क्रांती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्रांती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १९ मे, २०२६

समाज आणि क्रांती

 जर एखाद्या माणसाला शैक्षणिक आणि सरकारी कसल्याही सोयीसुविधा सवलती मिळाल्या नाही तरी त्याने निम्नमध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीय असा प्रवास केला असेल आणि लौकिकार्थाने प्रस्थापित झाला असेल तर काही लोकांच्या पोटात का दुखत आहे? तुमच्या नॅरेटिव्हला बळी पडत नसेल तर त्याला तमुक लोकांचा परंपरागत मतदार आहे मुर्दाड झालाय, लोकशाहीची बूज न राहीलेला वर्ग, सामाजिक राजकीय चळवळी आंदोलन वगैरे पासून आलिप्त राहणारा वर्ग म्हणून हिणवले का जातोय?


कायमस्वरूपी चला उठा क्रांती करू प्रस्थापितांना गाडून टाकू वगैरे च्या भूमिकेत सदासर्वकाळ राहणारे लोक उगीच अशा वर्गावर जळत असतात. जळकुकडे कुठले! ते तुम्हाला फाट्यावर मारतात याचा अर्थ ते फक्त आणि फक्त कायमस्वरूपी तुमच्या नावडत्या पक्षाची गुलामी करतात असा अर्थ होत नाही. भारतात खूप मोठा वर्ग आहे जो कोणत्याही राजकीय पक्ष किंवा विचारसरणीच्या कवेत गेलेला नाही. असा वर्ग कोणत्याही एका पक्षाचा हुकुमी मतदार नाही. जो कोणी भक्कम आणि सक्षम पर्याय देतो त्याला निवडून आणण्यासाठी मतदान करतो. सूज्ञ मतदार आहे. सहसा कोणत्याही नॅरेटिव्हला बळी पडत नाही. महागाई बेरोजगारी वगैरे ज्या काही राष्ट्रीय समस्या आहेत त्याच्याशी या वर्गाला पण तेवढेच सामोरे जावे लागते. गंमत अशी आहे की हा सुस्थापित असलेला वर्ग कधीच डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर चा लाभार्थी नसतो की अन्य सरकारी योजनांचा! तरीही इमाने इतबारे प्रसंगी काटकसर करून सरकारला शिव्या घालून जगण्याचं रहाटगाडं चालवतो.सद्सद्विवेक जागरूक असतो. महागाई वाढल्यामुळे गरजेच्या आवश्यकतेनुसार गोष्टींवर खर्च करतो. उधळपट्टी टाळतो. हा वर्ग सहजासहजी कोणत्याही नेत्यांची आणि त्यांच्या घराण्याची तळी उचलत नाही. सर्वात महत्त्वाचे हा बहुसंख्य समाज आहे आणि कोणत्याही पॉलिटिकल व्होटबॅंकचा चिकटू नाही. गल्लीत कोण दिल्लीत कोण पाहिजे याची जाणीव असलेला वर्ग आहे.


दुसऱ्या बाजूला एक वर्ग आहे जो शैक्षणिक आणि सरकारी सोयीसुविधा सवलती घेऊन निम्न मध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीय असा प्रवास करत सुस्थापित झाला. ह्या वर्गाला आपला सामाजिक आणि राजकीय वापर कसा होतो हे जवळून पाहिले. त्यामुळे सामाजिक व राजकीय चळवळी आंदोलने वगैरे पासून फारकत घेऊन आपापल्या दुनियादारीला जमेल तसे जगण्याचं रहाटगाडं चालवत आहे. आधी हा वर्ग नॅरेटिव्हला बळी पडत असे. कालांतराने यातून तावूनसुलाखून बाहेर पडायला वेळ लागला. आता ह्या वर्गाला कोण कसे सामाजिक बुरखा घालून राजकीय डावपेच टाकतात हे बरोब्बर समजतं. त्यामुळे चल क्रांती करू या मोड मध्ये सदैव असणाऱ्या लोकांना या वर्गाचा पण हल्ली राग येतो. दुषणं देतात. ह्या वर्गाला मिळणाऱ्या सरकारी योजनांचा आणि डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर सारखे फायदे बऱ्यापैकी मिळतात. हा वर्ग पण फक्त एका राजकीय पक्षाच्या किंवा विचारसरणीच्या बाजूचा हक्काचा मतदार नाही. जो सक्षम असेल भक्कम असेल त्याच्या पारड्यात मतदान करतो. गावपातळीवर कोण देशपातळीवर कोण याची जाणीव असलेला हा वर्ग आहे.


