बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

माझ्या जंगलगोष्टी

एकदा जंगलात सिंहाने सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावून घेतले आणि सांगितले की आपल्याला वाढलेल्या जंगलाचा कारभार पाहण्यासाठी नेमणुका करायच्या आहेत. पण त्या नेमणुका मी राजा असलो तरीही माझ्या मर्जीने करणार नाही. कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे तुमचे मत विचारात घेतल्याशिवाय माझा निर्णय सांगणार नाही. मग प्रत्येक प्राणीवर्ग आपापले प्रतिनिधी कोण याबद्दल चर्चा करू लागले. एका माकडाने शंका उपस्थित केली की कारभार पाहणाऱ्या मंडळीत सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे. सगळ्यांनी त्याची री ओढली. मग माकडांनी आघाडी घेऊन एक प्रतिनिधी माकड ठरवले सगळ्या प्राणी मात्रांचे प्रश्न मांडण्यासाठी. सगळे प्राणीमात्र भाबडे काहींनी लागलीच मान्यता दिली. काहींना असे समजावण्यात आले की तुमचे प्रश्न मांडण्यासाठी काही राखीव सदस्य प्रतिनिधी म्हणून आम्ही ठरवू जे तुमच्या प्राणीवर्गातील सगळे प्रश्न मांडतील. सगळे खुष झाले आम्हाला राखीव जागा मिळणार म्हणून. पण माकड मुळातच हुशार कोणाला निवडायचे हे तेच ठरवणार होते. सिंहाला हे सगळं माहिती होते, दिसत होते. पण त्याला जंगल एकत्र बांधायचे होते. कारभार करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा उभी करायची होती जेणेकरून जंगल सर्वच बाबतीत सुरक्षित राहिले पाहिजे होते. मग सिंहाने सांगितले आपले जंगल डोंगर, तळे, नद्या, पठारी भूभाग, घनदाट वने या सगळ्यांनी व्यापलेले आहे. आपण आपल्या जंगलात एकात्म कारभार करण्यासाठी प्रशासकीय गरज म्हणून पाच विभाग करूया ज्यात सगळ्या वर्गातील प्राणी अधिवास करतात. सगळे प्राणी लागलीच तयार झाले. माकडे बेरकीपणे ऐकत होते. 

सिंहाने सांगितले आपल्या जंगलात सगळे प्राणीमात्र गुण्यागोविंदाने कैक शतके राहतात. मग पाण्यात राहणारे असोत, झाडांवर राहणारे असोत, जंगलात राहणारे असोत किंवा सरपटणारे, हवेत उडणारे, वारूळं, बिळं करून राहणारे, गुहेत राहणारे, कळप करून राहणारे असोत. आपण सगळ्या ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना त्यांचे प्रश्न मांडून जंगलाचा कारभार उंचावण्यासाठी हक्क आणि अधिकार देणार आहोत. प्रत्येक प्राण्यांच्या प्रश्नावर आपण सगळे मिळून सामोपचाराने उत्तरे शोधू. आपला कारभार वाढवू. सुरक्षित राहू. जीवनमान उंचावू. आपल्या जंगलातील प्राण्यांच्या अन्नसाखळी मध्ये कोणत्याही बाहेरील शक्तींची लुडबूड होणार नाही हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. सिंह बोलत होता सगळे प्राणी कान देऊन ऐकत होते.

सगळ्यांनी एकमुखी मागणी केली तर प्रतिनिधी निवडला जाईल असा सिंहाचा कयास होता. सिंहाने पुढे सांगितले की हवेत उडणारे झाडावर राहणारे पक्षी यांचा एक प्रतिनिधी असणार, पाण्यात राहण्याऱ्या सगळ्या प्राण्यांचा एक प्रतिनिधी असणार, कष्टकरी किटक, किडे, मुंग्या यांचा तर राखीव प्रतिनिधी असणार कारण तो दुर्बल घटक आहेत. जमीनीवर सरपटणारे, बिळात राहणारे प्राणी पण त्यांचा एक प्रतिनिधी देणार. जंगलात कळपाने राहणाऱ्या प्राण्यांच्या पण एक प्रतिनिधी असणार. या सगळ्यावर शिक्कामोर्तब झाले. लागलीच माकडांनी एक प्रश्न उपस्थित केला जंगलाचे भौगोलिकदृष्ट्या विभाग करा म्हणजे प्रशासकीय कारभार अजूध सोपा जाईल. मग सिंहाने जमीन, डोंगर, पाणी, झाडे असे विभाग केले. आता सिंहाने सगळ्यांना सांगितले उद्या प्रत्येक प्राण्यांच्या प्रतिनिधीची निवड करण्यात येईल. आजची सभा संपली.

सगळे प्राणी आपापल्या विचारविश्वात रममाण होउन जाऊ लागले. माकडांना हीच ती योग्य वेळ आहे जाणवलं आणि त्यांनी सगळ्या जाणाऱ्या प्राण्यांना गाठलं. पहिल्यांदा किटक, किडे, मुंग्या या दुर्बल कष्टकरी वर्गाला समजावून सांगितले तुमचे कष्ट आम्ही खूप वर्षापासून पाहत आहोत. तुमचे दाहक प्रश्न शक्तिशाली राजसत्तेसमोर आम्हीच निर्भिडपणे मांडू शकतो. तुमच्या प्रश्नांना आम्हीच वाचा फोडू. तुम्हाला तुमचे जीवनमान उंच करायचे असेल तर आमच्यातील एका माकडाला प्रतिनिधित्व द्या. कारण आपण सगळे जमिनीवर राहतो. मग सगळ्या किटक, किडे, मुंग्यांनी माकडांना प्रतिनिधी ठरवले.

पुढे पक्ष्यांच्या समुहात एका माकडाने असेच समजावून सांगितले तुम्हाला खूप दूरवर भटकावे लागते रोजच्या जगण्यासाठी. तुमचे प्रश्न जर तुम्हीच मांडले तर त्याचा प्रभाव पडणार नाही. तुमच्या प्रश्नांची आम्हीच योग्यप्रकारे हाताळणी करू. तसंही आपण सगळे झाडावर राहणारे प्राणी आहोत. पक्षांना पण हे पटलं कारण आपल्याला सारखे स्थलांतरित व्हावे लागते. त्यापेक्षा जंगलात असणारे माकडे आपले प्रश्न मांडतील. म्हणून पक्ष्यांनी माकडांना प्रतिनिधी ठरवले.

असं करत करत सगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या समुहात जाऊन माकडे व्यवस्थित पोटतिडकीने पटवून देत होते आम्ही तुमचे प्रश्न व्यवस्थित मांडू. मग सगळ्या प्राण्यांना तेच पटलं आपलं रोजचं जगण एवढं जिकरीचे मग कोण प्रशासन आणि कारभारात लक्ष घालणार? त्यापेक्षा माकडे सगळीकडे संचार करत असतात त्यांना जंगलाची खडानखडा माहिती आहे. ते सगळीकडेच वावरत असल्याने तेच आपले प्रतिनिधित्व करू शकतील. म्हणून जंगलात राहणाऱ्या कळपातील प्राण्यांनी माकडांना प्रतिनिधी ठरवले.

पाण्यात राहणारे प्राण्यांच्या बाबतीत प्रश्न माकडांना सतावत होता. पण माकडांनी मगरीला तयार केले. मगर पाण्यात आणि जमिनीवर संचार करू शकते असे पटवून मगरीला पाण्यात पाठवले. मगर जेव्हा पाण्याबाहेर आली आणि सांगितले की सगळ्या जलचरांनी मला प्रतिनिधी म्हणून निवडलेय. मग माकडं बेरकीपणे मगरीला सांगू लागली तू एकमेव प्राणी आहेस जल आणि जमीनीवर राहणारा. म्हणजे तू तळ्यातला महाराजा आहेस. तू इथे असताना कोणीही तळ्याकाठी भटकत नाही हीच तूझी दहशत. मग तू राजा प्रमाणे वाग आम्ही तुझे पाईक सैनिक होऊन तुझ्यातर्फे प्रतिनिधी म्हणून जंगलात प्रश्न मांडू. तू तलावात राज्य कर. तळ्याच्या राज्यकारभारात फक्त तुझीच सत्ता. मगर खूष. माकडे सुस्साट. मग मगरीने पाण्यातील प्राण्यांचे माकडांना प्रतिनिधीत्व बहाल केले.

दुसऱ्या दिवशी सिंहाने बघितले तर सगळ्या जंगलातील प्राण्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून फक्त माकडेच गोळा झाली होती त्या त्या प्राणीमात्रांच्या एकमुखी संमती घेऊन. कारण सगळे प्राणी त्यांच्या रोजमर्रा जगण्याचे प्रश्न सांगितले सोडवायला बाहेर पडले होते. सिंहाने हे ओळखले की माकडे चलाखपणे वागत आहेत. पण सिंहाचा मुख्य फोकस जंगलाचे संरक्षण, विकास यावर होता. यथोचित पणे सगळ्या कारभाराची मुहूर्तावर सुरुवात झाली. भाषणे झाली. आनंदोत्सव साजरे झाले. अशी कैक वर्षे लोटली पण जंगलातील प्राण्यांच्या आयुष्यात काहीही बदल झाले नाहीत. जसे आधीचे आयुष्य होते तसेच राहिले. यावर कोणी आवाज उठवला की माकडे त्याचा यथोचित बंदोबस्त करायचे. सिंहाला हे सगळं समजत होतं पण जंगल एकात्मिक होते हेच तो पाहत होता. माकडांना आता आपलीच सत्ता यायला पाहिजे म्हणून मनोमन वाटले. मग त्यांनी आपापल्या प्रतिनिधी माकडांना जमीन, डोंगर, पाणी, झाडे या विभागाचे स्वायत्तता कसे करता येईल ते बघायला सांगितले. मग युनियन ऑफ फॉरेस्ट म्हणजेच संघराज्य जंगलात प्रत्येक विभागाचे स्वतंत्रपणे आस्तित्व पाहिजे. जंगलाचे त्यावर हक्क अधिकार नकोत अशा फुसकुल्या सोडल्या. सिंह गणराज्य म्हणजे जंगल या भूमिकेतून एकात्मिक जंगल तयार करण्यात व्यस्त होता. माकडांना एवढी वर्षे प्रतिनिधित्व केल्याने प्रशासकीय कारभाराची खडानखडा माहिती होती. त्यावर मजबूत पकड होती. अखेरीस सिंहाचा प्रयत्न निष्फळ ठरला मोठ्या जंगलाची जमीन, डोंगर, पाणी, झाडे यात फाळणी झाली. प्रत्यक्षात प्राणी रोजच्या जगण्याचा मरणाच्या प्रश्नांना भिडत होते. त्यांच्या काहीही गावी नव्हते. मनोमन ते सिंहाला च आपला राजा मानत होते. कारण ते कैक शतक पुर्वापार परंपरागत चालत आलेले होते. सरतेशेवटी जमीन, डोंगर, पाणी, झाडे अशी फाळणीनंतर जंगलाची विभागणी झाली. काही कालावधी गेल्यानंतर आजूबाजूला पसरलेल्या एकात्म जंगलाने जमीन, डोंगर, पाणी, झाडे काबीज करायला सुरूवात केली. कारण त्यांना माहिती होते माकडांना माकडचाळे करण्यासाठी काय आणि कोणत्या उद्योगात अडकायचे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी सिंहासारखेच धारिष्ट्य लागते. माकडांना ते जमणे शक्य नव्हते. दूर बसून हे सगळं सिंह पाहत आसवे गाळत बसला होता. कारण सिंह बंदिवान झाला होता आपल्या लाडक्या जंगलाची जमीन, डोंगर, पाणी, झाडे अशी झालेली शकले बघत.

©भूषण वर्धेकर
पुणे, ३ फेब्रुवारी २०२२

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

गांधीगौरव

अहिंसा फक्त पुस्तकी शोभते, शांतीसाठी युद्ध होते
सत्य बोलायला झकास, मात्र सिद्ध करायला नाहक त्रास

अस्तेय गुणधर्म म्हणून श्रेष्ठ, पण इतिहासात बळकावणारेच वरिष्ठ
ब्रम्हचर्य सामाजिक प्रतिमेचे ध्यान, प्रत्यक्षात भोगवादी कायदेशीर सज्ञान

अपरिग्रहात असतात मिरवण्याचे छंद, काबीज करायला संपत्तीचा ताळेबंद
श्रमजीवी संघटीत होतात सत्पर, मजबूरीने गुलामगिरीत रमतात तत्पर

आस्वाद समर्थ अनुभुतीचे बळ, गरजेपेक्षा जास्त हव्यासाचे मूळ
निर्भय होणे प्रगतीचे लक्षण, भीती दाखवणे हे सत्तातुरांचे भक्षण

सर्वधर्मसमभाव आदर्शवत प्रमाण, शोषितांचे मात्र धर्मांतर गतिमान
अस्पृश्यता निर्मूलन सलोख्याचे अनुष्ठान, सत्तेसाठी मात्र जातीपातीचे अनुमान

स्वदेशीची स्विकृती करे राष्ट्र आत्मनिर्भर, सरंजामी घराण्यांचे होई चित्त सैरभैर
वर्चस्वासाठी गांधी लागतात, द्वेषासाठी नथुरामाचा पर्याय
आसुसलेल्या सत्तेत राहण्यासाठी, दोघेही जिवंत ठेवणं अपरिहार्य

©भूषण वर्धेकर

२९ जानेवारी २०२२, रात्री २.१५ AM

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे शोषितांसाठी लढले 
कामगारांसाठी हाल सोसले
लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले
विळा हातोड्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वंचितांसाठी लढले
दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले
निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले
अशोक चक्रांचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे वर्चस्वासाठी लढले
फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले
क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले
विजयी उत्सवाचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे स्वराज्यासाठी लढले
गुलामांना धर्माखाली बांधले
सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले
सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे समाजासाठी लढले
ऐहिक कल्याणासाठी टिकले
चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले
स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे सर्वांगीण विकासासाठी लढले
संधीसाधूंनी त्यांना मिरवले
ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले
सत्ताधीश बनून सरंजामीत रमले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे उपेक्षितांसाठी लढले
रोजीरोटीसाठी रक्त आटवले
समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले
अल्पसंख्यांक म्हणून राजाश्रित झाले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे ऐक्यासाठी लढले
एकात्मकेच्या हक्कासाठी घुसमटले
मुलभूत गरजांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत भिडले
ते जयंती, पुण्यतिथीतच अडकले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
____________________
भूषण वर्धेकर
२८ नोव्हेंबर २०२१
पुणे
____________________


शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं


एकदा मी मराठ्यांवर 
विद्रोही कविता केली
महाराष्ट्रातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

मग मी गुजरात्यांवर 
विद्रोही कविता केली
गुजराती अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

नंतर मी सरदारांवर
विद्रोही कविता केली
पंजाबी, हरियाणातील अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

मग मी चिडून हिंदी भाषिकांवर
विद्रोही कविता केली
उत्तरेतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

थोडसं सावरून तमिळींवर
विद्रोही कविता केली
तमिळनाडूतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

त्वेषाने तेलुगू लोकांवर
विद्रोही कविता केली
आंध्रा, तेलंगणातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

नंतर मी मल्याळींवर
विद्रोही कविता केली
केरळी अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

त्यानंतर बंगाली, ओरिया लोकांवर
विद्रोही कविता केली
तिथल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

शेवटी मी ईशान्येकडील लोकांवर 
विद्रोही कविता केली
तिकडल्या अस्मितावाद्यांनी पण
मला ठोकून काढलं

सरतेशेवटी मी भारतीयांवर
विद्रोही कविता केली
एकदम सगळ्या सेक्युलरांनी 
माझं कौतुकच केलं
मात्र राष्ट्रवाद्यांनी शोधून
मला ठोकून काढलं

- भूषण वर्धेकर

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव

दिवाळीत अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला जय भीम चित्रपट म्हणजे व्यवस्थेत बऱ्याचशा ठिकाणी होणाऱ्या अमानुष छळाचं प्रातिनिधीक  भयाण वास्तव आहे. चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम संवेदनशील घटना लोकांसमोर मांडण्याचा एक यशस्वी प्रयोग आणि पायंडा कैक वर्षापासून चालत आलेला. सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात असे चित्रपट आले की चर्चा होतात, वेगवेगळे लेखनप्रपंच केले जातात व्यवस्थेतील त्रुटींवर. मग नवा काहीतरी मुद्दा येतो आणि पुन्हा ज्या विषयांवर घटनेनुसार बदल व्हायला हवेत त्या गोष्टी बासनात गुंडाळल्या जातात. समस्या जैसे थे राहतात आणि बिनकामी चर्चा, आरोप, प्रत्यारोप, तर्क, वितर्क आणि राजकीय लबाड आश्वासने निरंतर चालूच राहतात. समस्येवर तोडगा काढण्यापेक्षा इतर गोष्टी व्यवस्थेत रेंगाळत राहतात. जय भीम मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तामिळनाडूतील तत्कालीन दुर्लक्षित आदिवासींच्या होणाऱ्या छळाची गोष्ट सांगितली आहे. चित्रपट बघितल्यावर मन सुन्न होते. निष्पाप लोकांचा झालेला हिंसक छळ कोणालाही सुन्न करतोच. मात्र तेच निष्पाप लोक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले की व्यवस्थेचे खरे स्वरूप उघडकीस येते. या चित्रपटात दाखवला गेलेला मानवाधिकाराचा लढा फारच प्रामाणिकपणे दाखवलाय. जो आजच्या सोकॉल्ड सोशलमेडियाच्या जमान्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणे गरजेचा आहे. ढोंगी मानवतावादी लोकांमुळे जनसामान्यांना अस्सल खराखुरा मानवतावाद काय आहे कशासाठी हे समजणे गरजेचे आहे. कित्येक उच्चभ्रू लोकांना मुळात शोषितांचे रोजच्या जगण्याचे प्रश्न कसे आहेत हे समजत नाहीत. अशा लोकांच्या हातात जेव्हा सत्तेची आणि प्रशासनाची सुत्रे जातात तेव्हा हीच मंडळी व्यवस्थेला स्वार्थापोटी हवे तसे वाकवतात. कारण बहुतांश सुखवस्तू उच्चभ्रू लोकांमध्ये शोषित वंचित लोकांबद्दल एक वेगळाच तिटकारा असतो. हा चित्रपट व्यवस्था कशी मोडून तोडून राबवली जाते याच्यावर फार तीव्रतेने भाष्य करतो. मानवी पातळीवर रुक्ष करणारा अनुभव आहे.


मानवाधिकाराचा लढा हा नेहमीच राग-लोभ-रोषाच्या खाचखळग्यातून जातो. सध्याच्या काळात मानवाधिकाराचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना, कार्यकर्त्यांना एका बाधित नजरेने बघीतले जाते. कारण एकांगी पद्धतीने मानवधिकार प्रोजेक्ट केला जातो. वंचित, शोषित समुहाला व्यवस्था ही नेहमीच दुय्यम नजरेने बघत आली आहे. त्यांच्यासाठी लढणारे आणि धडपडणारे पारदर्शकपणे समाजात नेहमी चुकीच्या पद्धतीने पोट्रेट केले जातात. उदाहरणार्थ अतिरेक्यांना फाशी नको म्हणून लढणारे मानवाधिकार कार्यकर्ते दाखवले जातात.  कैक चित्रपटात मानवाधिकार कार्यकर्ते लोकांना सराईत गुन्हेगार वगैरेंचा पुळका असतो हे दाखवले जाते. चकमकीत जखमी होणाऱ्या पोलिसांच्या बाबतीत त्यांची भूमिका ही नेहमीच कुचकामी दाखवली गेली. निष्पाप लोकांच्या होणाऱ्या छळाला कैक मानवाधिकार चळवळींमुळे वाचा फोडली आहे. कितीतरी अमानुष छळाची प्रकरणे अशा कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आली. निरपराध लोकांना न्याय मिळाला. मात्र अशी प्रकरणे ही खूप कमी लोकांना माहिती असतात. मेडिया, चित्रपट वगैरे माध्यामातून एखाद्याच्या प्रतिमेचे रेखाटन बरबटलेले झाले की झाले. त्याची शहानिशा सहसा कोणी करत नाही. वा तशी एक नवी व्यवस्था उदयास आली जी कायदा सुव्यवस्था, न्यायव्यवस्था वगैरेंच्या आधीच एखाद्या वर शिक्कामोर्तब करते. आजकाल अशा ठशीव भूमिका घेणे अगदी व्यक्तीगत पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. जय भीम मधला मानवी हक्काचा लढा फार अप्रतिम दाखवलाय. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केलाय. सिनेमातील काही दृश्ये हिंसक जरी असली तरी ते एक सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. तसंही दक्षिणेत तमिळनाडूतील चित्रपटात जातिव्यवस्था विरुद्धच्या लढ्याची तीव्रता भडकपणे रंगवली जाते. त्या त्या दिग्दर्शकाची आणि सिनेमाची ती भाषा असते. धनुषच्या असूरन या तमिळ आणि व्यंकटेशच्या नारप्पा या तेलगु चित्रपटात पण अशीच लढाई रक्तरंजित दाखवली गेलीय. तिकडच्या पब्लिकला अशा सिनेमांचे टेकिंग अपील करत असावे. जसा कोरियन सिनेमात रक्तपात दाखवून एखाद्या व्यवस्थेविरुद्ध असलेली चीड सिंबॉलिक पद्धतीने दाखवलेली असते. तशीच ही एक सिनेमाची भाषा आहे. बेधडकपणे दाखवलेली हिंसा ह्यूमन लेवल वरच्या इमोशन्स जास्त रिक्रियेट करते वगैरे नव्या सिनेमाची नवी भाषा असावी. हृदयद्रावक, मन पिळवटून टाकणारे वगैरे दृश्ये ही अशा सिनेमाची परमोच्च बिंदू असतात. त्यात जय भीम अव्वल आहे. एखादा सिनेमा पाहून वा पुस्तक वाचून जर तुमचे मन खूप आनंदी होत असेल वा दुःखी होत असेल तर ते त्या दिग्दर्शकाचे वा लेखकाचे खरेखुरे कौशल्य आहे. त्याचा विचार, आशय आणि विषय लोकांपर्यंत पोचवण्याचे मोटिव्ह सिध्द झाले असे आपण म्हणू शकतो. अर्थातच संवेदनशील विषय हाताळताना फार बारकाईने मांडणी करावी लागते. कोणाच्यातरी प्रभावाखाली येउन केवळ अतिरंजित मेलोड्रामा करून काहीही उपयोग नसतो. 


जय भीम वर कौतुकाचा वर्षाव करणारे पण आहेत आणि आक्षेप घेणारे पण. मुळात चित्रपटाच्या नायकाला कम्युनिस्ट चळवळींशी निगडित दाखवलेय. मग आंबेडकर, पेरियार, मार्क्सच्या प्रतिमा कर्मधर्मसंयोगाने चित्रपटात डोकावतात. विळ्या-कोयत्याचा लाल झेंडा दिसला की उगाचंच काही लोकांना कसनुसं होतं. मग आक्षेप घेतले जातात. कारण लाल झेंडा हा नक्सली लोकांना सहानुभूती वगैरेसाठी आहे असा भलताच नवा प्रवाह सुरु झालाय. मग अर्बन नक्सल वगैरे बिरूदावली रुढ व्हायला लागली. मुळात आजचे साम्यवादी कार्यकर्ते आणि खरेखुरे साम्यवादी कार्यकर्ते यात बराच फरक आहे. तसंही लाल, निळा, हिरवा आणि भगव्या रंगाच्या झेंड्याखाली ज्याची त्याची मतपेढी बांधून ठेवलेली आहे. मुळात शोषित, वंचित आणि दलितांच्या चळवळी ह्या लाखो असंघटित लोकांच्या मूलभूत गरजा, हक्कासाठी उभ्या राहिल्या त्या त्या वेळी. जय भीम म्हणजे आंबेडकरी चळवळीचा आवाज असा काहीसा समज काही दशके चालू आहे. तसे खरे पाहता, अस्सल आंबेडकरी विचारधारा ही नेहमीच डाव्यांच्या, उजव्यांच्या आणि वर्चस्वतावादी विचारांच्या विरोधात असते. ज्यांनी आंबेडकरांचे साहित्य वाचलेय त्यांना नक्कीच माहिती आहे आंबेडकर यांचे कम्युनिस्ट लोकांबाबतचे प्रामाणिक मत काय आहे ते. हे कम्युनिस्ट फार चाणाक्ष दक्षिणेकडे पेरियार यांना जवळ करतात आति इतरत्र आंबेडकरांना अंतर देतात. आंबेडकर आणि पेरियार तसे समकालीन सुधारणावादी. शोषितांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. मात्र व्यवस्थेतील धुरणींनी सगळे महापुरुष आणि समाजसुधारक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले. दलित चळवळींशी निगडीत कार्यकर्ते कमी आणि गट-तट जास्त असतात. अशा गटातटातील नेत्यांची इच्छाधारी तऱ्हा निराळ्या. कम्युनिस्ट पक्षात जमिनीवर उतरून लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर आंदोलने करणारे अभ्यासू कार्यकर्ते आहेत. मात्र व्यवस्था बदलण्यासाठी लढतात आणि व्यवस्थेचाच भाग होऊन जातात. जय भीम चित्रपटाच्या नायकाची पार्श्वभूमी ही अशीच लढवय्याची आहे. जो प्रतिभावान, स्वाभिमानी आणि प्रामाणिक दाखवलाय. जय भीम चित्रपटातून लोकांच्या जगण्या, मरण्याचा प्रश्न कीती दाहक असू शकतो याची जाणीव प्रेक्षकांना होते. अशा चित्रपटातून व्यवस्थेवर एखादे स्टेटमेंट करण्यासाठी किंवा त्रुटी दाखवण्यासाठी फार समतोल राखावा लागतो. तकलादू भूमिका घेऊन चालत नाही. भेदक सत्य आणि दाहक वास्तव लोकांपर्यंत कसे पोहोचते त्यावर अशा चित्रपटाचे यशापयश अवलंबून असते. संवेदनशील मनाला नक्कीच प्रक्षुब्ध करणारा आणि व्यवस्थेबद्दल डोक्यात तिडिक जाणारा हा चित्रपट आहे.


जय भीम वर आक्षेप घेऊन किंवा कौतुक करुन अमुक-तमुक वर ओरखाडे काढणारे किंवा गोडवे गाणारे हे काही राजकीय पक्षाशी निगडीत खऱ्या अर्थाने चमकोगिरी टाईप लोक आहेत. भूतकाळातील मानवी हिंसक घटना धुंडाळून आणि जी घटना सेलेबल वाटेल तिला उचलून अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडून जर कोणी करत असेल तर हे इथल्या दुभंगलेल्या समाजव्यवस्थेत फार घातक ठरेल. उदाहरणार्थ तीन दशकांपूर्वी घडलेल्या काश्मीरमधील पंडीत लोकांवर झालेल्या अन्यायावर किंवा गांधीहत्येनंतर ब्राह्मणांनी भोगलेल्या छळावर जर अशा प्रकारचा चित्रपट दाखवला गेला तर लागलीच आक्षेप घेणारे आणि कौतुक करणारे आपापल्या भुमिका बदलतील. वर उल्लेखलेल्या घटना सध्याच्या सत्ताधारी समर्थकांना आपल्याश्या वाटतात. तसाच प्रकार २००२ साली झालेल्या गुजरात दंगली किंवा गोध्रा हत्याकांड यांच्यावरही अशा पद्धतीने सिनेमे बनवले जाऊ शकतात. कारण निष्पाप लोकांच्या जगण्या मरण्याच्या घटना आपल्या देशात कैक वेळा घडलेल्या आहेत. वरील उदाहरणे केवळ प्रातिनिधिक म्हणून घेतलेली आहेत. कारण प्रत्येक हिंसक घटनेतील पिडित समाजाच्या मागे एक नवी अप्पलपोटी व्यवस्था उभी राहिली आहे. महाराष्ट्रात तर दलितांच्या छळाच्या घटना बघितल्या तर कीतीतरी आहेत. यावर महाराष्ट्रातले स्वयंघोषित नवसंविधानवादी ब्रिगेडी काही बोलत नाहीत. कारण पोटजिविकेसाठी त्यांना ब्राह्मणांनी बहुजणांवर खूप शतके अत्याचार केला वगैरे शिकवलेले असते. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणी लोक जे कोणी आक्षेप वा कौतुक करणारे आहेत ते ढोंगी आहेत. भविष्यात जो तो ज्याला हवी ती घटना घेऊन कोणी प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा वगैरे सिनेमा करेल. तेव्हा आताचे कौतुक करणारे आणि आक्षेप घेणारे बुजगावणे काय करतील? एक देश एक संविधान म्हणायचे आणि सरंजामशाही अबाधित ठेवायची असा परिपाठ कित्येक दशके देशात चालत आलेला आहे. जय भीम हा चित्रपट ज्या घटनेवर बेतलेला आहे ती केवळ प्रातिनिधिक गोष्ट आहे. बिघडलेली आणि सोयीनुसार वाकवलेल्या व्यवस्थेबद्दल हा सिनेमा आहे. आजवर भारतात कैक समाजसुधारकांनी शोषितांसाठी जे जे केले ते अत्यंत अडचणींना तोंड देऊन. व्यवस्था बदलणे साधीसुधी गोष्ट नाही. त्यासाठी सोशल अवेअरनेस फार महत्त्वाचा. केवळ प्रतिमापुजन व प्रतिमाहनन करून समस्या सुटत नाहीत. त्यासाठी तडीस नेण्याची समर्पित प्रवृत्ती गरजेची. अशी प्रवृत्ती असलेले कार्यकर्ते आपल्या देशात नेहमीच दुर्लक्षित राहतात. कोणी कोणाला मोठे करावे कोणाला लहान ठरवावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेच्या विषय. मात्र जय भीम सारखे संवेदनशील चित्रपट जेव्हा येतात तेव्हा व्यवस्थेतील त्रुटी कायमच वाकुल्या दाखवत राहतात. 


आजच्या काळात अनेक वेळा एखाद्या जातीतील लोकांना हॅबिच्युअल चोरी करणारे असतात असे बोलले जाते. किंवा अमुक तमुक जातीतल्या लोकांचा जन्मच तमुक अमुक कारणांसाठी झालाय अशी ठशीव समजुत कित्येक पढतमुर्खांची असते. सोशलमेडियाच्या माध्यमातून जे राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक जेव्हा जय भीम सिनेमाबद्दल कौतुक करताना संविधानाच्या बाता मारतात तेव्हा हसू येते. कारण आजपर्यंत आपल्या देशात प्रत्येक विरोधकांना सत्ताधारी हे संविधानाचा खूण करणारेच दिसतात. प्रत्यक्षात वेळोवेळी ज्याने त्याने सत्तेत येऊन संविधानाची मोडतोड केलेली आहे. कारण अशी गळचेपी केल्याशिवाय सत्ता राबवता येत नाही. मग ही प्रवृत्ती देशातल्या प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेत मुरलेली आहे. न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन ही दोन प्रमुख टार्गेट जय भीमच्या निमित्ताने लोकांसमोर येतात. प्रत्येकाला आपापली प्रतिमा, पत जपण्यासाठी काय काय करावे लागते मग ते कसे जस्टीफायेबल आहे हे दाखवायचे असते असे सगळे या सिनेमात चित्रित केलेले आहे. असा एखाददुसरा सिनेमा सामाजिक क्रांती करू शकत नाही मात्र लोकांपर्यंत प्रामाणिक विषय पोचवू शकतो. असे सिनेमे करताना तोल ढासळू नये हे दिग्दर्शकाने पहिल्यापासूनच ठरवलेले आहे असे समजते. कारण सिनेमात व्यवस्था कशी कचकड्यासारखी वापरता येते हे स्पष्ट पणे कसलीही भीडभाड न बाळगता दाखवले आहे. सिनेमाची स्टोरी टेलिंग मेथड अजिबात कंटाळवाणी वाटत नाही. यासाठी पात्रांचा अभिनय मेलोड्रामा न होता संयत वगैरे आपसूकच झाला. बरेचसे संवाद बोल्ड आणि विचार करायला लावणारे आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने बॅकग्राऊंड स्कोअर चा प्रभावी वापर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवायला सिनेमा यशस्वी ठरलाय.


या सिनेमाच्या निमित्ताने हल्ली समाजमाध्यमांच्या वॉलवर बरेच चांगले वाईट सिनेमाबद्दल लिहिले गेलेय. काहींना जय भीम हा ट्रेडमार्क आहे अमुकतमुक चळवळींचा वगैरे असा साक्षात्कार झालाय. एक दोन महाभागांनी तर असे चित्रपट सहानुभूती दाखवण्यासाठी केलेले खटाटोप असतात असे अप्रत्यक्षपणे जाहिर केलेय. मुळात जे लोक असे विषय रिलेट करू शकतात अशांनाच हा सिनेमा थेट भिडतो. कित्येकांचे आयुष्य बोरातल्या आळीसारखे असते. बाहेरच्या जगाची कसलीही जाणीव नसते. अशा दिवट्यांनी जय भीम सिनेमा अवश्य बघावा. त्यामुळे शोषित, वंचितांच्या सामाजिक समस्यांचे गांभीर्य समजेल. 

- भूषण वर्धेकर, पुणे
नोव्हेंबर २०२१

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा

ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेला सरदार उधम हा चित्रपट नक्कीच न चुकवण्यासारखा आहे. शुजित सरकारचे दिग्दर्शन आणि विकी कौशलचा अभिनय अफाट आहे. एकूण स्वातंत्र्य मिळण्याआधीची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. हा नसिनेमा आजच्या काळात महत्त्वाचे विधान करतो. सध्याचा काळ हा श्रेयवादासाठी आसुसलेल्या पक्षांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. हा सिनेमा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी गोष्ट सांगतो ती फार महत्त्वाची आहे. सरदार उधम यांचा एकाकी लढा, सूडाची भावना आणि त्यामागची कारणमीमांसा जबरदस्त कन्व्हीक्शनने मांडलेली आहे. १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास निरखून बघायचा असेल तर एलन ह्यूम ने जे कारनामे केलेत त्यापासून सुरुवात करायला पाहिजे. १८५७ चा लढा आणि नंतरचे झालेले लढे. १९४२ च्या लढ्याला असलेले वेगवेगळे कंगोरे समजून घेणे गरजेचं आहे. त्यासाठी त्याकाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची भुमिका अभ्यासणे फार महत्त्वाचे आहे. समांतर पणे बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष पण महत्त्वाचा आहे. नंतर टिळकांच्या आधीचे लढे टिळकांच्या नंतरचे लढे फार महत्त्वाचे आहेत. आणि हो सोबत अमेरिकन आणि इंग्रज लोकांनी भारताबद्दल त्याकाळात जी निरिक्षणे नोंदवली आहेत ती पण विशेष उल्लेखनीय. नंतर तत्कालीन ठिकठिकाणच्या राजघराण्यातील लोकांनी काय काय उपद्व्याप केले ते पण तितकेच महत्त्वाचे. नंतर क्रांतिकारक लोकांची ठिकठिकाणी झालेली सशस्त्र आंदोलने आणि तत्कालीन कॉंग्रेसची आंदोलने यावर कटाक्ष टाकला की खरा इतिहास आणि लिहिला गेलेला कोणता आहे हे लक्षात येते. 

