शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या 
या रे येड्यांनो, या रे या 
झिंगलेला हा आनंद घ्या 
हर्बल तंबाखूचा सुंगंध घ्या

मनात फुलावी कडक चांदण्या, नबाब रे बरळतो
महाराष्ट्राच्या भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो 
गंजेकसांना का हुंगुन रे दहशत हा भरतो 
हर्बलफुलाचा  महाविकास घ्या 
वसुलीआघाडीचा सुहास घ्या 

चार दिशांचे चौखूर सुंदर आघाडीचे पाळणी 
मंत्र्यांचे मुखकमल हे डुलत्या तुरुंगसदनी 
बरळा बोंबला फुरोगाम्याला जो जो ग गाउनी 
युगायुगाचा अंमल घ्या,
नवक्रांतीचा हा आरंभ घ्या 

© विडंबन- भूषण वर्धेकर

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

भारत माता की जय!!!

पुर्वीच्या काळी फक्त आणि फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी राष्ट्राभिमान वगैरेंची जाणीव होत असे. मग सार्वभौम देशाचा सजग नागरिक म्हणून झेंडावंदन करून आल्यानंतर देशासाठी आगळं वेगळं कर्तव्य पार पाडल्यासारखे वाटायचं. मात्र आता अशी राष्ट्रभक्ती दाखवण्याची वेळ दैनंदिन व्यवहारात आली आहे. नोटबंदीनंतर बँकेच्या रांगेत तासनतास उभे राहून वीररसयुक्त देशभक्ती नँशनल ड्युटी केल्यासारखी वाटत होती. पण सरकारने दयाळू लोकांना असा फिल रोजच्या जगण्यात दिला. हल्ली तर दरवेळी पेट्रोल भरताना क्रांतिकारी कार्य केल्याचा अभिमान वाटतो. वाणसामानाची यादी घेऊन दुकानात गेलो तर गरजेपुरता किरणा घेण्यातच सगळा पैसा खर्च होतो. गोळ्या बिस्किटे चिक्की टाईमपास खाऊ साठी पैसेच शिल्लक राहत नाहीत. पुन्हा एकदा राष्ट्रीय कर्तव्य निभावल्याचा फिल येतो. मग मनाशीच विचार येतात की सरकारनेच ठरवलेलं दिसतंय लोकांनी फक्त गरजेप्रमाणे सकस व पौष्टिक खावं म्हणून महागाई केलीय. ससटरफटर खाल्याने वजन वाढतं मग आजार वाढतील म्हणून जंकफूड नकोच नको. अहाहा काय अद्वितीय सरकार आहे. गरीबातील गरीब जनतेसाठी किती तो कळवळा. याआधीचे सरकार कमी महागाई वाढवंत होते. आताचे सरकार सगळंच जास्तीतजास्त करतंय. विकासकामे पण जास्त करतंय महागाई पण जास्त करतंय जेणेकरून लोकांनी फक्त गरजेपुरतं आणि आवश्यक तेवढंच खाल्ले पाहिजे. म्हणूनच महागाई वाढत चाललीय. असं समजून अजून मोठ्ठं देशभक्तीपर कार्य करायचा फिल घेऊन घरी यायचे आणि काटकसरीने जगायचे. त्याशिवाय कसं कळणार आताच्या पिढीला आपल्या पूर्वजांनी कीती आणि काय हालापेष्टा भोगल्यात. खस्ता खाल्ल्यात. असा हा मास्टर स्ट्रोक.

आमच्या सौभाग्यवती लग्न झाल्यानंतर नवीन घरी आल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ गरम दुधाचा अभिषेक गँसला घालत असे. त्यामुळे एक लीटर घरासाठी एक लिटर अभिषेकासाठी दूध घेत होतो. आता मात्र पैसा तेवढाच खर्च होतोय दूध मात्र एकच लिटर येतय हो. तसं यामुळे सौभाग्यवतींचे लक्ष केंद्रित होऊ लागलेय गेल्या काही वर्षापासून. पुर्वी फक्त गँस रोज धुतला जात होता. आता दुधाचा अभिषेक होत नसल्याने महिनोंमहिने साफसफाई होत नाही. तसंही घरची मंडळी महागाई वाढल्यामुळे अन्नपदार्थ अगदी कट्टानकट्टी करते. अजिबात नासाडी होत नाही. पॉकेटमनी वाढवला तरीही घरचे दिवटा आणि दिवटी गपगुमान घरीच सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण करतात बरेच वेळा. हौसमौज पॉकेटमनी मधून भागवा असा हिने निर्वाणीचा आदेश दिल्यानंतर मुलांच्या खर्चिक स्वभावात अमुलाग्र बदल झालाय.  म्हणजे अगदी आटपाट नगरातील गरीब ब्राह्मणी कुटुंबातील गोष्टींमधल्या गृहकृतदक्ष पात्रांसारखी घरची मंडळी भासू लागली. अनंत उपकार आहेत हो सरकारचे. घरोघरी अगदी वैदिक काळातील संस्कृती अवतारावी असाच चंग बांधलेला दिसतोय विद्यमान सरकारने. मेरा भारत बदल रहा है। ये नया इंडिया है। असं उगाचंच नाही म्हणत?

एवढी महागाई वाढलीय तरीसुद्धा जनता बिचारी गपचूप सहन करतेय. म्हणजे आकस्मिक युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर लोकांना अशा प्रचंड दबावाखाली जगण्याची रंगीत तालीमच चाललीय जणू. पहा किती ते आमचे सरकार दुरदृष्टी ठेऊन कारभार करतंय. कडक हेडमास्तर जसे वांड पोरांना वठणीवर आणण्यासाठी यत्न यत्न पछाडलेले असतात. कडक शिस्तीचे डोस अधूनमधून देत असतात त्यामुळे विद्यार्थी दशेतच प्रबळ राष्ट्रप्रेमाची भावना बळावते तसाच काहीसा कयास चालू आहे वाटते. म्हणून उगाचंच 'व्हॉईस रेझ' करणाऱ्यांना टवाळांना लागलीच जेरबंद केले जातेय. स्वातंत्र्यानंतर असं कधीही घडलं नव्हते. म्हणजे हे आधीच घडायला हवे होते. तसे झाले असते तर आज आमच्यावर ही वेळ आलीच नसती. सारांश काय याहून भयावह वेळ पुढच्या पिढीवर येऊन भावी पिढी होरपळून जाऊ नये म्हणून आम्हाला मुस्कटदाबी वगैरे काय म्हणतात ते सहन करावे लागतेय. मग आम्ही नाही का लहानपणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या आधीच्या कैक पिढीने सोसले त्यामुळे त्यांचा आम्हाला दुराभिमान आहे. तसाच आमच्या पिढीचा दैदिप्य अभिमान भावी पिढीला होण्यासाठी विद्यमान सरकारच कावेबाज डाव खेळत आहे. ये है असली मास्टर स्ट्रोक।

बऱ्याचशा सरकारी व्यवहारात ऑनलाइन संस्कृती आल्यामुळे मधल्या साखळीला खिसा गरम करण्यासाठी द्यावा लागणारा पैसा वाचला म्हणून खूष होतो. वाटलं सेव्हींग करू एफ.डी. काढू. पण मनकवडे सरकार ऐकतंय सगळं बहुतेक? बँका बुडून पैसा अडकू नये म्हणून वाचलेला पैसा महागाई मार्फतच सरकारने वापरायचा ठरवलाय. ह्याला म्हणतात डायरेक्ट पॉकेटवरचा सर्जिकल स्ट्राईक. भारीच. काय ती अद्भूत विचाररम्य स्ट्रँटेजी. वाचलेल्या पैशात लोकांनी व्यसने करू नये म्हणून पण महागाई वाढत असावी. ज्यांना व्यसनांशिवाय रहावत नाही त्यांना वाढीव दरानं खरेदी करावी लागते म्हणजे मिळणारा अतिरिक्त पैसा पण सरकारी कामांसाठी वापरणार. उगाच अतिरिक्त पैशांसाठी गरीबांना कर भरावा लागू नये म्हणून सरकारची छुपी रणनीती आहे ही. 

सात वर्षापूर्वी पगार बेताचाच होता. महिन्याच्या पगारात सगळे कौटुंबिक खर्च भागवून एखादा ग्रँम सोनं घ्यायला नाकी नऊ येत असत. आता म्हटलं पगार चांगला वाढलाय तरी तीच परिस्थिती सगळा खर्च होऊन एखादा ग्रँम सोन्याच्या खरेदीसाठी भंबेरी उडते. म्हणजेच सरकारने लोकांनी पैसा वाढल्यामुळे श्रीमंतांची बरोबरी करू नये व पैशाच्या मुजोर-मस्तीची हवा डोक्यात जाऊ नये म्हणून किती काळजी घ्यावी गोरगरीब जनतेची? सोबत कर्जे स्वस्त करून, पगारवाढ करून खरेदी करण्याची क्षमता वाढवली. कर्जे सहज मिळू लागली बुडणाऱ्या बँका, डबघाईला आलेल्या वित्तसंस्थांना चालना देण्यासाठी सरकारने असे केले असावे. म्हणून पुन्हा आदिम राष्ट्रकर्तव्य पार पाडण्यासाठी कर्जे काढून सरकारला प्रगतीसाठी हातभार लावलाच पाहिजे ना! असं रोजच्या जगण्यात राष्ट्राभिमानामुळे उर भरून येण्याची वारंवारता वाढली. पूर्वीच्या काळी वर्षातून दोन दिवस असायचे. हल्ली रोज रोज देशसेवा करण्याचे सौभाग्य मिळतंय. जन-आंदोलनात उभे ठाकलेले दीन-सैनिक होण्याचे अहोभाग्य लाभत नाही नशीबवान लोकांना सुद्धा. खरंखुरं राष्ट्रप्रेम ते हेच बहुधा. भारत माता की जय!!!

- भूषण वर्धेकर , पुणे

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी...


एकदा एका जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन केले होते. जाहिरात एका घरगुती वापरणाऱ्या वस्तुची करायची होती त्यासाठी जो चांगल्या जाहिरातीची संकल्पना मांडेल त्याला बक्षिस देऊन तीची चित्रीकरणासाठी निवड होणार होती. ठरल्याप्रमाणे पुण्या मुंबईतील जाहिरात कंपन्यांनी झुंबड केली स्पर्धेत. कारण सर्वाधिक इंटेलिजंट कंटेट पुण्या मुंबईतूनच तयार होतो असा त्यांचा फुकाचा अतिआत्मविश्वास आहे. मग इतर भागातील जाहिरात कंपनीच्या प्रतिनिधींना तुच्छतेने वागवणे वगैरे बाष्कळ प्रकार तिथे झाले. शंंभरहून अधिक संकल्पनांची एन्ट्री झाली. सगळ्यांनी आपापल्या बुद्धीमत्तेचा पिट्टा पाडून एकेक संकल्पना मांडली होती. जेव्हा परिक्षकांकडे सगळ्या कल्पना गेल्या तेव्हा प्रत्येक संकल्पनेवर चर्चा, छाननी, वाद झाले. मग किमान समान विषय अधिकृतरीत्या ठरवले गेले.


त्यापैकी एक होता भारतीय कुटुंबातील एकजूट दाखवून जाहिरातीत घरगुती वापराच्या वस्तूचे प्रमोशन करणे. दुसरा म्हणजे नेहमीचाच महिलांचे सबलीकरण आणि ती घरगुती वस्तू वापरून मिळणारे तिला तिचे हक्काचे स्वातंत्र्य. तिसरा विषय घरगुती वस्तू वापरल्याने देशातील सर्व गोरगरिबांना होणारा फायदा दाखवणे. असे विषय ठरले आणि तिचे उपयोगात आणण्यासाठीच्या संकल्पनांची चिरफाड केली गेली. एका संकल्पनेत एका कुटुंबातील गृहिणीचा सगळा वेळ दिवसभर कामात निघून जातो म्हणून घरगुती वस्तू वापरल्याने तिचा निम्मा वेळ वाचेल आणि मुलांच्या जडणघडणीत जास्त लक्ष देता येईल असे मांडले होते. त्यावर एका परिक्षक महिलेचा लागलीच आक्षेप आला. त्या स्वतः स्त्रीमुक्तीच्या समर्थक होत्या. तशा त्या ते दर्शवण्यासाठी स्लीव्हलेस कॉटनचा कुर्ता आणि ब्रँडेड जीन्स परिधान करूनच सार्वजनिक जीवनात वावरत असत. सोबत चेहऱ्याला साजेशा बॉबकट व कुर्त्याला मँचिंग अशी साधी ओढणी असा पेहराव नेहमीचाच. आक्षेपाचे मूळ कारण जाहिराती मध्ये महिला गृहिणी दाखवून स्त्रीला कुटुंबात जखडून ठेवण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहात असे होते. त्यांचा तात्विक संताप झाला. तसही त्यांची दिवसाची सुरूवातच अशा तात्त्विक संतापाने होते त्यामुळे त्या बऱ्यापैकी रुळल्या होत्या अशा प्रसंगांना तोंड देताना. काय काय असतात प्रतिपक्षाचे आक्षेप, आरोप आणि युक्तिवाद वगैरेंची त्यांना पुरेपूर जाणीव होती. त्यांच्या मते आजवर सगळ्या माध्यामातून महिला ही शोषित असतात हे भासवले गेले. तिला तिचे हक्क, अधिकार वगैरेंसाठी तमाम लोकांची आणि समजाची पुरुषसत्ताक संस्कृतीच जबाबदार आहे. अशा अनेक बुरसटलेल्या परंपरा, रुढी, प्रथा वगैरेंवर त्यांना फार चीड येत असे. त्यांचा आक्षेप आल्यानंतर परिक्षक मंडळींमध्ये तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक होते . त्यांनी पण बाईंना दुजोरा दिला. 


एक परिक्षक मात्र या जाहिरात संकल्पनेला समर्थन देत होते. त्यांच्या मते भारतात बऱ्याचशा कुटुंबातील महिला ह्याच रिमोटकंट्रोल असतात खरेदीच्या बाबतीत. घर चालवण्यासाठी काय नको काय पाहिजे हे ठरवण्यासाठी महिलांचा हातखंडा असतो. अशा महिलांचा चलाखपणे जाहिरातीत वापर करून कंपन्यांना भरघोस फायदा झाल्याचे अनेक स्टँटिस्टिकल डेटा प्रस्तुत करून प्रेझेंटेशन दाखवले. ते एका मातब्बर जाहिरात कंपनीत कंटेट क्रीएटर म्हणून खूप वर्षे काम करत होते. यावर स्त्रीमुक्ती वादी बाईंनी लागलीच त्यांच्या मतावर त्वेषाने आक्षेप घेतला. 'महिलांचा चलाखपणे जाहिरातीत वापर करून' म्हणजे काय? महिला वस्तू नाहीत. वी आर ह्यूमन टू. वगैरे तावातावाने बडबडल्या. यावर लगेच तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक प्रतिक्रिया वगैरे देऊ लागले. अशाच चर्चा, वादविवाद आणि आक्षेप झाल्यानंतर एक नवीन संकल्पना समोर आली. ज्या वस्तूसाठी जाहिरात करायची आहे तिला आधुनिक आणि जुना नेहमीचाच ग्राहकवर्ग भूलला पाहिजे. त्यासाठी एका महाशयांनी मुद्दा मांडला.  'नऊवारी साडी नेसलेली स्लीवलेस घालणारी बाई' आपण मॉडेल म्हणून जाहिरातीत दाखवू. म्हणजे ऑफबीट फँशन स्टाईल विथ क्लासिक टच वगैरे मसाला होईल. तशी ऑड ड्रेसकोड वाटेल अशीच संकल्पना होती आणि ती मांडणारे टेक्स्टाईल आणि फँशन ब्रँडिंग एक्सपर्ट होते. आतापर्यंत शांत बसून ऐकूण घेणारे व सहभागी असणारे एक तथाकथित संस्कृती रक्षक म्हणवून घेणारे थोडेसे उचकले. अशी नऊवारी साडी नेसून स्लीवलेस वगैरे मॉडेल नको म्हणून बोलू लागले. समाजात चांगला संदेश वगैरे जाणार नाही असा तर्कट देऊ लागले. मुख्य आक्षेप नऊवारी साडी व स्लीवलेस बद्दल होता. त्यांचे मत नऊवारी साडी एका जुन्या लिजंडरी पिढीचे प्रतिक आहे. त्याच्याशी छेडछाड करू नये. स्लीवलेस घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रीयांना समाजात फारच वेगळ्या पद्धतीने पाहिले जाते वगैरे वगैरे अजब तर्कट मांडले गेले. 


एकदोघांकडून समर्थन मिळतेय आणि आपल्या मताला अनुकूलता दिसल्यावर त्यांच्यातील अस्सल संस्कृती रक्षक जागा झाला आणि स्त्रीदाक्षिण्य, स्त्रीयांच्या तोकड्या कपड्यामुळे होणारे पतन वगैरे रटाळ विषय पटलावर येऊ लागले. यावर स्त्रीमुक्तीचा अंगिकार करणाऱ्या बाईंना हुरूप आला. त्यांनी लागलीच प्रतिप्रश्न केला. स्त्रीयांनी काय पद्धतीचा पहेराव करावा आपण सांगणारे आणि ठरवणारे कोण? आजची स्त्री पुढारलेली आहे तिला प्रोजेक्ट करण्यासाठी अशी फँशनमध्ये मोडतोड केली तर बिघडले कुठे? पुरुषसत्ताक समाजातील स्त्रीला सहन करावे लागलेले छळ वगैरेंचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडल्यानंतर तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक लागलीच हिरिरीने मुद्दे मांडू लागले. परत वाद, प्रतिवाद, चर्चा वगैरे अखंडपणे सुरू झाल्या. येनकेनप्रकारेण सहिष्णुता असहिष्णुता वगैरे सोपस्कर आलेच सरतेशेवटी. असे सगळे वायफळ वगैरे बोलाचाली चालू असताना एकदम संस्कृती रक्षक वाले काका ओरडून म्हणाले, असे असेल तर 'हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी' मॉडेल म्हणून दाखवा. मग बघू कोण काय करेल.  कोण सहिष्णू असहिष्णू वगैरे ठरेल. त्यांच्या बोलण्यात एक बेरकी सूर होता. आता मात्र चर्चेचा सूर टिपेला पोचला होता. हिजाब, बिकीनी वगैरे विषय आल्यावर तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक नाके मुरडायला लागले. उगाचंच द्वेषपूर्ण पद्धतीने मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील वगैरे आक्षेप घेतले गेले. यावर स्त्रीमुक्तीचा गजर करणाऱ्या बाई मात्र मूग गिळून गप्प बसल्या होत्या. त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक्रमात मुस्लिम स्त्रीया वर्ज्य होत्या बहुतेक. आता संस्कृती रक्षक मंडळींना फारच चेव आला. पुरोगाम्यांचे आतापर्यंत मांडलेले मुद्दे घेऊन ही मंडळी त्यांना डिवचू लागली. मग नेहमीप्रमाणे तथाकथित पुरोगाम्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक मोघम सोयीस्करपणे बोलू लागले. रटाळ वादविवाद काही काळ चालूच होते. एकेका संकल्पनांची चिरफाड वगैरे करत लोकांचा उत्साह कमी होत गेला.


संकल्पनांची छाननी झाली होती मात्र दोनच मुद्दे ऐरणीवर होते. नऊवारी साडी स्लीवलेस घालणारी बाई की हिजाब आणि बिकीनी परिधान करणारी मॉडेल यावर सगळं घोडं अडलं. संभाव्य धोके लक्षात घेता आणि सणासुदीचे दिवसांत उगाचंच सोशल मेडियावर निगेटिव्ह ट्रोलिंग वगैरे नको म्हणून जाहिरात क्षेत्रातील आणि विपणन विभागाचे प्रमुख तज्ञांचा सल्ला घ्यावा असा ठराव एकमताने पास झाला. शेवटी तज्ञांच्या सल्ल्याने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा संकल्पना रद्दबातल ठरवल्या आणि पुन्हा एकदा त्याच जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन नव्या नियमावली नुसार करण्याचे ठरले.

- भूषण वर्धेकर, पुणे.

मंगळवार, १८ मे, २०२१

युद्ध नावडे सर्वांना

युद्ध नावडे सर्वांना...

© भूषण वर्धेकर
मे २०२१


आजकाल आंतरराष्ट्रीय युद्धाच्या घटनांचा भारतातील समाज माध्यमांवर सुळसुळाट जोरात चालू आहे. मग अशा वेळी मानवतावादी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांच्या फॉरवर्डेड लेख, स्फुटं, ऐतिहासिक नोंदी व्हायरल होत आहेत. तशाच गोष्टी कट्ट विचारसरणीतील मंडळीपण बिनधोक पणे पसरवतात. पीडीत कोण आवडता की नावडता हाच कळीचा मुद्दा आहे जणू! अशी युद्धे, जमीन बळकावून हस्तगत करणे हे परंपरागत चालत आलेल्या ऐतिहासिक घोडचूका आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये युद्धाचा आलेख बघितला तर पैसा, जमीन आणि सत्ता मिळवण्यासाठीच युद्धजन्य परिस्थिती तयार केली जाते. एखाद्याला गुलाम करणे ही जशी मानवी प्रवृत्ती आहे तसेच कमी शक्तीशाली देशाला किंवा समुहाला येनकेनप्रकारेण सोयी सवलती देऊन प्रसंगी धमकीवजा इशारे देवून काबूत ठेवले जाते. विस्तारवादी धोरणात हाच दुर्गुण आहे. वॉर मिनिस्टर किंवा डिफेन्स मिनिस्टर प्रत्येक देशात असतोच असतो. संरक्षण ही सामाजिक मुलभूत गरज आहे. मग ते संरक्षण देशाचे असो वा समुहाचे. मग अशावेळी जो आपला तारणहार असेल त्याचा उदोउदो ठरलेलाच. त्याच्या चुका, घोडचूका किंवा अनंत अपराध सगळे पोटात घेऊन समर्थन करणे हेच एकसुरी ठरलेले असते. युद्धे वाईटच कारण वित्तहानी आणि जीवितहानी ही सर्वांचीच होत असते. बलाढ्य पक्षाची कमी कमकुवत पक्षाची जास्त हाच तो काय फरक. 

युद्धाचा भडका उडाल्यावर रातोरात जागी झालेली मंडळी ही युद्ध होण्यासाठी जबाबदार गोष्टींवर काहीही बोलत नाहीत. कारण आंतरराष्ट्रीय अर्थचक्रावर युद्धांचा प्रचंड प्रभाव असतो. भीती ही एकमेव गोष्ट ज्याचा व्यापारासाठी सर्रासपणे उपयोग होतो. वैश्विक इतिहासात धर्मासाठी कत्तली ह्या वर्षानुवर्षे होत आलेल्या आहेत. पीडित धर्म वा देश कोणता यावर ज्याने त्याने निषेधाची किंवा पाठिंब्याची दुकाने थाटलेली आहेत. कोणताही देश शास्त्र आणि शस्त्र या दोहोंचा वापर करतोच. कारभार चालवण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी. मग त्या त्या विचारसरणीचे पाईक गुणवंत हौशे नवशे आणि गवशे पराकोटीची मंद बौद्धिकं उथळ माथ्याने मिरवत असतात. 

मानवतावाद कसा चांगला हे पाठ्यपुस्तकी छान वाटते. बिइंग प्रँक्टीकल अँक्शन ला रिअँक्शन येतेच. प्रतिसाद द्यावा की प्रतिकार करावा हे त्यावेळची दाहक परिस्थिती ठरवते. एकाएकी जर हल्ले झाले तर कडी निंदा तीखी निंदा वगैरे करणारे पण असतात आणि जशास तसे प्रत्युत्तरादाखल प्रतिहल्ला करणारे पण असतात. एक नागरिक म्हणून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जो पाऊल टाकतो त्याला समर्थन दिलेच जाते. उदा. भारतात आतंकवादी हल्ले जेव्हा झाले तेव्हा मोदींच्या नेतृत्वावर टिका करणारे, नावे ठेवणारे लोकच एअर स्ट्राईक वगैरे झाला की तो सैन्याने केला मोदिंचे काय कौतुक वगैरे बोलू लागले. काही बहाद्दर नेत्यांनी पुरावे द्या म्हणून मागणी केली. काही बिनडोक लोकांनी तर आतंकवादी हल्ला हा मोदींनीच घडवून आणला निवडणुकीत जिंकण्यासाठी असा जावईशोध लावला. अशा घटना जर होत असतील तर त्या पथ्यावर कशा पडतील याची खबरदारी बरोबर घेतली गेली. भक्तलोक मुळात मर्कट. त्यांना अशा पद्धतीने डबल स्टँडर्ड लोकांनी आयतं कोलीतच दिले. मर्कट असल्याने त्यांनी त्यांच्या लीला लीलया पार पाडल्या ध्रुवीकरणासाठी. 

मानवतावादी संघटनेच्या बाबतीत पण गढूळ समज बऱ्यापैकी फोफावलाय. सैनिक मरतात तेव्हा मानवतावादी आवाज उठवत नाहीत मात्र हल्ल्यात अतिरेकी मरतात तेव्हा मानवतावादी खडबडून जागे होतात. मुळात अतिरेकी का तयार होतात, कोण तयार करतात यावर मानवतावादी कधीच काथ्याकुट करत नाहीत. याचाच वर्चस्वतावादी लोक पुरेपूर फायदा उचलतात. युद्धात नुकसान हे होतेच पण त्यात आर्थिकदृष्ट्या बरेच हितसंबंध लपलेले असतात. त्या हितसंबंधांना कोणीही आवाहन देत नाही. विचारवंत वगैरे एक दोन आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांवर पुस्तके लिहून कोण कसा चुकतो किंवा अमुकच कसा बरोबर असे निष्कर्ष काढून चमकोगिरी करतात. बऱ्याचशा वेळेला अशा लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तर्क लावलेले आढळतात. असे विसंगत तर्क आजूबाजूच्या टपलेल्या टोळक्यांना आवडतात फे फे उडवण्यासाठी. जागतिक सत्य हेच आहे की जो बलाढ्य असतो तो इतरांनी शांतता पाळा म्हणून आग्रह धरतो. मात्र स्वतःच्या बाबतीत हिंसेचे, हल्ल्यांचे समर्थन करतो. सध्याच्या जागतिक परिस्थितीत चीन आणि अमेरिका ही दोन बलशाली राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. त्यांनी केलेल्या अमानवी कृत्यांवर कोणीही चकार शब्द काढणार नाही. निषेधार्थ एकही आवई उठवणार नाही. मात्र इतर राष्ट्रीय घटनांमध्ये स्वतःची टिमकी वाजवणार. अशा लोकांच्या तर्कांचा हेतू ध्रुवीकरणासाठी जोरदारपणे वापरला जातो.

जगाच्या इतिहासात नरसंहार खूप झालेले आढळतील. भारतभूमीवर देखील बरेच नृशंस नरसंहार केले गेले. मुळात आपल्या देशाचा बराचसा इतिहास बायस्ड पद्धतीने लिहिला गेला. एकतर प्रतिमामंडन करण्यासाठी किंवा प्रतिमाभंजन करण्यासाठी. एखाद्या राष्ट्राची, राज्याची किंवा नेतृत्वाची स्तुती कवने गाणारे, खुशमस्कऱ्या करणारे, गौरवग्रंथ लिहिणारे, चरित्रांचे शब्दांकन करणारे आणि आताचे बायोपिक काढून छद्मप्रतिमा उभी करणारे समुह पुर्वीपण होते आजही आहेत भविष्यातही असतील. अशी मंडळी मोठ्या गटाला आवडेल असा ऐवज तयार करतात किंवा उपलब्धतेनुसार गोळा करतात. अस्सल निष्पक्षपणे वर्णन केले जाणारे साहित्य दुर्मिळच. त्यामुळे हिंसेचे समर्थन करणारे जिकडेतिकडे सापडतात.

पृथ्वीगोलार्धाचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य असे भाग जर केले तर एक भाग धर्माधिष्ठित तर दुसरा विज्ञानाधारित मुल्यांना कवटाळलेला दिसतो. सगळे धर्म जरी शांतीचा संदेश वगैरे देतो म्हणत असतील तरीही प्रत्येक धर्माचा काहीना काही हिंसक इतिहास आहेच आहे. जेवढा धर्म एकजूटीने वाढेल तेवढा कट्टर होत जातो. अल्पसंख्याक असू तेव्हा विशेषाधिकार बहुसंख्यांक होऊ तेव्हा सर्वाधिकार समान अधिकार वगैरे अंधश्रद्धा असतात. हे प्रत्येकांना लागू पडते. हिंदूंच्या बाबतीत थोडेफार वावगे आहे. एकतर विस्कटलेल्या जातपातपंथांत विभागलेला धर्म म्हणजे हिंदू. जगभरात ज्या काही चाळीसच्यावर सिव्हिलायझेशन नोंदणीकृत आहेत त्यापैकी टिकलेली सिव्हिलायझेशन म्हणजे हिंदू. सिंधू नदीशी निगडीत, सप्तसिंधूशी नाळ असलेली भारतीय उपखंडात पसरलेली, विखुरलेली आणि बहरलेली समृद्ध जमात म्हणजे हिंदू. हिंदुंनी इतर धर्मीयांवर आक्रमणे करून त्यांना गुलाम केले किंवा त्यांचा देशातील जागा बळकावली किंवा मोठ्या प्रमाणात धर्मांतर करायला भाग पाडले असा उल्लेख कुठे आजवर सापडला नाही. जाणकारांनी यावर कुठे वाचले, अभ्यासले असेल तर जरूर सांगावे. इतर धर्मीयांच्या इतिहासात डोकावले तर काहींचा इतिहास हा रक्तरंजित आहे तर काहींचा शोषित, वंचित आहे. धर्माच्या आधारवर हिंसा कोणी कधी आणि किती वेळा केलीय हे वाचणाऱ्या सगळ्यांना माहिती असते. फक्त जगजाहीर बोलता येत नाही. त्यातही काही दशकांपासून इतर धर्मीयांच्या कट्टर भूमिकेला जशासतसे उत्तर देण्यासाठी कट्टर हिंदूत्ववादी जहाल गट उदयास आले आहेत. मात्र ते सकल हिंदूंचे कधीही प्रतिनिधीत्व करू शकत नाहीत.

