रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे शोषितांसाठी लढले 
कामगारांसाठी हाल सोसले
लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले
विळा हातोड्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वंचितांसाठी लढले
दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले
निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले
अशोक चक्रांचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वर्चस्वासाठी लढले
फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले
क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले
विजयी उत्सवाचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे स्वराज्यासाठी लढले
गुलामांना धर्माखाली बांधले
सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले
सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे समाजासाठी लढले
ऐहिक कल्याणासाठी टिकले
चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले
स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे सर्वांगीण विकासासाठी लढले
संधीसाधूंनी त्यांना मिरवले
ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले
सत्ताधीश बनून सरंजामीत रमले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे उपेक्षितांसाठी लढले
रोजीरोटीसाठी रक्त आटवले
समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले
अल्पसंख्यांक म्हणून राजाश्रित झाले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे ऐक्यासाठी लढले
एकात्मकेच्या हक्कासाठी घुसमटले
मुलभूत गरजांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत भिडले
ते जयंती, पुण्यतिथीतच अडकले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
____________________
भूषण वर्धेकर
२८ नोव्हेंबर २०२१
पुणे
____________________


शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं


एकदा मी मराठ्यांवर 
विद्रोही कविता केली
महाराष्ट्रातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

मग मी गुजरात्यांवर 
विद्रोही कविता केली
गुजराती अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

नंतर मी सरदारांवर
विद्रोही कविता केली
पंजाबी, हरियाणातील अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

मग मी चिडून हिंदी भाषिकांवर
विद्रोही कविता केली
उत्तरेतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

थोडसं सावरून तमिळींवर
विद्रोही कविता केली
तमिळनाडूतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

त्वेषाने तेलुगू लोकांवर
विद्रोही कविता केली
आंध्रा, तेलंगणातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

नंतर मी मल्याळींवर
विद्रोही कविता केली
केरळी अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

त्यानंतर बंगाली, ओरिया लोकांवर
विद्रोही कविता केली
तिथल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

शेवटी मी ईशान्येकडील लोकांवर 
विद्रोही कविता केली
तिकडल्या अस्मितावाद्यांनी पण
मला ठोकून काढलं

सरतेशेवटी मी भारतीयांवर
विद्रोही कविता केली
एकदम सगळ्या सेक्युलरांनी 
माझं कौतुकच केलं
मात्र राष्ट्रवाद्यांनी शोधून
मला ठोकून काढलं

- भूषण वर्धेकर

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव

दिवाळीत अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला जय भीम चित्रपट म्हणजे व्यवस्थेत बऱ्याचशा ठिकाणी होणाऱ्या अमानुष छळाचं प्रातिनिधीक  भयाण वास्तव आहे. चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम संवेदनशील घटना लोकांसमोर मांडण्याचा एक यशस्वी प्रयोग आणि पायंडा कैक वर्षापासून चालत आलेला. सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात असे चित्रपट आले की चर्चा होतात, वेगवेगळे लेखनप्रपंच केले जातात व्यवस्थेतील त्रुटींवर. मग नवा काहीतरी मुद्दा येतो आणि पुन्हा ज्या विषयांवर घटनेनुसार बदल व्हायला हवेत त्या गोष्टी बासनात गुंडाळल्या जातात. समस्या जैसे थे राहतात आणि बिनकामी चर्चा, आरोप, प्रत्यारोप, तर्क, वितर्क आणि राजकीय लबाड आश्वासने निरंतर चालूच राहतात. समस्येवर तोडगा काढण्यापेक्षा इतर गोष्टी व्यवस्थेत रेंगाळत राहतात. जय भीम मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तामिळनाडूतील तत्कालीन दुर्लक्षित आदिवासींच्या होणाऱ्या छळाची गोष्ट सांगितली आहे. चित्रपट बघितल्यावर मन सुन्न होते. निष्पाप लोकांचा झालेला हिंसक छळ कोणालाही सुन्न करतोच. मात्र तेच निष्पाप लोक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले की व्यवस्थेचे खरे स्वरूप उघडकीस येते. या चित्रपटात दाखवला गेलेला मानवाधिकाराचा लढा फारच प्रामाणिकपणे दाखवलाय. जो आजच्या सोकॉल्ड सोशलमेडियाच्या जमान्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणे गरजेचा आहे. ढोंगी मानवतावादी लोकांमुळे जनसामान्यांना अस्सल खराखुरा मानवतावाद काय आहे कशासाठी हे समजणे गरजेचे आहे. कित्येक उच्चभ्रू लोकांना मुळात शोषितांचे रोजच्या जगण्याचे प्रश्न कसे आहेत हे समजत नाहीत. अशा लोकांच्या हातात जेव्हा सत्तेची आणि प्रशासनाची सुत्रे जातात तेव्हा हीच मंडळी व्यवस्थेला स्वार्थापोटी हवे तसे वाकवतात. कारण बहुतांश सुखवस्तू उच्चभ्रू लोकांमध्ये शोषित वंचित लोकांबद्दल एक वेगळाच तिटकारा असतो. हा चित्रपट व्यवस्था कशी मोडून तोडून राबवली जाते याच्यावर फार तीव्रतेने भाष्य करतो. मानवी पातळीवर रुक्ष करणारा अनुभव आहे.


मानवाधिकाराचा लढा हा नेहमीच राग-लोभ-रोषाच्या खाचखळग्यातून जातो. सध्याच्या काळात मानवाधिकाराचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना, कार्यकर्त्यांना एका बाधित नजरेने बघीतले जाते. कारण एकांगी पद्धतीने मानवधिकार प्रोजेक्ट केला जातो. वंचित, शोषित समुहाला व्यवस्था ही नेहमीच दुय्यम नजरेने बघत आली आहे. त्यांच्यासाठी लढणारे आणि धडपडणारे पारदर्शकपणे समाजात नेहमी चुकीच्या पद्धतीने पोट्रेट केले जातात. उदाहरणार्थ अतिरेक्यांना फाशी नको म्हणून लढणारे मानवाधिकार कार्यकर्ते दाखवले जातात.  कैक चित्रपटात मानवाधिकार कार्यकर्ते लोकांना सराईत गुन्हेगार वगैरेंचा पुळका असतो हे दाखवले जाते. चकमकीत जखमी होणाऱ्या पोलिसांच्या बाबतीत त्यांची भूमिका ही नेहमीच कुचकामी दाखवली गेली. निष्पाप लोकांच्या होणाऱ्या छळाला कैक मानवाधिकार चळवळींमुळे वाचा फोडली आहे. कितीतरी अमानुष छळाची प्रकरणे अशा कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आली. निरपराध लोकांना न्याय मिळाला. मात्र अशी प्रकरणे ही खूप कमी लोकांना माहिती असतात. मेडिया, चित्रपट वगैरे माध्यामातून एखाद्याच्या प्रतिमेचे रेखाटन बरबटलेले झाले की झाले. त्याची शहानिशा सहसा कोणी करत नाही. वा तशी एक नवी व्यवस्था उदयास आली जी कायदा सुव्यवस्था, न्यायव्यवस्था वगैरेंच्या आधीच एखाद्या वर शिक्कामोर्तब करते. आजकाल अशा ठशीव भूमिका घेणे अगदी व्यक्तीगत पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. जय भीम मधला मानवी हक्काचा लढा फार अप्रतिम दाखवलाय. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केलाय. सिनेमातील काही दृश्ये हिंसक जरी असली तरी ते एक सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. तसंही दक्षिणेत तमिळनाडूतील चित्रपटात जातिव्यवस्था विरुद्धच्या लढ्याची तीव्रता भडकपणे रंगवली जाते. त्या त्या दिग्दर्शकाची आणि सिनेमाची ती भाषा असते. धनुषच्या असूरन या तमिळ आणि व्यंकटेशच्या नारप्पा या तेलगु चित्रपटात पण अशीच लढाई रक्तरंजित दाखवली गेलीय. तिकडच्या पब्लिकला अशा सिनेमांचे टेकिंग अपील करत असावे. जसा कोरियन सिनेमात रक्तपात दाखवून एखाद्या व्यवस्थेविरुद्ध असलेली चीड सिंबॉलिक पद्धतीने दाखवलेली असते. तशीच ही एक सिनेमाची भाषा आहे. बेधडकपणे दाखवलेली हिंसा ह्यूमन लेवल वरच्या इमोशन्स जास्त रिक्रियेट करते वगैरे नव्या सिनेमाची नवी भाषा असावी. हृदयद्रावक, मन पिळवटून टाकणारे वगैरे दृश्ये ही अशा सिनेमाची परमोच्च बिंदू असतात. त्यात जय भीम अव्वल आहे. एखादा सिनेमा पाहून वा पुस्तक वाचून जर तुमचे मन खूप आनंदी होत असेल वा दुःखी होत असेल तर ते त्या दिग्दर्शकाचे वा लेखकाचे खरेखुरे कौशल्य आहे. त्याचा विचार, आशय आणि विषय लोकांपर्यंत पोचवण्याचे मोटिव्ह सिध्द झाले असे आपण म्हणू शकतो. अर्थातच संवेदनशील विषय हाताळताना फार बारकाईने मांडणी करावी लागते. कोणाच्यातरी प्रभावाखाली येउन केवळ अतिरंजित मेलोड्रामा करून काहीही उपयोग नसतो. 


जय भीम वर कौतुकाचा वर्षाव करणारे पण आहेत आणि आक्षेप घेणारे पण. मुळात चित्रपटाच्या नायकाला कम्युनिस्ट चळवळींशी निगडित दाखवलेय. मग आंबेडकर, पेरियार, मार्क्सच्या प्रतिमा कर्मधर्मसंयोगाने चित्रपटात डोकावतात. विळ्या-कोयत्याचा लाल झेंडा दिसला की उगाचंच काही लोकांना कसनुसं होतं. मग आक्षेप घेतले जातात. कारण लाल झेंडा हा नक्सली लोकांना सहानुभूती वगैरेसाठी आहे असा भलताच नवा प्रवाह सुरु झालाय. मग अर्बन नक्सल वगैरे बिरूदावली रुढ व्हायला लागली. मुळात आजचे साम्यवादी कार्यकर्ते आणि खरेखुरे साम्यवादी कार्यकर्ते यात बराच फरक आहे. तसंही लाल, निळा, हिरवा आणि भगव्या रंगाच्या झेंड्याखाली ज्याची त्याची मतपेढी बांधून ठेवलेली आहे. मुळात शोषित, वंचित आणि दलितांच्या चळवळी ह्या लाखो असंघटित लोकांच्या मूलभूत गरजा, हक्कासाठी उभ्या राहिल्या त्या त्या वेळी. जय भीम म्हणजे आंबेडकरी चळवळीचा आवाज असा काहीसा समज काही दशके चालू आहे. तसे खरे पाहता, अस्सल आंबेडकरी विचारधारा ही नेहमीच डाव्यांच्या, उजव्यांच्या आणि वर्चस्वतावादी विचारांच्या विरोधात असते. ज्यांनी आंबेडकरांचे साहित्य वाचलेय त्यांना नक्कीच माहिती आहे आंबेडकर यांचे कम्युनिस्ट लोकांबाबतचे प्रामाणिक मत काय आहे ते. हे कम्युनिस्ट फार चाणाक्ष दक्षिणेकडे पेरियार यांना जवळ करतात आति इतरत्र आंबेडकरांना अंतर देतात. आंबेडकर आणि पेरियार तसे समकालीन सुधारणावादी. शोषितांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. मात्र व्यवस्थेतील धुरणींनी सगळे महापुरुष आणि समाजसुधारक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले. दलित चळवळींशी निगडीत कार्यकर्ते कमी आणि गट-तट जास्त असतात. अशा गटातटातील नेत्यांची इच्छाधारी तऱ्हा निराळ्या. कम्युनिस्ट पक्षात जमिनीवर उतरून लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर आंदोलने करणारे अभ्यासू कार्यकर्ते आहेत. मात्र व्यवस्था बदलण्यासाठी लढतात आणि व्यवस्थेचाच भाग होऊन जातात. जय भीम चित्रपटाच्या नायकाची पार्श्वभूमी ही अशीच लढवय्याची आहे. जो प्रतिभावान, स्वाभिमानी आणि प्रामाणिक दाखवलाय. जय भीम चित्रपटातून लोकांच्या जगण्या, मरण्याचा प्रश्न कीती दाहक असू शकतो याची जाणीव प्रेक्षकांना होते. अशा चित्रपटातून व्यवस्थेवर एखादे स्टेटमेंट करण्यासाठी किंवा त्रुटी दाखवण्यासाठी फार समतोल राखावा लागतो. तकलादू भूमिका घेऊन चालत नाही. भेदक सत्य आणि दाहक वास्तव लोकांपर्यंत कसे पोहोचते त्यावर अशा चित्रपटाचे यशापयश अवलंबून असते. संवेदनशील मनाला नक्कीच प्रक्षुब्ध करणारा आणि व्यवस्थेबद्दल डोक्यात तिडिक जाणारा हा चित्रपट आहे.


जय भीम वर आक्षेप घेऊन किंवा कौतुक करुन अमुक-तमुक वर ओरखाडे काढणारे किंवा गोडवे गाणारे हे काही राजकीय पक्षाशी निगडीत खऱ्या अर्थाने चमकोगिरी टाईप लोक आहेत. भूतकाळातील मानवी हिंसक घटना धुंडाळून आणि जी घटना सेलेबल वाटेल तिला उचलून अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडून जर कोणी करत असेल तर हे इथल्या दुभंगलेल्या समाजव्यवस्थेत फार घातक ठरेल. उदाहरणार्थ तीन दशकांपूर्वी घडलेल्या काश्मीरमधील पंडीत लोकांवर झालेल्या अन्यायावर किंवा गांधीहत्येनंतर ब्राह्मणांनी भोगलेल्या छळावर जर अशा प्रकारचा चित्रपट दाखवला गेला तर लागलीच आक्षेप घेणारे आणि कौतुक करणारे आपापल्या भुमिका बदलतील. वर उल्लेखलेल्या घटना सध्याच्या सत्ताधारी समर्थकांना आपल्याश्या वाटतात. तसाच प्रकार २००२ साली झालेल्या गुजरात दंगली किंवा गोध्रा हत्याकांड यांच्यावरही अशा पद्धतीने सिनेमे बनवले जाऊ शकतात. कारण निष्पाप लोकांच्या जगण्या मरण्याच्या घटना आपल्या देशात कैक वेळा घडलेल्या आहेत. वरील उदाहरणे केवळ प्रातिनिधिक म्हणून घेतलेली आहेत. कारण प्रत्येक हिंसक घटनेतील पिडित समाजाच्या मागे एक नवी अप्पलपोटी व्यवस्था उभी राहिली आहे. महाराष्ट्रात तर दलितांच्या छळाच्या घटना बघितल्या तर कीतीतरी आहेत. यावर महाराष्ट्रातले स्वयंघोषित नवसंविधानवादी ब्रिगेडी काही बोलत नाहीत. कारण पोटजिविकेसाठी त्यांना ब्राह्मणांनी बहुजणांवर खूप शतके अत्याचार केला वगैरे शिकवलेले असते. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणी लोक जे कोणी आक्षेप वा कौतुक करणारे आहेत ते ढोंगी आहेत. भविष्यात जो तो ज्याला हवी ती घटना घेऊन कोणी प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा वगैरे सिनेमा करेल. तेव्हा आताचे कौतुक करणारे आणि आक्षेप घेणारे बुजगावणे काय करतील? एक देश एक संविधान म्हणायचे आणि सरंजामशाही अबाधित ठेवायची असा परिपाठ कित्येक दशके देशात चालत आलेला आहे. जय भीम हा चित्रपट ज्या घटनेवर बेतलेला आहे ती केवळ प्रातिनिधिक गोष्ट आहे. बिघडलेली आणि सोयीनुसार वाकवलेल्या व्यवस्थेबद्दल हा सिनेमा आहे. आजवर भारतात कैक समाजसुधारकांनी शोषितांसाठी जे जे केले ते अत्यंत अडचणींना तोंड देऊन. व्यवस्था बदलणे साधीसुधी गोष्ट नाही. त्यासाठी सोशल अवेअरनेस फार महत्त्वाचा. केवळ प्रतिमापुजन व प्रतिमाहनन करून समस्या सुटत नाहीत. त्यासाठी तडीस नेण्याची समर्पित प्रवृत्ती गरजेची. अशी प्रवृत्ती असलेले कार्यकर्ते आपल्या देशात नेहमीच दुर्लक्षित राहतात. कोणी कोणाला मोठे करावे कोणाला लहान ठरवावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेच्या विषय. मात्र जय भीम सारखे संवेदनशील चित्रपट जेव्हा येतात तेव्हा व्यवस्थेतील त्रुटी कायमच वाकुल्या दाखवत राहतात. 


आजच्या काळात अनेक वेळा एखाद्या जातीतील लोकांना हॅबिच्युअल चोरी करणारे असतात असे बोलले जाते. किंवा अमुक तमुक जातीतल्या लोकांचा जन्मच तमुक अमुक कारणांसाठी झालाय अशी ठशीव समजुत कित्येक पढतमुर्खांची असते. सोशलमेडियाच्या माध्यमातून जे राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक जेव्हा जय भीम सिनेमाबद्दल कौतुक करताना संविधानाच्या बाता मारतात तेव्हा हसू येते. कारण आजपर्यंत आपल्या देशात प्रत्येक विरोधकांना सत्ताधारी हे संविधानाचा खूण करणारेच दिसतात. प्रत्यक्षात वेळोवेळी ज्याने त्याने सत्तेत येऊन संविधानाची मोडतोड केलेली आहे. कारण अशी गळचेपी केल्याशिवाय सत्ता राबवता येत नाही. मग ही प्रवृत्ती देशातल्या प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेत मुरलेली आहे. न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन ही दोन प्रमुख टार्गेट जय भीमच्या निमित्ताने लोकांसमोर येतात. प्रत्येकाला आपापली प्रतिमा, पत जपण्यासाठी काय काय करावे लागते मग ते कसे जस्टीफायेबल आहे हे दाखवायचे असते असे सगळे या सिनेमात चित्रित केलेले आहे. असा एखाददुसरा सिनेमा सामाजिक क्रांती करू शकत नाही मात्र लोकांपर्यंत प्रामाणिक विषय पोचवू शकतो. असे सिनेमे करताना तोल ढासळू नये हे दिग्दर्शकाने पहिल्यापासूनच ठरवलेले आहे असे समजते. कारण सिनेमात व्यवस्था कशी कचकड्यासारखी वापरता येते हे स्पष्ट पणे कसलीही भीडभाड न बाळगता दाखवले आहे. सिनेमाची स्टोरी टेलिंग मेथड अजिबात कंटाळवाणी वाटत नाही. यासाठी पात्रांचा अभिनय मेलोड्रामा न होता संयत वगैरे आपसूकच झाला. बरेचसे संवाद बोल्ड आणि विचार करायला लावणारे आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने बॅकग्राऊंड स्कोअर चा प्रभावी वापर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवायला सिनेमा यशस्वी ठरलाय.


या सिनेमाच्या निमित्ताने हल्ली समाजमाध्यमांच्या वॉलवर बरेच चांगले वाईट सिनेमाबद्दल लिहिले गेलेय. काहींना जय भीम हा ट्रेडमार्क आहे अमुकतमुक चळवळींचा वगैरे असा साक्षात्कार झालाय. एक दोन महाभागांनी तर असे चित्रपट सहानुभूती दाखवण्यासाठी केलेले खटाटोप असतात असे अप्रत्यक्षपणे जाहिर केलेय. मुळात जे लोक असे विषय रिलेट करू शकतात अशांनाच हा सिनेमा थेट भिडतो. कित्येकांचे आयुष्य बोरातल्या आळीसारखे असते. बाहेरच्या जगाची कसलीही जाणीव नसते. अशा दिवट्यांनी जय भीम सिनेमा अवश्य बघावा. त्यामुळे शोषित, वंचितांच्या सामाजिक समस्यांचे गांभीर्य समजेल. 

- भूषण वर्धेकर, पुणे
नोव्हेंबर २०२१

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा

ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेला सरदार उधम हा चित्रपट नक्कीच न चुकवण्यासारखा आहे. शुजित सरकारचे दिग्दर्शन आणि विकी कौशलचा अभिनय अफाट आहे. एकूण स्वातंत्र्य मिळण्याआधीची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. हा नसिनेमा आजच्या काळात महत्त्वाचे विधान करतो. सध्याचा काळ हा श्रेयवादासाठी आसुसलेल्या पक्षांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. हा सिनेमा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी गोष्ट सांगतो ती फार महत्त्वाची आहे. सरदार उधम यांचा एकाकी लढा, सूडाची भावना आणि त्यामागची कारणमीमांसा जबरदस्त कन्व्हीक्शनने मांडलेली आहे. १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास निरखून बघायचा असेल तर एलन ह्यूम ने जे कारनामे केलेत त्यापासून सुरुवात करायला पाहिजे. १८५७ चा लढा आणि नंतरचे झालेले लढे. १९४२ च्या लढ्याला असलेले वेगवेगळे कंगोरे समजून घेणे गरजेचं आहे. त्यासाठी त्याकाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची भुमिका अभ्यासणे फार महत्त्वाचे आहे. समांतर पणे बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष पण महत्त्वाचा आहे. नंतर टिळकांच्या आधीचे लढे टिळकांच्या नंतरचे लढे फार महत्त्वाचे आहेत. आणि हो सोबत अमेरिकन आणि इंग्रज लोकांनी भारताबद्दल त्याकाळात जी निरिक्षणे नोंदवली आहेत ती पण विशेष उल्लेखनीय. नंतर तत्कालीन ठिकठिकाणच्या राजघराण्यातील लोकांनी काय काय उपद्व्याप केले ते पण तितकेच महत्त्वाचे. नंतर क्रांतिकारक लोकांची ठिकठिकाणी झालेली सशस्त्र आंदोलने आणि तत्कालीन कॉंग्रेसची आंदोलने यावर कटाक्ष टाकला की खरा इतिहास आणि लिहिला गेलेला कोणता आहे हे लक्षात येते. 

क्रांतिकारक लढ्याचा उल्लेख केलाय मी, त्यात सरसकटपणे सगळेच क्रांतिकारक गृहित धरले आहेत. यापैकीच एक उधम सिंग यांचा एकाकी लढा म्हणजे सरदार उधम चित्रपट. आजवर आपला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमात कॉंग्रेस प्रणित सरकारांनी नेंहरू गांधी या विचारावर आधारित लिहिला आहे. कारण कॉंग्रेसने तशी खंबीर व्यवस्था उभी केली होती. मुळात क्रांतिकारक लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी संघटना कार्यरत होत्या. त्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र आघाडीवर होते. दक्षिणेकडे पण तुरळक क्रांतिकारी घटना होत होत्या मात्र इतिहासात त्यांचा उल्लेख प्रचलित लढ्यासारखा नोंदवला गेला नाही. बंगाली बहुतेक डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे होते. कारण तत्कालीन दशकांत जागतिक घटना पण तशाच होत होत्या. पहिल्या महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर, रशियन क्रांतीनंतर, युरोपीय खंडातील बदल यांचा आपल्या देशात कसे परिणाम झाले याबद्दल इतिहास फारसा शिकवला नाही. मात्र स्वातंत्र्य लढ्यात तत्कालीन क्रांतिकारक लोकांनी ठिकठिकाणी जे जे उठाव केले मग ते देशात असोत वा परदेशात ते फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी फक्त संघटनाच नाही तर कित्येक व्यक्ती अग्रभागी होत्या हे जाणवते. त्यापैकीच उधम सिंग यांची एकाकी लढत पाहून विशेषतः तत्कालीन कम्युनिस्ट चळवळी महत्त्वाच्या कशा होत्या हे समजते.

सशस्त्र क्रांतिकारकांचे पहिले पर्व, दुसरे पर्व वगैरे वाचण्यासारखे आहे. हे सगळे समांतरपणे चालू असताना परदेशात (प्रामुख्याने इंग्लंड, लंडन, जपान व रशिया) जाऊन तिथून जे जे कार्यरत होते त्यांना साईडलाईन केले गेले मुख्य ऐतिहासिक प्रवाहातून असे मला नेहमीच जाणवते. तसंही गेल्या काही वर्षांत सातत्याने सत्ताधारी मातृसंघटनेच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील योगदानाबद्दल बिनकामी चर्चा होत असते. त्यानंतर गांधी नेहरु वगैरेंची व्यवस्था होती म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले हे वारंवार पटवून सांगितले जाते. या दोहोंच्या संघर्षात खऱ्याखुऱ्या लोकांच्या चळवळी म्हणजे तत्कालीन कम्युनिस्ट, तत्कालीन शोषित, दलित यांचा संघर्ष नेहमीच मागे राहिलाय असे वाटते. 

माझ्या मते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर खरा पारदर्शी कालखंड पडताळून पहायचे असेल तर १९४० नंतरचा लढा, १९२० ते ४० चा लढा, १९२० च्या आधीचे लढे आणि सर्वात महत्त्वाचे १८५७ चा लढा इत्यादी कालखंड खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला सगळ्यात जास्त हॅपनिंग कालखंड म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर ते स्वातंत्र्य बहाल करण्यापर्यंतचा. हे सगळे लिहिण्याचे मुख्य कारण सरदार उधम चित्रपट पाहताना कैक क्रांतिकारक लोकांना आणि त्यांच्या चळवळींना आपण इतिहासात कमी प्रमाणात प्रोजेक्ट केलेय असे दिसते. खरा इतिहास बायस्ड पद्धतीने कोणी लिहिला आहे कसा लिहिला आहे का लिहिला आहे वगैरेंची नंतर चिरफाड करता येईल. मात्र खराखुरा हार्डकोअर कम्युनिझम समजून घ्यायचा असेल तर हा सिनेमा फार महत्त्वाचे भाष्य करतो. शुजित सरकारने फार बारीकसारीक गोष्टी दाखवल्या आहेत. त्यामुळे चित्रपट कोठेही कंटाळवाणा वाटत नाही. उगाचंच शब्दबंबाळ संवाद, देशप्रेमाचे ओतप्रोत भरलेले तेजपुंज डोस वगैरे हा चित्रपट अजिबात देत नाही. एक संकीर्ण लढाई एकाकीपणे लढताना सरदार उधम सिंग जिवंत उभा राहतो. चित्रपटात तुरळक घटना १९१९ ते १९४० मधील अशा पद्धतीने दाखवल्या आहेत की चित्रपटाची पटकथा कुठेही सैल होत नाही. उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून मायकेल ओडवायरची हत्या लंडनमध्ये केली. या एका वाक्यात उधम सिंग यांचे कार्य मावणार नाही. त्यासाठी त्यांना किती दिव्यांतून जावे लागले. २१ वर्षे एकच गोष्ट करण्यासाठी जे जे केले ते या चित्रपटात पाहण्यासारखे आहे.  मला विशेष कौतुक या गोष्टीचे वाटते की हा चित्रपट करताना दिग्दर्शकाने  फारच मुद्देसूद आणि पाल्हाळ होणार नाही असे सिनेमॅटिक प्रसंग दाखवलेत. असे पिरियड फिल्म्स करताना थोडीशी जरी स्क्रिप्ट इकडेतिकडे झुकली की चित्रपट गडगडतो. तत्कालीन कम्युनिस्ट विचारधारा जबरदस्त साकारली आहे. तसंही कम्युनिस्ट विचारधारेचे गेल्या शतकात भारतीय भूखंडावर वेगवेगळे पल्ले आणि प्रवाह राहिलेले आहेत. हल्लीचे कम्युनिस्ट, लिबलर वगैरे मंडळी हे नक्षलप्रेमी असतात असा एक मोठा समज पसरवलेला आहे. १९४० पर्यंत भारतातील कम्युनिस्ट एक दिलाने लढणारा समुह आणि विचारधारा होती. १९४२ च्या लढ्याला तत्कालीन कम्युनिस्ट चळवळीचे आणि संघाचे समर्थन नव्हते. का नव्हते हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. १९६२ नंतरचा कम्युनिस्ट विचारप्रवाह भारतात वेगळ्या खाचखळग्यातून जात होता. ८० नंतरचा एकूणच कम्युनिझम पतनाकडे वाटचालीस आगेकूच करत होता. ९० नंतर जागतिकीकरण आले आहे सगळ्या विचारप्रवाहांना उधळून लावले. सरदार उधम चित्रपटात जो कम्युनिस्ट लोकांचा कालावधी दाखवतो तो प्रखर राष्ट्रवादी, वैचारिक रित्या परिपक्व व जहाल पद्धतीत विश्वास असणारा होता.

पहिल्या महायुद्धानंतरचा, दुसऱ्या महायुद्धाच्या आधीचा काळ आणि भारतीय क्रांतिकारक लोकांच्या छुप्या पद्धतीने लढण्याच्या कृती या गोष्टींनी ह्या चित्रपटाचा गाभा तयार झालेला आहे. यात सरदार उधम सिंग यांची कृती आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेला खटला, त्यांना सहन करावा लागलेला छळ, हत्या करण्यामागील जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर झालेला तीव्र आघात. हे सगळं जस्टीफायेबल आहे. या चित्रपटात भगतसिंगांशी निगडित काही प्रसंग ज्याप्रमाणे दाखवले गेले आहेत त्याला तोड नाही. साधा, सरळ आणि सुटसुटीत साम्यवादी विचार कसा असतो हे खूपच भारी दाखवलंय या सिनेमात. एखाद्या ग्राउंड रिएलिटीशी तडफेने जाऊन भिडण्याची तलफ काय असते हे हार्डकोअर कम्युनिस्टच समजू शकतो. तिथे जातपातधर्म याचा मागमूसही नसतो. विचार पक्का आणि धडक कृती ही साम्यवादी आकलनाची मुख्य शक्तीस्थळे आहेत. क्रांतिकारक आणि दहशतवादी यांच्यातला सडेतोड फरक चित्रपटात भगतसिंगांनी सांगितलेला आहे. तो सीन माझ्यामते अव्वल दर्जाचा आहे जो आजच्या काळातील तथाकथित भोंदू, स्वयंघोषित राष्ट्रभक्त आणि ढोंगी, लिबरल लोकांना दाखवण्या लायक आहे. आजचा काळ हा एकूण विस्कळीत वैचारिक कल्लोळाचा आहे. अशा काळात सरदार उधम सारखा चित्रपट येतो हेच खूप महत्त्वाचे आहे. कारण सध्याच्या काळात राष्ट्रभक्ती ही पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्थान झिंदाबाद भोवतीच फिरते. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी जहाल व मवाळ गटात विभागलेले होते वगैरे पुस्तकी विधाने घोकंपट्टी साठी ठिक. मात्र जहाल गटाकडे जो मोटिव्ह होता तो किती क्रिस्टल क्लिअर होता आणि त्याचा जनजागृती साठी कसा वापर करायचा याचे 'टूलकीट' प्रबोधनात्मक होते. प्रक्षोभक नव्हते. नुसतं स्वातंत्र्य मिळवणे हा हेतू नसून लोकांना चांगले सुशासन, तळागाळापर्यंत विखुरलेल्या घटकांना सोबत घेऊन राष्ट्रबांधणी करणे हे फार महत्त्वाचे 'टास्क' जहाल गटाकडे होते. हा चित्रपट अशा घटकांचा जीवनपट उलगडतो. 

मन सुन्न करणाऱ्या हिंसक घटना आपल्या देशात खूप घडल्या आहेत. त्यापैकीच जालियनवाला बाग हत्याकांड. चित्रपटातील शेवटची काही मिनिटे केवळ त्या रात्री काय घडले आणि त्याचा विशीतल्या तरूणावर -उधम सिंग- झालेला परिणाम यासाठीच राखीव. रक्तरंजित दाहकता जी दाखवलीय त्यावरून त्याकाळी काय काय सहन करावे लागले असेल त्याची प्रचिती येते. इंग्रज लोकांची प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि प्रशासकीय कर्तव्यदक्ष कामकाज रूटिन याचाही हलकासा कानोसा या चित्रपटाने घेतलाय. शेवटचा सीन चित्रपटातील 'वरचा सा' वगैरे म्हणतात तसा आहे. अभिनयापेक्षा दिग्दर्शकीय कसब चित्रपटात खूप आहे. तसही चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम अभिनेत्याचे नाटक हे माध्यम व साहित्यनिर्मिती हा लेखकाचा प्रांत. ह्या चित्रपटाची विशेषकरून महत्त्वाची उल्लेखनीय बाजू म्हणजे तत्कालीन काळ उभा करणं. ते लयभारी जमलंय. तंत्रज्ञ कलाकारांनी जे उभे केलेय त्याला दहा पैकी दहा मार्क. मोजकेच पण लक्षात राहणारे संवाद. 
"... जंग बडी बेईमान चीज़ है। आपको लगता है आप जीतते हो । कोई नही जीतता,  नोबडी विन्स, ओन्ली हेटरेड विन्स।" हा संवाद मला विशेष आवडला. 

- भूषण वर्धेकर, पुणे.

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या 
या रे येड्यांनो, या रे या 
झिंगलेला हा आनंद घ्या 
हर्बल तंबाखूचा सुंगंध घ्या

मनात फुलावी कडक चांदण्या, नबाब रे बरळतो
महाराष्ट्राच्या भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो 
गंजेकसांना का हुंगुन रे दहशत हा भरतो 
हर्बलफुलाचा  महाविकास घ्या 
वसुलीआघाडीचा सुहास घ्या 

चार दिशांचे चौखूर सुंदर आघाडीचे पाळणी 
मंत्र्यांचे मुखकमल हे डुलत्या तुरुंगसदनी 
बरळा बोंबला फुरोगाम्याला जो जो ग गाउनी 
युगायुगाचा अंमल घ्या,
नवक्रांतीचा हा आरंभ घ्या 

© विडंबन- भूषण वर्धेकर

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

भारत माता की जय!!!

पुर्वीच्या काळी फक्त आणि फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी राष्ट्राभिमान वगैरेंची जाणीव होत असे. मग सार्वभौम देशाचा सजग नागरिक म्हणून झेंडावंदन करून आल्यानंतर देशासाठी आगळं वेगळं कर्तव्य पार पाडल्यासारखे वाटायचं. मात्र आता अशी राष्ट्रभक्ती दाखवण्याची वेळ दैनंदिन व्यवहारात आली आहे. नोटबंदीनंतर बँकेच्या रांगेत तासनतास उभे राहून वीररसयुक्त देशभक्ती नँशनल ड्युटी केल्यासारखी वाटत होती. पण सरकारने दयाळू लोकांना असा फिल रोजच्या जगण्यात दिला. हल्ली तर दरवेळी पेट्रोल भरताना क्रांतिकारी कार्य केल्याचा अभिमान वाटतो. वाणसामानाची यादी घेऊन दुकानात गेलो तर गरजेपुरता किरणा घेण्यातच सगळा पैसा खर्च होतो. गोळ्या बिस्किटे चिक्की टाईमपास खाऊ साठी पैसेच शिल्लक राहत नाहीत. पुन्हा एकदा राष्ट्रीय कर्तव्य निभावल्याचा फिल येतो. मग मनाशीच विचार येतात की सरकारनेच ठरवलेलं दिसतंय लोकांनी फक्त गरजेप्रमाणे सकस व पौष्टिक खावं म्हणून महागाई केलीय. ससटरफटर खाल्याने वजन वाढतं मग आजार वाढतील म्हणून जंकफूड नकोच नको. अहाहा काय अद्वितीय सरकार आहे. गरीबातील गरीब जनतेसाठी किती तो कळवळा. याआधीचे सरकार कमी महागाई वाढवंत होते. आताचे सरकार सगळंच जास्तीतजास्त करतंय. विकासकामे पण जास्त करतंय महागाई पण जास्त करतंय जेणेकरून लोकांनी फक्त गरजेपुरतं आणि आवश्यक तेवढंच खाल्ले पाहिजे. म्हणूनच महागाई वाढत चाललीय. असं समजून अजून मोठ्ठं देशभक्तीपर कार्य करायचा फिल घेऊन घरी यायचे आणि काटकसरीने जगायचे. त्याशिवाय कसं कळणार आताच्या पिढीला आपल्या पूर्वजांनी कीती आणि काय हालापेष्टा भोगल्यात. खस्ता खाल्ल्यात. असा हा मास्टर स्ट्रोक.

आमच्या सौभाग्यवती लग्न झाल्यानंतर नवीन घरी आल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ गरम दुधाचा अभिषेक गँसला घालत असे. त्यामुळे एक लीटर घरासाठी एक लिटर अभिषेकासाठी दूध घेत होतो. आता मात्र पैसा तेवढाच खर्च होतोय दूध मात्र एकच लिटर येतय हो. तसं यामुळे सौभाग्यवतींचे लक्ष केंद्रित होऊ लागलेय गेल्या काही वर्षापासून. पुर्वी फक्त गँस रोज धुतला जात होता. आता दुधाचा अभिषेक होत नसल्याने महिनोंमहिने साफसफाई होत नाही. तसंही घरची मंडळी महागाई वाढल्यामुळे अन्नपदार्थ अगदी कट्टानकट्टी करते. अजिबात नासाडी होत नाही. पॉकेटमनी वाढवला तरीही घरचे दिवटा आणि दिवटी गपगुमान घरीच सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करतात बरेच वेळा. हौसमौज पॉकेटमनी मधून भागवा असा हिने निर्वाणीचा आदेश दिल्यानंतर मुलांच्या खर्चिक स्वभावात अमुलाग्र बदल झालाय.  म्हणजे अगदी आटपाट नगरातील गरीब ब्राह्मणी कुटुंबातील गोष्टींमधल्या गृहकृतदक्ष पात्रांसारखी घरची मंडळी भासू लागली. अनंत उपकार आहेत हो सरकारचे. घरोघरी अगदी वैदिक काळातील संस्कृती अवतारावी असाच चंग बांधलेला दिसतोय विद्यमान सरकारने. मेरा भारत बदल रहा है। ये नया इंडिया है। असं उगाचंच नाही म्हणत?

एवढी महागाई वाढलीय तरीसुद्धा जनता बिचारी गपचूप सहन करतेय. म्हणजे आकस्मिक युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर लोकांना अशा प्रचंड दबावाखाली जगण्याची रंगीत तालीमच चाललीय जणू. पहा किती ते आमचे सरकार दुरदृष्टी ठेऊन कारभार करतंय. कडक हेडमास्तर जसे वांड पोरांना वठणीवर आणण्यासाठी यत्न यत्न पछाडलेले असतात. कडक शिस्तीचे डोस अधूनमधून देत असतात त्यामुळे विद्यार्थी दशेतच प्रबळ राष्ट्रप्रेमाची भावना बळावते तसाच काहीसा कयास चालू आहे वाटते. म्हणून उगाचंच 'व्हॉईस रेझ' करणाऱ्यांना टवाळांना लागलीच जेरबंद केले जातेय. स्वातंत्र्यानंतर असं कधीही घडलं नव्हते. म्हणजे हे आधीच घडायला हवे होते. तसे झाले असते तर आज आमच्यावर ही वेळ आलीच नसती. सारांश काय याहून भयावह वेळ पुढच्या पिढीवर येऊन भावी पिढी होरपळून जाऊ नये म्हणून आम्हाला मुस्कटदाबी वगैरे काय म्हणतात ते सहन करावे लागतेय. मग आम्ही नाही का लहानपणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या आधीच्या कैक पिढीने सोसले त्यामुळे त्यांचा आम्हाला दुराभिमान आहे. तसाच आमच्या पिढीचा दैदिप्य अभिमान भावी पिढीला होण्यासाठी विद्यमान सरकारच कावेबाज डाव खेळत आहे. ये है असली मास्टर स्ट्रोक।

बऱ्याचशा सरकारी व्यवहारात ऑनलाइन संस्कृती आल्यामुळे मधल्या साखळीला खिसा गरम करण्यासाठी द्यावा लागणारा पैसा वाचला म्हणून खूष होतो. वाटलं सेव्हींग करू एफ.डी. काढू. पण मनकवडे सरकार ऐकतंय सगळं बहुतेक? बँका बुडून पैसा अडकू नये म्हणून वाचलेला पैसा महागाई मार्फतच सरकारने वापरायचा ठरवलाय. ह्याला म्हणतात डायरेक्ट पॉकेटवरचा सर्जिकल स्ट्राईक. भारीच. काय ती अद्भूत विचाररम्य स्ट्रँटेजी. वाचलेल्या पैशात लोकांनी व्यसने करू नये म्हणून पण महागाई वाढत असावी. ज्यांना व्यसनांशिवाय रहावत नाही त्यांना वाढीव दरानं खरेदी करावी लागते म्हणजे मिळणारा अतिरिक्त पैसा पण सरकारी कामांसाठी वापरणार. उगाच अतिरिक्त पैशांसाठी गरीबांना कर भरावा लागू नये म्हणून सरकारची छुपी रणनीती आहे ही. 

सात वर्षापूर्वी पगार बेताचाच होता. महिन्याच्या पगारात सगळे कौटुंबिक खर्च भागवून एखादा ग्रँम सोनं घ्यायला नाकी नऊ येत असत. आता म्हटलं पगार चांगला वाढलाय तरी तीच परिस्थिती सगळा खर्च होऊन एखादा ग्रँम सोन्याच्या खरेदीसाठी भंबेरी उडते. म्हणजेच सरकारने लोकांनी पैसा वाढल्यामुळे श्रीमंतांची बरोबरी करू नये व पैशाच्या मुजोर-मस्तीची हवा डोक्यात जाऊ नये म्हणून किती काळजी घ्यावी गोरगरीब जनतेची? सोबत कर्जे स्वस्त करून, पगारवाढ करून खरेदी करण्याची क्षमता वाढवली. कर्जे सहज मिळू लागली बुडणाऱ्या बँका, डबघाईला आलेल्या वित्तसंस्थांना चालना देण्यासाठी सरकारने असे केले असावे. म्हणून पुन्हा आदिम राष्ट्रकर्तव्य पार पाडण्यासाठी कर्जे काढून सरकारला प्रगतीसाठी हातभार लावलाच पाहिजे ना! असं रोजच्या जगण्यात राष्ट्राभिमानामुळे उर भरून येण्याची वारंवारता वाढली. पूर्वीच्या काळी वर्षातून दोन दिवस असायचे. हल्ली रोज रोज देशसेवा करण्याचे सौभाग्य मिळतंय. जन-आंदोलनात उभे ठाकलेले दीन-सैनिक होण्याचे अहोभाग्य लाभत नाही नशीबवान लोकांना सुद्धा. खरंखुरं राष्ट्रप्रेम ते हेच बहुधा. भारत माता की जय!!!

- भूषण वर्धेकर , पुणे

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी...


एकदा एका जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन केले होते. जाहिरात एका घरगुती वापरणाऱ्या वस्तुची करायची होती त्यासाठी जो चांगल्या जाहिरातीची संकल्पना मांडेल त्याला बक्षिस देऊन तीची चित्रीकरणासाठी निवड होणार होती. ठरल्याप्रमाणे पुण्या मुंबईतील जाहिरात कंपन्यांनी झुंबड केली स्पर्धेत. कारण सर्वाधिक इंटेलिजंट कंटेट पुण्या मुंबईतूनच तयार होतो असा त्यांचा फुकाचा अतिआत्मविश्वास आहे. मग इतर भागातील जाहिरात कंपनीच्या प्रतिनिधींना तुच्छतेने वागवणे वगैरे बाष्कळ प्रकार तिथे झाले. शंंभरहून अधिक संकल्पनांची एन्ट्री झाली. सगळ्यांनी आपापल्या बुद्धीमत्तेचा पिट्टा पाडून एकेक संकल्पना मांडली होती. जेव्हा परिक्षकांकडे सगळ्या कल्पना गेल्या तेव्हा प्रत्येक संकल्पनेवर चर्चा, छाननी, वाद झाले. मग किमान समान विषय अधिकृतरीत्या ठरवले गेले.


त्यापैकी एक होता भारतीय कुटुंबातील एकजूट दाखवून जाहिरातीत घरगुती वापराच्या वस्तूचे प्रमोशन करणे. दुसरा म्हणजे नेहमीचाच महिलांचे सबलीकरण आणि ती घरगुती वस्तू वापरून मिळणारे तिला तिचे हक्काचे स्वातंत्र्य. तिसरा विषय घरगुती वस्तू वापरल्याने देशातील सर्व गोरगरिबांना होणारा फायदा दाखवणे. असे विषय ठरले आणि तिचे उपयोगात आणण्यासाठीच्या संकल्पनांची चिरफाड केली गेली. एका संकल्पनेत एका कुटुंबातील गृहिणीचा सगळा वेळ दिवसभर कामात निघून जातो म्हणून घरगुती वस्तू वापरल्याने तिचा निम्मा वेळ वाचेल आणि मुलांच्या जडणघडणीत जास्त लक्ष देता येईल असे मांडले होते. त्यावर एका परिक्षक महिलेचा लागलीच आक्षेप आला. त्या स्वतः स्त्रीमुक्तीच्या समर्थक होत्या. तशा त्या ते दर्शवण्यासाठी स्लीव्हलेस कॉटनचा कुर्ता आणि ब्रँडेड जीन्स परिधान करूनच सार्वजनिक जीवनात वावरत असत. सोबत चेहऱ्याला साजेशा बॉबकट व कुर्त्याला मँचिंग अशी साधी ओढणी असा पेहराव नेहमीचाच. आक्षेपाचे मूळ कारण जाहिराती मध्ये महिला गृहिणी दाखवून स्त्रीला कुटुंबात जखडून ठेवण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहात असे होते. त्यांचा तात्विक संताप झाला. तसही त्यांची दिवसाची सुरूवातच अशा तात्त्विक संतापाने होते त्यामुळे त्या बऱ्यापैकी रुळल्या होत्या अशा प्रसंगांना तोंड देताना. काय काय असतात प्रतिपक्षाचे आक्षेप, आरोप आणि युक्तिवाद वगैरेंची त्यांना पुरेपूर जाणीव होती. त्यांच्या मते आजवर सगळ्या माध्यामातून महिला ही शोषित असतात हे भासवले गेले. तिला तिचे हक्क, अधिकार वगैरेंसाठी तमाम लोकांची आणि समजाची पुरुषसत्ताक संस्कृतीच जबाबदार आहे. अशा अनेक बुरसटलेल्या परंपरा, रुढी, प्रथा वगैरेंवर त्यांना फार चीड येत असे. त्यांचा आक्षेप आल्यानंतर परिक्षक मंडळींमध्ये तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक होते . त्यांनी पण बाईंना दुजोरा दिला. 


एक परिक्षक मात्र या जाहिरात संकल्पनेला समर्थन देत होते. त्यांच्या मते भारतात बऱ्याचशा कुटुंबातील महिला ह्याच रिमोटकंट्रोल असतात खरेदीच्या बाबतीत. घर चालवण्यासाठी काय नको काय पाहिजे हे ठरवण्यासाठी महिलांचा हातखंडा असतो. अशा महिलांचा चलाखपणे जाहिरातीत वापर करून कंपन्यांना भरघोस फायदा झाल्याचे अनेक स्टँटिस्टिकल डेटा प्रस्तुत करून प्रेझेंटेशन दाखवले. ते एका मातब्बर जाहिरात कंपनीत कंटेट क्रीएटर म्हणून खूप वर्षे काम करत होते. यावर स्त्रीमुक्ती वादी बाईंनी लागलीच त्यांच्या मतावर त्वेषाने आक्षेप घेतला. 'महिलांचा चलाखपणे जाहिरातीत वापर करून' म्हणजे काय? महिला वस्तू नाहीत. वी आर ह्यूमन टू. वगैरे तावातावाने बडबडल्या. यावर लगेच तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक प्रतिक्रिया वगैरे देऊ लागले. अशाच चर्चा, वादविवाद आणि आक्षेप झाल्यानंतर एक नवीन संकल्पना समोर आली. ज्या वस्तूसाठी जाहिरात करायची आहे तिला आधुनिक आणि जुना नेहमीचाच ग्राहकवर्ग भूलला पाहिजे. त्यासाठी एका महाशयांनी मुद्दा मांडला.  'नऊवारी साडी नेसलेली स्लीवलेस घालणारी बाई' आपण मॉडेल म्हणून जाहिरातीत दाखवू. म्हणजे ऑफबीट फँशन स्टाईल विथ क्लासिक टच वगैरे मसाला होईल. तशी ऑड ड्रेसकोड वाटेल अशीच संकल्पना होती आणि ती मांडणारे टेक्स्टाईल आणि फँशन ब्रँडिंग एक्सपर्ट होते. आतापर्यंत शांत बसून ऐकूण घेणारे व सहभागी असणारे एक तथाकथित संस्कृती रक्षक म्हणवून घेणारे थोडेसे उचकले. अशी नऊवारी साडी नेसून स्लीवलेस वगैरे मॉडेल नको म्हणून बोलू लागले. समाजात चांगला संदेश वगैरे जाणार नाही असा तर्कट देऊ लागले. मुख्य आक्षेप नऊवारी साडी व स्लीवलेस बद्दल होता. त्यांचे मत नऊवारी साडी एका जुन्या लिजंडरी पिढीचे प्रतिक आहे. त्याच्याशी छेडछाड करू नये. स्लीवलेस घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रीयांना समाजात फारच वेगळ्या पद्धतीने पाहिले जाते वगैरे वगैरे अजब तर्कट मांडले गेले. 


एकदोघांकडून समर्थन मिळतेय आणि आपल्या मताला अनुकूलता दिसल्यावर त्यांच्यातील अस्सल संस्कृती रक्षक जागा झाला आणि स्त्रीदाक्षिण्य, स्त्रीयांच्या तोकड्या कपड्यामुळे होणारे पतन वगैरे रटाळ विषय पटलावर येऊ लागले. यावर स्त्रीमुक्तीचा अंगिकार करणाऱ्या बाईंना हुरूप आला. त्यांनी लागलीच प्रतिप्रश्न केला. स्त्रीयांनी काय पद्धतीचा पहेराव करावा आपण सांगणारे आणि ठरवणारे कोण? आजची स्त्री पुढारलेली आहे तिला प्रोजेक्ट करण्यासाठी अशी फँशनमध्ये मोडतोड केली तर बिघडले कुठे? पुरुषसत्ताक समाजातील स्त्रीला सहन करावे लागलेले छळ वगैरेंचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडल्यानंतर तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक लागलीच हिरिरीने मुद्दे मांडू लागले. परत वाद, प्रतिवाद, चर्चा वगैरे अखंडपणे सुरू झाल्या. येनकेनप्रकारेण सहिष्णुता असहिष्णुता वगैरे सोपस्कर आलेच सरतेशेवटी. असे सगळे वायफळ वगैरे बोलाचाली चालू असताना एकदम संस्कृती रक्षक वाले काका ओरडून म्हणाले, असे असेल तर 'हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी' मॉडेल म्हणून दाखवा. मग बघू कोण काय करेल.  कोण सहिष्णू असहिष्णू वगैरे ठरेल. त्यांच्या बोलण्यात एक बेरकी सूर होता. आता मात्र चर्चेचा सूर टिपेला पोचला होता. हिजाब, बिकीनी वगैरे विषय आल्यावर तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक नाके मुरडायला लागले. उगाचंच द्वेषपूर्ण पद्धतीने मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील वगैरे आक्षेप घेतले गेले. यावर स्त्रीमुक्तीचा गजर करणाऱ्या बाई मात्र मूग गिळून गप्प बसल्या होत्या. त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक्रमात मुस्लिम स्त्रीया वर्ज्य होत्या बहुतेक. आता संस्कृती रक्षक मंडळींना फारच चेव आला. पुरोगाम्यांचे आतापर्यंत मांडलेले मुद्दे घेऊन ही मंडळी त्यांना डिवचू लागली. मग नेहमीप्रमाणे तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक मोघम सोयीस्करपणे बोलू लागले. रटाळ वादविवाद काही काळ चालूच होते. एकेका संकल्पनांची चिरफाड वगैरे करत लोकांचा उत्साह कमी होत गेला.


संकल्पनांची छाननी झाली होती मात्र दोनच मुद्दे ऐरणीवर होते. नऊवारी साडी स्लीवलेस घालणारी बाई की हिजाब आणि बिकीनी परिधान करणारी मॉडेल यावर सगळं घोडं अडलं. संभाव्य धोके लक्षात घेता आणि सणासुदीचे दिवसांत उगाचंच सोशल मेडियावर निगेटिव्ह ट्रोलिंग वगैरे नको म्हणून जाहिरात क्षेत्रातील आणि विपणन विभागाचे प्रमुख तज्ञांचा सल्ला घ्यावा असा ठराव एकमताने पास झाला. शेवटी तज्ञांच्या सल्ल्याने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा संकल्पना रद्दबातल ठरवल्या आणि पुन्हा एकदा त्याच जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन नव्या नियमावली नुसार करण्याचे ठरले.

- भूषण वर्धेकर, पुणे.

मंगळवार, १८ मे, २०२१

युद्ध नावडे सर्वांना

युद्ध नावडे सर्वांना...

© भूषण वर्धेकर
मे २०२१


आजकाल आंतरराष्ट्रीय युद्धाच्या घटनांचा भारतातील समाज माध्यमांवर सुळसुळाट जोरात चालू आहे. मग अशा वेळी मानवतावादी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांच्या फॉरवर्डेड लेख, स्फुटं, ऐतिहासिक नोंदी व्हायरल होत आहेत. तशाच गोष्टी कट्ट विचारसरणीतील मंडळीपण बिनधोक पणे पसरवतात. पीडीत कोण आवडता की नावडता हाच कळीचा मुद्दा आहे जणू! अशी युद्धे, जमीन बळकावून हस्तगत करणे हे परंपरागत चालत आलेल्या ऐतिहासिक घोडचूका आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये युद्धाचा आलेख बघितला तर पैसा, जमीन आणि सत्ता मिळवण्यासाठीच युद्धजन्य परिस्थिती तयार केली जाते. एखाद्याला गुलाम करणे ही जशी मानवी प्रवृत्ती आहे तसेच कमी शक्तीशाली देशाला किंवा समुहाला येनकेनप्रकारेण सोयी सवलती देऊन प्रसंगी धमकीवजा इशारे देवून काबूत ठेवले जाते. विस्तारवादी धोरणात हाच दुर्गुण आहे. वॉर मिनिस्टर किंवा डिफेन्स मिनिस्टर प्रत्येक देशात असतोच असतो. संरक्षण ही सामाजिक मुलभूत गरज आहे. मग ते संरक्षण देशाचे असो वा समुहाचे. मग अशावेळी जो आपला तारणहार असेल त्याचा उदोउदो ठरलेलाच. त्याच्या चुका, घोडचूका किंवा अनंत अपराध सगळे पोटात घेऊन समर्थन करणे हेच एकसुरी ठरलेले असते. युद्धे वाईटच कारण वित्तहानी आणि जीवितहानी ही सर्वांचीच होत असते. बलाढ्य पक्षाची कमी कमकुवत पक्षाची जास्त हाच तो काय फरक. 

युद्धाचा भडका उडाल्यावर रातोरात जागी झालेली मंडळी ही युद्ध होण्यासाठी जबाबदार गोष्टींवर काहीही बोलत नाहीत. कारण आंतरराष्ट्रीय अर्थचक्रावर युद्धांचा प्रचंड प्रभाव असतो. भीती ही एकमेव गोष्ट ज्याचा व्यापारासाठी सर्रासपणे उपयोग होतो. वैश्विक इतिहासात धर्मासाठी कत्तली ह्या वर्षानुवर्षे होत आलेल्या आहेत. पीडित धर्म वा देश कोणता यावर ज्याने त्याने निषेधाची किंवा पाठिंब्याची दुकाने थाटलेली आहेत. कोणताही देश शास्त्र आणि शस्त्र या दोहोंचा वापर करतोच. कारभार चालवण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी. मग त्या त्या विचारसरणीचे पाईक गुणवंत हौशे नवशे आणि गवशे पराकोटीची मंद बौद्धिकं उथळ माथ्याने मिरवत असतात. 

मानवतावाद कसा चांगला हे पाठ्यपुस्तकी छान वाटते. बिइंग प्रँक्टीकल अँक्शन ला रिअँक्शन येतेच. प्रतिसाद द्यावा की प्रतिकार करावा हे त्यावेळची दाहक परिस्थिती ठरवते. एकाएकी जर हल्ले झाले तर कडी निंदा तीखी निंदा वगैरे करणारे पण असतात आणि जशास तसे प्रत्युत्तरादाखल प्रतिहल्ला करणारे पण असतात. एक नागरिक म्हणून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जो पाऊल टाकतो त्याला समर्थन दिलेच जाते. उदा. भारतात आतंकवादी हल्ले जेव्हा झाले तेव्हा मोदींच्या नेतृत्वावर टिका करणारे, नावे ठेवणारे लोकच एअर स्ट्राईक वगैरे झाला की तो सैन्याने केला मोदिंचे काय कौतुक वगैरे बोलू लागले. काही बहाद्दर नेत्यांनी पुरावे द्या म्हणून मागणी केली. काही बिनडोक लोकांनी तर आतंकवादी हल्ला हा मोदींनीच घडवून आणला निवडणुकीत जिंकण्यासाठी असा जावईशोध लावला. अशा घटना जर होत असतील तर त्या पथ्यावर कशा पडतील याची खबरदारी बरोबर घेतली गेली. भक्तलोक मुळात मर्कट. त्यांना अशा पद्धतीने डबल स्टँडर्ड लोकांनी आयतं कोलीतच दिले. मर्कट असल्याने त्यांनी त्यांच्या लीला लीलया पार पाडल्या ध्रुवीकरणासाठी. 

मानवतावादी संघटनेच्या बाबतीत पण गढूळ समज बऱ्यापैकी फोफावलाय. सैनिक मरतात तेव्हा मानवतावादी आवाज उठवत नाहीत मात्र हल्ल्यात अतिरेकी मरतात तेव्हा मानवतावादी खडबडून जागे होतात. मुळात अतिरेकी का तयार होतात, कोण तयार करतात यावर मानवतावादी कधीच काथ्याकुट करत नाहीत. याचाच वर्चस्वतावादी लोक पुरेपूर फायदा उचलतात. युद्धात नुकसान हे होतेच पण त्यात आर्थिकदृष्ट्या बरेच हितसंबंध लपलेले असतात. त्या हितसंबंधांना कोणीही आवाहन देत नाही. विचारवंत वगैरे एक दोन आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांवर पुस्तके लिहून कोण कसा चुकतो किंवा अमुकच कसा बरोबर असे निष्कर्ष काढून चमकोगिरी करतात. बऱ्याचशा वेळेला अशा लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तर्क लावलेले आढळतात. असे विसंगत तर्क आजूबाजूच्या टपलेल्या टोळक्यांना आवडतात फे फे उडवण्यासाठी. जागतिक सत्य हेच आहे की जो बलाढ्य असतो तो इतरांनी शांतता पाळा म्हणून आग्रह धरतो. मात्र स्वतःच्या बाबतीत हिंसेचे, हल्ल्यांचे समर्थन करतो. सध्याच्या जागतिक परिस्थितीत चीन आणि अमेरिका ही दोन बलशाली राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. त्यांनी केलेल्या अमानवी कृत्यांवर कोणीही चकार शब्द काढणार नाही. निषेधार्थ एकही आवई उठवणार नाही. मात्र इतर राष्ट्रीय घटनांमध्ये स्वतःची टिमकी वाजवणार. अशा लोकांच्या तर्कांचा हेतू ध्रुवीकरणासाठी जोरदारपणे वापरला जातो.

जगाच्या इतिहासात नरसंहार खूप झालेले आढळतील. भारतभूमीवर देखील बरेच नृशंस नरसंहार केले गेले. मुळात आपल्या देशाचा बराचसा इतिहास बायस्ड पद्धतीने लिहिला गेला. एकतर प्रतिमामंडन करण्यासाठी किंवा प्रतिमाभंजन करण्यासाठी. एखाद्या राष्ट्राची, राज्याची किंवा नेतृत्वाची स्तुती कवने गाणारे, खुशमस्कऱ्या करणारे, गौरवग्रंथ लिहिणारे, चरित्रांचे शब्दांकन करणारे आणि आताचे बायोपिक काढून छद्मप्रतिमा उभी करणारे समुह पुर्वीपण होते आजही आहेत भविष्यातही असतील. अशी मंडळी मोठ्या गटाला आवडेल असा ऐवज तयार करतात किंवा उपलब्धतेनुसार गोळा करतात. अस्सल निष्पक्षपणे वर्णन केले जाणारे साहित्य दुर्मिळच. त्यामुळे हिंसेचे समर्थन करणारे जिकडेतिकडे सापडतात.

पृथ्वीगोलार्धाचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य असे भाग जर केले तर एक भाग धर्माधिष्ठित तर दुसरा विज्ञानाधारित मुल्यांना कवटाळलेला दिसतो. सगळे धर्म जरी शांतीचा संदेश वगैरे देतो म्हणत असतील तरीही प्रत्येक धर्माचा काहीना काही हिंसक इतिहास आहेच आहे. जेवढा धर्म एकजूटीने वाढेल तेवढा कट्टर होत जातो. अल्पसंख्याक असू तेव्हा विशेषाधिकार बहुसंख्यांक होऊ तेव्हा सर्वाधिकार समान अधिकार वगैरे अंधश्रद्धा असतात. हे प्रत्येकांना लागू पडते. हिंदूंच्या बाबतीत थोडेफार वावगे आहे. एकतर विस्कटलेल्या जातपातपंथांत विभागलेला धर्म म्हणजे हिंदू. जगभरात ज्या काही चाळीसच्यावर सिव्हिलायझेशन नोंदणीकृत आहेत त्यापैकी टिकलेली सिव्हिलायझेशन म्हणजे हिंदू. सिंधू नदीशी निगडीत, सप्तसिंधूशी नाळ असलेली भारतीय उपखंडात पसरलेली, विखुरलेली आणि बहरलेली समृद्ध जमात म्हणजे हिंदू. हिंदुंनी इतर धर्मीयांवर आक्रमणे करून त्यांना गुलाम केले किंवा त्यांचा देशातील जागा बळकावली किंवा मोठ्या प्रमाणात धर्मांतर करायला भाग पाडले असा उल्लेख कुठे आजवर सापडला नाही. जाणकारांनी यावर कुठे वाचले, अभ्यासले असेल तर जरूर सांगावे. इतर धर्मीयांच्या इतिहासात डोकावले तर काहींचा इतिहास हा रक्तरंजित आहे तर काहींचा शोषित, वंचित आहे. धर्माच्या आधारवर हिंसा कोणी कधी आणि किती वेळा केलीय हे वाचणाऱ्या सगळ्यांना माहिती असते. फक्त जगजाहीर बोलता येत नाही. त्यातही काही दशकांपासून इतर धर्मीयांच्या कट्टर भूमिकेला जशासतसे उत्तर देण्यासाठी कट्टर हिंदूत्ववादी जहाल गट उदयास आले आहेत. मात्र ते सकल हिंदूंचे कधीही प्रतिनिधीत्व करू शकत नाहीत.

मूळ मुद्दा हाच की भारतात अशी आय स्टँड विथ समथिंग मंडळी आणि त्यांना पाठिंबा देणारे विचारवंत आपल्या मायभूमीत ज्या गोष्टी झाल्या होत्या घडत आहेत त्यावर सोयीनुसार भुमिका घेतात. अशा ढोंगीपणाला सामान्य जनता कंटाळते. सामान्य जनतेला हिंसा ही हिंसाच दिसते मरणारा माणूसच दिसतो. पण हल्ली भारतात मरणारा कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे पाहून निषेध वगैरे नोंदवला जातो.  मुळात स्वसंरक्षणासाठी जर हत्यार उचलले तर तर जो बलवान असतो तोच जिंकतो. हा जगत्मान्य इतिहास आहे. इतिहासात जो ताकदवान जो सक्षम तोच टिकतो अन् लक्षात ठेवला जातो. विजय पराजय हे नंतरचे पैलू आहेत.

देशावर हल्ला झाला तर प्रतिहल्ला होणारच. २०२१ चालूय. अहिंसेची शिकवण फक्त एकतर्फी असून चालत नाही. व्यक्तीगत आयुष्यात पण अहिंसा कोणीही पाळत नाही मात्र दुसऱ्याला अहिंसेची शिकवण द्यायला पुढे सरसावतात विचारवंत वगैरे मंडळी. मुद्दा हाच आहे की पँलेस्टाईन मधल्या मुस्लिमांवर हल्ले होतात तेव्हा जेवढा राग, निषेध किंवा प्रखर टिका हल्ले करणाऱ्यांवर होते तशी टिका चीनमधील ऊईगीर मुस्लिम समाजातील लोकांवर हल्ले करणाऱ्यांवर होत नाही. इकडचा मुस्लिम तिकडचा मुस्लिम असे काय वेगवेगळे असतात का?  अशावेळी आपल्याकडे वावरणाऱ्या पुरोगामी, विचारवंत आणि मानवतावादी लोकांच्या ढोंगीपणाची किव येते. पीडीतांचा धर्म, देश पाहून गळे काढणारे वाढत चाललेत सध्या. अशा लोकांमुळे कट्टर विचारसरणीतील लोक चेकाळतात आणि धष्टपुष्ट आयुधांचा वापर करून ध्रुवीकरण करतात. हल्ली हे भारतात सर्रासपणे होत आहे.

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

भारतातील आंदोलने, चळवळी आणि संप हायजॅक झाली आहेत काय?

भारतातील आंदोलने, चळवळी आणि संप हायजॅक झाली आहेत काय?


सरसकटपणे सगळीच आंदोलने ही हायजॅक करण्यासाठीच केली जातात किंवा काही आंदोलने केल्यानंतर हायजॅक होतात. भारतात तर आंदोलने, संप आणि चळवळी वगैरेंचा विचका झालेला आहे. कारण ज्याच्या त्याच्या राजकीय, सामाजिक गरजेनुसार आंदोलने, चळवळी आणि संप वापरले गेले. शोषितांच्या संघटना तर राखीव नेत्यांच्या राखीव प्रश्नांच्या मुखवट्या आडून पडीक नेतृत्व पुनर्वसन करण्यासाठीच वापरल्या गेल्या. एकेकाळी लोकांच्या रोजच्या जगण्यांच्या प्रश्नांना भिडून प्रशासनाला नडून आंदोलने यशस्वीपणे केली जात होती. यात कधीकाळचे अस्सल मातीशी निगडीत कम्युनिस्टांचा दबदबा होता. त्यांच्याकडे एकेकाळी खरीखुरी इहवादी विचारसरणी होती जी सर्व समस्यांवर साधकबाधक चर्चा विमर्श वगैरे करून बौद्धिक झाडून उपाययोजना करीत होती. लढत होती. मात्र भारतातील अस्ताव्यस्त पसरलेल्या भूखंडात कानाकोपऱ्यात रुजली पण फोफावली कधीही नाहीत. कापराप्रमाणे संप्लवन होतेय खरीखुरी कम्युनिस्ट विचारसरणी. भारतातील सर्वात मोठी चळवळ म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची. जिच्यातून वेगवेगळ्या संघटना उदयास आल्या. पण  टिकली, टिकवली गेली आणि फोफावली ती इंडियन नँशनल कॉंग्रेस. काही लोकांच्या मते १८५७ सारखा पुन्हा उठाव होऊ नये म्हणून एलन ह्यूम नामक इंग्रज अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन राजकीय सामाजिक घडामोडींवर वचक राहण्यासाठी कॉंग्रेसची स्थापना केली. तर काहींनी लोकांच्या सहभागातून आंदोलनातून कॉंग्रेस उभी झाली नंतर तळपली वगैरे कवतुके गायली. तसंही पुरोगाम्यांची आवडती थाप म्हणजे गांधीजींनी कॉंग्रेस तळागाळापर्यंत पोचवली टिळकांनंतर. अर्थातच आपल्याकडे ज्या त्या वैचारिक चळवळींनी त्यांच्या चष्म्यातून पाहून इतिहास रचलाय. नंतर तीचे भांडवल करून वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न केला. काहींना राजाश्रय होता तर काहींना लोकाश्रय. 


आंदोलनातून उभ्या राहिलेल्या संघटनांची कशा पद्धतीने वाताहत होते याचे समर्पक जीवंत उदाहरण म्हणजे घराणेशाहीत अडकलेला कॉंग्रेस पक्ष. भारतात होणारे संप वरकरणी कामगारांना सोयीसुविधा मिळाव्यात वा गरजेच्या मागण्यांसाठी केले जातात. नंतर संघटनेच्या नेत्यांना वापरून ज्याचे त्याचे मनसुबे पुर्ण केले जातात. यात प्रामुख्याने भरडला जातो तो गरीब मजूर कष्टकरी. मुळात कोणत्याही संघटनेच्या आंदोलनात नेतृत्व करणारेच काय ते यशस्वी होतात. ज्यांच्यासाठी आंदोलने होतात त्यांची भरभराट सहसा झालेली दिसत नाही. फक्त नेतृत्व बदलत राहते. प्रश्न, मागण्या तेच असतात आणि भरडणाऱ्या वर्गातील पिढ्यान पिढ्या तयार होतात आणि खपतात. आपल्याकडे काही पाचकळ सामाजिक, राजकीय विचारवंतांनी सेलेबल फॉरमॅट करून ठेवलेत. जसे की ब्राह्मणांना शिव्या घातल्या की विद्रोही, मुसलमानांच्या विरुद्ध गरळ ओकली की कट्टर हिंदुत्ववादी, ठराविक व्यवसायिकांना नावे ठेवली की भांडवलशाहीचे प्रखर विरोधक, अल्पसंख्याकांचे प्रश्न मांडले की पुरोगामी वगैरे. भारतात कैक विचारवंतांच्या मूळ भुमिकेत खूप मोठा लोचा आहे. इहवादी विचार, धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी वगैरेंची व्याख्या सर्जनशीलपणे गरजेचे आहे. भारतात तर विशिष्ठ गटाची समाजमान्यता मिळालेले कित्येक विचारजंत गल्लोगल्ली आढळतात.लोकांच्या हक्काचे मूलभूत प्रश्न, समस्या वगैरेंची मागणी करणे हा कोणत्याही आंदोलने, चळवळी किंवा संप यांचा मूळ गाभा. 

कधीकाळी आंदोलनातून, चळवळीतून खरेखुरे हिऱ्या माणकासारखे नेतृत्व देशाला लाभले. मात्र त्यांनी ज्या समस्येवर आंदोलने केली त्या समस्या तशाच आ वासून दशकानुदशके तशाच राहिल्या. कारण आपल्याकडे सोयीनुसार लोकशाही राबवली गेली. त्यामुळे भारतात ठिकठिकाणी सरंजामशाही, घराणेशाही, सावकारी पाश आणि जातपातधर्माचे ठेकेदारी रूजली व फोफावली. मूळ चळवळीला सार्वजनिक जीवनात बळकट होण्यासाठी खस्ता खाव्या लागल्या. त्यामुळे बऱ्याचशा चळवळी कागदोपत्रीच राहिल्या. खूप चांगल्या वैचारिक चळवळी तर ज्या त्या गटातल्या लोकांच्या अवतीभवतीच वाढल्या. संप तर कामगार नेते होण्याचे कुटिरोद्योग झाले. आजवरच्या सगळ्या चळवळी, आंदोलने वगैरेंचा उहापोह केल्यानंतर एक लक्षात येते हायजॅक होण्यासाठी किंवा हायजॅक झालेली आंदोलने, संप आणि चळवळी जगभरात सापडतात. रेसिझम टिकला तर रेसिझम विरूद्धची लढाई टिकते, गरीबी टिकली तर गरीबीविरूद्ध लढाई टिकते, जातपात टिकल्या तरच जातीपातीच्या प्रश्नावर लढा उभारता येतो, शोषणव्वस्था टिकली तरच शोषितांच्या, वंचितांच्या लढ्याला आयाम मिळतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळेच आपल्याकडे प्रत्येक राजकीय सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या लोकांचा एक सिलँबस ठरलेला. पुरोगामी बुरखे घालून जातीपातीत विष कालवणे आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ढोंगीपणा करणे हेच आजपर्यंत देशात चालत आले आहे. एखादी व्यवस्था विस्कळीत कशी राहील आणि तिचा पुरेपूर वापर कसा करता येईल हे पाहिले जाते. मग तसा वापर सत्ता टिकवण्यासाठी किंवा मक्तेदारी टिकवण्यासाठीच होतो. कामगार, मजूर, कष्टकरी, शेतकरी, वंचित, शोषित वगैरे फक्त बाहुले असतात. दशकभरापुर्वी अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे इव्हेंट मँनेजमेंटला नवी चालना मिळाली. त्यानंतर आंदोलन करणे म्हणजे इव्हेंट करणे आणि समाजमाध्यमातून लोकांना कनेक्ट करणे वगैरेचा नवा बिझिनेस फंडा सुरु झाला. भारतात उत्सवांची काही कमी नाही. त्यात आजकाल हायली डेकोरेटेड हाईप देऊन प्रोजेक्ट करणाऱ्यांना जास्त स्कोप आहे. मग फुकटच्या समाजमाध्यमांच्या उपलब्धतेमुळे रिकामटेकड्या लोकांना रिकामा वेळ घालवण्यासाठी काहीतरी खाद्य मिळते. उपद्रवी संघटना आणि त्यांच्या नेत्यांना स्वतःचे आस्तित्व टिकवायचे असते. मग अशी आंदोलने, संप आणि चळवळींशिवाय दुसरा समर्पक पर्याय तरी कोणता? जेव्हा दुसरा पर्याय सापडेल तेव्हा अशी आंदोलने वा संप होणार नाहीत. 

२०२० मध्ये सर्वसामान्य जनता सूज्ञ झाली आहे. कोणाला डोक्यावर घ्यायचे आणि कोणाला अस्मान दाखवायचे हे चांगले समजते जनतेला. कृषीप्रधान देश म्हणून मिरवायचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने मगरीचे अश्रू ढाळायचे कसे चालेल? शेतकरी जेवढा गुलाम राहिल तेवढ्या त्यांच्या समस्या, प्रश्न मांडणाऱ्या संघटना जिवंत राहतील. शेतकऱ्यांचे भले करा पण बसल्या जागी मिळणारी मिळकत बंद नाही झाली पाहिजे असा काहीसा सूर आहे समर्थकांचा. राजकीय विरोध करण्याचे दिवस आता संपलेत. सध्याचा काळ हा कृतीतून भले करणाऱ्यांचा आहे. लोकांना भिती दाखवून स्वार्थ साधण्याचा काळ संपलाय कधीचाच. हिंदू खतरे मे है, इस्लाम खतरे मे है, सेक्युलरिझम खतरे मे है वगैरे बोलून भिती दाखवून फक्त काही गटातटांवर वर्चस्व गाजवता येईल. अखंड भारतात कित्येक लोकांना अशा भितीने धाकात ठेवणे शक्य नाही. ज्या त्या पक्षाची किंवा संघटनांची तशी एक राजकीय, सामाजिक गरज असते त्यानुसार ते प्रोपागेंडा पसरवतात. भारतात सामाजिक अंधश्रद्धा पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वात मोठी राजमान्यता लाभलेली अंधश्रद्धा म्हणजे आरक्षण मिळाल्याने मागासलेला समाज सुधारतो, विकास वगैरे होतो. मुळात एखादा मागास कसा राहिल अशी तजवीज आपल्या व्यवस्थेतच करून ठेवलीय. उरलेली उत्तरपूजा त्या त्या समाजाची नेते मंडळी घालतात. समाज तसाच राहतो नेतृत्व फक्त सर्वांगिण विकसित होते. असे शोषित, वंचित घटक आपल्या भारतखंडात कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. त्यांच्या मूलभूत हक्कांचे जहाल प्रश्न पण खूप आहेत. त्यांचा पुरेपूर उपयोग आंदोलने, चळवळी वा संप वगैरे हायजॅक करण्यासाठी केला जातो. भारतात तर तशा समस्या भरपूर आहेत म्हणजे तशीच नानाविध आंदोलने आणि चळवळींना भरपूर स्कोप आहे. 
----------------------------
©भूषण वर्धेकर
२८ जानेवारी २०२१
हडपसर
----------------------------

रविवार, १७ जानेवारी, २०२१

शूर आम्ही दंगलखोर

शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती
शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती

बेरोजगारीच्या खाईत उमगली दगडफेकीची रीत
गल्लीतल्या नेत्याची संगत अन्  जडली येडी प्रीत
करोडोंची नासधूस करून येईल अशी शक्ती संघटीत
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती

तोडफोड वा जाळपोळ करावी हेच आम्हांला ठाव
नियतीच्या लाथाबुक्क्या खाणे हेच आम्हांला ठाव
जातीधर्मापायी सारी इसरू माया ममता नाती
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती
शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती
-------------------------------------
विडंबनात्मक
©भूषण वर्धेकर
३ जानेवारी २०१८
रात्रौ ११:१५
हैद्राबाद
-------------------------------------

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी  तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघर...