गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

वैचारिक - २

आरक्षणे देऊनही एखादा समाज शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होईल याची सध्याच्या काळात खात्रीपूर्वक सांगता येत नाही. कारण भारतीय शैक्षणिक व्यवस्था म्हणजे मराठीत इंडियन एज्युकेशन सिस्टीम बुरसटलेली आहे. म्हणजे ही व्यवस्था बदलायला मूळातच
सुधारणा करून आणायला पाहिजे.
महाराष्ट्रात शिक्षण सम्राटांनी जो धुमाकूळ घातलाय गेल्या वीस एक वर्षात ते अख्खा महाराष्ट्रानं पाहिलेय. कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालय, इंजिनिअरिंग, एमबीए कॉलेजेस, सीबीएसई स्कूल वगैरेची दुकानदारी तेजीत चालू होती. शिक्षकांचा पगार सहीने वेगळा तर हातात त्यापेक्षाही कमी मिळणार, अशी एक पिढी पोटापाण्यासाठी जोडधंदा म्हणून शेती, जमीनीचे व्यवहार, पॉलिसी एजंट अशा गोष्टी करण्यात गर्क होती. बेरोजगारीसाठी भाजपाला जबाबदार धरण्यापेक्षा रोजगारक्षम स्किल्ड युवक का तयार झाले नाहीत याचा विचार करायची गरज आहे. बेरोजगारी वाढण्यामागे शैक्षणिक व्यवस्थाच कारणीभूत असते. उगाच मोदीविरोधात आवई ठोकून मोकळं होण्यात काही अर्थ नाही.  भाजपा नक्कीच व्यवस्था परिवर्तन करेल मात्र आमचं हित सांभाळून करा नाहीतर मनुवादी सरकार म्हणून आम्ही शिक्का मारू अशी विरोधकांची मानसिकता झाली आहे. तुम्हाला पायजे तो बदल करा पण आमची दुकानदारी चालूच राहिली पाहीजे अशा मानसिकतेमुळे देशाचे नुकसान होतेय हे कळत नाही लोकांना. जे विचारवंत आहेत त्यांना हे चांगलं समजंत पण भाजपा हा त्यांचा नावडता पक्ष मग त्यांनी चांगलं केलं तरी त्यात खोड ते काढणारच. विरोधकांची त्यांच्याच कर्मामुळे नाचक्की झाली आहे.
राजकारणाचा भाग सोडला तर शिक्षण व्यवस्था मजबूत असेल तरच देश अग्रेसर होतो. वर्षाकाठी अमुक एवढे डॉक्टर, इंजिनिअर भारतात तयार होतात पण त्यांचे गुणात्मक मुल्यांकन केले जाते का?
आजकाल डिग्री घेऊनसुद्धा लाखभर रुपये भरून प्रोफेशनल जॉब ओरिएंटेड कोर्सेस करावे लागतात. बेरोजगारी वाढतेय याला कारण सरकार नसून सध्याची शिक्षण व्यवस्था आहे. स्किल्ड प्रोफेशनल आणि एम्प्लॉएबल म्हणजे रोजगारक्षम युवक सध्याची शिक्षण व्यवस्था तयार करत नाही. विद्यापीठे आणि शाळा कॉलेजमध्ये केवळ पाट्या टाकून पोरांना पास करून स्वतःचे आस्तित्व अनुदानासाठी टिकवणे हेच काम चालू आहे. कायमस्वरूपी विनाअनुदानित कॉलेज, शाळा तर हमखास शिक्षकांची पिळवणूक करतात. संस्थाचालक दुकानदारी चालवण्यासाठी शाळा कॉलेजेस आहेत असे वाटते. समस्या खूप आहेत मात्र जेवढ्या समस्या, अडथळे पार करू तेवढेच क्वॉलिटीचे परिवर्तन होइल. उगाच आपली जो तो उठतो आणि आरक्षण मागतो नाही दिले तर एकूण व्यवस्था, सरकार यांना जेरीस आणूश स्वतःची आस्तित्वात नसलेली सो कॉल्ड संघटना प्रस्थापित करू पाहतो याला काही अर्थ नाही. जे सत्तेत नाहीत असे अल्पसंतुष्ट आत्मे अशा संघटनांच्या बेअक्कल युवकांना फूस लावतात. अर्थात असे सत्तापिसासू बांडगूळे महाराष्ट्रात गल्लोगल्ली आढळतात. एखादा समाज वैचारिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्टीने मागास राहतो याचे एकमेव कारण म्हणजे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा प्रभावी वापर थेट जनतेपर्यंत न जाता मधल्या साखळीतील लोकांच्या घशात जातो. विशेषतः हीच साखळी सरकार किंवा विरोधकांना येनकेनप्रकारेण अर्थपुरवठा करत असतात स्वतःची दुकानदारी राजरोस चालू ठेवण्यासाठी. गेली कित्येक वर्षे हेच चालू आहे. शिकला सवरलेला तरूण जेव्हा बेरोजगार राहतो मग त्याची व्यवस्थेवरील चीड, राग अराजक माजवण्यासाठी कसा करायचा याचे तथाकथित तंत्र आपल्या येथील राजकारण्यांना चांगलेच अवगत आहे. माझी मक्तेदारीला कुणालाही धक्का लावून देणार नाही. सरकारात कसो वा नसो आमचे पत्ते हुकुमाचे हेच दाखवायचे असते यांना. यासाठी वाट्टेल ते करू पण जनसामान्यांना वेठीस धरु हीच भूमिका असते. सद्सद्विवेकबुद्धी, बुद्धिप्रामाण्यवाद, सारासार विवेक वगैरे गहाण ठेऊन जातपातधर्माचे राजकारण करणाऱ्यांची नवी पिढी तयार करण्यात येते आहे. भीषण आणि करूण आहे हे सगळं. (क्रमशः)

© भूषण वर्धेकर

शनिवार, ३० जून, २०१८

वैचारिक -१

कॉंग्रेस, भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष हे केवळ लोकशाहीचे मुखवटे आहेत. खरा देश चांडाळ चौकटी चालवत आहे. या चांडाळ चौकटीत देशातील व परदेशातील गुंतवणुकदार, कार्पोरेट  व इंडस्ट्रियल लॉबी, मेडिया हाउसेस मँनेज करणारे आणि तथाकथित धर्माचे ठेकेदार असे सगळे येतात. त्यामुळेच मतदानाच्या वेळी सर्वाधिक ध्रुवीकरणासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातपातधर्म. त्याचा वापर पुरेपूर करुन घेण्यासाठी राजकारणी नेहमीच तयार असतात. शिकले सवरलेले पण याला बळी पडतात. घडलेल्या घटनांचा केवळ जातपातधर्म यावर आधारित उल्लेख करणारे स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणवून घेतात. आजचा काळ खऱ्या अर्थाने सदैव सतर्कतेचा आहे कारण व्यक्त झालेले संवाद आणि लेखणीतून झिरपलेले शब्द कुठेना कुठे नोंद केला जातोय हे ध्यानात ठेवले पाहिजे. समाजमाध्यांचा अविरतपणे केला जाणारा भडीमार याला कारणीभूत आहे. विशेषतः अमुक एका गटाला लक्ष्य करून वृत्तांकन केले जाणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही. मग ते वृत्तांकन विरोधाचे असो वा समर्थनार्थ. एखाद्याविषयीची भूमिका सांगणं आणि कसलीही शहानिशा न करता सरळसरळ त्याला गुन्हेगार वा देवदूत ठरवणं हे सध्याच्या काळातील अत्यंत कलंकित गोष्ट आहे. यात येनकेनप्रकारेण आपण सर्वजण सहभागी होतोय कळतनकळतपणे. देशात प्रत्येक घडणाऱ्या घटनेला जातपातधर्माच्या चष्म्यातून पहाणे आणि त्यावर आपापल्यापरीने सोयीनुसार भूमिका वा मत व्यक्त करणे हे धोक्याचे आहे. हे करून केवळ आपण कसे संवेदनशील वगैरे आहोत हे दाखवणे म्हणजे वैचारिक नतद्रष्टेपणाचे लक्षण आहे. भारत हा सार्वभौम देश आहे त्याचा भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पसारा हा विविधांगी आहे. त्यामुळे भारतात होऊ घातलेली स्थित्यंतरे, केले वा लादले जाणारे सामाजिक बदल हे एका दिवसात होणे शक्य नाही. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात अनेक बदल या देशाने अनुभवलेत. काही बदल सरकारातील चांगल्या योजनांमुळे झालेत तर काही सत्तापिसासू वृत्तीने लादल्यामुळे. काही बदल तर परकीय शक्तींच्या दबावापोटी देशावर लादले गेले आहेत. आपल्या देशात अजूनही कित्येक प्रश्न, समस्या आहेत ज्यांना केवळ जबाबदार नसून आपण भारतीय नागरिक म्हणून देखील जबाबदार आहोत. जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे मिरवून काही उपयोग नाही. अमुक एक पक्ष लोकशाही संपवायला आलेत वा लोकशाहीचा गाभा म्हणजे संविधान बदलले जाईल असे भितीदायक वातवरण करून आडकाठी करण्यात काही अर्थ नाही. बाबासाहेबांनी देशाला दिलेली लोकशाही इतकी कमकुवत नाही की कोणीही यावे आणि बदल करावे. त्यासाठी संविधानिक निती, नियम आणि पद्धती आखीवरेखीव आहेत. त्यानुसारच देश चालतो. लोकशाही संकटात म्हणून जनतेची दिशाभूल करणे २०१८ मध्ये तरी थांबवावे. सरकारने आणि विरोधकांनी मिळून देशाची लोकशाही अबाधित ठेवली पाहिजे. लोकशाही सुदृढ ठेवायची असेल तर प्रत्यक्षपणे नागरिक म्हणून प्रत्येकाचेच योगदान गरजेचे आहे. त्यासाठी आपण जे निवडणूकीत मतदान करतो ते प्रामाणिकपणे आणि कसल्याही जातपआतधर्माच्या निकषांवर आधारित नसावे. कित्येक पक्ष निवडून येण्याची क्षमता असलेले म्हणजे पैसा ओतणारे उमेदवारांना तिकीटे देतात आणि ते निवडून येतात ही चूक मतदान करणाऱ्यांची. इथे लोकशाहीचा आणि पर्यायाने त्याच्या साधनांचा, आयुधांचा गैरवापर होतो.
आपल्या व्यवस्थेचा गिचका झालेल्या परिस्थितीला केवळ सरकार वा विरोधक हेच जबाबदार नसून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपणही आहोत. नकारात्मक वातावरण निर्मिती करून निवडणुका आपल्या पथ्यावर पाडून कशा घ्यायच्या हे राजकीय पक्षांना चांगलेच ठाऊक आहे. महत्वाच्या प्रश्नांना वा समस्यांना फाटा देऊन नको त्या गोष्टींची चिकित्सा करण्यात माध्यमांची जूनी खोड आहे. जे खपले जाते ते आम्ही विकतो ही निव्वळ सौदेबाजी सध्या राजरोसपणे चालूय. (क्रमशः)