मूळ मुद्दा हाच की भारतात अशी आय स्टँड विथ समथिंग मंडळी आणि त्यांना पाठिंबा देणारे विचारवंत आपल्या मायभूमीत ज्या गोष्टी झाल्या होत्या घडत आहेत त्यावर सोयीनुसार भुमिका घेतात. अशा ढोंगीपणाला सामान्य जनता कंटाळते. सामान्य जनतेला हिंसा ही हिंसाच दिसते मरणारा माणूसच दिसतो. पण हल्ली भारतात मरणारा कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे पाहून निषेध वगैरे नोंदवला जातो.  मुळात स्वसंरक्षणासाठी जर हत्यार उचलले तर तर जो बलवान असतो तोच जिंकतो. हा जगत्मान्य इतिहास आहे. इतिहासात जो ताकदवान जो सक्षम तोच टिकतो अन् लक्षात ठेवला जातो. विजय पराजय हे नंतरचे पैलू आहेत.

देशावर हल्ला झाला तर प्रतिहल्ला होणारच. २०२१ चालूय. अहिंसेची शिकवण फक्त एकतर्फी असून चालत नाही. व्यक्तीगत आयुष्यात पण अहिंसा कोणीही पाळत नाही मात्र दुसऱ्याला अहिंसेची शिकवण द्यायला पुढे सरसावतात विचारवंत वगैरे मंडळी. मुद्दा हाच आहे की पँलेस्टाईन मधल्या मुस्लिमांवर हल्ले होतात तेव्हा जेवढा राग, निषेध किंवा प्रखर टिका हल्ले करणाऱ्यांवर होते तशी टिका चीनमधील ऊईगीर मुस्लिम समाजातील लोकांवर हल्ले करणाऱ्यांवर होत नाही. इकडचा मुस्लिम तिकडचा मुस्लिम असे काय वेगवेगळे असतात का?  अशावेळी आपल्याकडे वावरणाऱ्या पुरोगामी, विचारवंत आणि मानवतावादी लोकांच्या ढोंगीपणाची किव येते. पीडीतांचा धर्म, देश पाहून गळे काढणारे वाढत चाललेत सध्या. अशा लोकांमुळे कट्टर विचारसरणीतील लोक चेकाळतात आणि धष्टपुष्ट आयुधांचा वापर करून ध्रुवीकरण करतात. हल्ली हे भारतात सर्रासपणे होत आहे.

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

भारतातील आंदोलने, चळवळी आणि संप हायजॅक झाली आहेत काय?

भारतातील आंदोलने, चळवळी आणि संप हायजॅक झाली आहेत काय?


सरसकटपणे सगळीच आंदोलने ही हायजॅक करण्यासाठीच केली जातात किंवा काही आंदोलने केल्यानंतर हायजॅक होतात. भारतात तर आंदोलने, संप आणि चळवळी वगैरेंचा विचका झालेला आहे. कारण ज्याच्या त्याच्या राजकीय, सामाजिक गरजेनुसार आंदोलने, चळवळी आणि संप वापरले गेले. शोषितांच्या संघटना तर राखीव नेत्यांच्या राखीव प्रश्नांच्या मुखवट्या आडून पडीक नेतृत्व पुनर्वसन करण्यासाठीच वापरल्या गेल्या. एकेकाळी लोकांच्या रोजच्या जगण्यांच्या प्रश्नांना भिडून प्रशासनाला नडून आंदोलने यशस्वीपणे केली जात होती. यात कधीकाळचे अस्सल मातीशी निगडीत कम्युनिस्टांचा दबदबा होता. त्यांच्याकडे एकेकाळी खरीखुरी इहवादी विचारसरणी होती जी सर्व समस्यांवर साधकबाधक चर्चा विमर्श वगैरे करून बौद्धिक झाडून उपाययोजना करीत होती. लढत होती. मात्र भारतातील अस्ताव्यस्त पसरलेल्या भूखंडात कानाकोपऱ्यात रुजली पण फोफावली कधीही नाहीत. कापराप्रमाणे संप्लवन होतेय खरीखुरी कम्युनिस्ट विचारसरणी. भारतातील सर्वात मोठी चळवळ म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची. जिच्यातून वेगवेगळ्या संघटना उदयास आल्या. पण  टिकली, टिकवली गेली आणि फोफावली ती इंडियन नँशनल कॉंग्रेस. काही लोकांच्या मते १८५७ सारखा पुन्हा उठाव होऊ नये म्हणून एलन ह्यूम नामक इंग्रज अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन राजकीय सामाजिक घडामोडींवर वचक राहण्यासाठी कॉंग्रेसची स्थापना केली. तर काहींनी लोकांच्या सहभागातून आंदोलनातून कॉंग्रेस उभी झाली नंतर तळपली वगैरे कवतुके गायली. तसंही पुरोगाम्यांची आवडती थाप म्हणजे गांधीजींनी कॉंग्रेस तळागाळापर्यंत पोचवली टिळकांनंतर. अर्थातच आपल्याकडे ज्या त्या वैचारिक चळवळींनी त्यांच्या चष्म्यातून पाहून इतिहास रचलाय. नंतर तीचे भांडवल करून वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न केला. काहींना राजाश्रय होता तर काहींना लोकाश्रय. 


आंदोलनातून उभ्या राहिलेल्या संघटनांची कशा पद्धतीने वाताहत होते याचे समर्पक जीवंत उदाहरण म्हणजे घराणेशाहीत अडकलेला कॉंग्रेस पक्ष. भारतात होणारे संप वरकरणी कामगारांना सोयीसुविधा मिळाव्यात वा गरजेच्या मागण्यांसाठी केले जातात. नंतर संघटनेच्या नेत्यांना वापरून ज्याचे त्याचे मनसुबे पुर्ण केले जातात. यात प्रामुख्याने भरडला जातो तो गरीब मजूर कष्टकरी. मुळात कोणत्याही संघटनेच्या आंदोलनात नेतृत्व करणारेच काय ते यशस्वी होतात. ज्यांच्यासाठी आंदोलने होतात त्यांची भरभराट सहसा झालेली दिसत नाही. फक्त नेतृत्व बदलत राहते. प्रश्न, मागण्या तेच असतात आणि भरडणाऱ्या वर्गातील पिढ्यान पिढ्या तयार होतात आणि खपतात. आपल्याकडे काही पाचकळ सामाजिक, राजकीय विचारवंतांनी सेलेबल फॉरमॅट करून ठेवलेत. जसे की ब्राह्मणांना शिव्या घातल्या की विद्रोही, मुसलमानांच्या विरुद्ध गरळ ओकली की कट्टर हिंदुत्ववादी, ठराविक व्यवसायिकांना नावे ठेवली की भांडवलशाहीचे प्रखर विरोधक, अल्पसंख्याकांचे प्रश्न मांडले की पुरोगामी वगैरे. भारतात कैक विचारवंतांच्या मूळ भुमिकेत खूप मोठा लोचा आहे. इहवादी विचार, धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी वगैरेंची व्याख्या सर्जनशीलपणे गरजेचे आहे. भारतात तर विशिष्ठ गटाची समाजमान्यता मिळालेले कित्येक विचारजंत गल्लोगल्ली आढळतात.लोकांच्या हक्काचे मूलभूत प्रश्न, समस्या वगैरेंची मागणी करणे हा कोणत्याही आंदोलने, चळवळी किंवा संप यांचा मूळ गाभा. 

कधीकाळी आंदोलनातून, चळवळीतून खरेखुरे हिऱ्या माणकासारखे नेतृत्व देशाला लाभले. मात्र त्यांनी ज्या समस्येवर आंदोलने केली त्या समस्या तशाच आ वासून दशकानुदशके तशाच राहिल्या. कारण आपल्याकडे सोयीनुसार लोकशाही राबवली गेली. त्यामुळे भारतात ठिकठिकाणी सरंजामशाही, घराणेशाही, सावकारी पाश आणि जातपातधर्माचे ठेकेदारी रूजली व फोफावली. मूळ चळवळीला सार्वजनिक जीवनात बळकट होण्यासाठी खस्ता खाव्या लागल्या. त्यामुळे बऱ्याचशा चळवळी कागदोपत्रीच राहिल्या. खूप चांगल्या वैचारिक चळवळी तर ज्या त्या गटातल्या लोकांच्या अवतीभवतीच वाढल्या. संप तर कामगार नेते होण्याचे कुटिरोद्योग झाले. आजवरच्या सगळ्या चळवळी, आंदोलने वगैरेंचा उहापोह केल्यानंतर एक लक्षात येते हायजॅक होण्यासाठी किंवा हायजॅक झालेली आंदोलने, संप आणि चळवळी जगभरात सापडतात. रेसिझम टिकला तर रेसिझम विरूद्धची लढाई टिकते, गरीबी टिकली तर गरीबीविरूद्ध लढाई टिकते, जातपात टिकल्या तरच जातीपातीच्या प्रश्नावर लढा उभारता येतो, शोषणव्वस्था टिकली तरच शोषितांच्या, वंचितांच्या लढ्याला आयाम मिळतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळेच आपल्याकडे प्रत्येक राजकीय सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या लोकांचा एक सिलँबस ठरलेला. पुरोगामी बुरखे घालून जातीपातीत विष कालवणे आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ढोंगीपणा करणे हेच आजपर्यंत देशात चालत आले आहे. एखादी व्यवस्था विस्कळीत कशी राहील आणि तिचा पुरेपूर वापर कसा करता येईल हे पाहिले जाते. मग तसा वापर सत्ता टिकवण्यासाठी किंवा मक्तेदारी टिकवण्यासाठीच होतो. कामगार, मजूर, कष्टकरी, शेतकरी, वंचित, शोषित वगैरे फक्त बाहुले असतात. दशकभरापुर्वी अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे इव्हेंट मँनेजमेंटला नवी चालना मिळाली. त्यानंतर आंदोलन करणे म्हणजे इव्हेंट करणे आणि समाजमाध्यमातून लोकांना कनेक्ट करणे वगैरेचा नवा बिझिनेस फंडा सुरु झाला. भारतात उत्सवांची काही कमी नाही. त्यात आजकाल हायली डेकोरेटेड हाईप देऊन प्रोजेक्ट करणाऱ्यांना जास्त स्कोप आहे. मग फुकटच्या समाजमाध्यमांच्या उपलब्धतेमुळे रिकामटेकड्या लोकांना रिकामा वेळ घालवण्यासाठी काहीतरी खाद्य मिळते. उपद्रवी संघटना आणि त्यांच्या नेत्यांना स्वतःचे आस्तित्व टिकवायचे असते. मग अशी आंदोलने, संप आणि चळवळींशिवाय दुसरा समर्पक पर्याय तरी कोणता? जेव्हा दुसरा पर्याय सापडेल तेव्हा अशी आंदोलने वा संप होणार नाहीत. 

२०२० मध्ये सर्वसामान्य जनता सूज्ञ झाली आहे. कोणाला डोक्यावर घ्यायचे आणि कोणाला अस्मान दाखवायचे हे चांगले समजते जनतेला. कृषीप्रधान देश म्हणून मिरवायचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने मगरीचे अश्रू ढाळायचे कसे चालेल? शेतकरी जेवढा गुलाम राहिल तेवढ्या त्यांच्या समस्या, प्रश्न मांडणाऱ्या संघटना जिवंत राहतील. शेतकऱ्यांचे भले करा पण बसल्या जागी मिळणारी मिळकत बंद नाही झाली पाहिजे असा काहीसा सूर आहे समर्थकांचा. राजकीय विरोध करण्याचे दिवस आता संपलेत. सध्याचा काळ हा कृतीतून भले करणाऱ्यांचा आहे. लोकांना भिती दाखवून स्वार्थ साधण्याचा काळ संपलाय कधीचाच. हिंदू खतरे मे है, इस्लाम खतरे मे है, सेक्युलरिझम खतरे मे है वगैरे बोलून भिती दाखवून फक्त काही गटातटांवर वर्चस्व गाजवता येईल. अखंड भारतात कित्येक लोकांना अशा भितीने धाकात ठेवणे शक्य नाही. ज्या त्या पक्षाची किंवा संघटनांची तशी एक राजकीय, सामाजिक गरज असते त्यानुसार ते प्रोपागेंडा पसरवतात. भारतात सामाजिक अंधश्रद्धा पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वात मोठी राजमान्यता लाभलेली अंधश्रद्धा म्हणजे आरक्षण मिळाल्याने मागासलेला समाज सुधारतो, विकास वगैरे होतो. मुळात एखादा मागास कसा राहिल अशी तजवीज आपल्या व्यवस्थेतच करून ठेवलीय. उरलेली उत्तरपूजा त्या त्या समाजाची नेते मंडळी घालतात. समाज तसाच राहतो नेतृत्व फक्त सर्वांगिण विकसित होते. असे शोषित, वंचित घटक आपल्या भारतखंडात कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. त्यांच्या मूलभूत हक्कांचे जहाल प्रश्न पण खूप आहेत. त्यांचा पुरेपूर उपयोग आंदोलने, चळवळी वा संप वगैरे हायजॅक करण्यासाठी केला जातो. भारतात तर तशा समस्या भरपूर आहेत म्हणजे तशीच नानाविध आंदोलने आणि चळवळींना भरपूर स्कोप आहे. 
----------------------------
©भूषण वर्धेकर
२८ जानेवारी २०२१
हडपसर
----------------------------

रविवार, १७ जानेवारी, २०२१

शूर आम्ही दंगलखोर

शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती
शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती

बेरोजगारीच्या खाईत उमगली दगडफेकीची रीत
गल्लीतल्या नेत्याची संगत अन्  जडली येडी प्रीत
करोडोंची नासधूस करून येईल अशी शक्ती संघटीत
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती

तोडफोड वा जाळपोळ करावी हेच आम्हांला ठाव
नियतीच्या लाथाबुक्क्या खाणे हेच आम्हांला ठाव
जातीधर्मापायी सारी इसरू माया ममता नाती
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती
शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती
-------------------------------------
विडंबनात्मक
©भूषण वर्धेकर
३ जानेवारी २०१८
रात्रौ ११:१५
हैद्राबाद
-------------------------------------

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

मुंबई कुणाची?

मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
लढणाऱ्यांची की लुटणाऱ्यांची?
मुंबई कुणाची ?

बकाल झोपड्यांची की गगनचुंबी सोसायट्यांची
किनाऱ्यावरच्या आगरी कोळ्यांची की शेठ लोकांची
फसवलेल्या कामगारांची की धूर्त कारखानदारांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
कष्टकऱ्यांची की लुबाडणाऱ्यांची?
मुंबई कुणाची ?

गोरगरीब भैय्यांची की खंगलेल्या भूमिपुत्रांची
अलिशान बंगल्यांची की जीर्ण झालेल्या चाळींची
झगडणाऱ्या कलाकारांची की मुजोर घराण्यांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
विस्थापितांची की प्रस्थापितांची?
मुंबई कुणाची ?

बुजलेल्या मध्यमवर्गीयांची की फुगीर उच्चभ्रू वर्गांची
बरबटलेल्या नाल्यांची की गजबजलेल्या वस्त्यांची
विस्तारलेल्या पश्चिमेची की पसरलेल्या पुर्वेची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
व्हेजवाल्यांची की नॉनव्हेजवाल्यांची?
मुंबई कुणाची ?

गब्बर गुंतवणूकदारांची की लढवय्या संघटनांची
कोंडलेल्या घरांची की गुर्फटलेल्या कुटुंबांची
विदीर्ण जंगलांची की आत्ममग्न उपनगरांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
महत्वकांक्षांची की अपेक्षाभंगांची
मुंबई कुणाची ?

कीर्द कल्लोळ्ळाची की कोंदट वातावरणाची
लब्बाड आश्वासनांची की कर्कश भूलथापांची
उपऱ्या लोंढ्यांची की घाटावरल्या माणसांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
फसवणाऱ्यांची की फसलेल्यांची
मुंबई कुणाची ?

उर्मट कार्यकर्त्यांची की उद्धट पुढाऱ्यांची
अट्टल भांडवलदारांची की कृश समाजवाद्यांची
करपलेल्या अस्मितांची की चिघळलेल्या जखमांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
एकल भाषिकांची की बहुभाषिकांची
मुंबई कुणाची ?

निगरगट्ट ठेकेदारांची की बनेल मध्यस्थांची
प्रशासकीय अधिकाऱ्यांची की राजपत्रित बाबूंची
केविलवाण्या निषेधांची की उग्र आंदोलनांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
संप करणाऱ्यांची की बंद करणाऱ्यांची
मुंबई कुणाची ?

दर्जेदार सेवासुविधांची की तुंबलेल्या गटारांची
कष्टाच्या घामाच्या धारांची की रक्तरंजित संघर्षांची
भैसाटलेल्या नेत्यांची की भरकटलेल्या मंत्र्यांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
राडा संस्कृतींची की ऐतिहासिक वारश्यांची
मुंबई कुणाची ?

मुंबई सगळ्यांचीच...
हाल-अपेष्टा, सुख-दुःख, स्वप्न, ईच्छा-आकांक्षा
उराशी बाळगून अहोरात्र अजस्र महानगरी चालवणाऱ्यांची...
जीवाची मुंबई करणाऱ्यांची...
मुंबई देशाची... मुंबई महाराष्ट्राचीच...!

© भूषण वर्धेकर,
२० नोव्हेंबर २०२०,
दौंड

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...