क्रांतिकारक लढ्याचा उल्लेख केलाय मी, त्यात सरसकटपणे सगळेच क्रांतिकारक गृहित धरले आहेत. यापैकीच एक उधम सिंग यांचा एकाकी लढा म्हणजे सरदार उधम चित्रपट. आजवर आपला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमात कॉंग्रेस प्रणित सरकारांनी नेंहरू गांधी या विचारावर आधारित लिहिला आहे. कारण कॉंग्रेसने तशी खंबीर व्यवस्था उभी केली होती. मुळात क्रांतिकारक लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी संघटना कार्यरत होत्या. त्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र आघाडीवर होते. दक्षिणेकडे पण तुरळक क्रांतिकारी घटना होत होत्या मात्र इतिहासात त्यांचा उल्लेख प्रचलित लढ्यासारखा नोंदवला गेला नाही. बंगाली बहुतेक डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे होते. कारण तत्कालीन दशकांत जागतिक घटना पण तशाच होत होत्या. पहिल्या महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर, रशियन क्रांतीनंतर, युरोपीय खंडातील बदल यांचा आपल्या देशात कसे परिणाम झाले याबद्दल इतिहास फारसा शिकवला नाही. मात्र स्वातंत्र्य लढ्यात तत्कालीन क्रांतिकारक लोकांनी ठिकठिकाणी जे जे उठाव केले मग ते देशात असोत वा परदेशात ते फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी फक्त संघटनाच नाही तर कित्येक व्यक्ती अग्रभागी होत्या हे जाणवते. त्यापैकीच उधम सिंग यांची एकाकी लढत पाहून विशेषतः तत्कालीन कम्युनिस्ट चळवळी महत्त्वाच्या कशा होत्या हे समजते.

सशस्त्र क्रांतिकारकांचे पहिले पर्व, दुसरे पर्व वगैरे वाचण्यासारखे आहे. हे सगळे समांतरपणे चालू असताना परदेशात (प्रामुख्याने इंग्लंड, लंडन, जपान व रशिया) जाऊन तिथून जे जे कार्यरत होते त्यांना साईडलाईन केले गेले मुख्य ऐतिहासिक प्रवाहातून असे मला नेहमीच जाणवते. तसंही गेल्या काही वर्षांत सातत्याने सत्ताधारी मातृसंघटनेच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील योगदानाबद्दल बिनकामी चर्चा होत असते. त्यानंतर गांधी नेहरु वगैरेंची व्यवस्था होती म्हणूनच स्वातंत्र्य मिळाले हे वारंवार पटवून सांगितले जाते. या दोहोंच्या संघर्षात खऱ्याखुऱ्या लोकांच्या चळवळी म्हणजे तत्कालीन कम्युनिस्ट, तत्कालीन शोषित, दलित यांचा संघर्ष नेहमीच मागे राहिलाय असे वाटते. 

माझ्या मते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर खरा पारदर्शी कालखंड पडताळून पहायचे असेल तर १९४० नंतरचा लढा, १९२० ते ४० चा लढा, १९२० च्या आधीचे लढे आणि सर्वात महत्त्वाचे १८५७ चा लढा इत्यादी कालखंड खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला सगळ्यात जास्त हॅपनिंग कालखंड म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर ते स्वातंत्र्य बहाल करण्यापर्यंतचा. हे सगळे लिहिण्याचे मुख्य कारण सरदार उधम चित्रपट पाहताना कैक क्रांतिकारक लोकांना आणि त्यांच्या चळवळींना आपण इतिहासात कमी प्रमाणात प्रोजेक्ट केलेय असे दिसते. खरा इतिहास बायस्ड पद्धतीने कोणी लिहिला आहे कसा लिहिला आहे का लिहिला आहे वगैरेंची नंतर चिरफाड करता येईल. मात्र खराखुरा हार्डकोअर कम्युनिझम समजून घ्यायचा असेल तर हा सिनेमा फार महत्त्वाचे भाष्य करतो. शुजित सरकारने फार बारीकसारीक गोष्टी दाखवल्या आहेत. त्यामुळे चित्रपट कोठेही कंटाळवाणा वाटत नाही. उगाचंच शब्दबंबाळ संवाद, देशप्रेमाचे ओतप्रोत भरलेले तेजपुंज डोस वगैरे हा चित्रपट अजिबात देत नाही. एक संकीर्ण लढाई एकाकीपणे लढताना सरदार उधम सिंग जिवंत उभा राहतो. चित्रपटात तुरळक घटना १९१९ ते १९४० मधील अशा पद्धतीने दाखवल्या आहेत की चित्रपटाची पटकथा कुठेही सैल होत नाही. उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून मायकेल ओडवायरची हत्या लंडनमध्ये केली. या एका वाक्यात उधम सिंग यांचे कार्य मावणार नाही. त्यासाठी त्यांना किती दिव्यांतून जावे लागले. २१ वर्षे एकच गोष्ट करण्यासाठी जे जे केले ते या चित्रपटात पाहण्यासारखे आहे.  मला विशेष कौतुक या गोष्टीचे वाटते की हा चित्रपट करताना दिग्दर्शकाने  फारच मुद्देसूद आणि पाल्हाळ होणार नाही असे सिनेमॅटिक प्रसंग दाखवलेत. असे पिरियड फिल्म्स करताना थोडीशी जरी स्क्रिप्ट इकडेतिकडे झुकली की चित्रपट गडगडतो. तत्कालीन कम्युनिस्ट विचारधारा जबरदस्त साकारली आहे. तसंही कम्युनिस्ट विचारधारेचे गेल्या शतकात भारतीय भूखंडावर वेगवेगळे पल्ले आणि प्रवाह राहिलेले आहेत. हल्लीचे कम्युनिस्ट, लिबलर वगैरे मंडळी हे नक्षलप्रेमी असतात असा एक मोठा समज पसरवलेला आहे. १९४० पर्यंत भारतातील कम्युनिस्ट एक दिलाने लढणारा समुह आणि विचारधारा होती. १९४२ च्या लढ्याला तत्कालीन कम्युनिस्ट चळवळीचे आणि संघाचे समर्थन नव्हते. का नव्हते हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. १९६२ नंतरचा कम्युनिस्ट विचारप्रवाह भारतात वेगळ्या खाचखळग्यातून जात होता. ८० नंतरचा एकूणच कम्युनिझम पतनाकडे वाटचालीस आगेकूच करत होता. ९० नंतर जागतिकीकरण आले आहे सगळ्या विचारप्रवाहांना उधळून लावले. सरदार उधम चित्रपटात जो कम्युनिस्ट लोकांचा कालावधी दाखवतो तो प्रखर राष्ट्रवादी, वैचारिक रित्या परिपक्व व जहाल पद्धतीत विश्वास असणारा होता.

पहिल्या महायुद्धानंतरचा, दुसऱ्या महायुद्धाच्या आधीचा काळ आणि भारतीय क्रांतिकारक लोकांच्या छुप्या पद्धतीने लढण्याच्या कृती या गोष्टींनी ह्या चित्रपटाचा गाभा तयार झालेला आहे. यात सरदार उधम सिंग यांची कृती आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेला खटला, त्यांना सहन करावा लागलेला छळ, हत्या करण्यामागील जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर झालेला तीव्र आघात. हे सगळं जस्टीफायेबल आहे. या चित्रपटात भगतसिंगांशी निगडित काही प्रसंग ज्याप्रमाणे दाखवले गेले आहेत त्याला तोड नाही. साधा, सरळ आणि सुटसुटीत साम्यवादी विचार कसा असतो हे खूपच भारी दाखवलंय या सिनेमात. एखाद्या ग्राउंड रिएलिटीशी तडफेने जाऊन भिडण्याची तलफ काय असते हे हार्डकोअर कम्युनिस्टच समजू शकतो. तिथे जातपातधर्म याचा मागमूसही नसतो. विचार पक्का आणि धडक कृती ही साम्यवादी आकलनाची मुख्य शक्तीस्थळे आहेत. क्रांतिकारक आणि दहशतवादी यांच्यातला सडेतोड फरक चित्रपटात भगतसिंगांनी सांगितलेला आहे. तो सीन माझ्यामते अव्वल दर्जाचा आहे जो आजच्या काळातील तथाकथित भोंदू, स्वयंघोषित राष्ट्रभक्त आणि ढोंगी, लिबरल लोकांना दाखवण्या लायक आहे. आजचा काळ हा एकूण विस्कळीत वैचारिक कल्लोळाचा आहे. अशा काळात सरदार उधम सारखा चित्रपट येतो हेच खूप महत्त्वाचे आहे. कारण सध्याच्या काळात राष्ट्रभक्ती ही पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्थान झिंदाबाद भोवतीच फिरते. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी जहाल व मवाळ गटात विभागलेले होते वगैरे पुस्तकी विधाने घोकंपट्टी साठी ठिक. मात्र जहाल गटाकडे जो मोटिव्ह होता तो किती क्रिस्टल क्लिअर होता आणि त्याचा जनजागृती साठी कसा वापर करायचा याचे 'टूलकीट' प्रबोधनात्मक होते. प्रक्षोभक नव्हते. नुसतं स्वातंत्र्य मिळवणे हा हेतू नसून लोकांना चांगले सुशासन, तळागाळापर्यंत विखुरलेल्या घटकांना सोबत घेऊन राष्ट्रबांधणी करणे हे फार महत्त्वाचे 'टास्क' जहाल गटाकडे होते. हा चित्रपट अशा घटकांचा जीवनपट उलगडतो. 

मन सुन्न करणाऱ्या हिंसक घटना आपल्या देशात खूप घडल्या आहेत. त्यापैकीच जालियनवाला बाग हत्याकांड. चित्रपटातील शेवटची काही मिनिटे केवळ त्या रात्री काय घडले आणि त्याचा विशीतल्या तरूणावर -उधम सिंग- झालेला परिणाम यासाठीच राखीव. रक्तरंजित दाहकता जी दाखवलीय त्यावरून त्याकाळी काय काय सहन करावे लागले असेल त्याची प्रचिती येते. इंग्रज लोकांची प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि प्रशासकीय कर्तव्यदक्ष कामकाज रूटिन याचाही हलकासा कानोसा या चित्रपटाने घेतलाय. शेवटचा सीन चित्रपटातील 'वरचा सा' वगैरे म्हणतात तसा आहे. अभिनयापेक्षा दिग्दर्शकीय कसब चित्रपटात खूप आहे. तसही चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम अभिनेत्याचे नाटक हे माध्यम व साहित्यनिर्मिती हा लेखकाचा प्रांत. ह्या चित्रपटाची विशेषकरून महत्त्वाची उल्लेखनीय बाजू म्हणजे तत्कालीन काळ उभा करणं. ते लयभारी जमलंय. तंत्रज्ञ कलाकारांनी जे उभे केलेय त्याला दहा पैकी दहा मार्क. मोजकेच पण लक्षात राहणारे संवाद. 
"... जंग बडी बेईमान चीज़ है। आपको लगता है आप जीतते हो । कोई नही जीतता,  नोबडी विन्स, ओन्ली हेटरेड विन्स।" हा संवाद मला विशेष आवडला. 

- भूषण वर्धेकर, पुणे.

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या 
या रे येड्यांनो, या रे या 
झिंगलेला हा आनंद घ्या 
हर्बल तंबाखूचा सुंगंध घ्या

मनात फुलावी कडक चांदण्या, नबाब रे बरळतो
महाराष्ट्राच्या भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो 
गंजेकसांना का हुंगुन रे दहशत हा भरतो 
हर्बलफुलाचा  महाविकास घ्या 
वसुलीआघाडीचा सुहास घ्या 

चार दिशांचे चौखूर सुंदर आघाडीचे पाळणी 
मंत्र्यांचे मुखकमल हे डुलत्या तुरुंगसदनी 
बरळा बोंबला फुरोगाम्याला जो जो ग गाउनी 
युगायुगाचा अंमल घ्या,
नवक्रांतीचा हा आरंभ घ्या 

© विडंबन- भूषण वर्धेकर

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...