स्वयंभू
गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५
खरा तो एकची धर्म - विडंबन
मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५
नास्तिकतेची वल्कलं
बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५
तुम्ही नास्तिक की सुधारक?
गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५
आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!
आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!
भारतीय राज्यघटना लिहिली जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फार बारकाईने अभ्यास करून आरक्षणाच्या तरतुदी केल्या. सर्वार्थाने जो समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रवाहापासून दूर होता त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी केल्या आहेत. यात प्रामुख्याने वंचित, शोषित जनतेला प्राधान्य द्यावे हे महत्त्वाचे. कारण वर्षानुवर्षे एकाच वर्गातील पिढ्यानपिढ्या लाभार्थी होत होत्या. बहुसंख्य सवर्ण हे संधी मिळवून आपापल्या परीने प्रगती करत. मात्र संधी न मिळालेला समाज किंवा संधी असूनही तीचा वापर कसा करावा याचा मागमूसही नसलेला समाज प्रामुख्याने शोषित, वंचित होता. दुर्लक्षित नव्हता फक्त शासनदरबारी, प्रशासकीय कारभारात अजिबातच नव्हता. अशा मंडळींची समाजातील धनाढ्य लोकांकडून पिळवणूक होत असे. नंतर अशा मंडळींना दलित, अस्पृश्य, मागास, भटकी जमात वा गावाच्या वेशीबाहेरची जमात वगैरे संबोधलं गेलं. अशा लोकांना समान संधी आणि सामाजिक न्याय देण्यासाठी आरक्षण महत्वाचे. मात्र आरक्षण हा हक्क नसतो. ती एक बेजमी असते सरकारी सबसिडी सारखी. त्यामुळे जे साध्य करायचे आहे त्यासाठी मागासलेल्या वर्गांना आरक्षण हे साधन म्हणून वापरणं गरजेचं होतं. मात्र चाणाक्षपणे आरक्षण हेच साध्य ठरवून हक्क सांगण्यासाठी राजकीय आणि सामाजिक व्यवस्था मजबूतीने उभी राहीली. स्वातंत्र्यानंतर किमान चार पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जर तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी पोचल्या नसतील तर समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे ह्या फक्त भूलथापा राहतील. आरक्षणाचा लाभ घेऊन वंचित, शोषित समाजाच्या एका वर्गाने कायमस्वरूपी लाभार्थी असण्याचा फायदा घेतला. त्यांच्याकडे सवर्ण वर्गाशी स्पर्धा करण्यासाठी बरोबरीने समान संधी मिळाल्या तरीही त्या वर्गाने आरक्षणाचा लाभ सोडला नाही. हीच खरी मेख आहे तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाच्या संधी न मिळाल्याच्या.
आरक्षण मिळाल्याने समाजाचा विकास होतो ही एक सामाजिक अंधश्रद्धा आहे. आरक्षण हे साधन आहे संधी न मिळालेल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. पण राजकीयदृष्ट्या वापर करून लोकांनी आरक्षण हेच साध्य बनवलं आहे. कागदोपत्री आकडेवारी दिली की काहीतरी पुराव्यानिशी आपण युक्तिवाद करतोय असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र आकडेवारी देऊन जेव्हा तुलना केली जाते तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाण ही बाब फार महत्त्वाची. दुसरं तुलनेत कोणकोणत्या घटकांना प्राधान्य दिले आहे याचं. त्यामुळे आकडेवारी देऊन सांगितले की कोर्टात आपली बाजू भक्कमपणे उभी होईल आणि वेळ पडली तर संविधानाच्या चौकटीत राहून तरतूद करण्यासाठी दुरूस्ती विधेयक वगैरे आणण्यासाठी परत आंदोलनं, चर्चा, चिखलफेक हे निर्विवादपणे चालत राहणार आहे. समजा माणसाला आजार झाला असेल आणि त्यावर एखाद्या औषधाची मात्रा लागू होत नसेल तर औषध बदलायला हवं. किंवा आजार होऊ नये म्हणून जीवनशैली बदलणं गरजेची आहे. औषध तेच ठेवायचं आणि डॉक्टर बदलायचे. हेच तर कैक वर्षे चालू आहे. मुळातच संधी उपलब्ध करून देणे आणि संधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता, कौशल्ये विकसित करण्यासाठी सेवा, सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे आहे. घटनात्मक आरक्षण हे मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ट 'मॉडेल' आहे. पण इम्प्लिमेंटेशन गंडवले गेले आहे. त्याला जबाबदार सामाजिक आणि राजकीय व्यवस्था.
गेल्या सात दशकांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या किती पिढ्या भारतात घडल्या? ज्यांनी आरक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येऊन सक्षम होऊन आरक्षणाचे लाभ नको म्हणून किती घटकांनी सरकार दरबारी नोंद केली आहे? क्रिमी लेअर नॉन क्रिमी लेअर वगैरे नोंदणी फक्त जात प्रमाणपत्राची गरज आहे. प्रत्यक्षात आरक्षणाचे हत्यार म्हणून वापर सर्रासपणे सुरू आहे. आता तर संख्यात्मक बळ वाढतेय समजल्यावर हिंसक उग्र आंदोलने आणि व्यवस्थेला धाब्यावर बसवून वाट्टेल त्या मागण्यांसाठी लोकांना भडकावणं सुरू आहे. आरक्षण हे गरीबी दूर करण्यासाठी आणलेलं नाही. वंचित, शोषित आणि पिढ्यानपिढ्या मागासलेला वर्ग आणि मुख्य प्रवाहातील वर्ग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणलेला उत्तम पर्याय म्हणजे घटनात्मक आरक्षण. ठराविक कालावधीनंतर ह्या पर्यायाने खरंच तळागाळापर्यंत लोकांना लाभ मिळत आहे का? ह्याच सिंहावलोकन करणं गरजेचं. म्हणजे व्यवस्था अजून सुदृढ कशी करता येईल याची चाचपणी करता येईल. मात्र हे करण्यासाठी धजावणार कोण? आरक्षणाचा प्रश्न राजकीय झाला आहे. राजकीय समस्या सुटत नसतात त्याचा वापर सत्ताकारणात कुटील डाव खेळण्यासाठी होतो.
मराठा आरक्षणावर खूप बोलून झाले, लिहून झाले, चर्चा वादविवाद होत राहतील. याचं समाजाभिमुख निरसन व्हावं असं कोणत्याही राजकीय सामाजिक क्षेत्रातील धुरिणांना वाटत नाही. ज्यांना पोटतिडकीने काही तरी करायचे आहे अशांना सार्वजनिक जीवनात व्यापकपणे पाठींबा मिळत नाही. कारण राजकीय धोरणलकवे. मराठा समाजातील लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. आपल्याकडे सत्ता मिळवण्यासाठी मराठा समाजाला वापरून दुर्लक्षित केले आहे. मराठा समाजाला संख्यात्मक पाठबळ जास्त आहे म्हणून त्यांचा राजकीय उपद्रव कोणत्याही राजकीय पक्षांना महागात पडतो. खरी गरज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून मराठा नेतृत्व राजकीय, आर्थिक क्षेत्रात आघाडीवर होते. मग सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण हवे असं का वाटू लागले? मराठा टक्केवारी जास्त असल्याने त्याच प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व पण जास्त असणार सहाजिकच आहे. मग एवढं सगळं सोशोइकोपॉलिटिकल प्रिव्हिलेजेस मिळून देखील मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासते म्हणजे. खरी मेख व्यवस्थेतील त्रुटींची आहे. त्यानंतर सत्ताधारी लोकांची अनास्था. त्यामुळे सत्तेवर कोणीही असले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच लोंबकळत राहील.
ज्या आंदोलनाचे उपद्रवमूल्य जास्त ती आंदोलन आपल्याला कशी फायदेशीर ठरतील हे बघणं विरोधकांचे पहिलं काम आहे. कारण सत्तेवर यायचं असेल तर सरकार विरोधात वातावरण निर्माण झाले पाहिजे तरच आपल्याला सत्तेवर येण्याची संधी उपलब्ध होईल हे राजकीय शहाणपण विरोधकांना असते. सत्ताधारी वेळकाढूपणा करत आपल्या पथ्यावर कसं पडेल याची काळजी घेत असतात. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ना सत्ताधारी लोकांना इंटरेस्ट असतो ना विरोधकांना. आंदोलनं हायजॅक होणं काही नवीन नाही. गेल्या दोन दशकांत अशी कितीतरी आंदोलनं फसलेली आहेत किंवा भरकटवली गेली आहेत. मराठा समाज कधीकाळी क्षत्रिय, लढवय्या म्हणून नावाजलेला होता तोच आज आरक्षणासाठी मागासलेला हे सिद्ध करण्यासाठी धडपडतोय. यावरून लक्षात घेतलं पाहिजे की, हीच पद्धत जर अंगवळणी पडली तर संख्यात्मक बळाच्या जोरावर व्यवस्थेला वेठीस धरेल. वेळ पडली तर संविधानाच्या दुरुस्तीसाठी दबावतंत्राचा वापर होईल. यावर उपाय म्हणून मूळ प्रश्न ज्यामुळे उद्भवले ते सोडवले पाहिजेत. खेडोपाड्यात मराठा समाजाला शेतीसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी हा बहुतांश मराठा समाजातील आहे. खेडोपाड्यात शेतकऱ्यांची पिळवणूक कोणामुळे कशासाठी होते हे वेगळे सांगायला नको. शिक्षणासाठी मराठा तरुणांना तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत जेवढ्या इतर समाजातील लोकांना असतात. फक्त आरक्षण मिळाल्याने सरकारी नोकरीत मराठा टक्का वाढेल. शिक्षणासाठी फीया कमी भराव्या लागतील हा बाळबोध समज आधी दूर केला पाहिजे. सरकारमध्ये नोकरीच्या संधी लोकसंख्येच्या प्रमाणात खूपच कमी होणार आहेत उत्तरोत्तर. मराठा समाजाला आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक हवे आहे. राजकीय हवंय पण स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे निवडणुकीत पदे मिळवण्यासाठी. त्यात ओबीसींच्या आरक्षणातच मराठा समाजाला सामावून घेण्यासाठी धडपड चालू आहे. अशी त्रेधातिरपीट होणारी गुंतागुंतीची अवस्था झाली आहे. स्वतःला कधीकाळी सरंजाम, जहागिरदार, वतनदार, सावकार, जमीनदार, गावची पाटीलकी संभाळून, गावगाडा चालवणारा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो हे सामाजिक ऱ्हासाचे द्योतक आहे. भविष्यात आरक्षण मिळाले आणि समाजाचा अपेक्षित विकास झाला नाही तर एससी, एसटी, व्हीजेएनटी वगैरे मध्ये सामील करा म्हणून मागणी करणार का? कारण ओपन मधून ओबीसींच्या कोट्यात जाण्यासाठी आज आंदोलन होतंय. याचा अर्थ आंदोलनं भरकटलेली आहे. आरक्षण मिळाल्याने जर खरंच समाजाचा चौफेर विकास होत असता तर गेली सात दशके किमान एक तरी मागास समाज आरक्षण नको मुख्य प्रवाहात स्थिरस्थावर झालो आहोत म्हणून पुढे आला असता. तसे झाले नाही आणि दोन चार पिढ्या मुख्य प्रवाहात येऊन सधन झाल्यानंतरही आरक्षण सोडणार नाहीत. अशा बरबटलेल्या वातावरणात कोणीही विवेकी पद्धतीने प्रबोधन करणार नाही. याचं कारण आरक्षण हे हत्यार झाले आहे. व्यवस्थेला जेरीस आणून हवं ते साध्य करता येते ह्याचा पायंडा पडत आहे.
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करणाऱ्या, पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या लोकांना सत्य परिस्थिती काय आहे आणि घटनात्मक मर्यादा कशा आहेत हे समजले आहे. यात भरडला जातोय तो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मराठा तरुण. यावर एक उपाय म्हणजे सामुहिक पद्धतीने संविधानाचे पारायण व्हावे आणि संविधानाच्या चौकटीत राहून देश कसा चालतो ह्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पण हे प्रबोधन करणे सोपे आहे का? संविधानाविषयी सर्वसामान्य माणसाला माहिती असते. वाचन, अभ्यास मात्र नसतो. त्यामुळे अशा जनतेला घोळात घेणं सोपं असतं. उदाहरणार्थ अमुक तमुक मुळं आपण दुर्लक्षित राहिलो किंवा फलाना टिमका लोकांमुळेच आपलं नुकसान झालं. अशा अन्यायकारक गोष्टी ठासून सांगितल्या की बहुसंख्य भोळा समाज विश्वास ठेवतो कसलीही शहानिशा न करता. तसंही सामाजिक आणि राजकीय प्रश्नांमध्ये पुसटशी रेषा असते. ती समजणं खूप जिकिरीचे आहे. त्यासाठी जागरूक नागरिक म्हणून सर्वात मोठा आधार म्हणजे संविधानाचा मसुदा. संविधान वगैरे गोष्टींचा वापर व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रामुख्यानं केला पाहिजे. पण व्यवस्थेतील लोक स्वतःला बळकट करण्यासाठी अशा आंदोलनाचा वापर करतात. मग अशी मंडळी सत्तेत असो वा नसो. व्यवस्था कशी राबवावी, झुकवावी किंवा विस्कळीत करावी याचं परिपूर्ण टूलकिट वापरण्यात वाकबगार असतात. यात फरफटतो तो गरीब समाज. बहुतांश बहुजन. सुस्थापित सवर्ण वर्गाचा रस्त्यावरील आंदोलन वगैरे यांचा तसा संबंध येत नाही. मात्र मेख अशी आहे की ह्यावर प्रबोधन करणे सोपे नाही. गमतीने म्हटले जाते की समाज हा किर्तनाने सुधारत नाही की तमाशाने बिघडत पण नाही. जो तो सभ्यतेचा आव आणून सांस्कृतिक किर्तन करतो किंवा सामाजिक जाणीवांची भोंगळ स्वप्न दाखवून राजकीय तमाशा करतो.
मागासलेल्या वर्गातील लाभार्थी जेव्हा सोयीसुविधांचा पुरेपूर वापर करून किमान दोन तीन पिढ्या आरक्षणाचा लाभ घेऊन जेव्हा तुल्यबळ होतात तेव्हा त्याच वर्गातील कायमस्वरूपी वंचित राहिलेले बाहेर फेकले जातात. उदाहरणार्थ एखाद्या जातीतीत मागासलेल्या कुटुंबातील पणजोबा, आजोबा, वडील जर सरकारी भरगच्च पगारदार नोकरीत असतील तर त्यांची पुढच्या पिढीला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी धडपड चालू असते. खरंतर अशा मंडळींमुळेच त्याच जातीतील संधी उपलब्ध न झालेली पिढी उपेक्षित राहते. तुलना केली असता समजेल की मागासवर्गीय क्लास वन अधिकाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आणि त्याच मागासवर्गातील शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी यात सर्वाधिक संधी कोणाला मिळणार? वंचित कोण राहणार? इथं समान संधी आणि सामाजिक न्याय वगैरे जिकरीनं लागू करणं गरजेचं आहे. त्यासाठी क्रिमी लेअर वगैरे तयार करण्यासाठी कायदेशीर रित्या कोर्टात ठरवलं जाईल. मात्र ते लागू करणं, अंगिकार करणं आणि स्विकारले जाणं या गोष्टी स्वयंप्रेरणेने येणं आवश्यक आहे. त्यासाठी कोर्टात, संसदेत मंजूरी होईल न होईल पण सार्वजनिक जीवनात ते स्विकारण्याची शक्यता कमीच. कारण आरक्षणाचा वापर हत्यार म्हणून झाला आहे. त्यासाठी सरकार दरबारी, राजकीय व्यवस्थेत लॉबिंग मजबूत केले जाते. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर अशीच व्यवस्था मजबूतीने उभी राहिली. त्यामुळे आधीच साधनसंपन्न असलेल्या मराठा समाजाला लौकिकार्थाने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. कालांतराने भाऊबंदकी जशी वाढली तसतशी संपत्ती विभागली गेली. सरासरी ३५% मराठा समाज महाराष्ट्रात जरी असला तरी ३०% च्या आसपास गरीब मराठा दशकांपासून वाढत गेला. त्यात याच दशकांत मागासवर्गीय आणि मराठेतर समाज बऱ्यापैकी आरक्षणाच्या लाभांमुळे सरकारी नोकरीत, राजकीय पटलावर स्थिरस्थावर झाला. अशा वेळी जेव्हा गावागावांत प्रबळ मराठा कुलीन घराण्याचे प्राबल्य कमी झाले आणि विखूरलेल्या मराठा कुटुंबातील आर्थिक आणि सामाजिक गोष्टींनी डोकं वर काढायला सुरुवात केली. अशा वेळी राजकीय धुरिणांनी आरक्षणाचा मुद्दा पेटवून आणि वरकरणी पटवून आपापले उपद्रवमूल्य किती आहे हे दाखवायला सुरुवात केली. महाराष्ट्रात रुढार्थाने भाजपा हा भटा-बामणांचा पक्ष म्हणून बाहेर पडून ओबीसीचा डीएनए असलेला पक्ष म्हणून उदयास आला तसतशी मराठांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली जाऊ लागली. राजकीयदृष्ट्या अजूनही मराठा समाज प्रभावी आहे. कधीकाळी तो सत्ताधारी पुरोगामी विचारांचा पाईक होता आता हिंदुत्ववादी विचारांचा कित्ता गिरवतोय. अशा परिस्थितीत बहुसंख्य मराठांच्या रोषाला ट्रिगर मिळाला तो कोपर्डी येथील अन्याय्यकारक घटनेचा. तिथून मग मूक मोर्चे निदर्शने झाली आणि मुख्य प्रवाहात मराठा आरक्षणावर झाडाझडती सुरू झाली. आता तर आम्हाला ओबीसीत घ्या नाहीतर बघा वगैरे वगैरे धमकीची भाषा बोलली जाऊ लागली. अर्थात झुंडशाही जशी वाढते तसा विचार, विवेक शून्य होतो आणि हिंसेला खतपाणी घालून आपापली इप्सितं साध्य केली जातात.
आम्ही परिस्थितीने वंचित, दुर्लक्षित झालो म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, ओबीसींच्या गटाचं पाहीजे, जमत नसेल तर संविधान बदला वगैरे मागण्या केल्या जातात. हे हास्यास्पद आहे. समजा भविष्यात ओबीसी मध्ये गेले आणि तरीही संधी मिळाली नाही तर काय एसटी एससी व्हीजेएनटी मध्ये घ्या म्हणून आंदोलन करणार का? दोन हाणा पण मागास म्हणा असं होत नसतं. संविधान अभ्यासलं पाहिजे. वाचून समजून आपण का त्यांच्या कक्षेत येऊ शकत नाही हे प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी मराठेतर समाजाला खूप कालावधी लागला. मात्र या कालावधीत गरीब मराठा समाजाला हाती काहीच लागले नाही. सत्तापिपासू मराठा लॉबी ही फक्त आणि फक्त आपला कुटुंबकबिला, बगलबच्चे आणि कार्यकर्ते लोकांना संधी कशी मिळेल यातच व्यस्त राहिले. त्यामुळे प्रस्थापित मराठा अजून श्रीमंत झाला. तर सर्वसामान्य गरीब मराठा हा कालांतराने विस्थापित होऊ लागला. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणता येणार नाही. कारण संविधानाच्या चौकटीत ते होऊच शकत नाही. जेव्हा शक्य होते तेव्हा जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. कारण तेव्हा मराठा समाज जर ओबीसी मध्ये आणला असता तर मराठा लॉबी ला राजकारणात मोठा पल्ला गाठाता आला नसता. सत्ता नसते तेव्हा बहुजन म्हणून मिरवायचे आणि सत्ता आल्यानंतर फक्त आणि फक्त मराठ्यांच्याच घराण्यात सत्ता टिकेल कशी हेच बघायचं. हेच काम आहे राजकारणातील सक्रिय मराठा लॉबीचे. आज कुणबी म्हणजे शेतकरी आहोत म्हणून ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहे हे नियमाला धरून नाही. त्रिवार नाही. आज कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षण मिळवणारा समाज बऱ्यापैकी आस्तित्वात आहे. हाच समाज आज कागदोपत्री ओबीसी पण समाजात उजळमाथ्याने मराठा म्हणवून मिरवतो. ह्यांची संख्या लक्षणीय आहे. अर्थात ही कुणबी मराठा नोंद ब्रिटिशकालीन कागदोपत्रीच असल्याने राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये फायदेशीर झाली. मात्र ह्या नोंदी अपुऱ्या असल्याने मराठवाडा वंचित होता. मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बऱ्यापैकी प्राबल्य वाढलं ते ओबीसी समाजाचे. त्यात जून २०२५ च्या अखेरीस सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात एक जीआर काढला होता. तिथूनच मराठा आरक्षणासाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली असावी. कारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण राज्य सरकारने दिले आहे. त्याचा सर्वाधिक फायदा गरीब मराठा कुटुंबातील लोकांना झाला. हे असूनही आम्हाला गावपातळीवर प्रभाव पाडण्यासाठी काहीतरी कायदेशीर हक्काचे टूल हवे यासाठी तर हा आरक्षणाचा खेळखंडोबा केला नसावा? अर्थात हे प्रश्न आहेत उत्तरं ज्याने त्याने शोधावीत.
आरक्षणाचा आणि त्यासंदर्भातील तरतुदींचा पुनर्विचार करण्याची योग्य वेळ आलेली आहे. कारण मराठा आरक्षणावर आजवर जी आंदोलनं झाली ती एका तालुक्यातील एका खेडेगावात मर्यादित होती. नंतर हे आंदोलन जिल्ह्यात व्यापले गेले. आता ते डायरेक्ट राज्याच्या राजधानीत येऊन धडकले आहे. हे जर असेच चालू राहिले तर महाराष्ट्रात शेकडो जातीपातीच्या लोकांना स्फूरण चढेल. जो तो आम्हाला अमुक गटातून तमुक गटात घ्या नाहीतर तर बघा! अशी धमकीवजा आंदोलन होतील. आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. राजकीय नाही. आपल्याकडं एक बोगस व्यवस्था रुजली आहे जी राजकीय प्रश्न सामाजिक पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते, सामाजिक प्रश्न राजकीय पद्धतीने सोडवण्यासाठी धडपडते तर आपण आर्थिक प्रश्न भांडवलदारांच्या भरवशावर टाकून त्यावर काथ्याकूट करत बसतो. जर कोणत्याही असंविधानिक आरक्षणाच्या मागणीवर वेळीच योग्य ते उपाय केले नाहीत तर लिटमस टेस्ट म्हणून झुंडीच्या जोरावर हवं ते करवून घेऊ अशी नवीन कुचकामी संस्कृती जन्माला येईल. तीच लोकशाहीला घातक असेल. देशाचं सार्वभौमत्व फक्त कागदोपत्रीच राहील. जातीधारित आरक्षणाच्या कक्षेत अजून किती जाती वाढवणार? या देशात हजारोंच्या संख्येने जाती अस्तित्वात आहेत. त्यातील कित्येक प्रमुख जातसमुह एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी मध्ये विभागले गेले आहेत. बरं एखादी जात आरक्षणाचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात आली म्हणून आरक्षण नको म्हणून बाहेर पडली आहे का? मुख्य प्रवाहात म्हणजे प्रतिनिधित्व कोणत्या कोणत्या क्षेत्रात वाढलं? किती प्रमाणात आहे? जातीची लोकसंख्या तुलनेसाठी घ्यावी की इतर जातसमुह संख्या? तुलनात्मक दृष्टीने कशाचा आधार घ्यावा? अशी कोणती फूटपट्टी आहे का मोजमाप करण्यासाठी? जर लोकसंख्या वाढतेय म्हटल्यावर आरक्षणाचे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येणार त्या लाभार्थी लॉबीचीच. जसं सवर्ण लोकांनी सगळं कसं आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी मांड भक्कम करून ठेवली होती तशीच मागासवर्गीय कायमस्वरूपी लाभार्थी लॉबीचीच मक्तेदारी गटातटापुरती भक्कम झाली आहे. नुकत्याच युपीएससीच्या संदर्भात पूजा खेडेकर केस संदर्भात ह्याची प्रचिती आली आहे. हा मागासवर्गीय लाभार्थी 'मवर्ण' जर सगळे लाभ गिळंकृत करत असेल तर तळागाळापर्यंत लाभ पोचत नाहीत याला जबाबदार कोणाला धरणार? नुकत्याच सुप्रीम कोर्टाने यावर मागासवर्गीय क्रिमी लेअर वगैरे बाबत सरकारला आदेश दिले आहेत एका केस संदर्भात. यावर कार्यवाही होईल न होईल ते राजकीय फायदा तोटा बघून होईल. थोडक्यात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाच्या संधी पोचल्या आहेत तर सामाजिक, राजकीय, आर्थिक संधींची कशा पद्धतीने पडताळणी केलीय याची शासनदरबारी कोणतीही प्रक्रिया नाही. केवळ राजकीयदृष्ट्या अजूनही वापर केला जातोय आरक्षणाच्या मुद्द्यांचा. यामुळे एकेक नेतृत्व जातीपातीच्या लोकांना उद्युक्त करतं. नंतर झुंडीच्या जोरावर हवं ते मिळालं नाही तर व्यवस्थेला बेजार करते. म्हणजे जातीपातीच्या राजकारणात सर्वपक्षीय नेते आपापल्या परीने जातीचं लॉबिंग मजबूत करण्यासाठी प्रामुख्यानं धडपडत असतात. हीच व्यवस्था कुचकामी आहे. कारण जातीपाती घट्ट पकडून स्थानिक राजकारणात प्रभाव पाडता येतो. मग हीच प्रयोगशाळा धर्माच्या राजकारणासाठी पाया मजबूत करते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे झेंडे मिरवणारे राजकीय नेते चाणाक्षपणे धर्माची पताका बेमालूमपणे फडकवू लागले. ही अधोगती झाली ही बाब लक्षात येत नसेल का? अर्थातच मनातून हतबलता असल्याने असे तडजोडीचे केविलवाणे निर्णय घेतले जातात. जनता भरडली जाते कारण जनतेला जातीपातीच्या विषाची मात्रा पचलेली असते. ह्या भेसूर भवतालामुळे संविधान, राज्यघटना वगैरे वर विश्वास वाढेल का कमी होईल? ह्या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून योग्य ती प्रक्रिया, नियम, दुरुस्ती न्यायालयाच्या आदेशानुसार संविधानाच्या चौकटीत संसदेने आमलात आणली पाहिजे.
आरक्षणाचा प्रश्न सामाजिक आहे. मग लोकसहभागातून, त्या त्या जातीपातीच्या गटातटाचे नेतृत्व आणि मुख्य मागासवर्गीय आयोग यांनी पुढाकार घेऊन जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. आरक्षण हे हत्यार नाही, साध्य नाही फक्त साधन आहे कशासाठी तर समान संधी आणि सामाजिक न्याय मिळण्यासाठी. हे प्रबोधन करणं गरजेचं आहे. मेडिया प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक वा सोशल मीडिया वरील फ्रीलान्सर, इंडिपेंडंट पत्रकार ह्या सर्वांनी किमान सामाईक कार्यक्रम आखून विश्वसनीय एकी दाखवणं गरजेचं आहे. जसं युध्दाच्या वेळी सगळे प्रश्न, समस्या बाजूला ठेवून आपण सर्वजण देशासाठी एकत्र येतो तशीच भावना संविधानाच्या कक्षेत आरक्षणाच्या बाबतीत दिसायला हवी. अशा वखवखलेल्या समस्या आजूबाजूला पेटलेल्या असताना सामाजिक बांधिलकी टिकावी हीच अपेक्षा.
© भूषण वर्धेकर
पुणे
४ सप्टेंबर २०२५
शुक्रवार, २० जून, २०२५
तू बोल मराठी
गुरुवार, २२ मे, २०२५
नारळीकर, मराठी विज्ञान साहित्य
नारळीकर गेल्याची बातमी समजली आणि एकदमच आपल्या जवळचं कोणीतरी गेले अशी भावना झाली. प्रत्यक्षात त्यांना मी कधीच भेटलो नाही. त्यांचं कोणतेही व्याख्यान मी ऐकले नाही. केवळ त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून, त्यांच्या मुलाखतीतून आणि त्यांनी आजवरच्या केलेल्या कामातून ते भेटत राहीले. सर्वसाधारणपणे शालेय जीवनात उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत पुस्तके वाचली पाहिजेत असा अघोषित नियम असतो. काही पाळतात काही पाळत नाहीत. नारळीकर भेटले पहिल्यांदा यक्षाची देणगी, वामन परतोनि न आला, प्रेषित आणि अंतराळीतील भस्मासूर वगैरे पुस्तकातून. नंतर आकाशाशी जडले नाते या पुस्तकामुळे तर विज्ञानाची गोडी अनेक पटीने वाढली. (ही पुस्तके माहित असण्याचे मुख्य कारण म्हणजे दौंडचे एस. एन. कुलकर्णी सरांची शिकवणी. त्यांच्यामुळेच पुणे विद्यापीठात आयुकात जाणं झालं.) या घटना एकदम आठवल्या कारण त्यानंतरच्या काळात आपण पण विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी करावे हीच स्वप्न उराशी बाळगून अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पुढं सप महाविद्यालयात बीएस्सी आणि फर्ग्युसन महाविद्यालयात एमएस्सी करणं. फर्ग्युसन मध्ये जुन्नरचे जयंत विष्णू कुलकर्णी (जेव्हीके सर) यांच्या लेक्चर्स मुळं विषयाची व्याप्ती खोली समजणं आणि आवड वाढणं. (अर्थातच भरपूर शिक्षकांच्या नावांचा उल्लेख करणं शक्य नाही) मात्र ठराविक शिक्षकांची मराठीतून शिकवण्याची एक हतौटी होती तीची आज प्रकर्षाने जाणीव होते. ह्या सगळ्या आठवणी एकाएकी दाटून आल्या कारण विज्ञानाकडे कसं बघायचं आणि त्याचं दैनंदिन जीवनात महत्व काय ह्याचे धडे मिळाले. अर्थात शाळेत विज्ञान विषय शिकवला जायचा पण तो पाठ्यपुस्तकी परिक्षेसाठी. एस. एन. कुलकर्णी यांच्या क्लासेस मध्ये विज्ञान आणि गणित हे विषय कसे, का व कशासाठी शिकावे हे समजलं. छोट्या छोट्या प्रयोगातून वैज्ञानिक संकल्पना शिकल्याने विज्ञान विषयात रुची वाढते गेली. त्याआधी विज्ञान हा रट्टा मारून, व्याख्या, सूत्रे, तोंडपाठ करून परिक्षेसाठी शिकणं हेच होत होतं. नारळीकर यांनी लिहिलेल्या साहित्यातून, मराठी विज्ञान परिषदेच्या मासिकातून (शीव चुनाभट्टी मुंबई हा पत्ता वाचताना जे फिलिंग असायचं ते अजूनही आहे), बाळ फोंडके, डॉ प्रकाश तुपे, मोहन आपटे, शाम मराठे, निरंजन घाटे, वगैरे मंडळींनी लिहिलेल्या पुस्तकातून विज्ञानाविषयी वेगळंच ग्लॅमर वाढत होतं. कालांतराने मराठी भाषेत अच्युत गोडबोले, नंदा खरे आणि सुबोध जावडेकर वगैरे आले. नंतर कॉलेजमध्ये असताना असिमोव्ह, हाईनलीन, क्लार्क वगैरे मंडळींच्या कादंबऱ्या विषयी माहिती मिळाली काही वाचल्या त्या कादंबऱ्या बद्दल मराठीत वाचलं. काही परिक्षणं इंग्रजीत वाचली ब्रिटिश लायब्ररीत. मग एकूणच मराठी भाषेत विज्ञानकथा किंवा विज्ञान साहित्य याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. अर्थातच जे जे आधी मराठी भाषेत वाचलं होते ते वाईट अजिबात नव्हतं. कारण ती पात्रं ते विषय डोक्यात घोळत असतानाच वय वाढत होतं. समज वाढत होती.
नारळीकरांच्या विज्ञानकथांविषयी वेगळी समीक्षा होईल. बरोबरी करताना आयझॅक असिमोव्ह सोबत करू नये हीच प्रांजळ अपेक्षा. हे मनात ठेवून जर कथा वाचल्या की त्यांच्या लेखणीतली ताकत कळते. मी आधी नारळीकर, सुबोध जावडेकर यांच्या कथा वाचल्या नंतर असिमोव्ह च्या कथा वाचल्या. म्हणून मराठी विज्ञानकथा त्याज्य होत नाहीत. ज्यांनी आधी असिमोव्ह च्या कथा वाचल्या आहेत त्यांना नारळीकर यांनी लिहिलेल्या कथा बाळबोधच वाटणार. ह्याविषयी निरंतर चर्चा सुरू राहील. मात्र मराठी भाषेत विज्ञानकथा लिहिणं, विज्ञान तंत्रज्ञान विषयक मराठीत माहितीपर लेख लिहिणं, मराठी भाषेतून विज्ञान विषयक चिंतन मनन करणारे लेख लिहिणं, विज्ञानवादी (वैचारिक, तात्विक अंगाने) लेख लिहिणं, विज्ञान मराठी भाषेत समजावे म्हणून लेख लिहिणे आणि वैज्ञानिक संशोधन, प्रबंध मराठी भाषेत लिहिणं या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे स्तर एकमेकांत गुंतलेले वाटतील पण जाणकार असाल तर फरक लागलीच समजेल. मूळ मुद्दा येतो की मराठी भाषेतून विज्ञान साहित्याचा प्रचार, प्रसार करताना विवेकवादी भूमिका घेत नारळीकरांनी जे कार्य केले ते फार मोलाचे आहे. योगदान दिले वगैरे ह्या शब्दच्छलात नको पडायला. त्यासाठी त्यांनी बहुमोल वेळ दिला. संशोधन क्षेत्रात काम करत, प्रशासकीय कारभार सांभाळत सामाजिक जाणीव ठेवून विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी धडपड केली. आयुकात उपक्रम राबविले. विज्ञान म्हणजे पडणाऱ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी असलेली शाखा. जिथे वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झालेले पुरावे ग्राह्य धरतात. नारळीकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं आणि रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, श्रद्धा, अंधश्रद्धा याकडे डोळसपणे विचारपूर्वक पाहणं कसं असावं आणि कृतीतून काय करावं हे दाखवून दिले आहे. अर्थातच त्यांनी पन्नास साठ वर्षे या क्षेत्रात ठशीव कामगिरी केली आहे तशीच समाजातील सर्व घटकांना समजेल अशा साध्या सोप्या विषयावर प्रश्न विचारून वैज्ञानिक उत्तरं मिळवा ही चळवळीची संकल्पना रुजवली हे खूप महत्त्वाचे. महाराष्ट्रात खेडोपाड्यात किंवा तालुक्यातील पोराटोरांना नारळीकरांनी कैक प्रश्नांची उत्तरं पाठवली ती साध्या पोस्टकार्ड पासून ते आयुकाच्या वर्तुळाकार लोगो असलेल्या पाकिटातून. यामुळे जो कनेक्ट तयार झाला तसा कनेक्ट कोणत्याही शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रात तरी आजपर्यंत केला नव्हता. २७ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयुकात सायन्स टूर म्हणून जे जे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामुळे जे एक ग्लॅमर तयार झाले ते मी स्वतः अनुभवलं आहे. ज्यांनी ज्यांनी ते शालेय जीवनात अनुभवले आहे त्यांच्या त्या आठवणी चिरकाल टिकणाऱ्या असतील.
नारळीकरांनी फ्रेड हॉईल यांच्या सोबत विश्वरचनाशास्त्र या विषयावर संशोधन केले. गुरुत्वाकर्षण, गणित आणि खगोलशास्त्र यावर त्यांनी केलेले संशोधन जगभरात मान्य केले आहे. सर्वसामान्य मराठी माणसाला या विषयावर फार जास्त माहिती नसणार मात्र नारळीकर यांनी विज्ञान विषयक चळवळीत, विज्ञानकथा, साहित्यात जे योगदान दिले ते नक्कीच माहिती असेल. आपल्याकडे शास्त्रज्ञ लोकांचे कार्य ठराविक वर्गातील लोकांपर्यंत मर्यादित आहे. याचं कारण म्हणजे कमी असलेली सामाजिक प्रगल्भता. विज्ञान आणि गणित विषयासाठी चौकस आणि उत्साही वातावरण तयार नसतं ही एक महाराष्ट्रातील शैक्षणिक शोकांतिका आहे. एका नावाजलेल्या शास्त्रज्ञाच्या प्रयत्नाने लागलीच बदल होणार नाही मात्र ठिणगी पडली हे महत्त्वाचे. राष्ट्रीय पातळीवर डॉ कलाम ह्यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशी कैक वैज्ञानिकांना मिळाली नाही. त्यासाठी वैचारिक तात्विक अंगाने विचार केला पाहिजे. खूप लोकांचा गैरसमज असतो वैज्ञानिक असेल तो विवेकवादी भूमिका घेणारा चे पाहिजे. जर तो श्रद्धाळू किंवा अध्यात्मिक असेल तो बुवाबाजी करणाराच असतो. अर्थातच हे वैचारिक वायफळ बगिचे डोक्यात फुललेले असतात. प्रत्यक्षात मात्र वैज्ञानिक संशोधन करून एखाद्या क्षेत्रात प्रगती झाली हे बघून मापदंड ठरले पाहिजेत. भारतीय समाजमनात देवभोळ्या प्रवृत्ती आहेत. श्रद्धाळू, आस्था जपणारा मोठा समाज आहे. तसाच अंधश्रद्धा बाळगून वागणारी भली मोठी पिढीजात चालत आलेले बहुसंख्य लोक आहेत. अशा गुंतागुंतीच्या सामाजिक वातावरणात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं आणि विवेकवादी भूमिका घेणं हे फार जिकिरीचं आहे. एखाद्या वैज्ञानिकाला सेवासुविधा पुरवल्या की त्याने सगळीकडे वैज्ञानिक क्रांती घडवून आणली पाहिजे हा हट्ट (किंवा समज) सहाजिकच बाळबोध आहे. भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवेकवादी भूमिका घेणं सरळमार्गी नाही. त्यांचं एकमेव कारण म्हणजे आपण पुराणं, वेद, उपनिषदे, पोथ्या, संस्कृती, सभ्यता आणि विज्ञान वगैरे ची सरमिसळ खूपच जाहीरपणे करतो. त्यामुळे एखाद्या वैज्ञानिकाला जे अपेक्षित असते अनुमान काढता येईल असे वातावरण किंवा घटना त्याला आवश्यक असा अवकाश मिळत नाही. आमच्या कडे आधीपासूनच हे अस्तित्वात होते वगैरे वर छातीठोकपणे मान्य असलेल्या समाजांना आपण विज्ञानवादी ठरवतो. मग लागलीच पुरावे आहेत का विचारलं की आस्था, युगानुयुगे चालत आलेल्या प्रथा, रुढी, परंपरा, चालीरीती वगैरे वगैरे वर चर्चा ढकलली जाते. याकडे मी वेगळ्याच दृष्टीने बघतो. उदाहरणार्थ अणू केंद्राबाहेर घिरट्या घालणारा इलेक्ट्रॉन स्थिर रेणू होण्यासाठी उर्जा उत्सर्जित करतो, दुसऱ्या अणूंची कक्षेत उड्या मारतो किंवा भागीदारी करतो हे प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं आहे. प्रमाणित आहे. मात्र या घटनेकडे अनेक विज्ञान शाखा वेगवेगळ्या स्तरातून दृष्टीकोनातून बघतात आणि तशी त्यांची थिअरी मांडली जाते. तसाच विचार प्रवाह गरजेचा आहे. विज्ञान जर विचारधारा असेल तर गणित ते सिद्ध करण्यासाठी भाषा असेल आणि तंत्रज्ञान हे प्रात्यक्षिकातून तयार झालेलं प्रचलित प्रमाण. मराठीत समजायला अवघड जाणार आहे हे लिहिलेले. मात्र विचार केला की पुष्टी होईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर सगळं बघून सप्रमाण दाखवून द्यायचं असेल किंवा मान्य करायचं असेल तर गुंतागुंतीचे कंगोरे दुर्लक्षित करता येणार नाहीत. उदाहरणार्थ पुरातन काळापासून चालत आलेल्या कैक गोष्टी छद्मविज्ञान म्हणून हेटाळल्या गेल्या तर जेव्हा केव्हा त्या सुरू झाल्या त्या आजतागायत टिकून आहेत हे दुर्लक्षित करता येणार नाही. जर त्याकाळी असं सांगितलं गेलं असेल किंवा मान्य केले गेले असेल ते आजच्या काळात विज्ञानाच्या कसोटीवर पडताळून घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान पाश्चात्य देशातून आलेले खरेखुरे तर एत्तदेशीय पुरातन काळातील विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे टाकाऊ. जर असे मानायचे ठरवलं तर हजारो वर्षांपासून दिमाखात उभे असलेल्या वास्तू (बहुसंख्य मंदिरे) कशी बांधली असतील? एखाद्या सिव्हिलायझेशनमध्ये जर स्थापत्यकलेचा विकास झालेला असेल तर त्यासाठी मूलभूत विज्ञान आणि आजूबाजूला उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून बांधलेल्या वास्तू छद्मविज्ञान होतं म्हणून बांधल्या का? असो यावर वेगळी चर्चा होईल.
विज्ञान हे निसर्गाचे निरिक्षण, सूक्ष्म निरीक्षण आणि मनाला पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून जन्माला येते. तसा विचार करण्याची पद्धत विकसित झाली की वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. मग तशी उपजतच भूमिका परिपक्व होते. नंतर प्रात्यक्षिके करून जर विकसित प्रारूप किंवा उपयोजित गोष्ट वापरात आली की तंत्रज्ञान जन्माला येते. हा वैज्ञानिक शोध म्हणून गणला जातो. ही एक कालातीत चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर पुणे. जागतिक स्तरावर कैक संशोधन, तंत्रज्ञान हे निसर्गाच्या निरिक्षणातून तयार झाले आहे. भारतात ह्यावर निसर्गाच्या सानिध्यात राहून सभ्यतेचा विकास झाला या धर्तीवर बघायला पाहिजे. मग सभ्यतेत जे जे उभं राहिलं ते मूळ तत्कालीन मान्यताप्राप्त विज्ञान आणि विकसित तंत्रज्ञान, शोध याचं जोरावर असेल. ही मांडणी लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे शिक्षणव्यवस्था जशी आणली तशी कारकून छाप पिढी तयार झाली. त्यातून वाचलेल्या पिढीतून उत्तमोत्तम शास्त्रज्ञ तयार झाले. कैक शास्त्रज्ञांनी संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आणि जगभरात भारताचे नाव उज्ज्वल केले. असे कितीतरी वैज्ञानिक आहेत. कितीतरी वेगवेगळ्या विज्ञानाच्या शाखांमध्ये भारतीयांचं काम वाखाणले गेले आहे. हजारो शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आज भारतात सरकारी संस्थांमध्ये खाजगी कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. सीएसआर, डीआरडीओ, आणि कैक संरक्षण संस्थांमध्ये भारतीय तंत्रज्ञ मोलाचं योगदान देत आहेत. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील असेच शास्त्रज्ञ समाजातील विज्ञान विषयक समज, गैरसमज, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार, विवेकवादी भूमिका घेत जनजागृतीसाठी कार्य करतात. त्यापैकी जयंत विष्णू नारळीकर हे होत. त्यांनी केलेल्या कामाचा आवाका मोठा आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.
बातमी समजली अन् जे जे मनात येईल तसं लिहिलं आहे.
© भूषण वर्धेकर
२१ मे २०२५
पुणे ४१२११५
शुक्रवार, १६ मे, २०२५
भैरु पैलवान की जय!
खरा तो एकची धर्म - विडंबन
खरा तो एकची धर्म - विडंबन (साने गुरुजी यांची क्षमा मागून) खरा तो एकचि धर्म जगाला जिहादी अर्पावे जगी जे हीन अति धर्मभोळे जगी जे दीन लुळे पां...
-
पवित्र कुराणातील निवडक आयातींची चिकित्सा कुराण हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. याला "अल्लाहचे शब्द" मानले जाते आणि ते अपरिवर्त...
-
Friendship is always best medicine to cure your inner wounds. Why do we need friends? Simple answer is friend is the only individual who can...
-
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यापासून एकूणच वैचारिक वातावरण खूप बदललेलं आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती असा निकाल लागलेला आहे. सर्वात ...