गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

लग्न आणि प्रेम

लग्न आणि प्रेम

एकदा लग्न आणि प्रेम यांच्यात
कडाक्याचं भांडण झालं
लग्न म्हणाले मीच महान
प्रेम म्हणाले मीच महान

वाद काही संपेना
कोणी कोणाला जुमानेना
मग त्यांनी ठरवलं
त्रयस्थाला विचारावं

मान-अपमान समोर दिसले
सगळं  ऐकून घेउन मान-अपमान म्हणाले
आम्ही दोघे सावत्र भाऊ
मान ठेवणारा आणि अपमान करणारा
उगाच आमच्यात शत्रुत्व निर्माण करतात
प्रेमात अपमान बहुधा होत असतो
लग्नात मान ठेवला जात नाही
म्हणूम मी तुमच्यात काही बोलणार नाही

पुढे दोघांना दुःख दिसले, धडधाकट-सुदृढ
दोघांचे ऐकून ते म्हणाले, जगात माझी सारखी मागणी वाढत आहे. प्रेमात दुःख सहन करणारे सापडत नाहीत आणि लग्नात दुःख देणारे भरपूर म्हणून मी काही निर्णय देणार नाही

पुढे दोघांना दिसले सुख, निपचित पडलेले
कृश आणि अशक्त, कमकुवतपणे म्हणाले
माझी जगात फार कमतरता आहे
लोकांमध्ये राहण्याची माझी फार ईच्छा असते
पण राहता येत नाही आणि प्रेमात मला दिलं जात नाही तर लग्नात नेहमीच ओरबडला जातो म्हणून मी काही निर्णय देत नाही

पुढं दोघांना आदर आप्पा दिसले, स्वच्छ टापटीप सगळं ऐकून आप्पा म्हणाले
मी असतो जीवनसत्वांसारखा, कमी पडलो तर
आजारी करतो आणि प्रेमात कोणी मला ठेवत नाही आणि लग्नात गृहित धरल्याने मी राखला जात नाही म्हणून तुमचं तुम्ही निस्तरा

पुढं समाधानराव समाधी लावून बसलेले असतात ऐकून एकच बोलले
प्रेमात समाधानापेक्षा इतर सुखात रमता
लग्नात हव्यासापोटी समाधानी राहता येत नाही म्हणून मी काही निकाल सांगणार नाही

पुढे गेल्यावर त्याग गंभीर मुद्रेत बसलेले दिसले, चिंतन करत ऐकून म्हणाले निर्वाणीनं
प्रेमात हल्ली मी नाहीसा झालोय आणि लग्नात त्याज्य पदार्थांना जखडलं जातं मी काय तुमचा निर्णय देणार?

पुढं गेल्यावर सहवासकाका दिसले सगळं ऐकून म्हणाले प्रेमात मी अती होतो नंतर लग्नात मी पूर्णपणे संपून जातो मी काय निर्णय देणार?

पुढे दोघांना संशयतात्या दिसतात बेरकीपणे दोघांकडे पाहून म्हणतात मला तुमच्यात आणू नका मी आलो की होत्याचं नव्हतं होतं आणि
सगळं पाप माझ्या माथी मारलं जातं प्रेमात मी मनोमनी खदखदत असतो लग्नात मात्र बिनसण्यासाठी मीच कारणीभूत ठरतो

समोर समजुतदारपणा एकाकी बसलेला असतो
सगळं ऐकतो आणि म्हणतो प्रेमात मला दूर ठेवलं जातं लग्नात असूनही दूर्लक्शित केला जातो मी तर नेहमीच एकाकी असतो आधारासाठी वाट पाहत मी काय देणार निर्णय?

पुढं इर्शा-राग-कपट-चिंता-निंदा-नालस्ती  टक लावून पाहत असतात ऐकून म्हणतात
प्रेमात व लग्नात आम्ही असतोच मनामनात ताबा न  ठेवल्याने आमची वाढ होते म्हणून जगात आमची नाचक्की होते आम्ही काही निर्णय देणार नाही

हताश होऊन दोघे पुढे जातात आणि पहतात तर ब्रेक-अप आणि घटस्फोट भांडत असतात
दोघांपैकी नीच कोण?
मग काय कोण महान कोण नीच यावर जोरात रणकंदण

अखेरीस चौघांना पुढे विश्वासमामा दिसतात
मिश्कीलपणे हसतात आश्वासकपणे ऐकून निर्णय देतात
प्रेमात मी नसल्याने ब्रेक-अप होतात
लग्नात मी आस्तित्वहिन झाल्याने घटस्फोट होतात
उगाच महान कोण नीच कोण यात न पडता
प्रेमाने ब्रेक-अप होउ नये म्हणून काळजी घ्यावी तर लग्नाने घटस्फोट होऊ नयेत याची

जो यात यशस्वी होतो तो महान
कारण असं झालं नाही तर मन भावनाशून्य होते निर्दयी होतं हल्लीच्या शब्दात प्रॅक्टीकल होतं
म्हणून प्रेमात निभवावं लागतं आणि लग्न टिकवावं लागतं तरच जग सूरळीत चालतं

---भूषण वर्धेकर,दौंड.

नातं, मैत्री आणि प्रेम

नातं, मैत्री आणि प्रेम
एका कंपनीत काम करायचे
नातं एकटेच राब राब राबायचं
मैत्री कधी निस्वार्थीपणे तर
कधी स्वार्थ साधून काम करायचं
प्रेमाची तर वेगळीच गोष्ट
कधी स्वच्छंदीपणे कधी मुक्तपणे तर कधी कामात लक्ष कधी दुर्लक्ष
नात्याला कबाडकष्ट करायची
सवयच असते
मैत्रीच मात्र वेगळं चालायचं
कामाचं स्वरुप पाहून राबायचं
नाहीतर मन मारुन काम करायचं
प्रेमाचा अजब खेळ साधलं तर सुत नाहीतर मानगुटीवरचं भूत
नात्याला ओव्हरटाईमचा भारी शौक
मोबदल्याची फिकीर नाही
मैत्री मात्र मनासारखं असेल तर झोकून देऊन काम करायचं
प्रेमाची गोष्टच न्यारी,
लिमीटेड ड्युटी प्यारी
स्वतःचे ओव्हरटाईमचे रिकामे रकाने
नात्याचीच सारी मक्तेदारी
आता मात्र एक सिस्टीम आली,
काळ बदलला
नातं तसंच राहीलं बुरसटलेलं रांधत
मैत्रीने पलटी मारत सगळे हेवेदावे हेरले
प्रेम मात्र गुलछबू, आपल्याच धुंदीत
कधीतरी फसायचं तर कधी फसवलं जायचं
काळानुरुप कंपनीत आधुनिकता आली
मैत्री आणि प्रेम पुर्णपणे बदलून गेले
कल्लोळाच्या धामधुमीत कलुषित झाले
नातं मात्र कृश होत गेलं, खोलवर रुतल्यानं अधिक दृढ झालं
मैत्रीचा गोंधळ उडतो प्रेमाची धांदल, त्रेधातिरपीट
नातं मात्र अजागळपणे सगळ्यांना संभाळून घेतं
एकविसावे शतक उजाडले
मैत्री व प्रेम अनेक सौदेबाजीत अडकले
नातं मात्र खंबीरपणे उभारत होतं, निपचितपणे साथ देत होतं
मैत्रीला प्रमाची हुरहुर वाटे
प्रेमाला मैत्री कधी कधी हवीहवीशी वाटे
नातं आता वृद्ध झालं सगेसोयरांनी समृद्ध
प्रेमाचा विचका झाला मैत्रीचा इस्कोट
तरीही दोघातला छंदी-फंदी पणा कमी नाही झाला
कंपनी पण थकली नात्यासकट उतारवयात खंगली
प्रेम मात्र दुरावलं मैत्रीलाही सोडवत नव्हतं मनोमनी मांडे खात होतं
नातं मात्र अविचल. .  राग, लोभ, द्वेष,मत्सर गिळतं होतं
कंपनी मृत्युशय्येवर टेकली नातं मात्र गोतावळ्यात अडकलं
मैत्री संस्मरणीय क्षणांत रमलं. . हुसमुसलं
प्रेम मात्र विस्मरणात. .  ईतरांसाठी नकळतपणे केलेल्या ओव्हरटाईमचा हिशेब चाळत बसलेलं. . एकटं. .  एकलकोंडं . .

भूषण वर्धेकर, दौंड

प्रेमात आणि युद्धात

प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं
असं म्हणतात ...  पण खरतर ....
भावनेनं मारायचं असतं अन
मनान पुन्हा उभारायचं असतं

रडत.. कुढत.. का होईना
जगण्याच रहाट चालूच ठेवायचं असतं
जगासाठी आनंदी दाखवणं असतं..
स्वत: मात्र एकांतात झुरायचं असतं
उगाच  practical  वगैरे
जगणं अनुभवायचं असतं

एकट्याशीच संवाद साधत राहायचं असतं
काय चूक... काय बरोबर...
कोणी किती खरं.. किती खोटं
याच मोजमाप अविरत चालू ठेवायचं असतं  
उगाच स्वतःला दोष द्यायचा असतो
पण  मन मात्र तिच्यातालेच दोष टिपत असतं
आधुनिक space... Committed...  
Liberal...  secure... personal..
वगैरे शेलक्या शब्दांचे जोडे
वावगत फिरायचं असतं
स्वतःच म्हणणं ठाम असून
कोणी विचारात नसतं
नाहक सल्ल्यांचा पाऊस
सहन करत बसायचं असतं
कळत नकळत भूतकाळावर
राग येत असतो भविष्याचा विचार करायचा
देखावा करत वर्तमान
मात्र थंड असतं.. निवांत...
जगाच तार्किक वगैरे अनुभवत
स्वतःलाच खोदून खोदून पटवायचं असतं
न जाणो नवा घडेल काहीतरी असं म्हणत
असंख्य दिवस ढकलायचं असतं
काही म्हणा प्रेमात पडाव
मात्र निभावाण्यासाठीच
असं म्हणणारी बरीच
मात्र जगणारी मात्र थोडकीच
प्रेमात का व कोण याचा काही
जगण्याशी संबंध नाही उगाच पोकळीतल्या
एकटेपणाला साथसंगत वगैरे म्हणायचं असतं
काही मात्र थोर अनुभवी संत
सगळं कसं settled  करणारे
दोन्हीकडे जाऊन शब्दबंबाळ चर्चा करणारे
दिवस रात्रौ उगाच उदाहरणांचा भडीमार करणारे
अमका.. तमका... फलाना... टिमका....
स्वतः मात्र नामानिराळे
किनाऱ्यावरून पोहायला शिकवणारे
बुडणारा मात्र खडबडीत जागा होऊन
केविलवाणा ओशाळलेला.....
एककल्ली एकटाच राहणारा
शून्यात नजर लावून बसणारा
आगाउपणे व्यसनं करणारा
जगाला चुकीच्या नजरेने पाहणारा
सगळ्याच नात्यांना तुच्छ लेखणारा
नाकर्ते लोकांच्या संगतीत राहणारा...
कधी कधी जगायचं पण सोडून देणारा....
अशा जगण्याच्या मैफिलीत सर्व
अनुभव घ्यायचे असतात
काही भोगायचे असतात
काही जगायचे असतात
कळवळलो तरी मागं हटायचं नसतं
निर्विकारपणे सत्य असत्याचा मागोवा
घेत नवं जगणं अनुभवायचं असतं

भूषण वर्धेकर
२०-०२-२००८
भारत गायन समाज
पुणे

ऑफिस म्हणजे अजब जंत्री ...

ऑफिस म्हणजे अजब जंत्री ...
सगळेच करतात काम...
काही मनापासून तर काही मनाविरूद्ध
काही तर आवडीची नोकरी मिळेपर्यंत करायची म्हणून करतात..
काही जणांची पाट्या टाकण्याची जागा
काही म्हणा आवडीची नोकरी आणि समजूतदार बायको फक्त स्वप्नातच मिळते
प्रत्यक्षात मात्र खेळखंडोबा ...
ऑफिसवरून एक आठवलं ... एक आटपाट नगरातलं ऑफिस होतं ...
कामगार होते उच्चशिक्षित.. चकाचक इमारती.. प्रसन्न बैठका... मोहक वातावरण एकजण नुकताच जॉईन झाला... फ्रेशर म्हणून..
करायची होती म्हणून करत होता नोकरी... अनुभवासाठी
गड्याचं सुरुवातीला बिनसलं सोबतचे होते वयस्क ... मग काय हा तर होतकरू... अनुभवशून्य
लोकांचा वाढता कामाचा बोजा याच्यावर...विनाकारण भरपूर शिकून घे म्हणून पडायचा
एक मन म्हणायचं सोड नोकरी दुसरं मात्र रडतं-कुढत ...
एकदा काय झालं त्याची झाली चूक शिक्षा म्हणून दिलं लो प्रोफाईल जॉब
सहा महिने झाले रोज तेच.. ते... तेच... ते
कळत नव्हते काय करावे... एकदा मात्र हद्द झाली नोकरी सोडावी म्हणून सनक आली
गेला साहेबांकडे पण ते होते मिटींगमध्ये... दुसऱ्या दिवशी आल्यावर पाहतो तर काय..
चालू होती कामगारभर्ती.. गर्दीत सुखावणारे चेहरे पाहून मंदावला ..नोकरी सोडायचा विचार नंतर करावा म्हणून सरसावला..
वाटलं नवीन भर्तीत कोणीतरी गर्दीतल्या लोकांपैकी...
झालं मनासारखं.. आली ती ट्रेनी म्हणून त्याच्याच विभागात...
साहेबांनी दिली ओळख करून हा तर खुश होताच सोबतीला चांगली कंपनी म्हणून...
काळ मात्र वाइट हो.. याला जास्त दिवस ठेवले नाही कंपनीनं  त्याच्या विभागात...
दुसऱ्या विभागात रवानगी केली ... गेला सगळं हातातून.. तिने त्याला ग्रीट केले
दुसऱ्या दिवसापसुन नवा विभाग नवं काम .. नशीबान आवडीच काम तर मिळवून दिलं ..
मन मात्र तिकडच रमलं.. मग काय हळूहळू चोरून पाहणं आलं .. ओरकुट वगैरे फ्रेंड लिस्ट मध्ये आणि फॅन लिस्ट मध्ये येणं झालं...
हा मात्र नाराजच.. रोज रोज लांबून पाहणं.. कामापुरतं हाय बाय बोलणं
जेवणाच्या सुट्टीत मंद हसणं वगैरे चालूच होतं ...
हळूहळू आणखी काही दिवस गेले दोघेही छान त्यांच्या त्यांच्या कामात रमले...
अचानक एक असाईन्मेंट आली ...तिच्या आणि ह्याच्या विभागाची मीटिंग झाली..
कर्म धर्म संयोगाने दोघांकडे जॉईन्ट टास्क आलं
मग काय .. मन कसं आनंदलं
हा कधी नव्हे तर ऑफिस वर वेळेच्या आधी
रंगीबेरंगी भावनांचा कल्लोळ उगाच काम करायचा शिरजोर
दोघेही कामात तसे तरबेज
हा मात्र एकांतात कुठेतरी गुंतलेला.. काम तसं झकास होतं  चालू..
हा मात्र डिप्रेस उगाच तिने समजूत काढावी म्हणून...
कामाव्यतिरिक्त भेटावं म्हणून... रिलॅक्स होण्यासाठी...
ती मनमोकळी बिनधास्त .. संध्याकाळी थांबू म्हणाली कॉफी घेऊ म्हणाली
मग मात्र हा खुश झाला मनोमन ...
कधी नव्हे तो दोघांची कामे करून फ्री झाला... फ्रेश तर मनापासूनच होता
संध्याकाळ व्हायची वाट पाहत होता,...
संध्याकाळ झाली... कॅफेत गेली.. snacks आले कॉफी आली... डिस्कशन झाले...
आवड निवड शिक्षण वगैरे ... आदानप्रदान
दुसऱ्या दिवशी कसं एकदम ताजतवानं.. फ्रेश वगैरे..
काम होत आलं पुन्हा भेटणं झालं.. पुन्हा कॉफी .. वगैरे....
जॉईन्ट टास्क पूर्ण झाल.. अभिनंदन झालं.. वर्षा अखेरीस event झाला.. मग काय जो तो आपापले कलागुण दाखवू लागला .. खेळप्रकार उदंड झाले..
हॉटसीट .. ड़मशिराज.. डेअर टू विश ... गाण्याच्या भेंड्या .. Q & A ..वगैरे वगैरे..
ह्याच्या कवितांनी कार्यक्रमाची सांगता झाली.. सगळेच अवाक.. हा कविता सुद्धा करतो.. कौतुकेच कौतुके ...
ती सुद्धा खुश होऊन म्हणाली मला कधी  तू बोलला नाहीस..कविता करतो म्हणून..
तो हळूच म्हणाला आपण पर्सनल कधी बोललोच नाही.. ती मात्र खुश..
म्हणाली एक दिवस भेटू खास तुझ्या कवितांसाठी...
ह्याला तर काय सार्थक झाल्यागत वाटलं
कवितामुळेच राणीमार्ग सापडला...
मग ठरलं... भेट झाली.. काव्यवाचन झाले.. दोघे पण मस्त.. कॉफीचे घुटके.. चमचमीत पदार्थ ... आणि ह्याच्या कवितांचे अर्थ.. अशाच भेटी व्हाव्यात म्हणून ह्याच्या मनातल्या मनात शर्थ ... असो पुढे काय हळूहळू दोघे रुळले...
गाठीभेटी वाढल्या sms सुरु झाले उदंड ...
ह्याच्या मनात बरचसं दाटलेलं.. कॉलेज मध्ये असेच अव्यक्त राहिलेलं होतं
हे हातातून जाऊ नये म्हणून मनोमन काहीतरी जळत होतं.. अचानक एके दिवशी रात्री फोन आला तिचा.. उद्या मी चाललेय बाहेरगावी भेटू नाही शकत काही दिवस तिकडून स्पष्टोक्ती
मग याला झाली होती सवय sms आले गेले.. खूप miss झाले...
हा मात्र गदगदला असं आधी कधीच झाल नव्हतं.. उगाच सवय झाली म्हणून असं होत असावं म्हणून मनाला समजावत होता.. पण मन तर तिकडचेच झाले होते.. गेले कसेबसे तीन चार दिवस ती आली पुन्हा .. ऑफिस झाले सुरु.. गाठी भेटी पण झाल्या ..हा बाबा नव्या जोशात अवतरला.. मनात काहीतरी बोलायचं ठरवून तिच्याकडे गेला
ती मात्र नेहमीप्रमाणेच हाय.. बाय.. कसा आहेस वगैरे.. वगैरे..
भेटल्यावर कळलं ती गेली होती मूळगावी... मग इकडच्या तीकडच्या गप्पा .. किस्से..
ह्याला मात्र वेगळेच टेन्शन... त्यात तिला आला फोन..
आज मात्र हळूच गेली बाजूला बराच वेळा बोलत .. हा बसला ताठकळत ..
ह्याची झाली बत्ती गुल.. कोणाचा असेल हा फोन.. कोणाशी बोलत असेल ही.. हात पाय लटपट ..या आधी असं कधी नाही घडलं
एक न अनेक प्रश्न .. न लक्ष्य खाण्यात न पिण्यात ...
एकटक तिच्या दूरवरच्या बोलण्यात...अखेर ती आली निघते म्हणत लगोलग निघाली
हा नाखुषेने हो ठीक आहे परत उद्या म्हणून निघाला...
झालं आठवडा याचा असाच गेला हुरहूर मनाची वाढत गेली
ह्याच तिला फोनवर बोलताना पाहणं.. उगाच काळजात धस्स होण... सारख तिचाच विचार करण.. मन मोकळ कराव असे सारखे वाटणंकाय वाट्टेल ते होईल.. सगळं कसे सांगून मोकळ व्हायचं... खुरडत कुठवर जगत राहायचं
मग पुन्हा कॉफी.. वगैरे खाण पिणं ...गप्प्पा टप्पा...आली एक वेळ.. साधला याने मेळ
बोलून टाकलं सगळं.. कसं झालं मन मोकळ मोकळ
ती तशी practical.. शुद्ध न हरपता सहज बोलली.. हे तुला आजच कां सुचलं
त्यान तिला सगळ खर खर सांगितलं... मग ती ओशाळली .. आधीच का नाही बोललास .. आता मात्र उशीर केलास.. मुळगावी माझ ठरलं.. त्याला मी कधीच हो म्हटलं...
तो जागेवरून आठ इंच उडाला .. म्हणजे आधी कां नाही बोलला याचा अर्थ काय?
म्हणाली ती.. मी विचार केला असता.. तुझ्या प्रस्तावाचा.. तुला होकार देण्याचा विचार केला असता.. तुझ्यात काहीच कमी नाही.. पण असू देत आपण चांगले मित्र राहू.. आहोत आणि तू जास्त गुंतू नकोस म्हणून नुघून गेली.. आता मात्र भेटीगाठी मंदावल्या.. तिच्या साखरपुड्याची, लग्नाची  तारीख ठरल्याची वार्ता आली... तो विस्कटला... गहिवरला.. एकटा एकलकोंडा राहू लागला...गर्दीतपण एकटाच चालू लागला.. स्वतःला स्वतःचा राग येऊ लागला...
पुन्हा ऑफिस.. पुन्हा काम..सवयीच झालं... मन मात्र कुठेतरी झुरू लागलं तिचे हाय बाय चालूच होते पण कोरडेपणा वाढला..
बोलण्यातला कृत्रिमपणा जाणवला..... मनाला लागलेली तडस संपायला वेळ लागला...काळ सरला.. हा रुळला ... नोकरी सोडावी हा विचार पुन्हा डोकावू लागला..
झाली नव्या नोकरीची शोधाशोध.. मिळाली नोकरी पार्टी झाली सेंड ऑफ झाला..
तिने खास भेट दिली कॉफीचा मग..
नव्या नोकरीत हा रमला.. तिचे पुढे व्हायचे ते झाले.. हा मात्र खूपच दुरावला जाणूनबुजून ऑरकुट  पाहू लागला...
बराच काळ गेला.. हा पण नव्या मित्रात रमला.. मन मात्र रुक्ष रुक्ष...
पुन्हा ती भेटली जरा एकटी एकटी वाटली..
ह्याने पाहताच थबकली...
हाय हेलो झाले.. कसा आहेस.. काय करतोस.. कुठे असतोस.. वगैरे वरवरचे बोलणे झाले..
तीच कसे सुखात चालू असेल असं याच्या मनात चालू होतं.. ती मात्र कोरड्याने बोलत होती...
मग पुन्हा एक दोनदा गाठी भेटी...
तशी ही त्याला टाळू लागली.. ह्याची बेचैनी आणखी वाढू लागली..
मग मात्र याने पुढाकार घेत सगळ काय आहे म्हणून विचारणा केली.. हळूहळू ती मोकळी झाली... practically कोण कसं चुकल सगळ कसं पारदर्शीपणे सांगू लागली...
ह्याला मात्र वेगळाच अनुभव आला तिच्यातून बाहेर पडून त्रयस्थपणे  जगाकडे पाहू लागला..
मग कधीतरी असेच भेटणं होते.... ती एकटीच हा एकटाच..
एक सुन्न शांतता...
कॉफीचे मग रिते होऊ लागले..
निशब्द शांतता..
रस्ते वाहतात.. दिवे लागतात...दिवस जातो येतो... पुन्हा त्याच ठिकाणी ते भेटतात... वरवरच्या गपा गोष्टी.. अगम्य शांतता.. स्तब्ध संवाद ...मनातल्या मनात कल्लोळ...

