सोमवार, १० एप्रिल, २०२३

गावगोष्टी #१

एका गावात मोठी पाण्याची टाकी होती. टाकीचा उपयोग पाणी साठवण्यासाठी आणि लोकांना दैनंदिन जीवनात गरजेप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन ची सर्वोत्कृष्ट व्यवस्था उभी करण्यात आली होती. गावाची सगळी उपजिविका शेतीवरच होती. छोटेमोठे गावातले उद्योग होतेच. पण ते तुटपुंजे होते. तसं सांगितलं गेलं होतं ही व्यवस्था गावातील गोरगरीब जनतेसाठी उभी करण्यात आली आहे. शेतीसाठी, रोजच्या दैनंदिन वापरासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याची देखरेख आणि पाणीपुरवठा अंमलबजावणी साठी गावातील जनताच काही लोकांना निवडून देत होती. असे निवडून येणारे लोक मात्र पाणीपुरवठा व्यवस्थेचे मालक असल्यासारखे वागत होती. एकाच कुटुंबातील लोकांना पिढ्यानपिढ्या जनतेने निवडून दिल्यामुळे त्यांचा गोड गैरसमज झाला होता की ही व्यवस्था आमचीच. आम्हीच ही व्यवस्था राबवली, उभी केली. त्यांचा पुढचा काल्पनिक समाजमान्य गैरसमज असा होता की आम्हीच फक्त लोकांचे कल्याण केले आहे. आमच्यामुळेच गावातील गोरगरीब जनतेला पाणीपुरवठा झाला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी शेवटच्या घटकांपर्यंत कधीच पोचले नव्हते. ते कायमच दुर्लक्षित राहतील याची तजवीज चाणाक्ष निवडून येणाऱ्या लोकांनी वेळोवेळी केली होती. कालांतराने टाकी, पाइपलाइन कमकुवत होत गेली. वेळोवेळी गरजेनुसार डागडुजी केली खरी पण कायमस्वरूपी कशी व्यवस्था आपल्याकडेच राहील याची पण तजवीज केली होती. 

गावातील लोकसंख्या जशी वाढत गेली तसा पाण्याच्या मागणीचा बोजा वाढला. त्यात व्यवस्था पाहण्यासाठी नेमलेल्या लोकांचीच संस्थांनं तयार झाली त्यांची शेतीवाडी, उद्योगधंदे यालाच प्राधान्य देण्यात आले पाणीपुरवठ्याचे. जनतेला जातीपातीवरुन भडकावून सगळेच आपापल्या कुटुंबातील सदस्यांना भक्कम पणे निवडून आणत होते. जनतेला रोजच्या जगण्याचं रहाटगाडं ओढण्यासाठी मारामार होत होती. निवडून दिलेल्या लोकांना त्यामुळे असा समज झाला होता की आम्ही सर्वशक्तिमान, आम्ही खरे जनतेला चांगले सांभाळू, आम्ही आहोत म्हणून पाणीपुरवठा व्यवस्थेचे चालतोय दुसरे कोणीही आले की वाट लावणार व्यवस्थेची. मुळातच व्यवस्था जीर्ण झाली होती. पुरवठ्याचे मॉडेल जबरदस्त गुणकारी होते पण तीची अंमलबजावणी फिसकटलेली होती. लोकांनी आलटून पालटून वेगवेगळ्या लोकांना निवडून दिले तरी व्यवस्था दुरुस्ती झाली नाही. तीच व्यवस्था आहे तशीच राबवली. ती अजून जीर्ण झाली. नवीन लोकांना निवडून दिले तरीही पुर्वाश्रमींच्या लोकांशी असलेल्या घरोबा आणि ऋणानुबंधामुळे काहीही फरक पडत नव्हता. 

एकूणच सावळा गोंधळ चालू असताना आजूबाजूच्या गावातील चाणाक्षांनी ओळखले या गावातील लोकसंख्या आणि या गावातील जीर्ण झालेल्या व्यवस्थेचा आपल्याला मजबूत फायदा घेता येईल. पण या गावात येण्यासाठी कसलीही व्यवस्था नव्हती. मग निवडून आलेल्या लोकांना गुंडाळून तुमच्या गावात आम्ही उद्योग सुरू केल्यावर तुमची भरभराट होईल तुमचे सगळे प्रश्न मिटतील सांगून आपापल्या उद्योगाचे साम्राज्य उभे केले. सोबतीला गावातील उच्चभ्रू लोकांना हाताशी धरून पाणीपुरवठा आपल्याला फायदेशीर कसा ठरेल याची तजवीज केली. याला गोंडस नाव दिले *गावकीकरण*. 

या गावकीकरणामुळे ठराविक वर्गाचेच भले झाले. शेती व्यवसाय करण्याऱ्या लोकांचे जे हाल होते ते तसेच ठेवले गेले. माणूस अशक्त आणि कृश असेल तर त्याच्या दवापाण्याचा खर्च वाढवून, लांबवून स्वतःची आणि कुटुंबांची दुकानदारी दीर्घकाळ चालवता येते. हे सूत्र निवडून येणाऱ्या प्रत्येकाने वापरले. शेतकरी सशक्त झाला तर कित्येक लोकांची दुकानदारी बंद झाली असती. मग शेतकऱ्यांना शेती कशी कमी कारखानदारी कशी उच्च सांगितले. मग त्यांच्याच शेतजमिनी बळकावून गावकीकरण प्रचंड प्रमाणात वाढवले. विस्कटलेल्या गावकीकरणामुळे कैक प्रश्न निर्माण झाले. त्यात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी आणि पाइपलाइन यांच्या देखभालीसाठी येणारा खर्चही परवडत नसल्याने आजूबाजूच्या गावातून कर्जे उचलली गेली. ती कर्जे फेडण्यासाठी गावातील जनता राबराब राबायची. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर भरायची व्यवस्था राबवणाऱ्यांना शिव्या घालायची पुन्हा जातीपातीधर्मावरुन लोकांना निवडून द्यायची. असे चक्र कालानुक्रमे चालूच होते. जनतेला समजून चुकले की कोणालाही निवडून दिले तरी व्यवस्था आहे तशीच राहणार म्हणून जो तो आपापल्या परीने उस्फुर्त विरोध, निषेध आणि आंदोलने करीत असत. काही ठिकाणी फरक दिसत असे. कालांतराने पुन्हा पिळवणकीची तशीच व्यवस्था उभी राहिली. मग पुन्हा गावातील जनतेचा विरोध, निषेध आणि आंदोलने. शेवटी निवडून येणाऱ्या लोकांना वैताग आला काय ते सारखं सारखं जनतेचीच काम करायची. निषेध, विरोध आणि आंदोलने सहन करायची. काय पायपोस उरला नव्हता. इतकी दशकं त्यांना सहन केले आता आम्हाला करायला काय होतंय? आम्हाला आमच्या पद्धतीने कारभार पण करून देत नाहीत. गावद्रोही कुठले. 

सरतेशेवटी चाणाक्षांनी गावातील जनतेला ऑनलाईन समाजमाध्यमे फुकटात उपलब्ध करून दिली. आता निवडून येणाऱ्या लोकांना त्यांच्या मनासारखी व्यवस्था राबवता येते आणि गावातील निम्म्या जनतेला मेटाकुटीला येऊन जगण्यासाठी किमान गरजा भागविण्यासाठी दुनियादारीशी झगडावं लागतं. उरलेल्या जनतेला व्हर्च्युअल विरोध, निषेध आणि आंदोलने.

सगळं कसं मस्त चालू आहे.
© भूषण वर्धेकर
३ एप्रिल २०२३

काव्यमय वडापाव


काळ्याकुट्ट मातीत मुळाशी गाडलेला
टुम्म फुगीर रुंद बटाटा पसरलेला
घाऊक बाजाराच्या रचलेल्या पोत्यातून
भल्यामोठ्या पातेलात रटारटा शिजवून

ठेचून चेंदामेंदा झालेली लक्तरे
कांदा मिरची मसाल्याचे फवारे
गोलमटोल गोळे पीठात बुचकळून
ओतीव कढईतल्या तेलात उकळून

लालचुटुक चुराचटणी कणीदार
घोटलेल्या चिंचेचा अर्क पाणीदार
मऊ लुसलुशीत पावात कोंबून
चवीला मीठमिरची कांदा कापून

अटक मटक खवय्यांची चटक
तहानभूक भागवायचं मिथक
दंत ओष्ठ्य जीव्हा खाण्यात दंग 
उदरभरण नोहे अखंड अभंग

©भूषण वर्धेकर
२२ मार्च २०२२

रविवार, ९ एप्रिल, २०२३

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!


स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळेच लढले
कोणी दक्षिणेकडे कोणी पश्चिमेकडे लढले
उत्तरेतील, पुर्वेकडील कैक फासावर चढले
अनेकांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले

काही जीवानिशी मेले काही होरपळले
विस्कटलेल्या चळवळीत कैक बिथरले
बंड पुकारून कैक त्वेषाने निकराने लढले
राष्ट्रवादी लेखणीचे चित्कार सर्वदूर पोचवले गेले 

परदेशांतून जहालांनी हादरून सोडले
ब्रिटिशांना देशातलेच मवाळ बरे वाटू लागले
हुशारीने राजे राजवाडे आधीच ताब्यात घेतले
संस्थानिकांना हेरून करारबद्ध गुलाम केले

बेरकीपणे काही आंदोलने प्रॉक्टर्ड केली
लोकसहभागातून काही उस्फुर्त झाली
दुसऱ्या महायुद्धात वाताहत अंगलट आली
संभाव्य लष्करी उद्रेकामुळे पाचर बसली

ज्वलंत राष्ट्रवाद्यांच्या जरबेने गांगारुन गेले
मवाळांतील सत्तापिपासू हेरले गेले
ब्रिटिशांनी धर्माधिष्ठित राष्ट्रास बळ दिले
सर्वधर्मसमभावाचे कंबरडेच मोडले

सगळ्यात आधी ब्रिटीशांनी वापरले
नंतर कॉंग्रेसने सत्तेसाठी मिरवले
सर्वदूर सत्य अहिंसा ठसवले गेले
प्रत्यक्षात अहिंसा असत्य वठवले गेले

कित्येक दशकं गांधी बिचारे वापरले गेले
जाज्वल्य सावरकर अडगळीत फेकले गेले
सुटाबुटातून संविधान अंमलात आणले गेले
बाबासाहेब जातीच्या कोंडाळ्यात ढकलले गेले

पंचवार्षिक योजनेचे दिवास्वप्न दाखवले गेले
गोताळ्यातील समाजवादी धनिकांना रेटले गेले 
गावोगावचे जमीनदार सावकार एकवटले गेले
सेक्युलर म्हणवून संस्थानिकं भक्कम केले गेले

व्यक्तींकडून कुटुंबं उच्चभ्रू प्रस्थापित झाले 
विकासाच्या आडून गोरगरीब विस्थापित झाले
नेहरुंचे गुडी गुडी राष्ट्रनिर्भर स्वप्न मिरवले गेले
प्रत्यक्षात मात्र घराणेशाहीचे वारस लादले गेले

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!

२७ नोव्हेंबर २०२२
भुकूम, पुणे


मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

Her Voice Her Choice

Her Voice, Her Choice
Her decision, Her life

Her distorted life, Family problem
Her repentance, Curtural problem

Her broken mind, Career problem
Her love life, Society matter

Her success, Women empowerment
Her failures, Male dominance

Her excessive demands, Pampered parents problem
Her chaste emotions, Humiliated men problem

Her social duties, Our religious problem
Her freedom of expression, Progressive beliefs problem 

Her murder, Our problem
Her rape, Patriarchal problem

©Bhushan Vardhekar 
15 November 2022
Pune - 412115

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

लढाई

आमची लढाई, तुमची लढाई
त्यांची लढाई, ह्यांची लढाई
आतली लढाई, बाहेरची लढाई
गल्लीतील लढाई, दिल्लीतील लढाई

मनातील लढाई, घरातील लढाई
एकट्याची लढाई, दुकट्याची लढाई
शांततेसाठी लढाई, वर्चस्वासाठी लढाई
रक्षणासाठी लढाई, संरक्षणासाठी लढाई

मिरवण्याची लढाई, दिखाव्याची लढाई
आस्तित्वाची लढाई, निकराची लढाई 
अटीतटीची लढाई, मेटाकुटीची लढाई 
शहाण्यांची लढाई, मुर्खांची लढाई

गटागटात लढाई, तटातटात लढाई
सामाजिक लढाई, राजकीय लढाई
जातीअंताची लढाई, जातीपातीची लढाई
विचारांची लढाई, आचारांची लढाई

सत्तेची लढाई, खुर्चीची लढाई
मंत्र्यांची लढाई, नेत्यांची लढाई
पदांची लढाई, प्रतिष्ठेची लढाई
भक्तांची लढाई, गुलामांची लढाई

अंधश्रद्धेशी लढाई, प्रथांशी लढाई
रुढींशी लढाई, परंपरांशी लढाई
दैववादी लढाई, विवेकवादी लढाई
सांस्कृतिक लढाई, सदाचारी लढाई 

पक्ष वाढवण्याची लढाई, पक्ष संपवण्याची लढाई
बंड क्षमवण्याची लढाई, बंड पेटवण्याची लढाई
सरकार करण्यासाठी लढाई, सरकार पाडण्यासाठी लढाई
विरोधकांची अंतर्गत लढाई, विरोधकांची कमीशनची लढाई

जनतेची जगण्याची लढाई, महागाईशी कमाईची लढाई,
बेरोजगारीशी बेकारांची लढाई, शेतकऱ्यांची निसर्गाशी लढाई 
कर्जबाजाऱ्यांची बॅंकेशी लढाई, मजूरांची भांडवलदाराशी लढाई
मानवतेची माणसाशी लढाई, सौहार्दाची ढोंगाशी लढाई 

©भूषण वर्धेकर
३१ मे २०२२
पुणे -४१२११५



शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

समाजमाध्यांकित विचारवंत होण्याची दशसुत्री


१. सर्वसामान्य जनतेला ठाऊकच नसलेल्या परकीय लेखकांच्या पुस्तकांची यादी तयार करून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल माहिती वाचावी
२. ही माहीती मराठीत अशा पद्धतीनं लिहायची की वाचणाऱ्याला मूळ लेखकाचे सगळं प्रकाशित अप्रकाशित साहित्य कोळून प्यायला की काय असं वाटावं! ही लिहिलेली माहिती सोप्या आणि जड भाषेत लिहून समाज माध्यमातून पोहोचवावी. सोपी भाषा सर्वसाधारण वाचक तर जड भाषा प्रगल्भ वाचक.
३. प्रगल्भ वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास असे वाचक कसे फक्त लोकप्रिय आणि रसिकप्रिय लेखकाची पुस्तके वाचतात यावर काथ्याकूट करायचा. अशी मंडळी कशी प्रतिगामी अवैज्ञानिक आणि बुरसटलेल्या मानसिकतेची असतात यावर पोष्टी पाडायच्या. 
४. सर्वसाधारण वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास अशा वाचकांना साहित्यिक जाणच नाही यावर प्रदीर्घ पोस्ट लिहायची. त्यात त्यांच्यावर ब्राह्मणवादी संस्कृती आणि सनातन विचारांचा प्रभाव कीती खोलवर आहे असे टिकात्मक लिखाणातून ठोसपणे लिहायचे.
५. जर दोघांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला तर. तर भांबावून न जाता क्रमांक १,२ आणि ३ ची च्या कृती पुन्हा करायच्या. फक्त प्रगल्भ वाचकांना ठाऊक असलेल्या परकीय लेखकांच्या साहित्याबद्दल सोप्या भाषेत लिहावे सर्वसाधारण वाचकांसाठी. इथे वैचारिक प्रमोशनसाठी आणि आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नामी संधी मिळते. त्यात सामान्य वाचन करणारे लोक मिळाले तरीही बेहत्तर. अशी सुवर्ण संधी सोडायची नाही. आत्मप्रौढी मिरवताना लिखाणातून सेल्फ ऍपिझमेंट करणं महत्वाचं. मी कशाप्रकारे कसलीही सामाजिक राजकीय आर्थिक आणि परंपरागत पार्श्वभूमी नसताना इथपर्यंत आलो आणि टिकलो हे दाखवून द्यावे. इथे स्वतःच्या सामाजिक, साहित्यिक, वैचारिक आणि पुढारलेल्या मानसिकतेचा अवाका दाखवून देण्यासाठी जगप्रसिद्ध पाश्चिमात्य देशांमधील विचारवंतांची पुस्तकं वाचून स्वतःला बदलत गेलो हे ठशीवपणे लिखाणातून मांडावे.
६. एवढं सगळं कशाचीही अपेक्षा न ठेवता जोपर्यत करावे तोपर्यंत तुमचे समाजमाध्यमात फॉलोअर्स वाढत नाहीत. जर फॉलोअर्स वाढले तर त्यांच्यापैकी आर्थिक क्षेत्रात सधन लोकांच्या सानिध्यात राहून वैचारिक मंथन करावे. फॉलोअर्स पैकी कोणी राजकीयदृष्ट्या फायद्याच्या दृष्टीने समक्ष असेल तर संमेलने, चर्चासत्र वा साहित्यिक मेळावे यासाठी आग्रही असावे. या सगळ्यात आपण फक्त मार्गदर्शक म्हणून वावरावे. एक्टीव्ह पार्टिसिपेशन टाळावे आणि दिवसभर जरी घरी रिकामे असलो तरी आगामी मोठ्या प्रोजेक्ट्स बद्दल तयारी चालूय म्हणून वायरी सोडाव्यात. त्यात एखादा शिष्यवृत्ती योजना देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर मुद्दामहून बहुजन होतकरू लेखकाची नावे पुढे करावीत जेणेकरुन त्यांना वैचारिक व्यासपीठावर फुटेज मिळेल व त्यांच्या लेखी तुम्ही ऋषितुल्य व्हाल.
७. इथपर्यंत जर सगळं सहज शक्य नाही झालं तर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे आपण लिखाणातून अशाप्रकारे अवलोकन आणि सिंहावलोकन करावे की सभोवतालच्या समाजातील लोकांचा आयक्यू हा अश्मयुगीन आहे. आणि जग खूप पुढे गेले तरीही ही मंडळी नॉस्टॅल्जिक चिखलात लोळणारी आहेत असे तिखट शब्दांत सांगावे. 
८. जर कोणी तुमची दखल घेतलीच तर आजूबाजूच्या वातावरणात कल्लोळ माजला असून तुम्ही माझ्यासारख्या पामराची दखल घेतल्याने समाजात अजूनही सुधारणा होण्यासाठी खूप वाव आहे असे छातीठोकपणे सांगावे. त्यासाठी स्वखर्चाने छोटेखानी कार्यक्रम आयोजित करावेत.
९. एवढे प्रयत्न करूनही हाती काहीच लागले नाही तरी नकारात्मक आणि नैराश्याच्या वाटेवर जाऊ नये. जर तशीच अवस्था जाणवली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शोषितांच्या, वंचितांच्या, दुर्लक्षित बहुजनांच्या, विस्थापित विस्कटलेल्या जनजाती, आदिवासी लोकांच्या बद्दल तळमळीने लिखाण करावे. त्यांच्यावर सांस्कृतिक दहशतवादाचे सावट आणि आव्हान कसे वाढतेय यावर लिखाण करावे. अशी मंडळीचे ब्राह्मणीकरण होण्यासाठी वर्चस्वतावादी संघटना, नेते कसे कारणीभूत आहेत यावर धाय मोकलून क्रंदन करावे.
१०. ही शेवटची कृती. एवढे सगळे खटाटोप करूनही कोणी म्हणजेच कोणीही तुमची दखल घेतली नाही तर कृती क्रमांक १, २ आणि ३ पुनः एकदा करावी. फरक एकच. आता लोकप्रिय, रसिकप्रिय, सर्वसामान्य लोकांना परिचित असलेल्या लेखकांचं साहित्य उपयोगात आणावे.

® भूषण वर्धेकर
पुणे- ४१२११५
३० सप्टेंबर २०२२
वेळ - वामकुक्षी घेण्यापूर्वी

रविवार, १० जुलै, २०२२

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

आर. माधवन दिग्दर्शित रॉकेट्री चित्रपट नव्या युगात वैज्ञानिक राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ ठरेल असा बनवला आहे. आजवर ऐतिहासिक राष्ट्रवाद ऊतू जाईल एवढे सिनेमे आलेले आहेत. अशा प्रत्येक चित्रपटात कोणाला कोणीतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. किंवा शत्रू पक्ष म्हणून ठरवून चित्रपटाची बांधणी आणि मांडणी करतात. रॉकेट्री चित्रपट मात्र भलेही राष्ट्रवाद, वैज्ञानिक क्षेत्रातील घडामोडी यावर आधारित असेल तरीही भडक आणि भंपक वाटत नाही. यात कोणीही कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कसलेही आडाखे तडाखे दिलेले नाहीत. काही शक्यता असू शकतात, प्रशासन शासन आणि यंत्रणा यातील त्रुटींवर तिखट भाष्ये केली आहेत. वैज्ञानिक क्षेत्रातील संस्था कशा काटकसरीने कारभार करतात हे यात व्यवस्थित योजनाबद्ध पद्धतीने दाखवले आहे. अर्थातच नंबी नारायण यांच्या आयुष्यातील आलेले आणि आणलेले चढ उतार आर. माधवनने काही फिल्मी तर काही रोमांचक पद्धतीने दाखवले आहेत. आर. माधवन तसा जबरदस्त टॅलेंट असलेला अभिनेता. या सिनेमात अभिनयाच्या बाबतीत तर तो उजवाच ठरलाय. दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा समोर येतोय. सिनेमा मेकिंग चे बारकावे टिपण्यात तो कमालीचा यशस्वी ठरलाय. मध्यंतरापूर्वी चित्रपट मनाची पकड तर घेतोच. शिवाय स्वातंत्र्योत्तर काळात कशाप्रकारे वैज्ञानिक क्षेत्रात भारतीय वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि संस्था उभ्या राहत हे पण काही संदर्भातून समजतं. मध्यंतरानंतर सिनेमा थोडासा रेंगाळलेला वाटला मला. कदाचित ते दिग्दर्शकाने नंबी नारायण यांचा संघर्ष एस्टॅब्लिश करण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असावी. 

