राजकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

स्वतंत्र भारताचे सहस्त्रचंद्रदर्शन

 स्वतंत्र भारताचे सहस्त्रचंद्रदर्शन


गेल्या आठ दशकांपासून भारतात कैक घडामोडी घडल्या ज्यातून भारतीय जनमानसाची सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक घुसळण झाली. यातील दर वीस वर्षांनी पिढी बदलते असे मानले तर किमान सात पिढ्यांनी हा देश बदललेला पाहीला याची देही याची डोळा! आजच्या भाषेत ग्रेटेस्ट जनरेशन (१९००-१९२५), सायलेंट जनरेशन (१९२६-१९४५), बेबी बूमर्स (१९४६-१९६४), जेन एक्स (१९६५-१९८०), मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय (१९८१-१९९६), जेन झी (१९९७-२०१२) आणि जेन अल्फा (२०१३-२०२४) या पिढ्या महत्त्वाच्या आहेत. पैकी जेन झी आणि जेन अल्फा अकाली पौगंडावस्थेतील संक्रमित झालेली पिढी. जेन एक्स आणि जेन वाय खऱ्या अर्थाने उत्पादक पिढ्या. बेबी बूमर्सने एक अशक्य कालखंड पाहिला जो कल्पनाशक्तीच्या बाहेर होता. ग्रेटेस्ट आणि सायलेंट या दोन्ही जनरेशन ने खऱ्याखुऱ्या अर्थाने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक गोष्टी अनुभवल्या. नंतरच्या पिढ्यांना केवळ पाहायला ऐकायला वाचायला मिळाल्या. या पिढ्यांची कालरेषा समजल्यावर लक्षात येते की ग्रेटेस्ट जनरेशन ने सायलेंट जनरेशन जन्माला घातले आणि सायलेंट जनरेशन ने बेबी बुमर्स ला. जेन एक्स बेबी बूमर्स च्या पोटी जन्माला आले तर मिलेनियल्स जन्माला घालायचे भाग्य जेन एक्स ला मिळाले. मात्र चौकटीबाहेरचे आयुष्य जगणारी मिलेनियल्स आर्थिक उदारीकरणाची सगळ्यात जास्त लाभार्थी पिढीने जेनझी आणि जेन अल्फा अशी संमिश्र पिढी जन्माला घातली.  या गोष्टी नमूद केल्या कारण प्रत्येक पिढीत आपण जे भोगले ते आपल्या पुढच्या पिढीने भोगायला नको म्हणून बरेच कबाडकष्ट उपसले. याचा परिणाम एका पिढीत अप्राप्य असलेल्या गोष्टी पुढच्या पिढीला आपसूकच मिळत गेल्या. भौतिक सुखाच्या बाबतीत जेन झी आणि अल्फा अव्वल आहेत. मिलेनियल्स ही एकमेव अशी पिढी जीने कळत्या वयात विसाव्या शतकातील अखेरचे दशक अन् एकविसाव्या शतकाची गद्यपंचवीशी अनुभवली. ही फार प्रचंड विलक्षण गोष्ट आहे. कारण ह्यांनी पाहिलेला काळ हा सूर्य हा जयद्रथ प्रमाणे पारदर्शक आहे. त्यामुळे आधुनिक काळात ह्यांनी बदल लगेच आत्मसात केले. असे बदल जेन एक्सला अंगवळणी कधीच पडले नाहीत. ही ढोबळ रूपरेषा मांडली कारण सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक बदल मिलेनियल्स नी गटागट प्राशन करून रिचवले. हीच पिढी भक्कम आहे कसलेही बदल झेलण्यासाठी. मग ते कोरोना काळाचे असो वा सोशल मेडियात क्षणाक्षणाला आदळणाऱ्या माहितीच्या लाटांचे. ही पिढी खूप स्थिर आहे. असे मानसिक स्थैर्य जेन झी आणि अल्फा कडे नाही. मिलेनियल्सची क्रयशक्ती आणि जेन एक्स ची सिनियॉरिटी आपल्या देशाचे बॅकबोन आहेत. 


वरील सर्व बाबी नीट समजून घेतल्या तर नक्कीच लक्षात येईल की राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जे महत्त्वाचे बदल झाले ते मिलेनियल्स आणि जेन एक्स ने खूप जवळून अनुभवले. ज्या पिढीची चाळीशी उलटून जाते ती पिढी वैचारिक दृष्ट्या मजबूत असते. विशीत जी चंचचलता असते ती चाळीशी पार केलेल्या मॅच्युअर पिढीने रिचवलेली असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे एकाच कुटुंबातील दोन तीन पिढ्या समांतरपणे घडणाऱ्या घटनांचे अवलोकन सिंहावलोकन करतात. त्यातून नकळतपणे दोन मार्गदर्शक एक बंडखोर वगैरे पिढी तयार होत असते. आज २०२६ साली जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्याचे सहस्त्रचंद्रदर्शन साजरे करतो तेव्हा अवखळ बदललेला सामाजिक आणि राजकीय अनुभव सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आता आर्थिक परिस्थिती कशी बदलली हे थोडक्यात जाणून घेऊया. अठराविश्वे दारिद्य्र म्हणजे काय हे पहिल्या तीन पिढ्यांना ठाऊक आहे. नंतरच्या काळातील पिढ्या संघर्षात, कष्टप्रद आणि आर्थिक सुबत्तेत संक्रमित झाल्या. यामुळे जेन झी आणि अल्फा यांच्या भौतिक आणि चैनीच्या गरजा ह्या हक्क आणि अधिकार या गटात समाविष्ट झाल्या आहेत. मिलेनियल्सना आधीच्या पिढीतील घर्डेघाशी पण बघायला मिळाली तर अनुभवातून आलेल्या शहाणपणामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले दिवस पण अनुभवता आले. हीच खरी कसदार आणि सकस गोष्ट आहे एकविसाव्या शतकातील. त्यामुळे ही पिढी प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद देण्याकडे कललेली आहे. याच्या उलट जेन झी प्रतिक्रियावादी झाली. भविष्यात अनुभवातून लवकरच शहाणपणा येईल मात्र तोपर्यंत ते सर्वात जास्त वापरले जातील. तावून सुलाखून बाहेर पडले की परिपक्वता येईलच.


भारतात राजकारण करताना वापरण्याजोगी वस्तू कित्येक आहेत. चळवळी, समाज, जात-पात-धर्म, नेते-महात्मे आणि विचारधारा वगैरे. यातून बऱ्याच लोकांच्या हाती निराशा वैफल्य येते आणि काही तुरळक लोक लाभार्थी होतात. हेच लाभार्थी व्यवस्थेचे पाईक होऊन बळकट होतात. देश बळकट होईल तेव्हा होईल. सर्वात आधी आपण बळकट होऊ मग व्यवस्था कळकट झाली तरी चालेल नंतर देशाचे बळकटीकरण वगैरे बघू. दुसरीकडे वैफल्यग्रस्त नैराश्य आलेल्या गटाकडे उत्पात माजवणे किंवा थंड बसून संधी मिळताच व्यवस्थेचे लाभार्थी होणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात. जो सक्षम असेल तो व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी शिस्तबद्ध संघटित होत आपली स्वयंभू समांतर व्यवस्था तयार करतो. अशा समांतर व्यवस्थेत या देशातील सगळ्या पिढ्यांनी योगदान दिले आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ग्रेटेस्ट जनरेशन सायलेंट जनरेशन चे महत्त्वपूर्ण योगदान होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बेबी बूमर्स आणि जेन एक्स ही पिढी खरोखरच भाग्यवान ठरली जिने देश घडताना पाहिला. देशाच्या पहिल्या चाळीस वर्षात झालेल्या स्थित्यंतरांचा अनुभव घेतला. नंतरच्या चाळीस वर्षांत मात्र मिलेनियल्स आणि जेन झी वगैरे मच हॅपनिंग जनरेशन आहे. त्यातल्या त्यात सध्याच्या परिस्थितीत मिलेनियल्स किंवा जेन वाय ही पिढी मॅच्युअर्ड आहे सर्वात जास्त. हीच उत्पादक पिढी आहे सध्याच्या काळात. मिलेनियल्स ने सगळ्यात जास्त बदलणारा कालखंड पाहिला. अस्ताव्यस्त बदल पचवले मग ते ९० सालात झालेले आर्थिक उदारीकरण असो वा कोरोना महामारी मुळे विस्कळीत झालेली घडी. सध्या तरी मिलेनियल्स खूप मजबूत कनेक्ट आहे या देशाचा. तर जेन झी हा प्रवाह. कोणत्याही वेळी देशात सर्वात जास्त सक्रिय केवळ तीन पिढ्या असतात सध्या जेन एक्स मिलेनियल्स आणि जेन झी ह्या आहेत. यातील जेन एक्स स्थैर्यासाठी खस्ता खाणारी पिढी, मिलेनियल्स बंडखोरी करणारी आणि जेन झी सगळ्यांना फाट्यावर मारणारी. थोडक्यात एक पिढी जागरूक दुसरी बंडखोर आणि तिसरी मस्तवाल. हा एक चमत्कारिक संयोग आहे की एक पिढी वैचारिक संघर्ष करून सुबत्ततेसाठी धडपडली. दुसरी विचारसरणी तावू सुलाखून जोपासणारी अन् तिसरी तंत्रज्ञान, समाजमाध्यमांच्या मोहजालात गुरफटलेली. गेल्या आठ दशकांचा आढावा घेतला तर पुढील दोन दशकात आपण शतक पूर्ण करू स्वातंत्र्याचे आणि या भावी दोन दशकात जेन झी, अल्फा, बीटा वगैरेंचा वरचष्मा असेल. अर्थात मिलेनियल्स तोपर्यंत मार्गदर्शकाच्या भूमिकेत असेल. ही रूपरेषा नीट समजून घेतली तर नक्कीच आपण एक देश म्हणून किमान तीन पिढ्यांना एकत्र बांधून ठेवत असतो. याच देशाचे लघू स्वरूप म्हणजे कुटुंब. एकाच कुटुंबातील वास्तव्य करणाऱ्या तीन पिढ्या एकाच छताखली असतात तेव्हा त्या घरात सगळ्यांची मते सगळ्यांना पटत नाहीत मात्र तीनही पिढीतील लोकांना एकच कुटुंब बांधून ठेवते हे पण तितकेच महत्त्वाचे. वाद विवाद भांडणे कुरबुरी आणि मतभेद यातून कौटुंबिक जीवनाचा प्रवास निरंतर चालू असतो. तसाच देशाचा प्रवास चालू असतो.


एकाच वेळी देशात ॲक्टिव्ह असणाऱ्या तीनही पिढ्यांची सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे बघू. सुरुवातीला आर्थिक परिस्थिती वर चर्चा करू. आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे हे कोणत्याही देशासाठी गरजेचे आहे. त्यासाठी पैसा उभा करणे मग तो जनतेच्या करातून असो सरकारी उद्योग व्यवसायातून. आर्थिक पुरवठा करणाऱ्या संस्था बॅंका आणि संघटना ह्या पर्यायी व्यवस्था आहेत. सरकारी कंपन्या किंवा उद्योग व्यवसाय हेच सर्वस्वी जनतेच्या सेवेसाठी असावेत ही समाजवादी प्रवृत्ती जागतिकीकरणानंतर पार कोलमडून गेली. सरकारने केवळ पायाभूत सुविधा निर्माण करणे कायदा सुव्यवस्था राखणे आणि संरक्षण शिक्षण संशोधन आरोग्य सेवा पुरवणे हे काही अर्थशास्त्री लोकांचे मत. मात्र यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होत जाते हे जागतिकीकरण येण्याआधी समजले. कारण वाढणाऱ्या लोकसंख्येला सरकारी सेवा सुविधा पुरवण्यासाठी पैसा खर्च होतो तो येतो कुठून? मुख्य स्रोत करातून. मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करातून पैसा उभा करावा लागतो. कर्जे ही तात्पुरती मलमपट्टी आहे. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य येण्यासाठी देशात कृषी क्षेत्र उद्योग व्यवसाय सेवाक्षेत्रे वगैरे स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे. अशी क्षेत्रे गेल्या ऐंशी वर्षांत प्रचंड बदलत गेली. समजण्यासाठी ऐंशीचे दोन भाग करू. पहिला चाळीस वर्षांचा कालखंड जागतिकीकरण पूर्व. यात भारतीय उद्योग व्यवसाय सेवाक्षेत्रे सरकारी कृपेवर अवलंबून होती. खाजगी क्षेत्रातील कंपन्या होत्या, छोटे मोठे उद्योग होते मात्र सरकारी नोकरीचा वरचष्मा होता. लोकसंख्या कमी असल्याने सरकारी नोकऱ्या बऱ्यापैकी मिळत होत्या. याच काळातील सरकारी नोकरीत तीस पस्तीस वर्षे पूर्ण करणारी बेबी बूमर्स आणि जेन एक्स ह्या पिढ्या सध्या अस्तित्वात आहेत. मिलेनियल्स ला जागतिकीकरण लागू झाल्यानंतरचा अवकाश मिळाला. त्यामुळे करिअर एक्सप्लोरेशन करण्यासाठी मिलेनियल्सला मिळालेल्या संधी बेबी बूमर्स पेक्षा खूप जास्त आहेत. त्यामुळे या दोन्ही पिढ्यांनी सरकारी अनास्था पाहिली आणि जागतिकीकरणाचे फायदे पण बघितले. आता जागतिकीकरणाची पस्तीशी ओलांडली आहे. आणि मिलेनियल्सला जागतिकीकरण कसे तोट्याचे झाले हे अनुभवण्याशिवाय गत्यंतर नाही. अशा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शिक्षण नोकरी व्यवसाय असणे जिकिरीचे आहे. उत्तम शिक्षण कौशल्य आणि प्रशिक्षण मिळाले तर आर्थिक परिस्थिती चांगली होते सुधारण्यासाठी संधी प्राप्त होतात. यासाठी देशाचे आर्थिक शैक्षणिक धोरण हे देशाच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हेच आर्थिक वा शैक्षणिक धोरण एक्सटर्नली ड्रीव्हन असेल तर काय फायदा? जागतिकीकरण लागू करून आपण आपली आर्थिक प्रगती केली मात्र विषमता कमी करण्यासाठी आपण काय केले? हा प्रश्न प्रत्येक पिढीत विचारला जाणार! आपल्या देशात शैक्षणिक व्यवस्था ही कौशल्यवान रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करते का? करत असेल तर त्यांना तशा संधी उपलब्ध आहेत का? नसतील तर त्या कशा होतील याचा विचार सरकारने करायला पाहिजे. समजा देशात असे मनुष्यबळ उपलब्ध झाले तर ते याच देशासाठी वापरले गेले पाहिजे. उदाहरणार्थ युरोप अमेरिकेने आपल्या देशातील सुपीक मेंदू असलेल्या किमान दोन तीन पिढ्यांना रेड कार्पेट घालून बोलावले. आता पुढच्या पिढ्यांना ही संधी सहजासहजी मिळणार नाही कार जागतिक स्तरावर होऊ घातलेल्या घटना! त्यामुळे या ऐंशी वर्षांत सध्याच्या परिस्थितीत शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होईल अशी धोरणे आखण्यात आली तर पुढच्या काळात काही अमुलाग्र बदल होतील. गेल्या वीस पंचवीस वर्षात आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेचे मातेरे करून ठेवलेले आहे. पुढील वीस वर्षांत आपण आर्थिक प्रगती करू पण आत्मनिर्भर होण्यासाठी स्वयंपूर्ण आहोत का हे बघणे गरजेचे आहे. स्वयंपूर्ण होण्यासाठी आपण कृषीप्रधान देश आहोत हेच पुरेसे नाही. औद्योगिकीकरण ही काळाची गरज वगैरे पुस्तकी वाक्य टाळ्या घेण्यासाठी ठीक आहेत. पण औद्योगिक विकास झाला आणि शेतीच्या विकासाला चालना मिळाली का? शेतीधारित उद्योग वाढले तर फायदा शेतकऱ्यांना होईल की भांडवलदारांना? हे नेहमीचे प्रश्न उभे राहणार आहेत. विकसित भारत होण्यासाठी पुढील वीस वर्षात शिक्षण संशोधन क्षेत्रात सगळ्यात जास्त फोकस असेल तर भरीव कामगिरी करता येईल. 


देशाची सामाजिक राजकीय घुसळण सृष्टीच्या अंतापर्यंत होत राहणार आहे. त्यापेक्षा सांस्कृतिक स्थित्यंतर फार महत्त्वाची होती आणि आहेत. प्रत्येक पिढी ही सांस्कृतिक संक्रमणाच्या अवस्थेतून जात असतेच. काळ जसा बदलतो तसा समाज बदलत जातो. शिक्षणाचा प्रसार जसा वाढत जातो तशी पिढी सुजाण सुशिक्षीत सृजनशील सर्जनशील होत जाते. वैचारिक प्रगल्भता असणारा आणि विवेकी दृष्टिकोन जोपासणारा एक वर्ग नेहमीच धर्माच्या कचाट्यात सापडत नाही. मात्र देवभोळा श्रद्धाळू वर्ग हा नेहमीच सांस्कृतिक दृष्ट्या अस्तित्वात असतो. भारतीय जनमानसावर सांस्कृतिक सभ्यता आचार विचार संस्कार यांचा पगडा कायमस्वरूपी दिसून आला आहे. मानववंश शास्त्रीय दृष्ट्या सिव्हिलायझेशन म्हणजे नागरीजीवन. काही अभ्यासक संस्कृती सभ्यता वगैरेंची व्याख्या वेगळी करतात. काही धार्मिक चष्म्यातून करतात. मात्र ढोबळमानाने नागरीजीवन हे वेगवेगळ्या प्रकारे बघायला मिळते. भाषा, लिपी, लेखनकला, कला, वास्तुकला, शासन प्रशासन राज्यव्यवस्था, सामाजिक आर्थिक पातळीवरील प्रगत झालेला समाज आणि अगदी अलिकडच्या काळातील झालेले शहरीकरण ह्या अंगानी सिव्हिलायझेन वा नागरी संस्कृती वा नागरी जीवन भारतीय पिढ्यानपिढ्या बघत आलेले आहेत. मात्र एक अधिकृत राष्ट्र म्हणून गेली ऐंशी वर्षे उलटून गेली आहेत. त्याआधी आपण राष्ट्रापेक्षा संस्थानिकं राज्य साम्राज्य खंड उपखंड वगैरेंचा समूह म्हणून ओळखला जात होतो. परकीय गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र देश म्हणून आपण आपल्या कारभाराची ऐंशी वर्षे पूर्ण केली आहेत. ही ऐंशी वर्षे म्हणजे सहस्रचंद्रदर्शन समजून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.


१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२६ या ऐंशी वर्षांच्या कालावधीत पंतप्रधानांनी दिलेल्या ऐंशी भाषणांचा आढावा घेऊ. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ही भाषणं देशाला संबोधित करतात. लाल किल्ल्यावरून होणारे हे भाषण केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून, तो भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानाचे स्मरण करण्याचा आणि एका बलशाली राष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प सोडण्याचा राष्ट्रीय सोहळा आहे. हीच भाषणे कशासाठी? तर पंतप्रधान देशासमोर या भाषणातून देशाच्या प्रगतीचा आढावा घेतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांसमोर, लष्कराच्या तुकड्यांसमोर आणि शाळकरी मुलांसमोर हे भाषण होते. सर्वसामान्य नागरिक पण ही भाषणं उत्सुकतेने ऐकतात. मागील वर्षातील कामगिरी, देशापुढील आव्हाने आणि भविष्यातील विकासाची दिशा यावर पंतप्रधान सविस्तर भाष्य करतात. सत्तेत कोणताही पक्ष किंवा पंतप्रधान असला, तरी राजकीय पक्षांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन ही राष्ट्रीय परंपरा गेल्या ८० वर्षांपासून दरवर्षी न चुकता पाळली जात आहे. सुरुवात आपण नेहरूंनी दिलेले ऐतिहासिक भाषणापासून करू. ट्रिस्ट विद डेस्टिनी. या भाषणात एक वेगळाच रोमॅंटीसिझम आहे. मात्र या भाषणात महत्त्वाचे मुद्दे काय होते ते बघू. दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिलेल्या आणि सोशिक राहिलेल्या 'राष्ट्राचा आत्मा' आता मोकळा श्वास घेत आहे, अशी भावना नेहरूंनी व्यक्त केली. जात, धर्म किंवा वर्गाच्या भिंती पलीकडे जाऊन सर्व भारतीयांनी एकत्र येऊन एका लोकशाही, प्रगतशील आणि न्याय्य राष्ट्राची निर्मिती करण्याचा आशावाद त्यांनी ठेवला. (गंमत म्हणजे धर्माच्या नावावर देशाचे दोन तुकडे केले गेले आणि हा आशावाद म्हणजे पराकोटीचा विरोधाभास होता पण भारतीयांना सहन करण्याची दुर्दम्य शक्ती प्राप्त झाली आहे कायमस्वरूपी.) या भाषणात सामान्य जनतेच्याकल्याणाचा संकल्प आणि जागतिक शांतता आणि मानवता या विषयावर भाष्य केलं. देशातील गरीब, शेतकरी, कामगार आणि उपेक्षितांच्या चेहऱ्यावरचे अश्रू पुसणे, तसेच गरिबी, निरक्षरता आणि आजारपण संपवणे हे नवभारत निर्माण करणाऱ्यांचे मुख्य ध्येय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. भारत केवळ स्वतःच्या विकासापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी, शांततेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी जगासोबत मिळून काम करेल, असा विश्वास त्यांनी भाषणात व्यक्त केला होता. हा थोडक्यात सारांश पहिल्या भाषणाचा. नेहरू १९४७ ते १९६४ पर्यंत पंतप्रधान राहिले होते. त्या काळात त्यांनी आपल्या भाषणात देशाच्या लोकशाहीसाठी जी पायाभरणी केली त्याबद्दलचे मुद्दे महत्त्वाचे होते. नंतर पंचवार्षिक योजना, आधुनिक भारतातील कारखाने कृषी क्षेत्रातील बदलांसाठी योजना, धरणे याबाबत धोरण जाहीर करणे अंमलबजावणी करणे ही महत्त्वाची कामे होती. वैज्ञानिक दृष्टिकोन, शैक्षणिक धोरण, आंतरराष्ट्रीय शांतता आणि अलिप्ततावाद यावर केलेल्या भरभक्कम सुधारणा या लोकांना अधिक आकर्षित करत होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली वीस वर्षे स्थिरस्थावर होण्यासाठी चाचपडण्यासाठी होती असे आपण म्हणू शकतो. याच काळात १९६२ साली चीन ने लडाख आणि अरूणाचल प्रदेशच्या सीमा ओलांडून विस्तारवादी धोरण तीव्र केले हे काही साम्यवादी सुपीक मेंदूतील विचार. मात्र ते एक युद्ध होते जे कसलीही प्रबळ तयारी न करता भारताला सर्वात मोठा धक्का बसला होता. यातून आपल्याला लष्कराच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष देण्याची किती गरज आहे हे समजले. सीमावर्ती भागातील शस्त्रास्त्र पुरवठ्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याने देशाचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी करावे लागणाऱ्या बदलांची सुरुवात स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या शेवटच्या २० महिन्यांत (१९६२ ते १९६४) केली असली, तरी त्यांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचे आणि त्याचे परिणाम दाखवण्याचे मोठे काम नंतरच्या दोन पंतप्रधानांच्या काळात झाले. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त प्रभावीपणे लष्कर आधुनिकीकरण आणि परराष्ट्र धोरणात बदल झाले.


भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते, यांनी त्यांच्या कार्यकाळात दिल्लीतील लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्टला एकूण २ भाषणे (१९६४, १९६५)दिली होती. पंडित नेहरूंच्या निधनानंतर (मे १९६४) अवघ्या काही महिन्यांतच शास्त्रीजींनी हे पहिले भाषण दिले. त्यावेळी देश अन्नधान्याच्या मोठ्या टंचाईला सामोरा जात होता. देशातील अन्नधान्य संकट आणि वाढत्या महागाईवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी जनतेला अन्नाची नासाडी थांबवण्याचे आणि साधे राहण्याचे आवाहन केले. भारताचे परराष्ट्र धोरण शांततेचेच राहील आणि शेजारी राष्ट्रांशी संवाद साधून प्रश्न सोडवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दुसरे १९६५ चे भाषण अत्यंत ऐतिहासिक ठरले, कारण त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात छुपे युद्ध (कच्छचे रण आणि काश्मीरमधील घुसखोरी) सुरू झाले होते. या भाषणाच्या काही दिवसांनंतरच संपूर्ण युद्धाला सुरुवात झाली. शास्त्रीजींनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले की, "जर भारताच्या अखंडतेला आणि काश्मीरला हात लावण्याचा प्रयत्न केला, तर भारत त्याचे चोख प्रत्युत्तर लष्करी ताकदीने देईल". त्यांचा 'जय जवानजय किसान' हा नारा देत शेतकरी आणि जवानांच्या योगदानाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात महत्त्वपूर्ण होता. १९६२ च्या पराभवामुळे खचलेल्या भारतीय लष्कराला शास्त्रीजींनी खंबीर राजकीय पाठबळ दिले. त्यांनी लष्कराला अंतर्गत निर्णयात संपूर्ण मोकळीक दिली. त्यामुळे सैन्याचे मनोधैर्य उंचावले. यातूनच भारताने अवघ्या ३ वर्षांत १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारली. चीनच्या युद्धातील धड्यांमुळे भारतीय सैन्याने घेतलेले नवे प्रशिक्षण आणि आधुनिक शस्त्रे या युद्धात खूप प्रभावी ठरली. ह्या सर्वोच्च कामगिरी सोबत देशातील अन्नधान्याची टंचाई दूर करून स्वावलंबी बनवण्याचे आवाहन आणि हरित क्रांती साधण्यासाठी राजकीय पाठबळ शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. आणि नंतर इंदिरा गांधी यांनी या मोहिमेला पूर्ण राजकीय पाठबळ दिले, तर सी. सुब्रमण्यम हे तत्कालीन कृषी मंत्री होते. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना 'भारतातील हरित क्रांतीचे जनक' म्हटले जाते. त्यांनी डॉ नॉर्मन बोरलॉग यांच्या तंत्रज्ञानाचा भारतीय शेतीत यशस्वी वापर केला. आपण खाण्यासाठी अमेरिकेकडून पीएल-४८० योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचा गहू आयात करत होतो. हरित क्रांती नंतर भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आपल्याला दुसऱ्या देशांसमोर हात पसरण्याची गरज उरली नाही. गव्हाच्या आणि तांदळाच्या उत्पादनात ५००% पेक्षा जास्त वाढ झाली. विशेषतः पंजाब, हरियाणा आणि पश्चिमेकडील उत्तर प्रदेश या राज्यांना याचा सर्वात जास्त फायदा झाला. ह्या तीनही गोष्टी म्हणजे चीन आक्रमण पाकिस्तानचा पराभव आणि हरित क्रांती ६०-७० च्या दशकातील फार मोठ्या ऐतिहासिक घटना होत्या. 


इंदिरा गांधी यांच्या काळात (१९६६ - १९७७ आणि १९८० - १९८४) देशात आमुलाग्र बदल झाले.  भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या संपूर्ण पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून एकूण १६ वेळा राष्ट्राला संबोधित केले होते. यात त्यांनी १९६६ ते १९७७ या सलग कालखंडात ११ वेळा आणि त्यानंतर १९८० ते १९८४ या काळात ५ वेळा ध्वजारोहण करून भाषणे दिली होती. लाल बहादूर शास्त्रींच्या अचानक निधनानंतर जेव्हा इंदिरा गांधींनी सूत्रे हाती घेतली, तेव्हा देश दुष्काळ, अन्नधान्याची टंचाई आणि आर्थिक संकटातून जात होता. त्यांच्या सुरुवातीच्या भाषणांत अन्नधान्यात स्वावलंबी होणे, हरितक्रांतीला बळ देणे आणि देशाला अंतर्गत व बाह्य आव्हानांवर मात करण्यासाठी सक्षम बनवण्यावर भर होता. बांगलादेशच्या मुक्तीयुद्धानंतर आणि १९७१ च्या विजयानंतर त्यांच्या भाषणात एक नवा आत्मविश्वास आणि कणखरपणा दिसून आला. भारताची लष्करी ताकद आणि दक्षिण आशियातील सार्वभौमत्व यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली. ही एक सर्वात मोठी ऐतिहासिक घटना होती. आणीबाणीपूर्वीच्या काळातील भाषणांमध्ये देशातील शिस्त, आर्थिक सुधारणा, २० कलमी कार्यक्रम आणि गरिबी निर्मूलनाच्या योजनांचा वारंवार उल्लेख पाहायला मिळतो. आणीबाणीच्या प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर सत्तेत आलेले मोरारजी देसाई (१९७७ - १९७९) हे भारताचे पहिले गैर-काँग्रेसी पंतप्रधान होते. लाल किल्ल्यावरील भाषणात त्यांनी आणीबाणीच्या काळात दुभंगलेली लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे पुनरुज्जीवन करण्यावर भर दिला. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. याशिवाय, ग्रामीण विकास, कुटीर उद्योग (खादी व ग्रामोद्योग) यांना बळकटी देणे आणि परराष्ट्र धोरणात शांतता व सत्याचा पुरस्कार करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. अत्यंत अल्प काळ सत्तेत राहिलेले चरण सिंह (१९७९ - १९८०) हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जात असत. लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणाचा मुख्य केंद्रबिंदू नेहमीच शेतकरीशेतमजूर आणि ग्रामीणअर्थव्यवस्था हा राहिला. भारताचा विकास हा शहरांच्या नाही, तर खेड्यांच्या विकासातूनच होईल, यावर त्यांनी जोर दिला. शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि ग्रामीण भागात पायाभूत सुविधा पोहोचवल्या जाव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. यानंतर पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांच्या दुसऱ्या कारकिर्दीची सुरुवात झाली. यात पण बऱ्याच ऐतिहासिक घटना घडल्या होत्या. १९८० मध्ये सत्तेत पुन्हा परतल्यानंतरच्या भाषणांमध्ये त्यांनी देशाची एकता, अखंडता आणि जातीय सलोख्यावर विशेष भर दिला. यादरम्यान देशात पंजाब आणि ईशान्य भारतात वाढत्या दहशतवादाचे व फुटीरतावादी शक्तींचे नवे संकट उभे ठाकले होते. देशाचे आधुनिकीकरण, वैज्ञानिक प्रगती (उदा. अंतराळ कार्यक्रम आणि अण्वस्त्र संशोधन) या मुद्द्यांसोबतच देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणाऱ्या शक्तींविरुद्ध सावध राहण्याचे आवाहन त्यांनी आपल्या शेवटच्या भाषणांत केले. ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांच्या हत्येपूर्वी त्यांनी १५ ऑगस्ट १९८४ रोजी लाल किल्ल्यावरून आपले शेवटचे भाषण दिले होते. इंदिरा गांधींच्या भाषणांचा एकूणच सुर हा "देशाची अंतर्गत सुरक्षागरिबीहटावअन्नधान्याचे स्थैर्य आणि कणखर राजकीय निर्णय" यांभोवती केंद्रित होता. एका बाजूला परकीय आव्हाने आणि दुसरीकडे देशांतर्गत आर्थिक व सामाजिक अस्थिरता अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी देशाला मार्गदर्शन केले. एकूणच इंदिरा गांधी यांची राजकीय कारकीर्द वादळी होती हे मात्र निश्चित.


इंदिरा गांधींच्यानंतर राजीव गांधींनी संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाची पायाभरणी केली. तरुण आणि एनर्जेटिक नेतृत्व म्हणून आलेले राजीव गांधी (१९८४ - १९८९) यांनी भारताला आधुनिक युगात नेण्याची स्वप्ने पाहिली. लाल किल्ल्यावरील भाषणात त्यांनी भारतात माहिती तंत्रज्ञान, संगणक आणि दूरसंचार क्रांती ची पायाभरणी केली. "भारताला एकविसाव्या शतकात न्यायचे आहे," हा त्यांच्या भाषणाचा मुख्य सूर होता. तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी शिक्षण प्रणालीत बदल, मतदान करण्याचे वय २१ वरून १८ वर्षे करणे आणि पंचायती राज व्यवस्थेला बळकटी देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. विश्वनाथ प्रताप सिंग (व्ही. पी. सिंग) (१९८९ - १९९०)  हे अल्पकाळ पंतप्रधान राहिले. सामाजिक न्यायाच्या राजकारणाला राष्ट्रीय पटलावर आणणारे व्ही. पी. सिंग यांनी लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणाचा मुख्य भर सामाजिक न्याय आणि समता यावर होता. मंडल आयोगाच्या माध्यमातून मागासवर्गीयांना आरक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. ग्रामीण भागातील उपेक्षित घटक, सर्वसामान्यांचे सक्षमीकरण आणि प्रशासकीय पारदर्शकता या मुद्द्यांवर त्यांचे भाषण केंद्रित होते.


चंद्रशेखर (१९९० - १९९१) पंतप्रधान असताना ज्यावेळी देशासमोर अत्यंत गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले होते, तेव्हा चंद्रशेखर यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात देशाचा परकीय चलन साठा खालावत चालला असताना आणि अंतर्गत सामाजिक-राजकीय अशांतता असताना त्यांनी राष्ट्रहिताला आणि राष्ट्रीय एकात्मतेला सर्वोच्च प्राधान्य दिले. गरिबी, सामाजिक सलोखा टिकवणे आणि कठीण आर्थिक परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी लाल किल्ल्यावरून केले होते. यानंतर पी व्ही नरसिंह रावांनी पंतप्रधान म्हणून कारकीर्द गाजवली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान म्हणून पी व्ही नरसिंह राव भारतीय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे आणि आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान म्हणून लालकिल्ल्यावरील भाषणात त्यांनी आपल्या भाषणातून एलपीजी (LPG - Liberalization, Privatization, Globalization) धोरणाची घोषणा करत भारतीय अर्थव्यवस्थेची दारे जागतिक बाजारपेठेसाठी खुली केली. परराष्ट्र धोरणात 'लुक ईस्ट' धोरणाचा स्वीकार करून आग्नेय आशियाई देशांसोबत संबंध सुधारण्यावर त्यांनी भर दिला. मंदीच्या गर्तेत असलेल्या देशाला आर्थिक सुबत्तेच्या मार्गावर नेण्याचे मोठे धाडस त्यांनी दाखवले. या जागतिकीकरणाच्या युगात भारतात न भूतो न भविष्यति असे बदल घडायला सुरुवात झाली. सगळ्यात जास्त सामाजिक राजकीय स्थित्यंतरे या काळात घडली. एच. डी. देवेगौडा (१९९६ - १९९७) यांचे युनायटेड फ्रंट अल्पकालीन सरकार होते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून देशाच्या उच्च पदापर्यंत पोहोचलेले एच. डी. देवेगौडा यांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र करून सरकार चालवले. त्यांनी आपल्या भाषणात सहकारी संघराज्य पद्धती बळकट करण्यावर भर दिला. देशातील प्रादेशिक असमंतोल दूर करणे, राज्यांना अधिक अधिकार व निधी देणे आणि कृषी व सिंचन प्रकल्पांना गती देणे हे त्यांच्या भाषणाचे कळीचे मुद्दे होते. नंतर आलेल्या इंद्र कुमार गुजराल (आय. के. गुजराल) (१९९७ - १९९८) यांची उत्कृष्ट मुत्सद्दी आणि परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक म्हणून ओळख होती. लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणाचा मुख्य सुर 'गुजराल सिद्धांत' वर आधारित होता, ज्यानुसार भारताने शेजारी राष्ट्रांसोबत एकतर्फी सलोख्याचे व मैत्रीचे संबंध ठेवावेत यावर त्यांनी भर दिला. दक्षिण आशियाई भागात शांतता, सुरक्षितता आणि परराष्ट्र संबंधांमध्ये भारताची उदार व मोठी भूमिका असणे गरजेचे आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून मांडले.


अटलबिहारी वाजपेयी (१९९८ - २००४) यांनी पंतप्रधान पदावर असताना कणखर राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळख मिळवली. देशाने उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांना पहिल्यांदा सत्तेत पाहिले. वाजपेयींनी लाल किल्ल्यावरील भाषणात त्यांच्या काळातील भारताच्या वाढत्या वैज्ञानिक आणि सामरिक ताकदीचे दर्शन घडवले. १९९८ च्या पोखरण अणुचाचण्यानंतर भारताची ताकद जगाने पाहिली. 'जय जवान, जय किसान' मध्ये 'जय विज्ञान'ची भर त्यांनी घातली. तसेच देशातील रस्ते विकासासाठी 'सुवर्णचतुष्कोन' आणि पंतप्रधान ग्राम रस्ते योजना यांसारख्या प्रकल्पांची घोषणा करून पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी भर दिला. कारगील युद्धानंतर देशाच्या सुरक्षेविषयी त्यांचा आवाज अत्यंत कणखर होता. वाजपेयींची लोकशाही आघाडी २००४ मध्ये सत्तेतून बाहेर पडली आणि पुन्हा एकदा कॉंग्रेस सत्तेत आली ते २००४ ते २०१४ सलग दहा वर्षे. अर्थतज्ज्ञ आणि शांत स्वभावाचे नेते म्हणून डॉ. मनमोहन सिंग  (२००४ - २०१४) यांनी एक दशक देश चालवला. १५ ऑगस्ट ला जी काही भाषणं झाली या दशकात त्या भाषणांचा मुख्य उद्देश सर्वसमावेशक विकास हा होता. ग्रामीण गरिबांसाठी मनरेगा योजना आणून त्यांना रोजगाराची कायदेशीर हमी देण्यात आली. माहिती अधिकार कायदा आणि शिक्षण हक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा यांसारख्या क्रांतिकारी कायद्यांच्या माध्यमातून पारदर्शकता आणि शिक्षणाचा अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचे भाषण केंद्रित होते. २०१४ नंतरच्या कालखंडाने भारताच्या राजकारणात आणि विकासात एक वेगळाच टप्पा गाठला आहे. राजकीय घराण्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी हा काळ अत्यंत महत्वाचा ठरला आहे. जनतेने जे जे सक्षम सरकार स्थापन करतील त्यांना सत्तेत बसवले आहे. या दहा वर्षांत भाजपा मजबूत झाली आहे तळागाळात. संपूर्ण देशात कॉंग्रेस नंतर कशी गावपातळीवर मजबूत होणारी राजकीय संघटना म्हणजे भाजपा. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात 'स्वच्छ भारत अभियान', जनधन खाती, डिजिटल इंडिया, आणि मेक इन इंडिया वर त्या त्या भाषणांमध्ये जोर दिला. अलीकडील काळात भारताला 'विकसित भारत २०४७' बनवण्याचे ध्येय, सेमीकंडक्टर निर्मिती, स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारताला जागतिक स्तरावर आत्मनिर्भर व महासत्ता बनवणे यावर स्वातंत्र्यदिनीच्या भाषणात भर दिला. डिजिटलइंडिया आणि पायाभूत सुविधा या मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या. आधुनिक रेल्वे रस्ते मेट्रो प्रकल्प लोकांच्या वापरात आले. जनधन खाती, आधार आणि मोबाईल यांच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण सुरू झाले, ज्यामुळे पारदर्शकता आली. युपीआय मुळे देश पूर्णपणे डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळला, ज्याचा फायदा आज जेन झी आणि मिलेनियल्स सहजपणे घेत आहेत. मेक इन इंडियासंरक्षण साहित्यापासून ते मोबाईल आणि सेमीकंडक्टर निर्मितीपर्यंत भारताला जागतिक पातळीवर 'मॅन्युफॅक्चरिंग हब' बनवण्याचा विडा या काळात उचलण्यात आला आहे. या येत्या वीस पंचवीस वर्षांत होताना देश स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करत असताना, २०४७ पर्यंत भारताला एका विकसित राष्ट्राच्या श्रेणीत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, स्पेस टेक (चंद्रयान आणि गगनयान), आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून तरुणांना संधी देण्यावर भर दिला जात आहे. आजची जेन झी आणि अल्फा पिढी याच आधुनिक आणि ग्लोबल भारताच्या वातावरणात मोठी होत आहे.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचवार्षिक योजना आखली गेली. त्यानुसार गेल्या ऐंशी वर्षांत वर्षात जे जे घडले त्याबाबत प्रस्तुत लेखातून प्रमुख मुद्दे स्वातंत्र्यदिनी भाषणातून आले आहेत त्यावर सारांश रूपाने लिहिले आहे. कारण सध्याच्या काळात नेहरू ते मोदी या दोन नेत्यांच्या सत्ताकाळाचा प्रचंड मोठा अवाका कुत्सितपणे चर्चिला गेला आहे. सलग दोन पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी दहा वर्षे एकाच पक्षाकडे जर सत्ता टिकली तर फरक पडू शकतो का? नक्की फरक पडतो. मात्र त्यानंतर जी जी कामे केली जातात त्याबाबत लोकांमध्ये काय भावना आहेत यावर लक्षणीय चर्चा झाली पाहिजे. अशी दशकभराची सलगपणे सत्ता आजपर्यंत फक्त नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहनसिंग आणि मोदी यांनाच लाभली. त्यामुळे सलग दोन पंचवार्षिक योजनेत नेमकं काय काय करता येते आणि जनतेला नक्की काय सुविधा मिळतात यावर भाष्य करणं गरजेचं आहे. त्यातही नेहरू, इंदिरा गांधी यांची सरकारे ९० च्या दशकाआधी तर मनमोहनसिंग, मोदी यांची सरकारे जागतिकीकरणानंतरची. ही मांडणी खूप महत्त्वाची आहे. हा चर्चेचा मुद्दा लक्षात घेऊन देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकिय पटलावर घडणाऱ्या घटनांचा उल्लेख केला आहे.


उदाहरणार्थ एखाद्याच्या नेतृत्वाखाली एकत्र कुटुंब राहत असेल तर दहा वर्षांत त्या कुटुंबातील सदस्यच त्या दहा वर्षांत जे घडलं त्याबद्दल व्यक्त होऊ शकतात कारण त्यांचं जगणं आणि जडणघडण त्याच काळातील असते. हा अनुभव मोठा चमत्कारिक असतो. फायदे, तोटे विशद करण्यासाठी. शेजारच्या कुटुंबांना फक्त काय घडले हे त्रयस्थपणे बघता येते. दहा वर्षांत कुटुंबातील नेतृत्व जे निर्णय घेतात ते फायद्याचे की तोट्याचे हे त्याच कुटुंबातील सदस्य अनुभवाने सांगितले तर निर्णय चुकीचे होते की फायद्याचे हे समजते. शेजारच्या कुटुंबांना फक्त आँखो देखा हाल समजतो ते काही त्या अनुभवातून गेलेले नसतात. हे उदाहरण लक्षात घेतले तर कळेल की आजपर्यंत आपण त्रयस्थ देशाच्या मतांवर आपल्या देशातील प्रगतीची मांडणी केली. तो आधार घेऊन आपल्या देशात काय नको काय पाहिजे ह्यावर वादविवाद झाले. अनुकरण आणि अंधानुकरण यासाठी ह्या बाबींचा सर्वात मोठा पाया असतो. विशेषतः योजना, सामाजिक निर्णय, जागतिक पातळीवर परिणाम लक्षात घेऊन देशात राबविले जाणारे प्रकल्प अशा अनेक चांगल्या वाईट गोष्टी नकळतपणे देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे टप्पे असतात. देशाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घुसळण होऊन त्यातून नक्की काय महत्त्वाचे बाय प्रॉडक्ट तयार होते हे सलगपणे दहा वर्षांतील सत्ता राबवल्यानंतर समजते.


देशात सध्याच्या वातावरणात जनतेला दहा वर्षांत मोदींनी पंतप्रधान पदी आल्यानंतर जे जे निर्णय घेतले त्यापैकी काय फायद्याचे किती तोट्याचे यावर मतदान करण्यासाठी खूप मोठा अवकाश मिळाला आहे. २०१४ ला कॉंग्रेस नको म्हणून भाजपाला सत्तेवर आणलं जनतेने बहुमताने. २०१९ ला पुलवामा झाल्यावर जे घडलं त्याचा मोठा प्रभाव जनतेवर पडला. दुसऱ्या वेळी बहुमताने निवडून येणं मोदींच्या करिश्म्यावर झाले. कारण भाजपात तोवर सबकुछ मोदी असंच झालं होतं. २०२४ ला झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या ४०० पार च्या वल्गनांना जनतेने २४० वर आणून ठेवले. हे फार महत्वाचे आहे. भारतीय राजकारणात जनतेचा सहभाग निर्णायक असतो हे सिद्ध करण्यासाठी. निवडणुकीत जनता नेहमी मूलभूत गरजा भागविण्यासाठी ज्या आवश्यक सेवा आहेत त्याबाबत जागरुकतेने मतदान करते. जातपात धर्म वगैरे गोष्टी बघून मतदान करणाऱ्या लोकांचा एक प्रभावशाली गट नेहमी असतोच. साधारणपणे सध्याच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट , ऑनलाईन युपीआय पेमेंट व्यवस्था, डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर, जेनेरिक मेडिसिन, सरकारी मिळणाऱ्या ऑनलाईन सुविधा आणि प्रवासासाठी कनेक्टिव्हिटीच्या सरकारी सुविधा या महत्त्वाच्या गोष्टींची जनतेला भूरळ पडते. यानंतर भ्रष्टाचार महागाई वगैरे मुद्दे उपस्थित होतात. याचं कारण प्रत्येक पक्षाने आपापली व्होट बँक, इको सिस्टिम तयार केलेली आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा दुरुपयोग भारतात झाला तो हाच. प्रत्येक सत्ताधाऱ्यांच्या काळात सत्तेचा वापर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कमी आणि आपापली इको सिस्टिम मजबूत होईल अशीच काळजी घेतली गेली. अन्न, वस्त्र, निवारा, वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या महत्त्वाच्या मूलभूत मुद्द्यांवर गेली कित्येक दशकं निवडणूक होते आहे. वरील किमान गरजा पूर्ण होण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी. ह्या गरजांची पूर्तता होण्यासाठी एक साचेबद्ध आणि सर्वांना सहजगत्या उपलब्ध होईल अशी लोकाभिमुख व्यवस्था सहज उभी राहू शकते. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ८० वर्षांत जर आपली सरकारे सर्वसामान्य जनतेला ह्या गोष्टी पुरवठा करू शकत नाही म्हणजे कुचकामी व्यवस्था आहे हे अधोरेखित होते. आपल्याकडे व्यवस्था परिवर्तनासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने पुढाकार घेतला नाही. व्यवस्था कशी सत्ता बळकट होण्यासाठी पूरक ठरेल हेच बघितले गेले. 


आज २०२६ मध्ये जेव्हा सलगपणे दोन दशकं सत्ता भोगलेले समोरासमोर निवडणुकीत उभे ठाकतात तेव्हा त्यांच्या कार्यकाळात जे घडले त्याची चिरफाड होणं गरजेचं आहे. जे चांगले ते चांगले म्हटले पाहिजे. जे वाईट आहे ते वाईटच राहणार. चांगले काय वाईट काय हे ठरवण्यासाठी सारांश काय तर आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक ह्या फुटपट्टीवर देशात नेमकं काय बदललं हे बघणं महत्त्वाचं असतं कोणत्याही निवडणुकीमध्ये. सर्वसामान्य जनता याबाबतीत फार प्रगल्भ आहे. प्रत्येक पंतप्रधानांच्या काळात आव्हानांचे स्वरूप बदलले, पण भारताला पुढे नेण्याच्या प्रवासात प्रत्येक पिढीने आपले झपाटलेपण कायम राखले आहे. नेहरूंच्या काळातील पायाभूत जडणघडण, इंदिरा गांधींच्या काळातील 'अन्न आणि सुरक्षेची गरज' ते मोदींच्या काळातील 'तंत्रज्ञानस्वावलंबन आणिजागतिक महासत्ता' बनण्याच्या स्वप्नात रूपांतरित झाली आहे. या ८० वर्षांत देशाने गरिबीपासून ते डिजिटल क्रांतीपर्यंतचा प्रचंड मोठा पल्ला गाठला आहे. स्वतंत्र भारताच्या या ऐंशी वर्षांच्या प्रवासात, अनेक वेगवेगळ्या राजकीय पार्श्वभूमीतून आलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले आहे. यामध्ये काही पंतप्रधान पूर्ण मुदतीचे होते, तर काही अल्पकालीन सरकारांचे नेतृत्व करणारे होते. या सर्व पंतप्रधानांनी आपापल्या कालखंडानुसार देशाच्या गरजा, आव्हाने आणि विकासाची दिशा ठरवत लाल किल्ल्यावरून महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.या सर्व पंतप्रधानांनी आपापल्या कालखंडात देशासमोर उभी राहिलेली आव्हाने लीलया पेलली. कोणाच्या वाट्याला आर्थिक संकटाचा काळ आला, तर कोणाला युद्धाचा किंवा सामाजिक बदलांचा लढा द्यावा लागला. भविष्यात पण असेच बदल घडणार आहेत. येत्या काळात पंतप्रधान कोणीही असेल सत्ता कोणाचीही असेल मात्र देशाच्या हितासाठी हा प्रवास असाच चालू राहील निरंतरपणे! 


©️भूषण वर्धेकर

१७ ऑगस्ट २०२६

पुणे 

बुधवार, २९ एप्रिल, २०२६

भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र

 भाषिक अस्मिता आणि महाराष्ट्र 

महाराष्ट्रात जर राजकीय विचार मराठी अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व बहरलं असतं. जशा दक्षिणेत भाषिक अस्मिता कट्टर आहेत तशा. तसेच सामाजिक विचारधारा म्हणून जर पुरोगामी विचार पुढे आणला गेला असता तर सामाजिक विषमता वाढली नसती. कारण सामाजिक विषमता वाढीस लावली जाते ती राजकीय फायद्यासाठी. महाराष्ट्रात झालं नेमके उलटे! आपण राजकीय भूमिका पुरोगामी म्हणून स्वीकारली आणि राजकारणी मंडळींना आयतं चरायला कुरण दिलं आणि सामाजिक भूमिका म्हणून मराठी भाषेच्या अस्मितेचा डोस दिला गेला. याचा परिणाम असा झाला की पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादी राजकारण गावपातळीपर्यंत मुरले. भाषा टिकली तर आपण टिकून राहू एकसंध राहू ही जाणीव भाषिक अस्मिता जर रुजली तर एकछत्राखाली सर्व जातपात धर्म येतात. कारण भाषा ही संस्कृतीचा कणा असतो त्यासाठी भरभक्कमपणे राजकीय आशीर्वाद असायलाच पाहिजे. याच्या उलट जर सामाजिक विचार पुरोगामी सर्वधर्मसमभाव म्हणून स्वीकारला तर सर्वसमावेशक समाज म्हणून आपण एकत्र राहू जातपातधर्म न बघता. कारण सामाजिक प्रश्न समस्या या सामाजिक पद्धतीने एकमेकांशी संवाद साधून सोडवता येतात. राजकीय प्रश्न समस्या सोडवण्यासाठी राजकीय दृष्टीने योग्य ते निर्णय घेतले जातात. यात जे सत्ताधारी आहेत त्यांचाच वरचष्मा असतो. महाराष्ट्रात सामाजिक प्रश्न समस्या राजकीय नेत्यांनी सोडवल्या पाहिजेत ही आपली अपेक्षा असते. राजकीय प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपण सामाजिक पद्धतीने सोडवण्यासाठी धडपड करतो. दोन्ही बाजूंनी आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो. अशाप्रकारे महाराष्ट्रात ना भाषिक अस्मिता कणखर झाली ना पुरोगामी विचार टिकून राहिला. अशी त्रेधातिरपीट झाल्यानंतर ना पुरोगामी विचार जनसामान्य जनतेत मुरला ना भाषिक अस्मिता सर्वदूर पसरल्या. याला सर्वस्वी जबाबदार मराठी माणूस जसा आहे तसाच आपली राजकीय विचारधारा. 


भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्र हा देखील काही प्रमाणात कारणीभूत आहे मराठी अस्मिता टोकदार न होण्यासाठी. भौगोलिक परिस्थिती नुसार आपण हिंदी पट्ट्याच्या अगदी जवळ आहोत. त्यामुळे हिंदी भाषिक संस्कृती आपण लगेच आत्मसात केली. या उलट हिंदी भाषिक लोकांनी मराठी संस्कृती लगेच आत्मसात केली का? का नाही केली? आज कामचलाऊ मराठी बोलणारे लोक असो वा मराठी अजिबात न बोलणारी मंडळी आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडत असतात. मराठी हिंदी लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचे साधर्म्य आहे. त्यामुळे वाचन लेखन आणि बोलणे यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. हिंदी मुळात अनेक बोलीभाषा एकत्र करून तयार झालेली आहे. लिखाणाची भाषा आजही प्रमाणित शुद्ध हिंदी वापरली जाते. संस्कृत प्रचुर हिंदी असो उर्दू मिश्रित हिंदी असो दोन्ही व्हर्जन महाराष्ट्रात वापरले जातात. या व्यतिरिक्त बम्बैया हिंदी जी बॉलीवूड मुळे अनेकांच्या तोंडी रूळली. हिंदी भाषिक कधीकाळी महाराष्ट्रात केवळ मोठ्या शहरापुरते मर्यादित होते. कालांतराने नोकरी धंदा उद्योग करण्यासाठी स्थलांतरित कैक हिंदी भाषिक उत्तरेतून महाराष्ट्रात स्थायिक झाले. किमान तीन चार पिढ्या महाराष्ट्रात राहिल्या. त्यामुळे हिंदी आणि मराठीचे सख्य वाढत गेले. विशेषतः मुंबईत मराठी माणूस घाटी म्हणून कधीकाळी ओळखला जायचा. कारकुनी कामं करणारा मराठी माणूस. हीच प्रतिमा साहित्य चित्रपट वगैरे माध्यमात प्रचलित झाली. मराठी माणूस कारकून बनला याला महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रिटिश. ब्रिटिश काळात विशेषतः १७ वं आणि १८ वं शतक हे बॉम्बे प्रेसिडन्सी मधलं कारखाने उद्योगात आघाडीवर होतं. तशी कारखानदी कलकत्ता आणि मद्रास प्रेसिडन्सी मध्ये पण होती. मात्र मराठी माणूस कारकून म्हणून बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये आला स्थिरावला. अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत मराठी माणसाची मुंबईत टक्केवारी बरीच वाढली होती. कापड गिरणी, जहाज बांधणी आणि इतर उद्योग हे मराठी माणसाच्या रोजीरोटीचे प्रमुख साधन होते. त्यामुळे मराठी सत्ता ही आर्थिक होण्यासाठी जी एक उद्योजक, कारखानदार आणि व्यवसाय पिढी मराठी माणूस वाढायला पाहीजे होती ती कधीच जोमाने वाढली नाही. शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला तसा मराठी माणसांचा व्यवसाय उद्योग वगैरे वाढला नाही. कदाचित रिस्क न घेण्याचा विचार आणि नोकरशाही हीच सेफ साईड म्हणून बघितली गेली असेल. याचा परिणाम असा झाला की मराठी माणसाव्यतिरिक्त अन्य दक्षिणी आणि उत्तर भारतीय लोकांना जशा संधी उपलब्ध झाल्या तशा त्यांनी उपयोगात आणल्या. त्यामुळे आर्थिक केंद्र म्हणून उदयास आलेली मुंबईची गोची अशी होती की महाराष्ट्रात मुंबई पण आर्थिक राजधानीत प्रस्त वाढले अमराठी लोकांचे! काही काळ मराठी अस्मिता म्हणून राजकारण तापलं. मात्र या राजकारणात मोठा मराठी भूभाग आकुंचन पावत गेला याच्या उलट अमराठी भूभाग अजून प्रसरण पावत गेला. आज एकविसाव्या शतकात अडीच दशके उलटून गेली आहेत आणि फक्त मूळ मराठी टक्केवारी बघितली तर लक्षात येईल मूळ मुंबईतून मराठी माणूस उपनगरात फेकला गेला. गेल्या शतकभरात कॉस्मोपॉलिटिन शहर म्हणून मुंबई मध्ये मराठी भाषिक अस्मिता फक्त निवडणूक प्रचारात आघाडीवर राहिली. तशी वेळ ना कलकत्ता ना मद्रास मध्ये गेल्या शतकापासून आली नाही. दक्षिण भारतात पाच राज्यांमध्ये कन्नड तेलगू तमिळ मल्याळम भाषिक अस्मिता ह्या राजकीय पटलावर अधिक टोकदार झालेल्या आहेत. महाराष्ट्रात फक्त मुंबईत मराठी अस्मिता बाकीच्या महाराष्ट्रात का बरं राजकीय पटलावर टोकदार झाल्या नाहीत? कारण आपण राजकीय भूमिका घेतली ती पुरोगामी. बरं पुरोगामी विचार महाराष्ट्रात रूजला का? जोवर सोकॉल्ड पुरोगामी पक्ष सत्तेवर होते तोपर्यंत पुरोगामी विचार पुढे जात होता. मग सत्ताबदल झाला आणि पुरोगामी विचार का खुंटला? उजव्या विचारसरणीचा प्रभाव का वाढला? थोडक्यात हिंदुत्व हा सामाजिक विचार महाराष्ट्रात आला उत्तरेकडून आणि स्थिर झाला. आता हिंदुत्ववादी महाराष्ट्र म्हणून उदयास आला. मग पुरोगामी विचारधारा ही राजकीय आश्रयाला असल्याने खंगत चालली का? याचा विचार केला पाहिजे.


भाषा ही राजकीय साधन आहे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी. जगभरात जे जे काही कांड झाले आहेत त्यांचे मूळ हे भाषा भूमी भय याच्याशी येनकेन प्रकारे निगडित असते. संस्कृती वरील आक्रमण भाषेची गळचेपी करूनच होते. उत्तर भारतात किमान पन्नास बोलीभाषा बोलल्या जात होत्या रोजच्या व्यवहारात. त्यांची जवळीक हिंदीशी जशी झाली तशी बोलीचालीच्या भाषा म्हणून बोलीभाषा खुंटल्या गेल्या. लिखाणात वापरल्या जाणाऱ्या भाषेचा सर्व लोकांना फायदा होतो म्हणून प्रमाण भाषेचा उदय झाला. महाराष्ट्रात तर प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाणारी बोलीभाषा वेगळी आहे. मग अशी मराठी भाषेची व्याप्ती असलेल्या महाराष्ट्रात मराठी अस्मिता सहजपणे रूळली असती रूजली असती आणि टोकदारपण पुढे आली असती. मात्र तसे झाले नाही कारणं अनेक आहेत. मुख्य कारण मराठी माध्यमात शिक्षणाचा प्रसार झाला नाही. आधुनिक शिक्षण हे इंग्रजी माध्यमात मिळते हा भेकड समज तालुका तालुक्यात पोचला आणि इंग्रजी माध्यमाची शैक्षणिक व्यवसायिक मॉल उभे राहिले. सीबीएसई आयसीएसई माध्यमांमुळे तर गावागावांत मराठी शाळा ओस पडू लागल्या. मराठी शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना जगात खूप स्ट्रगल करावा लाजतो ह्या न्यूनगंडाने कैक पिढ्यांना पछाडलेले आहे. असा करंटेपणा असेल तर मराठी भाषिक अस्मिता खोलवर रूजेल काय?  शिक्षणाचा दर्जा कसा आहे याचाही विचार केला पाहिजे. सरकारी शाळांमध्ये शिक्षण चांगले नाही म्हणून आम्ही खाजगी शाळांना प्रोत्साहन देतो असा एक गैरसमज आहे. दुसरा सरकारी शाळा म्हणजे लो स्टॅंडर्ड वाटणारी एक पिढी आहे. गंमत म्हणजे याच पिढीतले कित्येक लोक मराठी शाळेत शिकलेले असतात. अशी त्रेधातिरपीट असेल शालेय शिक्षणात तर मराठी भाषिक अस्मिता निर्माण होईल का? घरापासून जर मराठी ऐवजी इतर भाषेला प्राधान्यक्रम दिला गेला तर अस्मिता जगेल का मरेल? मराठी साहित्य देखील आपल्या भाषेचा अस्मितेचा गौरव करण्यात कमी पडले आहे. मराठी साहित्यात एक दळभद्री गोष्ट जगमान्य आहे की सामाजिक जाणीव नेणीव वेदना संवेदना वगैरे भावना व्यक्त केल्या असतील तर उत्तम साहित्य. नसेल तर मागास? मुळातच साहित्य हे रंजक आणि विचार मांडणारे असावे. भडिमार करणारे किंवा रडारडी करणारे नसावे. मराठी साहित्यातील लेखन हे प्रामाणिकपणे सामाजिक जीवनात जाणीवा कशा रूंदावत गेल्या आणि आम्ही समाजाभामुख कसे बदललो वगैरे वैचारिक फुशारक्या मारणारे असते. थोडी जातकुळी बदलण्याची भूमिका घेतली तर लगेचच अभिजन बहुजन विद्रोही दलित साठोत्तरी नव्वदोत्तरी वगैरे शेलकी विशेषणे लावून बेदखल केले जाते. वाचकप्रिय की रसिकप्रिय वगैरे शब्दच्छलात निर्ढावलेली किमान दोन तीन साहित्यिक लोकांच्या पिढ्या खपल्या. आमच्या मनाला पटणाऱ्या गोष्टी लिहिल्या तरच तुम्ही खरे सर्जनशील ही कुष्ठरोगी मानसिकता बदलायला हवी. यातून आपण बाहेर पडलो तरच मराठी अस्मितेचे बाळकडू मराठी साहित्यात रूजेल. गेलाबाजार आम्ही असू आधुनिक विचारांचे नवमतवादी वगैरे बंडखोरी मराठी साहित्य विश्वात पृथ्वीवर जीवसृष्टीच्या अंतापर्यंत चालत राहील यात शंका नाही.


मराठी अस्मिता हीच राजकीय भूमिका घेऊन जर सर्व प्रादेशिक राजकीय पक्ष वावरले असते तर महाराष्ट्रात आज जो वैचारिक आणि सामाजिक विचका झालेला आहे तसा तरी निश्चितपणे झाला नसता. दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रेतर पक्ष महाराष्ट्रात टिकू शकले नसते. कारण मराठी अस्मिता ही बाहेरच्या पक्षांना मानवली नसती. आज राष्ट्रीय पक्ष जसे दक्षिणेत संघर्ष करीत आहेत तसेच महाराष्ट्रात खर्डेघाशी करत बसले असते. महाराष्ट्रात पुरोगामी हिंदुत्व आणि मराठी अस्मिता खोखो चालू आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे मराठी अस्मितेसाठी एकत्र येत नाहीत. आर्थिक नाड्या अमराठी लोकांकडे आहेत आणि मराठी माणसाला आर्थिक पाठबळ वाढवण्याऐवजी जातीय पाठबळ वाढवण्यासाठी विशेष रस असतो. मराठी चित्रपट निर्मिती मध्ये आर्थिक पाठबळ अमराठी लोकांचे मिळावे मराठी चित्रपट मराठी अस्मिता निर्माण करण्यासाठी कधीही धडपडणार नाहीत. गंमत म्हणजे दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. यातही दादासाहेब तोरणे की दादासाहेब फाळके यावर वाद घालत असतात . वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रभावशाली घटक आहे गावपातळीवर पोचलेला. भव्य अशी संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात संत देखील जातीपातीच्या चौकटीत अडकवले गेले आहेत. थोडक्यात मराठी अस्मिता बळकट करण्यासाठी ज्या ज्या धष्टपुष्ट बाबी महाराष्ट्रात आहेत त्यांचा वापर करून जातीय अस्मिता बळकट झाल्या. भविष्यात धार्मिक अस्मिता मजबूत होतील. मराठी अस्मिता बिचारी वाऱ्यावर फडफडत बसणार! याउलट जर महाराष्ट्रात सामाजिक विचार म्हणून पुरोगामी विचार मुरला असता तर सामाजिक चळवळींची शकलं झाली नसती. गटतट पडून विषमता वाढली नसती. जरी जातीय भावना दुखावल्या गेल्या तरी मराठी अस्मितेच्या छायाछत्राखाली सगळे सामाजिक प्रवाह एकवटले असते. आज महाराष्ट्रात हिंदुत्वाखाली सगळे प्रवाह एकवटले जात आहेत. याला जबाबदार कोण?


महाराष्ट्रात आजपर्यंत वेगवेगळ्या राजकीय विचारधारा जेवढ्या प्रमाणात आल्या त्यापैकी कोणत्याही राजकीय विचारधारा मराठी अस्मितेचे समर्थन करत सत्तेत आल्या नाहीत. आंबेडकरी, दलित, समाजवादी, साम्यवादी, बहुजनवादी किंवा हिंदुत्ववादी वगैरे सगळे आपापले अजेंडे राबवत असतात. मात्र कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या लोकांनी केवळ मराठी अस्मितेचे राजकारण करून एकहाती महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे भाषिक अस्मिता ही सत्ता मिळविण्यासाठी गुरुकिल्ली नव्हे हे सगळ्यांना माहीत आहे. यासाठी ऐतिहासिक पार्शभूमी बघणं गरजेचे आहे. भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र स्थापन झाला १९६० साली. त्याआधी मराठी भाषिक वेगवेगळ्या भूभागात विखुरलेले होते. म्हैसूर, हैदराबादच्या संस्थानात मराठी भाषिक होते ते नंतर कर्नाटकात स्थिरावले. मध्य भारत, वऱ्हाड, नागपूर संस्थान मध्ये मराठी भाषिक होते मात्र त्यांना हिंदी भाषा जवळची वाटली होती रोजच्या व्यवहारात. मुंबई प्रांतांत मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक होते अगदी कोकणातील किनारपट्टी सकट. मराठ्यांची गादी साताऱ्यात आणि कोल्हापूरात असली तरी या भागातील जहागिरी संभाळणारे मराठी संस्थानिकं ब्रिटिशांच्या वक्रदृष्टी मुळे पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करू शकले नाहीत. हेच सर्व वेगवेगळ्या प्रांतांतील मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर एकत्र नांदू लागले. त्यानंतर मराठी भाषिक स्वायत्त राज्य म्हणून जरी प्रगतीशील झाले असले तरीही या उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रात मराठी भाषिक अस्मितेच्या नावाखाली कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश माणदेश वगैरे भूभाग एक होत नाहीत. गंमत म्हणजे याच भूभागातून आपापल्या जातीसाठी मराठी माणूस एकत्र येतो व राजकरणात वापरून फेकला जातो. महाराष्ट्रात जातीय अस्मिता तिखट आणि भडक झाली याला जबाबदार पुरोगामी म्हणून वावरणारे राजकीय नेते. महाराष्ट्रात राजकीय चिखल झालाय तो केवळ राजकीय स्वार्थासाठी पुरोगामी विचारांचा जयघोष केला म्हणून. आता त्याच चिखलात पोषक वातावरणात कमळ उगवलंय तर दोष कोणाला देणार?



©️भूषण वर्धेकर

२७ एप्रिल २०२६

पुणे - ४१२११५


गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!


भारतीय राज्यघटना लिहिली जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फार बारकाईने अभ्यास करून आरक्षणाच्या तरतुदी केल्या. सर्वार्थाने जो समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रवाहापासून दूर होता त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी केल्या आहेत. यात प्रामुख्याने वंचित, शोषित जनतेला प्राधान्य द्यावे हे महत्त्वाचे. कारण वर्षानुवर्षे एकाच वर्गातील पिढ्यानपिढ्या लाभार्थी होत होत्या. बहुसंख्य सवर्ण हे संधी मिळवून आपापल्या परीने प्रगती करत. मात्र संधी न मिळालेला समाज किंवा संधी असूनही तीचा वापर कसा करावा याचा मागमूसही नसलेला समाज प्रामुख्याने शोषित, वंचित होता. दुर्लक्षित नव्हता फक्त शासनदरबारी, प्रशासकीय कारभारात अजिबातच नव्हता. अशा मंडळींची समाजातील धनाढ्य लोकांकडून पिळवणूक होत असे. नंतर अशा मंडळींना दलित, अस्पृश्य, मागास, भटकी जमात वा गावाच्या वेशीबाहेरची जमात वगैरे संबोधलं गेलं. अशा लोकांना समान संधी आणि सामाजिक न्याय देण्यासाठी आरक्षण महत्वाचे. मात्र आरक्षण हा हक्क नसतो. ती एक बेजमी असते सरकारी सबसिडी सारखी. त्यामुळे जे साध्य करायचे आहे त्यासाठी मागासलेल्या वर्गांना आरक्षण हे साधन म्हणून वापरणं गरजेचं होतं. मात्र चाणाक्षपणे आरक्षण हेच साध्य ठरवून हक्क सांगण्यासाठी राजकीय आणि सामाजिक व्यवस्था मजबूतीने उभी राहीली. स्वातंत्र्यानंतर किमान चार पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जर तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी पोचल्या नसतील तर समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे ह्या फक्त भूलथापा राहतील. आरक्षणाचा लाभ घेऊन वंचित, शोषित समाजाच्या एका वर्गाने कायमस्वरूपी लाभार्थी असण्याचा फायदा घेतला. त्यांच्याकडे सवर्ण वर्गाशी स्पर्धा करण्यासाठी बरोबरीने समान संधी मिळाल्या तरीही त्या वर्गाने आरक्षणाचा लाभ सोडला नाही. हीच खरी मेख आहे तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी न मिळाल्याच्या. 


आरक्षण मिळाल्याने समाजाचा विकास होतो ही एक सामाजिक अंधश्रद्धा आहे. आरक्षण हे साधन आहे संधी न मिळालेल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. पण राजकीयदृष्ट्या वापर करून लोकांनी आरक्षण हेच साध्य बनवलं आहे. कागदोपत्री आकडेवारी दिली की काहीतरी पुराव्यानिशी आपण युक्तिवाद करतोय असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र आकडेवारी देऊन जेव्हा तुलना केली जाते तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाण ही बाब फार महत्त्वाची. दुसरं तुलनेत कोणकोणत्या घटकांना प्राधान्य दिले आहे याचं. त्यामुळे आकडेवारी देऊन सांगितले की कोर्टात आपली बाजू भक्कमपणे उभी होईल आणि वेळ पडली तर संविधानाच्या चौकटीत राहून तरतूद करण्यासाठी दुरूस्ती विधेयक वगैरे आणण्यासाठी परत आंदोलनं, चर्चा, चिखलफेक हे निर्विवादपणे चालत राहणार आहे. समजा माणसाला आजार झाला असेल आणि त्यावर एखाद्या औषधाची मात्रा लागू होत नसेल तर औषध बदलायला हवं. किंवा आजार होऊ नये म्हणून जीवनशैली बदलणं गरजेची आहे. औषध तेच ठेवायचं आणि डॉक्टर बदलायचे. हेच तर कैक वर्षे चालू आहे. मुळातच संधी उपलब्ध करून देणे आणि संधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता, कौशल्ये विकसित करण्यासाठी सेवा, सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे आहे. घटनात्मक आरक्षण हे मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ट 'मॉडेल' आहे. पण इम्प्लिमेंटेशन गंडवले गेले आहे. त्याला जबाबदार सामाजिक आणि राजकीय व्यवस्था.


गेल्या सात दशकांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या किती पिढ्या भारतात घडल्या? ज्यांनी आरक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येऊन सक्षम होऊन आरक्षणाचे लाभ नको म्हणून किती घटकांनी सरकार दरबारी नोंद केली आहे? क्रिमी लेअर नॉन क्रिमी लेअर वगैरे नोंदणी फक्त जात प्रमाणपत्राची गरज आहे. प्रत्यक्षात आरक्षणाचे हत्यार म्हणून वापर सर्रासपणे सुरू आहे. आता तर संख्यात्मक बळ वाढतेय समजल्यावर हिंसक उग्र आंदोलने आणि व्यवस्थेला धाब्यावर बसवून वाट्टेल त्या मागण्यांसाठी लोकांना भडकावणं सुरू आहे. आरक्षण हे गरीबी दूर करण्यासाठी आणलेलं नाही. वंचित, शोषित आणि पिढ्यानपिढ्या मागासलेला वर्ग आणि मुख्य प्रवाहातील वर्ग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणलेला उत्तम पर्याय म्हणजे घटनात्मक आरक्षण. ठराविक कालावधीनंतर ह्या पर्यायाने खरंच तळागाळापर्यंत लोकांना लाभ मिळत आहे का? ह्याच सिंहावलोकन करणं गरजेचं. म्हणजे व्यवस्था अजून सुदृढ कशी करता येईल याची चाचपणी करता येईल. मात्र हे करण्यासाठी धजावणार कोण? आरक्षणाचा प्रश्न राजकीय झाला आहे. राजकीय समस्या सुटत नसतात त्याचा वापर सत्ताकारणात कुटील डाव खेळण्यासाठी होतो. 


मराठा आरक्षणावर खूप बोलून झाले, लिहून झाले, चर्चा वादविवाद होत राहतील. याचं समाजाभिमुख निरसन व्हावं असं कोणत्याही राजकीय सामाजिक क्षेत्रातील धुरिणांना वाटत नाही. ज्यांना पोटतिडकीने काही तरी करायचे आहे अशांना सार्वजनिक जीवनात व्यापकपणे पाठींबा मिळत नाही. कारण राजकीय धोरणलकवे. मराठा समाजातील लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. आपल्याकडे सत्ता मिळवण्यासाठी मराठा समाजाला वापरून दुर्लक्षित केले आहे. मराठा समाजाला संख्यात्मक पाठबळ जास्त आहे म्हणून त्यांचा राजकीय उपद्रव कोणत्याही राजकीय पक्षांना महागात पडतो. खरी गरज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून मराठा नेतृत्व राजकीय, आर्थिक क्षेत्रात आघाडीवर होते. मग सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण हवे असं का वाटू लागले? मराठा टक्केवारी जास्त असल्याने त्याच प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व पण जास्त असणार सहाजिकच आहे. मग एवढं सगळं सोशोइकोपॉलिटिकल प्रिव्हिलेजेस मिळून देखील मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासते म्हणजे. खरी मेख व्यवस्थेतील त्रुटींची आहे. त्यानंतर सत्ताधारी लोकांची अनास्था. त्यामुळे सत्तेवर कोणीही असले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच लोंबकळत राहील. 


ज्या आंदोलनाचे उपद्रवमूल्य जास्त ती आंदोलन आपल्याला कशी फायदेशीर ठरतील हे बघणं विरोधकांचे पहिलं काम आहे. कारण सत्तेवर यायचं असेल तर सरकार विरोधात वातावरण निर्माण झाले पाहिजे तरच आपल्याला सत्तेवर येण्याची संधी उपलब्ध होईल हे राजकीय शहाणपण विरोधकांना असते. सत्ताधारी वेळकाढूपणा करत आपल्या पथ्यावर कसं पडेल याची काळजी घेत असतात. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ना सत्ताधारी लोकांना इंटरेस्ट असतो ना विरोधकांना. आंदोलनं हायजॅक होणं काही नवीन नाही. गेल्या दोन दशकांत अशी कितीतरी आंदोलनं फसलेली आहेत किंवा भरकटवली गेली आहेत. मराठा समाज कधीकाळी क्षत्रिय, लढवय्या म्हणून नावाजलेला होता तोच आज आरक्षणासाठी मागासलेला हे सिद्ध करण्यासाठी धडपडतोय. यावरून लक्षात घेतलं पाहिजे की, हीच पद्धत जर अंगवळणी पडली तर संख्यात्मक बळाच्या जोरावर व्यवस्थेला वेठीस धरेल. वेळ पडली तर संविधानाच्या दुरुस्तीसाठी दबावतंत्राचा वापर होईल. यावर उपाय म्हणून मूळ प्रश्न ज्यामुळे उद्भवले ते सोडवले पाहिजेत. खेडोपाड्यात मराठा समाजाला शेतीसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी हा बहुतांश मराठा समाजातील आहे. खेडोपाड्यात शेतकऱ्यांची पिळवणूक कोणामुळे कशासाठी होते हे वेगळे सांगायला नको. शिक्षणासाठी मराठा तरुणांना तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत जेवढ्या इतर समाजातील लोकांना असतात. फक्त आरक्षण मिळाल्याने सरकारी नोकरीत मराठा टक्का वाढेल. शिक्षणासाठी फीया कमी भराव्या लागतील हा बाळबोध समज आधी दूर केला पाहिजे. सरकारमध्ये नोकरीच्या संधी लोकसंख्येच्या प्रमाणात खूपच कमी होणार आहेत उत्तरोत्तर. मराठा समाजाला आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक हवे आहे. राजकीय हवंय पण स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे निवडणुकीत पदे मिळवण्यासाठी. त्यात ओबीसींच्या आरक्षणातच मराठा समाजाला सामावून घेण्यासाठी धडपड चालू आहे. अशी त्रेधातिरपीट होणारी गुंतागुंतीची अवस्था झाली आहे. स्वतःला कधीकाळी सरंजाम, जहागिरदार, वतनदार, सावकार, जमीनदार, गावची पाटीलकी संभाळून, गावगाडा चालवणारा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो हे सामाजिक ऱ्हासाचे द्योतक आहे. भविष्यात आरक्षण मिळाले आणि समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही तर एससी, एसटी, व्हीजेएनटी वगैरे मध्ये सामील करा म्हणून मागणी करणार का? कारण ओपन मधून ओबीसींच्या कोट्यात जाण्यासाठी आज आंदोलन होतंय. याचा अर्थ आंदोलनं भरकटलेली आहे. आरक्षण मिळाल्याने जर खरंच समाजाचा चौफेर विकास होत असता तर गेली सात दशके किमान एक तरी मागास समाज आरक्षण नको मुख्य प्रवाहात स्थिरस्थावर झालो आहोत म्हणून पुढे आला असता. तसे झाले नाही आणि दोन चार पिढ्या मुख्य प्रवाहात येऊन सधन झाल्यानंतरही आरक्षण सोडणार नाहीत. अशा बरबटलेल्या वातावरणात कोणीही विवेकी पद्धतीने प्रबोधन करणार नाही. याचं कारण आरक्षण हे हत्यार झाले आहे. व्यवस्थेला जेरीस आणून हवं ते साध्य करता येते ह्याचा पायंडा पडत आहे. 


शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करणाऱ्या, पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या लोकांना सत्य परिस्थिती काय आहे आणि घटनात्मक मर्यादा कशा आहेत हे समजले आहे. यात भरडला जातोय तो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मराठा तरुण. यावर एक उपाय म्हणजे सामुहिक पद्धतीने संविधानाचे पारायण व्हावे आणि संविधानाच्या चौकटीत राहून देश कसा चालतो ह्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पण हे प्रबोधन करणे सोपे आहे का? संविधानाविषयी सर्वसामान्य माणसाला माहिती असते. वाचन, अभ्यास मात्र नसतो. त्यामुळे अशा जनतेला घोळात घेणं सोपं असतं. उदाहरणार्थ अमुक तमुक मुळं आपण दुर्लक्षित राहिलो किंवा फलाना टिमका लोकांमुळेच आपलं नुकसान झालं. अशा अन्यायकारक गोष्टी ठासून सांगितल्या की बहुसंख्य भोळा समाज विश्वास ठेवतो कसलीही शहानिशा न करता. तसंही सामाजिक आणि राजकीय प्रश्नांमध्ये पुसटशी रेषा असते. ती समजणं खूप जिकिरीचे आहे. त्यासाठी जागरूक नागरिक म्हणून सर्वात मोठा आधार म्हणजे संविधानाचा मसुदा. संविधान वगैरे गोष्टींचा वापर व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रामुख्यानं केला पाहिजे. पण व्यवस्थेतील लोक स्वतःला बळकट करण्यासाठी अशा आंदोलनाचा वापर करतात. मग अशी मंडळी सत्तेत असो वा नसो. व्यवस्था कशी राबवावी, झुकवावी किंवा विस्कळीत करावी याचं परिपूर्ण टूलकिट वापरण्यात वाकबगार असतात. यात फरफटतो तो गरीब समाज. बहुतांश बहुजन. सुस्थापित सवर्ण वर्गाचा रस्त्यावरील आंदोलन वगैरे यांचा तसा संबंध येत नाही. मात्र मेख अशी आहे की ह्यावर प्रबोधन करणे सोपे नाही. गमतीने म्हटले जाते की समाज हा किर्तनाने सुधारत नाही की तमाशाने बिघडत पण नाही. जो तो सभ्यतेचा आव आणून सांस्कृतिक किर्तन करतो किंवा सामाजिक जाणीवांची भोंगळ स्वप्न दाखवून राजकीय तमाशा करतो.


मागासलेल्या वर्गातील लाभार्थी जेव्हा सोयीसुविधांचा पुरेपूर वापर करून किमान दोन तीन पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जेव्हा तुल्यबळ होतात तेव्हा त्याच वर्गातील कायमस्वरूपी वंचित राहिलेले बाहेर फेकले जातात. उदाहरणार्थ एखाद्या जातीतीत मागासलेल्या कुटुंबातील पणजोबा, आजोबा, वडील जर सरकारी भरगच्च पगारदार नोकरीत असतील तर त्यांची पुढच्या पिढीला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी धडपड चालू असते. खरंतर अशा मंडळींमुळेच त्याच जातीतील संधी उपलब्ध न झालेली पिढी उपेक्षित राहते. तुलना केली असता समजेल की मागासवर्गीय क्लास वन अधिकाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आणि त्याच मागासवर्गातील शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी यात सर्वाधिक संधी कोणाला मिळणार? वंचित कोण राहणार? इथं समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे जिकरीनं लागू करणं गरजेचं आहे. त्यासाठी क्रिमी लेअर वगैरे तयार करण्यासाठी कायदेशीर रित्या कोर्टात ठरवलं जाईल. मात्र ते लागू करणं, अंगिकार करणं आणि स्विकारले जाणं या गोष्टी स्वयंप्रेरणेने येणं आवश्यक आहे. त्यासाठी कोर्टात, संसदेत मंजूरी होईल न होईल पण सार्वजनिक जीवनात ते स्विकारण्याची शक्यता कमीच. कारण आरक्षणाचा वापर हत्यार म्हणून झाला आहे. त्यासाठी सरकार दरबारी, राजकीय व्यवस्थेत लॉबिंग मजबूत केले जाते.  महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर अशीच व्यवस्था मजबूतीने उभी राहिली. त्यामुळे आधीच साधनसंपन्न असलेल्या मराठा समाजाला लौकिकार्थाने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. कालांतराने भाऊबंदकी जशी वाढली तसतशी संपत्ती विभागली गेली. सरासरी ३५% मराठा समाज महाराष्ट्रात जरी असला तरी ३०% च्या आसपास गरीब मराठा दशकांपासून वाढत गेला. त्यात याच दशकांत मागासवर्गीय आणि मराठेतर समाज बऱ्यापैकी आरक्षणाच्या लाभांमुळे सरकारी नोकरीत, राजकीय पटलावर स्थिरस्थावर झाला. अशा वेळी जेव्हा गावागावांत प्रबळ मराठा कुलीन घराण्याचे प्राबल्य कमी झाले आणि विखूरलेल्या मराठा कुटुंबातील आर्थिक आणि सामाजिक गोष्टींनी डोकं वर काढायला सुरुवात केली. अशा वेळी राजकीय धुरिणांनी आरक्षणाचा मुद्दा पेटवून आणि वरकरणी पटवून आपापले उपद्रवमूल्य किती आहे हे दाखवायला सुरुवात केली. महाराष्ट्रात रुढार्थाने भाजपा हा भटा-बामणांचा पक्ष म्हणून बाहेर पडून ओबीसीचा डीएनए असलेला पक्ष म्हणून उदयास आला तसतशी मराठांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली जाऊ लागली. राजकीयदृष्ट्या अजूनही मराठा समाज प्रभावी आहे. कधीकाळी तो सत्ताधारी पुरोगामी विचारांचा पाईक होता आता हिंदुत्ववादी विचारांचा कित्ता गिरवतोय. अशा परिस्थितीत बहुसंख्य मराठांच्या रोषाला ट्रिगर मिळाला तो कोपर्डी येथील अन्याय्यकारक घटनेचा. तिथून मग मूक मोर्चे निदर्शने झाली आणि मुख्य प्रवाहात मराठा आरक्षणावर झाडाझडती सुरू झाली. आता तर आम्हाला ओबीसीत घ्या नाहीतर बघा वगैरे वगैरे धमकीची भाषा बोलली जाऊ लागली. अर्थात झुंडशाही जशी वाढते तसा विचार, विवेक शून्य होतो आणि हिंसेला खतपाणी घालून आपापली इप्सितं साध्य केली जातात.


आम्ही परिस्थितीने वंचित, दुर्लक्षित झालो म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, ओबीसींच्या गटाचं पाहीजे, जमत नसेल तर संविधान बदला वगैरे मागण्या केल्या जातात. हे हास्यास्पद आहे. समजा भविष्यात ओबीसी मध्ये गेले आणि तरीही संधी मिळाली नाही तर काय एसटी एससी व्हीजेएनटी मध्ये घ्या म्हणून आंदोलन करणार का? दोन हाणा पण मागास म्हणा असं होत नसतं. संविधान अभ्यासलं पाहिजे. वाचून समजून आपण का त्यांच्या कक्षेत येऊ शकत नाही हे प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी मराठेतर समाजाला खूप कालावधी लागला. मात्र या कालावधीत गरीब मराठा समाजाला हाती काहीच लागले नाही. सत्तापिपासू मराठा लॉबी ही फक्त आणि फक्त आपला कुटुंबकबिला, बगलबच्चे आणि कार्यकर्ते लोकांना संधी कशी मिळेल यातच व्यस्त राहिले. त्यामुळे प्रस्थापित मराठा अजून श्रीमंत झाला. तर सर्वसामान्य गरीब मराठा हा कालांतराने विस्थापित होऊ लागला. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणता येणार नाही. कारण संविधानाच्या चौकटीत ते होऊच शकत नाही. जेव्हा शक्य होते तेव्हा जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. कारण तेव्हा मराठा समाज जर ओबीसी मध्ये आणला असता तर मराठा लॉबी ला राजकारणात मोठा पल्ला गाठाता आला नसता. सत्ता नसते तेव्हा बहुजन म्हणून मिरवायचे आणि सत्ता आल्यानंतर फक्त आणि फक्त मराठ्यांच्याच घराण्यात सत्ता टिकेल कशी हेच बघायचं. हेच काम आहे राजकारणातील सक्रिय मराठा लॉबीचे. आज कुणबी म्हणजे शेतकरी आहोत म्हणून ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे हे नियमाला धरून नाही. त्रिवार नाही. आज कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षण मिळवणारा समाज बऱ्यापैकी आस्तित्वात आहे. हाच समाज आज कागदोपत्री ओबीसी पण समाजात उजळमाथ्याने मराठा म्हणवून मिरवतो. ह्यांची संख्या लक्षणीय आहे. अर्थात ही कुणबी मराठा नोंद ब्रिटिशकालीन कागदोपत्रीच असल्याने राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये फायदेशीर झाली. मात्र ह्या नोंदी अपुऱ्या असल्याने मराठवाडा वंचित होता. मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्यापैकी प्राबल्य वाढलं ते ओबीसी समाजाचे. त्यात जून २०२५ च्या अखेरीस सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात एक जीआर काढला होता. तिथूनच मराठा आरक्षणासाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली असावी. कारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण राज्य सरकारने दिले आहे. त्याचा सर्वाधिक फायदा गरीब मराठा कुटुंबातील लोकांना झाला. हे असूनही आम्हाला गावपातळीवर प्रभाव पाडण्यासाठी काहीतरी कायदेशीर हक्काचे टूल हवे यासाठी तर हा आरक्षणाचा खेळखंडोबा केला नसावा? अर्थात हे प्रश्न आहेत उत्तरं ज्याने त्याने शोधावीत.


आरक्षणाचा आणि त्यासंदर्भातील तरतुदींचा पुनर्विचार करण्याची योग्य वेळ आलेली आहे. कारण मराठा आरक्षणावर आजवर जी आंदोलनं झाली ती एका तालुक्यातील एका खेडेगावात मर्यादित होती. नंतर हे आंदोलन जिल्ह्यात व्यापले गेले. आता ते डायरेक्ट राज्याच्या राजधानीत येऊन धडकले आहे. हे जर असेच चालू राहिले तर महाराष्ट्रात शेकडो जातीपातीच्या लोकांना स्फूरण चढेल. जो तो आम्हाला अमुक गटातून तमुक गटात घ्या नाहीतर तर बघा! अशी धमकीवजा आंदोलन होतील. आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. राजकीय नाही. आपल्याकडं एक बोगस व्यवस्था रुजली आहे जी राजकीय प्रश्न सामाजिक पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते, सामाजिक प्रश्न राजकीय पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते तर आपण आर्थिक प्रश्न भांडवलदारांच्या भरवशावर टाकून त्यावर काथ्याकूट करत बसतो. जर कोणत्याही असंविधानिक आरक्षणाच्या मागणीवर वेळीच योग्य ते उपाय केले नाहीत तर लिटमस टेस्ट म्हणून झुंडीच्या जोरावर हवं ते करवून घेऊ अशी नवीन कुचकामी संस्कृती जन्माला येईल. तीच लोकशाहीला घातक असेल. देशाचं सार्वभौमत्व फक्त कागदोपत्रीच राहील. जातीधारित आरक्षणाच्या कक्षेत अजून किती जाती वाढवणार? या देशात हजारोंच्या संख्येने जाती अस्तित्वात आहेत. त्यातील कित्येक प्रमुख जातसमुह एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी मध्ये विभागले गेले आहेत. बरं एखादी जात आरक्षणाचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात आली म्हणून आरक्षण नको म्हणून बाहेर पडली आहे का? मुख्य प्रवाहात म्हणजे प्रतिनिधित्व कोणत्या कोणत्या क्षेत्रात वाढलं? किती प्रमाणात आहे? जातीची लोकसंख्या तुलनेसाठी घ्यावी की इतर जातसमुह संख्या? तुलनात्मक दृष्टीने कशाचा आधार घ्यावा? अशी कोणती फूटपट्टी आहे का मोजमाप करण्यासाठी? जर लोकसंख्या वाढतेय म्हटल्यावर आरक्षणाचे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येणार त्या लाभार्थी लॉबीचीच. जसं सवर्ण लोकांनी सगळं कसं आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी मांड भक्कम करून ठेवली होती तशीच मागासवर्गीय कायमस्वरूपी लाभार्थी लॉबीचीच मक्तेदारी गटातटापुरती भक्कम झाली आहे. नुकत्याच युपीएससीच्या संदर्भात पूजा खेडेकर केस संदर्भात ह्याची प्रचिती आली आहे. हा मागासवर्गीय लाभार्थी 'मवर्ण' जर सगळे लाभ गिळंकृत करत असेल तर तळागाळापर्यंत लाभ पोचत नाहीत याला जबाबदार कोणाला धरणार? नुकत्याच सुप्रीम कोर्टाने यावर मागासवर्गीय क्रिमी लेअर वगैरे बाबत सरकारला आदेश दिले आहेत एका केस संदर्भात. यावर कार्यवाही होईल न होईल ते राजकीय फायदा तोटा बघून होईल. थोडक्यात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या संधी पोचल्या आहेत तर सामाजिक, राजकीय, आर्थिक संधींची कशा पद्धतीने पडताळणी केलीय याची शासनदरबारी कोणतीही प्रक्रिया नाही. केवळ राजकीयदृष्ट्या अजूनही वापर केला जातोय आरक्षणाच्या मुद्द्यांचा. यामुळे एकेक नेतृत्व जातीपातीच्या लोकांना उद्युक्त करतं. नंतर झुंडीच्या जोरावर हवं ते मिळालं नाही तर व्यवस्थेला बेजार करते. म्हणजे जातीपातीच्या राजकारणात सर्वपक्षीय नेते आपापल्या परीने जातीचं लॉबिंग मजबूत करण्यासाठी प्रामुख्यानं धडपडत असतात. हीच व्यवस्था कुचकामी आहे. कारण जातीपाती घट्ट पकडून स्थानिक राजकारणात प्रभाव पाडता येतो. मग हीच प्रयोगशाळा धर्माच्या राजकारणासाठी पाया मजबूत करते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे झेंडे मिरवणारे राजकीय नेते चाणाक्षपणे धर्माची पताका बेमालूमपणे फडकवू लागले. ही अधोगती झाली ही बाब लक्षात येत नसेल का? अर्थातच मनातून हतबलता असल्याने असे तडजोडीचे केविलवाणे निर्णय घेतले जातात. जनता भरडली जाते कारण जनतेला जातीपातीच्या विषाची मात्रा पचलेली असते. ह्या भेसूर भवतालामुळे संविधान, राज्यघटना वगैरे वर विश्वास वाढेल का कमी होईल? ह्या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून योग्य ती प्रक्रिया, नियम, दुरुस्ती न्यायालयाच्या आदेशानुसार संविधानाच्या चौकटीत संसदेने आमलात आणली पाहिजे. 


आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. मग लोकसहभागातून, त्या त्या जातीपातीच्या गटातटाचे नेतृत्व आणि मुख्य मागासवर्गीय आयोग यांनी पुढाकार घेऊन जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. आरक्षण हे हत्यार नाही, साध्य नाही फक्त साधन आहे कशासाठी तर समान संधी आणि सामाजिक न्याय मिळण्यासाठी. हे प्रबोधन करणं गरजेचं आहे. मेडिया प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक वा सोशल मीडिया वरील फ्रीलान्सर, इंडिपेंडंट पत्रकार ह्या सर्वांनी किमान सामाईक कार्यक्रम आखून विश्वसनीय एकी दाखवणं गरजेचं आहे. जसं युध्दाच्या वेळी सगळे प्रश्न, समस्या बाजूला ठेवून आपण सर्वजण देशासाठी एकत्र येतो तशीच भावना संविधानाच्या कक्षेत आरक्षणाच्या बाबतीत दिसायला हवी. अशा वखवखलेल्या समस्या आजूबाजूला पेटलेल्या असताना सामाजिक बांधिलकी टिकावी हीच अपेक्षा.


© भूषण वर्धेकर 

पुणे 

४ सप्टेंबर २०२५


स्वतंत्र भारताचे सहस्त्रचंद्रदर्शन

  स्वतंत्र भारताचे सहस्त्रचंद्रदर्शन गेल्या आठ दशकांपासून भारतात कैक घडामोडी घडल्या ज्यातून भारतीय जनमानसाची सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्...