--------------------------
भूषण वर्धेकर
मार्च २००७
पुणे रेल्वे स्टेशन
-------------------------

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

रिकामे साक्षीदार

आपण फक्त रिकामे साक्षीदार
जगात चिरकाल फक्त काळ
शेवटल्या श्वासाचे दावेदार
बाकी उर्वरीत संथ मवाळ

गर्क आयुष्यातल्या सुंदोपसंदी
अकल्पित वास्तवाच्या गाभ्यात
मखमली दूरस्वप्ने मावळती
संसारचूलीच्या निवलेल्या राखेत

पूर्वापार श्रद्धेची खंगलेली जळमटं
सणासुदीच्या उभ्या आडव्या भिंती
चौफेर आयुष्याला व्रतवैकल्याची चौकट
घुसमटीची बंदिस्त दिखाऊ बांधिलकी

मुदतीच्या जगण्यातला एकसूरी पाठ
उपजीविकेसाठी दाही दिशा फरपट
पोटाच्या भुकेला पर्याय भरमसाठ
निर्दयी नियतीचं काळाशी साटंलोटं

मृत्यूच्या फेऱ्याला दैवाची बोळवण
मातीमोल देहास किरवंताचे संस्कार
पाप-पुण्य, गतजन्माची तार्किक उधळण
अखेर उरतो एकाकी काळाचा आधार

भूषण वर्धेकर
29-10-2015
रात्रौ 10:30
हडपसर

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

देवा तुझी कमाल आहे

देवा तुझी कमाल आहे
भक्तांचीपण धमाल आहे
राजरोस उपास आहेत
उपासनेचा वाणवा आहे

प्रत्येक वार ज्याचा-त्याचा
उर्वरीत खेळखंडोबा
उत्साही लोकांचा महापूर
चंगळवाद भौतिकवादी

खाबुगिरीसाठी धर्मदाय संस्था
सोन्या चांदीचा ढीग
पैशांचा जोर दररोज
तोंडदेखलेपणा समाजसेवांचा

भक्तीचा अलौकिक गजर
कार्यकर्त्यांच्या ताफ्यात DJ वगैरे
फ्लेक्स मात्र डोंगराएवढे
कर्तृत्वाची बंद कवाडे

ज्याचा-त्याचा धर्म, पंथ
ज्याचा-त्याचा महापुरुष
जयंत्या पुण्यतिथ्या आधी व नंतर
साप्ताहिक सोहळे सुरुच

गर्दी खेचण्याची स्पर्धा
रेलचेल करमणूकप्रधान कार्यक्रमांची
विचारवंतांचा वाणवा
बजेट सँक्शन करणाऱ्यांचा
जलसा. . मिरवणुका. . सत्कार. .

गल्लोगल्ली हीच बोंब
तरूण म्हातारे सगळे एकछत्राखाली
महिलांसाठी आघाड्या
स्त्री सुरक्षा रामभरोसे

जगात आपणच भारी
आपला महोत्सव भारी
यांतच युवा नेते  जुंपले
विचार आचार  आशय वगैरे
गतकाळापुरते राहिले

आता केवळ संख्यात्मक पाठबळ
टक्केवारी निरंतर
जात पात कागदोपत्री
लिफाफे लालफिती धुळखात

धांगाड-धिंगाचा कळस
हिशेबाचा ना ताळमेळ
खर्च बिनभोबाट
नंतर आहेच खंडणी वर्गणी वगैरे

कहर झालाय समाजात
तुटत चालले दूवे
दैनिकांची बोटचेपी भूमिका
जहिरातींसाठी हेवेदावे

महापुरुषांचा देवदेवतांचा
अजब धांडोळा
या देशी पुन्हा पुन्हा
सामाजिक परिवर्तन पाठ्यपुस्तकी
वार्षिक परिक्षांसाठी