© भूषण वर्धेकर

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या

असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या
होय तुम्ही तिघी फार भाग्यवान आहात
तुमच्यावर झालेल्या पाशवी अत्याचाराला वाचा फुटली
सगळी माध्यमं तुमच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेत,
भारतातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिक या घटनेचा निषेध करतोय पण,
स्वार्थी, भांड मेडिया तुमच्या घटनांचा तपशील टिरापीसाठी रवंथ करतोय
हुकलेले बिनडोक राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून संधी साधून घेताहेत
संधीसाधू विचारवंत, कलावंत आपापली सोशल सेन्सेस जागरूक ठेवण्यासाठी सिलेक्टिव्ह निषेधाची नौटंकी करत आहेत
सद्सद्विवेक बुद्धी बाजूला ठेवून बरबटलेले ज्ञानी महात्मे जातपातधर्माच्या कुंठीत अस्मिता धारदार करतायत
एक माणूस म्हणून सध्याचा समाज गाभडत चाललाय
सत्तापिसासू परमपूज्य थुकरट माननीय सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांच्या उखळ-पाखळ काढण्यात व्यस्त आहेत
ज्याला त्याला आपापली दुकानदारी चालवून प्रतिमा स्वच्छ करायचीय
घृणास्पद आणि निर्घृण हे शब्द पण रुसलेत
स्वयंघोषित संस्कृतीरक्षक अजूनही आदेशाची वाट पाहत बसलेत निषेधासाठी
षष्प झाल्या संवेदना अन् विकृतीचे उदात्तीकरण
इथे सगळ्यांनाच न्यायालयाने आपापल्या सोयीनुसार निकाल द्यावा असे वाटते
कहर करतात मनासारखा निकाल नाही लागला तर
सोयीनुसार संविधान बचाव अन् निषेध यांच्या मोर्च्याचे पेड इव्हेंट होतात
तरीदेखील
असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या
होय तुम्ही तिघी फार भाग्यवान आहात
मी मात्र नाही....
मी कोण ?
मी एक अशीच पिडीत दूर्दैवी, हवालदिल स्त्री, अल्पवयीन मुलगी अन् म्हातारी
मी एक कधी शोषित तर कधी सो कॉल्ड उच्चभ्रू परंतू कायमस्वरुपी दुर्लक्षितच माध्यमांपासून, विचारवंतापासून, असंतुष्ट राजकिय गटातटापासून
मी एक अशीच सार्वभौम भारतातील प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारातील एकमेव अमुक तमुक प्रधान संस्कृतीतील अभागी अबला
मी एक अशीच सोयीस्कररित्या जातपातधर्मात वाटली गेलेली कुटुंबवत्सल
मी एक अशीच भोगासाठी आसुसलेल्या नामर्द नजरा सहन करणारी
मी एक अशीच समाजाने लादलेल्या चालीरितीत रूतल्याने स्वत्व हरवलेली
------------------------------------
©भूषण वर्धेकर
१५ एप्रिल २०१८
हैद्राबाद
------------------------------------

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी  तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघर...