गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

लग्न आणि प्रेम

लग्न आणि प्रेम

एकदा लग्न आणि प्रेम यांच्यात
कडाक्याचं भांडण झालं
लग्न म्हणाले मीच महान
प्रेम म्हणाले मीच महान

वाद काही संपेना
कोणी कोणाला जुमानेना
मग त्यांनी ठरवलं
त्रयस्थाला विचारावं

मान-अपमान समोर दिसले
सगळं  ऐकून घेउन मान-अपमान म्हणाले
आम्ही दोघे सावत्र भाऊ
मान ठेवणारा आणि अपमान करणारा
उगाच आमच्यात शत्रुत्व निर्माण करतात
प्रेमात अपमान बहुधा होत असतो
लग्नात मान ठेवला जात नाही
म्हणूम मी तुमच्यात काही बोलणार नाही

पुढे दोघांना दुःख दिसले, धडधाकट-सुदृढ
दोघांचे ऐकून ते म्हणाले, जगात माझी सारखी मागणी वाढत आहे. प्रेमात दुःख सहन करणारे सापडत नाहीत आणि लग्नात दुःख देणारे भरपूर म्हणून मी काही निर्णय देणार नाही

पुढे दोघांना दिसले सुख, निपचित पडलेले
कृश आणि अशक्त, कमकुवतपणे म्हणाले
माझी जगात फार कमतरता आहे
लोकांमध्ये राहण्याची माझी फार ईच्छा असते
पण राहता येत नाही आणि प्रेमात मला दिलं जात नाही तर लग्नात नेहमीच ओरबडला जातो म्हणून मी काही निर्णय देत नाही

पुढं दोघांना आदर आप्पा दिसले, स्वच्छ टापटीप सगळं ऐकून आप्पा म्हणाले
मी असतो जीवनसत्वांसारखा, कमी पडलो तर
आजारी करतो आणि प्रेमात कोणी मला ठेवत नाही आणि लग्नात गृहित धरल्याने मी राखला जात नाही म्हणून तुमचं तुम्ही निस्तरा

पुढं समाधानराव समाधी लावून बसलेले असतात ऐकून एकच बोलले
प्रेमात समाधानापेक्षा इतर सुखात रमता
लग्नात हव्यासापोटी समाधानी राहता येत नाही म्हणून मी काही निकाल सांगणार नाही

पुढे गेल्यावर त्याग गंभीर मुद्रेत बसलेले दिसले, चिंतन करत ऐकून म्हणाले निर्वाणीनं
प्रेमात हल्ली मी नाहीसा झालोय आणि लग्नात त्याज्य पदार्थांना जखडलं जातं मी काय तुमचा निर्णय देणार?

पुढं गेल्यावर सहवासकाका दिसले सगळं ऐकून म्हणाले प्रेमात मी अती होतो नंतर लग्नात मी पूर्णपणे संपून जातो मी काय निर्णय देणार?

पुढे दोघांना संशयतात्या दिसतात बेरकीपणे दोघांकडे पाहून म्हणतात मला तुमच्यात आणू नका मी आलो की होत्याचं नव्हतं होतं आणि
सगळं पाप माझ्या माथी मारलं जातं प्रेमात मी मनोमनी खदखदत असतो लग्नात मात्र बिनसण्यासाठी मीच कारणीभूत ठरतो

समोर समजुतदारपणा एकाकी बसलेला असतो
सगळं ऐकतो आणि म्हणतो प्रेमात मला दूर ठेवलं जातं लग्नात असूनही दूर्लक्शित केला जातो मी तर नेहमीच एकाकी असतो आधारासाठी वाट पाहत मी काय देणार निर्णय?

पुढं इर्शा-राग-कपट-चिंता-निंदा-नालस्ती  टक लावून पाहत असतात ऐकून म्हणतात
प्रेमात व लग्नात आम्ही असतोच मनामनात ताबा न  ठेवल्याने आमची वाढ होते म्हणून जगात आमची नाचक्की होते आम्ही काही निर्णय देणार नाही

हताश होऊन दोघे पुढे जातात आणि पहतात तर ब्रेक-अप आणि घटस्फोट भांडत असतात
दोघांपैकी नीच कोण?
मग काय कोण महान कोण नीच यावर जोरात रणकंदण