वरील दोन्ही वर्गातील लोक किमान दोन दशकांहून जास्त कालावधीत संक्रमित झालेले आहेत. एकत्र कुटुंब ते न्युक्लिअर कुटुंब हा प्रवास अत्यंत कठीण काळात कष्टप्रद झालेला आहे. 

त्यामुळे देश कसा चालतो अर्थव्यवस्था कशी उभी राहते गावगाडा ते जगरहाटी कशी चालते याची सूजबूझ असलेला महत्वाचा घटक आहे. हा कोणत्याही राजकीय सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग न घेणारा खूप मोठा वर्ग आहे. असे दोन्ही वर्गाकडे कमालीचा राजकीय शहाणपणा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन मतदान करतात. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक कोणीही असो कोणत्याही राजकीय विचारधारेचे असो यांना फरक पडत नाही. 


या दोन्ही वर्गांव्यतिरिक्त एक सर्वसामान्य जनता आहे जी रोजच्या व्यवहारात व्यस्त असते दोनवेळच्या जेवणासाठी. हीच खरी सरकारी योजना, अन्नधान्य पुरवठा आणि डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरवर गुजराण करणारी आहे. गरीब किंवा अल्प उत्पन्न गटातील. यांचा सर्वप्रथम राजकीय वापर केला जातो राजकीय आणि सामाजिक स्तरावर अशी मंडळी त्या त्या संघटना पक्ष घराणेशाही नेतृत्व वगैरेंशी जोडलेले असतात. अशा मंडळींना मतदान करण्यासाठी बऱ्यापैकी प्रभावित केले जाते. कधीकाळी त्या त्या ठिकाणच्या राजकीय धुरीणांनी यांचा वापर करून आपापली मक्तेदारी प्रस्थापित केली. नंतर सर्वमान्य सरकारी कृपेने डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर ने हा वर्ग प्रभावित झाला. कारण कुठेही न जाता सरकार डायरेक्ट बॅंकेत पैसा टाकतंय तुटपुंजी रक्कम का असेना पण टाकतंय ही भूरळ याजनतेला पडली. याच जनतेत त्या त्या राजकीय पक्षांचे किंवा राजकीय विचारसरणीचे स्टेक्स असतात. जातपात धर्म यावर लागलीच प्रभावित होणारी हीच जनता असते. कालांतराने हीच जनता हळूहळू संक्रमित होते निम्न मध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीय वर्गात. ही कायमस्वरूपी चालणारी संक्रमणाची अवस्था आहे. गंमत अशी आहे की हीच जनता जोपर्यंत जातीपातीत अडकून मतदान करते तेव्हा राजकीय क्रांती करणारे सामाजिक प्रबोधनाचे ढोंग करणारे लोक खूष असतात. मात्र हीच मंडळी धर्माच्या आधारावर जेव्हा मतदान करते तेव्हा खूप लोकांच्या बुडाला आग लागते. कारण जातीपातीत अडकलेल्या लोकांना चल उठ क्रांती करू वाले सहज वापरू शकतात. धर्माच्या नावाने एक झालेल्या लोकांना सामाजिक क्रांती वगैरे व्हावी असे कधीच वाटत नाही. त्यांना फक्त धर्म महत्वाचा असतो. आपल्या आवडत्या विचारधारेसाठी जर धर्माची एकी झाली राजकीय फायद्यासाठी तर कोणालाही कसलाच धोका नसतो. मात्र न आवडणाऱ्या विचारधारेला जर भरभरून प्रतिसाद मिळाला धर्माच्या नावाखाली तर बऱ्याच लोकांना मिरच्या झोंबतात. चालायचंच लोकशाही आहे. अशा वेगवेगळ्या वर्गातून आलेल्या लोकांना बांधून वते ते संविधान. आज या घडीला कम्युनिस्ट, नवमतवादी, उदारमतवादी, समतावादी, समाजवादी, आंबेडकरवादी, गांधीवादी, दलित, विद्रोही, डावे, अतिडावे आणि प्रांतवादी वगैरे सगळे उताणे पडले आहेत उजव्यांसमोर. जेव्हा जेव्हा या मंडळींना संधी मिळाली होती तेव्हा सर्वात आधी माती केली नंतर राडा करून चिखल केला नंतर मग कमळ उगवणार नाहीतर काय निवडुंग उगवणार काय?


©️भूषण वर्धेकर

१९ मे २०२६

समाज आणि क्रांती

  जर एखाद्या माणसाला शैक्षणिक आणि सरकारी कसल्याही सोयीसुविधा सवलती मिळाल्या नाही तरी त्याने निम्नमध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्...