भूषण वर्धेकर, दौंड
4-4-2015
8:15 PM

पत्र क्रमांक नऊ

आज मी असे लिहितोय या मागे केवळ एकच उद्देश आहे, तो म्हणजे माझ्या मनातील वेदना मोकळ्या होणे. तसेही ह्या बाबतीत कोणाशीच बोलू शकत नाही. गेले १५ दिवस मला कळत नाही कसली तरी अनामिक ओढ तुझ्याकडे खेचतेय. मी याला प्रेम म्हणून शकत नाही कारण ते दोन्ही बाजूने असेल तरच घडते. एरवी क्रश किंवा एकतर्फी गुंतणे असावे असे वाटते. मला नक्की आठवतेय गेले वर्षेभर मी कधीच तुला पाहून अशा पद्धतीने व्यक्त होत नसे. कारण तेव्हा तुझ्याकडे पाहून मला कसलीच हूर हूर वाटत नव्हती. मात्र जसे मी IPL सामना पाहून आलो आणि त्या नंतर एकूण माझ्या जगण्यात प्रवाहाचे वारे वेगळेच वाहू लागले. म्हणजे अगदी गेल्या १५ दिवसात  एकाएकी तुझ्याकडे आकर्षिले गेलोय. एरवी तू फोनवर कोणाशी बोललीस, ऑफिसमध्ये कोणासोबत बोललीस, अगदी मित्रत्वाच्या नात्याने तरी मला काहीच वाटत नसे. मात्र गेले १५ दिवस तुला पहिले की फारच हूर हुर ,धडधड आणि हात पाय कंप पावतात. तुला कोणासोबत बोलताना पाहून फार बेचैन होतोय. कदाचीत खूप खोलवर जाऊन तुझा असा लाईफ पार्टनर म्हणून मी विचार केलाय का? कळत नाही.  कारण मला अफेअर वगैरे आवडत नाहीत चिरकाल टिकणारी नाती आवडतात. आणि महत्वाचे म्हणजे माझ्या मनातील माझी बायको कशी असावी त्या फ्रेम मध्ये तू अगदी तंतोतत बसतेस. अजून गुंतून पडून  त्रास होऊ नये म्हणून लागलीच काही गोष्टी स्पष्ट करतोय. का कुणास ठाऊक तूच का ती मुलगी असावीस वाटते माझी लाईफ पार्टनर म्हणून.. असो मी जास्त लिहित नाही उगाच महाकाव्य वगैरे लिहायचो तुझ्यावर.... तू जर कमिटेड असलीस तर प्रश्नच येत नाही माझ्या या भावनिक गुंतागुंतीचा. मात्र तुला जर माझ्याबद्दल काही वाटत असेल तर नक्की सांग कृपया या पत्राचा गैरार्थ घेऊ नकोस. मला फारच त्रास होत आहे म्हणून हे पत्र तुला पाठवतोय. प्रत्यक्षात बोलायचे होते. पण  खूप घाबरतोय प्रत्यक्ष बोलायला. पण माझे असे लिखित का होईना तुला कळणे गरजेचे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच.  तुझ्यात खूप गुंतून पडू नये यासाठीच हा प्रयत्न. नाहीतर उगाच त्रास होतो. तुझे जे उत्तर असेल ते स्वीकारायला माझे मन तयार आहे. कधीतरी वेळ मिळाला तर भेटून यावर सविस्तर बोलूच. पण काही म्हण कदाचित तुला माझा हा मूर्खपणा वाटेल पण मला तुझ्याशी बोलायला आवडेल. उगाच मनात एक भाव ठेऊन तुझ्याशी इतरांसारखे खोटे बोलता येत नाही. जे आहे ते स्पष्टपणे बोलणारा व लिहीणारा माणूस आहे मी. मग कोणाला राग येवो अथवा न येवो मला त्याचे काही देणंघेणं नाही. तुझ्यासोबत एक बोलायचं आणि तुझ्या मागाहून तुझ्याबद्दलच वेगळं बोलायचं असा तोंडपुजलेपणा मला जमत नाही आणि जमणं अशक्य आहे. अमुक कोणाला चांगलं वाटेल वाईट वाटेल म्हणून माझं अभिव्यक्त होणं मी सिमित करू ईच्छित नाही. तुला माझ्या या पत्राने काय वाटेल यापेक्षा माझं व्यक्त होणं मी महत्वाचे मानतो. तू याची दखलच घ्यावीस असा माझा अट्टहासदेखील नाही. एकूणच आजकाल तुला अमेरिकेतून फोन येतो आणि तो आल्यावर तुझं कामात दुर्लक्ष होतं यावर सध्या उगाच गॉसिप चालू आहे. तुझ्यासमोर एक बोलणारे माझ्यासमोर मात्र तुझ्याबद्दल वेगळंच बोलतात. याची मला चीड पण येते आणि अशा लोकांची किव पण येते. मनातून झूरत असल्याने कदाचित असा तुझ्याबद्दल त्रास होत असावा. एकूण मेंदूत अशा काही रासायनिक अभिक्रिया होतात ज्यामुळे आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी हूरहूर वाटणं सहाजिकच आहे. हे सगळं नैसर्गिक आहे. आकर्षण आहे की एकतर्फी प्रेम हे तुझ्याशी बोलूनच स्पष्ट होईल. अर्थातच तुझी इच्छा असेल तरच. तुझ्या नकाराधिकाराचा मी निश्चितच आदर करेन. होकार किंवा नकार हे निष्कर्ष माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे नाहीत. आत्ता जे जगतोय, जे अनुभवतोय याची मला जमेची बाजू वाटते. मानवी संवेदना कधी उफाळून येतील याचा काही नेम नाही.  त्यात कळत नकळतपणे तुझ्याकडे ओढला गेलो याचं मला नवल वाटतं. एकाएकी कोणाविषयी तरी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण तसंच मनात ठेवणं आणि नंतर बोलायला पाहिजे होत अन् तसं करायला पाहिजे होतं असं घुसमटीत अडकण्याला काही अर्थ नाही. तुझ्याबद्दल मला अत्यंत आदर आहेच. तटस्थपणे विचार करणारी तू मुलगी आहेस हे मी जाणतो. तुला माझ्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी मी असं लिहीत नसून माझं आत्मगत तुजबद्दलचं लिहीत आहे. एक माणूस म्हणून व्यक्त होणं याला प्राध्यान्य मी देतो. चूक की बरोबर ज्याचं त्यानं ठरवावं हे माझ्या जगण्याचं तत्वज्ञान आहे. तू एक सुस्वभावी सून म्हणून माझ्या घरात नक्कीच सामावशील. मी कुटुंबव्यवस्थेवर निस्सीम श्रद्धा असलेला मनुष्य आहे. लग्नासाठी मन जुळावी लागतात त्यात तुझ्या लग्नाची बोलणी, मुलं पाहणं वगैरे घरी चालू आहे असे कळले म्हणून असा खटाटोप करतोय. माझ्याबाबतीत सकारात्मक जर विचार केलास तर माझी निवड करून चूक केली अशी खंत तू उभ्या आयुष्यात तुला होऊ देणार नाही याची हमी मी देतो. उगाच हिरोगिरी म्हणून मी हे बोलत नाही तर जे चांगले करेन ते केवळ तुझ्यासाठीच करेन आणि तुला कसलेही दुःख होणार नाही याची जीवापाड काळजी घेईन. असो हा जर तर चा मामला आहे. तसही या जर तर वरंच माणसाचं सगळं आयुष्य अवलंबून असतं. योग्य वेळी व्यक्त होऊन मन पाण्यासारखे स्वच्छ असावे. उगाच नंतर हुरहुर वाटून काय उपयोग?  एकूण मी जगण्याकडे प्रवाही पद्धतीने पाहतो. यथार्थपणे आस्तित्ववादाशी माझ्या जगण्याची नाळ जोडली गेली आहे. असो मी माझं जगण्याचं तत्वज्ञान सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच करीत नाहीए. लौकिकार्थाने माझ्या मनातील माजलेलं काहूर शांत करण्यासाठी असं लिहू लागलोय. सर्वार्थाने तुझ्या बाबतीतच मला का असे वाटू लागलेय याचे मला कमालीचे आश्चर्य वाटते बुआ! वय जसं वाढत जातं पसं आपण एकाकी आहोत अशी उगाच एकल जाणीव होऊ लागते. अन् तसंही गद्यपंचवीशी उलटल्यावर संसार लगन याकडे नैसर्गिकपणे आकर्षिले जातोच मनुष्य! त्यात एक सामाजिक व कौटुंबिक जाणीव असतेच. अखेरीस तारूण्यसुलभभावना ह्या असताततच की? अशा मनस्थितीत तुझ्याकडे आकर्षित झालो एवढेच! यात काही मला गैर वाटत नाही. आणि एक महत्वाचे मला सांगायचे आहे की आपण एकाच गावातील असल्याने तुझ्या कुटुंबियांना माझे घरातले बऱ्यापैकी ओळखतात. जर तुला माझ्याबद्दल खरंच काही वाटत असेल तर मी रीतसर लग्नाची मागणी घालायला तयार आहे. माझ्या घरातल्यांना तू पसंत पडणार हे नक्की! शिवाय सध्या माझ्या लगनासाठी मुली पाहणे वगैरे सुरु होईलच. तुझी हरकत नसेल तरच ह्या गोष्टी पुढं नेता येईल. एकंदरीत आयुष्याची गंमत आहे बघ एरवी लगनाचा विषय निघाला की मी टाळाटाळ करतो. पण तू जशी मला आवडू लागलीस तशी लग्नाळू स्वप्नं पडू लागलीत!तसा त्यात एकतर्फी रमलोय सुद्धा ! मजेशीर आहे बाबा हे आयुष्य ! कलाटणी देणाऱ्या घटना कधी घडतील याचा काही नेम नाही. कदाचित मी भावूक झालोय यामागे आपण गाववाले आहोत हेही कारण असू शकते. कारण एकाच गावाशी निगडीत असल्याने लाईफ पार्टनर बद्दल असणारी असुरक्षितपणाची भावना तुझ्याबाबतीत राहिली नाही.  नाहीतरी हल्ली जो तो असुरक्षित मानसिकतेचा बकरा बनलाय.  माझा जोडीदार कसा असेल, त्याच्या कसल्या भानगडी वगैरे तर नसतील ना, तो स्वभावाने कसा असेल असे एक ना अनेक मध्यमवर्गीय प्रश्न सगळ्यांनाच पडतात. त्यातून मी ही सुटलेलो नाही.  जेव्हा तुझा विचार करतो तेव्हा वेगळ्याच रोमॅन्टिसिझममध्ये असतो मी! का कुणास ठाऊक असे मी आजवर कधी अनुभवले नव्हते. तसा माझा भविष्यावर विश्वास नाहीए. पण हल्ली रोज भविष्य वाचण्याचे वेडगळ प्रकार चालू आहेत.  कुठेतरी मनपसंत जोडीदार मिळेल असं वाचलं की सातवे आसमानपर असतो मी!! तसा हा वेडपटपणाच आहे हा. पण शेवटी माणूस म्हटलं की असं होतं असतेच. कोणी याला नावे ठेवतो तर कोणी टाळत असतो. मी मात्र या जगण्याचा मनापासून आनंद घेतोय! रोज नवे कपडे घालून येतोय. पहिल्यांदाच असं प्रेझेंटेबल राहतोय. असो माझ्यात होणारे बदल हे मला चांगलेच लक्षात येऊ लागलेत. जगण्याची मौज अनुभवतोय ! नियतीने काय वाढून ठेवलंय हे काही कोणीच सांगू शकत नाही. मनासारखं घडलं तर आनंदाने जगायचं अन् नाही घडलं तर त्रयस्थपणे जगण्याकडे पाहत पुढं जायचं या पलीकडे जाऊन आपण काही करू शकत नाही. जे आहे ते तसंच आहे असं स्विकारून जगण्याचे मौलिक जाणणारा मी एक मितभाषी माणूस आहे. अशी माझ्या जगण्याची स्पंदनं आहेत असं म्हण हव तर ! काळाच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्यानुसार होणाऱ्या बदलांशी समन्वय साधून आजवर जगत आलोय. आयुष्याकडे खूप सकारात्मकतणे पाहतो मी. असो एवढेच सांगतो की एकदा विचार करून तर बघ  निराश तुला कधीच होऊ देणार नाही.  तुझ्यासाठी मी एक अखेरची संधी नक्कीच असेन. डिअर ईज अ पर्सन हू गिव्ह्स लास्ट चान्स अगेन ऍण्ड अगेन
तुझा होण्याची वाट पाहत बसलेला  एक...  एकटा... एकलकोंडा...
1 मे 2015 

पत्र क्रमांक सहा

अनाहूत असे पत्र लिहितोय त्याबद्दल क्षमस्व !
सर्वप्रथम हे जाहीर करतो की, प्रस्तुत लिखाण म्हणजे रुढ अर्थाने प्रेमपत्र वा तत्सम कसलाही प्रकार अजिबात नाही. केवळ माझ्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन द्यावी या साठी केला गेलेला हा पामर प्रयत्न आहे.

एक महत्वाची बाब मला विशद करावीशी वाटते की मी हे असे पराक्रमी लिहून तुझे मन वळविण्याचा  किंवा माझ्याबद्दल विचार करण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत नाही.. वा तसा तुला विचार करायची गरजच नाही. तू तेवढी करारी आणि बाणेदार आहेस.. ( अरे हो की हाही गुण मला तुझा भावला होता!) तुला माझ्या केवळ शुद्ध भावना कळाव्यात हाच एकमेव हेतू ह्या लेखणात आहे...

आजवर जे काही दोन आठवड्यात घडले वा नकळतपणे घडवले गेले ते विलक्षण होते. एकूणच माझ्या हातून जे घडले ते कसे वा का घडले? ते अजून मला उमगत नाही. आजवर असे भावनाविवश वगैरे होणे मला पहिल्यांदाच  भावतेय. कारण मी स्वतंत्र विचार करणारा समाजशील प्राणी आहे. माझ्या जगण्याच्या आखीव-रेखीव अशा पाच मिती आहेत. वाचन -लेखन-मनन-चिंतन-सूक्ष्म निरीक्षण. या सर्वांचे प्रवाही सिंहावलोकन म्हणजे माझे जीवन.

एकूण मौज आहे बरं का? कोणी एक मुलगी माझा  असा मानसिक कल्लोळ करेल असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. मुळात मला आजवर ज्या मुली आवडल्या त्यांच्यापाशी मी अशाप्रकारे कधीच व्यक्त झालो नाही. कारण मध्यमवर्गीय संस्कार !!!! आजकाल सभोवतालचे वातावरण खुप बदललेलं होतं. तुला सांगितलेलेच आहे की घरी माझ्या लग्नाचा विचार चालू आहे. मग काय, चर्चा , गप्पा, टोमणे सगळे कसे मजेत रमले... त्यात १ जुलैला मी रात्री जिलाटो इटालिनो मध्ये आल्यावर नकळतपणे तुला पाहून जरा वेगळेपणा वाटला.. थोडेसे अंतर्मनात डोकावले व माझ्या घरात साजेशी, सोज्ज्वळ, सुसंस्कृत अशी व्यक्ती - माझी पत्नी म्हणून तू म्हणून यावीस असे वाटले. अर्थात मला प्रेम भानगडी वगैरे तकलादू प्रकार अजिबात रुचत नाहीत. वा त्याबद्दल मला फार राग आहे. असे प्रकार म्हणजे केवळ वरवरची गरज भगवण्याचे सोपस्कर आहेत- मग ते शारिरीक असो वा मानसिक.

मला तुझ्याशी लग्न करायचे या सभ्य हेतूने मी ११ जुलैला "तसे" व्यक्त झालो. म्हणजे हल्लीच्या भाषेत प्रपोज केले. अर्थात लग्नासाठीच. मात्र त्यावेळी पुढे माझी एवढी अतोनात घुसमट होईल असे तिळमात्र वाटले नव्हते. का कुणास ठाऊक डोळ्यात मला चक्क होकार दिसला होता. त्यात मी गणपती मंदीरात बोलवले की तू आलीस. मला वाटले सगळे कसे मनासारखे होतेय... त्यात तू विचार करुन सांगते म्हटल्यावर मला तोळाभर  मांस चढले. मला वाटले की तू होकरासाठी विचार करायला वेळ घेतला.  मला तुझ्याबद्दल काही फिलिंग्स नाहीत असे त्याच वेळी सांगीतले असतेस तर पुढे होणारा माझा एवढा मानसिक त्रास वा वैचारिक कल्लोळ तरी वाचला असता...
असो  मला तुला प्रतिप्रश्न करायचा किंचीतही अधिकार नाही. मुलींच्या मनात काय चालते याचा ब्रम्हदेवाला सुद्धा सुगावा लागणे शक्य नाही त्यामुळे मी विचार करणे म्हणजे करंटेपणाचे ठरेल. एकूण मी आजवर मोकाटपणे जगलो. व्यासंगी म्हणून वावरलो. स्वत:च्या जगण्याच्या व्याख्या मीच करून मौजेने फिरलो. सुख-दु:ख, आर्थिक चणचण वगैरे क्षुद्र गोष्टींचा त्रास आनंदाने सहन केला. मात्र ’असा’ त्रास सहन करणे माझ्या परीने फार जिकरीचे आहे.. म्हणून हा लेखन प्रपंच....

