल्यानंतर एका वेगळ्या धाटणीचे मॉडेल भाजपाने डेव्हलप केले. साम दाम दंड भेद याचा पुरेपूर वापर पक्षबांधणी आणि सत्ता समीकरणात झाला. राजकीय पक्ष व्यावसायिक पद्धतीने कसा चालवायचा हे मोदी शहा जोडगोळीने दाखवून दिले. याचा परिपाक म्हणजे मोदीकेंद्रीत राजकारण खूप भक्कम झाले. त्यात टिनपाट विरोधकांनीही कोणत्याही समस्येसाठी मोदींच्या नावाने शंख करणे सुरू केले. त्याचा फायदा भाजपा का नाही करणार? यामुळे गेल्या दहा वर्षांत मोदींच्या प्रभावाचा ग्राफ वाढत गेला आणि भाजपाला राष्ट्रीय राजकारणात व्यक्तीकेंद्रित अवकाश मिळाला. आजपर्यंत असा व्यक्तीकेंद्रित अवकाश फक्त कॉंग्रेसच्या काळात गांधी कुटुंबातील सदस्यांना मिळाला होता. प्रादेशिक पक्षांचे तसे राजकारण व्यक्तीकेंद्रित असते पण त्याची भौगोलिक मर्यादा असते. आपण भारतीय लोक एकाप्रकारे व्यक्ती किंवा चेहऱ्यावर भाळणारी गुलामाची फौज आहोत. लोकशाहीचा प्रचार प्रसार प्रसिध्दी करण्यासाठी अशाच चेहऱ्यांची भारतात नितांत गरज असते. भाजपाच्या चाणाक्ष लोकांना हे चांगलेच समजलं होते. पण वाजपेयी अडवाणी वगैरे नेत्यांना तसं ग्लॅमर मिळाले नाही. भाजपाचे नेटवर्क वाढवण्यासाठी वाजपेयी अडवाणी यांच्या काळात जे प्रयत्न झाले त्याचे सर्वात मोठा लाभार्थी म्हणजे मोदी. मोदींच्या राजकारणाची सुरुवात गुजरात मध्ये झाली असली तरीही त्यांचा लोकसंपर्क ठेवण्याची सुरूवात (सार्वजनिक जीवनात हा शब्द जाणीवपूर्वक टाळला आहे) ही संघाचे प्रचारक म्हणून सुरू झाली. संघ प्रचारक नेमकं काय करतात जनसंपर्क कसा करतात याचा थोडा अभ्यास केला तर समविचारी लोकांना एकत्र आणून संघटनेचे कार्यकर्ते कसे तयार होतात हे समजतं. मोदी ज्या काळात प्रचारक होते तो काळ कॉंग्रेसप्रणित सरकारांचा होता. त्यावेळी जनतेमध्ये एक प्रकारची चीड सरकारबद्दल होती. ती चीड आणि नाराजी लोकांना विद्यमान सरकारच्या विरोधात कशी मतांमध्ये रूपांतरीत करायची यासाठी लोकसंपर्क असणं खूप गरजेचं. तो काळ मोदींनी जवळून बघितला. त्याचा फायदा मोदींना दिल्लीत प्रवक्ते झाल्यावर झाला. नंतरच्या काळात गुजरात मध्ये मुख्यमंत्री म्हणून दमदार कामगिरी करण्यासाठी हाच लोकसंपर्क उपयोगी पडला.


मोदींना डिझास्टर मॅनेजमेंटचा एक वेगळाच अनुभव आहे. गुजरातमध्ये झालेल्या दंगली किंवा भूकंपाचा तडाखा बसल्याने झालेली वाताहत या प्रसंगी मोदींमध्ये असलेले संघटन कौशल्य आणि लोकसंपर्क उपयोगी पडले. १९७९ साली मोरबी येथे पूर आला होता मच्छू नदीत तेव्हा मोदी ऐन तीशीत धडपडणारे कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या कामाची खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे मोठा जनसमुदाय बाधित झालेल्या परिस्थितीची हाताळणी कशी करावी हे मोदींना व्यवस्थितपणे समजते. त्यात चुका होतात त्या भरून काढल्या जातात. ही रीतच आहे नेतृत्व घडण्याची. मोदींच्या राजकारणाची खरी मेख ही आहे की 'हे फक्त मोदीच करु शकतो' असे नॅरेटिव्ह सेट होणं. त्या बळावर ३७० कलम, राममंदिर आणि नोटबंदी सारखे धाडसी निर्णय घेतले गेले. बऱ्याच वेळा मोदींना महत्त्वाच्या निर्णयांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे हे काही प्रमाणात जमलं नाही कारण तसा केंद्रीय राजकारभाराचा अनुभव कमी पडला. पण या सगळ्यात मोदींची क्रेडिबिलिटी ही कमिटमेंट डिलीव्हरी करणारा प्रधानसेवक ही उभी करण्यात भाजपाला जमलं. कदाचित जनतेला त्याची भूरळ पडली असावी. मोदींच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे विरोधकांमध्ये जे हुकुमी एक्के आहेत,  निवडून येण्याची क्षमता असलेले नेते आहेत त्यांना गोड बोलून, प्रसंगी धमकावून पक्षात घेऊन पक्षबांधणी मजबूत करणे आणि संख्यात्मक बळ वाढवणं ही कॉंग्रेसच्या काळातील आउटडेटेड खेळी मोदी देशसेवेसाठी कटिबद्ध वगैरे म्हणत सहजपणे करतात. आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून ज्या खाचाखोचा पळवाटा आहेत त्या बरोबर वापरण्यात भाजपाला मिळालेली संधी मोदींसाठी फायद्याची पण आहे. तशीच डोकेदुखी ठरणारी पण आहे.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५० ते १९७० , १९७० ते १९९० हे कालखंड कॉंग्रेसच्या बाबतीत फार महत्त्वाचे आहेत. पहिल्या कालखंडातील दोन दशकांत कॉंग्रेस मजबूत होती. दुसऱ्या कालखंडातील दोन दशकांत कॉंग्रेस ढासळू लागली. १९९० ते २०२४ या पंचवीस वर्षांत कॉंग्रेसच्या एकूणच संघटनेचे कुटुंबकबिल्यामुळे जे नुकसान झाले ते पुढच्या काळात लवकर भरून येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. याच्या उलट आताचा भाजपा किंवा तत्कालीन जनसंघ, जनता पार्टी वगैरेचा कालखंड जर बघितला तर लक्षात येईल की १९५० ते १९७०, १९७० ते १९९० आणि १९९० ते २०२४ भाजपा हा मजबूत होत गेला. पहिल्या कालखंडातील दोन दशकांत जनसंघ हा सनातन हिंदु धर्म वगैरे या जंजाळात अडकला होता. जनाधार तर अजिबातच नव्हता. १९७० ते १९९० हा काळ खऱ्या अर्थाने भाजपाच्या जडणघडणीचा. कार्यकर्ते तयार करणं, लोकसंपर्क वाढवणं, लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर विचार करायला भाग पाडणं. सत्ताधाऱ्यांच्या ऐवजी आम्ही कसे सक्षम आणि भक्कम पर्याय आहोत हे पटवून देणं ही महत्वाची संघटनेची पायाभरणी त्या काळात झाली. १९९० ते २०२४ मध्ये भाजपाने कधी नव्हे ते न भूतो न भविष्याति असे यश संपादन केले. हा भाग झाला संघटनेच्या संघटन कौशल्य उभारण्याचा. मात्र संघटनेच्या माध्यमातून जेव्हा व्यक्तीकेंद्रित राजकारण आणि व्यवहार सुरू होतात तेव्हा मात्र पक्ष हा संपू लागतो. वैयक्तिक विचारधारा बिंबवली जाते. कॉंग्रेसच्या बाबतीत गांधी कुटुंबातील सदस्य हेच सर्वस्व होते. तसे भाजपात मोदी शहा ही जोडगोळी संघटनेला सापडली. भारतीय जनमानसात व्यक्तीपूजा अग्रभागी आहे. यामुळेच भारतात महापुरुष झाले भरपूर पण अनुयायांनी केलेल्या व्यक्तीपूजेच्या हव्यासापोटी महापुरुषांचे महत्त्व कमी झाले. भाजपाने या बाबतीत वेगळे धोरण अवलंबिले. मोदी हे हुकुमी एक्का झाले की भाजपातील संघटनेचे चाणाक्ष सत्ता कशी टिकेल यावर काथ्याकूट करू लागले. त्यासाठी साम दाम दंड भेद होते आणि अमर्यादित सत्ता. वाजपेयी अडवाणी यांना सत्ता टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी जमलं नाही. मात्र मोदी, शहा या द्वयींनी ते करून दाखवलं. 


