शनिवार, ३० जून, २०१८

वैचारिक -१

कॉंग्रेस, भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष हे केवळ लोकशाहीचे मुखवटे आहेत. खरा देश चांडाळ चौकटी चालवत आहे. या चांडाळ चौकटीत देशातील व परदेशातील गुंतवणुकदार, कार्पोरेट  व इंडस्ट्रियल लॉबी, मेडिया हाउसेस मँनेज करणारे आणि तथाकथित धर्माचे ठेकेदार असे सगळे येतात. त्यामुळेच मतदानाच्या वेळी सर्वाधिक ध्रुवीकरणासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातपातधर्म. त्याचा वापर पुरेपूर करुन घेण्यासाठी राजकारणी नेहमीच तयार असतात. शिकले सवरलेले पण याला बळी पडतात. घडलेल्या घटनांचा केवळ जातपातधर्म यावर आधारित उल्लेख करणारे स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणवून घेतात. आजचा काळ खऱ्या अर्थाने सदैव सतर्कतेचा आहे कारण व्यक्त झालेले संवाद आणि लेखणीतून झिरपलेले शब्द कुठेना कुठे नोंद केला जातोय हे ध्यानात ठेवले पाहिजे. समाजमाध्यांचा अविरतपणे केला जाणारा भडीमार याला कारणीभूत आहे. विशेषतः अमुक एका गटाला लक्ष्य करून वृत्तांकन केले जाणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही. मग ते वृत्तांकन विरोधाचे असो वा समर्थनार्थ. एखाद्याविषयीची भूमिका सांगणं आणि कसलीही शहानिशा न करता सरळसरळ त्याला गुन्हेगार वा देवदूत ठरवणं हे सध्याच्या काळातील अत्यंत कलंकित गोष्ट आहे. यात येनकेनप्रकारेण आपण सर्वजण सहभागी होतोय कळतनकळतपणे. देशात प्रत्येक घडणाऱ्या घटनेला जातपातधर्माच्या चष्म्यातून पहाणे आणि त्यावर आपापल्यापरीने सोयीनुसार भूमिका वा मत व्यक्त करणे हे धोक्याचे आहे. हे करून केवळ आपण कसे संवेदनशील वगैरे आहोत हे दाखवणे म्हणजे वैचारिक नतद्रष्टेपणाचे लक्षण आहे. भारत हा सार्वभौम देश आहे त्याचा भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पसारा हा विविधांगी आहे. त्यामुळे भारतात होऊ घातलेली स्थित्यंतरे, केले वा लादले जाणारे सामाजिक बदल हे एका दिवसात होणे शक्य नाही. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात अनेक बदल या देशाने अनुभवलेत. काही बदल सरकारातील चांगल्या योजनांमुळे झालेत तर काही सत्तापिसासू वृत्तीने लादल्यामुळे. काही बदल तर परकीय शक्तींच्या दबावापोटी देशावर लादले गेले आहेत. आपल्या देशात अजूनही कित्येक प्रश्न, समस्या आहेत ज्यांना केवळ जबाबदार नसून आपण भारतीय नागरिक म्हणून देखील जबाबदार आहोत. जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे मिरवून काही उपयोग नाही. अमुक एक पक्ष लोकशाही संपवायला आलेत वा लोकशाहीचा गाभा म्हणजे संविधान बदलले जाईल असे भितीदायक वातवरण करून आडकाठी करण्यात काही अर्थ नाही. बाबासाहेबांनी देशाला दिलेली लोकशाही इतकी कमकुवत नाही की कोणीही यावे आणि बदल करावे. त्यासाठी संविधानिक निती, नियम आणि पद्धती आखीवरेखीव आहेत. त्यानुसारच देश चालतो. लोकशाही संकटात म्हणून जनतेची दिशाभूल करणे २०१८ मध्ये तरी थांबवावे. सरकारने आणि विरोधकांनी मिळून देशाची लोकशाही अबाधित ठेवली पाहिजे. लोकशाही सुदृढ ठेवायची असेल तर प्रत्यक्षपणे नागरिक म्हणून प्रत्येकाचेच योगदान गरजेचे आहे. त्यासाठी आपण जे निवडणूकीत मतदान करतो ते प्रामाणिकपणे आणि कसल्याही जातपआतधर्माच्या निकषांवर आधारित नसावे. कित्येक पक्ष निवडून येण्याची क्षमता असलेले म्हणजे पैसा ओतणारे उमेदवारांना तिकीटे देतात आणि ते निवडून येतात ही चूक मतदान करणाऱ्यांची. इथे लोकशाहीचा आणि पर्यायाने त्याच्या साधनांचा, आयुधांचा गैरवापर होतो.
आपल्या व्यवस्थेचा गिचका झालेल्या परिस्थितीला केवळ सरकार वा विरोधक हेच जबाबदार नसून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपणही आहोत. नकारात्मक वातावरण निर्मिती करून निवडणुका आपल्या पथ्यावर पाडून कशा घ्यायच्या हे राजकीय पक्षांना चांगलेच ठाऊक आहे. महत्वाच्या प्रश्नांना वा समस्यांना फाटा देऊन नको त्या गोष्टींची चिकित्सा करण्यात माध्यमांची जूनी खोड आहे. जे खपले जाते ते आम्ही विकतो ही निव्वळ सौदेबाजी सध्या राजरोसपणे चालूय. (क्रमशः)

© भूषण वर्धेकर

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या

असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या
होय तुम्ही तिघी फार भाग्यवान आहात
तुमच्यावर झालेल्या पाशवी अत्याचाराला वाचा फुटली
सगळी माध्यमं तुमच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेत,
भारतातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिक या घटनेचा निषेध करतोय पण,
स्वार्थी, भांड मेडिया तुमच्या घटनांचा तपशील टिरापीसाठी रवंथ करतोय
हुकलेले बिनडोक राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून संधी साधून घेताहेत
संधीसाधू विचारवंत, कलावंत आपापली सोशल सेन्सेस जागरूक ठेवण्यासाठी सिलेक्टिव्ह निषेधाची नौटंकी करत आहेत
सद्सद्विवेक बुद्धी बाजूला ठेवून बरबटलेले ज्ञानी महात्मे जातपातधर्माच्या कुंठीत अस्मिता धारदार करतायत
एक माणूस म्हणून सध्याचा समाज गाभडत चाललाय
सत्तापिसासू परमपूज्य थुकरट माननीय सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांच्या उखळ-पाखळ काढण्यात व्यस्त आहेत
ज्याला त्याला आपापली दुकानदारी चालवून प्रतिमा स्वच्छ करायचीय
घृणास्पद आणि निर्घृण हे शब्द पण रुसलेत
स्वयंघोषित संस्कृतीरक्षक अजूनही आदेशाची वाट पाहत बसलेत निषेधासाठी
षष्प झाल्या संवेदना अन् विकृतीचे उदात्तीकरण
इथे सगळ्यांनाच न्यायालयाने आपापल्या सोयीनुसार निकाल द्यावा असे वाटते
कहर करतात मनासारखा निकाल नाही लागला तर
सोयीनुसार संविधान बचाव अन् निषेध यांच्या मोर्च्याचे पेड इव्हेंट होतात
तरीदेखील
असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या
होय तुम्ही तिघी फार भाग्यवान आहात
मी मात्र नाही....
मी कोण ?
मी एक अशीच पिडीत दूर्दैवी, हवालदिल स्त्री, अल्पवयीन मुलगी अन् म्हातारी
मी एक कधी शोषित तर कधी सो कॉल्ड उच्चभ्रू परंतू कायमस्वरुपी दुर्लक्षितच माध्यमांपासून, विचारवंतापासून, असंतुष्ट राजकिय गटातटापासून
मी एक अशीच सार्वभौम भारतातील प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारातील एकमेव अमुक तमुक प्रधान संस्कृतीतील अभागी अबला
मी एक अशीच सोयीस्कररित्या जातपातधर्मात वाटली गेलेली कुटुंबवत्सल
मी एक अशीच भोगासाठी आसुसलेल्या नामर्द नजरा सहन करणारी
मी एक अशीच समाजाने लादलेल्या चालीरितीत रूतल्याने स्वत्व हरवलेली
------------------------------------
©भूषण वर्धेकर
१५ एप्रिल २०१८
हैद्राबाद
------------------------------------

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

मी एक एकटा भरकटलेला

मी एक एकटा भरकटलेला
एकांतवासात गुदमरलेला
झगमगत्या उंच मनोऱ्यात
बंदीवासात तरफडलेला

भौतिक सुखांसाठी हपापलेला
ऐशोआराम टिचभर पोटाला
लखलखत्या चंदेरी स्वप्नात
जुंपलो बैलांच्या घाण्याला

कस्पटासमान मानून नैतिकतेला
बुद्धीसकट विकले स्वतःला
मस्तवाल कलाकारांच्या दुनियेत
तोचतोचपणा मेटाकुटीला

सुखवस्तु लोकांच्या मनोरंजनाला
विस्कटलेल्या कलेचा हवाला
जीर्ण संवेदनेच्या चित्रनगरीत
उच्च भाव इथे कुटुंबकल्लोळाला

गिचमीड लेखण्या निर्ढावलेल्या
गृहीत धरुन सर्जनशिलतेला
मध्यमवर्गीय किर्द पठडीत
ठोकताळे घरगुती चौकटीला

वाहिन्यांनी बाजार मांडला
उथळ विषयांचा बोलबाला
क्षीण कथासूत्रात खितपत
फाट्यावर मारून प्रगल्भतेला

शून्य मानधन वैचारिकतेला
निर्मितीमुल्ये उंची दिखाव्याला
नवनिर्मिती काढून मोडीत
नॉस्टॅल्जिक चिखलात माखलेला
-----------------------------------------
भूषण वर्धेकर,
१० नोव्हेंबर २०१७
रात्रौ ११:२५
हैद्राबाद
-----------------------------------------

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

हा आसमंत माझा

हा आसमंत माझा
मी अनन्यसाधारण त्यापुढे
उद्विग्न मनोधारणेच्या पाऊलखुणा उन्मत्तपणे उधळल्या चौफेर
कणाकणांत गहिवरला सूक्ष्म उर
गजबजलेल्या तिन्ही दिशा माझ्या पाठी
नजर मात्र रोखून उर्वरीत दिशेला
गरजत आलो मी जिंकून नैराश्य
अनंत अवकाशात मी फैलावून बाहू
गतकाळच्या चुका चूलीत घालून
नवनिर्माणाच्या हाकेला सकारात्मक हुंकार
किर्र अंधारातली तिरिप हाताशी
उजळून टाकाया आयुष्य सुंदर
मी तयार आहे… या दुःखांनो
झेलायला अणूकुचीदार शस्त्रे
निधड्या छातीने सामोरे जाऊन
खंबीरतेने मागे न रत्तीभर हटता
ऊठा.. ऊठा.. भूमीपुत्रांनो
वैरी आपल्याच मानगुटीवर
खेचा खाली त्याला
तुडवा पायदळी.. फडकवा लक्तरे त्याची
म्यान झालेल्या तलवारी पुन्हा उसळू द्या
भेदून टाका त्या जखमा विव्हळणाऱ्या..
कुरवळणाऱ्या धुंदीत गुलछबू मनाच्या
चिरफाड करा तुमच्या नतद्रष्ट संकुचित विचारांची
येऊद्यात फुत्कार मानव्याचे
ससेहोलपटत असणाऱ्या शूद्र मनाला
पोकळ विचारसरणीचा आधार
द्या झुगारून अखंड वरात
तुम्हाला मागे खेचणाऱ्यांची
घ्या हाती शस्त्रास्त्रे बिमोड करायला
कमकुवत स्वप्ने अन् मुडदूस ध्येयाची करा राखरांगोळी…..
एक व्हा… सज्ज व्हा.. दक्ष व्हा…

----------------------------
भूषण वर्धेकर
१४ जूलै २०१६
रात्रौ १०:००
हडपसर
-----------------------------

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

येथे मृत्यूचाही बाजार होतो

येथे मृत्यूचाही बाजार होतो
सोबत उथळ विचारांचा बागुलबुवा
मेलेल्यांचा जात, धर्म पाहून होतो निषेध
विचारसरणीच्या सरणावरती असतो इव्हेंट
मानवतेच्या उदरात उजवे डावे वेगळे होतात
उथळ विचारांच्या कोशात विचारजंत एक होतात
आमचा मेला तर असहिष्णुता तुमचा मेला तर पूर्वाश्रमीचे पाप
अशाच कमकुवत बौद्धिक चर्चा जोरजोरात
उकरुन काढतात जूने संदर्भ आपल्याच विचारसरणीचे राखून अबाधित हक्क
काढले जातात जात-पात अन् धर्माचे वाभाडे
विखुरलेले वैचारिक नागडेपणाचे आखाडे
आहेत नंतर मोर्चे, शोकसभा अन् आणाभाका
शिणलेल्या क्रांतीचा निपचित फौजफाटा
आरोप प्रत्यारोप संकुचित बुद्धिमत्तेचा उरुस
सळसळतात लेखण्या, कुंचले वृत्तपत्रातून
सोयीनुसार संदर्भ, नोंदी पानापानांतून
कोणाची मुस्कटदाबी, कोणाचा बुलंद आवाज
जो तो आपआपल्या विचारांचा घेऊन झेंडा
थोटक्या बुद्धिमत्तेचा विस्कटलेला गावगाडा
गंजलेली निषेधाची हत्यारे, बुरसटलेली भाषणे,
रुतलेली दांभिकता, विद्वत्तेचा गजकर्ण,
ढोंगी विचारस्वातंत्र्याची दिवाळखोरी,
विस्कटलेल्या मानवतेची मक्तेदारी
दुभंगलेली देशाची दुनियादारी

---------------------------
भूषण वर्धेकर
७ सप्टेंबर २०१७
९:५० AM

रविवार, ३० एप्रिल, २०१७

आयुष्याच्या उधळलेल्या


आयुष्याच्या उधळलेल्या आकांक्षा
आक्रोशातल्या होरपळलेल्या भावना
भावबंधाचे निसटलेले किनारे
करूणेचे ढासळलेले मनोरे

गाभाडलेल्या ईच्छा अन् मनोकामना
निखाऱ्यात विसावल्या संवेदना
मर्दुमकीचे फोडलेले अचाट टाहो
चिरकाल धुमसत स्मरणात राहो

एकांतातले निपचित विचारचक्र
गर्द आठवणीत पाणावलेले नेत्र
कस्पटासमान रूतलेले आस्तित्व
विरहातलं एकलकोंड ममत्व

पुसलेल्या पाऊलखुणांच्या वाटा
अनाकलनीय गूढ जगरहाटा
हुंदक्यामधली सूक्ष्म स्पंदने
कर्दमलेली आभासी मने

घुसमटीची कर्णकर्कश्य ललकार
स्वप्नांतल्या दुनियेची तीक्ष्ण चिरफाड
काळोखाच्या अतर्क्य उलाढाली
मेटाकुटीचे जगणे नियतीच्या  हवाली

---------------------------
-- भूषण वर्धेकर
 हडपसर, पुणे
रात्रौ ११:००
१७ एप्रिल २०१७
-----------------------------

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

असंख्य प्रश्नांचा बोजवारा

असंख्य प्रश्नांचा बोजवारा
मनात कोंडून प्रत्येकजण
घुसमटताना दिसतो
ज्याचा त्याचा पिंड वेगळा
कोणी जगण्यसाठी तर
कोणी जगवण्यासाठी....
मी मात्र अजागळ
सर्व दु:खेही केवळ माझ्याशीच...
असा बाऊ करत भैसटतो..बिथरतो...
शोधत कारणं
धगधगतं सत्य...ग्रोन अप काळ
असुरक्षितता भविष्याची
असो... सध्यातरी माझा
फुल टाईम स्ट्रगल चालू आहे....

भूषण वर्धेकर
७/९/२००९
पहाटे ३.१५
समाज

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...