मंगळवार, १५ मार्च, २०२२

काश्मीर फाईल्स

दि काश्मीर फाईल्स - अस्वस्थ करणारा अनुभव

सिनेमा पाहताना जर अस्वस्थ वाटत असेल तर त्या सिनेमाचा कंटेंट आणि कंटेक्स्ट योग्य जागी प्रहार करतो. अर्थातच सगळेच मनाला भिडणारे सिनेमे ह्यूमन लेवल वर करूण वाटतात. ठणकावून आणि ओरबडून सत्य सांगणारे सिनेमे फार कमीच. त्यापैकी काश्मीर फाईल्स. काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल तिखट आणि तीव्र भाष्य करणारा सिनेमा. काही लोकांना हा सिनेमा प्रोपागंडा वाटतो कारण त्यांच्या डीप नॅरेटिव्हला धक्के बसतात म्हणून. सेट केलेलं नॅरेटिव्ह जर खोटं पडू लागलं की जळफळाट, तळमळ, खदखद बाहेर येणं सहाजिकच आहे. मात्र जे काही दाखवले आहे काश्मीर फाईल्स मध्ये ते सत्य घटनेवर आधारित आहे. कपोलकल्पित कथांवर तर नक्कीच नाही. कारण या सिनेमासाठी जो रिसर्च केलाय तो सिनेमा बघताना आतून हादरवतो. अतिरेक्यांनी पंडितांवर हल्लेच केले नाहीत असं जर कोणाचं म्हणणं असेल तर पंडित काश्मीरमध्ये का राहिले नाहीत? विस्थापित का व्हावे लागले पंडितांना? अर्थातच अतिरेक्यांनी गुलाबपुष्प देऊन पंडितांना काश्मीर सोडा म्हणून तर सांगितले नव्हते! 

आपल्याच देशात  मूळ रहिवाशांना आपापल्या घरादाराला सोडून त्रयस्थ ठिकाणी जीवाच्या भीतीपोटी विस्थापित व्हायला भाग पाडले हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ताश्कंद फाईल्स साठी जसा रिसर्च केला होता तसाच खोलवर जाऊन रिसर्च या सिनेमासाठी केला हे स्क्रिप्ट मध्ये दिसून येते. कलाकारांचे परफॉर्मन्सेस पॉवरफुल झाले आहेत. सिनेमाची गोष्ट जसजशी पुढं सरकत जाते तसतसे काही संदर्भ मध्येच कसे काय आले असा प्रश्न पडतो. अशा किरकोळ त्रुटी वगळता सिनेमा बघण्यासारखा झालाय. उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरेंनी विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणासाठी काही जागा वाढवून दिल्याचा उल्लेख आहे. मात्र महाराष्ट्रात युतीचे सरकार ९५ नंतर आले. ८९-९० सालातील हल्ले दाखवले गेले. मात्र डिरेक्टोरिअल लिबर्टी म्हणून असे संदर्भ खपून जातात. दुसरा प्रसंग म्हणजे रक्ताने माखलेले तांदूळ खाऊ घालणे. हा प्रसंग कधीकाळी बंगालमध्ये खराखुरा घडलेला आहे. तत्कालीन कॉंग्रेसच्या नेत्याला घरात घूसून असेच मारले होते कम्युनिस्ट लोकांनी. सैनबारी हत्याकांड म्हणून प्रसिद्ध आहे. त्या घटनेचा पंडितांचे हाल दाखवताना आधार का घ्यावा हे समजले नाही. सिनेमात पंडितांवर झालेले अनन्वित अत्याचार पाहून आतून उध्वस्त होतेच. मग समजते प्रत्यक्षात किती आणि कसे हाल त्यांनी सहन केले असावेत! त्याहूनही वाईट वाटते तथाकथित लोकांच्या डीप सिस्टिम्सचा अवाका आणि ब्रेनवॉश करण्यासाठी केली जाणारी हुकुमी पद्धत. सिनेमात हिंसक दृश्ये दाखवली आहेत कारण हिंसा हेच अस्त्र वापरलं गेलं पंडितांना हुसकावून लावण्यासाठी. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुनागढ, हैद्राबाद आणि काश्मीर या संस्थानाच्या इतिहासातील घडामोडींचा जर सिनेमात उल्लेख आला असता तर सिनेमात एक महत्त्वाचा टप्पा मांडला गेला असता. त्यानंतर सोव्हिएत रशियाच्या पाडावानंतर काश्मीरमधील कित्येकांना अचानक कसा काय इंटरेस्ट वाटू लागला याचेही धागेदोरे सिनेमात मांडता आले असते. कारण इस्लामिक स्टेटची मोडस ऑपरेंडी अचानक एकाकी वाढली नाही. तिचा शिरकाव खूप आधीपासूनच झाला. मग स्वतंत्र काश्मीर चे आळोखेपिळोखे नंतर भारताने बळकावल्याची भावना वगैरे सिनेमात यथोचित मांडली आहे. कारण काश्मीर स्वतंत्रपणे केवळ धर्माधारित हवा होते तत्कालीन अलगाववादी लोकांना. त्यांना छुपा पाठिंबा देणारे भारतातील तथाकथित विचारवंत आणि त्यांना रसद पुरवणारे पॉलिटिकल थिंकटँक समांतरपणे कार्यरत होते. साधा सोपा प्रश्न आहे जर स्वतंत्र काश्मीर हवा होता तर काश्मीरमधील पंडितांचे जिनोसाईड करण्याची काय गरज होती?

काश्मीरमधील प्रश्नांची उकल करण्यापेक्षा ते तसेच ठेवून कैक लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट इनकॅश करायचे उद्योग काही नवे नाहीत. रलीव, सलीव, गलीव चे नारे देऊन पंडितांवर काश्मीर सोडण्याची वेळ आली याला जबाबदार कोण? इस्लामिक टेररिझमला पाठीशी घालणारे कोण? सत्य दाबून ठेऊन इन्फो वॉर चालवणारे कोण? याची उत्तरे सिनेमा पाहून समजतात. मुस्लिम ऑप्रेस्ड झाला म्हणून अतिरेकी कारवायांकडे वळाला हे भंपक लॉजिक कैक दशकांपासून लोकांच्या मनावर बिंबवलं जाते. मुळातच धार्मिक कट्टर शिक्षण लहाणपणापासून दिल्यावर मेंदूत सर्वधर्मसमभावाचा मागमूस तरी राहील का? अशा धार्मिक कट्टरपंथी अतिरेकी सोकॉल्ड फ्रीडम फायटर होऊच कसे शकतात. तसं त्यांना एखाद्या इकोसिस्टिमने जर प्रमोट केले तरच असे होऊ शकते. इकोसिस्टिम कोणी राबवली कशासाठी राबवली कोणाचे काय मनसुबे आहेत यावर काश्मीर फाईल्स सडेतोड भाष्य करतो. हे असं उघडंनागडं सत्य पचवायला तथाकथित पुरोगाम्यांना शक्य नाही. कारण त्यांना पंडितांबद्दलची सरकारने जाहीर केलेली आकडेवारी प्रिय आहे. हेच तर्कट गुजरात दंगलीवर पुरोगामी कदापिही मान्य करणार नाहीत. कारण गुजरात दंगल हा पुरोगाम्यांचा जीवाभावाचा विषय. मात्र गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगली पेटल्या हे स्विकारणे पुरोगाम्यांना जमणार नाही. हा विषय खूप खोल आहे. तसेच दलितांवर झालेल्या अत्याचाराचे खापर जसे तथाकथित सवर्ण आणि प्रस्थापित वर्गावर फोडले जाते. तसे पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे खापर इस्लामिक टेररिझमवर जाहीरपणे कोणी सोकॉल्ड स्कॉलर फोडत नाही. मुळातच पॉलिटिकल इस्लाम, मुल्लांचा इस्लाम की अल्लाह चा इस्लाम यातच खूप लोकांचे बेसिकमध्ये राडे आहेत. मुसलमान स्वतःच्या धार्मिक आस्थांना कवटाळून नक्की काय आणि कशी भूमिका घ्यायची याच्याच विवंचनेत असतो. तलवारीच्या टोकावर इस्लामिक प्रसार प्रचार झालाय हे सर्वश्रुत असून देखील जिहाद म्हणजे धार्मिक बाब म्हणून दुर्लक्षित केला जातो. मी मागे कोणत्यातरी वेच्यात लिहिले होते अल्पसंख्याक असू तेव्हा विशेषाधिकार आणि बहुसंख्य झालो की सर्वाधिकार हीच शिकवण लादली गेलीय धर्माच्या नावाखाली. मग शरीया, कुराण दिमतीला आहेच. सोबत समुदायावर असलेले मुल्ला मौलवींचे वर्चस्व. अशा त्रेधातिरपीट असलेल्या गुंतागुंतीची व्यवस्था असताना सोकॉल्ड मुस्लिम स्कॉलरांनी पुढे येऊन प्रबोधन करण्याची गरज असते. मात्र तसं होताना दिसत नाही. कोणताही पुरोगामी असे प्रबोधन करण्यास उत्सुक नसतो. हिंदुत्ववादी लोकांना हाच मुद्दा मिळतो ध्रुवीकरण करण्यासाठी. 

सर्वात महत्त्वाचं या सिनेमात भिडणारे आहे ते म्हणजे गोंधळलेल्या कृष्णा पंडितचे मानसिक द्वंद्व. त्यासाठी दिग्दर्शकाने जेएनयूस्टाईल इन्स्टीट्यूट ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. मग प्रेसिडेंट इलेक्शन, प्रचार, स्पीच वगैरेंची विषयसुचक पेरणी भारी केलीय. डाव्यांची बौद्धीकं ज्या पद्धतीने मेंदूत बिंबवली जातात त्याचा वापर स्वैरपणे स्क्रिप्ट आणि प्लॉटमध्ये केलाय. हे करताना सिनेमा कुठेही पकड सैल करत नाही कारण अभिनेत्यांनी केलेल्या चाबूक परफॉर्मन्समुळे. विशेष अनुपम खेर. सारांशमधला हतबल म्हातारा ज्या ताकदीने उभा केला होता त्याच ताकदीने पुष्करनाथ पंडित उभा केलाय. बाकीचे सोबतीचे तेवढेच ताकदीचे कलाकार. त्यांच्या त्या काळच्या आठवणी ज्या पद्धतीने मांडल्या आहेत त्यावरून प्रशासकीय कारभारात काही तरी करू पाहणाऱ्या लोकांची हतबलता लक्षात येते. डोळ्यासमोर जूलुस निघतात. आजूबाजूला हिंसक हल्ले होतात. वेचून वेचून पंडितांना ठार केले जाते अल् जिहादच्या नावाखाली. हे बघून सून्न होते. हे जे दाखवलंय ते काय मनघटीत कहाण्यांवर तर नक्कीच नाही. या वर वेगवेगळ्या वेळी खूप लोकांनी लिहिले आहे. मात्र सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर पहिल्यांदाच येतंय. हे धाडस महत्त्वाचे. अर्थातच याला प्रोपागंडा म्हणणारे अट्टल आहेत. त्यांची सर्वात मोठी गोची अशी आहे की असे घडले होते जाहीरपणे बोलूही शकत नाहीत. मुळातच जसे काश्मीरमधील हिंदू होरपळले तसे काश्मिरी मुसलमान पण हकनाक बळी पडले. काश्मिरी पोलिसांना तर कोणीही वाली नाही. त्यांच्यावर पण असाच सिनेमा यायला पाहिजे. पण मेख तिथेच आहे बहुसंख्य काश्मिरी पोलीस हे मुस्लिम आणि इस्लामिक अतिरेक्यांनी त्यांच्यावर केलेले अमानुष हल्ले जर सिनेमात दाखवले तर त्यालापण प्रोपागंडा वगैरे लेबल लावून मोकळे होता येणार नाही. एरव्ही हिंदु दहशतवाद, भगवा आतंकवाद वगैरे बरळणारे काश्मीरमधील आतंकवादाला उभ्या आयुष्यात इस्लामिक टेररिझम बोलणार नाहीत. कारण कैक वर्षे सेट केलेले नॅरेटिव्हला तडा जाईल. काश्मीर बाबतीत सेपरेटिस्ट, फ्रीडम फायटर वगैरे बीरुदावलल्या जाणूनबुजून पेरल्या.

सिनेमा बघताना फक्त पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला आहे असे वाटत नाही. एकमेकांच्या खोलवर पसरलेल्या गुंतागुंतीच्या सिस्टिम्स कशा वापरल्या जातात हे समजते. मग लढणारे वेगळ्या पातळीवर जातात आणि फिल्डवर होरपळून मरणारे बिचारे पंडित दिसतात. 'सियासत की लडाई' न राहता 'धर्म की नोंकपर लहराएँ परचम' पर्यंत सिक्वेन्सेस ढळढळीत दिसतात. ज्यांनी इतिहास भूगोल वाचलाय काश्मीर विषयी त्यांना फार काही हादरे बसत नाहीत. मात्र ज्या धाडसाने सिनेमात मांडलेय त्याचं कौतुक वाटतं. कारण अशा जेनोसाईडवर माहितीपट, न्यूज हिस्टॉरिकल सेगमेंट आले असते तर इम्पॅक्ट पडला नसता. सिनेमाने तो पडतो. सिनेमा बनवणे ही सर्वात महागडी कला. त्यात अशा विषयांवर एवढी जोखीम घेऊन सिनेमा बनवणे आणि कमर्शिअल पद्धतीने ऑडिअन्स ला सिनेमागृहात खेचून आणणे सहजसाध्य नाही. बॉलिवूड चौकटीच्या कसल्याही प्रमोशनल टेकनिक्स न वापरता सिनेमा चालतो लोकांना आवडतो हे या सिनेमाने दाखवून दिलेय. सिनेमाचं माध्यम लोकांपर्यंत न आणलेल्या गोष्टी दाखवू शकतो हे पुन्हा सिद्ध केलंय. काहींना हे प्रचारतंत्र वाटतेय. वाटणारच कारण त्यांनीही कधीकाळी असाच प्रचारासाठी प्रयत्न केलेला असावा. कारण ज्या ठामपणे सांगितले जातेय की काश्मीर फाईल्स हा असत्यावर आधारित आहे तर त्या ठामपणे ते सत्य नेमके काय हे सांगत नाहीत. 

सिनेमाची सर्वात मोठी बाब म्हणजे गोष्ट सांगणे. ती जर का फसली तर सिनेमा प्रेक्षकांना पकडून ठेवत नाही. नेहमीची गोष्ट सांगताना लोकांना नेमकं अमुकतमुकबद्दल काय घडलं याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकते. हे दिग्दर्शकीय कसब. शेवट निराशा करणारा असला तरी विचार करायला प्रवृत्त करतो कोणत्याही संवेदनशील माणसाला. आपल्याच देशात आपल्याच नागरिकांना अशाही प्रकारे जगावं लागलं कसलीही चूक नसताना. हे भीषण वास्तव मनाला  हादरा देतं सिनेमा संपल्यानंतरही.

© भूषण वर्धेकर
१५ मार्च २०२२
पुणे

सोमवार, ७ मार्च, २०२२

एका स्त्रीवादी बाईचा महिला दिवस

सकाळी सकाळी मोबाईलवर आलेले प्रमोशनल मेसेजेस वाचून एक स्त्रीवादी बाई फारच वैतागली. मेसेज होता एका ऑनलाइन शॉपिंगच्या सेल संदर्भात. महिला दिनानिमित्त किचन एप्लायन्सेसवर भरघोस सूट. दुसरा मेसेज होता साड्यांच्या सेलबद्दल. त्यातील एक वाक्य होते.  'वुमेन इन सारीज् लूक्स मोअर ट्रेडिशनल. हॅप्पी शॉपिंग'

सकाळीच असे मेसेजेस वाचल्यावर बाईंचे पित्त खवळले. बातम्या बघण्यासाठी टिव्ही लावला तर स्त्रीया आता पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात आघाडीवर वगैरे बाबतीत चर्चा चालू होत्या त्यात फक्त अँकर बाई होती आणि चर्चेसाठी बोलावलेल्या पॅनलवर पाचपैकी एकच स्त्री होती. बाकीचे चार म्हणे फेमिनिस्ट मेल होते. हे बघून बिचारी स्त्रीवादी एकदम फेमिनाझी झाली. 'फ' वर्गातील आंग्ल शिवी हासडून टिव्ही बंद करून मोबाईलवर स्क्रोल करू लागली. व्हॉट्सऍप ग्रुपवर वुमेन्स डे निमित्ताने येणाऱ्या पानाफुलांच्या, कवितांच्या, इमोजींच्या, सुविचारांच्या गराड्यात गोंधळून गेली. फेसबुकवर टॅग केलेल्या मैत्रिणींच्या नवऱ्यांच्या पोस्टींचा महापूर पाहून 'एक्स'च्या पोस्टवर थबकली.

आपल्या एक्सला बायको म्हणून काकूबाई घर सांभाळण्यासाठी पाहिजे होती आणि तशी त्याला भेटली होती हे पाहून मनातून कासावीस झाली. मग आवरून लाडक्या 'पेट'  ला घेऊन मॉर्निंग वॉकला निघाली. बाईंनी मुद्दाम कुत्राच पाळला होता आणि नाव पण एक्सचेच दिले होते. खुन्नस. तसंही पोरं ब्रेकअप झाल्यावर कुत्री पाळून तिला आपल्या एक्सचे नाव देतात. मग महिलांनी का मागे रहायचे! कुत्र्याची रपेट झाल्यानंतर बाईंची व्हेजिटेबल स्मुदी आणि वर्क फ्रॉम होम सेटअप रेडी झाला. लॉगिन केल्यावर एच.आर. चे वुमेन्स डे स्पेशल व्हाउचर्स, ग्रिटींग आणि मिटिंग इन्व्हीटेशन्स धडधडायला सुरुवात झाली. मग दिवसभर आळोखेपिळोखे देत स्टँड अप, स्टेटस मिटिंग, सेशन्स, एक्सेल शीट्स, जीरा टिकिट्स, ब्रेन स्ट्रॉमिंग डिस्कशन्स, कॉफी ब्रेक, लंच ब्रेक, वामकुक्षी, घरच्यांसोबत बोलणं, लग्नासाठी तुणतुणे वादविवाद, दिवसभराची कामे वगैरे सगळे सोपस्कर झाले. राहत असलेल्या सोसायटीची आज खास महिला दिना निमित्त खास महिलांनी महिलांसाठीच पुरुषांच्या पुढाकाराने टेरेस डिनर इव्हेंट पार पडला. सभासदांनी नसती केली तरी चालली असती अशी भाषणे फेकून मारली. घिसेपिटे हास्य विनोद. गॉसिप करताना कोंडलेल्या एकमेकींच्या इच्छा, आकांशा आणि वेदनांना मोकळी वाट मिळाली. इथे स्त्रीवादी बाई थोड्या आयसोलेटच होत्या.

सोसायटीच्या इव्हेंटमध्ये नटूनथटून येणाऱ्यांचा बाईंना विशेष एलर्जी. बाई स्वतः टॉमबॉय प्रमाणे वावरतात. बुलेट वापरतात. विकेंडला हँगआऊटला जातात. महिन्यात किमान डझनभर ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सिरिज संपवतात. घरच्यांचा आग्रहाखातर सणासुदीला गावी जातात. महिन्या दोन महिन्यांतून एकदा भावाच्या घरी जाऊन भाच्च्यांसोबत दंगामस्ती करतात. वर्षातून एकतरी लॉंग बाईक राईड फिनिश करतात. थोडक्यात मनाला हवं तसं जगतात म्हणून महिला दिनानिमित्त होणाऱ्या मच हायपर सेलेब्रेशन्स इव्हेंट्सचा तिटकारा करतात. पुर्वीसारखी आता नातलग, मित्रमैत्रिणींचे लग्न समारंभ उत्साहात साजरा करत नाहीत. स्वतःच्या स्पेसमध्ये गुरफटून जगाची निरिक्षणे नोंदवत बसतात. कधीतरी घरातून फारच पिच्छा पुरवला तर एखादे शनिवारी लग्नासाठी म्हणून पाहिलेल्या मुलासोबत कॉफी प्यायला जड मनाने पोचतात. मग इकडच्या तिकडच्या साचेबद्ध गप्पा. फ्युचर, पार्टनर, आवड निवड, नोकरी वगैरेंच्या चोथट चर्चा होतात. कधी इकडून नकार तर कधी तिकडून नकार यातच वयाची वर्षे वाढत जातात. मग पुन्हा तोच प्रपंच स्वतः स्वतःसाठी स्वतःपुरता केलेला रहाटगाडगे चालवण्यासाठी.

©भूषण वर्धेकर
८ मार्च २०२२, पुणे

शनिवार, ५ मार्च, २०२२

झुंड

झुंड

झुंड मध्यंतरानंतर मनावरील पकड कमी करतो. बरेच ठिकाणी प्रेडिक्टेबल होतो. नागरजचे फँड्री आणि सैराट जसे मनावर गारूड करतात तसा झुंड करत नाही. सिनेमा संपल्यानंतर नागराज स्पेशल होल्ड झुंड बघितल्यावर राहत नाही. झोपडपट्टी मधल्या पोराटोरांचे मानसशास्त्र, सामाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानवतावाद सगळं एकाच सिनेमातून का दिलं गेलं असा प्रश्न पडतो. कलरफुल सिनेमा, प्रत्येक नॉन एक्टर कडून करवून घेतलेली कामे, संवाद, सिम्बॉलिक फ्रेम्स आणि सिनेमॅटोग्राफी आशयाला अनुसरून शोभत असली तरी शेवटपर्यंत खिळवून ठेवत नाही. धक्कातंत्र देण्याचे नागराजचे कसब इथे फिके पडते. मला व्यक्तीगत सिनेमा पाहताना नामदेव ढसाळ आणि जयंत पवार यांच लिखाण वाचल्यावर जे दृश्यं उभे राहिले होते तसा भास झाला. झोपडपट्टी मधल्या तरुणांना एकत्र घेऊन फुटबॉलच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणं लोकांना अपील होईल असं वाटत नाही. कारण स्पोर्ट्स फिल्म्स बनवण्यासाठी जे तंत्र लागते लोकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्याचे ते तंत्र इथे नाही. केवळ फुटबॉल खेळात गुंतून राहिल्याने त्यांचे प्रश्न सुटणार का? नाही सुटणार. कारण ते दुर्लक्षित राहिले म्हणून मुख्य प्रवाहात आले नाहीत. बच्चन साहेबांच्या खांद्यावर मुख्य पात्र देऊन सगळा स्ट्रगल इतर लोकांचा दाखवलाय. मग बच्चन नसते तर तीच झोपडपट्टी गँग हिरो म्हणून स्ट्रगल करताना दाखवली असती तर वेगळाच इम्पॅक्ट तयार करता आला असता. आजवरचे सगळे हिंदी सिनेमे संवादातून व्यथा मांडतात. मग झुंडमध्ये शेवटच्या सीनमध्ये कोर्टात अमिताभ बच्चन चे भारदस्त आवाजातील संवाद त्याच पठडीतील वाटतो. फँड्री आणि सैराट मध्ये संवादापेक्षा पात्रांनी केलेली कृती लोकांवर प्रभाव टाकत होती. संवादातून टाकलेला प्रभाव हा कृतीतून टाकलेल्या प्रभावासमोर तकलादू असतो. झोपडपट्टीत राहतात म्हटल्यावर दाखवण्यात आलेले सगळे कॅरॅक्टर्स हे लोकांपर्यंत आजवर सगळ्याच माध्यमातून बरेचदा आलेले आहेत. मग नागराज कडून वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्याने टिपिकल छापखान्यातील टेकनिक्स वापरून झुंड बनवला आहे असं जाणवत राहतं. ह्या विषयावर सगळं एकाच सिनेमात बसवण्याचा प्रयत्न केलाय असं दिसतं. कित्येक आजूबाजूचे कॅरॅक्टर्स तेवढ्यापुरते येतात जातात.  ही सगळी कॅरॅक्टर्स वेगवेगळ्या कॅनव्हासवर आणून किमान एक सिजन होईल अशी ओटीटी सिरिज सहज होऊ शकेल. त्यात प्रत्येक एपिसोड  मध्ये एक एक प्रश्न हाताळता येतील आणि वेगवेगळ्या सिच्युएशन वर भाष्य करता येईल.  

हिंदी सिनेमाच्या एक ठरलेल्या चौकटीत नागराज मंजुळेचा सिनेमा पाहणं अवघड जातं. अपेक्षा उंचावल्या होत्या फँड्री आणि सैराट ने त्यामुळे झुंड तशा अपेक्षा पुर्ण करत नाही. मध्यंतरापर्यंत जे जे हॅपनिंग आहे ते ते चांगलं खिळवून ठेवतं. नंतर फुटबॉलच्या संदर्भातील सामने, टुर्नामेंट्स, होमलेस सॉकर साठी प्रत्येक खेळाडूचा चाललेला संघर्ष एकाच सिनेमात पचनी पडत नाही. फक्त अमिताभ बच्चन लक्षात राहतो नागराज मंजुळे कुठेतरी हरवतो सिनेमा संपल्यानंतर. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची कामे ज्यांनी केली ते लक्षात राहतात. सिनेमात जे सामाजिक भाष्य केले आहे ते पण लक्षात राहते मात्र मंजुळे काय वेगळं दाखवणार ह्या अपेक्षेने गेलेला प्रेक्षक हिरमुसतो. नागराजचे सिनेमे सामाजिक भाष्य करतात. राजकीय भाष्य आणि सामाजिक भाष्य यात पुसटशी रेषा आहे. समाजाच्या व्यथा, प्रश्न, समस्या भेदकपणे मांडणे हे सामाजिक भाष्य आणि त्याचे खापर कोण्या एका वर्गावर तरी फोडणे हे झाले राजकीय भाष्य. सगळ्याच समाजात दाहक, ज्वलंत वगैरे भेडसावणाऱ्या समस्या असतात. काहींना त्या जाणीवेतून तर काहींना नेणिवेतून समजतात. ते जगणं ज्या माध्यामातून लोकांसमोर येते ते महत्त्वाचे. ते माध्यम किती लोकांना अपील होते किंवा तुमची जगण्यासाठी चालणारी धडपड किती लोकांपर्यंत जाते हे त्या माध्यमाच्या लोकप्रियतेवर ठरते. साहित्य, नाटक, चित्रपट ही महत्त्वाची माध्यमे ज्याने त्याने वापरली. एखाद्यावर झालेला अत्याचार जर साधन म्हणून बाजारात मांडला तर तो राजकीय किंवा सामाजिक बस्तान पक्कं करण्याचा खटाटोप असतो. असा खटाटोप सगळ्या माध्यमातून ज्या त्या सामाजिक आणि राजकीय आस्थांनी बरेचदा केला. काहींना यश आलं तर काही अपयशी ठरले. अशा सगळ्या बाबींवर जर मंजुळे काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतोय तर ते फँड्री किंवा सैराट सारखे असेल अशी अपेक्षा उंचावणे सहाजिकच आहे. कारण नागराज ज्या भेदकपणे प्रश्न मांडतो ते लाजवाब. मग ती चीड झुंड मध्ये मध्यंतरानंतर दिसत नाही. विस्कटले आहे काहीतरी असं मनोमन जाणवतं. कॉलेजमध्ये खेळणाऱ्या पोरांना फुटबॉलमध्ये गड्डी गोदामची पोरं हरवतात हे सिनेमॅटिक वाटतं. मात्र नंतरचा होमलेस सॉकरचा प्रत्येकाचा लढा मनाला रुचत नाही. मग चावून चोथा झालेले घिसेपिटे डायलॉग इनकी दुनिया उनकी दुनिया यात अडकल्यासारखा वाटतो सिनेमा. 