अखेरीस चौघांना पुढे विश्वासमामा दिसतात
मिश्कीलपणे हसतात आश्वासकपणे ऐकून निर्णय देतात
प्रेमात मी नसल्याने ब्रेक-अप होतात
लग्नात मी आस्तित्वहिन झाल्याने घटस्फोट होतात
उगाच महान कोण नीच कोण यात न पडता
प्रेमाने ब्रेक-अप होउ नये म्हणून काळजी घ्यावी तर लग्नाने घटस्फोट होऊ नयेत याची

जो यात यशस्वी होतो तो महान
कारण असं झालं नाही तर मन भावनाशून्य होते निर्दयी होतं हल्लीच्या शब्दात प्रॅक्टीकल होतं
म्हणून प्रेमात निभवावं लागतं आणि लग्न टिकवावं लागतं तरच जग सूरळीत चालतं

---भूषण वर्धेकर,दौंड.

नातं, मैत्री आणि प्रेम

नातं, मैत्री आणि प्रेम
एका कंपनीत काम करायचे
नातं एकटेच राब राब राबायचं
मैत्री कधी निस्वार्थीपणे तर
कधी स्वार्थ साधून काम करायचं
प्रेमाची तर वेगळीच गोष्ट
कधी स्वच्छंदीपणे कधी मुक्तपणे तर कधी कामात लक्ष कधी दुर्लक्ष
नात्याला कबाडकष्ट करायची
सवयच असते
मैत्रीच मात्र वेगळं चालायचं
कामाचं स्वरुप पाहून राबायचं
नाहीतर मन मारुन काम करायचं
प्रेमाचा अजब खेळ साधलं तर सुत नाहीतर मानगुटीवरचं भूत
नात्याला ओव्हरटाईमचा भारी शौक
मोबदल्याची फिकीर नाही
मैत्री मात्र मनासारखं असेल तर झोकून देऊन काम करायचं
प्रेमाची गोष्टच न्यारी,
लिमीटेड ड्युटी प्यारी
स्वतःचे ओव्हरटाईमचे रिकामे रकाने
नात्याचीच सारी मक्तेदारी
आता मात्र एक सिस्टीम आली,
काळ बदलला
नातं तसंच राहीलं बुरसटलेलं रांधत
मैत्रीने पलटी मारत सगळे हेवेदावे हेरले
प्रेम मात्र गुलछबू, आपल्याच धुंदीत
कधीतरी फसायचं तर कधी फसवलं जायचं
काळानुरुप कंपनीत आधुनिकता आली
मैत्री आणि प्रेम पुर्णपणे बदलून गेले
कल्लोळाच्या धामधुमीत कलुषित झाले
नातं मात्र कृश होत गेलं, खोलवर रुतल्यानं अधिक दृढ झालं
मैत्रीचा गोंधळ उडतो प्रेमाची धांदल, त्रेधातिरपीट
नातं मात्र अजागळपणे सगळ्यांना संभाळून घेतं
एकविसावे शतक उजाडले
मैत्री व प्रेम अनेक सौदेबाजीत अडकले
नातं मात्र खंबीरपणे उभारत होतं, निपचितपणे साथ देत होतं
मैत्रीला प्रमाची हुरहुर वाटे
प्रेमाला मैत्री कधी कधी हवीहवीशी वाटे
नातं आता वृद्ध झालं सगेसोयरांनी समृद्ध
प्रेमाचा विचका झाला मैत्रीचा इस्कोट
तरीही दोघातला छंदी-फंदी पणा कमी नाही झाला
कंपनी पण थकली नात्यासकट उतारवयात खंगली
प्रेम मात्र दुरावलं मैत्रीलाही सोडवत नव्हतं मनोमनी मांडे खात होतं
नातं मात्र अविचल. .  राग, लोभ, द्वेष,मत्सर गिळतं होतं
कंपनी मृत्युशय्येवर टेकली नातं मात्र गोतावळ्यात अडकलं
मैत्री संस्मरणीय क्षणांत रमलं. . हुसमुसलं
प्रेम मात्र विस्मरणात. .  ईतरांसाठी नकळतपणे केलेल्या ओव्हरटाईमचा हिशेब चाळत बसलेलं. . एकटं. .  एकलकोंडं . .

भूषण वर्धेकर, दौंड

प्रेमात आणि युद्धात

प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं
असं म्हणतात ...  पण खरतर ....
भावनेनं मारायचं असतं अन
मनान पुन्हा उभारायचं असतं

रडत.. कुढत.. का होईना
जगण्याच रहाट चालूच ठेवायचं असतं
जगासाठी आनंदी दाखवणं असतं..
स्वत: मात्र एकांतात झुरायचं असतं
उगाच  practical  वगैरे
जगणं अनुभवायचं असतं

एकट्याशीच संवाद साधत राहायचं असतं
काय चूक... काय बरोबर...
कोणी किती खरं.. किती खोटं
याच मोजमाप अविरत चालू ठेवायचं असतं  
उगाच स्वतःला दोष द्यायचा असतो
पण  मन मात्र तिच्यातालेच दोष टिपत असतं
आधुनिक space... Committed...  
Liberal...  secure... personal..
वगैरे शेलक्या शब्दांचे जोडे
वावगत फिरायचं असतं
स्वतःच म्हणणं ठाम असून
कोणी विचारात नसतं
नाहक सल्ल्यांचा पाऊस
सहन करत बसायचं असतं
कळत नकळत भूतकाळावर
राग येत असतो भविष्याचा विचार करायचा
देखावा करत वर्तमान
मात्र थंड असतं.. निवांत...
जगाच तार्किक वगैरे अनुभवत
स्वतःलाच खोदून खोदून पटवायचं असतं
न जाणो नवा घडेल काहीतरी असं म्हणत
असंख्य दिवस ढकलायचं असतं
काही म्हणा प्रेमात पडाव
मात्र निभावाण्यासाठीच
असं म्हणणारी बरीच
मात्र जगणारी मात्र थोडकीच
प्रेमात का व कोण याचा काही
जगण्याशी संबंध नाही उगाच पोकळीतल्या
एकटेपणाला साथसंगत वगैरे म्हणायचं असतं
काही मात्र थोर अनुभवी संत
सगळं कसं settled  करणारे
दोन्हीकडे जाऊन शब्दबंबाळ चर्चा करणारे
दिवस रात्रौ उगाच उदाहरणांचा भडीमार करणारे
अमका.. तमका... फलाना... टिमका....
स्वतः मात्र नामानिराळे
किनाऱ्यावरून पोहायला शिकवणारे
बुडणारा मात्र खडबडीत जागा होऊन
केविलवाणा ओशाळलेला.....
एककल्ली एकटाच राहणारा
शून्यात नजर लावून बसणारा
आगाउपणे व्यसनं करणारा
जगाला चुकीच्या नजरेने पाहणारा
सगळ्याच नात्यांना तुच्छ लेखणारा
नाकर्ते लोकांच्या संगतीत राहणारा...
कधी कधी जगायचं पण सोडून देणारा....
अशा जगण्याच्या मैफिलीत सर्व
अनुभव घ्यायचे असतात
काही भोगायचे असतात
काही जगायचे असतात
कळवळलो तरी मागं हटायचं नसतं
निर्विकारपणे सत्य असत्याचा मागोवा
घेत नवं जगणं अनुभवायचं असतं

भूषण वर्धेकर
२०-०२-२००८
भारत गायन समाज
पुणे

ऑफिस म्हणजे अजब जंत्री ...

ऑफिस म्हणजे अजब जंत्री ...
सगळेच करतात काम...
काही मनापासून तर काही मनाविरूद्ध
काही तर आवडीची नोकरी मिळेपर्यंत करायची म्हणून करतात..
काही जणांची पाट्या टाकण्याची जागा
काही म्हणा आवडीची नोकरी आणि समजूतदार बायको फक्त स्वप्नातच मिळते
प्रत्यक्षात मात्र खेळखंडोबा ...
ऑफिसवरून एक आठवलं ... एक आटपाट नगरातलं ऑफिस होतं ...
कामगार होते उच्चशिक्षित.. चकाचक इमारती.. प्रसन्न बैठका... मोहक वातावरण एकजण नुकताच जॉईन झाला... फ्रेशर म्हणून..
करायची होती म्हणून करत होता नोकरी... अनुभवासाठी
गड्याचं सुरुवातीला बिनसलं सोबतचे होते वयस्क ... मग काय हा तर होतकरू... अनुभवशून्य
लोकांचा वाढता कामाचा बोजा याच्यावर...विनाकारण भरपूर शिकून घे म्हणून पडायचा
एक मन म्हणायचं सोड नोकरी दुसरं मात्र रडतं-कुढत ...
एकदा काय झालं त्याची झाली चूक शिक्षा म्हणून दिलं लो प्रोफाईल जॉब
सहा महिने झाले रोज तेच.. ते... तेच... ते
कळत नव्हते काय करावे... एकदा मात्र हद्द झाली नोकरी सोडावी म्हणून सनक आली
गेला साहेबांकडे पण ते होते मिटींगमध्ये... दुसऱ्या दिवशी आल्यावर पाहतो तर काय..
चालू होती कामगारभर्ती.. गर्दीत सुखावणारे चेहरे पाहून मंदावला ..नोकरी सोडायचा विचार नंतर करावा म्हणून सरसावला..
वाटलं नवीन भर्तीत कोणीतरी गर्दीतल्या लोकांपैकी...
झालं मनासारखं.. आली ती ट्रेनी म्हणून त्याच्याच विभागात...
साहेबांनी दिली ओळख करून हा तर खुश होताच सोबतीला चांगली कंपनी म्हणून...
काळ मात्र वाइट हो.. याला जास्त दिवस ठेवले नाही कंपनीनं  त्याच्या विभागात...
दुसऱ्या विभागात रवानगी केली ... गेला सगळं हातातून.. तिने त्याला ग्रीट केले
दुसऱ्या दिवसापसुन नवा विभाग नवं काम .. नशीबान आवडीच काम तर मिळवून दिलं ..
मन मात्र तिकडच रमलं.. मग काय हळूहळू चोरून पाहणं आलं .. ओरकुट वगैरे फ्रेंड लिस्ट मध्ये आणि फॅन लिस्ट मध्ये येणं झालं...
हा मात्र नाराजच.. रोज रोज लांबून पाहणं.. कामापुरतं हाय बाय बोलणं
जेवणाच्या सुट्टीत मंद हसणं वगैरे चालूच होतं ...
हळूहळू आणखी काही दिवस गेले दोघेही छान त्यांच्या त्यांच्या कामात रमले...
अचानक एक असाईन्मेंट आली ...तिच्या आणि ह्याच्या विभागाची मीटिंग झाली..
कर्म धर्म संयोगाने दोघांकडे जॉईन्ट टास्क आलं
मग काय .. मन कसं आनंदलं
हा कधी नव्हे तर ऑफिस वर वेळेच्या आधी
रंगीबेरंगी भावनांचा कल्लोळ उगाच काम करायचा शिरजोर
दोघेही कामात तसे तरबेज
हा मात्र एकांतात कुठेतरी गुंतलेला.. काम तसं झकास होतं  चालू..
हा मात्र डिप्रेस उगाच तिने समजूत काढावी म्हणून...
कामाव्यतिरिक्त भेटावं म्हणून... रिलॅक्स होण्यासाठी...
ती मनमोकळी बिनधास्त .. संध्याकाळी थांबू म्हणाली कॉफी घेऊ म्हणाली
मग मात्र हा खुश झाला मनोमन ...
कधी नव्हे तो दोघांची कामे करून फ्री झाला... फ्रेश तर मनापासूनच होता
संध्याकाळ व्हायची वाट पाहत होता,...
संध्याकाळ झाली... कॅफेत गेली.. snacks आले कॉफी आली... डिस्कशन झाले...
आवड निवड शिक्षण वगैरे ... आदानप्रदान
दुसऱ्या दिवशी कसं एकदम ताजतवानं.. फ्रेश वगैरे..
काम होत आलं पुन्हा भेटणं झालं.. पुन्हा कॉफी .. वगैरे....
जॉईन्ट टास्क पूर्ण झाल.. अभिनंदन झालं.. वर्षा अखेरीस event झाला.. मग काय जो तो आपापले कलागुण दाखवू लागला .. खेळप्रकार उदंड झाले..
हॉटसीट .. ड़मशिराज.. डेअर टू विश ... गाण्याच्या भेंड्या .. Q & A ..वगैरे वगैरे..
ह्याच्या कवितांनी कार्यक्रमाची सांगता झाली.. सगळेच अवाक.. हा कविता सुद्धा करतो.. कौतुकेच कौतुके ...
ती सुद्धा खुश होऊन म्हणाली मला कधी  तू बोलला नाहीस..कविता करतो म्हणून..
तो हळूच म्हणाला आपण पर्सनल कधी बोललोच नाही.. ती मात्र खुश..
म्हणाली एक दिवस भेटू खास तुझ्या कवितांसाठी...
ह्याला तर काय सार्थक झाल्यागत वाटलं
कवितामुळेच राणीमार्ग सापडला...
मग ठरलं... भेट झाली.. काव्यवाचन झाले.. दोघे पण मस्त.. कॉफीचे घुटके.. चमचमीत पदार्थ ... आणि ह्याच्या कवितांचे अर्थ.. अशाच भेटी व्हाव्यात म्हणून ह्याच्या मनातल्या मनात शर्थ ... असो पुढे काय हळूहळू दोघे रुळले...
गाठीभेटी वाढल्या sms सुरु झाले उदंड ...
ह्याच्या मनात बरचसं दाटलेलं.. कॉलेज मध्ये असेच अव्यक्त राहिलेलं होतं
हे हातातून जाऊ नये म्हणून मनोमन काहीतरी जळत होतं.. अचानक एके दिवशी रात्री फोन आला तिचा.. उद्या मी चाललेय बाहेरगावी भेटू नाही शकत काही दिवस तिकडून स्पष्टोक्ती
मग याला झाली होती सवय sms आले गेले.. खूप miss झाले...
हा मात्र गदगदला असं आधी कधीच झाल नव्हतं.. उगाच सवय झाली म्हणून असं होत असावं म्हणून मनाला समजावत होता.. पण मन तर तिकडचेच झाले होते.. गेले कसेबसे तीन चार दिवस ती आली पुन्हा .. ऑफिस झाले सुरु.. गाठी भेटी पण झाल्या ..हा बाबा नव्या जोशात अवतरला.. मनात काहीतरी बोलायचं ठरवून तिच्याकडे गेला
ती मात्र नेहमीप्रमाणेच हाय.. बाय.. कसा आहेस वगैरे.. वगैरे..
भेटल्यावर कळलं ती गेली होती मूळगावी... मग इकडच्या तीकडच्या गप्पा .. किस्से..
ह्याला मात्र वेगळेच टेन्शन... त्यात तिला आला फोन..
आज मात्र हळूच गेली बाजूला बराच वेळा बोलत .. हा बसला ताठकळत ..
ह्याची झाली बत्ती गुल.. कोणाचा असेल हा फोन.. कोणाशी बोलत असेल ही.. हात पाय लटपट ..या आधी असं कधी नाही घडलं
एक न अनेक प्रश्न .. न लक्ष्य खाण्यात न पिण्यात ...
एकटक तिच्या दूरवरच्या बोलण्यात...अखेर ती आली निघते म्हणत लगोलग निघाली
हा नाखुषेने हो ठीक आहे परत उद्या म्हणून निघाला...
झालं आठवडा याचा असाच गेला हुरहूर मनाची वाढत गेली
ह्याच तिला फोनवर बोलताना पाहणं.. उगाच काळजात धस्स होण... सारख तिचाच विचार करण.. मन मोकळ कराव असे सारखे वाटणंकाय वाट्टेल ते होईल.. सगळं कसे सांगून मोकळ व्हायचं... खुरडत कुठवर जगत राहायचं
मग पुन्हा कॉफी.. वगैरे खाण पिणं ...गप्प्पा टप्पा...आली एक वेळ.. साधला याने मेळ
बोलून टाकलं सगळं.. कसं झालं मन मोकळ मोकळ
ती तशी practical.. शुद्ध न हरपता सहज बोलली.. हे तुला आजच कां सुचलं
त्यान तिला सगळ खर खर सांगितलं... मग ती ओशाळली .. आधीच का नाही बोललास .. आता मात्र उशीर केलास.. मुळगावी माझ ठरलं.. त्याला मी कधीच हो म्हटलं...
तो जागेवरून आठ इंच उडाला .. म्हणजे आधी कां नाही बोलला याचा अर्थ काय?
म्हणाली ती.. मी विचार केला असता.. तुझ्या प्रस्तावाचा.. तुला होकार देण्याचा विचार केला असता.. तुझ्यात काहीच कमी नाही.. पण असू देत आपण चांगले मित्र राहू.. आहोत आणि तू जास्त गुंतू नकोस म्हणून नुघून गेली.. आता मात्र भेटीगाठी मंदावल्या.. तिच्या साखरपुड्याची, लग्नाची  तारीख ठरल्याची वार्ता आली... तो विस्कटला... गहिवरला.. एकटा एकलकोंडा राहू लागला...गर्दीतपण एकटाच चालू लागला.. स्वतःला स्वतःचा राग येऊ लागला...
पुन्हा ऑफिस.. पुन्हा काम..सवयीच झालं... मन मात्र कुठेतरी झुरू लागलं तिचे हाय बाय चालूच होते पण कोरडेपणा वाढला..
बोलण्यातला कृत्रिमपणा जाणवला..... मनाला लागलेली तडस संपायला वेळ लागला...काळ सरला.. हा रुळला ... नोकरी सोडावी हा विचार पुन्हा डोकावू लागला..
झाली नव्या नोकरीची शोधाशोध.. मिळाली नोकरी पार्टी झाली सेंड ऑफ झाला..
तिने खास भेट दिली कॉफीचा मग..
नव्या नोकरीत हा रमला.. तिचे पुढे व्हायचे ते झाले.. हा मात्र खूपच दुरावला जाणूनबुजून ऑरकुट  पाहू लागला...
बराच काळ गेला.. हा पण नव्या मित्रात रमला.. मन मात्र रुक्ष रुक्ष...
पुन्हा ती भेटली जरा एकटी एकटी वाटली..
ह्याने पाहताच थबकली...
हाय हेलो झाले.. कसा आहेस.. काय करतोस.. कुठे असतोस.. वगैरे वरवरचे बोलणे झाले..
तीच कसे सुखात चालू असेल असं याच्या मनात चालू होतं.. ती मात्र कोरड्याने बोलत होती...
मग पुन्हा एक दोनदा गाठी भेटी...
तशी ही त्याला टाळू लागली.. ह्याची बेचैनी आणखी वाढू लागली..
मग मात्र याने पुढाकार घेत सगळ काय आहे म्हणून विचारणा केली.. हळूहळू ती मोकळी झाली... practically कोण कसं चुकल सगळ कसं पारदर्शीपणे सांगू लागली...
ह्याला मात्र वेगळाच अनुभव आला तिच्यातून बाहेर पडून त्रयस्थपणे  जगाकडे पाहू लागला..
मग कधीतरी असेच भेटणं होते.... ती एकटीच हा एकटाच..
एक सुन्न शांतता...
कॉफीचे मग रिते होऊ लागले..
निशब्द शांतता..
रस्ते वाहतात.. दिवे लागतात...दिवस जातो येतो... पुन्हा त्याच ठिकाणी ते भेटतात... वरवरच्या गपा गोष्टी.. अगम्य शांतता.. स्तब्ध संवाद ...मनातल्या मनात कल्लोळ...

--------------------------
भूषण वर्धेकर
मार्च २००७
पुणे रेल्वे स्टेशन
-------------------------

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

रिकामे साक्षीदार

आपण फक्त रिकामे साक्षीदार
जगात चिरकाल फक्त काळ
शेवटल्या श्वासाचे दावेदार
बाकी उर्वरीत संथ मवाळ

गर्क आयुष्यातल्या सुंदोपसंदी
अकल्पित वास्तवाच्या गाभ्यात
मखमली दूरस्वप्ने मावळती
संसारचूलीच्या निवलेल्या राखेत

पूर्वापार श्रद्धेची खंगलेली जळमटं
सणासुदीच्या उभ्या आडव्या भिंती
चौफेर आयुष्याला व्रतवैकल्याची चौकट
घुसमटीची बंदिस्त दिखाऊ बांधिलकी

मुदतीच्या जगण्यातला एकसूरी पाठ
उपजीविकेसाठी दाही दिशा फरपट
पोटाच्या भुकेला पर्याय भरमसाठ
निर्दयी नियतीचं काळाशी साटंलोटं

मृत्यूच्या फेऱ्याला दैवाची बोळवण
मातीमोल देहास किरवंताचे संस्कार
पाप-पुण्य, गतजन्माची तार्किक उधळण
अखेर उरतो एकाकी काळाचा आधार

भूषण वर्धेकर
29-10-2015
रात्रौ 10:30
हडपसर

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी  तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघर...