मंगळवार, ३० मे, २०२३

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध

एका राज्यात गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारे लोक एकाएकी धर्म, प्रार्थना स्थळे यावरुन भांडू लागले. राजाला प्रश्न पडला असं अचानक एकदम कसं झालं. त्यानं तातडीने प्रधानास बोलावलं. प्रधानाने राजाला सांगितले की समाजकंटकांनी हे सगळं सुरू केले आहे. जर वेळीच यावर उपाय केला नाही तर धर्मावरुन जनक्षोभ उसळेल. राजाने विचारले ही समाजकंटक मंडळी आहेत तरी कीती. त्यांचाच बंदोबस्त करून टाका कायमस्वरूपी. प्रधानाने सांगितले ते शक्य नाही. जे समाजकंटक ज्या धर्मातील आहेत त्यांच्या मागे मोठी इकोसिस्टिम उभी आहे. त्यांना दडपून टाकलं तर त्या त्या धर्माच्या लोकांना काबूत ठेवणे शक्य नाही. त्यांची शक्ती खूप वाढलेली आहे. यावर काय उपाय करावेत या विचारात असतानाच राजा प्रधानाला सांगतो की उद्या आदेश काढा. आपल्या राज्यातील धार्मिक ध्रुवीकरण, समाजातील द्वेष लोकांमधील सलोखा बिघडवत आहे. तो थोपविण्यासाठी राज्य सात कलमी कायदा लागू करेल ज्यात सर्व धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा, रुढी आणि चालीरिती यांचा बंदोबस्त केला जाईल. आणि जनता जुमानत नसेल तर हुकुमशाही प्रमाणे माझी राजवट आमलात आणून सगळ्या धर्मातील कट्टरपंथी संघटना कायमस्वरूपी बंद करण्यात येतील. प्रधान चलाखीने राजाला असं करू नका सांगून टप्प्याटप्प्याने लोकांमध्ये जनजागृती करू असे सुचवतो. मग
या राज्यातील सगळ्या धर्माची प्रार्थना स्थळे कायमस्वरूपी बंद करू असे राजा सांगतो. प्रधान राजाला सांगतो कायमस्वरूपी शब्द वापरू नका. त्या पेक्षा आपण पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात येतील असा आदेश काढा. राजाला ते पटतं. तसा तो आदेश जनतेपर्यंत पोचवला जातो. सर्वसामान्य जनतेला या आदेशामुळे काही सुतराम फरक पडत नाही. मात्र ज्या लोकांची प्रार्थना स्थळांवर मक्तेदारी आणि दुकानदारी चालू असते त्यांची मात्र गोची होते. मात्र सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे बंद करण्याचा आदेश असल्याने कोणीही रस्त्यावर उतरत नाही. पुढील आदेश येईपर्यंत वाट बघायची आणि ठरवावे असा विचार सर्व धर्मातील ठेकेदार करतात. 

या आदेशाचे राज्यातील नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी लोक एकमुखाने स्वागत करतात. कारण हीच खरी मंडळी विचारांनी पुढारलेली असतात ज्यांना धर्म नाकारून माणूस म्हणून जगण्याचा अर्थ समजलेला असतो. ते सगळे ठरवतात की आपण प्रत्यक्ष राजाला भेटून त्यांचं अभिनंदन केले पाहिजे. ठरल्याप्रमाणे प्रधानाकडे राज्यातील नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी राजाची भेट मागतात राजाचं अभिनंदन करण्यासाठी. तुम्हाला राजाची भेट लवकरच होईल तशी मी त्यांच्या कडे विनंती करेन. प्रधान राजाकडे जातो आणि सांगतो की राज्यातील सुधारणावादी लोकांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. त्यांनी तुमच्या निर्णयाचे स्वागत केले आणि तुमचं अभिनंदन करण्यात येणार आहेत. राजा परवानगी देतो आणि ठरल्याप्रमाणे भेट होते. सगळ्या मंडळींना राजाचं अभिनंदन करतात आणि सांगतात की सगळी धार्मिक प्रार्थना स्थळे कायमस्वरूपी बंद करावीत. त्याऐवजी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बाबतीत ती स्थळं वापरण्यात यावीत. आपणच हे काम करू शकता. राजा हसतो आणि म्हणतो हे कदापिही शक्य नाही. धर्माच्या बाबतीत राजाने हुकुमशाही लादू नये. त्यापेक्षा जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात यावेत. कोणत्याही धर्माच्या नावाखाली जे जे ठेकेदार आपापली मक्तेदारी गाजवत आहेत आणि दुकानदारी वाढवत आहेत त्यांना थोपविण्यासाठी तुमच्या सारख्या लोकांची संख्या वाढणं गरजेचे आहे. जेवढे लोक विचारांनी पुढारतील तेवढा तोटा समाजकंटकांचा होईल. सगळी मंडळी एकदिलाने होकार देतात. राजा सगळ्यांना सांगतो की तुम्ही लोकांनी पुढं येऊन एकदिलाने काम सुरू केले पाहिजे जनजागृतीचे. तीच काळाची खरीखुरी गरज आहे. प्रत्येक धर्मात वाईट चालीरिती रुढी परंपरा आणि प्रथा ठाण मांडून बसल्या आहेत त्या आधी बंद कराव्यात. वेळ पडली तर आपण तसे कायदे करू. धर्मग्रथांचा प्रचंड बडगा लोकांवर असतो. तो मोडून काढण्यासाठी आम्हाला तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे. लोकांना विश्वासात घेऊन अशी कामे करता येतील. त्यासाठी तुम्हाला जमिनीवर उतरून कामं करावी लागतील. आपल्य राज्य सर्वतोपरी सहकार्य तुम्हाला करेल. सगळी नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी खूश झाली. राजा कीती पुढारलेल्या विचारांचा आहे हे समजल्यावर त्यांचे तोळाभर मांस वाढले. मग त्यांनी पण लागलीच देवस्थानच्या अनागोंदी कारभारामुळे कशी भक्तांची लूट करतात, प्रार्थनास्थळे व्यवस्थापन समितीवाले कशी पैशासाठी हपापलेले आहेत वगैरे गोष्टी सांगितल्या. अशा संस्थांना पण चपराक बसली पाहिजे म्हणून राजाला गळ घातली. राजाने पण मान्य केले आणि सगळ्या प्रार्थना स्थळांची, देवस्थानांची, धर्मदाय संस्थांची माहिती प्रधानांकरवी मागवली. मनोमन जमलेल्या मंडळींना वाटले की आता खऱ्या अर्थाने आपलं राज्य आधुनिक होईल. नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळींनी निरोप घेतला आणि काही दिवसांनी मोठ्या संख्येने पुढारलेल्या विचारांच्या तरुणांना घेऊन परत भेटायला येऊ म्हणून आश्वासन दिले. 

राजा खूष झाला. प्रधानांकडे ह्या मंडळींना कसल्याही सोयीसुविधांची गरज पडल्यास तातडीने पुरवा म्हणून सांगतो. प्रधान चतुर असतो. तो म्हणतो तुमचे विचार नक्कीच पुढारलेले आहेत. तुमची इच्छाशक्ती पण प्रचंड आहे. पण सगळ्या धर्मातून पुढारलेल्या विचारांचा तरुण वर्ग तीन कलमी कार्यक्रमात सामील होणार नाही. राजा अचंबित होतो. आणि असं कसं शक्य आहे. नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी लोक नक्कीच सर्व धर्मातील तरुणांना प्रभावीत करतील आणि त्यांचा तू हुरूप बघितला नव्हतास काय? प्रधान म्हणतो पुढच्या वेळी ते किती मोठा तरुण वर्गासोबत तुम्हाला भेटायला येतात ते तुम्ही बघा आणि मग बोला. इकडे नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळींनी समविचारी लोकांची जमवाजमव सुरू केली. राजाने सांगितलेला किमान समान कार्यक्रम सांगितला. सुधारणावादी नवीन तरुण वर्गासोबत आपल्याला भेटायला जायचं आहे त्यासाठी तुम्हाला जमिनीवर उतरून लोकांना विश्वासात घेऊन प्रसाद करावा लागेल हे ठरले. काही काळ लोटला मग सगळे नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी मोठ्या संख्येने पुढारलेल्या विचारांच्या तरुणांना घेऊन परत एकदा राजाला भेटायला गेले. जमलेल्या गर्दीकडे पाहून राजाने प्रधानाकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला बघ बदल घडतोय. तू म्हणाला होतास की सगळ्या धर्मातून युवावर्ग सामील होणार नाही. बघ कीती तरुण वर्ग आला आहे. बदल घडवण्यासाठी. प्रधान म्हणतो की आता या गर्दीत जी नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी आहेत ती फक्त बहुसंख्यांक धर्मातील आहेत. राजाला विश्वास बसत नाही. मग तो जमलेल्या सगळ्या तरूणांना विचारतो तुमचा धर्म कोणता त्यानुसार आपण त्या त्या धर्माचे गट करू आणि पुढची कार्यवाही सुरू करू. दूर्दैव या राज्याचे असे होते की अशी सगळी मंडळी बहुसंख्यांक लोकांच्या धर्मातील होती. अल्पसंख्य धर्म असलेल्या लोकांमध्ये अशी पुढारलेली मंडळी नव्हतीच. प्रधान राजाला सांगतो की बहुसंख्यांक धर्मातील लोकांना धर्माला प्रश्न विचारायची सोय आहे. तो धर्म खऱ्या अर्थाने लिबरल आहे. त्या धर्मात धर्माचे अस्तित्व नाकारण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्या धर्मात कोणीही बळजबरी करत नाही धार्मिक प्रथा, परंपरा आणि रुढी पाळण्यासाठी. लहानपणापासून धार्मिक शिक्षणाची कसलीही सक्ती नसते. त्यामुळे धर्माविषयी प्रश्न विचारले जातात, बंडखोरी केली जाते. नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळींनी पण या बाबीला दुजोरा दिला. राजाने विचारले मग बहुसंख्य धर्म असलेल्या राज्यात एवढी धार्मिक कट्टरता आली कुठून? प्रधानाने सांगितले की अल्पसंख्याक धर्मातील लोकांना सेक्युलॅरिझम नावाखाली आजपर्यंत केवळ मतदानासाठी वापरले गेले. बहुसंख्य धर्मातील लोकांच्या सर्वांगीण विकासासोबत तुलना केली तर अल्पसंख्याक समाजातील खूप मोठा वर्ग मागासलेला आहे. अल्पसंख्य समाज हा धर्माला अंतर्बाह्य चिकटलेला आहे. या समाजात सुधारणावादी लोकांचा वाणवा आहे. हीच योग्य वेळ आहे आपण नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळींच्या साथीने बदल घडवून आणू. 

मग राजाने विवेकवादी, नास्तिक आणि अज्ञेयवादी लोकांना किमान समान कार्यक्रम दिला जनजागृतीचा. त्यातला सर्वात पहिला होता सगळ्या धर्मांची परखडपणे चिकित्सा करा. याआधी कोणी केली असेल तर ती लोकांसमोर आणा. तिचा प्रचार, प्रसार करा. दुसरा होता धार्मिक शिक्षण बंद करण्याचा आणि तिसरा होता सगळ्या धर्मग्रंथांची काटेकोरपणे समीक्षा, टिका आणि कालबाह्य बुरसटलेल्या विचारांना तिलांजली देण्याचा. तीन कलमी कार्यक्रम सर्व मंडळींनी रस्त्यावर उतरून लोकांना विश्वासात घेऊन राबवावा आणि सगळ्या धर्मातून पुढारलेल्या विचारांचा खूप मोठा तरुण वर्ग यात सामील व्हावा अशी राजाची अपेक्षा होती. राजा आता जमलेल्या गर्दीकडे पाहून सांगतो की तुम्ही मंडळींनी आपल्या राज्यातील प्रत्येक धर्मासाठी तीन कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रम तयार करा. सुरुवात अल्पसंख्याक समाजातील लोकांना त्यांच्या धर्मातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी तयार करा. त्यांच्या धर्मातील बुरसटलेल्या चालीरिती, रुढी, परंपरा, प्रथा आणि पायंडे कसे मागासलेले आहेत ते सांगा. त्यांच्यातील जे सुधारणा करण्यासाठी तयार आहेत त्यांना घेऊन मला भेटायला या. जमलेली सगळी मंडळी राज्यात परतली आणि प्रत्येक धर्मातील समविचारी लोकांची जमवाजमव करू लागली. राजाच्या तीन कलमी कार्यक्रमांतर्गत सगळ्या धर्माची चिकित्सा करण्याचे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. लहानपणापासून दिले जाणारे धार्मिक शिक्षण बंद करण्यासाठी आंदोलने होऊ लागली. सगळी धार्मिक प्रार्थना स्थळे आणि संस्था सरकारी नियंत्रणाखाली येण्यासाठी मोर्चे काढले जाऊ लागले. दूर्दैव हेच की बहुसंख्यांक लोकांना धर्माच्या बाबतीत सुधारणा व्हायला हवी असे वाटत होते. अल्पसंख्याक समाजातील लोकांनी तुम्ही आमच्या धर्मात ढवळाढवळ करू नका असा धमकीवजा संदेश दिला. काहींनी तर दिवसाढवळ्या विवेकवादी लोकांच्या गोळ्या घालून हत्या केल्या. बिचारे नास्तिक, विवेकवादी आणि अज्ञेयवादी मंडळी हवालदिल झाली.

© भूषण वर्धेकर
३० मे २०२३
पुणे

सोमवार, २२ मे, २०२३

तो एक विद्रोही

हा पण विद्रोही
तो पण विद्रोही
पण तो नंतरचा विद्रोही
हा मात्र मुळचा विद्रोही 
तो जातीवंत विद्रोही
हा नवा विद्रोही
तो जुना विद्रोही
हा पुरातन विद्रोही
तो नवजात विद्रोही
तो अस्सल विद्रोही
हा सलणारा विद्रोही
तो कडवट विद्रोही
हा तिखट विद्रोही
तो सर्वसमावेशक विद्रोही
हा झुंजार विद्रोही 
तो प्रस्थापित विद्रोही
हा विस्थापित विद्रोही
तो सरकारमान्य विद्रोही
हा समाजमान्य विद्रोही
तो कार्यकर्ता मग्न विद्रोही
हा मंत्रालय मग्न विद्रोही
तो अनुदान प्राप्त विद्रोही
हा विनाअनुदानित विद्रोही
तो कायमस्वरूपी विद्रोही
हा कालानुरूप विद्रोही 
तो कोकणस्थ विद्रोही
हा देशस्थ विद्रोही
तो ब्राह्मणांचा विद्रोही
हा ब्राह्मणद्वेषी विद्रोही
तो नुसताच बामण विद्रोही
खरा तोचि एक ब्राह्मणी व्यवस्थेचा विद्रोही
प्रस्थापितांशी संघर्ष करणारा विद्रोही 
वंचितांच्या न्याय, हक्कासाठी लढणारा विद्रोही

© भूषण वर्धेकर
२४ एप्रिल २०२३
पुणे

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

पुरस्कार

पुरस्कार - विडंबन (मूळ कविता केशवसुतांची - तुतारी)

एक पुरस्कार द्या मज आणुनि
मिरवीन मी जो मुक्तकंठाने
भडकूनी टाकिन सगळी माध्यमे
प्रदीर्घ ज्याच्या त्या चित्काराने
असा पुरस्कार द्या मजलागुनी

शासनाच्या परीटघडीचे
व्यवहार असे जे आजवरी
होतील ते मला सत्वरी
भाषणे देता त्या समयी
कोण पुरस्कार तो मज देईल?

इकोसिस्टिम त्यांची खंबीर
प्रशासन आंदण तुम्हाला
हळूच ढापती लीलया
महामेळावा जनसागराला
पुरस्काराचे समालोचन हवे तर?

सत्कार! ते बक्षिसे घेऊनी
सुंदर, सोज्ज्वळ मोठी शिल्पे
अलिकडले टीकाकार ते
ओरडती धरुनी आपटूनी बोटे
चित्कार करुद्या सर्वांना

निषेध जाऊ द्या वाऱ्यावरती
फेकुनी किंवा दुर्लक्ष करा
न कळता प्रतिमा उंचवा
हळूच! ठरवा पुढचे पुरस्कार
कंपूत चला डोकं बुडवूनी

सांप्रत काळ हा मिरवण्याचा
सोशल मेडिया आहे साथीला
गर्जूनी त्यावर फॉरवर्ड करा
बसल्या जागी व्हायरल करा
दिखाऊ पणा करु चला तर!

लाळ घुटमळूनी सैल संचार
गावोगावी हिंडून मैलभर
गत इतिहासाची मढी उकरुन
रक्तरंजित वसा उगाळून
पाहिजेत रे! पुरस्कारांची रीघ

जातपातधर्माचे भांडणं लावून
जनसेवेला आणिती अडथळे
एकामागोमाग सैरभैर मुद्दे
अनैतिकता पदसिद्ध भले
पुरस्कारार्थी होतसे इथे

©भूषण वर्धेकर
१९ एप्रिल २०२३

सोमवार, १० एप्रिल, २०२३

गावगोष्टी #१

एका गावात मोठी पाण्याची टाकी होती. टाकीचा उपयोग पाणी साठवण्यासाठी आणि लोकांना दैनंदिन जीवनात गरजेप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन ची सर्वोत्कृष्ट व्यवस्था उभी करण्यात आली होती. गावाची सगळी उपजिविका शेतीवरच होती. छोटेमोठे गावातले उद्योग होतेच. पण ते तुटपुंजे होते. तसं सांगितलं गेलं होतं ही व्यवस्था गावातील गोरगरीब जनतेसाठी उभी करण्यात आली आहे. शेतीसाठी, रोजच्या दैनंदिन वापरासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याची देखरेख आणि पाणीपुरवठा अंमलबजावणी साठी गावातील जनताच काही लोकांना निवडून देत होती. असे निवडून येणारे लोक मात्र पाणीपुरवठा व्यवस्थेचे मालक असल्यासारखे वागत होती. एकाच कुटुंबातील लोकांना पिढ्यानपिढ्या जनतेने निवडून दिल्यामुळे त्यांचा गोड गैरसमज झाला होता की ही व्यवस्था आमचीच. आम्हीच ही व्यवस्था राबवली, उभी केली. त्यांचा पुढचा काल्पनिक समाजमान्य गैरसमज असा होता की आम्हीच फक्त लोकांचे कल्याण केले आहे. आमच्यामुळेच गावातील गोरगरीब जनतेला पाणीपुरवठा झाला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी शेवटच्या घटकांपर्यंत कधीच पोचले नव्हते. ते कायमच दुर्लक्षित राहतील याची तजवीज चाणाक्ष निवडून येणाऱ्या लोकांनी वेळोवेळी केली होती. कालांतराने टाकी, पाइपलाइन कमकुवत होत गेली. वेळोवेळी गरजेनुसार डागडुजी केली खरी पण कायमस्वरूपी कशी व्यवस्था आपल्याकडेच राहील याची पण तजवीज केली होती. 

गावातील लोकसंख्या जशी वाढत गेली तसा पाण्याच्या मागणीचा बोजा वाढला. त्यात व्यवस्था पाहण्यासाठी नेमलेल्या लोकांचीच संस्थांनं तयार झाली त्यांची शेतीवाडी, उद्योगधंदे यालाच प्राधान्य देण्यात आले पाणीपुरवठ्याचे. जनतेला जातीपातीवरुन भडकावून सगळेच आपापल्या कुटुंबातील सदस्यांना भक्कम पणे निवडून आणत होते. जनतेला रोजच्या जगण्याचं रहाटगाडं ओढण्यासाठी मारामार होत होती. निवडून दिलेल्या लोकांना त्यामुळे असा समज झाला होता की आम्ही सर्वशक्तिमान, आम्ही खरे जनतेला चांगले सांभाळू, आम्ही आहोत म्हणून पाणीपुरवठा व्यवस्थेचे चालतोय दुसरे कोणीही आले की वाट लावणार व्यवस्थेची. मुळातच व्यवस्था जीर्ण झाली होती. पुरवठ्याचे मॉडेल जबरदस्त गुणकारी होते पण तीची अंमलबजावणी फिसकटलेली होती. लोकांनी आलटून पालटून वेगवेगळ्या लोकांना निवडून दिले तरी व्यवस्था दुरुस्ती झाली नाही. तीच व्यवस्था आहे तशीच राबवली. ती अजून जीर्ण झाली. नवीन लोकांना निवडून दिले तरीही पुर्वाश्रमींच्या लोकांशी असलेल्या घरोबा आणि ऋणानुबंधामुळे काहीही फरक पडत नव्हता. 

एकूणच सावळा गोंधळ चालू असताना आजूबाजूच्या गावातील चाणाक्षांनी ओळखले या गावातील लोकसंख्या आणि या गावातील जीर्ण झालेल्या व्यवस्थेचा आपल्याला मजबूत फायदा घेता येईल. पण या गावात येण्यासाठी कसलीही व्यवस्था नव्हती. मग निवडून आलेल्या लोकांना गुंडाळून तुमच्या गावात आम्ही उद्योग सुरू केल्यावर तुमची भरभराट होईल तुमचे सगळे प्रश्न मिटतील सांगून आपापल्या उद्योगाचे साम्राज्य उभे केले. सोबतीला गावातील उच्चभ्रू लोकांना हाताशी धरून पाणीपुरवठा आपल्याला फायदेशीर कसा ठरेल याची तजवीज केली. याला गोंडस नाव दिले *गावकीकरण*. 

या गावकीकरणामुळे ठराविक वर्गाचेच भले झाले. शेती व्यवसाय करण्याऱ्या लोकांचे जे हाल होते ते तसेच ठेवले गेले. माणूस अशक्त आणि कृश असेल तर त्याच्या दवापाण्याचा खर्च वाढवून, लांबवून स्वतःची आणि कुटुंबांची दुकानदारी दीर्घकाळ चालवता येते. हे सूत्र निवडून येणाऱ्या प्रत्येकाने वापरले. शेतकरी सशक्त झाला तर कित्येक लोकांची दुकानदारी बंद झाली असती. मग शेतकऱ्यांना शेती कशी कमी कारखानदारी कशी उच्च सांगितले. मग त्यांच्याच शेतजमिनी बळकावून गावकीकरण प्रचंड प्रमाणात वाढवले. विस्कटलेल्या गावकीकरणामुळे कैक प्रश्न निर्माण झाले. त्यात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी आणि पाइपलाइन यांच्या देखभालीसाठी येणारा खर्चही परवडत नसल्याने आजूबाजूच्या गावातून कर्जे उचलली गेली. ती कर्जे फेडण्यासाठी गावातील जनता राबराब राबायची. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर भरायची व्यवस्था राबवणाऱ्यांना शिव्या घालायची पुन्हा जातीपातीधर्मावरुन लोकांना निवडून द्यायची. असे चक्र कालानुक्रमे चालूच होते. जनतेला समजून चुकले की कोणालाही निवडून दिले तरी व्यवस्था आहे तशीच राहणार म्हणून जो तो आपापल्या परीने उस्फुर्त विरोध, निषेध आणि आंदोलने करीत असत. काही ठिकाणी फरक दिसत असे. कालांतराने पुन्हा पिळवणकीची तशीच व्यवस्था उभी राहिली. मग पुन्हा गावातील जनतेचा विरोध, निषेध आणि आंदोलने. शेवटी निवडून येणाऱ्या लोकांना वैताग आला काय ते सारखं सारखं जनतेचीच काम करायची. निषेध, विरोध आणि आंदोलने सहन करायची. काय पायपोस उरला नव्हता. इतकी दशकं त्यांना सहन केले आता आम्हाला करायला काय होतंय? आम्हाला आमच्या पद्धतीने कारभार पण करून देत नाहीत. गावद्रोही कुठले. 

सरतेशेवटी चाणाक्षांनी गावातील जनतेला ऑनलाईन समाजमाध्यमे फुकटात उपलब्ध करून दिली. आता निवडून येणाऱ्या लोकांना त्यांच्या मनासारखी व्यवस्था राबवता येते आणि गावातील निम्म्या जनतेला मेटाकुटीला येऊन जगण्यासाठी किमान गरजा भागविण्यासाठी दुनियादारीशी झगडावं लागतं. उरलेल्या जनतेला व्हर्च्युअल विरोध, निषेध आणि आंदोलने.

सगळं कसं मस्त चालू आहे.
© भूषण वर्धेकर
३ एप्रिल २०२३

काव्यमय वडापाव


काळ्याकुट्ट मातीत मुळाशी गाडलेला
टुम्म फुगीर रुंद बटाटा पसरलेला
घाऊक बाजाराच्या रचलेल्या पोत्यातून
भल्यामोठ्या पातेलात रटारटा शिजवून

ठेचून चेंदामेंदा झालेली लक्तरे
कांदा मिरची मसाल्याचे फवारे
गोलमटोल गोळे पीठात बुचकळून
ओतीव कढईतल्या तेलात उकळून

लालचुटुक चुराचटणी कणीदार
घोटलेल्या चिंचेचा अर्क पाणीदार
मऊ लुसलुशीत पावात कोंबून
चवीला मीठमिरची कांदा कापून

अटक मटक खवय्यांची चटक
तहानभूक भागवायचं मिथक
दंत ओष्ठ्य जीव्हा खाण्यात दंग 
उदरभरण नोहे अखंड अभंग

©भूषण वर्धेकर
२२ मार्च २०२२

रविवार, ९ एप्रिल, २०२३

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!


स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळेच लढले
कोणी दक्षिणेकडे कोणी पश्चिमेकडे लढले
उत्तरेतील, पुर्वेकडील कैक फासावर चढले
अनेकांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले

काही जीवानिशी मेले काही होरपळले
विस्कटलेल्या चळवळीत कैक बिथरले
बंड पुकारून कैक त्वेषाने निकराने लढले
राष्ट्रवादी लेखणीचे चित्कार सर्वदूर पोचवले गेले 

परदेशांतून जहालांनी हादरून सोडले
ब्रिटिशांना देशातलेच मवाळ बरे वाटू लागले
हुशारीने राजे राजवाडे आधीच ताब्यात घेतले
संस्थानिकांना हेरून करारबद्ध गुलाम केले

बेरकीपणे काही आंदोलने प्रॉक्टर्ड केली
लोकसहभागातून काही उस्फुर्त झाली
दुसऱ्या महायुद्धात वाताहत अंगलट आली
संभाव्य लष्करी उद्रेकामुळे पाचर बसली

ज्वलंत राष्ट्रवाद्यांच्या जरबेने गांगारुन गेले
मवाळांतील सत्तापिपासू हेरले गेले
ब्रिटिशांनी धर्माधिष्ठित राष्ट्रास बळ दिले
सर्वधर्मसमभावाचे कंबरडेच मोडले

सगळ्यात आधी ब्रिटीशांनी वापरले
नंतर कॉंग्रेसने सत्तेसाठी मिरवले
सर्वदूर सत्य अहिंसा ठसवले गेले
प्रत्यक्षात अहिंसा असत्य वठवले गेले

कित्येक दशकं गांधी बिचारे वापरले गेले
जाज्वल्य सावरकर अडगळीत फेकले गेले
सुटाबुटातून संविधान अंमलात आणले गेले
बाबासाहेब जातीच्या कोंडाळ्यात ढकलले गेले

पंचवार्षिक योजनेचे दिवास्वप्न दाखवले गेले
गोताळ्यातील समाजवादी धनिकांना रेटले गेले 
गावोगावचे जमीनदार सावकार एकवटले गेले
सेक्युलर म्हणवून संस्थानिकं भक्कम केले गेले

व्यक्तींकडून कुटुंबं उच्चभ्रू प्रस्थापित झाले 
विकासाच्या आडून गोरगरीब विस्थापित झाले
नेहरुंचे गुडी गुडी राष्ट्रनिर्भर स्वप्न मिरवले गेले
प्रत्यक्षात मात्र घराणेशाहीचे वारस लादले गेले

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!

२७ नोव्हेंबर २०२२
भुकूम, पुणे


मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

Her Voice Her Choice

Her Voice, Her Choice
Her decision, Her life

Her distorted life, Family problem
Her repentance, Curtural problem

Her broken mind, Career problem
Her love life, Society matter

Her success, Women empowerment
Her failures, Male dominance

Her excessive demands, Pampered parents problem
Her chaste emotions, Humiliated men problem

Her social duties, Our religious problem
Her freedom of expression, Progressive beliefs problem 

Her murder, Our problem
Her rape, Patriarchal problem

©Bhushan Vardhekar 
15 November 2022
Pune - 412115

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...