गेल्या दशकात भारतात बऱ्यापैकी महत्वाचे बदल झाले. त्यात कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला पण त्यावर मात करण्यात आली. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे प्रश्न निर्माण तयार झाले असले तरी हीच लोकसंख्या भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या विभागलेली असल्याने त्या प्रश्नांची, समस्यांची तीव्रता जाणवत नाही. हे भाजपाला चांगले समजले म्हणून उत्तर भारतात भाजपाने या दशकात मजबूत बस्तान बसवलं. आता त्यांचा मोर्चा दक्षिण भारतात वळाला आहे. यामध्ये मोदी प्रतिमेचा सर्वाधिक उपयोग होणार हे निश्चित. भारतात संविधानाच्या चौकटीत राहून देश जसा मजबूत करता येतो तसा सत्ताधारी पक्ष ही मजबूत होतो. भाजपाने या दोन टर्ममध्ये पक्ष संघटना वाढीसाठी जेवढे प्रयत्न केले त्यापेक्षा जास्त प्रयत्न देश चालवण्यासाठी भाजपा कसा खमका आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न केले. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पाकीस्तानात केलेले सर्जिकल स्ट्राईक. पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडी निंदा, तीखी निंदा वगैरे करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्जिकल स्ट्राईक होणं हा अनुभव देशवासीयांसाठी खूप वेगळा आहे. त्यांचं क्रेडिट खरंतर सैन्याला दिलं पाहिजे पण भाव खाऊन गेले ते मोदी. २०१९ ला या सर्जिकल स्ट्राईक चा मतदानावर प्रभाव पडला ते निकालानंतर समजलं. त्यातही विरोधकांनी नेहमीप्रमाणे पुरावे दाखवा कार्यक्रम सुरू केला नंतर मोदींनी विरोधकांचा कार्यक्रम केला. २००४ ते २०१४ या दशकांत भारतात दहशतवादी हल्ले भरपूर प्रमाणात झाले. २००८ चा हल्ला सर्वात मोठा होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्वात नामी संधी देशाला मिळाली होती पण ती गमावली. एवढं सगळं होऊनही जनतेने कॉंग्रेसच्या पारड्यात २००९ ला सर्वाधिक खासदार निवडून दिले. म्हणजे जनता सक्षम कारभार करण्यासाठी सरकार देते हे सिद्ध झाले. त्याची पुनरावृत्ती २०१९ ला जनतेने भाजपाला पुन्हा सत्तेवर आणून केली. 


२०२४ च्या निवडणुकित खूप महत्त्वाचे प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. पण त्याची व्याप्ती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विरोधक कमी पडले. याचं कारण म्हणजे विरोधकांना अजूनही विरोधक म्हणून कामं कशी करायची हे समजलं नाही. जे जे विरोध करतील ते ते इडी सीबीआयने दडपले म्हणून कोल्हेकुई सुरू होते. मात्र विरोधकांना एकही नेता असा मिळू नये जो कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकणार नाही हे विरोधकांचे दूर्दैव. दुसरं म्हणजे सलगपणे १० वर्ष जर सत्तेबाहेर राहिलो तर आपापली संस्थानं सांभाळायची कशी या विवंचनेत कित्येक जहागिरदार विरोधक सरळसोट सत्तेत सहभागी होण्यासाठी आतुरतेने भाजपाला जाऊन मिळाले. यात भाजपाने सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांना पवित्र केले. काहींना मंत्री बनवून निवडणुकीत संख्या कशी वाढेल याची तजवीज केली. कारण जनता भ्रष्टाचार होतोय म्हणून रोष व्यक्त करते पण निवडणुकीत मात्र परंपरागत चालत आलेल्या नेत्यांना भरभरून मतदान करते हे भाजपाला ठाउक आहे. त्यामुळे वॉशिंग मशीन भाजपाचा उदय झाला. यामध्ये सर्वाधिक डोकेदुखी वाढली ती विकल्या जाणाऱ्या आमदारांची. जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही पक्ष सोडला वगैरे बाता मारायचा काळ संपला. जनतेला समजतं कोण कीती पाण्यात आहे ते. मात्र सत्ता सगळी पापं पवित्र करते म्हणून असे चुकार प्रयोग खपतात. नंतर जम बसवला की सत्तेतील पक्षच अशा नेत्यांना खपवतात. जनतेवर अजूनही स्थानिक पातळीवर राजकीय कुटुंबातील सदस्यांचे गारुड आहे. पणजोबा आजोबा पोरगा नातू वगैरे पिढ्यानपिढ्या मतदारसंघात निवडणूक लढतात दरवेळी तीच तीच आश्वासने तेच तेच मुद्दे हे बदलण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे भाजपाने तालुक्यातील वजनदार नेते मंडळी पक्षात घेऊन पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. याचा तोटा कार्यकर्ते लोकांना झाला. वर्षानुवर्षे ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासाठी लढण्याची नामुष्की ओढवली. ही मोदींच्या भाजपाला भविष्यात डोकेदुखी ठरणारी आहे. कारण भाजपाचा मतदार बांधील नाही. कॉंग्रेसचा एक मतदार वर्ग कायमस्वरूपी बांधील असतो. तसा भाजपाचा होऊ शकत नाही. कारण कॉंग्रेसकडे एक ऐतिहासिक लीगसी इको सिस्टिम, तयार केलेली व्यवस्था आहे. तीच गावपातळीवर कॉंग्रेसच्या लोकांना बांधून ठेवते. भाजपाची सुरूवात भट बामण शेठजींचा पक्ष म्हणून झाली असली तरी ओबीसींच्या कल्याणासाठी काम करणारा पक्ष म्हणून उदयास आला. याला कारणीभूत आहेत दोन गोष्टी एक मंडल आयोग दुसरा बहुजनांचे हिंदुत्व. बहुजनांना पुरोगामी छत्राखाली आणणं सहज शक्य होते पण अल्पसंख्याकांचे लांगूनचालन नडलं. तेच भाजपाने हेरलं आणि सर्वसामावेशक हिंदुत्व म्हणून हातपाय पसरायला सुरुवात झाली. 


कॉंग्रेसच्या काळात सुरुवातीला बलाढ्य असणारी पक्षसंघटना हळूहळू कमकुवत होत गेली ती प्रादेशिक गटबाजीमुळे. कॉंग्रेसमधून फुटून प्रांतीय अस्मिता, सत्तातुर नेत्यांच्या प्रकट इच्छा यामुळे प्रादेशिक पक्षांचे वजन त्या त्या भौगोलिक प्रदेशात वाढले. बांडगुळासारखे जगणारे हे पक्षच कॉंग्रेसला कमकुवत करू लागले. शेवटी राज्यातील राजकारणातून ह्याच प्रादेशिक पक्षांची मक्तेदारी एवढी वाढली की कॉंग्रेस नेस्तनाबूत झाला. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल, दक्षिणेकडील राज्ये. हा सर्वंकष इतिहास माहित असल्याने भाजपाने सेफ गेम सुरू केला पक्षवाढीचा. सुरुवातीला छोट्या छोट्या पक्षांसोबत युती करून जनतेच्या मनाचा कानोसा घेऊन त्या त्या राज्यात हात पाय पसरले. विरोधी पक्षांची पोकळी भरून काढणे, प्रादेशिक पक्षांतील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेऊन पक्षफुटीला संविधानिक संरक्षण देणं, आमदारांची खरेदीविक्री सारखे पुचाट प्रकार चाणक्यनीतीच्या नावाखाली खपवणे वगैरे हे मोदींच्या भाजपाचे प्रताप. यामुळेच भाजपाचा पारंपारिक मतदार दुखावला. २००४ ला इंडिया शायनिंग मुळं भाजपाचे पानिपत झाले होते हे माहिती असूनही इतर पक्षातील गटबाजी उफाळून आल्यानंतर भाजपाने त्याचा सत्ता समीकरणे तयार करण्यासाठी वापर केला. याचं कारण म्हणजे. दिल्ली पासून गल्ली पर्यंत फक्त आणि फक्त शतप्रतिशत भाजपा झाली पाहिजे हे ब्रीद. हे असे प्रकार संविधानाच्या पळवाटा शोधून काढून त्यात बसवणं हे भाजपाने केले. हे सर्वात मोठे व्यवस्थेचे वाभाडे काढण्यासारखे आहे. हे सर्व कशासाठी तर सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी. नीती, कृती आणि करणी याचा पायपोस नसलेली संस्कृती भाजपाने जन्माला घातली. यास जबाबदार मोदी आणि शहा ही जोडगोळी. भाजपाच्या एक फळीतील बऱ्याच नेत्यांना हे आवडले नसणार हे सर्वश्रुतच. पण जो जिंकेल तोच टिकेल यासाठी केला अट्टाहास. जनतेला असले राजकारणात डाव टाकणारे नेते आवडतात‌. डोक्यावर घेऊन मिरवण्यासाठी असेच नेते समर्थकांना भावतात. चाणक्य वगैरे संबोधून पत्रकार संपादक मंडळी बेडकाला फुगवून बैल करतात. बऱ्याचदा ठराविक जनतेला हे मनापासून आवडतं. ह्याची कशी जिरवली त्याची कशी जिरवली वगैरे. आमच्या नेत्याला कसे इकडे मानतात. तिकडे कसा भारी दबदबा आहे. अमुक याच्यावर पकड आहे. तमुकला बेकार पॅक केलाय. फलाना लॉबी नेत्यांच्या पाठीशी आहे. टिमका जातीच्या लोकांना हेच पाहिजे. असे सोपस्कार भारतात सर्रास चालतात. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विचारवंत, कार्यकर्ते आणि माननीय मंडळी तर अमुक एक नेता आपल्या विचारधारेला मानणारा आहे म्हणून त्याची सगळी कुकर्मे दुर्लक्षित करतात. अर्थातच त्यांच्या इको सिस्टिमचे ते सर्वाधिक लाभार्थी असावेत म्हणून नौटंकी खपते. बाकी अशी नौटंकी जाहीरपणे सार्वजनिक जीवनात वाखाणली गेली ती मोदींच्या भाजपामुळे.


गेल्या काही महिन्यांत महत्वाची प्रकरणं सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले म्हणून जनतेसमोर आली. त्यापैकी निवडणूक रोखे. इलेक्टोरल बॉंडस्. हे काय नवीन नाही. अरूण जेटली हयात असताना त्यांच्या पुढाकाराने इलेक्टोरल बॉंडस् कायदेशीररीत्या अस्तित्वात आले. या बॉंडस् मुळं एक गोष्ट महत्त्वाची घडली ती म्हणजे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीचे ऑन रेकॉर्ड दिसणं. हे या आधी होत नव्हतं. जो काही व्यवहार चालायचा तो सगळा रोख आणि टेबलाखालून. ऑन रेकॉर्ड दिसेल असे बॅंकेचे व्यवहार जे राजकीय पक्ष दाखवतील तेच होते. या एसबीआयच्या बॉंडस् मार्फत सर्वात जास्त निधी हा सत्ताधाऱ्यांनाच मिळणार हे सर्वश्रुत. या योजनेत सगळेच राजकीय पक्ष लाभार्थी. जे पक्ष सत्तेवर त्यांना मोठा निधी. बाकीच्या पक्षांना कमी निधी. यात मेख अशी आहे की भाजपा नंतर सर्वात जास्त निधी तृणमूल काँग्रेस कडे आला. कारण कोलकाता येथे असणारे उद्योग आणि राज्य सरकारच्या मर्जी सांभाळूनच होणारे व्यवहार. यावर बराच उहापोह करता येईल. मात्र करप्शन लीगल पद्धतीने कसे करावे याचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे इलेक्टोरल बॉंडस्.  एक विचार करा की जर हे प्करण कॉंग्रेसच्या काळात उघडकीस आले असते आणि विरोधक भाजपावाले असते तर भाजपाने सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले असते. मग नेमकं आताचा विरोधक एवढा का ढिसाळ आहे हाच खरा प्रश्न आहे. कदाचित सर्वच पक्ष लाभार्थी असल्याने हे गांभीर्याने घेत नसावेत. आडवाटेच्या घटना संविधानाच्या पळवाटा शोधून चौकटीत बसवून  लोकांना डायजेस्ट होतील अशा पद्धतीने हाताळणे हीच मोदींच्या काळातील ही सर्वात मोठी समस्या आहे. जनतेला ह्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. कारण लोकांनी एवढं मोठं प्रकरण बाहेर येऊन सुद्धा लाईटली घेतलं आहे. कारण राजकीय पक्षांना पैसा लागतोच तो अशा लीगल पद्धतीने बॅंकेमार्फत मिळतोय एवढीच समज लोकांमध्ये पसरली आहे. व्यवस्थेतील पळवाटा कशा हातळाव्यात याचं सर्वात समर्पक उदाहरण आहे हे. असे मुद्दे निवडणुकीच्या तोंडावर आल्याने सहसा काही फरक पडत नाही. मात्र हाच मुद्दा घेऊन पुढे येणाऱ्या निवडणुकीत माहौल तयार केला तर सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी होईल. पण जनतेची स्मरणशक्ती क्षीण असते. आजच्या आढळणाऱ्या समाज माध्यमातून रोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत असल्याने केवळ इंटरनेट वर ऑनलाईन असलेला समाज या बाबतीत जागरूक आहे. बराच मोठा वर्ग अनभिज्ञ असतो अशा मुद्यांवर. एकूणच भारतीय राजकारण हे एका रिऍलिटी शो सारखं चालू आहे की काय असं वाटतं कधीकधी. सगळं स्क्रिप्टेड असल्यासारखे कधी सत्ताधारी तर कधी विरोधक तर कधी सन्माननीय मंडळी वागत बोलत असतात. ह्या हेतूपुरस्सर केलेल्या व्यवस्थेचे सर्वात मोठे पाईक कोण असा प्रश्न भेडसावू लागतो.


जनतेला कोणत्याही राष्ट्रीय पक्षांना डावलता येत नाही. निवडणुकीत एकदा दोनदा संधी दिली जाते. त्याचं कारण शीर्ष नेतृत्वाच्या प्रभावामुळे. हा प्रभाव हळूहळू ओसरला की मग नवीन नेतृत्व उदयाला आले पाहिजे. जर पक्षांना असे नेतृत्व लादावे लागले तर मग पक्षांतर्गत त्या व्यक्तीची मक्तेदारी वाढली आहे हे समजावे. अशावेळी जनताच त्यांना बाहेर फेकून देते. १९७५ साली इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या काळात विरोधकांनी जनतेमध्ये जाऊन जागृती निर्माण केली त्यामुळे जनतेनेच कॉंग्रेसचे सरकार पाडले. नंतर आलेल्या अनेक पक्षांचे कडबोळे सत्ता टिकवू शकले नाही की पुन्हा एकत्रितपणे मिळवू शकले नाही. हा धडा लक्षात घेऊन भाजपाने भविष्यात जरी स्वपक्षातील खासदार कमी झाले तरीही सत्ता कशी मिळेल, टिकेल याबाबत नक्कीच रणनीती आखलेली असेल. कारण मोदी त्याबाबतीत फार पुढचा विचार करणारे आहेत. मोदींनी भाजपातील अंतर्गत विरोधक बेमालूमपणे बाजूला सारून गुजरातमध्ये मुख्यमंत्री पद टिकवले. ती एक रंगीत तालीम म्हणून बघायला हरकत नाही. जर भविष्यात २०२४ च्या निवडणुकित भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर पुढची बेजमी म्हणून भाजपाने जय्यत तयारी केली असणार हे वेगळे सांगायला नको. हा सगळा विचका त्या त्या राज्यात विधानसभा निवडणुकीत खूप गोंधळ उडवणारा आहे. त्याआधी सगळ्यात मोठा लोकशाहीचा महोत्सव म्हणजे २४ च्या लोकसभेच्या निवडणुका. त्याच्या निकालानंतर खरे प्रश्न उभे राहतील. जर जनतेने सगळं पचवून मोदींना मतदान केले तर ही शेवटची संधी असेल मोदींना. भविष्यात मोदी पंच्याहत्तरीत असतील आणि ठरेल अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना ज्या आधारावर पक्ष संघटनेत मार्गदर्शकाची भूमिका घ्यायला भाग पाडलं तसं मोदींना भाग पाडतात का बघणं महत्त्वाचं आहे.


सरतेशेवटी या दशकांत सबकुछ मोदी असल्याने जे फायदे भाजपाला झाले भविष्यात त्याचेच तोटेही होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जनतेला नेमकं काय मुद्दे भावतात हे समजेल.


© भूषण वर्धेकर 
पुणे 

बुधवार, ७ जून, २०२३

गडबडलेलं राजकारण

गडबडलेलं राजकारण

लेख - १

भारतीय राजकारणात सर्वात नशीबवान पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी. कारण भक्तांना जेवढे ते प्राणप्रिय तेवढेच ते त्यांच्या विरोधकांचे नावडते. विरोधक, मोदीद्वेष्ट्ये, अगदी विचारवंत म्हणवून घेणारे स्वयंघोषित पण मोदींना प्रत्येक गोष्टीला जबाबदार धरतात. त्यामुळे आजवर कोणत्याही पंतप्रधान पदी असलेल्या व्यक्तीला एवढं फुटेज कधीही मिळाले नाही. राजकीय पक्ष कसा असावा आणि व्यवस्थापन कसे करावे यासाठी भाजपाची कार्यशैली फार महत्वाची आणि अभ्यास करण्यासारखी आहे. स्थानिक पातळीवरील समस्यांना देखील मोदींना जबाबदार धरून विरोधकांनी गेल्या सात वर्षांत आम्ही कसे सत्तेत येण्याच्या लायकीचे नाही हेच दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजपावर खूप मोठी जबाबदारी आहे. सत्तेत राहून सत्ता डोक्यात जाऊ न देणे. नाहीतर असले दळभद्री विरोधक सत्तेवर येतील. मुळातच विरोधकांनी कसे वागावे, कशा पद्धतीने लोकांसमोर सरकारच्या कामांची चिरफाड करावी, सरकार विरोधातील राग, द्वेष जनतेच्या मनात पेटवून तो मतपेटीतून सरकार विरोधात कसा वाढेल असे प्रयत्न करणे गरजेचे असते. तसे प्रयत्न भाजपाच्या एका फळीतील कार्यकर्ते लोकांनी तळागाळापर्यंत कैक वर्षे अहोरात्र मेहनत करून पोचवले. त्याचीच फळे आज मोदी, शहा सारखे नेते चाखत आहेत. विरोधक कसे असावेत हे भाजपावाल्यांनी दाखवून दिले. आता सरकार कसे चालवावे हे पण दाखवून देत आहेत. आम्हीच कसे लायक आहोत बाकीचे नालायक होते असा असंविधानिक गैरसमज प्रत्येक सत्ताधाऱ्यांचा असतो. व्यवस्थेशी पाईक होण्याची ती मूलभूत अट असावी.

गरीबीविरूद्धचा लढा चिरकाल टिकवायचा असेल तर गरीब टिकला पाहिजे म्हणजे राजकारण करणे सोयीचे ठरते. जातीअंताची लढाई निरंतर चालू ठेवायची असेल तर जातीपाती पण राहिल्या पाहिजेत. जातपात संपल्या तर लढाई कोणासाठी करायची? अगदी असेच सूत्र सगळ्या सामाजिक लढ्यांना लागू होते. त्यामुळे भाजपाने असे लढे चालू ठेवण्यापेक्षा कृतीशील आराखडे राबवून तळागाळापर्यंत योजना कशा जातील हे बघितले. तसे बदल केले. असे बदल केल्याने ज्या प्रस्थापितांना धक्के बसणार होते ते निषेधाचे हत्यार उगारणाच! त्यामुळे जनतेपर्यंत सगळ्या सोयीसुविधा जेवढ्या पारदर्शक पणे पोचतील ते भाजपाने पहिल्यापासून करून दाखवले. आधारशी बॅंक खाते संलग्न करून डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर चा अव्वल उपयोग भाजपावाल्यांनी केला. कधीकाळी विरोधक असताना डायरेक्ट कॅश ट्रान्स्फर स्कीमला डाव्यांनी आणि भाजपावाल्यांनी विरोध केला होता. डाव्यांचे अस्तित्व सध्याच्या काळात कागदोपत्रीच उरलेलं आहे म्हणा.

देशासमोरचे प्रश्न, समस्या या खूप गंभीर आहेत. मात्र त्या सोडवण्यासाठी असलेली कार्यक्षमता, निर्णयक्षमता, राजकीय इच्छाशक्ती भाजपाकडे नक्कीच आहे हे आता जनतेला चांगले समजले आहे. सत्ता मिळवण्यासाठी तडजोडी, युत्या, आघाड्या वगैरे करून जरी सत्ता मिळाली तर निर्णय घेण्याची आणि ते राबवण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती युतीत, आघाडीत साध्य होत नाही. हे ही जनतेला समजले आहे. त्यामुळे प्रत्येकाचे सत्तेतले स्टेक्स वाढतात मग सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी पटत नसलेल्या गोष्टी कराव्या लागतात. एकहाती सत्ता असेल तर निर्णयक्षमता कशी वाढते आणि आघाडी बिघाडी करून सत्ता आली तर निर्णय घेण्याची आणि राबवण्याची क्षमता कशी कमकुवत होते हे पण जनतेला समजले. भाजपाकडे फक्त ईकोसिस्टम नाही ती आहे कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांकडे. कैक दशके सत्तेत राहिल्यामुळे एक प्रकारची स्थानिक साम्राज्यवादी घराणी आणि कटकारस्थाने करण्यात पटाईत अशी समांतर चालणारी बलस्थाने कॉंग्रेसच्या इशाऱ्यावर देशात अजूनही चालतात. एकमेव कारण म्हणजे घरोबा आणि ऋणानुबंध.

सध्याच्या घडीला कोणताही विरोधी पक्ष स्वबळावर सत्तेत येणार नाही हे माहिती असल्याने बिनमहत्वाच्या गोष्टींचा उदोउदो करून भाजपाची कोंडी कशी होईल अशा खेळी करण्यासाठी विरोधकांची धडपड केविलवाणी दिसते. समोर असणारे ज्वलंत प्रश्न, समस्या जनतेला भेडसावत असतात. पण त्या सोडवण्यासाठी विरोधक लायक नाहीत हे जनतेला पुर्णपणे माहिती आहे. कारण सोयीनुसार विरोध आणि ढोंगी भुमिका घेऊन देशाचे प्रश्न सुटत नसतात. सोशलमेडियाच्या जमान्यात कोण किती तळमळीने बोलतो, वागतो हे शिक्षित आणि सुशिक्षित जनतेला बरोब्बर समजते. त्यामुळे सूज्ञ जनता निवडणुकीत बरोबर त्या त्या लायक लोकांना नक्कीच निवडून देते. आपल्याकडे भूरट्या चोरांना सत्तेवर आणायचे की दरोडेखोरांना हेच पर्याय उपलब्ध आहेत. कधीकधी भूरटे चोर पण दरोडेखोर होतातात. लोकशाहीचा वरदहस्त असल्याने.

लोकशाही संविधान वगैरे बोलून आजवर कित्येक राजकीय पक्षांनी आणि घराण्यांनी स्वतःची पाळंमुळं घट्ट रोवली. जोपर्यंत अशा घट्ट रोवलेल्या मुळांना हादरे बसत नव्हते तोवर लोकशाही, संविधान वगैरेचा जयघोष होत नव्हता. हादरे बसले की मग 'संविधान खतरे मे' येते. किंवा काही लोकांचा 'सेक्युलरीझम खतरे मे' येतो. सध्यातरी भारतीयांना कमी नालायक आणि जास्त नालायक राजकीय लोकांना निवडावे लागते. लायक लोकांना कोणत्याही निवडणुका परवडत नाहीत. हे निवडणुकांचे बरबटीकरण कोणामुळे झाले हे भारतीयांना चांगलेच माहिती आहे. ज्यांच्या मुळे भारतात ज्वलंत प्रश्न, समस्या निर्माण झाल्या ते लोक जर सत्ताधारी भाजपाला दोष देत असतील तर जनता का विश्वास ठेवेल? मुळात भाजपा विरोधकांनी आणि मोदी द्वेष्ट्यांनी जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजे. इंधन दरवाढ आणि महागाई ह्या दोनच बाबींचा प्रचंड प्रभाव जनतेवर पडतो. हा जनतेतील राग, असंतोष विरोधकांना दिसत नाही का? ईडी, सीबीआय ला घाबरून जनतेसाठी रस्त्यावर उतरायला कचरत असावेत. सत्ताधारी ह्या गोष्टींकडे कानाडोळा नेहमीच करतात.  

भाजपाने पर्यायाने संघाने कधीकाळी कार्यकर्ते हाताशी धरून देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तृत जाळे विणले. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. सरकार विरोधात असलेला राग मतांमधून व्यक्त करा आणि भाजपा सत्ता मिळाल्यास सक्षमपणे कारभार कसा करेल हे पटवून सांगितले. कार्यकर्ते हीच कोणत्याही पक्षाची डीप एसेट असते. बेरजा वजाबाकी चे राजकारण करताना नंबरगेम करताना बेडूक उड्या मारणारे नेते तिकिटे मिळवतात पण जनाधार नसतो. भारतातील राजकीय व्यवस्थेतील सत्तेचे समीकरण हे संख्याबळावर चालणारे आहे. त्यामुळे प्रस्थापितांना संख्याबळासाठी कोलांट्याउड्या मारणे सोपे असते. कारण जातीपातीत लॉबिंग करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. कोकणात आंबा उत्पादक जसे आमराईतील पाडाला लागलेले आंबे टिकवायचे असतील तर एक दोन आंब्याची झाडे माकडांना राखून ठेवतात. जेणेकरून अशी उडाणटप्पू माकडे आमराईतील इतर झाडांची नासधूस करत नाहीत. तशीच माकडे आणि मर्कटलीला करणारे स्थानिक पातळीवरील नेते, संघटना आपल्या देशात जागोजागी पसरलेल्या आहेत. आजपर्यंत यांना गोंजारत देशाचे राजकारण चालत होते भाजपाने सत्तेत आल्यानंतर अशा लोकांना, नेत्यांना, संघटनांना हादरे द्यायला सुरुवात केली. जनतेने पण चाणाक्षपणे अशा संघटना, नेते यांना हाणून पाडले पाहिजे निवडणुकीत. भारतीय जनता तेवढी सूज्ञ आहे. 

मानसशास्त्रीय एक संकल्पना आहे 'हर्ड बिहेविअर'. समजायला थोडी किचकट वाटते. मात्र उदाहरणे आणि संलग्न केस स्टडीज वाचल्यावर त्याबद्दलची माहिती जास्त होते आणि त्याची व्याप्ती पण कळते. मागे एकदा Instincts of the Herd in Peace and War नावाचे Wilfred Trotter चे पुस्तक वाचायला मिळाले होते. सुरुवातीला अगम्य वाटले. नंतर डोक्यावरून गेले. पण आजकाल युट्युबवर क्राउड सायकॉलॉजी वर सर्फिंग वगैरे केले की सामाजिक प्रभाव कशा पद्धतीने हाताळता येतो आणि त्याचे सर्वसामान्य जनतेवर कसे परिणाम होतात ते समजते. सध्याच्या काळात विरोधक आणि सरकार समर्थक यांच्या एकूण ज्या काही चळवळी आणि आरोप प्रत्यारोप चालतात त्यावरून जनतेच्या मनात खोलवर खूप काही निसटल्याची भावना तयार झालीय. अशीच भावना देश स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनंतर भारतातील जनतेत झाली होती. नेहरू प्रणीत समाजवादी धोरणात्मक प्रगती वगैरेची गोडकौतुके हळूहळू ढासळू लागली. मग तसा राग तत्कालीन साहित्य, सिनेमात तरुण नायकाच्या रुपाने लोकांपर्यंत पोचला. पण तो राग मतपेटीतून व्यक्त होऊन सत्तापालट सहजपणे होऊ शकला नाही. कारण तत्कालीन कॉंग्रेसच्या धुरंधर नेत्यांनी पाळंमुळं घट्ट रुजवली होती. त्यामुळे देश चालवण्यासाठी नाईलाजाने लोक कॉंग्रेसला निवडून देत होती. बायको आवडत नसेल, तिच्यासोबत पटत नसेल तर बांधलेले कुटुंब टिकावं म्हणून माणसाला संसार कुढत का होईना करावा लागतो. तसा काहीसा हा प्रकार. देश चालवण्यासाठी सक्षम पर्याय तयार होण्यासाठी प्रयत्न चालू होते पण वेग कमी पडत होता. अशा काळात संघाने हिंदुत्व हे साधन घेऊन कणखर राष्ट्र निर्मितीसाठी गावोगावी एक जाळं निर्माण केलं. त्याचा फायदा वेळोवेळी तत्कालीन सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात करून घेतला. मात्र राजकीय पक्ष म्हणून भाजपाला त्याचा सर्वाधिक उपयोग झाला. 

कॉंग्रेसच्या लोकांनी आणि समर्थक विचारवंतांनी सेक्युलर सेक्युलर जयघोषात कैक दशके देश आणि राज्ये गाजवली. मग जनतेत सेक्युलर गुणसूत्रे तयार व्हायला पाहिजे होती. हिंदुत्ववादी गुणसूत्रे सामाजिक पातळीवर तयार झाली हे भाजपा प्रणित विचारसरणीचे यश मानायचे की कॉंग्रेस प्रणित विचारसरणीचे अपयश मानायचे? सकल हिंदू भाजपा समर्थन करत असेल तर भाजपा हा कायमस्वरूपी सत्तेत राहिला असता. आज एकाएकी भाजपाची ताकद सर्वदूर राज्याराज्यात, खेडोपाडी वाढलेली आहे ती हिंदुत्ववादी पक्ष म्हणून नाही. तर विरोधक म्हणून तत्कालीन सरकारविरोधात जी पोकळी तयार झाली होती ती भरून काढून भाजपाने विरोधीपक्ष म्हणून खंबीर पर्याय उभा केला. एकदा का खंबीर विरोधक तयार झाला तर सत्तेत सक्षम पर्याय तयार होण्यासाठी वेळ लागत नाही. लागतो तो राजकीय शहाणपणा. जो भाजपाकडे पुरेपूर आहे. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर आम्ही काय करू याचे दावे केल्यानंतर ते दावे प्रत्यक्षात कसे उतरवता येतील हे भाजपाने करून दाखवले. तशी वेळ सध्याच्या विरोधकांकडे आता आलीय. मात्र दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने विश्वासार्हता हरवलेली आहे. सध्याचे बरेचसे प्रश्न मोदी सत्तेत आल्यानंतर तयार झालेले नाहीत. त्याची पाळेमुळे आधीपासूनच होती. मग आताचे विरोधक त्यावर सक्षमपणे रामबाण उपाय कोणत्या बाबींवर सांगणार? सोशलमेडियाच्या अतिवापरामुळे व्हॉटअबाउटिझम आणि सलेक्टिव्हीटी ऑफ एक्सप्रेशन अँड लिबर्टी जनतेला समजून चुकलेली आहे. त्यामुळे विरोधक जेवढा चिखल करतील तेवढे पोषक वातावरण कमळ उगवण्यासाठी तयार होईल. 

©भूषण वर्धेकर,
२३ जानेवारी २०२२



लेख - २

आजकाल बहुतेक राजकारण करणारे लोक स्वतः ची एक सोशल मीडिया टिम ठेवू लागले. याची सुरुवात मोदींनी दहा वर्षापूर्वी केली होती. मात्र अशा टिमचे फक्त व्हर्चुअल कनेक्शन तयार होते. जमीनीवर कामे करणारे लोक जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्षपणे ऑन फिल्ड राबतात. तिथे अभासी माध्यम फिके पडते. आपल्या देशात स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस ला रेडिमेड असे नेटवर्क तयार करून दिले. त्याचा उपयोग तत्कालीन धुरिणांनी संस्थानं उभी करण्यासाठी केला. तेच संस्थानिक, सरंजामी कॉंग्रेस कमकुवत झाली की भाजपात स्थिरस्थावर होऊ लागले. भाजपाला लोकशाहीत विजय मिळवण्यासाठी जिंकून येणाऱ्या लोकांना संख्याबळ वाढवण्यासाठी पक्षात घेऊन पवित्र करावे लागले. हीच मोठी घोडचूक भाजपाला भविष्यात महाग पडणार आहे. वेळोवेळी निवडणुकीत हे दिसते. भूतकाळात कॉंग्रेसला सत्ता टिकवण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत कारण तेव्हा तगडा विरोधक तयार झाला नव्हता. तेव्हाच्या जनतेवर गांधी नेहरू यांच्यासारख्या लोकांचे गारूड होते. कॉंग्रेस ने तर गांधींची इमेज सत्तेत राहण्यासाठी कशी वापरली हे अभ्यासायचे असेल तर तत्कालीन आंबेडकरांचे लेखन आणि भाषणं वाचावीत. त्यावेळेस लोकांवर कॉंग्रेस नसेल तर कोण देश सांभाळणार हे बिंबवले गेले होते. नंतर कॉंग्रेस विरोधात राग व्यक्त होऊ लागला आणि सत्तेवर कॉंग्रेसेतर पक्ष अल्पकाळ आले. पण टिकणारे स्थिर बहुमताचे सरकार मिळाले नाही. ते मिळाले २०१४ आणि २०१९ मध्ये. त्याचा उपयोग भाजपाने सत्तेत राहण्यासाठी कसा केला? जनतेने त्यांना परत सत्तेवर आणले का? हे २०२४ नंतर समजेलच. मात्र भाजपातील एक फळी आता आमचीच सत्ता राहील या दुधखुळ्या आशेवर जगतेय. जनता जनार्दन असते हे माहीती असूनही महत्त्वाचे प्रश्न आणि समस्या 'जैसे थे'च आहेत. लोकशाही मध्ये सत्तेसाठी पर्याय आपोआपच तयार होतात. फक्त सत्ताधारी लोकांविषयीचा राग मतपेटीतून व्यक्त व्हायला लागतो. भाजपाला हिंद- मुस्लिम, राष्ट्रद्रोही राष्ट्रभक्ती वगैरेंच्या बाबी प्राणप्रिय. सध्याच्या घडीला महागाई, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि कोरोनामुळे विस्कटलेली शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्था या सगळ्यात महत्वाच्या आहेत. जेव्हा असे महत्वाचे विषय पटलावर येतात तेव्हा राजकारणात एकमेकांना टार्गेट करण्यासाठी तर्क कुतर्क, चुकीचे युक्तिवाद नेहमीच होतात. मग पुर्वाश्रमीच्या सरकारच्या काळातील आकडेवारी सोबत चालू आकडेवारीची तुलना करायची. मग ही तुलना एकेरी खर्चाबाबत दाखवली की प्रचंड तफावत जाणवते. मात्र महागाई वाढते तसे व्यक्तीगत किंवा कौटुंबिक उत्पन्न पण कमीअधिक प्रमाणात वाढत असते. आर्थिक आणि वित्तीय संकल्पना नीट अभ्यासल्या असतील तर अशी गफलत होत नाही. महागाई आणि उत्पन्न मधील नाते हे साप आणि मुंगुस प्रमाणे असते. माझे आजोबा सांगायचे एक तोळा सोनं किती रुपयांचे मिळते तेवढे रुपये जर आपण महिन्याकाठी कमवत असू तर काटकसर करून किमान मुलभूत गरजा आपण पुऱ्या करू शकतो. त्यापेक्षा कमी पैसा कमवत असू तर हौसमौज, चैन करण्यासाठी पैसा खर्च करणे स्वप्नवत असेल. पुर्वीची पिढी काटकसर करून पैसे साठवणारी होती कारण उत्पन्नाचे स्रोत मर्यादित होते म्हणून. काळ बदलतो बदलणाऱ्या पिढीसकट. त्यामुळे काही लोकांना महागाई जीवनावश्यक वस्तूंची वाटते तर काहींना हौसमौज करण्यासाठी खर्च जास्त झाला तर महागाई आठवते. लोकांच्या मनात महागाई विषयी प्रचंड राग असतो. जर आजूबाजूला भ्रष्टाचार होतोय आणि आपल्याच कराच्या पैशातून सरकार आपल्याला मूलभूत सोयीसुविधा देऊ शकत नाही ही बाब प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण करते. त्यासाठी लोकांपर्यंत गेलं पाहिजे. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सध्याचे कोणते विरोधक रस्त्यावर उतरले? आंदोलने केली विरोध केला की सरकार सूडबुद्धीने कारवाई करते म्हणून जस्टीफिकेशन देत बसायचं फक्त काम विरोधकांना येतं. सत्ताधारी हे नेहमीच सत्तेत मश्गूल असतात. सत्तेवर टिकण्यासाठी सत्तेचा वापर करणे लोकशाहीचे आद्यकर्तव्य आहे. सत्ता, पैसा आणि भिती हीच आयुधं प्रचलितपणे वापरली गेली आहेत राज्यकर्त्यांकडून प्रभाव वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी. त्यांना ठिकाणावर आणणारे सक्षम विरोधक हवेतच. तशीच राजकीय व्यवस्था लोकशाहीला अपेक्षित असते. मात्र तसं दिसत नसल्यामुळे लोकांचा विश्वास उडत जातो. मग सामाजिक व्यवस्था आणि लोकशाही बद्दल आत्मीयता राहत नाही. लोकांकडे फक्त एकच पर्याय उरतो तो म्हणजे चिडून निवडणुकीत राग काढणे मतदान करून सत्ता पालटवणे. जनतेने भल्या भल्या लोकांना वठणीवर आणले आहे. भविष्यात भाजपाला पण जनता वठणीवर नक्कीच आणणार.

अर्थव्यवस्था कशी चालते याचे वेगवेगळे कंगोरे गुंतागुंतीचे असतात. उत्पन्न म्हणून येणारा पैसा, खर्चाचा जाणारा पैसा आणि उचललेला कर्जाचा पैसा या तिन्हींची सांगड घालताना नाकी नऊ येतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कमकुवत घटकांना पोसण्यासाठी समाजवादी अर्थव्यवस्था जोपासली. कालांतराने ती जागतिकीकरणामुळे पुर्णपणे कोसळली. कृषीप्रधान देश वगैरे म्हणून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन योजना आणल्या मात्र त्यातून सरंजामी आणि संस्थानिकांच्या व्यवस्था उभ्या राहिल्या. शेतकरी जेवढा परावलंबी झाला तेवढे शोषणाचे प्रमाण वाढले. नंतर औद्योगिकीकरणामुळे सुपीक जमीनीवर भांडवलदार टपून बसले. कम्युनिस्ट लोकांचे आवडते वाक्य 'बडी बडी कंपनिया देश चलाती है' हे काही प्रमाणात खरे आहे. ही सगळी गुंतागुंतीची त्रांगडी व्यवस्था जशी आहे तशीच या ना त्या सरकारने राबवली. आधी विदेशी भांडवलदार होते त्यांची जागा स्वदेशी भांडवलदारांनी घेतली फरक एवढाच. सत्ता टिकवण्यासाठी सगळ्यांचे हित जोपासण्यापेक्षा ठराविक गटाचे हित जोपासले की सत्ता टिकवता येते हे आपल्या लोकशाही कटू सत्य. अशा व्यवस्थेत जर राजकीय लाभार्थी आणि सत्ताधारी यांचे संगनमताने जर व्यावसायिक हितसंबंध असतील तर बजबजपुरी माजणारच! सर्वात कमी भ्रष्ट उमेदवार निवडून देणं हेच जनतेला करावं लागतं. मतदान कमी टक्के झाले की गटातटाचे स्टेक्स वाढतात. जेवढे जास्त टक्के मतदान होते तेवढा लोकांचा राग लोभ व्यक्त होतो मतपेटीतून. आपलं संविधान, लोकशाही व्यवस्था देश मजबूत करण्यासाठी चांगली आहेच. पण सत्तेवर आल्यानंतर राजकीय पक्षांनी आपापली इको सिस्टीम मजबूत करण्यासाठी व्यवस्था वापरली. संविधानातील खाचाखोचा आणि पळवाटा शोधून कधीकाळी तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेसने देशात पायंडा पाडला. सध्या भाजपा पण तशीच री ओढत आहे. त्यामुळे आपली व्यवस्थाच कुचकामी आहे. हा पक्ष वाईट तो पक्ष वाईट असे फक्त म्हणून काहीही उपयोग नाही. कारण व्यवस्थेचा उपयोग देश बळकट करण्यापेक्षा ज्या त्या सत्ताधारी पक्षांनी आपापले पक्ष मजबूत करण्यासाठी केला. एकदा का इकोसिस्टम बळकट झाली की सत्ता टिकवता येते. हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. अशा गडबडलेल्या राजकीय परिस्थितीत सुधारणा करायला सहसा कोणी उत्सुक नसतो.

आपल्या देशात व्यक्तीस्तोम फार पुजला जातो. राजकीयदृष्ट्या महत्वाच्या व्यक्तींना पोस्टर बॉय बनवून सत्ताकारण सोपे होते. प्रतिमामंडन करणं, वैचारिक खुजेपणा असून देखील सत्तेसाठी मिरवणं हे आपल्या राजकीय इतिहासातील महत्वाचं दारिद्र्य. एखाद्याची मक्तेदारी वाढत गेली की सुप्त बंडखोरी वाढते. घराणेशाही अस्तंगत होतात त्या वाढत्या बंडखोरीमुळे. वाढत्या मक्तेदारी मुळे हुकुमशाही बळावते. एककल्ली कारभाराला चाप लागला की अराजकता निर्माण केली जाते. भारतात तर ज्याचे त्याचे हितसंबंध जपण्यासाठी राजकारणी वरचढ असतात. अशावेळी धर्म, आस्था, जातपात आणि अस्मिता पुर्णवेळ ड्युटी सुरू होते. त्यामुळे राजकीय सामाजिक व्यवस्था कोण्या एका व्यक्तीने किंवा कुटुंबाने किंवा पक्षाने बिघडवलेली नसते. ती आपसूकच सर्वपक्षीय हितसंबंध राखण्यासाठी केलेल्या तडजोडीमुळे बरबटली. उदाहरणार्थ महाराष्ट्रात जे घडतंय ते फक्त राजकीय लोकांचे एकमेकांसोबत असलेले व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी. ज्यांच्याविरुद्ध प्रचार केला त्यांच्यासाठी मते मागायची नामुष्की सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आणलीय राजकारण्यांनी. कधीकाळी देशात मुस्लिम द्वेष ब्राह्मण द्वेष करून व्होटिंग पॉकेट्स तयार केली गेली होती. आता त्यांच्या जोडीला राष्ट्रद्रोही आणि राष्ट्रप्रेम वगैरे आलंय. सोबत मुरवलेल्या डीप ऍसेट्स आहेतच ईको सिस्टीम च्या दिमतीला. समाजमाध्यमातील योद्ध्यांना लॉजिकल फॅलसीज् आणि इलॉजिकल सिलॉजिझम् भरमसाठ मिळत असतात सध्याच्या डेटा युगात. अशा गोष्टींमुळे ज्याच्या त्याच्या स्ट्रॉंग पॉलिटिकल टेरिटरी झालेल्या आहेत. अशावेळी फोकस फक्त संख्याबळानुसार बहुमताने निवडून यायचे कसेही करून. हेच सूत्र वापरले जातेय. सत्ताधारी यात इतके गुरफटले की महत्वाच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी वेळच मिळत नाही. आम्ही सत्ता टिकवूनच दाखवू हा आत्मविश्वास एक तर जनतेला गृहीत धरून येत असावा किंवा हाराकिरी करणाऱ्या विरोधकांमुळे. या सर्व घटनांमुळे उब येतो. यात भर पडते ती वकीलपत्र घेतलेल्या पत्रकार लोकांची. नेमकं राजकारणात चिखल होतोय का केला जातोय हे समजत नाही.

भारतीय जनता बहुमताने निवडून देते म्हणजे जनतेला सक्षम आणि स्थिर सरकार गरजेचे असते. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही म्हणजे तडजोड करून सरकार स्थापन करण्यासाठी चढाओढ होणारच. नकळतपणे युत्या आघाड्या जेव्हा सरकार स्थापन करतात तेव्हा अंतर्गत मतभेदांमुळे महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे युती आघाडीत प्रत्येक पक्षाचे आपापले स्टेक्स असतात. त्यामुळे जनहितार्थ कामे दुय्यम होतात. स्वातंत्र्यानंतर एकूण राजकीय व्यवस्थेची ही ठराविक गट तट आणि पक्षाने उभे केलेले सरंजामी लोकांनी मशागत केली होती. तेव्हाचे प्रश्न आणि आजचे प्रश्न यात प्रचंड तफावत आहे. तेव्हाच्या पिढीला राजकारणात व्यवसाय उभा करता येतो ह्याची म्हणावी तशी जाणीव झाली नव्हती. तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार झाला नव्हता. तशी साधने पण त्याकाळी उपलब्ध नव्हती. आताचा काळ हा प्रचंड साधनसामग्री उपलब्ध असण्याचा आहे. सोबत शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार प्रचंड वेगाने झाला आहे. कधीकाळी डॉक्टर आणि इंजिनियर वगैरे प्रतिष्ठित शैक्षणिक पात्रता ठराविक वर्गांपर्यंत पोचल्या होत्या. कालांतराने हीच पात्रता बहुसंख्य क्रयशक्ती वाढलेल्या कुटुंबात दिसू लागल्या. म्हणजेच एक शिक्षित वर्ग तयार झाला. नव्वदीनंतर जागतिकीकरण लागू झाल्यानंतर तर शिक्षणक्षेत्रात भांडवलदार वर्ग पडद्याआड सगळी सुत्रे हलवू लागले. त्यांच्या मुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट असे बदल पण झाले आणि निकृष्ट दर्जाची शिक्षण संकुले पण उभी राहिली. शेतीक्षेत्र, सहकारी क्षेत्र नंतर शिक्षणात राजकारणातील नेतेमंडळींनी स्वतःचे साम्राज्य उभे करायला सुरुवात केली. राजकारणात संख्याबळाच्या आधारे सत्ताकारण करता येते आणि पैसा असेल तर बरेचसे प्रश्न सुटतात. ह्या एकमेव कारणांमुळे सत्तेवर असणाऱ्या सगळ्या पक्षांनी शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील त्रुटींवर कायमच दुर्लक्ष केले. कारण त्यांच्याशी निगडित पसरलेली राजकीय व्यवस्था सत्ता टिकवण्यासाठी गरजेची होती. 

© भूषण वर्धेकर
१६ ऑक्टोबर २०२२

सोमवार, १० एप्रिल, २०२३

गावगोष्टी #१

एका गावात मोठी पाण्याची टाकी होती. टाकीचा उपयोग पाणी साठवण्यासाठी आणि लोकांना दैनंदिन जीवनात गरजेप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन ची सर्वोत्कृष्ट व्यवस्था उभी करण्यात आली होती. गावाची सगळी उपजिविका शेतीवरच होती. छोटेमोठे गावातले उद्योग होतेच. पण ते तुटपुंजे होते. तसं सांगितलं गेलं होतं ही व्यवस्था गावातील गोरगरीब जनतेसाठी उभी करण्यात आली आहे. शेतीसाठी, रोजच्या दैनंदिन वापरासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याची देखरेख आणि पाणीपुरवठा अंमलबजावणी साठी गावातील जनताच काही लोकांना निवडून देत होती. असे निवडून येणारे लोक मात्र पाणीपुरवठा व्यवस्थेचे मालक असल्यासारखे वागत होती. एकाच कुटुंबातील लोकांना पिढ्यानपिढ्या जनतेने निवडून दिल्यामुळे त्यांचा गोड गैरसमज झाला होता की ही व्यवस्था आमचीच. आम्हीच ही व्यवस्था राबवली, उभी केली. त्यांचा पुढचा काल्पनिक समाजमान्य गैरसमज असा होता की आम्हीच फक्त लोकांचे कल्याण केले आहे. आमच्यामुळेच गावातील गोरगरीब जनतेला पाणीपुरवठा झाला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी शेवटच्या घटकांपर्यंत कधीच पोचले नव्हते. ते कायमच दुर्लक्षित राहतील याची तजवीज चाणाक्ष निवडून येणाऱ्या लोकांनी वेळोवेळी केली होती. कालांतराने टाकी, पाइपलाइन कमकुवत होत गेली. वेळोवेळी गरजेनुसार डागडुजी केली खरी पण कायमस्वरूपी कशी व्यवस्था आपल्याकडेच राहील याची पण तजवीज केली होती. 

गावातील लोकसंख्या जशी वाढत गेली तसा पाण्याच्या मागणीचा बोजा वाढला. त्यात व्यवस्था पाहण्यासाठी नेमलेल्या लोकांचीच संस्थांनं तयार झाली त्यांची शेतीवाडी, उद्योगधंदे यालाच प्राधान्य देण्यात आले पाणीपुरवठ्याचे. जनतेला जातीपातीवरुन भडकावून सगळेच आपापल्या कुटुंबातील सदस्यांना भक्कम पणे निवडून आणत होते. जनतेला रोजच्या जगण्याचं रहाटगाडं ओढण्यासाठी मारामार होत होती. निवडून दिलेल्या लोकांना त्यामुळे असा समज झाला होता की आम्ही सर्वशक्तिमान, आम्ही खरे जनतेला चांगले सांभाळू, आम्ही आहोत म्हणून पाणीपुरवठा व्यवस्थेचे चालतोय दुसरे कोणीही आले की वाट लावणार व्यवस्थेची. मुळातच व्यवस्था जीर्ण झाली होती. पुरवठ्याचे मॉडेल जबरदस्त गुणकारी होते पण तीची अंमलबजावणी फिसकटलेली होती. लोकांनी आलटून पालटून वेगवेगळ्या लोकांना निवडून दिले तरी व्यवस्था दुरुस्ती झाली नाही. तीच व्यवस्था आहे तशीच राबवली. ती अजून जीर्ण झाली. नवीन लोकांना निवडून दिले तरीही पुर्वाश्रमींच्या लोकांशी असलेल्या घरोबा आणि ऋणानुबंधामुळे काहीही फरक पडत नव्हता. 

एकूणच सावळा गोंधळ चालू असताना आजूबाजूच्या गावातील चाणाक्षांनी ओळखले या गावातील लोकसंख्या आणि या गावातील जीर्ण झालेल्या व्यवस्थेचा आपल्याला मजबूत फायदा घेता येईल. पण या गावात येण्यासाठी कसलीही व्यवस्था नव्हती. मग निवडून आलेल्या लोकांना गुंडाळून तुमच्या गावात आम्ही उद्योग सुरू केल्यावर तुमची भरभराट होईल तुमचे सगळे प्रश्न मिटतील सांगून आपापल्या उद्योगाचे साम्राज्य उभे केले. सोबतीला गावातील उच्चभ्रू लोकांना हाताशी धरून पाणीपुरवठा आपल्याला फायदेशीर कसा ठरेल याची तजवीज केली. याला गोंडस नाव दिले *गावकीकरण*. 

या गावकीकरणामुळे ठराविक वर्गाचेच भले झाले. शेती व्यवसाय करण्याऱ्या लोकांचे जे हाल होते ते तसेच ठेवले गेले. माणूस अशक्त आणि कृश असेल तर त्याच्या दवापाण्याचा खर्च वाढवून, लांबवून स्वतःची आणि कुटुंबांची दुकानदारी दीर्घकाळ चालवता येते. हे सूत्र निवडून येणाऱ्या प्रत्येकाने वापरले. शेतकरी सशक्त झाला तर कित्येक लोकांची दुकानदारी बंद झाली असती. मग शेतकऱ्यांना शेती कशी कमी कारखानदारी कशी उच्च सांगितले. मग त्यांच्याच शेतजमिनी बळकावून गावकीकरण प्रचंड प्रमाणात वाढवले. विस्कटलेल्या गावकीकरणामुळे कैक प्रश्न निर्माण झाले. त्यात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी आणि पाइपलाइन यांच्या देखभालीसाठी येणारा खर्चही परवडत नसल्याने आजूबाजूच्या गावातून कर्जे उचलली गेली. ती कर्जे फेडण्यासाठी गावातील जनता राबराब राबायची. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर भरायची व्यवस्था राबवणाऱ्यांना शिव्या घालायची पुन्हा जातीपातीधर्मावरुन लोकांना निवडून द्यायची. असे चक्र कालानुक्रमे चालूच होते. जनतेला समजून चुकले की कोणालाही निवडून दिले तरी व्यवस्था आहे तशीच राहणार म्हणून जो तो आपापल्या परीने उस्फुर्त विरोध, निषेध आणि आंदोलने करीत असत. काही ठिकाणी फरक दिसत असे. कालांतराने पुन्हा पिळवणकीची तशीच व्यवस्था उभी राहिली. मग पुन्हा गावातील जनतेचा विरोध, निषेध आणि आंदोलने. शेवटी निवडून येणाऱ्या लोकांना वैताग आला काय ते सारखं सारखं जनतेचीच काम करायची. निषेध, विरोध आणि आंदोलने सहन करायची. काय पायपोस उरला नव्हता. इतकी दशकं त्यांना सहन केले आता आम्हाला करायला काय होतंय? आम्हाला आमच्या पद्धतीने कारभार पण करून देत नाहीत. गावद्रोही कुठले. 

सरतेशेवटी चाणाक्षांनी गावातील जनतेला ऑनलाईन समाजमाध्यमे फुकटात उपलब्ध करून दिली. आता निवडून येणाऱ्या लोकांना त्यांच्या मनासारखी व्यवस्था राबवता येते आणि गावातील निम्म्या जनतेला मेटाकुटीला येऊन जगण्यासाठी किमान गरजा भागविण्यासाठी दुनियादारीशी झगडावं लागतं. उरलेल्या जनतेला व्हर्च्युअल विरोध, निषेध आणि आंदोलने.

सगळं कसं मस्त चालू आहे.
© भूषण वर्धेकर
३ एप्रिल २०२३

रविवार, ९ एप्रिल, २०२३

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!


स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळेच लढले
कोणी दक्षिणेकडे कोणी पश्चिमेकडे लढले
उत्तरेतील, पुर्वेकडील कैक फासावर चढले
अनेकांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले

काही जीवानिशी मेले काही होरपळले
विस्कटलेल्या चळवळीत कैक बिथरले
बंड पुकारून कैक त्वेषाने निकराने लढले
राष्ट्रवादी लेखणीचे चित्कार सर्वदूर पोचवले गेले 

परदेशांतून जहालांनी हादरून सोडले
ब्रिटिशांना देशातलेच मवाळ बरे वाटू लागले
हुशारीने राजे राजवाडे आधीच ताब्यात घेतले
संस्थानिकांना हेरून करारबद्ध गुलाम केले

बेरकीपणे काही आंदोलने प्रॉक्टर्ड केली
लोकसहभागातून काही उस्फुर्त झाली
दुसऱ्या महायुद्धात वाताहत अंगलट आली
संभाव्य लष्करी उद्रेकामुळे पाचर बसली

ज्वलंत राष्ट्रवाद्यांच्या जरबेने गांगारुन गेले
मवाळांतील सत्तापिपासू हेरले गेले
ब्रिटिशांनी धर्माधिष्ठित राष्ट्रास बळ दिले
सर्वधर्मसमभावाचे कंबरडेच मोडले

सगळ्यात आधी ब्रिटीशांनी वापरले
नंतर कॉंग्रेसने सत्तेसाठी मिरवले
सर्वदूर सत्य अहिंसा ठसवले गेले
प्रत्यक्षात अहिंसा असत्य वठवले गेले

कित्येक दशकं गांधी बिचारे वापरले गेले
जाज्वल्य सावरकर अडगळीत फेकले गेले
सुटाबुटातून संविधान अंमलात आणले गेले
बाबासाहेब जातीच्या कोंडाळ्यात ढकलले गेले

पंचवार्षिक योजनेचे दिवास्वप्न दाखवले गेले
गोताळ्यातील समाजवादी धनिकांना रेटले गेले 
गावोगावचे जमीनदार सावकार एकवटले गेले
सेक्युलर म्हणवून संस्थानिकं भक्कम केले गेले

व्यक्तींकडून कुटुंबं उच्चभ्रू प्रस्थापित झाले 
विकासाच्या आडून गोरगरीब विस्थापित झाले
नेहरुंचे गुडी गुडी राष्ट्रनिर्भर स्वप्न मिरवले गेले
प्रत्यक्षात मात्र घराणेशाहीचे वारस लादले गेले

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!

२७ नोव्हेंबर २०२२
भुकूम, पुणे


नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...