जब्याचा मारलेला दगड जेवढा जोरात लागला किंवा आर्ची परश्याच्या रक्तात माखलेली लहानग्याची पावले जेवढी मनात रुतली तेवढे वार डॉनच्या कटर ने झाले नाहीत. तरीही आपल्या मराठी माणसाने केलाय सिनेमा एकदा अवश्य बघा. आवडो न आवडो. 

© भूषण वर्धेकर
५ मार्च २०२२, पुणे

गुरुवार, ३ मार्च, २०२२

प्रत्येकाचं बरं चाललंय

प्रत्येकाचं बरं चाललंय
आपापलं राखून ठेवलंय
काहींनी वाटून घेतलंय
उरलेल्यांनी हेरून ठेवलंय

कोण कोणाला जीवे मारतो
कोण कोणावर हल्ले करतो
कोण कोणाची कोंडी करतो
त्यावर प्रत्येकाचा निषेध ठरतो

साम्राज्याचा विस्तारवाद युद्ध करते
स्वराज्याचे सीमोल्लंघन क्रांती करते
इतिहासकारांची ढोंगी लेखणी चाचरते
कुठे सशस्त्र लढा, कुठे युध्दाची खुमखुमी ठरते 

हल्ल्यांच्या भीतीपोटी शस्त्रे घ्यावी
संरक्षणासाठी दिखाऊ अस्त्रे दाखवावी
पत नसेल तर आर्थिक मदत घ्यावी
श्रीमंत तिजोरीत भर पडावी

असेल अभेद्य राष्ट्रवाद जर
अंतर्गत ऐक्य करावे जर्जर
लक्ष वेधून जातपातधर्मावर
वार करा सामाजिक सलोख्यावर

राष्ट्राच्या इतिहासाची करावी तोडमोड
संस्कृती, सभ्येतेची करून पडझड
फुस लावून असंतुष्टांची रडारड
राष्ट्रविघातक अंतर्गत वरचढ

शांततावादी भूमिका घेऊन तत्पर
दुसऱ्यांच्या माथी फोडावे खापर
महाशक्तीचे कौतुक गोडवे जोरदार
नफेखोरीचे शस्त्रास्त्र व्यवहार

© भूषण वर्धेकर
४ मार्च २०२२, पुणे

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

आमचं तुमचं

आमची असते कायदेशीर कारवाई
तुमची असते सूडबुद्धीची कारवाई
आमची असते संविधानिक दुरुस्ती
तुम्ही करता ते संविधानाची तोडमोड 

आमचा असतो अस्मितेचा अंगार
तुमची असते ती द्वेषपूर्ण नौटंकी 
आमची असते लोकशाहीतील एकी
तुमची असतात स्पॉन्सर्ड आंदोलने

आम्ही मांडतो भूमीपुत्रांचे मुद्दे
तुम्ही मांडता सुपारी घेऊन प्रश्न
आमचा असतो रस्त्यावरचा लढा
तुम्ही करता तो खळखट्याक राडा

आम्ही टाकतो नियमानुसार धाडी
तुम्ही करता जाणूनबुजून मुस्कटदाबी
आम्ही देतो कायदा-सुव्यवस्थेची हमी
तुम्ही देता तो गोरगरिबांचा बळी

आमचे चालते ते प्रामाणिक प्रशासन
तुम्ही करता ते हुकूमशाही शासन
आमचा पिंड पारदर्शी व्यवहाराचा
तुमचा असतो पाढा भ्रष्टाचाराचा

आमच्या विजयात असतो मतदारांचा कल
तुमच्या विजयात मात्र ईव्हीएम ची गडबड
आमचा पराभव ठरतो नैतिक विजय
तुमचा पराभव मात्र लोकशाहीचा विजय
------------------------
©भूषण वर्धेकर
२२ फेब्रुवारी २०२२
पुणे
-------------------------

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

होकार आणि नकार

होकार आणि नकार
एकाच नाण्याच्या दोन बाजू
मात्र एक पारदर्शी प्रमाणे
चकचकीत अभ्युदयाची सुरुवात
तर एकात अपारदर्शी दडवणूक
एका भ्रमाच्या फुग्याचा स्फोट
तत्वाच्या दृष्टीने दोन्ही समर्थ
एकीकाकडे निव्वळ आनंदी तर
एकीला विलक्षण त्रास

एकात अमुलाग्र बदलांची नांदी  
तर एकात नैराश्याची भ्रांती
उद्वेग, उद्विग्न कुतरोडीची पाठीराखी
तर एक उल्हास, उत्साह यांची सोबती
सुकाळाची क्रांती, दुष्काळाची संक्रांति
एकाच मुद्द्यावर आधारित

एकीला सर्वोतोपरी दुरुस्तीला
वाव तर एकीचे सोंग
मोकाटपणाला चालना देणारे
असू द्यावे नसू द्यावे
यांचा बेचकीत राहण्याचा संगम

एकाच उत्तरात दोन्ही वाटा एकत्र
दुकट्या फसव्या भावनांचा पोरखेळ
डोळे विस्फारून रक्ताच्या अश्रूत धूर सोडतो
तरतरीत चटपटीत काळाच्या
शिळा एकमेकांवर आक्रंदत
भूत भविष्य अंधारात
वर्तमान केवळ स्वप्नवत
दुखाची किनार तर
कुठे समाधानाचे आगर
आयुष्याच्या सोंगट्यांच्या
खेळाचा मौल्यवान अविष्कार
होकार आणि नकार

एका प्रश्नाच्या अलगुज
उत्तराचा उर्वरित सारांश
भावनांचे अक्षांश, वेदनेचे रेखांश
जगण्याच्या प्रवाहात सगळेच
सर्वकालिक अशांत संथ

- भूषण वर्धेकर
२३ जुलै २०१२, ८:१५ रात्री


गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

फुर्रोगामी फियास्को

आज्ञा पाळणारे आज्ञाधारक
आदेश पाळणारे गुलाम
हुकुम देणारे हुकुमशहा
फतवा मानणारे धार्मिक
मंगळसूत्र आणि कुंकू
स्रीवर लादलेली बंधने
स्त्रीचं गृहकृतदक्ष राहणं
जेन्डर बायस्ड अन् स्टिरिओटाईप
हिजाब अन् बुरखा हर चॉईस
हलाला आणि मुताह विवाह
धार्मिक स्वातंत्र्याचे रितीरिवाज
तीन तलाक धार्मिक अधिकार
वटपौर्णिमा किंवा करवा चौथ
स्रीत्वाच्या गुलामीचं जोखड
मासिक धर्मात स्त्रीची अलिप्तता
म्हणजे स्त्रीत्वाचे शोषण
इद्दाह मात्र धार्मिक पवित्र विधी
"संविधान की मनुस्मृती" नारा असतो प्रोग्रेसिव्ह
"संविधान की शरिया" नारा कम्युनल प्रोपागंडा
सवर्ण दलित फूट म्हणजे हिंदूंचा वर्चस्ववाद
शिया सुन्नी वैर असतो इस्लामी अंतर्गत वाद
सर्वधर्मसमभावाचा वैचारिक विचका
फुर्रोगाम्यांनी केलेला इहवादी पचका

© भूषण वर्धेकर
१० फेब्रुवारी २०२२
पुणे

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...