शुक्रवार, २५ मार्च, २०१६

अब्जावधी

अब्जावधी हृदयाचा ठेका
चाले यांच्यासंगे
लेकरा तुही चाल, चालत रहा
वाट फुटेल तिथे

उगाच काही विचारू नको
कसली उत्तरे शोधू नको
आपणच इतरांची उत्तरे आहोत
असे समजून चालत रहा

तो पहा आपला नेता कुलपती
समाजाचा उद्धार करतोय
कळसासाठी आपल्याच
बांधवांचा रक्ताभिषेक

बाता मात्र क्रांतीच्या,
अभ्युदयाच्या व्याप्तीच्या
सकलांचा कर्दनकाळ
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

रक्तमासांचा चिखल करून
ज्याने घडवला हा देश
त्यांचेच वंशज सत्तेवर
सेवा मात्र स्वकीयांची

अखंड तेवणारी
कर्तृत्वाची वात
निर्वात पोकळीशी झुंजते...

२५/०७/२०११
उरूळीकांचन स्टेशन

यत्र तत्र सर्वत्र

यत्र तत्र सर्वत्र
बिनकामाचे मानपत्र
माध्यमांचे त्रिनेत्र
दिखाऊ विकासकामाचे शास्त्र

इव्हेंटचा बागूलबुवा
कृतीचा कांगावा
भाडोत्री गर्दीने पहावा
प्रशासकीय देखावा

झाकपाक टेक्नोसॅव्ही
पोकळ क्रांती ठरावी
गरजवंत असे निनावी
योजनांचे फ्लेक्स गावोगावी

निधीला नसे तोटा
उत्पन्नाचा फुगवटा
करवसुलीचा वरवंटा
विकासपर्वाच्या लाटा

विदेशी गुंतवणूकीला प्राधान्य
गाढवी कामे धन्य धन्य
सरकारी आकडेवारी सर्वमान्य
शेतकऱ्यांचे दारूण दैन्य

--भूषण वर्धेकर
4-10-2015
रात्रौ 11:30
दौंड


आम्ही हिंदू

आम्ही हिंदू, आम्ही हिंदू
विस्कटलेले अनेक बिंदू
कोणाकोणाला आम्ही वंदू
पोकळ सलोख्यातच नांदू

भव्य दिव्य कल्पक कथा
पुराणातील दाहक व्यथा
स्वयंघोषित परमपूज्य आस्था
शांतपणे कुठे टेकवू माथा

भेदरलेल्या संस्कृतीच्या वाटा
माणूसपणाला निव्वळ फाटा
भरकटलेल्या उत्सवांच्या लाटा
तुंबलेल्या दानपेटीतल्या नोटा

गर्जा जयजयकार तयांचा
गांव तेथे सम्राट ह्यांचा
अवडंबर मात्र धनिकांचा
विकलेल्या बाजारू धर्माचा

एकीचे नेकीचे दिव्य समीकरण
एकटेपणाचे वास्तव भीषण
बरबटलेल्या जातींचे ग्रहण
जावे कुठे कुठे शरण

अराजकतेच्या अखंड पसारा
अस्तित्वाच्या शोधात निवारा
निर्मिकाला चकचकीत गाभारा
दीनदुबळ्यांचा आशाळभूत सहारा

--- भूषण वर्धेकर
9-2-13
दौंड

माझा देश खूप मोठाय...

माझा देश खूप मोठाय !

लोकसंख्येत आम्ही अब्जाधिश आहोत,
पण इथं माणसंच राहत नाही जी आहेत ती त्या त्या धर्माने बांधून ठेवलेली गिऱ्हाइकं !
इथं सगळ्या धर्मांचा बाजार आहे माणूसकी चा धर्म सोडून. तो आहे फक्त पाठ्यपुस्तकातच !
इथली गिऱ्हाईकं तशी साधीभोळी, रोजमर्राच्या जगण्यात पिचलेली.
मात्र गावोगावी विखूरलेले गिऱ्हाईकांचे पुरवठादार फार हुशार.
ज्याला त्याला आपापल्या धर्माचा बाजार वाढवायला हुरूप भारी !
काही धर्मांना सरकारदरबारी अनुदाने, सवलती यांची काही कमी नाही तर काहींना प्रसारासाठी परदेशी देणगी प्यारी.
काही धर्म अतिप्राचीन अस्तित्वाच्या भांडवलावर हेलकावे खात धडपडतायत. बिचाऱ्याला सुशिक्षितांकडून खस्ता खाव्या लागतात!
इथं कोणी मेला रे मेला कि त्याची धार्मिक चिरफाड होते.
ज्याची संख्या तुलनेने कमी त्याचा जागतिक उदो उदो !
इतर धर्मातले मेले काय अन जगले काय याचे कोणालाच देणेघेणे नाही! आताशा सहिष्णू आणि असहिष्णू असे दोन जुनेच पाहुणे नटून थटून आलेत.
यांचा वावर सध्या अतिउच्चशिक्षित लोकांकडे आहे. ते म्हणतील तसं वागतात. गेलाबाजार इतरही पाहुणे आहेतच !
सवर्ण, बहुजन, दलित, मागास, अतिमागास आणि उर्वरीत!
ज्याची त्याची सोय जो तो धर्म राखीव गोदामात करतच असतो.
गिऱ्हाईकांची कमी नसल्याने सगळी गोदामं तुडुंब भरलेली आहेत.
मागणी तसा पुरवठा तत्वावर बाजार तेजीत चालूय !
माणूसकीची मंदी मात्र दिवसेंदिवस वाढतंच चाललीय !!!

--------------------
भूषण वर्धेकर
19-01-2016
रात्रौ 11:20
हडपसर
----------------------

सुन्या सुन्या

सुन्या सुन्या मैफिलीत तिच्या
रिकामे ग्लास रित्या बाटल्या
कोमेजली फुले गजरा उशाला
मैथुनाच्या राती ओशाळल्या

तीन्ही सांजच्या झगमगीत वस्त्या
निर्मनुष्यपणे सकाळी विखुरल्या
तुटपंजी कमाई भेसूर रात्रीला
दळभद्री भुकेल्या पोटाला

संसाराची क्षणिक स्वप्ने धुळीला
सुखद आठवणी काळवंडलेल्या
शल्य मनाचे भोगलेल्या शरीराला
तनाचे धन पुन्हा शृंगाराला

वेदना जगण्याच्या एकांतातल्या
दुर्लक्षित लिंगपिसाट समाजाला
संभोगाचा क्रुरकर्मा करपलेल्या
सधनतेच्या आर्जवा देव-दैवाला

भूषण वर्धेकर
15-4-2008
पुणे

गदारोळ

एके दिवशी गदरोळ झाला
धर्म, जात-पात, संस्कृती, सभ्यता, आचार-विचार आणि माणूसकी संसदेवर चाल करून गेले निषेधासाठी
अन् ह्यांचा म्होरक्या होता स्वातंत्र्य
स्वातंत्र्याने तर हिरिरीने सहभाग घेतला
सगळ्यांचा एकच नारा
अबाधित रखो आस्तित्व हमारा!
स्वातंत्र्याने पुढाकार घेतला कारण वर्षातला एक दिवस सोडून त्याला कोणी पुसतच नव्हतं
आज तर हुरूप एव्हढा होता की सगळ्यांना घेऊन संसदेवर जाऊ म्हणाला
धर्म तर त्वेषाने पेटला होता बेरंग होऊन बेछूट झाला होता कारण स्वतःचा असा त्याचा रंग शिल्लक नव्हता
जोर मात्र सगळ्यांपेक्षा जास्त होता
जात-पात तर सवयीनुसार लगेचच मोर्च्यात आले
एरवी कोणीतरी त्यांना ओढून आणत आज स्वतःहून सामील झाले
संस्कृती तर नटून थटून आली
मग चार-चौघात जास्त फुटेज मिळेल म्हणून
कारण बिचारी आजवर श्रेयवादालाच ती उरली होती
सभ्यतेचा जरा थाट वेगळा होता
ईतरांपेक्षा अंमळ पसरलेला होता
छान-छौकी उगाच लादली गेली होती तिच्यावर
मात्र स्वतःची आयडेंटिटी तिने सोडली नव्हती
आचार-विचार तर अगदी जय्यत तयारीने आले होते
सगळी साधनं, परिमाणं आणि संदर्भ घेऊन
आज तर त्यांना स्वतःच वेगळंपण सिद्ध करायचंच होतं
माणूसकी तर स्ट्रेचरवर आली होती डायरेक्ट आयसीयूमधून
तशी तज्ञ डॉक्टरांची टिम दिमतीला होतीच
उगाच माणूसकीवर काळाचा घाला येऊ नये म्हणून!
सगळे जमल्यावर स्वातंत्र्याने निषेधाच्या मोर्च्याची रूपरेषा समजावून सांगितली
संस्कृतीने तर लगेच अनुमोदन दिले आवरून सावरून
धर्म नाराजीनं म्हणालं अजेंडात मी दुय्यम का?
मग सभ्यता पुढं सरसावली अन् धर्माची समजूत काढली
आचार-विचार जरा साशंक होते पण त्यांच्या माथी मारले की ते राजी होतात हे धर्माने हेरलं होतं
जात-पात संदिग्ध होते नेहमीप्रमाणे
त्यांना एकच माहित होतं
जिसके पिछे सारी जनता
वही हमारा भारी नेता !
माणूसकीचं बिनसलं होतं पण दुःखण्यानं पिचलं होतं
डॉक्टरांची टिम टेस्ट अन् रिपोर्टमध्येच मश्गूल होती
अखेरीस एक कलमी कार्यक्रम जाहीर झाला
आचार-विचार तर तडाखेबंद लिखाणात माहिर
इकडे धर्म जाज्वल्य अन् वीररसयुक्त भाषणबाजीत तरबेज
संस्कृती प्रदर्शनासाठी आसुसलेलीच होती
मागाहून जात-पात मात्र फरफटत रेटलं जात होतं
सभ्यता मात्र दोहोंना सांभाळण्यात गर्क होती
माणूसकी सगळ्यांच्या शेवटी निपचितपणे आणली जात होती तज्ञांकडून !
संसदेचा आवार जसा आला
शुकशुकाट सुरू झाला
किर्र शांतता पसरली
स्वातंत्र्याला काहीच उमगेना!
मागे वळून पाहतो तर काय कोणीच उरलं नव्हतं
ज्याचे त्याचे कॉपीराईट होते ते बाकीच्यांना घेऊन गेले
स्वातंत्र्य एकटंच हिरमुसलं बंद संसदेपाशी कोलमडलं !!!!

भूषण वर्धेकर,
23-10-2015
दौंड
दुपारी 4:30

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

लग्न आणि प्रेम

लग्न आणि प्रेम

एकदा लग्न आणि प्रेम यांच्यात
कडाक्याचं भांडण झालं
लग्न म्हणाले मीच महान
प्रेम म्हणाले मीच महान

वाद काही संपेना
कोणी कोणाला जुमानेना
मग त्यांनी ठरवलं
त्रयस्थाला विचारावं

मान-अपमान समोर दिसले
सगळं  ऐकून घेउन मान-अपमान म्हणाले
आम्ही दोघे सावत्र भाऊ
मान ठेवणारा आणि अपमान करणारा
उगाच आमच्यात शत्रुत्व निर्माण करतात
प्रेमात अपमान बहुधा होत असतो
लग्नात मान ठेवला जात नाही
म्हणूम मी तुमच्यात काही बोलणार नाही

पुढे दोघांना दुःख दिसले, धडधाकट-सुदृढ
दोघांचे ऐकून ते म्हणाले, जगात माझी सारखी मागणी वाढत आहे. प्रेमात दुःख सहन करणारे सापडत नाहीत आणि लग्नात दुःख देणारे भरपूर म्हणून मी काही निर्णय देणार नाही

पुढे दोघांना दिसले सुख, निपचित पडलेले
कृश आणि अशक्त, कमकुवतपणे म्हणाले
माझी जगात फार कमतरता आहे
लोकांमध्ये राहण्याची माझी फार ईच्छा असते
पण राहता येत नाही आणि प्रेमात मला दिलं जात नाही तर लग्नात नेहमीच ओरबडला जातो म्हणून मी काही निर्णय देत नाही

पुढं दोघांना आदर आप्पा दिसले, स्वच्छ टापटीप सगळं ऐकून आप्पा म्हणाले
मी असतो जीवनसत्वांसारखा, कमी पडलो तर
आजारी करतो आणि प्रेमात कोणी मला ठेवत नाही आणि लग्नात गृहित धरल्याने मी राखला जात नाही म्हणून तुमचं तुम्ही निस्तरा

पुढं समाधानराव समाधी लावून बसलेले असतात ऐकून एकच बोलले
प्रेमात समाधानापेक्षा इतर सुखात रमता
लग्नात हव्यासापोटी समाधानी राहता येत नाही म्हणून मी काही निकाल सांगणार नाही

पुढे गेल्यावर त्याग गंभीर मुद्रेत बसलेले दिसले, चिंतन करत ऐकून म्हणाले निर्वाणीनं
प्रेमात हल्ली मी नाहीसा झालोय आणि लग्नात त्याज्य पदार्थांना जखडलं जातं मी काय तुमचा निर्णय देणार?

पुढं गेल्यावर सहवासकाका दिसले सगळं ऐकून म्हणाले प्रेमात मी अती होतो नंतर लग्नात मी पूर्णपणे संपून जातो मी काय निर्णय देणार?

पुढे दोघांना संशयतात्या दिसतात बेरकीपणे दोघांकडे पाहून म्हणतात मला तुमच्यात आणू नका मी आलो की होत्याचं नव्हतं होतं आणि
सगळं पाप माझ्या माथी मारलं जातं प्रेमात मी मनोमनी खदखदत असतो लग्नात मात्र बिनसण्यासाठी मीच कारणीभूत ठरतो

समोर समजुतदारपणा एकाकी बसलेला असतो
सगळं ऐकतो आणि म्हणतो प्रेमात मला दूर ठेवलं जातं लग्नात असूनही दूर्लक्शित केला जातो मी तर नेहमीच एकाकी असतो आधारासाठी वाट पाहत मी काय देणार निर्णय?

पुढं इर्शा-राग-कपट-चिंता-निंदा-नालस्ती  टक लावून पाहत असतात ऐकून म्हणतात
प्रेमात व लग्नात आम्ही असतोच मनामनात ताबा न  ठेवल्याने आमची वाढ होते म्हणून जगात आमची नाचक्की होते आम्ही काही निर्णय देणार नाही

हताश होऊन दोघे पुढे जातात आणि पहतात तर ब्रेक-अप आणि घटस्फोट भांडत असतात
दोघांपैकी नीच कोण?
मग काय कोण महान कोण नीच यावर जोरात रणकंदण

अखेरीस चौघांना पुढे विश्वासमामा दिसतात
मिश्कीलपणे हसतात आश्वासकपणे ऐकून निर्णय देतात
प्रेमात मी नसल्याने ब्रेक-अप होतात
लग्नात मी आस्तित्वहिन झाल्याने घटस्फोट होतात
उगाच महान कोण नीच कोण यात न पडता
प्रेमाने ब्रेक-अप होउ नये म्हणून काळजी घ्यावी तर लग्नाने घटस्फोट होऊ नयेत याची

जो यात यशस्वी होतो तो महान
कारण असं झालं नाही तर मन भावनाशून्य होते निर्दयी होतं हल्लीच्या शब्दात प्रॅक्टीकल होतं
म्हणून प्रेमात निभवावं लागतं आणि लग्न टिकवावं लागतं तरच जग सूरळीत चालतं

---भूषण वर्धेकर,दौंड.

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...