सिनेमा दोन पातळ्यांवर समांतरपणे घडतो एक नंबी नारायण यांची कारकीर्द कशी घडत गेली, कशा पद्धतीने त्यांच्या विरोधात आरोपांची चौकशी झाली आणि त्याचा लढा. दुसरी पातळी म्हणजे भारतीय अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांच्या प्रयत्नांना मिळणारे यशापयश. हे दाखवताना दिग्दर्शकाने कोणालाही लार्जर दॅन लाईफ दाखवले नाही की मेडिया ट्रायल करतात त्याप्रमाणे अमुकतमुक आरोपी ठरवून भाषणबाजी दाखवली नाही. नंबी नारायण यांचा लढा हा फार वेगळा आहे. त्यामुळे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची स्वयंपूर्ण यंत्रणा सहज उभी न राहता अडखळली. अर्थात यात बऱ्याच कॉन्स्पीरेन्सी थिअरीज आहेत. हॉलिवूडमध्ये अशा एकेका थिअरीच्या एकेका थ्रेडवर किमान एक सिनेमाची सिरिज होऊ शकते. माधवन ने मात्र त्याचा हात आवरता घेतलाय. टू द पॉईंट गोष्ट सांगून सगळ्या सरकारी यंत्रणा, प्रशासकीय करभार पाहणारे मंडळी यांच्या मर्यादा किमान सिन्स मध्ये कमाल दाखवल्या आहेत. मुळातच स्वातंत्र्योत्तर भारतात कोणत्याही क्षेत्रात जे जे काही घडले ते पायोनियर असेच होते. टीम वर्क तसेच होते. इथे कोणी हिरो नाही व्हीलन नाही. फक्त विज्ञान क्षेत्रातील परिवर्तनाचा बदलांचा वेग प्रचंड मंदावलेला होता. त्यातही भारतीय वैज्ञानिकांनी किमान उपलब्ध असलेल्या स्रोतांचा वापर करून बऱ्यापैकी यशस्वी प्रयोग केले. या आशयाचे अनेक चित्रपट, ओटीटी वरील निवडक सिरिजेस पाहिल्यावर तशी कल्पना येते. मात्र या रॉकेट्री सिनेमात लाईफ ऑफ नंबी नारायण कसलेही आढेवेढे न घेता दिग्दर्शकाने दाखवली आहे. शेवटचं खरेखुरे नंबी नारायण यांचं वक्तव्य विचार करण्याजोगे आहे. त्यांच्या एकूण लढ्याला मिळालेला पाठिंबा त्यांच्या वर झालेले आरोप हल्ले पाहून असे कितीतरी वैज्ञानिक क्षेत्रातील शापित गंधर्व आज आपल्या देशात राहतात असे जाणवते. देशासाठी काहीतरी करण्याचा संघर्ष फक्त सामाजिक, राजकीय, आर्थिक असतो असं नव्हे. वैज्ञानिक क्षेत्रात जेवढे अमुलाग्र बदल होतील त्यासाठी लागणारा राजकीय आणि आर्थिक पाठींबा जर कणखर असेल तर देश महासत्ता, स्वयंपूर्ण वगैरे नक्कीच होऊ शकेल. त्यासाठी सोडवाव्या लागणाऱ्या समस्या ह्या अंतर्गत गुंतागुंतीच्या असतात. हल्लीच्या भाषेत देशाचा जीडीपी वाढवायचा असेल किंवा अमुकतमुक ट्रिलियन वगैरे अर्थव्यवस्था करायची असेल तर मूलभूत वैज्ञानिक संशोधन आणि त्याचे प्रभावीरीत्या उपयोजन करणे खूप गरजेचे आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन जेवढे स्वावलंबी तेवढे राष्ट्री स्वयंभू. मात्र आपल्याकडे असणारी वैज्ञानिक क्षेत्रातील, संशोधन क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनास्था ह्या कधीही राजकीय पटलावर आल्या नाहीत. जातपातधर्म आणि सोकॉल्ड विचारधारा यावरच सगळ्या राजकीय कुस्त्या झाल्या. त्यामुळे वैज्ञानिक अधोगतीला राजकीय इच्छाशक्ती, वैज्ञानिक दृष्ट्या मागासलेल्या विचारधारा, शैक्षणिक उदासीनता आणि ढिसाळ कारभारी ह्याच कारणीभूत आहेत. भारतीय लोक बुद्धीमान आहेतच यात वाद नाही मात्र त्यांचं टॅलेंट देशासाठी वापरण्यासाठी आवश्यक असलेला सामाजिक आणि राजकीय प्रगल्भता कोणाकडे नाही. तशी व्यवस्था पण या देशात बळकट नाही.

सिनेमात बऱ्याच वैज्ञानिक संकल्पना आणि मूलभूत नियमानुसार केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक चाचण्या यांच्याबद्दल बरेच उल्लेख आहेत. जे लोक विज्ञानाच्या किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात असतील त्यांना ते ओळखीचे नक्कीच वाटतील. इंटरनल कंबशन इंजिन आणि त्याचे कार्य वगैरे कधीकाळी अभ्यासताना द्रवरूप आणि स्थायूरूप इंधन, दाब आणि हीट, मास ट्रान्सफर वगैरे संदर्भ उगाचंच आठवत होते. औद्योगिक क्रांती झाली आणि अशी सगळी कारणीभूत ठरलेली आयुधं, साधनं आणि यंत्रे सार्वजनिक जीवनात कमालीची परिचयाची झाली. त्यामुळे अनेक विद्याशाखा तयार झाल्या प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी त्यातून बऱ्याच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उलाढाली झाल्या वगैरेचा सालंकृत इतिहास हा सिनेमात कुठेन् कुठेतरी डोकावतो. त्या वैज्ञानिक पद्धतीने जास्त विस्तृतपणे जर सिनेमात दाखवल्या असत्या तर अजून मजा आली असती. कदाचित दिग्दर्शकाने सिनेमा माहितीपट होऊ नये म्हणून जागोजागी हात आवरता घेतलाय की काय असे जाणवते. 

एकूण पहिलाच प्रयत्न आहे माधवनचा दिग्दर्शक म्हणून असे जाणवत नाही सिनेमा बघताना. सिनेमात दाखवलेल्या इतर पात्रांनी पण साजेसा अभिनय केला आहे. उगाचंच मेलोड्रामा कटाक्षाने टाळलेला जाणवतो. फिल्मी टेकिंग आहे बऱ्याचशा सीन्समध्ये. भारतीय सिनेमा म्हटलं की चालायचंच. मात्र अभिनय उत्तम. बॉडी लँग्वेज आर. माधवनने भारी पेललीय. टेक्निकल आस्पेक्ट्स सिनेमात येत राहतात. सरतेशेवटी संघर्षाची कहाणी ही मानवी पातळीवर आणायची असेल तर कौटुंबिक ससेहोलपट दाखवली की निम्म काम सोपं होतं कोणत्याही घटनेचं. त्यात सिनेमात हे येतंच येतं. एवढं सगळं सहन करून लढण्याची जिद्द शेवटपर्यंत ठेवणं हे फार जिकिरीचे असते. ते प्रत्यक्षात नंबी नारायण यांची याची देही याची डोळा अनुभवलं आहे. शेवट कटू गोड व्हावा तसा नंबी नारायण यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार, त्यांचा निर्दोषत्वाचा कोर्टाने दिलेला निकाल आणि त्यांना मिळालेल्या भरपाया याचे धावते संदर्भ सिनेमात शेवटी येतात. मोदींच्या भाषणाचा एक व्हॉईस ओव्हर शेवटी येतो. तो ऐकून नेहरू भक्त दुखावतात बहुतेक असे वाटते. उद्या ते अशी ही मागणी करतील की नेहरुंनी वैज्ञानिक क्षेत्रातील ज्या ज्या संस्थांची पायाभरणी केली त्याचे पण संदर्भ सिनेमात असायला पाहिजेत. चालायचंच ही भक्तमंडळी भारतीयांना मनोरंजनासाठी मिळालेली सर्वात डोकीदुखीयुक्त मेजवानी आहे. असो. पण हा रॉकेट्री सिनेमा एकदा का होईना बघितलाच पाहिजे. विज्ञानविषयक विद्याशाखेच्या लोकांना हा सिनेमा पाहताना लढा, संघर्ष करण्यासाठी कशा आणि किती खस्ता खाव्या लागतात हे समजेल. 

©भूषण वर्धेकर
१० जूलै २०२२
पुणे

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...