एकूणच कुतरोड होऊ लागली की माणूस विलक्षण निराश होतो. अगदी तसेच माझे होत असावे. मी  कुटुंबसंस्था मानणारा आहे.त्यात लग्न ही पराकोटीची, मांगल्याची, सोळा संस्कारातील महत्वाची घटना आहे. मला माझ्या भावी सहचारिणीमध्ये जे गुण, स्वभाव हवे होते ते तुझ्यात दिसले. हीच सुरुवात तुझ्याकडे आकर्षिले जाण्याची. कारण मला आकृष्ट करण्याजोग्या ज्या काही बाबी आहेत त्या तुझ्यात ओतप्रोत आहेत....त्यात माझ घर धर्मिक, सणासुदीचं प्रचंड जोपासना करणारे.. त्यात जुलै ऑगस्ट  महीने सुरु झाले की (मराठी महिन्याप्रमाणे श्रावण सुरु झाला की) माझे मन फार एकाकी असल्याचे जाणवते... कोणीतरी आपले असावे याची हुरहुर फार वाटते.आणि नेमके याच दिवसात महाविद्यालये सुरु होतात. त्यातून मी पुण्यामध्ये शिकलेला मुलगा... तिथे ज्या मुली पाहण्यात आल्या त्याबद्दल मी आता काही सांगू ईच्छित नाही.. यावर किमान मी एक प्रबंध लिहू शकतो .. एवढा माझा अभ्यास आहे.... असो... त्यामुळे तुलना करायची झालीच तर तू त्यांच्यापेक्षा फार वेगळी आहेस... सालस, सभ्य, सुसंस्कृत, घरगुती वगैरे वगैरे.. म्हणून मला तुझ्याकडे एक विलक्षण जागृत ओढ वाटली... कदाचित यालाच प्रेमाची सुरुवात म्हणत असावेत... एकतर्फी
तुझ्याबाबतीत मी तुझ्या नकाराधिकाराचा कधीच विचार केला नाही. मला तू आवडतेस म्हणजे मी तुला आवडायला पाहिजेच असे काही नाही. हा दुधखुळा विचार मी केला.तसंही हे एक छान झाले माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला योग्यवेळी....  कारण आजवर माझा असा भ्रम होता की मुली मुलांचा विचार करताना त्याचा स्वभाव, कौशल्ये, विश्वास व कुवत पाहतात. या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत... पण असुरक्षितता आहे ती पैसा..अडका..घर.. गाडी वगैरेची...
या व्यवहारी जगात असा सो-कॉल्ड विचार करने स्वाभाविक आहे.. शिवाय माझ्याबद्दल जर तुला काहीच वाटत नसेल तर ईतर बाबींचा तपशील व्यर्थच म्हणावा लागेल.... त्यात तुझा जो निर्णय आहे तो मला शिरसावंद्य ! उगाच तुझ्या मागे पुढे करून तुझे मन वळवायला ना तुला आवडणार अन् माझ्या तत्वात असे अवास्तव नाही बसत.

मुळात  भावना ही मनाच्या केंद्रस्थानी असते तीच तुला नाही तर मी कितीही प्रयत्न केले तरीही काही उपयोग नाही. हे सगळे सिनेमामध्ये चालते... आणि मी आयुष्याकडे खूप प्रॅक्टिकल म्हणून पाहणारा आहे.. मला वास्तववादात जगायला आवडते... कारण  माझ्या एकूण सामाजिक जाणीवा आणि बौध्दिकं वास्तववादाच्या जवळीक साधणारे आहे... असो... जड लिहायला नको... उगाच साहित्यिक अंगाने लिहू लागायचो...

कारण मला अजून समजत नाही की तुझा नकार मी का पचवू शकत नाही? मला तुझ्याशिवाय दुसरी कोणी भावेल असे आत्तातरी वाटत नाही.. किंवा एकदा दुधाने तोंड पोळले तर ताकसुद्धा फुंकुन प्यावे लागते.. अशा प्रकारे मी पुन्हा असे प्रयत्न करीन मला वाटत नाही. किंवा मी तुला गृहीत धरले... तुझे कोणीतरी असेल वा घरगुती अडचणींमुळे तू नकार देत असावीस असा विचारच मी कधी केला नव्हता.. आज असे लिहिताना मला प्रकर्षाने जाणवतेय... असो... काहीतरी हरवल्यागत झालेय.. परीक्षेत बसण्याआधीच नापास झालोय. अशी हृदयद्रावक अवस्था झालीये.

कारण मी तुझा खुप खोलवर विचार केला होता... तुझ्याकडे बौद्धिक, वाचिक असे सर्व काही पक्के दुवे मला आढळले होते.. आणि ते तुझ्यात पुरेपूर आहेत...  ते मला भविष्यात एक सहकारी म्हणून उपयोगी पडणारे आहेत.. नाटक.. सिनेमा... महितीपट.. साहित्यविषयक वगैरेंसाठी... त्याच स्वप्नात मी रमलो होतो.. मनाचे ईमले रचू लागलो होतो... मनसुबे आखू लगलो होतो.. तुला माझ्या सारखा मिळणार नाही अश्या भ्रमात राहीलो होतो...तुझ्या आजपर्यंच्या माझ्यासोबतच्या वागण्याचा, बोलण्याचा हसण्या-खिदळ्ण्याचा वेगळाच गैरसमज केला होता ... असो...
आता मला काहीतरी सांगायचे आहे ते लिहितो... माझ्याबद्दल तुझ्या मनात जे स्थान होते ते मी कायमचेच गामावून बसलोय... व पुन्हा ते मला मिळणार नाही... याची मला पुर्ण खात्री आहे. तरीही माझे तुझ्या बाबतीत असे का व्हावे... त्यबद्दल केलेल्या चिंतनातून...मननातून असे लिहिते झलोय... माझी निवड ही नेहमीच सर्वोत्कृष्ट असते.. आणि ती मला प्राप्त झाली की सर्वश्रेष्ठ होते...... एकूणच मला जिच्यामुळे आयुष्यात असा पहिल्यांदा त्रास झाला तिला हे कळावे की मी कसा आहे हाच सभ्य हेतूने ह्या लिखाणाचे शिवधनुष्य पेलले आहे. एक नमूद करतो की ह्या लेखनाद्वारे मी माझी सालंकृत बाजु मांडू ईच्छितो...
एकतर मी माझे आत्मचरित्र वगैरे सांगणार नाही.. कारण मला आत्मचरित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचे वाटते... चारित्र्याला चिंतनाची जोड असेल  आणि वैचारिक बैठक पक्की असेल तर सर्व गोष्टी पाण्यासारख्या स्वच्छ दिसतात. तसेच माझे आहे...

तुझ्या मनात माझेविषयी जे काही कडू गैरसमज आहेत.. वा हीनपणाची भावना आहे ती कशी चूक आहे हे प्रस्तूत लिखाण वाचल्यावर कळावे.. हीच रास्त अपेक्षा... मी एक कलंदर माणूस आहे. व्यक्त होताना पराकोटीचा सच्चेपणा बाळगतो.. कसलीही पर्वा करत नाही...तुला काही बाबी विशद करायच्या होत्या म्हणून हे असे लिहितोय... बोलून सुद्धा या भावना व्यक्त होतील मात्र तुला पाहीले की माझी प्रचंड घुसमट होते.. फार त्रास होतो... बोलणे शक्य होत नाही.. हात-पाय थरथर कापतात... म्हणून असे लिहितोय...मी तुझ्याबाबतीत कधीच फालतू विचार केला नव्हता..आणि कदापि करणारही नाही... केवळ एक समजूतदार सहकारी म्हणून मला तू हवी होतीस.. त्यासाठी मला तुझ्याशी चर्चा, गप्पा करायच्या होत्या... अर्थात हे सर्व तुला सांगितले आहे... उगाच मनात एक भाव ठेवून मला बोलायला अजिबात आवडत नाही... जे आहे ते स्पष्टपणे.. निर्भिडपणे... बोलणारा माणूस आहे मी... ओठात एक पोटात दुसरे. असा दुटप्पी पणा मला सहन होत नाही.. मात्र हा अस एकतर्फी विचार करताना हे साफ विसरलो की तुझ्याही काही भावना असतीलच की... एकंदरीत व्यवहार्यपणे तू माझा विचार का करावास.?

एक तर मी इंजिनिअर नाही.. स्थायिक नाही.. घर-दार, पैसा-अडका यांची भ्रांत आहे... फार देखणा नाही ... व सर्वात महत्वाचे म्हणजे मुलींच्या नजरेत भरावा असा रुबाबदार पण नाही ... मला तू का हवी होतीस याचे एकमेव कारण म्हणजे तू माझ्याच जातीतली आहेस आणि दुसरे महत्वाचे  तू एक इंजिनिअर आहेस. तसा मी जात-पात मानत नाही. मात्र लग्नामुळे दोन कुटुंब जोडली जातात.दोन समान संस्कारातील, चालीरितीतील कुटुंब एकत्र होण्यासाठी जातीला प्राध्यान्य दिलं गेलं पाहिज. असो यावर जास्त लिहित नाही उगाच भरकटले जाईन. असो.

माझी इंजिनिअर होण्याची फार इच्छा होती.. मात्र बारावीनंतर प्रवेश मिळून देखिल मला आर्थिक अडचणींमुळे इंजिनिरींगला जाता आले नाही... ते माझे आयुष्यातील फार वाईट दिवस होते अजुनही गहीवरून येते तुला आता काय सांगू शिकण्यासाठी... म्हणून मी किती उपद्व्याप केलेत... असो खुपच आत्मचरित्रात्मक लिहू लगलोय..तर याकरीता मला माझी बायको इंजिनिअर हवी होती... असो आता हे कायमचेच दीवास्वप्न झाले..
बाकी काय सांगावे...गेली १० - १२ वर्षे मी पुण्यात फार मोकाटपणे वावरलो... मात्र तत्त्वाने जगलो.. मला जे आवडेल, मनाला रुचेल व आत्मिक समाधान मिळेल असेच जगलो...उगाच जगच्या प्रवाहात मिसळून गेलो नाही... मध्यमवर्गीय कुबटलेपणातून बाहेर पडलो.. चौकटीबाहेरचा विचार करु लागलो... उगाच जगाच्या प्रवाहात मिसळून गेलो नाही.... कदाचित याच कारणांमुळे मी मागे राहीलो.. बाकीचे माझ्यासोबतचे फार पुढे गेले... मी मात्र अजागळपणे जगण्याचे अर्थ शोधीत बसलो..

मला मात्र याची पर्वा नव्हती की  खंत  नव्हती... आता मात्र खेद वाटतो... कारण व्यवहारी जगात स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी झुंजणाऱ्याला जिन्याखालचा अंधार मिळतो.... असो.प्रारंभी सांगावेसे वाटते असे की मला तुझ्याबाबतीत असे कसे एकाएकी जाणवू लागले, आज मागे वळून पाहताना कळते की, तुझ्याबाबतीत जेव्हा गॉसिप होत असे.. एकूणच... जुलै महीन्यात मला मनातून कसंनुसं होई. का कुणास ठाऊक.. कारण आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीविषयी जेव्हा असे प्रकार कानावर पडतात तेव्हा... असे होत असावे... कदाचीत तुझ्यात गुंतण्याची सुरुवात इथूनच झाली असावी... तारुण्यसुलभभावना ह्या असतातच की... असो... मुळात तुझ्या बाबतीत मला नंतर एवढा त्रास होइल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते... शपथ घेउन सांगतो... मला आयुष्यात असे अनुभव पहील्यांदाच आले आहेत... तू अशी एकमेव मुलगी भेटलीस की जिच्यामुळे माझे मन जेवणात रमत नाही की झोपण्यात रमत नाही... असे कसे व्हावे याचा अचंबा वाटतो...कदाचित तू माझा जेव्हा त्या दोन दिवसात विचार केला असल्यास.. तुला जे तुझ्या पार्टनरमध्ये स्वभाव गुण, सुरक्षितता वा अनेक अशा गोष्टी त्या माझ्यात दिसल्या नसाव्यात.... वा मी तुझ्या लायक नसावा...किंवा तुझ्या काही अडचणी असतील .. असे एक ना अनेक प्रकारे विचार मंथन मी केले.. करतो आहे... असो... असे माझे अनेक विचारांचे खंडन-मंडन अविरतपणे चालूच राहते..... लेखक बनण्याची फार हौस आहे म्हणून...एक मात्र खरे आहे की मला तुझा नकार फारच जिव्हारी लागला आहे.. वेदना तीव्र होताहेत… आपण कोणालातरी आवडत नाही याची जाणीव मनाला चटका लावून गेलीये... असो
मी मुलींच्या भावविश्वावर काही लिहीणार नाही.. हा माझ्या आवडीचा विषय आहे... एकूणच वैष्यम्य वाटेल तुला की, कोण कुठला गावठी मुलगा १५-२० दिवसात एवढा गुंतलाय....? कारण मी सच्चेपणाने प्रेमात पडलोय.. एकतर्फी.. म्हणून हा अजब खटाटोप.. कारन आवडतेस असे सांगितल्यावर तू चक्क प्रपोजल समजून नकार दिलास... आता तर प्रेमात पडलो असे सांगण्यासाठी काय करू... असो.. एरवीच मी तुझ्या मनातून सफ उतरलो आहेच आहे.. हे असे लिहून तुला वाचायला देवून अजून तिरस्कार ओढवून घेइन... मात्र माझ्या मनातील विचार तुला लिहून दाखवण्याखेरीज कोणताही पर्याय  मजजवळ नाही... असो... आजवर मी तुझा खूप खोलवर विचार केला.. तोही एकमार्गी... कारण मी पुढे-मागे पुण्यातच स्थायिक होणार आहे. तुझ्याबद्दल अतिटोकाचा विचार केला सर्व बाबींनी... मश्गूल झालो होतो... मात्र एक चुकलो तुझ्या बाजूने विचार केलाच नाही.. मगाशीच लिहीले आहे... की मी तुला गृहीत धरले होते..मला वाटले तू पैसा, घर-दार, सो -    कॉल्ड सेटल्ड वगैरे... न पाहता केवल माझा स्वभाव, सुसंस्कृतपणा पाहशील.मला मुली अशा बाबतीत कसा विचार करत असतील याची कल्पना नाही.  असो...तुझ्या जागी तू बरोबर माझ्या जागी मी... मला याचा खेद वाटतो.. तुला माझ्याबाबतीत काहीच फिलिंग्ज  नाहीत असे तू आज मला बाल्कनीत सांगितलेस...आणि मी पण तुला बळजबरीने माझा विचार कर म्हणून सांगू शकत नाही.. कारण प्रत्येकाला स्वतःचा नकाराधिकार असतोच आणि तो त्यांनी त्याचा योग्यवेळी वापर करावा असे मानणारा मी आहे. तुझ्या नकाराधिकाराचा मी मान राखलाच पाहिजे कारण आवडणाऱ्या व्यक्तीचं हित आणि त्याचं मत हेच महत्वाचं. त्यात मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा पुरस्कर्ता आहे. असो......

बैठकीची लांबी फारच वाढली आहे...मी तुझ्या बाबतीत खुप अपेक्षा ठेवून बसलो होतो.. हे साफ विसरलो की अपेक्षा ही भ्रमनिरास होण्याची पहिली पायरी आहे...उगाच मनसुबे रचून, मनचे इमले रचून काही होत नाही... जे आहे ते असेच आहे.. आणि ते तसेच राहणार... मी काही सिनेअभिनेता वगैरे अजिबात नाही.. कुछ भी करुंगा लेकीन तुझे हासिल करके रहुंगा.. वगैरे सिनेमात छान दिसते... वास्तवात नाही... मी मात्र फार निराश झालो आहे.. मला आता वाटत नाही की मी कोणच्या तरी पुन्हा प्रेमात पडेन.. कारण प्रेम हे एकदाच होत असते.. नंतर केवळ त्याची पुनरावृत्ती  होत असते. आडजेस्टमेंट म्हणून जगणे सुरु होते.. नंतर तेच हळूहळू आवडू लागते.... असो... एक मजेशीर गोष्ट नमूद करतो.. तुझ्या नकारामुळे मला माझ्यातली विलक्षण सहनशक्ती गवसली आहे. आणि ती जोपासली जातेय... हाही अनुभव जगण्यात येणे होते म्हणून असे सगळे घडले असावे.. असे मानून पुढे जायचे... आता जास्त काय लिहावे तुर्तास एवढेच लिहून थांबतो... वाचल्याबाद्दल धन्यावाद...
22 जुलै 2012

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी  तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघर...